Sunday, June 13, 2021

धुंद पावसाळी राईड१०, ११ जून २०२१

धुंद पावसाळी राईड
१०, ११ जून २०२१

धुवादार पावसात राईड करूया काय? संजयचा मेसेज आला. नऊ ते बारा जून दरम्यान मुंबई आणि आसपासच्या भागात धुवाधार पाऊस पडणार आहे, असे वेधशाळेने जाहीर केले होते. याचा संधीचा फायदा घेऊन पावसात खंडाळा सायकल सफर करण्याचे ठरले...

आज सकाळी साडेपाच वाजता सायकल राईड सुरू झाली. सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला होता. सुरुवातीलाच पावसात भिजणे, एकदम अंगावर येते. त्यामुळेच पोंचू घालून पावसाची तमा न बाळगता पेडलिंग सुरू केले. पावसामुळे रस्त्याला अंधार होता. संततधारेमुळे चष्म्यावर पडणारे टप टप थेंब रस्ता दिसेनासा करीत होते. परेल हिंदमाता जवळ पाणी तुंबायला नुकतीच सुरुवात झाली होती. संजयने सुद्धा दहिसर वरून सायकलिंग सुरू केली होती. 

आज पावसाचा आवेश काही वेगळाच होता. दादर चित्रा सिनेमा जवळील पुलाखालून जाताना; पुलावरून मोठी बस गेल्यामुळे पाण्याचा प्रचंड झोत धाडकन डोक्यावर कोसळला. सायकल सकट होलपटलो. MTB सायकल असल्यामुळे पटकन सावरलो. अंगात पॉंचू असून सुद्धा नखशिखान्त भिजलो होतो. पाऊस सतत पडत असल्यामुळे सायकलचा वेग अतिशय कमी झाला होता. 

"आता थांबायचं नाही गड्या"...  "जिद्दीने पेडल करत रहायचं.." हे मनाला समजावले...  आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचे... तेव्हाच आनंदाची आगळी वेगळी सकाळ प्रकाशमान होणार होती. तब्बल दिड तास लागला वाशी स्टेशन जवळील हायवेला पोहोचायला. वाशी उड्डाण पुलाखाली तुतारी वाजविणाऱ्या मावळ्याचा पुतळा होता.मावळा खरच तुतारी वाजवून माझे स्वागत करीत होता. संजय घाटकोपर पर्यंत पोहोचला होता. आम्ही दोघे पनवेलच्या पुढे दत्त स्नॅक्स हॉटेल जवळ भेटण्याचे ठरविले होते.
 आता जलधारांनी थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे पुढची सफर पामबीच रोड वरून सुरू केली. पामबीच म्हणजे सायकलिस्ट मंडळींचे अतिशय आवडते ठिकाण... पण गम्मत म्हणजे पामबीच मार्गे नवी मुंबई महापालिके पर्यंत एकही सायकलिस्ट दिसला नाही. 

बेलापूर हायवेला आल्यावर गाड्याच्या रहदारीत सायकलिंग सुरू झाली. पॉंचू काढून आता हिरवा फ्लुरोसंट विंडचिटर घातला. पाऊस थांबला तरी नभात काळ्या ढगांनी दाटी केली होती. बाजूने जाणाऱ्या गाड्या स्प्रे सारखे पाण्याचे तुषार अंगावर उडवत होते. हा तर जमिनीवरून अंगावर कोसळणारा पाऊस होता. खांदेश्वर गाव आले आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. चोही बाजूनी जलधारांनी माझ्या भोवती फेर धरला होता. थेंब अन् थेंब जणू मित्रच वाटत होता. खरं तर पावसात भिजायचे कारण हवे होते. या निसर्गानेच चैतन्याचे धडे शिकविले होते.  या धुंद पावसात रममाण होत मुंबई गोवा हायवेच्या सुरवातीला असलेल्या  दत्त स्नॅक्स कॉर्नरला पोहोचलो. 

पंधरा मिनिटात संजय तेथे पोहोचला. चरचरीत भूक लागली होती. खमंग कांदा भजी आणि वडापाव वर ताव मारला. सोबत आणलेला सुकामेवा साथीला होताच.

 आता सुरू झाली मैत्रीची राईड... नर्मदा परिक्रमा केल्या नंतर आज पुन्हा एकदा आम्ही दोघे एकमेकांच्या संगतीत तुडुंब राईड करणार होतो. पाऊस पुन्हा बरसतोय...  अशा वेळी मित्राचा सहवास लाभतोय...  कोन गावाजवळ एक्सप्रेस वे ला जुना हायवे क्रॉस करतो, त्या ब्रिजवर थांबलो आणि सरळ रेषेत जाणाऱ्या एक्सप्रेस वे चे दर्शन घेतले. दूरवर डोंगरांच्या कपारीत रस्ता गडप झाला होता. तेथे नभ काळ्या मेघांनी झाकोळले होते. ढगांचे डोंगरांशी मिलन झाल्याचे अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवत होतो.

