Sunday, March 30, 2025

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २१ फेब्रुवारी २०२५...केरळचा राजन अण्णा...

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २१ फेब्रुवारी २०२५

केरळचा राजन अण्णा...

केरळ मधील करीनकपारा गावात केळी घ्यायला थांबलो... सकाळचा ब्रेक फास्ट झाला नसल्याने केळी खाऊन दोन तास राईड करायची होती...

राजन स्टोअरचा मालक राजन अण्णा  गल्ल्यावरून उठून बाहेर आला... आस्थेने मल्याळम मध्ये चौकशी करू लागला... त्याचे मल्याळम आणि आमचे हिंदी इंग्लिश मेळ खात नव्हते... पण त्याच्या बोलण्यातली कणव जाणवत होती... तेवढ्यात दुकानात असलेला त्याचा मुलगा अनिरुद्ध बाहेर आला... त्याला इंग्लिश येत होते...

 एक किलो केरळी वेलची केळी सत्तर रुपयात दिली... किमान अठरा केळी आली असावी... गोड केरळी अप्पे सुद्धा घेतले... सर्वांनी केळी आणि अप्पे गटकावले... आणि तयार झाले पुढील दोन तास राईड करायला...

अनिरुद्धने आमची चौकशी करून मल्याळम व्यतिरिक्त कोणतीही भाषा न  समजणाऱ्या वडिलांना सर्व माहिती दिली... राजन अण्णा एकदम खुश झाला...केळीचे पैसे नाकारू लागला... बळेच पैसे दिले त्याला...

आम्ही पुढे निघालो... तर राजन अण्णा मागून स्कूटर वरून आला आणि थंड पाण्याची बाटली देऊन गेला... 

राजन अण्णाला आमचा काश्मीर ते कन्याकुमारी साहसी सायकलिंगचा  उद्देश समजला होता... या जागतिक विक्रमात त्याने सुद्धा खारीचा वाटा उचलला होता...

निरपेक्ष उद्देश आणि लोककल्याण... यातूनच प्रेमाचा मार्ग जातो... हेच राजन अण्णाच्या कृतीतून दिसते...


सतीश जाधव, सायकलिस्ट

7977690693

Tuesday, March 25, 2025

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २० फेब्रुवारी २०२५. कोझिकोडे येथील पेट्रोल पंप मॅनेजर मनोज...

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २० फेब्रुवारी २०२५

कोझिकोडे येथील पेट्रोल पंप मॅनेजर मनोज...

कोझिकोडे येथील HP पेट्रोलपंपावर मॅनेजर मनोजची भेट झाली... डोगरा रेजमेंटमधून हवालदार पदावरून निवृत्त झालेल्या मनोजने पेट्रोल पंप घराप्रमाणे स्वच्छ ठेवला होता... 

सर्व महिला कामगार होत्या पेट्रोलपंपावर... अतिशय हसतमुखपणे सर्व महिला पेट्रोल डिझेल भरण्याचे काम करत होत्या... एक महिला साफसफाईकडे बारकाईने लक्ष देऊन होती... 

टॉयलेटला गेल्यावर ताबडतोब टॉयलेट स्वच्छ केले जात होते... अपंगांसाठी स्वतंत्र बाथरूम होते... RO पाण्याचा कुलर होता... थंडगार पाणी बाटल्यात भरून घेतले आणि तृष्णा शांत केली...

फ्रिज मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स ठेवले होते... ते सुद्धा MRP वर मिळत होते... मोटर सायकल आणि बस गाड्या पार्किंग साठी स्वतंत्र जागा होती... येथे गाडीचे ऑईल बदलले तर 10% सूट होती...

सायकलिस्ट मोटार बाईकर यांच्यासाठी राहण्याची, टेन्ट लावण्याची व्यवस्था होती... पंप मॅनेजर मनोजने आम्हाला सुद्धा राहण्याची विनंती केली... परंतु पुढील टप्पा गाठायचा होता...

