रूडाबाईची वाव, अडालज दि. २९ नोव्हेंबर २०२५
अहमदाबाद येथे प्रीती दिदीच्या मुलीच्या... साक्षीच्या लग्नाला आलो असताना रुडाबाईची बाव पाहण्याचा योग आला...
अहमदाबाद शहरातील अडालज उपनगरात असलेली ही बाव पाच मजल्यांची आहे. बावची रचना, नक्षीकाम, शिल्पकला हे धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आणि भौगोलिक गरजाच्या समन्वयानुसार करण्यात आली आहे...
तसेच ही बाव पाण्याच्या सोई बरोबरच... जनता, प्रवासी, धार्मिक श्रद्धा, वास्तुशास्त्र या साऱ्यांचा संगम आहे...
ही आयताकृती बाव (विहीर) मराठा गुर्जर वास्तुकलेवर आधारित आहे... ह्या बावचे बांधकाम दक्षिणोत्तर आहे...
दक्षिणेकडील बाजूला तीन प्रवेशद्वार असून, अष्टकोनी आकाराचे मोकळे छत आणि सोळा स्तंभांनी वेढलेला पहिला मजला चौकोनी आहे...
येथे प्रत्येक कोपऱ्यात सुंदर छतासह एक छोटी खोली आहे... इथून संपूर्ण बावची रम्य सममिती आकर्षक दिसते...
या विहिरीतील इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक छोटी भिंत आहे आणि ती भिंत सरळ रेषेत खोलीपर्यंत पुढे गेलेली आहे...
उत्तरेकडील बाजूस पाच मजली अष्टकोनी बांधकाम असलेल्या कुंडाच्या चारही बाजूंनी नजाकतदार पायऱ्यां वरून प्रवेश करता येतो.
खांब, भित्तिस्तंभ, नक्षीकाम, सरदारांचे प्रतिमा शिल्प सूक्ष्म कोरीव काम गुर्जर स्थापत्य शैलीत केलेले आहे.
या बावमध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिल्पांचा समावेश आहे... नवग्रहांच्या राशीला दहा-दहा अंशांच्या भागांत विभागून ग्रहांची अचूक स्थिती दर्शवणारी दशाही पाटिका आहे... तसेच गुडघे टेकून बसलेल्या राजाचे चित्रण व ऊंटावर बसलेला सैनिक आणि देवींची प्रतीकात्मक चित्रे आहेत...
या बावचे बांधकाम १५व्या शतकात सुरू झाले आणि १६व्या शतकात पूर्ण झाले.
रुडाबाई बावचा इतिहास अतिशय रोमांचक आणि प्रेरणादायी आहे...
दांडी राज्याचा आणि वाघेला वंशाचा राजा राणा वीर सिंग याने या बावचे बांधकाम सुरू केले होते...
परंतु गुजरात सल्तनतचा राजा महमूद बेगडा याच्या बरोबर झालेल्या लढाईत राणा वीर सिंग याला वीर मरण आले... त्यामुळे ही बाव अपूर्ण राहिली..
महमूद बेगडा याने राणा वीर सिंग याची बायको रुडाबाई हिला स्वतःशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला...
बाव पूर्ण झाल्यानंतर, आपला पती राणा वीर सिंग यांच्या वीर मरणाला कलंक लागू नये म्हणून राणी रुडाबाईने या बाव मध्ये उडी मारून प्राण त्याग केला... म्हणूनच ही बाव त्यागमूर्ती रुडाबाईची बाव म्हणून प्रसिद्ध झाली आहे...
रुडाबाईचा... जनतेला जल मिळण्यासाठी केलेल्या त्यागाचा... लोकसेवेचा आणि भारतीय नारीच्या चारित्र्य संपन्नतेचा इतिहास शिकवलाच गेला नाही... हीच खंत आहे...
सतीश जाधव