खोपोलीकडे राईड सुरू झाली आणि गेल्या वर्षी केलेली एकविरा देवी राईड आठवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेले गर्द गहिरे हिरवे रान... हरवून जाई धुंद मनाचे भान... अशी स्थिती झाली होती. रसायनी बस स्टँड जवळ आलो. तेथे पुणे १०० किमी मैलाचा दगड लागला.
तेथे फोटो काढला आणि मित्रांना पोष्ट केला.  काय आश्चर्य शरदचा मेसेज आला... तुम्ही नक्की कुठे चालला आहात... मुंबई कन्याकुमारी सायकलिंग करताना याच मार्गाने बंगलोर लागले होते त्याची आठवण झाली. 

पुढे मार्गक्रमण करत असताना विने गावाजवळील निशीलँड पार्क मध्ये एक खरेखुरे विमान ठेवले होते. विमानाच्या लोकेशनवर फोटो काढले. हिरवळीच्या जंगलात उतरलेले विमान सायकल पुढे खुजे वाटत होते. मुंबई पुणे जुना हायवे चारपदरी मार्ग अतिशय सुस्थितीत होता. दोन्ही बाजूला हिरवळ आणि  तरारलेल्या झाडांच्या मधून नागमोडी सायकलिंग मनाच्या डोहात शांतीचे तरंग उमटवित होते. 

"आनंदाचे डोही आनंद तरंग" या तल्लीनते मध्ये महडच्या वरदविनायक गणेश मंदिराकडे आलो. मंदिर बंद असल्यामुळे, बाप्पाचे दर्शन बाहेरून घेतले. मंदिराच्या जवळच राहण्याची सोय आहे, हे समजल्यावर हुरूप आला. खंडाळ्याला राहण्याची सोय झाली नाही तर महडला यायचे ठरविले.  आता खंडाळ्याच्या घाट चढण्याचे नक्की केले. 

भूक लागली होती पण जेवल्यावर घाट चढणे कठीण झाले असते म्हणून खोपोलीच्या अलीकडे हाल गावाजवळ अननसाचा टेम्पो उभा होता. त्याच्या कडून एक रसरशीत अननस घेतले. सुकामेवा खाऊन सुरू झाली चढाई खंडाळ्याच्या घाटाची...  या घाटाला बोरघाट पण म्हणतात. अतिशय कठीण घाट म्हणून याची ख्याती होती. परंतु एक्सप्रेस वे झाल्यामुळे या घाटाची रहदारी कमी झाली आहे. तसेच रुंद केलेल्या रस्त्यामुळे अपघात सुद्धा कमी झाले आहेत.

 अतिशय बाकदार वळणे आणि उभ्या चढाईचा खंडाळ्याचा रस्ता भल्या भल्या सायकलिस्ट मंडळींना जेरीस आणतो. म्हणूनच लेह लढाखची पूर्व तयारी म्हणून भर पावसात खंडाळा चढायचे ठरविले होते. 

नव्या ऊर्जेने चढाई सुरू केली. पाऊस थांबला तरी आकाश ढगाळ होते. आता जलधाराशिवाय अंग घामाने चिंब झाले होते. शिंगरोबा मंदिराकडे पोहोचलो आणि देवाला प्रसाद दाखवून रसरशीत अननसाचा फडशा पडला. मस्तपैकी तासभर हायड्रेशन ब्रेक घेतला. आता सुरू झाली अमृतांजन पुलाकडे चढाई. 

घाटात पुढे धबधबा लागला. दोघेही घुसलो पाण्यात आणि जी धम्माल केली त्याला तोड नाही. निव्वळ आम्ही दोघेच डुंबत होतो. चहा घेऊन अमृतांजन ब्रिजकडे प्रस्थान केले.  ढगात दडलेल्या नागफणी  कड्याचे (ड्युक्स नोज) दर्शन झाले. निळ्याभोर आकाशावर पांढऱ्याफेक ढगांचा शिडकावा त्या कॅनव्हासवर नागफणीचा डोंगर, हे निसर्ग चित्र पाहिल्यावर भान हरपून गेले.फोटो काढण्याची आता आमची चढाओढ लागली.