पाच वाजता मागच्या बाजूला असलेल्या भगवती मंदिरातून  शारदा स्तोत्र सुरू झाले... वातावरण मस्त मंगलमय झाले... नमाजी केरळ मध्ये हिंदू भक्तिगीत ऐकून मन भावविभोर झाले...

मनोज केबिन मधून बाहेर येऊन आमची आस्थेने चौकशी करत होता... काश्मिर ते कन्याकुमारी सायकलिंग करत असल्याबद्दल त्याला खूप आनंद झाला होता...

आर्मी मध्ये असताना खूप ट्रेकिंग केले होते मनोजने... पण आता पाय दुखतात... असे म्हणाला... सायकलिंगमुळे पायाचे दुखणे नाहीसे होते आणि तब्बेत सुद्धा चांगली होते... त्यावर सायकलिंग करण्याचे त्याने आश्वासन दिले...

या रस्त्याने तुमच्या ओळखीचे कोणीही सायकलिस्ट आणि बायकर्स जाणार असतील तर त्यांना या पेट्रोल पंपाला आवर्जून भेट द्यायला सांगा... मनोज म्हणाला...

या सायकल सफरी मध्ये अशी आगळी वेगळी व्यक्तिमत्वे भेटत होती आणि आनंदाचा चिरंतन साठा देऊन जाता होती...

पाडगावकरांचे भावगीत ओठावर तरळून गेले...

कुठे कुणाच्या घडल्या भेटी...

गीत एक मोहरते ओठी...

त्या जुळल्या हृदयांची गाथा...

सूर अजूनही गाती...

अशी पाखरे येती... 

आणिक स्मृती ठेऊनी जाती...


सतीश जाधव, सायकलिस्ट

टीम लीडर, 7977690693

Monday, March 24, 2025

मुंबईच्या वरिष्ठ तरुण सायकलवीरांनी केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारी... आणि दिला 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश....


 मुंबईच्या वरिष्ठ तरुण  सायकलवीरांनी केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारी... आणि दिला 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश....

पाच सेवानिवृत्त मुंबईकरांनी 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी असा ४,१९८ किमीचा सायकल प्रवास सागरी महामार्गावरून पूर्ण केला.

प्रदूषण कमी करण्याच्या संदेशासोबत सुदृढ आरोग्य राखणे आणि वयस्कांमध्ये  सक्रिय जीवनशैलीबद्दल जागरूकता पसरवणे देखील होता.

वरिष्ठ सायकलिस्ट सतीश जाधव (६७) यांच्या नेतृत्वाखाली   जितेंद्र जैन (५६), मनोज चौगुले (६२), जयंती गाला (५५) आणि मंगल भानुशाली (६४)... हे  टूरिंग सायकलिंगच्या आवडीमुळे देशाच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंतच्या  स्वप्नातील सायकलिंग सफर पूर्ण करण्यासाठी एकत्र आले होते.

संघप्रमुख सतीश जाधव यांनी जुलै २०२४ मध्ये जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता उमलींगला पास सायकलने पादाक्रांत केला होता... तसेच त्यांच्या नावावर सायकलिंगचे दोन जागतिक विक्रम आहेत... संपूर्ण भारतात ७६,००० किमी सायकल सफर करणाऱ्या जाधव यांचा १०० वर्षापर्यंत सायकलिंग करण्याचा निर्धार आहे...

या वरिष्ठ तरुण सायकलवीरांनी  १६ जानेवारी रोजी श्रीनगरच्या लाल चौकातून आपला प्रवास सुरू केला 

पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी... प्रदूषण मुक्त भारताचा संदेश देत... जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ मार्गे काश्मिर ते कन्याकुमारी हा ४१९८ किमीचा प्रवास ३९ दिवसात पूर्ण केला...

