Wednesday, April 8, 2026

सायकल सफरीची खरी शिदोरी: अनुभवातून सापडला सुरक्षिततेचा मार्ग...

सायकल सफरीची खरी शिदोरी: अनुभवातून सापडला सुरक्षिततेचा मार्ग... दिनांक ०८ एप्रिल २०२६

खूप वर्षांच्या टुरिंग अनुभवातून सायकल आणि सफर यांचं एक सुंदर नातं जुळल आहे… आणि त्या नात्याने अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत...

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात लोकलने सायकल घेऊन जाणं म्हणजे जणू एक आव्हानच असते... लगेज तिकीट मिळवण्याची धावपळ, कंडक्टरकडे दंड भरण्याचा वेळेचा अपव्यय आणि गाडी चुकण्याची भीती... या सगळ्यामुळे अनेक वेळा नाईलाजाने लगेज तिकीट न काढता प्रवास करावा लागतो...

लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये सायकल पाठवणं ही देखील एक वेगळीच परीक्षा असते... मेल एक्स्प्रेस गाडीच्या लगेज मध्ये सायकल जमा करणे साठी बरेच पेपर वर्क करावे लागते आणि आपण प्रवास करत असलेल्या गाडीतूनच सायकल येईल याचा सुद्धा भरोसा नसतो...

 हल्ली  बऱ्याच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे लगेज प्रायव्हेट झाले असल्यामुळे... त्याचे कॉन्ट्रॅक्टर अव्वाच्या सव्वा पैसे लगेज म्हणून मागतात... तसेच रेल्वे प्राधिकरण मार्फत अथवा खाजगी कंत्राटदार यांच्या मार्फत सायकल पाठविणे म्हणजे उतरताना आपली सायकल कोणत्या परिस्थितीत मिळेल याची काहीच गॅरंटी नसते... बऱ्याच वेळेला मधल्या स्टेशनवर सायकल उतरवणे देखील जिकिरीचे असते... 

काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग करताना... आमची तिकीटे माता वैष्णो देवी कटरा पर्यंत होती... पण लगेज बोगी जम्मू तवी पर्यंत असल्यामुळे आम्हाला जबरदस्ती जम्मू तेथे उतरावे लागले होते..

खाजगी कंत्राटदारांची अवास्तव मागणी, सायकलची सुरक्षितता याबद्दलची अनिश्चितता तसेच गाडीतून उतरल्यावर सायकल कोणत्या अवस्थेत मिळेल याची चिंता... हे सगळं अनुभवताना अनेक वेळा सायकलचे नुकसान सहन करावं लागलं...

अरुणाचल प्रदेश येथील तीन सुखिया येथून पाठवलेली सायकल मुंबईत चाक निखळलेल्या अवस्थेत मिळाली होती... रेल्वेने सायकल नेताना बऱ्याच वेळा ब्रेक आणि डीरेलर खराब झालेले आहेत... 

मागच्या वेळेला निलगिरी सायकल टूर करताना म्हैसूर वरून सायकल डिस्मेंटल करून आम्ही बसण्याच्या बोगी मध्ये घेतल्या होत्या... पण सायकली गोणीत किंवा बॅग पॅकिंग केल्या नव्हत्या... त्यामुळे आमच्याकडून दंड वसूल करण्यात आला होता...  

या सर्व अनुभवांनी एक गोष्ट स्पष्ट झाली होती... सायकल आपल्या सोबत असेल तरच ती सुरक्षित राहते...

आता अरुणाचल प्रदेशात शेला पास आणि तवंग सायकल सफर करतोय... गौहती पर्यंत रेल्वेने जायचे आहे... म्हणून या वेळेस एक ठाम निर्णय घेतला... प्रत्येकाने सायकल डिस्मेंटल करून व्यवस्थित गोणी किंवा बॅगमध्ये पॅक करूनच कुर्ला टर्मिनस स्टेशन येथे यायचे...


