शतकी पुनरागमन राईड... पेण चा कासमाळ धबधबा... ३० ऑगस्ट २६ भाग १
डॉक्टरांनी आराम सांगितला… मित्रांनी १०० किमी सायकल राईड ठरविली...
अपघातानंतर डॉक्टरांनी प्रेमाने सांगितलं होतं, “सतीशभाऊ, आता जरा आराम करा!” डॉक्टरांचा सल्ला मी अगदी मनापासून ऐकला… तब्बल काही दिवस!... पण विकास नावाचा मित्र असताना पेशंटने फार काळ आराम करावा, अशी सोय नशिबात कुठून असणार?
माझी तब्येत सुधारतेय, मी पुन्हा सायकलवर बसायला सुरुवात केलीय आणि तीन आठवड्यांत ५० किमीची राईडही पूर्ण केलीय, हे विकासला समजलं.
सामान्य मित्र असता तर म्हणाला असता, “सर, सावकाश घ्या… अजून थोडी विश्रांती करा.” पण हा सायकलिस्ट मित्र! त्याच्या डोक्यात लगेच एक अत्यंत प्रेमळ आणि ‘भन्नाट’ कल्पना आली...
“सतीश सरांचं पुनरागमन साजरं करायचं… थेट १०० किलोमीटरची शतकी राईड करून!”
म्हणजे नुकत्याच अपघातातून बाहेर आलेल्या माणसाची तब्येत कशी आहे हे तपासण्याची सायकलिस्ट लोकांची पद्धतच वेगळी असते.
डॉक्टर विचारतात, “दुखतंय का?” आणि मित्र विचारतात, “१०० किमी होईल ना?”... अशा प्रकारे जन्म झाला खास माझ्यासाठी आखलेल्या ‘शतकी पुनरागमन राईड’चा!
सकाळी सव्वा तीनला उठलो आणि सव्वा चारला सायकल घेऊन घराबाहेर! लोक अजून स्वप्नात होते आणि आम्ही शतकी राईडच्या तयारीत!
दादर टी.टी. सर्कलला जयेश तयारच उभा होता. तिथून आम्ही ४.५० ची गाडी पकडली. कॉटन ग्रीनला विशांत चढणार होता; पण डब्यात गेलो तर साहेब आधीच हजर!
क्षणभर वाटलं... आम्ही गाडी पकडली की विशांतने आमच्यासाठी गाडी पकडून ठेवली होती?
रविवारची पहाट. सकाळचे सहा वाजले होते. ठिकाण खांदेश्वर स्टेशन. माझ्यासह विशांत, आणि जयेश पहिली हार्बर लोकल पकडून सायकलींसह हजर झाले होते. विकास जितेंद्र आणि महेंद्र धरून आम्ही झालो सहा जण. रविवारी पहाटे सहा वाजता सहा सायकलिस्ट स्टेशनबाहेर जमलेले पाहून लोकांना कदाचित वाटलं असेल, ही मंडळी एखादी मोठी सायकल स्पर्धा जिंकायला निघाली आहेत. पण आमच्या मनात सुरुवातीपासूनच पहिला प्रश्न वेगळाच होता... “नाश्ता कुठे करायचा?”
जितेंद्रची तयारी तर आणखी भारी होती. महाशय आदल्या रात्रीच कळंबोलीला मित्र शर्माजींच्या घरी मुक्कामाला गेले होते आणि सकाळी शर्माजी स्वतः जितेंद्राला आम्हाला सोपवायला आले होते. तो निरोपाचा प्रसंग पाहून क्षणभर वाटलं, जितेंद्र सायकल राईडला निघालाय की सासरी पाठवणी चालली आहे!
शर्माजींना हात हलवून निरोप दिला आणि आमच्या सहा सायकलींची चाकं पेणच्या दिशेने फिरू लागली.
सकाळची हवा मस्त होती. वातावरण कुंद होतं. रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. गप्पा, टिंगलटवाळी आणि पेडलिंग सुरू होतं. पण सायकलिस्ट कितीही फिट असला तरी पोट नावाचा अवयव त्याला जमिनीवर आणतोच. काही अंतर गेल्यावर पळस्पे फाटा आला आणि तिथे डोसा सेंटर दिसताच आमच्या सायकलींनी जणू स्वतःहून ब्रेक मारला!
“शतकी राईड आहे, हलकंच खाऊया,” असा कुणीतरी विचार मांडला असावा; पण टेबलावर इडली, डोसा आणि पोंगल आल्यानंतर तो विचार कुठे गायब झाला हे आजपर्यंत कळलेलं नाही...
इडलीवर ताव, डोशावर हल्ला आणि पोंगलवर शेवटची मोहोर! आमचा नाश्ता पाहून हॉटेलवाल्यालाही बहुधा शंका आली असेल... “हे लोक पेणला सायकलने जाणार आहेत की इथूनच दुपारचं जेवण करून परतणार आहेत?”