तसेच कोणत्याही सहाय्यक वाहनाशिवाय आणि सर्व सामान सायकलवर घेऊन  दररोज १०० किमी पेक्षा जास्त अंतर कापले आणि शेवटचा २३० किमीचा  टप्पा २२ तासांत  पूर्ण केला.

डिझेल पेट्रोल वाहनांच्या अतोनात वापरामुळे प्रदूषणाची होणारी प्रचंड वाढ थांबविण्यासाठी... आम्हाला लोकांमध्ये जागरूकता पसरवायची होती...

 सैनिक किंवा पोलिस प्रसंगी प्राणाची आहुती देऊन देशसेवा करतात... तसेच निवृत्ती नंतर देशसेवा करण्यासाठीच सायकलिंगने भारत भ्रमंती हा मार्ग आम्ही निवडला...

 सायकलिंगमुळे केवळ प्रदूषण कमी होईलच असे नाही तर व्यक्तीच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठीच प्रत्येकाने सायकलिंगकडे वळणे महत्त्वाचे आहे.  तसेच सर्वांना सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणे हा आमचा उद्देश होता," असे जाधव म्हणाले.

 संपूर्ण मार्गावर विविध शाळा आणि महाविद्यालये आणि पोलिस स्टेशन मध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी  या चमूने व्याख्याने दिली.

 एका शहरातून दुसऱ्या शहरात पॅडलिंग करत असताना, विविध समुदाय आणि सरकारी अधिकाऱ्यांनी  त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सायकल वारीला हिरवा झेंडा दाखवला.

वाटेत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि संरक्षण दलातील माजी कर्मचाऱ्यांनी  आमचे स्वागत केले आणि आम्हाला अनेक प्रकारे मदत केली. विशेषतः काश्मीरमध्ये, आम्हाला एस्कॉर्ट वाहने देण्यात आली होती... तसेच  आमच्यासाठी रस्ता मोकळा केला होता त्यामुळे आम्ही या प्रदेशातून सुरक्षितपणे प्रवास केला... जितेंद्र जैन म्हणाले

आम्ही काश्मिरच्या बर्फवृष्टीतून तसेच केरळच्या कडक उन्हातून  सायकलिंग केली,  एकंदरीत सायकल वारीचा हा अनुभव अविस्मरणीय होता...  असे जाधव म्हणाले.

या सायकल वारीसाठी ठाण्याच्या आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन, घोडबंदर सायकल क्लब आणि समर्पयामि सायकल्स तसेच मुंबईच्या पेडल वॉरियर्स या सायकल संघटनांचे  विशेष सहकार्य लाभले.

काश्मिर ते कन्याकुमारी स्वप्न झाले साकार... दिनांक २४ फेब्रुवारी २०२५



काश्मिर ते कन्याकुमारी स्वप्न झाले साकार...

सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना सादर प्रणाम...

जीवनात अनेक स्वप्न पहात असतो... पण किती साकारतात... स्वप्नांना प्रत्यक्षात आणायला अथक परिश्रमाची जोड द्यावी लागते... 

एकट्यानेच आपले स्वप्न साकार करणे... आणि आणखी चार जणांना सोबत घेऊन त्यांच्या स्वप्नांना पूर्णत्वाकडे नेणे... हे अतिशय खडतर असते... ते आज साध्य झालंय...

काल सकाळी 5.55 राईड सुरू केली केरळ मधील वंदनम शहरातून... आणि कन्याकुमारीला पोहोचलो आज पहाटे 4.30 वाजता...

23 तास सायकलिंग करून 230 किमी एका दिवसात पार केले होते... ते ही फक्त 39 दिवसात...

एका नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली होती... या विक्रमातील महत्त्वाचे मुद्दे खालील आहेत...

प्रथमच काश्मिर ते कन्याकुमारी व्हाया सागरी महामार्ग करणारे 5 सितारे... या मार्गाने अजून कोणीही K2K राईड केलेली नाही... 