जितेंद्र जैन सायकल चालवत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचला, तर महेंद्र निकमने कुर्ला टर्मिनस येथे ट्रेनने सायकल आणली. स्टेशनवरच सायकल डिस्मेंटल करून सर्वांनी नीट पॅकिंग केलं. माझ्यासह विशांत, नवनीत आणि विकास यांनी आधीच सायकली बॅगमध्ये बंद करून आणल्या होत्या.

2 टायर AC डब्यात सर्व सायकली अत्यंत सुरळीतपणे ऍडजस्ट झाल्या. कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, कोणतीही कुरबुर नाही... अगदी आरामात सीटच्या खाली ठेवल्या... सोबतचं सामानही सहज मावलं.


भुसावळ येथे टीसी बदलला, आणि तेव्हा एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला... एस. पी. महाले यांनी “Happy Journey, Happy Cycling!” अशा शुभेच्छा दिल्या, तर बदली आलेल्या टीसी मनीष मिश्रा यांनी हसतमुख स्वागत केलं. या छोट्या गोष्टी प्रवास अधिक आनंददायी करून गेल्या...
या संपूर्ण अनुभवातून एक मौल्यवान शिकवण मिळाली...

आपली सायकल डिस्मेंटल करून व्यवस्थित पॅक करून, ती आपल्या सोबत ठेवून प्रवास करणं हेच सर्वात सुरक्षित, सोयीचं आणि आनंददायी आहे...


प्रवास नेहमी अनुभव समृद्ध करतो, शिकवतो आणि प्रत्येक वेळेला अधिक सजग बनवतो. 

सतीश विष्णू जाधव
सायकलिस्ट
7977690693

Wednesday, March 11, 2026

श्री. बजरंग बनसोडे (म.पो.से.), पोलिस उप आयुक्त... एक ग्रेट भेट... दि. १० मार्च२०२६

श्री. बजरंग बनसोडे (म.पो.से.), पोलिस उप आयुक्त, गुन्हे प्रतिबंधक शाखा, मुंबई... संवेदनशीलता, निसर्गप्रेम आणि माणुसकीची आस असणारे आणि जपणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व... आज त्यांच्या सहवासात अनुभवलेले क्षण माझ्यासाठी एक संस्मरणीय ठेवा झाला आहे...


बुलढाण्याचे सायकलिस्ट परममित्र संजय मयुरे यांच्या भारत परिक्रमा आरंभ समारंभात बनसोडे साहेबांची प्रथम भेट झाली होती... त्या कार्यक्रमात संजयची मयुरेची घेतलेली मुलाखत आज बनसोडे साहेबांच्या मार्फत मिळाली आणि तोच धागा पकडून भेटीसाठी वेळ मागितली... दुपारी तीन वाजताची वेळ मिळाली... या भेटीसाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि सायकल मित्र सुवर्णा अडसुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले...


भेट होताच साहेबांचा पहिला प्रश्न होता... “ओळखलं काय?” त्यावर सहज उमटलेले उत्तर होते... खेळाडूंना वेळ देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्याला बरे कोण विसरेल?

पहिल्याच भेटीत प्रेम, आत्मीयता आणि जिव्हाळ्याची ओढ अनुभवायला मिळाली...

केबिनमधील अभ्यागतांच्या कोचावर आदरपूर्वक बसवले गेले. फक्कड चहाच्या सोबतीने गप्पांची रंगलेली मैफल मनात घर करून गेली...

टुरिंग सायकलिंगमधील विविध उपक्रम, शिव चातुर्य दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेली गरुडझेप सायकल मोहीम, आणि खऱ्या इतिहासाची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न याविषयी तसेच दोन वेळा पार पडलेल्या विश्वविक्रमी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेबद्दल बोलणे साहेब अतिशय एकाग्रतेने ऐकत होते...

संवादाच्या ओघात त्यांनीही अशी मोहीम करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा मोहिमेसाठी योग्य वेळ काढता येईल, फक्त या व्यग्र जबाबदाऱ्यांमधून किमान तीस दिवसांची सुट्टी घ्यावी लागेल.. असा मनमोकळा संवाद रंगला...

