Sunday, June 13, 2021

ऋणानुबंध राईड... १३ जून २०२१

ऋणानुबंध राईड... १३ जून २०२१

ठाण्याला सायकल राईड करत जाणे आता परिपाठ झाला आहे. छोटसं कारण ही ठाण्याला जायला पुरते. सायकलचा तुटलेला स्पोक बदलण्यासाठी उद्या राईड करायचे ठरविले.

मग परममित्र डॉ. राजेश कांबळेला भेटायचे पण नक्की केले. समर्पयामिची नवीन सायकल शॉपी आता उपवन जवळ उघडल्यामुळे सोईचे झाले होते. सायकलची बारीक सारीक कामे या शॉपीवर करणे सोपे झाले होते. 

सकाळी सहा वाजता लोअर परेल वरून राईड सुरू केली. रस्ता ओला होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. ओल्या  रस्त्यामुळे लो गियरवर सायकल मार्गक्रमण करत  होती.
         एकटे राईड करणे म्हणजे तल्लीनता असते. सकाळच्या वातावरणात जुकबॉक्सवर किशोरजींचे "जीवन से भरी तेरी आँखे" हे अतिशय आवडणारे गाणे लागले होते. या गाण्यातील अंतऱ्यात आलेली  "रंगो  छंदोमे समायेगी किस तरह से इतनी सुंदरता" ही ओळ अंतर्मुख करून गेली... विचारांचे वारू चौखूर उधळले.
         
 "निसर्गाचे अनंत रंग आपल्या डोळ्यात सामावू शकत नाहीत, एव्हढा प्रचंड आनंद या सृष्टीत सामावला आहे". फक्त आणि फक्त निसर्गावरचे प्रेमच या आनंदाला जवळ आणू शकते.... असेच काहीसे विचार मन पटलावर तरळत होते. एकांतातली हीच तल्लीनता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आणि प्रत्येक प्रसंगाला सामोरे जायचे  सामर्थ्य देत होते.

गाण्याच्या धुंदीत आणि पहाट वाऱ्याच्या मस्तीत राईड सुरू होती. पाखरांचा पूर्वेकडे झेप घेणारा थवा   किरणांच्या साथीने भविष्याचा वेध घेत होता. 

दीड तासात समर्पयामिच्या उपवन मधील नवीन शॉपीमधे पोहोचलो. कॅडबरी जंक्शनच्या पुढे राजेशची भेट झाली. 

आज रविवार म्हणजे सायकलिस्ट मित्रांच्या भेटीचा दिवस... प्रथम हसतमुख  बलजीत आला. त्याचा खास मित्र नटखट ब्रिजेशने आज सुट्टी घेतली होती. पाठोपाठ प्रविणकुमार आले. सायकलिंगमुळे खूपच स्लिम ट्रिम झाले होते. त्यांची झुबकेदार मिशी भारदस्त आहे. उत्सवमूर्ती यशवंत जाधव आले.  बलजीत आणि प्रवीण कुमार यांना लवकर निघायचे असल्यामुळे समर्पयामिच्या लोकेशनवर फोटो सेशन झाले. 

इतक्यात फ्रिलांस सायकलिस्ट अनिल वामोरकर यांची एन्ट्री झाली. संयमी पण बोलकं व्यक्तिमत्व मनाला भावलं. "तुम्हीच जाधव काय !!!" "तुमचे ब्लॉग वाचतो, खुप आनंद झाला तुम्हाला भेटून" ही त्यांची पहिली प्रतिक्रिया... 

मिस्कील आणि भारदस्त अडव्होकेट अंबर जोशी आला.  अंबर म्हणजे हास्याचा खजिना आहे. तो बोलायला लागला की आपण फक्त ऐकत राहायचे. कोर्टात तो प्लास्टिकच्या खुर्चीतुन कसा पडला, याचे बहारदार वर्णन अंबरने केले. स्वतःवर विनोद करण्याचे कसब त्याच्या कडून शिकावे. जो स्वतःवर विनोद करतो, तो सर्वांना प्रिय असतो. निरंजन कार मधून आला. आज तो घाईत दिसत होता. 

चैतन्यमयी सिद्धार्थ बागाव नवीन सायकलसह शॉपीवर आला.
  नवीन सायकल बद्दल भरभरून बोलत होता. आम्ही बोलत असताना हिरेन पटापट सायकलची कामे करत होता. तो खरं तर सायकलचा डॉक्टर आहे. राजेशला काहीतरी काम असल्यामुळे तो घरी निघाला. 