या मार्गाने राईड करणारे 55 ते 67 या वयाचे पाच वरिष्ठ तरुण...

ही संपूर्ण राईड सर्व सामनासहीत सेल्फ सपोर्ट होती...

एकूण 40 दिवस ठरवले होते परंतु राईड 39 दिवसात पूर्ण झाली... 

शेवटच्या  दिवशी 23 तासात 230 किमी सायकलिंग... करून कन्याकुमारी मध्ये पदार्पण केले...

यासाठी तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद कामी आले..


सतीश जाधव...टीम लीडर

7977690693




हापूस आंब्यासारखी मधुर आणि मधाळ कोकणची माणसं... दि. १३ फेब्रुवारी २०२५

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी मध्ये भेटलेली व्यक्तिमत्वे...

 हापूस आंब्यासारखी मधुर आणि मधाळ कोकणची माणसं... दि. १३ फेब्रुवारी २०२५

कुणकेश्वरचे महादेवाचे दर्शन घेऊन पुढे निघालो... मेहुणा महेश बागवेचा मित्र गोविंद सावंत हे मुणगे येथे वाट  पहात थांबले होते...  त्यांनी भगवती देवीच्या मंदिरात श्रीफळ आणि प्रसाद देऊन सन्मान केला... कोकणातील टिपिकल हॉटेलातील  पिठाचे, खोबऱ्याचे, शेंगदाण्याचे लाडवांचा  आस्वाद घेतला... तो सावंतांचे पाहुणे म्हणूनच...

डोंगरातून येणाऱ्या गोमुख जलाचे आणि भगवती देवीचे दर्शन  घेतले... मंदिराजवळ मेहुणा संतोष आणि भाचे कंपनी श्री आणि श्रीकांतची भेट झाली... कोकणचे स्पेशल खडखडे  लाडू मिळाले... मुणगेकरांनी झकास आदरतिथ्य केले होते... संतोषाचा मेहुणा मुणग्यात रहाण्यासाठी आग्रह करत होता... पण आज पुढचा पल्ला गाठायचा होता...

राईड करताना अर्ध्या तासात सूर्य अस्ताला गेला... त्यामुळे रहाण्याची व्यवस्था पाहणे आता आवश्यक होते... महेश कडून आचरे येथील डॅफोडिल रिसॉर्टच्या निलेश सरजोशीचा नंबर मिळाला... त्याला फोन करून रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली... 

मुणगे घाट चढलो... आणि वरच्या सड्यावरून पेडलिंग करत आचरा तिठा पार केला आणि डॅफोडिल रिसॉर्टवर पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता... आज या रिसॉर्ट वर कोल्हापूरच्या शाळेतील मुलांची सहल आली होती... मुलांचा चिवचिवाट ऐकून एकदम मस्त वाटले...  सायंकाळी पक्षी घरट्यात येताना किलबिलाट करतात त्याची आठवण झाली... लहान मुलांबरोबर बालपणात जाता येते... मुलांच्या या खळखळाटाने सायकलचे श्रम एकदम नाहीसे झाले... त्याच बरोबर हिरव्यागार निसर्गाचे आसमंतात पसरलेले आवर्तन आवाक्यात आले ... आणि ऊर्जेत परावर्तित झाले...

 आडिवरे येथील तावडे वाड्यातून सकाळी आठ वाजता सुरू झालेली सायकल वारी रात्री साडेआठ वाजता आचरा येथील डॅफोडिल रिसॉर्ट मध्ये पोहोचली होती...  रिसॉर्टवरच सात्विक जेवणाचा आस्वाद घेतला... 

रात्री रिसॉर्टचे मालक निलेश सरजोशी बरोबर बोलणे झाले... फोन वर बोलतानाच जाणवले... नीलेशच्या आवाजात मार्दवता आणि हळुवारपणा आहे... मनोमन त्याला भेटण्याची इच्छा जागृत झाली... 