साहेबांच्या केबिनमध्ये असलेली विविध झाडे, इनडोअर रोपटी आणि हिरवाई पाहून त्यांच्या निसर्गप्रेमाची आवड लक्षात आली... त्या अनुषंगाने बोलताना गावाकडे तब्बल दहा एकर क्षेत्रात विविध झाडे लावल्याचे त्यांनी सांगितले...

फळझाडे, फुलझाडे आणि पक्षी प्राण्यांसाठी जपलेले ते छोटेसे निसर्गविश्व... निरपेक्ष प्रेमाचा अनुभव देणारे आहे... आणि एक वेगळ्या भावविश्वात नेणारे आहे... हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले...

गाय वासरू, हरण, कुत्रा, मांजर, खार, ससा, राजहंस, पोपट, कबुतर तसेच विविध पक्षी… अशा अनेक प्राण्यांशी जुळलेला त्यांचा जिव्हाळा ऐकताना मन भारावून गेले...

एखादा आजारी कोंबडा औषधोपचाराने बरा करणे, दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मांजर केवळ आवाजावरून आपला मार्ग शोधत जगणे, आजारी घुबड किंवा कबुतरांना आधार देऊन पुन्हा निसर्गात सोडणे... या प्रत्येक गोष्टीतून त्यांच्या मनातील करुणा आणि मायेची ओल पक्षी प्राणी प्रेम अतिशय भावले...

निरपेक्ष प्रेमाची खरी भाषा प्राणी पक्षी शिकवतात, हे त्यांच्या अनुभवातून प्रकर्षाने जाणवले...

या संवादात आणखी एक गोष्ट विशेष लक्षात आली... मंत्रालयातून आणि पोलिस विभागातून वरिष्ठांचे फोन सतत येत होते... त्यांना हवी असलेली माहिती देताना... आपल्या प्रत्येक सहकाऱ्याशी, कर्मचाऱ्याशी बोलताना त्यांच्या आवाजात प्रेम, संयम आणि आदर जाणवत होता...

पद मोठे असले तरी माणुसकी अधिक मोठी असते... सरांच्या व्यक्तिमत्त्वाची ही आगळी वेगळी ओळख मनात त्यांच्या बद्दल एक आदरच स्थान निर्माण करून गेली...

फिटनेस जपणारे, धावणारे, पोहणारे, सायकल चालवणारे, मोटारसायकलने भ्रमंती करणारे, मित्र जोडणारे, निसर्ग प्राणी पक्ष्यांवर नितांत प्रेम करणारे आणि माणसांबद्दल आत्मियता जपणारे असे हे व्यक्तिमत्त्व भेटले... हीच आजची खरी “ग्रेट भेट” होती...

अशा संवेदनशील, प्रेरणादायी आणि मनाने अतिशय श्रीमंत असलेल्या अधिकाऱ्यांची भेट जीवनाला नवी ऊर्जा देऊन गेली...


सतीश कुसुम विष्णू जाधव
सायकलिस्ट
7977690693


Tuesday, March 10, 2026

जाता संतांच्या गावा” दि. ०८ मार्च २०२६

जाता संतांच्या गावा”  दि. ०८ मार्च २०२६

घुमान सायकल वारीचे संयोजक सूर्यकांत भिसे गुरुजी यांचे सुपुत्र स्वामीराज भिसे यांनी संतपरंपरेचा सखोल  अभ्यास करून लिहिलेल्या “जाता संतांच्या गावा” या ग्रंथाचे प्रकाशन काल रानडे इन्स्टिट्यूटचे सभागृह, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे येथे संपन्न झाला. 

मा. डॉ. सदानंद मोरे... अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मा. राजेश पांडे... संचालक, राष्ट्रीय पुस्तक न्यास, मा. डॉ. संजय विष्णू तांबट... अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मा. सचिन परब... संपादक, वार्षिक रिंगण, मा. कृष्णकुमार गोयल... अध्यक्ष, खडकी शिक्षण संस्था, मा. डॉ. संजय चाकणे... सहसचिव, खडकी शिक्षण संस्था, कॅप्टन आत्मसिद्ध भिसे... चेअरमन, मा.सै. सह. पतसंस्था दिघी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. 