आता शेवटचा चढ सुरू झाला. "खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार" हे गाण्याचे बोल आठवले. या थंडगार हवेतून पुरेपूर प्राणवायू नसानसात भरून घेतला. त्यामुळे हा चढ सहजपणे चढून गेलो. राजमाची व्हीव पॉईंटकडे आलो. या टप्यावर निसर्गाचे बहारदार रूप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करू लागलो. दूरवर डोंगराच्या माथ्यावरून कोसळणारा धबधबा पायथ्याला हिरवळीत गडप झाला होता. पुढे नागमोडी धावत जाणारा ओहळ लहान बालकासारखा अवखळ झाला होता. भान हरपून गेले. 

येथून खंडाळा गावात आलो. येथेच मुंबई बँकेच्या स्वप्नपूर्ती विश्रामधाम मध्ये राहायची सोय संजयमुळे झाली... ते पण रात्रीच्या जेवणासह. संध्याकाळच्या प्रहरी पाऊस सुरू झाला... संपूर्ण कॉटेज परिसर धुक्याने भरून गेला. येणारा प्रकाश सुद्धा धुक्यात हरवला होता. जेवणाच्या अगोदर खंडाळ्याचा एक फेरफटका मारला. तलावावर जाऊन पावसांच्या तुषारासह थंड वारे अंगावर घेतले. 

 तलावात उमटलेले तरंग आणि संधीप्रकाशात लाभलेला शांत एकांत, सोबत मित्राचा संग... आणखी काय हवे असते जीवन अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी....

भरपेट नास्ता करून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता परतीचा प्रवास सुरु झाला.
आता वेगाला मागे टाकत सुसाटत मुंबईकडे निघालो होतो. पाऊस पाठशिवणीचा खेळ खेळत होता... हिरवे प्लुरोसंट विंडचिटर घातल्यामुळे खूप सुरक्षित वाटत होते. तसेच पावसाळी सायकलिंग सँडल्सवर करणे खूप सुखकारक आहे, याचा प्रत्यय आला.  वाटेत अमृतांजन पुलाजवळ मयुरेश पॉईंट लागला. याच ठिकाणी समर्पयामिच्या मयुरेशने टि शर्ट काढून डान्स केला होता.

  तीन ठिकाणी हायड्रेशन ब्रेक घेतले.  वाशी गावात केळी खाल्ली. संजयने मानखुर्दवरून दहिसरला जाण्यासाठी घाटकोपर कडे प्रस्थान केले.
  
    पावसात तुडुंब भिजत २१० किमी राईड दोन दिवसात पूर्ण झाली. विशेष म्हणजे अवघड खंडाळ्याचा घाट सहज पार करत... हिरवटलेले डोंगर.. खळखळणारे नाले... आणि भिरभरणारे काळपट पांढरट ढग...यांच्या संगतीत दोन दिवस अविस्मरणीय झाले होते.


सतीश जाधव
मुक्त पाखरे

12 comments:

  1. निसर्गाशी एकरूप करायला लावणारी सायकल सफर ....सुंदर लेख

    ReplyDelete
  2. Sir, कुठे राहिलात याचा उल्लेख व्ह्याला हवा होता, मी तेच शोधत होतो.निसर्गाचे छान वर्णन केलेले आहे

    ReplyDelete
  3. सोगो गणेशचे अभिप्राय

    मस्त सर तुम्ही अनुभवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर वाचताना उभा राहतो खूप छान लिखाण अप्रतिम👌👌👌

    ReplyDelete
  4. परम मित्र संजय चे अभिप्राय

    तलावात उमटलेले तरंग आणि संधीप्रकाशात लाभलेला शांत एकांत, सोबत मित्राचा संग... आणखी काय हवे असते जीवन अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी....
    सतिश ! अप्रतिम काव्यात्मक ओघवते प्रवास वर्णन ! डोळ्यासमोर निर्सगाचे रेखाटन उभे केलेस ! जबरदस्त !🙏

    ReplyDelete
  5. परम मित्र विकास चे अभिप्राय

    सतिश उत्तम प्रवास वर्णन तु लेखमालेच पुस्तक बनवावे हीच शुभेच्छा 👍💐

    ReplyDelete

  6. You description of the feeling of going on an adventure........ .your experiences are pretty enjoyable............

    ReplyDelete
  7. मित्र निनाद चे अभिप्राय

    जितका रम्य निसर्ग तितकेच रम्य लिहिलेलं निसर्ग वर्णन
    आणि त्यासोबत सायकलवरून मनसोक्त केलेला प्रवास
    वाचताना वाचक रममाण होतो ....

    ReplyDelete
  8. तुमचा सायकल सफरीचा छंद छान आहे वर्णन वाचताना पूर्वी जुन्या खंडाळा घाटातून बरेच वेळा चालत गेलो त्या डोळ्यासमोर आल्या

    ReplyDelete
  9. खूप सुंदर अनुभव सर

    ReplyDelete