सिध्दार्थच्या मनात नवीन सायकल बद्दल ट्रीट द्यायचे होते. आणि आडनाव बंधु यशवंत जाधव मला न्याहरी दिल्याशिवाय सोडणार नव्हते.

नौपड्यातील गोखले उपहारगृहामध्ये मिसळपावचा स्वाद चाखायला आलो. येथे बसण्याची व्यवस्था होती. आजची ट्रीट सिद्धार्थने दिली. या उपहार गृहामागेच अनिल राहतात. 

मिसळ आणि तर्रीचा स्वाद घेताना, "छोटे छोटे आनंदाचे क्षण आपण वेचले पाहिजेत", यशवंत जाधव चटकन बोलून गेले. खरं आहे, या आनंदाच्या छोट्या छोट्या क्षणातून आपण समृद्ध होतो.  सायकलिंगच्या आनंदामुळे नवनवीन मित्रांचा खजिना वाढत आहे.  जुन्या मित्रांची नव्याने वेगळी ओळख होत आहे.  नवीन विषय आणि विचारांची देवाण घेवाण यामुळेच जीवन समृद्ध होत जाते.

गोखल्यांच्या मिठाईच्या दुकानातून मुगाचा साजूक तुपातील शिरा घेतला. तेथून केशव वडा टी सेंटर मध्ये आलो. येथील चहा एव्हढा फर्मास होता की दोन कप चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. 

पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन सर्वांचा निरोप घेतला. मिसळ आणि चहाचा स्वाद मुखात घोळवत परतीचा प्रवास सुरु झाला.

काहीतरी ऋणानुबंध असल्यामुळेच असे प्रिय मित्र माझ्या जीवनात आले आहेत.


सतीश जाधव
मुक्त पाखरे...

धुंद पावसाळी राईड१०, ११ जून २०२१

धुंद पावसाळी राईड
१०, ११ जून २०२१

धुवादार पावसात राईड करूया काय? संजयचा मेसेज आला. नऊ ते बारा जून दरम्यान मुंबई आणि आसपासच्या भागात धुवाधार पाऊस पडणार आहे, असे वेधशाळेने जाहीर केले होते. याचा संधीचा फायदा घेऊन पावसात खंडाळा सायकल सफर करण्याचे ठरले...

आज सकाळी साडेपाच वाजता सायकल राईड सुरू झाली. सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला होता. सुरुवातीलाच पावसात भिजणे, एकदम अंगावर येते. त्यामुळेच पोंचू घालून पावसाची तमा न बाळगता पेडलिंग सुरू केले. पावसामुळे रस्त्याला अंधार होता. संततधारेमुळे चष्म्यावर पडणारे टप टप थेंब रस्ता दिसेनासा करीत होते. परेल हिंदमाता जवळ पाणी तुंबायला नुकतीच सुरुवात झाली होती. संजयने सुद्धा दहिसर वरून सायकलिंग सुरू केली होती. 

आज पावसाचा आवेश काही वेगळाच होता. दादर चित्रा सिनेमा जवळील पुलाखालून जाताना; पुलावरून मोठी बस गेल्यामुळे पाण्याचा प्रचंड झोत धाडकन डोक्यावर कोसळला. सायकल सकट होलपटलो. MTB सायकल असल्यामुळे पटकन सावरलो. अंगात पॉंचू असून सुद्धा नखशिखान्त भिजलो होतो. पाऊस सतत पडत असल्यामुळे सायकलचा वेग अतिशय कमी झाला होता. 

"आता थांबायचं नाही गड्या"...  "जिद्दीने पेडल करत रहायचं.." हे मनाला समजावले...  आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचे... तेव्हाच आनंदाची आगळी वेगळी सकाळ प्रकाशमान होणार होती. तब्बल दिड तास लागला वाशी स्टेशन जवळील हायवेला पोहोचायला. वाशी उड्डाण पुलाखाली तुतारी वाजविणाऱ्या मावळ्याचा पुतळा होता.मावळा खरच तुतारी वाजवून माझे स्वागत करीत होता. संजय घाटकोपर पर्यंत पोहोचला होता. आम्ही दोघे पनवेलच्या पुढे दत्त स्नॅक्स हॉटेल जवळ भेटण्याचे ठरविले होते.
 आता जलधारांनी थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे पुढची सफर पामबीच रोड वरून सुरू केली. पामबीच म्हणजे सायकलिस्ट मंडळींचे अतिशय आवडते ठिकाण... पण गम्मत म्हणजे पामबीच मार्गे नवी मुंबई महापालिके पर्यंत एकही सायकलिस्ट दिसला नाही. 

