Sunday, February 15, 2026

टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनचा दिमाखदार सायकल सोहळा... एक अविस्मरणीय अनुभव... दि १४.०२.२०२६

टायगर सिटी  सायकलिंग असोसिएशनचा दिमाखदार सायकल सोहळा... एक अविस्मरणीय अनुभव... दि १४.०२.२०२६

टायगर सिटी  सायकलिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या बहारदार कार्यक्रमात विशेष पाहुणा म्हणून सहभागी होण्याचा सुवर्णयोग लाभला...  

संस्थेचे अध्यक्ष आणि जिवलग मित्र दिलीप वरकड यांचा संदेश आला आणि नागपूरच्या या कार्यक्रमात भाग घेण्याचे नक्की केले... दिलीपच्या सहयोगाने VIP कोट्यात दोन दिवस आधी काढलेल्या जाण्या येण्याच्या तिकीट कन्फर्म सुद्धा झाल्या...

दूरंतो एक्सप्रेसने सकाळी सव्वा सातला नागपूरमध्ये आगमन झाले… तर परम मित्र प्रदीप देशपांडे उर्फ PD स्वागतासाठी प्लॅटफॉर्मवर सज्ज होता...

PD च्या घरचा आपुलकीचा पाहुणचार घेऊन थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या कार्यक्रम स्थळी उपस्थित झालो... 

मागोमाग विद्यमान नगरसेविका शिवानी ताई  दाणी वखारे यांचे सायकलवरून आगमन होताच  वातावरणात प्रसन्नतेने भरून गेले... 

अध्यक्ष दिलीप आणि सदस्य विश्वास यांच्या कडून शिवानी ताईंचा जीवन प्रवास ऐकला आणि भारावून गेलो...

त्याचा संक्षिप्त परिचय खालील प्रमाणे:

महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याच्या समन्वयक; मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि. यांच्या संचालिका, प्रेरणादायी वक्त्या व आर्थिक सल्लागार...

संगणकशास्त्र पदवीधर; वित्त क्षेत्रातील अनेक प्रमाणपत्रे. १८व्या वर्षापासून विविध क्षेत्रांत कार्यअनुभव...

शिवानी ताईंचे ४००+ लेख प्रमुख मराठी वृत्तपत्रांत प्रकाशित झाले आहेत... वयाच्या १९व्या वर्षी ‘नागपूरचा सर्वोत्तम वक्ता’ हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे...

NISM व BSE येथे सर्वात तरुण प्राध्यापक म्हणून कार्यरत...

अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशीच त्याचे विश्लेषणात्मक पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा अनोखा विक्रम आहे...

२.७५ लाख+ सबस्क्राइबर्स असलेला यूट्यूब चॅनल; १.३ कोटी+ व्ह्यूज...

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस; नागपूर शहराच्या पहिल्या महिला अध्यक्षा...

हार्ले डेव्हिडसन बाईकर; जम्मू–कारगिल बाइक प्रवास पूर्ण....

आणि आता नागपूर महापालिकेच्या नगरसेविका...

शिवानी ताई म्हणजे तडफदार व्यक्तिमत्त्व, अफाट जिद्द, साहसाची आवड आणि ओढ... या सर्व गुणांमुळेच त्यांच्या  मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार याची मला खात्री आहे...

दीप प्रज्वलना नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली...  सुरुवातीलाच प्रदीप देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींची ओळख करून दिली. अध्यक्ष दिलीप वरकड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि सदस्य दररोज ३० किमी सायकलिंगची शिस्त पाळतात, ही प्रेरणादायी माहिती दिली.

शिवानी ताईंनी नागपूरमध्ये सायकल ट्रॅक उभारण्याचे आणि स्वतः नियमित सायकलिंग करण्याचे आश्वासन  दिले, ही सायकलप्रेमींसाठी मोठी आनंदवार्ता होती... अश्विनी ताईच्या हस्ते मला सुद्धा मेडल मिळाले...