पाच पाच बेडचे दोन मोठे रूम आम्हा पाच जणांना उपलब्ध करून दिले निलेशने ... ते निव्वळ आम्ही पर्यावरण प्रेमी सायकलिस्ट आहोत आणि सकाळी लवकर निघण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून होते...

सकाळी आश्चर्याचा सुखद धक्का बसला... उपमा चहा नाष्टा करतानाच निलेश सरजोशी रिसॉर्ट वर हजर झाला... पांढऱ्या शुभ्र सदरा झब्ब्यात असणारा... अतिशय साधी राहणी असलेला निलेश प्रथमदर्शनीच भावला...

तुझ्या आडनावात काय विशेष आहे... निलेश म्हणाला आमचे घराणे पुरोहितांचे आहे... बारा पंचक्रोशीच्या पुरोहित जोशींचे मुख्य म्हणून सरजोशी...

पर्यावरण प्रेमी निलेशने  आपल्या दहा एकर जमिनीत फक्त जंगल वाढविले आहे... ते निव्वळ वन्य प्राणी, पक्षी, पाने, फुले, जमीन आणि पर्यावरण यांचे संवर्धन आणि संगोपन होण्यासाठीच... 

वेदांचा गाढा अभ्यास असणाऱ्या निलेशला पर्यावरण पुरक सायकल यात्रे संबंधात बोलण्यास सांगितले...

 आपले प्राचीनतम शास्त्र ऋग्वेद हे निसर्गाशी निगडित आहे... आणि आपण सुद्धा निसर्गाचा एक भाग आहोत... म्हणूनच निसर्गाची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य आहे... आणि याच उद्देशाने समाज प्रबोधनासाठी तुम्ही वरिष्ठ तरुण प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन प्रदूषणमुक्त वाहन सायकल वरून काश्मिर ते कन्याकुमारी या साहसी वारी वर निघाला आहात... याचे कौतुक वाटते आहे... सरजोशी कुटुंबीय आणि डॅफोडिल परिवारातर्फे  या पर्यावरण वारीला प्रचंड शुभेच्छा.... तुम्ही ही सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण करणार याची खात्री आहे...

निलेशचे ते विद्वतप्रचूर कवन ऐकून धन्य झालो... या पुढे सायकल सफर करणारे माझे सहकारी... सायकल क्लब यांना निलेश सरजोशीचा संदर्भ देण्याची मनोमन ठरवून डॅफोडिलचा निरोप घेतला...

कोकणातील मन मोहून टाकणाऱ्या मधाळ माणसांच्या भेटीगाठी वारीच्या सफलतेसाठी अतिशय पूरक होत्या...


सतीश जाधव

सायकलिस्ट...टीम लीडर

7977690693




Thursday, March 20, 2025

मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मेडिक्लेम एक दुष्टचक्र...

मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मेडिक्लेम एक दुष्टचक्र...

कॉम्प्युटरवरच्या प्रतिमा जरा भुरकट  दिसायला लागल्या तेव्हा लक्षात आले... चष्म्याचा नंबर वाढला आहे... म्हणून लालबागच्या प्रसिद्ध मारू रुग्णालयात डोळे तपासायला गेलो... 

 डोळ्यात औषध टाकून डोळे तपासले...  तेव्हा डॉक्टर म्हणाले मोतीबिंदू झाले आहे... शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढावे लागेल.... लगेच त्यांनी रक्ताचे रिपोर्ट ECG, XRay इत्यादी टेस्ट करायला सांगितल्या... तसेच इंपोर्टेड लेन्स बसवायची असेल तर 35000 रुपये खर्च सांगितला... सर्व रिपोर्ट आणि ऑपरेशन इत्यादीचा  खर्च मिळून एकूण साठ हजार रुपये लागतील असे सांगितले...