बेलापूर हायवेला आल्यावर गाड्याच्या रहदारीत सायकलिंग सुरू झाली. पॉंचू काढून आता हिरवा फ्लुरोसंट विंडचिटर घातला. पाऊस थांबला तरी नभात काळ्या ढगांनी दाटी केली होती. बाजूने जाणाऱ्या गाड्या स्प्रे सारखे पाण्याचे तुषार अंगावर उडवत होते. हा तर जमिनीवरून अंगावर कोसळणारा पाऊस होता. खांदेश्वर गाव आले आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. चोही बाजूनी जलधारांनी माझ्या भोवती फेर धरला होता. थेंब अन् थेंब जणू मित्रच वाटत होता. खरं तर पावसात भिजायचे कारण हवे होते. या निसर्गानेच चैतन्याचे धडे शिकविले होते.  या धुंद पावसात रममाण होत मुंबई गोवा हायवेच्या सुरवातीला असलेल्या  दत्त स्नॅक्स कॉर्नरला पोहोचलो. 

पंधरा मिनिटात संजय तेथे पोहोचला. चरचरीत भूक लागली होती. खमंग कांदा भजी आणि वडापाव वर ताव मारला. सोबत आणलेला सुकामेवा साथीला होताच.

 आता सुरू झाली मैत्रीची राईड... नर्मदा परिक्रमा केल्या नंतर आज पुन्हा एकदा आम्ही दोघे एकमेकांच्या संगतीत तुडुंब राईड करणार होतो. पाऊस पुन्हा बरसतोय...  अशा वेळी मित्राचा सहवास लाभतोय...  कोन गावाजवळ एक्सप्रेस वे ला जुना हायवे क्रॉस करतो, त्या ब्रिजवर थांबलो आणि सरळ रेषेत जाणाऱ्या एक्सप्रेस वे चे दर्शन घेतले. दूरवर डोंगरांच्या कपारीत रस्ता गडप झाला होता. तेथे नभ काळ्या मेघांनी झाकोळले होते. ढगांचे डोंगरांशी मिलन झाल्याचे अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवत होतो.

खोपोलीकडे राईड सुरू झाली आणि गेल्या वर्षी केलेली एकविरा देवी राईड आठवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेले गर्द गहिरे हिरवे रान... हरवून जाई धुंद मनाचे भान... अशी स्थिती झाली होती. रसायनी बस स्टँड जवळ आलो. तेथे पुणे १०० किमी मैलाचा दगड लागला.
तेथे फोटो काढला आणि मित्रांना पोष्ट केला.  काय आश्चर्य शरदचा मेसेज आला... तुम्ही नक्की कुठे चालला आहात... मुंबई कन्याकुमारी सायकलिंग करताना याच मार्गाने बंगलोर लागले होते त्याची आठवण झाली. 

पुढे मार्गक्रमण करत असताना विने गावाजवळील निशीलँड पार्क मध्ये एक खरेखुरे विमान ठेवले होते. विमानाच्या लोकेशनवर फोटो काढले. हिरवळीच्या जंगलात उतरलेले विमान सायकल पुढे खुजे वाटत होते. मुंबई पुणे जुना हायवे चारपदरी मार्ग अतिशय सुस्थितीत होता. दोन्ही बाजूला हिरवळ आणि  तरारलेल्या झाडांच्या मधून नागमोडी सायकलिंग मनाच्या डोहात शांतीचे तरंग उमटवित होते. 

"आनंदाचे डोही आनंद तरंग" या तल्लीनते मध्ये महडच्या वरदविनायक गणेश मंदिराकडे आलो. मंदिर बंद असल्यामुळे, बाप्पाचे दर्शन बाहेरून घेतले. मंदिराच्या जवळच राहण्याची सोय आहे, हे समजल्यावर हुरूप आला. खंडाळ्याला राहण्याची सोय झाली नाही तर महडला यायचे ठरविले.  आता खंडाळ्याच्या घाट चढण्याचे नक्की केले. 

भूक लागली होती पण जेवल्यावर घाट चढणे कठीण झाले असते म्हणून खोपोलीच्या अलीकडे हाल गावाजवळ अननसाचा टेम्पो उभा होता. त्याच्या कडून एक रसरशीत अननस घेतले. सुकामेवा खाऊन सुरू झाली चढाई खंडाळ्याच्या घाटाची...  या घाटाला बोरघाट पण म्हणतात. अतिशय कठीण घाट म्हणून याची ख्याती होती. परंतु एक्सप्रेस वे झाल्यामुळे या घाटाची रहदारी कमी झाली आहे. तसेच रुंद केलेल्या रस्त्यामुळे अपघात सुद्धा कमी झाले आहेत.