प्रदूषणमुक्त भारताची संकल्पना घेऊन देशभर केलेल्या सायकल सफरीतील  अनुभव... थोरामोठ्यांच्या झालेल्या गाठीभेटी आणि नर्मदा परिक्रमेतील आध्यात्मिक अनुभूती मला सर्वांसमोर मांडता आल्या...

प्रत्येक सायकलस्वाराने एखादे ध्येय ठरवून टुरिंग सायकलिंग करावे... असा प्रेमाचा संदेश सर्वांना दिला... समाजचं आपण देणं लागतो आणि त्याची परतफेड करण्याची परमेश्वराने आपल्याला सायकलिंगच्या अनुषंगाने दिलेली ही सुवर्णसंधी आहे... 

नागपूरच्या चैतन्य प्रवीण कुहिते या छोट्या मुलाने " काका मला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे... हे सांगितल्यावर... माझे नागपूरला येण्याचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले... छोट्यांच्या स्वप्नांना माझ्या अनुभवाची साथ मिळाली होती...

टायगर सिटी सायकलिंग असोसिएशन यांनी एका महिन्याची जी सायकल स्पर्धा घेतली होती त्यातील सर्व विजेत्या सदस्यांना मेडल प्रदान करण्याचा कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला... तसेच विशेष कार्य केलेल्या सदस्यांना माझ्या हस्ते ट्रॉफीने सन्मानित करण्याचे भाग्य मिळाले..


संस्थेचे फाउंडर मेंबर देवदत्त परांजपे यांनी आभार प्रदर्शन केले आणि त्या नंतर  अल्पोपहारचा कार्यक्रम झाला... तेव्हा टायगर सिटीच्या सर्व सदस्यांशी मनमोकळा सुसंवाद साधता आला.

कार्यक्रमानंतर विश्वास चाटी यांच्या घरी जंगी पाहुणचार... उदय-जयंत-विश्वास यांच्यासोबत रंगलेल्या गप्पा... आणि परतीच्या प्रवासासाठी स्वाती वहिनींच्या प्रेमळ हातचा जेवणाचा डबा... नागपूरकरांची  ही आपुलकी हृदयात कायमची कोरली गेली...

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती... त्यांचे खूप खूप आभार आणि  सायकलिंग परिवार वाढविण्यासाठी नवनवीन कार्यक्रम हाती घ्यावेत... हीच शुभेच्छा...

नागपूर भेट आणि टायगर सिटीकरांनी केलेला स्नेहसत्कार दीर्घकाळ स्मरणात राहील.

नागपूरकरांनी सप्रेम दिलेला मोमेंटो आणि टायगर सिटी सायकल असोशिएशन प्रिंट केलेला कप खूप भावला... घरी गेल्यावर त्याचे उद्घाटन झाले...

सर्व नागपूरकर सायकलिस्ट ना प्रेमाचे आमंत्रण जेव्हा मुंबईला याल तेव्हा तुमची सेवा करण्याची संधी जरूर द्यावी...

जय श्री राम...

सतीश जाधव...सायकलिस्ट 

7977690693

Monday, January 26, 2026

२६ जानेवारी... प्रजासत्ताक दिवस राईड...

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या विरार राईड बाबत आशिषने विचारणा केली... त्याला तात्काळ होकार दिला... पेडल वरियर्सचे बरेच सदस्य रेल्वेने जाणार होते... माझी सुद्धा सहमती होती... विचार केला होता... विरारवरून परतीची राईड करायची.. 

जितेंद्र नुकताच दुबई एन्जॉय करून आला होता.. म्हणाला आपण जाता येता सायकलिंग करूया... आणि मग जयेशच्या साथीने  कार्यक्रम नक्की झाला... 

विरार लूप मारायचा आणि दिडशे किमी पूर्ण करायचे... GRM 300 साठीची तयारी आणि नेट प्रॅक्टिस अशी ही राईड होणार होती... 

सकाळी साडेचार वाजता घरून पेडलिंग सुरू झाले... वांद्र्याला जयेश भेटला आणि जितेंद्र अंधेरी येथे साथीला आला... 

