Wednesday, March 11, 2026

श्री. बजरंग बनसोडे (म.पो.से.), पोलिस उप आयुक्त... एक ग्रेट भेट... दि. १० मार्च२०२६

श्री. बजरंग बनसोडे (म.पो.से.), पोलिस उप आयुक्त, गुन्हे प्रतिबंधक शाखा, मुंबई... संवेदनशीलता, निसर्गप्रेम आणि माणुसकीची आस असणारे आणि जपणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व... आज त्यांच्या सहवासात अनुभवलेले क्षण माझ्यासाठी एक संस्मरणीय ठेवा झाला आहे...


बुलढाण्याचे सायकलिस्ट परममित्र संजय मयुरे यांच्या भारत परिक्रमा आरंभ समारंभात बनसोडे साहेबांची प्रथम भेट झाली होती... त्या कार्यक्रमात संजयची मयुरेची घेतलेली मुलाखत आज बनसोडे साहेबांच्या मार्फत मिळाली आणि तोच धागा पकडून भेटीसाठी वेळ मागितली... दुपारी तीन वाजताची वेळ मिळाली... या भेटीसाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि सायकल मित्र सुवर्णा अडसुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले...


भेट होताच साहेबांचा पहिला प्रश्न होता... “ओळखलं काय?” त्यावर सहज उमटलेले उत्तर होते... खेळाडूंना वेळ देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्याला बरे कोण विसरेल?

पहिल्याच भेटीत प्रेम, आत्मीयता आणि जिव्हाळ्याची ओढ अनुभवायला मिळाली...

केबिनमधील अभ्यागतांच्या कोचावर आदरपूर्वक बसवले गेले. फक्कड चहाच्या सोबतीने गप्पांची रंगलेली मैफल मनात घर करून गेली...

टुरिंग सायकलिंगमधील विविध उपक्रम, शिव चातुर्य दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेली गरुडझेप सायकल मोहीम, आणि खऱ्या इतिहासाची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न याविषयी तसेच दोन वेळा पार पडलेल्या विश्वविक्रमी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेबद्दल बोलणे साहेब अतिशय एकाग्रतेने ऐकत होते...

संवादाच्या ओघात त्यांनीही अशी मोहीम करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा मोहिमेसाठी योग्य वेळ काढता येईल, फक्त या व्यग्र जबाबदाऱ्यांमधून किमान तीस दिवसांची सुट्टी घ्यावी लागेल.. असा मनमोकळा संवाद रंगला...

साहेबांच्या केबिनमध्ये असलेली विविध झाडे, इनडोअर रोपटी आणि हिरवाई पाहून त्यांच्या निसर्गप्रेमाची आवड लक्षात आली... त्या अनुषंगाने बोलताना गावाकडे तब्बल दहा एकर क्षेत्रात विविध झाडे लावल्याचे त्यांनी सांगितले...

फळझाडे, फुलझाडे आणि पक्षी प्राण्यांसाठी जपलेले ते छोटेसे निसर्गविश्व... निरपेक्ष प्रेमाचा अनुभव देणारे आहे... आणि एक वेगळ्या भावविश्वात नेणारे आहे... हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले...

गाय वासरू, हरण, कुत्रा, मांजर, खार, ससा, राजहंस, पोपट, कबुतर तसेच विविध पक्षी… अशा अनेक प्राण्यांशी जुळलेला त्यांचा जिव्हाळा ऐकताना मन भारावून गेले...

एखादा आजारी कोंबडा औषधोपचाराने बरा करणे, दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मांजर केवळ आवाजावरून आपला मार्ग शोधत जगणे, आजारी घुबड किंवा कबुतरांना आधार देऊन पुन्हा निसर्गात सोडणे... या प्रत्येक गोष्टीतून त्यांच्या मनातील करुणा आणि मायेची ओल पक्षी प्राणी प्रेम अतिशय भावले...

निरपेक्ष प्रेमाची खरी भाषा प्राणी पक्षी शिकवतात, हे त्यांच्या अनुभवातून प्रकर्षाने जाणवले...

या संवादात आणखी एक गोष्ट विशेष लक्षात आली... मंत्रालयातून आणि पोलिस विभागातून वरिष्ठांचे फोन सतत येत होते... त्यांना हवी असलेली माहिती देताना... आपल्या प्रत्येक सहकाऱ्याशी, कर्मचाऱ्याशी बोलताना त्यांच्या आवाजात प्रेम, संयम आणि आदर जाणवत होता...

पद मोठे असले तरी माणुसकी अधिक मोठी असते... सरांच्या व्यक्तिमत्त्वाची ही आगळी वेगळी ओळख मनात त्यांच्या बद्दल एक आदरच स्थान निर्माण करून गेली...

फिटनेस जपणारे, धावणारे, पोहणारे, सायकल चालवणारे, मोटारसायकलने भ्रमंती करणारे, मित्र जोडणारे, निसर्ग प्राणी पक्ष्यांवर नितांत प्रेम करणारे आणि माणसांबद्दल आत्मियता जपणारे असे हे व्यक्तिमत्त्व भेटले... हीच आजची खरी “ग्रेट भेट” होती...