संतांच्या ओव्या, अभंग, समाधी स्थळे, मंदिरे आणि संतपरंपरेचा विद्यमान समाजजीवनावर असलेला प्रभाव यांचा सखोल अभ्यास करून स्वामीराज भिसे यांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून हा ग्रंथ साकार केला आहे. संतसाहित्याचा आशय, त्यामागील अध्यात्मिक विचार आणि समाजजीवनातील प्रेरणादायी भूमिका यांचे अभ्यासपूर्ण चित्रण या ग्रंथात आढळते. त्यामुळे हा ग्रंथ संतपरंपरेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार आहे.

या प्रकाशन सोहळ्याला पंढरपूर ते पंजाब... घुमान सायकल वारीचे सर्व सक्रिय सदस्य मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. संतपरंपरेचा वारसा जतन करण्याच्या या उपक्रमाचे सर्वांनी मनापासून स्वागत केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वामीराज भिसे यांच्या संशोधनपर कार्याचे कौतुक करत संतविचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या या प्रयत्नाला मोठे महत्त्व असल्याचे सांगितले.

स्वामीराज सूर्यकांत भिसे लिखित जाता संतांच्या गावा...  या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक अत्यंत अर्थपूर्ण चित्र आणि त्यासोबत एक चिंतनशील कवन दिसते...

संत केवळ मंदिरातच सापडत नाहीत; ते भेटतात रस्त्यावर, गर्दीत, विसरलेल्या गल्ल्यांमध्ये आणि आपल्या मनाच्या खोल तळाशी...

या ओळींतून संतत्वाचा व्यापक अर्थ उलगडतो. संत हे केवळ मंदिरात पूजले जाणारे व्यक्तिमत्त्व नसून ते जीवनाच्या प्रत्येक प्रवाहात अनुभवता येणारे चैतन्य आहेत. समाजाच्या गजबजाटात, दैनंदिन जीवनाच्या धावपळीत आणि माणसाच्या अंतर्मनात त्यांचे विचार सतत मार्गदर्शन करत असतात...

चित्रात दिसणारी होडी या विचारांचीच प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. चारही बाजूंना पसरलेली पाने, जणू संतांच्या अभंगांची, ओव्यांची आणि त्यांच्या अनुभवसंपन्न वाङ्मयाची आठवण करून देतात. त्या ज्ञानसमुद्रात ही छोटीशी होडी आपला मार्ग शोधत पुढे सरकत आहे...

होडीवरील भगवा ध्वज संतपरंपरेतील त्याग, अध्यात्म आणि प्रेरणेचे प्रतीक आहे... जशी होडी लाटांमधून वाट काढते, तशीच संतवाणी जीवनातील गोंधळातून माणसाला योग्य दिशा दाखवते...

या चित्राचा आणि कवनाचा  एकत्रित भावार्थ असा की, संतांचा शोध घेण्यासाठी दूर जाण्याची आवश्यकता नाही. संतविचार समाजाच्या प्रत्येक प्रवाहात आणि माणसाच्या अंतर्मनात जिवंत असतात. त्या विचारांच्या दिशेने प्रवास सुरू झाला की जीवनालाही नवी दिशा आणि नवे प्रकाशपथ प्राप्त होते...

संतांचा विचार, त्यांची शिकवण आणि समाजजागृतीचा संदेश यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे “जाता संतांच्या गावा” हे पुस्तक निश्चितच वाचकांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. 

सतीश विष्णू जाधव, सायकलिस्ट

7977690696


Thursday, February 19, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि चांदिवली सहयोग सोसायटीत शिवज्योत स्वीकारण्याचा मान... दि १९ फेब्रुवारी २०२६*

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि चांदिवली सहयोग सोसायटीत शिवज्योत स्वीकारण्याचा मान... दि १९ फेब्रुवारी २०२६*

आज शिवजयंती प्रित्यर्थ परममित्र स्वप्नील दौंड यांच्या संकल्पनेतून साकारलेली सायन किल्ला ते पवई ह्या छत्रपती शिवाजी महाराज सायकल राईड मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली...