घोडबंदर ओलांडले चाळीस किमी राईड पूर्ण झाली होती... वाटेत जैन ढाबा लागला... गंमत म्हणजे तेथे कुल्हड चहा 42 रुपये होता... पुढे छान उडुपी हॉटेल लागले...  तेथे मस्त इडली वडा सांबार हाडदले... कडक चहा घेऊन पुढची सफर सुरू झाली... 

विरार फाट्यावर पोहोचलो... तेथून आशिषला फोन लावला... म्हणाला लवकर या... कार्यक्रम आटपत आलंय... तिघांनी जोर मारला आणि विरार पूर्वेला कार्यक्रम स्थळी पोहोचलो... वाटेत सरिता जालोरी हिची भेट झाली...

जितेंद्र वाडे भेटला... कार्यक्रम स्थळी आशिष आणि कुणाल ओमी यांची भेट झाली... 

विरार पर्यंत राईड करत आल्याबद्दल मेडल आणि नाष्टा मिळाला... सपाटून भूक लागली होती... फिट इंडिया आणि कच्छी मंडळ यांच्या तर्फे स्वातंत्रदिन राईड आयोजित केली होती... इव्हेंट आयोजकांची भेट घेतली... आणि परतीची सफर सुरू झाली...

विरार फाट्यावरील नुकतेच प्राणप्रतिष्ठा झालेले द्वारकाधीशाच्या मंदिराला भेट दिली... तुडुंब गर्दी होती मंदिर परिसरात... बाहेरूनच कलश आणि मंदिराचे दर्शन घेतले... आणि.मुंबईकडे निघालो...

आता ऊन वाढले होते... परंतु जिद्द कमी झाली नव्हती...  घोडबंदर येथे तिळाचे लाडू  आणि नीरा यांचा समाचार घेतला... 

जितेंद्राला सायंकाळी सत्संग साठी जायचे असल्यामुळे 100 किमी पूर्ण करून त्याने दहिसरला मेट्रो पकडली... दहिसर जवळील गोकुळ आनंद मध्ये  जयेशच्या साथीने डाळखीचडी खाल्ली... आणि भन्नाटात 150 किमी राईड पूर्ण करून घर गाठले... घरी यायला चार वाजले होते... 12 तासात 150 किमी पूर्ण झाले होते

लांब पल्ल्याची सायकलिंग करताना मनाची तयारी, नियोजनाची शिस्त आणि संघभावनेची ताकद यांची  सांगड घालणे आवश्यक असते...

वेळेची मर्यादा, उन्हाचा तडाखा किंवा थकवा हे अडथळे वाटतात...  मात्र स्पष्ट उद्दिष्ट, सोबत असलेली योग्य साथ आणि अंतर्मनातील जिद्द यांमुळे प्रत्येक अडथळा संधीमध्ये रूपांतरित होतो...

पूर्ण पेडलिंगच्या निर्णयामुळे मार्गात मिळणारा साधा चहा सुद्धा अमृतासारखा भासतो...

शेवटच्या टप्प्यातील थकवा सुद्धा मित्रांच्या साथीमुळे ऊर्जावान बनतो...आणि मग  पुढील मोठ्या ध्येयाची तयारी होते...

100, 150 किंवा 300 किमी सायकलिंग म्हणजे सातत्य, संयम आणि आत्मविश्वासाची परीक्षा असते...

एकमेकांना वेळेवर होकार देणे, मार्गावर भेटणाऱ्या सहकाऱ्यांना, मित्रांना प्रोत्साहन देणे आणि कार्यक्रमस्थळी मिळालेल्या सन्माना बरोबर  परतीच्या प्रवासातही तितक्याच उत्साहाने पेडल मारणे... हीच खरी सायकलिंग संस्कृती आहे...

मनात अढळ विश्वास, पायात सातत्याची ताकद आणि डोळ्यांसमोर स्पष्ट ध्येय असेल, तर कोणतेही अंतर मोठे वाटत नाही...

आजची प्रत्येक राईड उद्याच्या मोठ्या आव्हानासाठीची नेट प्रॅक्टिस ठरते... पेडल फिरत राहिले की आत्मविश्वास आपोआप वेग घेतो... आणि मग प्रत्येक सायकलिस्ट स्वतःच्या मर्यादा ओलांडताना दिसतो. 

