काश्मिर सफर...
पहिला दिवस 21.05.24
दुपारी साडेतीन वाजता सहकुटुंब श्रीनगर विमानतळावर उतरलो....तेथे गाडी तयारच होती... ड्रायव्हर ओईसने सामान गाडीत ठेवायला मदत केली... विमानतळावर भव्य फडकता तिरंगा आणि त्याखाली शहीद स्मारक पाहून मन अभिमानाने उचंबळून आले...
बदलाचे वारे वहात असल्याचे जाणवले... विमानतळावरील लोकल गाईड आणि विमानतळ कर्मचारी सर्व टुरिस्टना अतिशय अदबीची वागणूक देत होते... आपले प्रीपेड फोन येथे चालत नाहीत... म्हणून सर्वांसाठी एक सिम कार्ड घेतले...
दुपारचे जेवण झाले नसल्यामुळे सर्वांना दल झिल समोरील शाह कॅफेटरीया मध्ये पॅटीस, बर्गर, फ्रेंच फ्राईज ट्रीट मिळाली... वर काश्मिरी कावा घेतला...
तेथून तडक मुघल बागेत गेलो... आ हा हा !!! अप्रतिम लॅण्डस्केप आणि झील पाहून मन अतिशय प्रसन्न झाले... फोटोग्राफीची पर्वणी होती...नाचणे, बागडणे, धावणे, चालणे, हरखून जाणे, निसर्ग कवेत घेणे, डोळ्यात आसमंत साठवणे... या सर्व अनुभवांची एकत्रित परिणीती साठली होती... आसमंताची निळाई आणि झाडांची पानांची हिरवाई धरणीवर अवतरली होती... फुलांच्या रंगसंगती डोळ्याचे पारणे फेडीत होते... भान हरपणे काय असते... याचा प्रत्यक्ष अनुभव येत होता...
सायंकाळी दल झीलवर विसावलो... सूर्याचे हिमालयाच्या आड लपणे आणि आकाशाला सोन्याची लालिमा देण्याची कलाकुसर पाहणे... ही ध्यानधारणा होती... मुले स्पीड बोटीतून फिरून आली... यावेळी आईसक्रीम खाणे म्हणजे डोळ्याबरोबर रसना तृप्त करणे होते...
दल झीलची झलक अनुभवली होती... समोरच असलेल्या आलिशान ड्यूक हॉटेलमध्ये गाडी विसावली... ॲंटिक लाकडी कलाकुसर असलेले हे हॉटेल पहिली पसंती होती...
सकाळी मुंबईत होतो तर संध्याकाळ श्रीनगर मध्ये आलो... येथे वातावरणाशी एकरूप होण्यासाठी तीन दिवस राहणे आवश्यक होते..
सुरू झाली होती काश्मिर सफर... सहकुटुंब...
जय श्री राम...