तरुणाईला निसर्गाकडे नेणे तसेच छत्रपतींचा इतिहास अवगत करणे आणि फिटनेसची आवड निर्माण करणे... स्वप्नीलच्या  या शुद्ध प्रयोजनामुळेच या राईड मध्ये भाग घेण्याचे ठरविले...

सायन किल्ल्यावर शिव मशालीचे प्रज्वलन झाले तेव्हा छत्रपतींचा जयघोष करण्यात आला...

सकाळच्या आल्हाददायक वाऱ्यात पेडल मारताना प्रत्येक सायकलस्वाराच्या मनात एकच ऊर्जा धावत होती ... छत्रपतींची प्रेरणा...

पवई येथील सहयोग सोसायटीमध्ये सर्व सायकलिस्टचे जोरदार स्वागत करण्यात आले... 

येथे सुप्रसिद्ध कौन्सिलर डॉ अंजलीताई अरुण पारकर यांची भेट झाली...  अंजली ताई समाजासाठी करत असलेल्या कार्यामुळे अतिशय प्रभावित झालो... त्या Remedial Therapist आणि Counsellor म्हणून कार्यरत आहेत..

शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही... तर प्रत्येक मुलाची क्षमता ओळखून ती उजळवण्याचे त्यांचे समर्पित कार्य सतत सुरू आहे... विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भावनिक विकासासाठी कार्यरत असलेली त्यांची सेवा समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे...

शिकण्यात अडचणी येणाऱ्या मुलांसाठी योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास वाढवणारे समुपदेशन आणि विशेष शिक्षणाची प्रभावी साथ हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे...

अंजलीताईंच्या साथीने चांदिवलीतील सहयोग सोसायटीच्या प्रांगणात शिव प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून छत्रपतींच्या प्रतिमेला हार घालण्यात आला...

तसेच शिवज्योत स्वीकारण्याचा सन्मान लाभला… तो स्वराज्याच्या विचारांना स्पर्श करण्याचा दिव्य अनुभव होता... ज्या भूमीतून स्वराज्याची ज्योत प्रज्वलित झाली, त्या तेजस्वी परंपरेची ही अखंड मशाल… शौर्य, दूरदृष्टी आणि जनकल्याण यांचे जिवंत प्रतीक... त्यामुळेच मनाचा निर्धार अधिक भक्कम झाला...

छत्रपतींच्या तेजस्वी विचारांची ही मशाल हातात घेताना जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली...

स्वराज्य, शौर्य आणि संस्कार यांचे प्रतीक असलेली ही मशाल प्रत्येक हृदयात स्वाभिमान प्रज्वलित करत राहो... रस्ता कितीही लांब असो, उद्दिष्ट कितीही कठीण असो... स्वराज्याची प्रेरणा सोबत असेल तर प्रत्येक वाट विजयाकडेच जाते...

या राईड निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमातील... छत्रपतींची आग्र्याहून सुटका या इतिहासाची माहिती सर्वांना दिली... आणि छत्रपतींना आग्र्यात नजरकैदेत ठेवलेल्या मीनाबाजार कोठी या वास्तूवर  मोठे संग्रहालय निर्माण होतय या बद्दल सांगितले... केंद्र सरकारने १७ ऑगस्ट हा दिवस शिव चातुर्य दिन म्हणून जाहीर केला आहे...

स्वप्नीलने  पितळी पाण्याची बाटली भेट म्हणून दिली... विशेष म्हणजे  त्या बाटलीवर छापलेली महाराजांची प्रतिमा पाहताच छाती अभिमानाने भरून आली.

सहयोग सोसायटीतील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

आजची पन्नास किमी राईड करून महाराजांना मानाचा मुजरा...

जय शिवराय...