मेडिक्लेम काढलेल्या SBI general insurance कंपनी कडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले...  मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कॅशलेस फॅसिलिटी नाही... ऑपरेशन झाल्यावर पैसे परत मिळतील... 

याच शस्त्रक्रियेसाठी हिंदुजा रुग्णालयात चौकशी केल्यावर माहिती मिळाली... लेन्स साठी 75 हजार रुपये तसेच सर्व टेस्ट आणि ऑपरेशन मिळून दिड लाख रुपये खर्च येईल...

 फेब्रुवारी महिन्यात काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी असल्यामुळे डॉक्टर ना विचारले मार्च महिन्यात ऑपरेशन केले तर चालेल काय... त्यांनी होकार दिला...

टॅक्स प्लॅनर मित्र महेंद्रला सांगितले... मेडिक्लेम फेब्रुवारी अखेरीस  संपतोय तो रिनिव्ह करावा लागेल...  कन्याकुमारी सायकल टुरवर असताना sbi जनरल इन्शुरन्स कडून मेसेज आला... अगोदरचा रु 10500 प्रीमियमचा मेडिक्लेम आता इलिट मेडिक्लेम मध्ये परावर्तित करावा लागेल आणि त्याचा प्रीमियम 93000 रुपये आहे... हे समजल्यावर महेंद्रला सांगितले... सध्याचा मेडिकल दुसऱ्या कंपनीत पोर्ट कर... परतू ती सोय सुद्धा sbi जनरल इन्शुरन्सने ठेवली नव्हती... त्यामुळे सतत पाच वर्ष सुरू असलेलेला मेडिक्लेम मार्च महिन्यात बंद झाला...

 वयाच्या पासष्टी नंतर कोणत्याही कंपनीचा नवीन मेडिक्लेम घ्यायचा तर सर्व टेस्ट कराव्या लागणार होत्या तसेच प्रीमियम सुद्धा पन्नास हजारापेक्षा जास्त होता... तेसेच कोणत्याही मेडिक्लेम मध्ये 100 टक्के पैसे कधीच मिळत नाहीत... याचा अनुभव घेतला होता... नवीन मेडिक्लेम काढल्यावर मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी एक वर्ष थांबावे लागणार होते... त्यामुळे मेडिक्लेमचा नाद सोडून दिला..  आणि स्वतःच्या पैशांनी मोतीबिंदू ऑपरेशन करायचे नक्की केले...

मुंबई महापालिकेच्या sogo संगीत मैफिलीमुळे नायर रुग्णालयात सध्या कार्यरत असलेल्या सिस्टर प्रिया आणि साक्षी यांची मैत्री झाली होती... त्यांनी सांगितले  नायर मध्ये डॉ नयना पोतदार यांच्या युनिटच्या opd मध्ये  डोळे तपासा... म्हणजे सेकंड ओपिनियन पण होईल आणि ऑपरेशन आवश्यक असेल तर अतिशय कमी खर्चात होईल... (खाजगी रुग्णालयात आवश्यक नसताना सुद्धा ऑपरेशन केली जातात आणि मेडिक्लेम द्वारे पैसे उकळले जातात... अशी बरीच प्रकरणे झाली आहेत...)

स्वतः माजी महापालिका कर्मचारी असल्यामुळे रिपोर्ट किंवा ऑपरेशन यासाठी काही खर्च येणार नव्हता... 

आठवड्यापूर्वी डॉ नयना पोतदार यांच्या opd मध्ये औषध घालून डोळे तपासले... जवळ जवळ सात आठ वेळा वेगवेगळ्या मशीन खाली दोन्ही डोळे तपासण्यात आले... पुन्हा औषध घालून सुद्धा तपासणी झाली... डॉ दिप, डॉ शिवानी, डॉ श्रुती, डॉ माधव या सर्वांनी डोळे तपासल्यावर मुख्य डॉ अनुजा यांनी डोळ्याची पाहणी केली... आणि मोतीबिंदू फर्स्ट स्टेज मध्ये आहे... याचे निदान झाले... डॉक्टर म्हणाले नंबर थोडा वाढला आहे... त्यामुळे नवा चष्मा घेऊन सहा महिने ऑपरेशन पुढे ढकलू शकता... सायकलचे इव्हेंट सतत चालत असल्यामुळे कुटुंबियांच्या सहमतीने ताबडतोब ऑपरेशन करायचे नक्की केले... 