अशा संवेदनशील, प्रेरणादायी आणि मनाने अतिशय श्रीमंत असलेल्या अधिकाऱ्यांची भेट जीवनाला नवी ऊर्जा देऊन गेली...


सतीश कुसुम विष्णू जाधव
सायकलिस्ट
7977690693


Tuesday, March 10, 2026

जाता संतांच्या गावा” दि. ०८ मार्च २०२६

जाता संतांच्या गावा”  दि. ०८ मार्च २०२६

घुमान सायकल वारीचे संयोजक सूर्यकांत भिसे गुरुजी यांचे सुपुत्र स्वामीराज भिसे यांनी संतपरंपरेचा सखोल  अभ्यास करून लिहिलेल्या “जाता संतांच्या गावा” या ग्रंथाचे प्रकाशन काल रानडे इन्स्टिट्यूटचे सभागृह, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे येथे संपन्न झाला. 

मा. डॉ. सदानंद मोरे... अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मा. राजेश पांडे... संचालक, राष्ट्रीय पुस्तक न्यास, मा. डॉ. संजय विष्णू तांबट... अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मा. सचिन परब... संपादक, वार्षिक रिंगण, मा. कृष्णकुमार गोयल... अध्यक्ष, खडकी शिक्षण संस्था, मा. डॉ. संजय चाकणे... सहसचिव, खडकी शिक्षण संस्था, कॅप्टन आत्मसिद्ध भिसे... चेअरमन, मा.सै. सह. पतसंस्था दिघी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. 

संतांच्या ओव्या, अभंग, समाधी स्थळे, मंदिरे आणि संतपरंपरेचा विद्यमान समाजजीवनावर असलेला प्रभाव यांचा सखोल अभ्यास करून स्वामीराज भिसे यांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून हा ग्रंथ साकार केला आहे. संतसाहित्याचा आशय, त्यामागील अध्यात्मिक विचार आणि समाजजीवनातील प्रेरणादायी भूमिका यांचे अभ्यासपूर्ण चित्रण या ग्रंथात आढळते. त्यामुळे हा ग्रंथ संतपरंपरेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार आहे.

या प्रकाशन सोहळ्याला पंढरपूर ते पंजाब... घुमान सायकल वारीचे सर्व सक्रिय सदस्य मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. संतपरंपरेचा वारसा जतन करण्याच्या या उपक्रमाचे सर्वांनी मनापासून स्वागत केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वामीराज भिसे यांच्या संशोधनपर कार्याचे कौतुक करत संतविचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या या प्रयत्नाला मोठे महत्त्व असल्याचे सांगितले.

स्वामीराज सूर्यकांत भिसे लिखित जाता संतांच्या गावा...  या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक अत्यंत अर्थपूर्ण चित्र आणि त्यासोबत एक चिंतनशील कवन दिसते...

संत केवळ मंदिरातच सापडत नाहीत; ते भेटतात रस्त्यावर, गर्दीत, विसरलेल्या गल्ल्यांमध्ये आणि आपल्या मनाच्या खोल तळाशी...

या ओळींतून संतत्वाचा व्यापक अर्थ उलगडतो. संत हे केवळ मंदिरात पूजले जाणारे व्यक्तिमत्त्व नसून ते जीवनाच्या प्रत्येक प्रवाहात अनुभवता येणारे चैतन्य आहेत. समाजाच्या गजबजाटात, दैनंदिन जीवनाच्या धावपळीत आणि माणसाच्या अंतर्मनात त्यांचे विचार सतत मार्गदर्शन करत असतात...

चित्रात दिसणारी होडी या विचारांचीच प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. चारही बाजूंना पसरलेली पाने, जणू संतांच्या अभंगांची, ओव्यांची आणि त्यांच्या अनुभवसंपन्न वाङ्मयाची आठवण करून देतात. त्या ज्ञानसमुद्रात ही छोटीशी होडी आपला मार्ग शोधत पुढे सरकत आहे...

होडीवरील भगवा ध्वज संतपरंपरेतील त्याग, अध्यात्म आणि प्रेरणेचे प्रतीक आहे... जशी होडी लाटांमधून वाट काढते, तशीच संतवाणी जीवनातील गोंधळातून माणसाला योग्य दिशा दाखवते...

या चित्राचा आणि कवनाचा  एकत्रित भावार्थ असा की, संतांचा शोध घेण्यासाठी दूर जाण्याची आवश्यकता नाही. संतविचार समाजाच्या प्रत्येक प्रवाहात आणि माणसाच्या अंतर्मनात जिवंत असतात. त्या विचारांच्या दिशेने प्रवास सुरू झाला की जीवनालाही नवी दिशा आणि नवे प्रकाशपथ प्राप्त होते...

संतांचा विचार, त्यांची शिकवण आणि समाजजागृतीचा संदेश यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे “जाता संतांच्या गावा” हे पुस्तक निश्चितच वाचकांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. 

सतीश विष्णू जाधव, सायकलिस्ट

7977690696