सतीश जाधव सायकलिस्ट

7977690693


Sunday, February 15, 2026

टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनचा दिमाखदार सायकल सोहळा... एक अविस्मरणीय अनुभव... दि १४.०२.२०२६

टायगर सिटी  सायकलिंग असोसिएशनचा दिमाखदार सायकल सोहळा... एक अविस्मरणीय अनुभव... दि १४.०२.२०२६

टायगर सिटी  सायकलिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या बहारदार कार्यक्रमात विशेष पाहुणा म्हणून सहभागी होण्याचा सुवर्णयोग लाभला...  

संस्थेचे अध्यक्ष आणि जिवलग मित्र दिलीप वरकड यांचा संदेश आला आणि नागपूरच्या या कार्यक्रमात भाग घेण्याचे नक्की केले... दिलीपच्या सहयोगाने VIP कोट्यात दोन दिवस आधी काढलेल्या जाण्या येण्याच्या तिकीट कन्फर्म सुद्धा झाल्या...

दूरंतो एक्सप्रेसने सकाळी सव्वा सातला नागपूरमध्ये आगमन झाले… तर परम मित्र प्रदीप देशपांडे उर्फ PD स्वागतासाठी प्लॅटफॉर्मवर सज्ज होता...

PD च्या घरचा आपुलकीचा पाहुणचार घेऊन थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या कार्यक्रम स्थळी उपस्थित झालो... 

मागोमाग विद्यमान नगरसेविका शिवानी ताई  दाणी वखारे यांचे सायकलवरून आगमन होताच  वातावरणात प्रसन्नतेने भरून गेले... 

अध्यक्ष दिलीप आणि सदस्य विश्वास यांच्या कडून शिवानी ताईंचा जीवन प्रवास ऐकला आणि भारावून गेलो...

त्याचा संक्षिप्त परिचय खालील प्रमाणे:

महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याच्या समन्वयक; मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि. यांच्या संचालिका, प्रेरणादायी वक्त्या व आर्थिक सल्लागार...

संगणकशास्त्र पदवीधर; वित्त क्षेत्रातील अनेक प्रमाणपत्रे. १८व्या वर्षापासून विविध क्षेत्रांत कार्यअनुभव...

शिवानी ताईंचे ४००+ लेख प्रमुख मराठी वृत्तपत्रांत प्रकाशित झाले आहेत... वयाच्या १९व्या वर्षी ‘नागपूरचा सर्वोत्तम वक्ता’ हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे...

NISM व BSE येथे सर्वात तरुण प्राध्यापक म्हणून कार्यरत...

अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशीच त्याचे विश्लेषणात्मक पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा अनोखा विक्रम आहे...

२.७५ लाख+ सबस्क्राइबर्स असलेला यूट्यूब चॅनल; १.३ कोटी+ व्ह्यूज...

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस; नागपूर शहराच्या पहिल्या महिला अध्यक्षा...

हार्ले डेव्हिडसन बाईकर; जम्मू–कारगिल बाइक प्रवास पूर्ण....

आणि आता नागपूर महापालिकेच्या नगरसेविका...

शिवानी ताई म्हणजे तडफदार व्यक्तिमत्त्व, अफाट जिद्द, साहसाची आवड आणि ओढ... या सर्व गुणांमुळेच त्यांच्या  मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार याची मला खात्री आहे...

दीप प्रज्वलना नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली...  सुरुवातीलाच प्रदीप देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींची ओळख करून दिली. अध्यक्ष दिलीप वरकड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि सदस्य दररोज ३० किमी सायकलिंगची शिस्त पाळतात, ही प्रेरणादायी माहिती दिली.

शिवानी ताईंनी नागपूरमध्ये सायकल ट्रॅक उभारण्याचे आणि स्वतः नियमित सायकलिंग करण्याचे आश्वासन  दिले, ही सायकलप्रेमींसाठी मोठी आनंदवार्ता होती... अश्विनी ताईच्या हस्ते मला सुद्धा मेडल मिळाले...

प्रदूषणमुक्त भारताची संकल्पना घेऊन देशभर केलेल्या सायकल सफरीतील  अनुभव... थोरामोठ्यांच्या झालेल्या गाठीभेटी आणि नर्मदा परिक्रमेतील आध्यात्मिक अनुभूती मला सर्वांसमोर मांडता आल्या...