डॉक्टरांनी XRay, ECG, रक्ताचे वेगवेगळे रिपोर्ट, HIV, BP, मधुमेह इत्यादीचे रिपोर्ट आणायला सांगितले... नायर रुग्णालयातील सिस्टर्स गायिका प्रिया आणि साक्षी मुळे सर्व रिपोर्ट्स दोन दिवसात मिळाले...  तेही कोणताही खर्च न होता... 

दोन दिवसांनी पुन्हा OPD मध्ये डॉक्टर अनुजा यांना दाखविले तर त्यांनी सांगितले पुढच्या आठवड्यात ऑपरेशनची तारीख नक्की करूया... पुन्हा येथे  प्रिया आणि साक्षी यांची ओळख उपयोगाला आली... त्यामुळे दुसऱ्या दिवशीच ऑपरेशन करायचे नक्की झाले... 

डॉक्टरांनी सांगितले इंपोर्टेड लेन्स बाहेरून विकत घ्यावी लागते... या लेन्स साठी सात हजार रुपये खर्च येईल... तसेच ऑपरेशनच्यावेळी लागणारी काही इंजेक्शन आणि औषधे बाहेरून आणावी लागतील... ताबडतोब होकार दिला... 

रात्री रुग्णालयात भरती झालो... दर दोन तासांनी डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप्स देण्यात आले... हाताच्या पंजाला स्काल्प व्हेन लावण्यात आली... रात्री अलर्जीचे इंजेक्शन देण्यात आले... नायर रुग्णालयात सायंकाळी सात वाजता अतिशय सात्विक जेवण आणि रात्री आठ वाजता पेलाभर दूध मिळाले... 

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून दर अर्ध्या तासांनी डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप देण्यात आले...  चार नंबर वार्डची स्वच्छता वाखाणण्या सारखी होती... रात्री दहा वाजता वॉर्ड मध्ये झाडलोट आणि मॉपिंग करण्यात आले... त्यामुळे निवांत झोप झाली... 

सकाळी पाच वाजता नावाची अनाउन्समेंट झाली... डॉक्टरांनी पुन्हा BP पल्स रेट आणि मशीन वर डायबिटीज चेक केले... थिएटरचे पांढरे ढगळ कपडे देण्यात आले... कमरेला बांधायला सॅनिटरी पॅड देण्यात आला... तोंडाला आणि डोक्याला मास्क, तसेच थिएटर मध्ये जाताना चप्पल काढण्यावर पायात घालायचे प्लास्टिक मोजे देण्यात आले...

संघवी इंटरप्रायसेस कंपनीचा माणूस लेन्स घेऊन थिएटर बाहेर उभा होता... लेन्सचा बॉक्स हातात घेऊन त्यावर असणारी लेन्सची किंमत पहिली... त्यावर   17109 रुपये किंमत होती... आणि त्याचे नायर रुग्णालयाच्या नावाने 6935 रुपयाचे बिल होते... पैसे देऊन लेन्स ताब्यात घेतली... 

मारु रुग्णालयात 35000 रुपये, हिंदुजा मध्ये 75000 रुपये आणि नायर मध्ये  फक्त 6935 रुपये किंमत...  या लेन्सच्या किमतीचे  गौडबंगाल पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली...