पोटात व्यवस्थित इंधन भरल्यावर सायकली पुन्हा रस्त्यावर आल्या. आता समोर होता साधारण तीस किलोमीटरचा पेणपर्यंतचा प्रवास. वातावरण मात्र सायकलिंगसाठी एकदम झकास! ढगाळ आकाश, हिरवाई, मधूनच येणारा गार वारा आणि मित्रांची अखंड बडबड. अशा वातावरणात किलोमीटर कधी मागे पडतात ते समजतही नाही.
पण मग समोर आलं कर्नाळा अभयारण्य आणि त्याबरोबर आली चढाई.
बाकी मित्रांसाठी ती कदाचित ‘थोडी चढ’ असेल. पण तीन आठवड्यांपूर्वी अपघात झालेल्या माझ्यासाठी त्या चढाईची व्याख्या जरा वेगळीच होती! माझे पाय म्हणत होते, “सर, काळजी करू नका, आम्ही आहोत!” आणि पाठ मागून हळू आवाजात विचारत होती, “डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं होतं, आठवतंय ना?”
एकेक पेडल मारत वर चढत होतो. विकास अधूनमधून मागे वळून माझ्याकडे पाहत होता. सुरुवातीला मला वाटलं, किती काळजी घेणारा मित्र आहे! नंतर लक्षात आलं... १०० किलोमीटरची राईड त्यानेच ठरवली असल्यामुळे ‘पेशंट अजून आपल्या मागे येतोय ना?’ याची खात्री करत असावा...
कर्नाळ्याची चढाई पार झाली आणि वाटलं, चला आता आराम. पण सायकलिंगमध्ये ‘आता पुढे सगळा उतारच आहे’ या वाक्याइतकं दिशाभूल करणारं वाक्य दुसरं नसावं! पुढे आणखी दोन छोट्या घाट्या आमच्या स्वागतासाठी उभ्याच होत्या. जणू म्हणत होत्या, “पुनरागमन करतोयस ना? मग आधी आमच्याकडे हजेरी लाव!”
पायांवर ताण जाणवत होता, पण मनात उत्साहाची नवी लहर होती. त्या दिवशी प्रत्येक किलोमीटरसोबत आत्मविश्वास वाढत होता आणि प्रत्येक पेडलसोबत मन स्वतःलाच सांगत होतं... “सतीश, तुझी जिद्द अजून तितकीच मजबूत आहे… आणि तुझा सायकल प्रवास पुन्हा नव्या जोमाने खुलत चाललाय!”
आणि अशा गप्पा, चढ-उतार, दमछाक आणि धमाल करत अखेर आम्ही पेणला पोहोचलो.
पेणमध्ये विकासाचा मित्र अभिजित आमची वाट पाहत होता. त्याने आम्हाला पेणमधल्या शिवसागरमध्ये नेलं आणि मस्त गरमागरम कॉफी पाजली. घाट चढण्याआधी अशी प्रेमाने कॉफी पाजणारा मित्र म्हणजे सायकलिस्टसाठी त्या क्षणी अगदी देवदूतच!...
कॉफीचे दोन घोट पोटात गेले आणि शरीरात जणू नव्या ऊर्जेचं नेटवर्क सुरू झालं. सिस्टीम एकदम फ्रेश होऊन पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाली!
अभिजित आमच्यासोबत गावाच्या वेशीपर्यंत आला. आम्हाला वाटलं, आता व्याघ्रेश्वर मंदिर आणि धबधबा जवळच असणार. पण अभिजितने अगदी सहजपणे पुढची माहिती दिली... “आता इथून फक्त चौदा किलोमीटर घाट चढायचा आहे. वर व्याघ्रेश्वर मंदिर आणि कासमाळ धबधबा लागेल.”
‘फक्त चौदा किलोमीटर घाट!’
क्षणभर आमच्या समूहात विलक्षण शांतता पसरली.
मी विकासकडे पाहिलं… विकासाने माझ्याकडे पाहिलं…
माझ्या चेहऱ्यावर एकच प्रश्न स्पष्ट दिसत होता...
“विकासा… माझ्या पुनरागमनाचा आनंद साजरा करायचा आहे की मागच्या जन्माचा बदला घ्यायचा आहे?”
आणि अभिजित मात्र अत्यंत शांतपणे म्हणाला, “तुम्ही पुढे जा. मी घरी जाऊन तुमच्यासाठी व्हेज जेवण घेऊन येतो.”
बस्स!
‘जेवण’ हा शब्द कानावर पडताच टीममध्ये पुन्हा ऊर्जा संचारली. कारण सायकलिस्टला चौदा किलोमीटर घाट सांगितला तर तो विचार करतो; पण त्याच वाक्यात “वर जेवण मिळेल” असं सांगितलं की तो लगेच पेडल मारायला सुरुवात करतो!
आता पेण मागे राहिलं होतं. समोर उभा होता चौदा किलोमीटरचा घाट… कुठेतरी वर व्याघ्रेश्वर मंदिर, कासमाळचा धबधबा आमची वाट पाहत होतं.
आणि माझ्या मनात मात्र एकच विचार सुरू होता...
“सकाळपासून जे काही झालं… ते जर फक्त ट्रेलर असेल, तर विकासने पुढच्या पिक्चरमध्ये नेमकं काय वाढून ठेवलंय?”
क्रमशः…
सतीश विष्णू जाधव