प्रत्येक सायकलस्वाराने एखादे ध्येय ठरवून टुरिंग सायकलिंग करावे... असा प्रेमाचा संदेश सर्वांना दिला... समाजचं आपण देणं लागतो आणि त्याची परतफेड करण्याची परमेश्वराने आपल्याला सायकलिंगच्या अनुषंगाने दिलेली ही सुवर्णसंधी आहे... 

नागपूरच्या चैतन्य प्रवीण कुहिते या छोट्या मुलाने " काका मला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे... हे सांगितल्यावर... माझे नागपूरला येण्याचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले... छोट्यांच्या स्वप्नांना माझ्या अनुभवाची साथ मिळाली होती...

टायगर सिटी सायकलिंग असोसिएशन यांनी एका महिन्याची जी सायकल स्पर्धा घेतली होती त्यातील सर्व विजेत्या सदस्यांना मेडल प्रदान करण्याचा कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला... तसेच विशेष कार्य केलेल्या सदस्यांना माझ्या हस्ते ट्रॉफीने सन्मानित करण्याचे भाग्य मिळाले..


संस्थेचे फाउंडर मेंबर देवदत्त परांजपे यांनी आभार प्रदर्शन केले आणि त्या नंतर  अल्पोपहारचा कार्यक्रम झाला... तेव्हा टायगर सिटीच्या सर्व सदस्यांशी मनमोकळा सुसंवाद साधता आला.

कार्यक्रमानंतर विश्वास चाटी यांच्या घरी जंगी पाहुणचार... उदय-जयंत-विश्वास यांच्यासोबत रंगलेल्या गप्पा... आणि परतीच्या प्रवासासाठी स्वाती वहिनींच्या प्रेमळ हातचा जेवणाचा डबा... नागपूरकरांची  ही आपुलकी हृदयात कायमची कोरली गेली...

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती... त्यांचे खूप खूप आभार आणि  सायकलिंग परिवार वाढविण्यासाठी नवनवीन कार्यक्रम हाती घ्यावेत... हीच शुभेच्छा...

नागपूर भेट आणि टायगर सिटीकरांनी केलेला स्नेहसत्कार दीर्घकाळ स्मरणात राहील.

नागपूरकरांनी सप्रेम दिलेला मोमेंटो आणि टायगर सिटी सायकल असोशिएशन प्रिंट केलेला कप खूप भावला... घरी गेल्यावर त्याचे उद्घाटन झाले...

सर्व नागपूरकर सायकलिस्ट ना प्रेमाचे आमंत्रण जेव्हा मुंबईला याल तेव्हा तुमची सेवा करण्याची संधी जरूर द्यावी...

जय श्री राम...

सतीश जाधव...सायकलिस्ट 

7977690693

Monday, January 26, 2026

२६ जानेवारी... प्रजासत्ताक दिवस राईड...

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या विरार राईड बाबत आशिषने विचारणा केली... त्याला तात्काळ होकार दिला... पेडल वरियर्सचे बरेच सदस्य रेल्वेने जाणार होते... माझी सुद्धा सहमती होती... विचार केला होता... विरारवरून परतीची राईड करायची.. 

जितेंद्र नुकताच दुबई एन्जॉय करून आला होता.. म्हणाला आपण जाता येता सायकलिंग करूया... आणि मग जयेशच्या साथीने  कार्यक्रम नक्की झाला... 

विरार लूप मारायचा आणि दिडशे किमी पूर्ण करायचे... GRM 300 साठीची तयारी आणि नेट प्रॅक्टिस अशी ही राईड होणार होती... 

सकाळी साडेचार वाजता घरून पेडलिंग सुरू झाले... वांद्र्याला जयेश भेटला आणि जितेंद्र अंधेरी येथे साथीला आला... 

घोडबंदर ओलांडले चाळीस किमी राईड पूर्ण झाली होती... वाटेत जैन ढाबा लागला... गंमत म्हणजे तेथे कुल्हड चहा 42 रुपये होता... पुढे छान उडुपी हॉटेल लागले...  तेथे मस्त इडली वडा सांबार हाडदले... कडक चहा घेऊन पुढची सफर सुरू झाली... 