ऑपरेशन थिएटर मध्ये सुद्धा ओळखीमुळे पहिला नंबर होता... डॉ श्रुतीने डाव्या डोळ्याला भूल दिली... पाच मिनिटात डोळा सुन्न झाला... तेव्हढ्या वेळात डॉक्टरांनी माझ्या काश्मिर ते कन्याकुमारी सायकलिंग बद्दल माहिती विचारली...  डोके न हलवता डॉक्टरांबरोबर बोलण्याची परवानगी होती..

लेझर सर्जरी सुरू झाल्यावर कानात... डोळा कापण्याचा टरर् टरर् आवाज येत होता... सर्जरी सुरू असताना ऑपरेशन थिएटर मध्ये मधुर भक्ती संगीत चालू होते... माझ्या सायकलिंग बद्दल सुद्धा चर्चा सुरू होती... पेशंट एकदम रिलॅक्स असावा... त्याला कोणताही ताण येऊ नये म्हणूनच सर्व काळजी घेण्यात आली होती... 

दहा मिनिटात ऑपरेशन पूर्ण झाले... मोतीबिंदू काढलेल्या डाव्या डोळ्याला पट्टी लावून रिकव्हरी रूम मध्ये पाच मिनिटे बसविण्यात आले... डॉ अनुजा यांना विचारले... काढलेला मोतीबिंदू पाहायला मिळेल काय... डॉक्टर हसल्या आणि म्हणाल्या आता ऑपरेशन लेझरद्वारे डोळ्याला सूक्ष्म छिद्र पडून केले जाते... त्यामुळे मोतीबिंदू बर्स्ट करून बारीक चुरा करून बाहेर काढला जातो... आणि त्या जागेवर नवी लेन्स बसविली जाते... ती लेन्स त्या सूक्ष्म छिद्रातून आत सरकवली जाते... मग डोळ्याच्या रेटिना मध्ये ती छत्री सारखी उघडते... त्यामुळे तिला डोळ्याच्या योग्य जागेवर बसण्यास थोडा वेळ लागतो... म्हणूनच ऑपरेशन नंतर दर दोन तासांनी डोळ्यात ड्रॉप टाकणे आणि डोळ्यात धूर, धुळ जाऊ नये किंवा ताण येऊ नये याची काळजी घ्यावी लागते...

डॉ अनुजाने दिलेली माहिती खूपच उपयुक्त होती...

संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला... तसेच सर्जरी लवकर बरी व्हावी यासाठी पाच प्रकारच्या गोळ्या आणि ड्रॉप देण्यात आले...

दर दोन दिवसांनी फॉलो अप साठी बोलावण्यात आले... या ऑपरेशन कार्यक्रमात बायको स्वप्नाची साथ सुरुवातीपासून शेवट पर्यंत होती... 

 मोतीबिंदू ऑपरेशन आणि बाहेरून आणावे लागणारे औषध गोळ्या यांचा एकूण खर्च आला 7840 रुपये आला होता...

मित्रांनो... आता सांगा मेडिक्लेमच्या नावाखाली खाजगी रुग्णालये किती लूटपाट करत आहेत... असलेला मेडिक्लेम पास झाला तरी पंचवीस टक्के रक्कम रुग्णाला भरावी लागते.... सरकारी रुग्णालयात प्रत्येक ठिकाणी रांग लावावी लागते... तुमच्याकडे वेळ आणि संयम असेल तर खरोखर सरकारी रुग्णालयातील अतिशय चांगली सेवा आपण मिळवू शकतो...

खाजगी रुग्णालयातील रुग्णाच्या पैशाची लुटपाट, ऑपरेशनचे दुष्टचक्र आणि मेडिक्लेमचे मायाजाल पहिले की मन विषण्ण होते....

ठरवले आहे... आता दरमहा पाच हजार रुपये मेडिकलसाठी SIP करायची आणि सरकारी रुग्णालयात... ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन साठी आपलेच पैसे खर्च करायचे... 


सतीश जाधव

सायकलिस्ट

7977690693