सतीश जाधव... सायकलिस्ट 

7977690693


Tuesday, January 6, 2026

निलगिरी सायकल टूर... दिनांक ०५.०१.२०२६

निलगिरी सायकल टूर... दिनांक ०५.आणि ०६.०१.२०२६ 

सुप्रभात मित्रांनो.... 

या वेळी टू टायरचे तिकीट काढले होते... ते सायकल डिस्मेंटल करून आपल्याच बोगीत घेता येतील काय... हा प्रयोग करण्यासाठी... 

लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत सर्व सामानासह सायकल राईड करत पोहोचलो...


तेथून सर्व सायकल थेट प्लॅटफॉर्मवर नेल्या... गाडी सुटायला एक तास अवधी होता... सर्व सायकलचे पेडल आणि दोन्ही चाक काढले... 

एक सायकल... काढलेल्या चाकासह सीटच्या खाली ठेवली... दोन सायकल अप्पर बर्थ वर बांधल्या... त्यांची चाके बाजूला असलेल्या बोगी सहाय्यकाच्या केबिन मध्ये ठेवली... जितेंद्र, नवनीत आणि माझी सायकल बोगीत व्यवस्थित ठेवली गेली...

 महेंद्र डिस्मेंटल सायकल घेऊन कल्याण येथे चढला... त्याचा साइड अप्पर बर्थ होता... लोअर बर्थच्या खाली त्याची सायकल मस्त बसली... त्यात समान सुद्धा राहिले... 

रात्री जितेंद्र बोगी मधील मोकळ्या जागेत निवांत झोपला... त्याआधी विशांतने आणलेली मस्त बंगाली मिठाई फस्त केली... 


आपल्याच बोगीतून सायकल घेऊन जाण्याची युक्ती सफल झाली होती...


 नवीन प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला होता... 
आज दिवसभराचा प्रवास कोइंबतूर एक्सप्रेस मधून आहे आणि उद्या सकाळी चेन्नई मध्ये पोहोचू...

जय श्री राम... 

सतीश जाधव
7977690693

Sunday, December 28, 2025

कीर्तावनी... वारी आडवटंच्या विठोबाची... दिनांक २६.१२.२५

कीर्तावनी... वारी आडवटंच्या विठोबाची... दिनांक २६.१२.२५

घुमान वारीचे आयोजक आणि माझे परममित्र सूर्यकांत भिसे यांचे आमंत्रण मिळाले... मुंबईत होणारा कीर्तावनी नाटकाचा प्रयोग बघण्याचे... त्यांचा मुलगा स्वामीराज याची प्रमुख भूमिका होती... 

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु.ल. कट्टा या उपक्रमाअंतर्गत सादर झालेला कीर्तावनी  हा प्रयोग  एक वैचारिक आणि भावनिक उत्सव होता.

खुल्या आकाशाखाली, शब्द-सूर-संवेदनेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेला कीर्तावनीचा मुंबईतील पहिला प्रयोग मनावर दीर्घकाळ ठसा उमटविणारा होता....

तमाशातील नर्तिका आणि कीर्तनकार यांच्या भेटीतून उलगडणारा कीर्तन आणि बतावणी म्हणजेच कीर्तावनी हा खुल्या रंगमंचावरील प्रयोग  थेट अंतर्मनाला भिडतो...

तेराव्या शतकातील ज्ञानदेव-नामदेवांच्या संतवाणीपासून ते सोळाव्या शतकातील तुकाराम महाराजांच्या वैचारिक प्रवाहांपर्यंतची संत परंपरा अत्यंत प्रभावीपणे उभी केली होती...

त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले व्हावेत म्हणून झालेल्या ऐतिहासिक प्रयत्नांची मांडणी मनाला स्पर्शून गेली... एकनाथ महाराजांचा बुरगुंडा प्रचंड भावला...

आजच्या काळाशी संतवाणीची घट्ट सांगड घालताना हे नाटक समाजाला आरसा दाखवते. शब्द, संगीत, नृत्य आणि अभिनय यांचा सुरेख समतोल साधत प्रत्येक प्रसंग डोळ्यात अंजन घालणारा होता...

 ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे यांचा अभिनय, गाणे आणि नृत्य यांची ताकद अनुभवताना रंगमंच सादरीकरणा बरोबर... शब्द, सूर आणि भावनांनी उजळून निघालेला जिवंत अनुभव होता... तुकाराम महाराजांचे स्वर्गावरोहण आणि सध्या त्यावर चाललेला वाद याचे अतिशय मार्मिक विवेचन किर्तवली मध्ये अनुभवता आले...

अभ्यासपूर्ण मांडणी, आशयाची प्रखरता आणि सादरीकरणातील सहजता यामुळे सलग १ तास ५० मिनिटांचा हा प्रयोग पाहताना मन विठ्ठल नामात रंगून गेले… आणि हा रंगानुभव अखंड चालत रहावा असे वाटत होते...

संतपरंपरेची उज्ज्वल मशाल वर्तमानकाळात तेजाने पेटवणारा ‘कीर्तावनी’ प्रहसन मन समृद्ध करून गेले...

कीर्तावनी या आशयघन आणि संवेदनशील रंगानुभवासाठी मंचावर दिसणाऱ्या कलाविष्कारामागे अनेक हातांची, अनेक मनांची आणि अनेक विचारांची एकत्रित ताकद उभी होती...

लेखन आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून संतपरंपरेचा वैचारिक प्रवास प्रभावीपणे उलगडणाऱ्या ऋचिका खोत, तसेच संशोधन सहाय्यातून आशयाला खोली देणाऱ्या कीर्तनकार स्वामीराज भिसे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे...

दिग्दर्शन सहाय्यासाठी ज्ञानराज होले यांचे समर्पित सहकार्य संपूर्ण सादरीकरणात जाणवले...

संगीतदिग्दर्शन आणि संगीतसाथ यांच्या रूपाने ऋषिकेश देशमाने, सामिरण बर्डे आणि ज्ञानराज होले यांनी शब्दांना सूर दिले आणि भावनांना लय मिळवून दिली...

रंगमंचावर सजीव होणारे अभिनयविश्व ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे यांनी ताकदीने उभे केले होते...

नृत्यदिग्दर्शनातून हालचालींना अर्थ आणि सौंदर्य देणाऱ्या वैष्णवी निवाळकर, दृश्यभाषेला आकार देणाऱ्या प्रसाद आव्हाड यांच्या चित्ररचनेने आणि प्रकाशयोजनेतून वातावरण घडवणाऱ्या राम सईदपुरे  व अक्षय ओगले यांच्या कामामुळे सादरीकरण अधिक प्रभावी आणि भावनात्मक झाले...

पोस्टर डिझाइनसाठी नीरज सबनीस यांचे सर्जनशील योगदानही तितकेच महत्त्वाचे होते...

खरं तर  जगन्नीयंत्याचे विशेष आभार मानले पाहिजेत... कारण अशा कलाकृती समाजाच्या सामूहिक संवेदनशीलतेतूनच आकार घेतात...

कीर्तावनीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकास मनःपूर्वक शुभेच्छा. अशीच अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि समाजाशी संवाद साधणारी कला निरंतर घडत राहो, हीच सदिच्छा...

नाट्यप्रयोगाच्या समारोपानंतर स्वामीराजची आपुलकीने गळाभेट घेतली… आणि ऋचिकाला भरभरून आशीर्वाद दिले...

 संपूर्ण टीमने लोककलेचा केलेला आदर...  तसेच कीर्तन आणि बतावणी यांच्या सुरेल संगमातून समाजप्रबोधन घडविणाऱ्या  विचारांना दिशा देऊन मनांना स्पर्श केला...

या अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी सादरीकरणासाठी प्रत्येक कलाकार, सूत्रधार आणि पडद्यामागील सहकाऱ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा!

अशा आशयघन, संवेदनशील आणि समाजाशी संवाद साधणाऱ्या कलाकृतीसाठी रंगमंच, कलाकार आणि प्रेक्षक तिघेही एकत्र आले... हीच या संध्याकाळची सर्वात मोठी कमाई होती... 

राम कृष्ण हरी...

सतीश जाधव

7977690693