विरार फाट्यावर पोहोचलो... तेथून आशिषला फोन लावला... म्हणाला लवकर या... कार्यक्रम आटपत आलंय... तिघांनी जोर मारला आणि विरार पूर्वेला कार्यक्रम स्थळी पोहोचलो... वाटेत सरिता जालोरी हिची भेट झाली...

जितेंद्र वाडे भेटला... कार्यक्रम स्थळी आशिष आणि कुणाल ओमी यांची भेट झाली... 

विरार पर्यंत राईड करत आल्याबद्दल मेडल आणि नाष्टा मिळाला... सपाटून भूक लागली होती... फिट इंडिया आणि कच्छी मंडळ यांच्या तर्फे स्वातंत्रदिन राईड आयोजित केली होती... इव्हेंट आयोजकांची भेट घेतली... आणि परतीची सफर सुरू झाली...

विरार फाट्यावरील नुकतेच प्राणप्रतिष्ठा झालेले द्वारकाधीशाच्या मंदिराला भेट दिली... तुडुंब गर्दी होती मंदिर परिसरात... बाहेरूनच कलश आणि मंदिराचे दर्शन घेतले... आणि.मुंबईकडे निघालो...

आता ऊन वाढले होते... परंतु जिद्द कमी झाली नव्हती...  घोडबंदर येथे तिळाचे लाडू  आणि नीरा यांचा समाचार घेतला... 

जितेंद्राला सायंकाळी सत्संग साठी जायचे असल्यामुळे 100 किमी पूर्ण करून त्याने दहिसरला मेट्रो पकडली... दहिसर जवळील गोकुळ आनंद मध्ये  जयेशच्या साथीने डाळखीचडी खाल्ली... आणि भन्नाटात 150 किमी राईड पूर्ण करून घर गाठले... घरी यायला चार वाजले होते... 12 तासात 150 किमी पूर्ण झाले होते

लांब पल्ल्याची सायकलिंग करताना मनाची तयारी, नियोजनाची शिस्त आणि संघभावनेची ताकद यांची  सांगड घालणे आवश्यक असते...

वेळेची मर्यादा, उन्हाचा तडाखा किंवा थकवा हे अडथळे वाटतात...  मात्र स्पष्ट उद्दिष्ट, सोबत असलेली योग्य साथ आणि अंतर्मनातील जिद्द यांमुळे प्रत्येक अडथळा संधीमध्ये रूपांतरित होतो...

पूर्ण पेडलिंगच्या निर्णयामुळे मार्गात मिळणारा साधा चहा सुद्धा अमृतासारखा भासतो...

शेवटच्या टप्प्यातील थकवा सुद्धा मित्रांच्या साथीमुळे ऊर्जावान बनतो...आणि मग  पुढील मोठ्या ध्येयाची तयारी होते...

100, 150 किंवा 300 किमी सायकलिंग म्हणजे सातत्य, संयम आणि आत्मविश्वासाची परीक्षा असते...

एकमेकांना वेळेवर होकार देणे, मार्गावर भेटणाऱ्या सहकाऱ्यांना, मित्रांना प्रोत्साहन देणे आणि कार्यक्रमस्थळी मिळालेल्या सन्माना बरोबर  परतीच्या प्रवासातही तितक्याच उत्साहाने पेडल मारणे... हीच खरी सायकलिंग संस्कृती आहे...

मनात अढळ विश्वास, पायात सातत्याची ताकद आणि डोळ्यांसमोर स्पष्ट ध्येय असेल, तर कोणतेही अंतर मोठे वाटत नाही...

आजची प्रत्येक राईड उद्याच्या मोठ्या आव्हानासाठीची नेट प्रॅक्टिस ठरते... पेडल फिरत राहिले की आत्मविश्वास आपोआप वेग घेतो... आणि मग प्रत्येक सायकलिस्ट स्वतःच्या मर्यादा ओलांडताना दिसतो. 

सतीश जाधव... सायकलिस्ट 

7977690693