 अतिशय बाकदार वळणे आणि उभ्या चढाईचा खंडाळ्याचा रस्ता भल्या भल्या सायकलिस्ट मंडळींना जेरीस आणतो. म्हणूनच लेह लढाखची पूर्व तयारी म्हणून भर पावसात खंडाळा चढायचे ठरविले होते. 

नव्या ऊर्जेने चढाई सुरू केली. पाऊस थांबला तरी आकाश ढगाळ होते. आता जलधाराशिवाय अंग घामाने चिंब झाले होते. शिंगरोबा मंदिराकडे पोहोचलो आणि देवाला प्रसाद दाखवून रसरशीत अननसाचा फडशा पडला. मस्तपैकी तासभर हायड्रेशन ब्रेक घेतला. आता सुरू झाली अमृतांजन पुलाकडे चढाई. 

घाटात पुढे धबधबा लागला. दोघेही घुसलो पाण्यात आणि जी धम्माल केली त्याला तोड नाही. निव्वळ आम्ही दोघेच डुंबत होतो. चहा घेऊन अमृतांजन ब्रिजकडे प्रस्थान केले.  ढगात दडलेल्या नागफणी  कड्याचे (ड्युक्स नोज) दर्शन झाले. निळ्याभोर आकाशावर पांढऱ्याफेक ढगांचा शिडकावा त्या कॅनव्हासवर नागफणीचा डोंगर, हे निसर्ग चित्र पाहिल्यावर भान हरपून गेले.फोटो काढण्याची आता आमची चढाओढ लागली.

आता शेवटचा चढ सुरू झाला. "खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार" हे गाण्याचे बोल आठवले. या थंडगार हवेतून पुरेपूर प्राणवायू नसानसात भरून घेतला. त्यामुळे हा चढ सहजपणे चढून गेलो. राजमाची व्हीव पॉईंटकडे आलो. या टप्यावर निसर्गाचे बहारदार रूप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करू लागलो. दूरवर डोंगराच्या माथ्यावरून कोसळणारा धबधबा पायथ्याला हिरवळीत गडप झाला होता. पुढे नागमोडी धावत जाणारा ओहळ लहान बालकासारखा अवखळ झाला होता. भान हरपून गेले. 

येथून खंडाळा गावात आलो. येथेच मुंबई बँकेच्या स्वप्नपूर्ती विश्रामधाम मध्ये राहायची सोय संजयमुळे झाली... ते पण रात्रीच्या जेवणासह. संध्याकाळच्या प्रहरी पाऊस सुरू झाला... संपूर्ण कॉटेज परिसर धुक्याने भरून गेला. येणारा प्रकाश सुद्धा धुक्यात हरवला होता. जेवणाच्या अगोदर खंडाळ्याचा एक फेरफटका मारला. तलावावर जाऊन पावसांच्या तुषारासह थंड वारे अंगावर घेतले. 

 तलावात उमटलेले तरंग आणि संधीप्रकाशात लाभलेला शांत एकांत, सोबत मित्राचा संग... आणखी काय हवे असते जीवन अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी....

भरपेट नास्ता करून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता परतीचा प्रवास सुरु झाला.
आता वेगाला मागे टाकत सुसाटत मुंबईकडे निघालो होतो. पाऊस पाठशिवणीचा खेळ खेळत होता... हिरवे प्लुरोसंट विंडचिटर घातल्यामुळे खूप सुरक्षित वाटत होते. तसेच पावसाळी सायकलिंग सँडल्सवर करणे खूप सुखकारक आहे, याचा प्रत्यय आला.  वाटेत अमृतांजन पुलाजवळ मयुरेश पॉईंट लागला. याच ठिकाणी समर्पयामिच्या मयुरेशने टि शर्ट काढून डान्स केला होता.

  तीन ठिकाणी हायड्रेशन ब्रेक घेतले.  वाशी गावात केळी खाल्ली. संजयने मानखुर्दवरून दहिसरला जाण्यासाठी घाटकोपर कडे प्रस्थान केले.
  
    पावसात तुडुंब भिजत २१० किमी राईड दोन दिवसात पूर्ण झाली. विशेष म्हणजे अवघड खंडाळ्याचा घाट सहज पार करत... हिरवटलेले डोंगर.. खळखळणारे नाले... आणि भिरभरणारे काळपट पांढरट ढग...यांच्या संगतीत दोन दिवस अविस्मरणीय झाले होते.


सतीश जाधव
मुक्त पाखरे