Sunday, April 2, 2023

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

शाहीर दादा कोंडके यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्ताने मराठी भाषा पंधरवड्यात दौलत दादा कोंडकेंची हा युगुल गीतांचा बहारदार कार्यक्रम दिनांक १८ मार्च रोजी पार पडला. या कार्यक्रमाची संकल्पना, रचना आणि दिग्दर्शन मुंबई महापालिका कर्मचार्‍यांच्या सोगो संगीत संस्थेने केले होते. महापालिकेच्या आजीमाजी  ३२ गायक कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमात होता. 

अतिशय अप्रतिम आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला... या कार्यक्रमामधील प्रत्येक युगुलगीत... कलाकार जोडीने सादर करताना दादा कोंडके आणि त्यांच्या चित्रपटातील नायिका यांचा पेहराव परिधान केल्यामुळे या कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली होती. 

या कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवलेली आणि भावलेली एक गोष्ट म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन... 

सर्वसाधारणपणे गीतसंगीताच्या कार्यक्रमात प्रत्येक गाणे साडेतीन चार मिनिटांचे असते..  तसेच दोन गाण्यामध्ये  सूत्रसंचालकास  एक ते दीड मिनिटाची वेळ दिली जाते... परंतु  आजच्या या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेने आयोजकांकडून दोन गाण्यामध्ये तीन मिनिटांचा वेळ मागून घेतला होता... सोगो आयोजकांनी पण ते मान्य केले होते... 

कार्यक्रम सुरू झाल्यावर दोन गाण्याच्या मधल्या वेळात सूत्रसंचालिकेने दादांचा जीवनपट उलगडायला सुरुवात केली... आणि जाणीव झाली की दादा कोंडकेंसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जीवनपट इतक्या कमीवेळेत, अचूक अन् मोजक्या आणि आक्षेपविरहित शब्दांत मांडण्यासाठी  सूत्रसंचालिकेने प्रचंड अभ्यास केला आहे...

 युगुलगीताला साजेशा वाक्यरचनेतून गीतांबरोबरच, चित्रपटाचा अभ्यास... तसेच दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालकाने भरपूर वाचन केलं आहे...  

अतिशय मार्मिक आणि दखलपात्र निवेदन करण्यासाठी भाषेवर तितकच प्रभुत्व असणं आवश्यक असते... ते पदोपदी निवेदिकेच्या शब्दांमधून जाणवत होते... त्यामुळे गाण्याबरोबरच दादांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकाधीक  बळावत होती.....

दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालिकेने दादांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून गाण्याला अनुरूप आणि विषयाला साजेसे असे वेचक मुद्दे निवडून ते तारतम्यतेने आणि मनोवेधकपणे सादर केले होते... 

सूत्रसंचालिकेची जिज्ञासू वृत्ती आणि विषयाचा व्यासंग यामुळेच सूत्रसंचालनाची  कला अतिशय उत्तमपणे आत्मसात केल्याचे तिच्या निवेदनातून पदोपदी जाणवत होते...

 सूत्रसंचालिकेच्या या प्रशंसनीय कामगिरी मुळेच तिच्या कामाची दाखल घेऊन शाबासकी देण्यासाठी आणि दादांच्या चित्रपट जीवनासाठी हा पत्रप्रपंच आहे...

एकापाठोपाठ एक अशा सलग नऊ चित्रपटांचा रौप्य महोत्सव  साजरा करून गिनीज बूक मध्ये जागतिक विक्रमाची नोंद करणारे दादा... आपल्या विनोदाने सार्‍या महाराष्ट्राला हसवणारे दादा... आपल्या स्वतःच्या आयुष्यात कसे एकटा जीव सदाशिव होते... याचा प्रत्यय सर्व रसिक प्रेक्षकांना येत होता...

दादांनी आपल्या चित्रपटांतून तात्कालिक समाज आणि राजकारणातील  वैगुण्यांवर नेमके भाष्य केले होते...

द्व्यर्थी संवादफेकीचा बादशहा ...  विनोदाची मर्मभेदी जाण असणारा.. नेमक्या ठिकाणी पॉज घेऊन हशा घेणारा विनोदवीर... निर्माता... लेखक... दिग्दर्शक... गायक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दादा वैयक्तिक जीवनात एकटा जीव सदाशिव होते...   याची जाणीव झाली... 

दादांच्या जीवनात घडलेला प्रत्येक प्रसंग अंतर्मुख करणारा होता... किंबहुना दादांची जीवन कहाणी ऐकताना हसू आणि आसू यांचे संमिश्र भाव  मनात येत होते... 

अतिशय भोळा भाबडा नायक... नायिकेला का भावतो... याचे समर्पक उत्तर प्रत्येक चित्रपटात आपल्याला मिळते... याच वैशिष्टयपूर्ण खासियतीमुळे ग्रामीण प्रेक्षकांबरोबर शहरी प्रेक्षकांना सुद्धा दादांचे चित्रपट पसंतीला उतरत.. 

त्यांच्या जीवन चरित्रपटातील ठळक वैशिष्ठ्यांचा आढावा सूत्रसंचालकाने प्रत्येक गाण्याच्या मध्ये घेतला होता... त्याची झलक खालील प्रमाणे... 

समाजातील  रुढी, परंपरा, बुवाबाजी यावर उपहासात्मक किंवा व्यंगात्मक चित्रण म्हणजे सटायर चित्रपटातून सादर करणे ह्यात दादांचा हातखंडा होता... त्यामुळे त्या काळातील प्रस्थापित बुवाबाबांचा रोष सुद्धा दादांनी ओढावून घेतला होता... 

शांताराम बापू आणि दादा कोंडके यांच्यातील चित्रपट शीतयुद्ध जगजाहीर होते... बापूंच्या असला नवरा नको ग बाई  या चित्रपटावर कडी म्हणून  ह्योच नवरा पाहिजे  ह्या  चित्रपटाचे नाव दादांनी जाहीर केले... त्यावेळी त्यांच्याकडे चित्रपटाचे कोणतेही कथानक सुद्धा नव्हते... पण प्रचंड जिगर मात्र होती... 

सेवादलाच्या सांस्कृतिक विभागात काम करताना सदानंद वर्दे, वसंत बापट, नाथ पै अशा नामवंत मंडळींच्या ओळखी झाल्या.. तसेच सेवादलाच्या कार्यक्रमात निळू फुले, राम नगरकर हे कलाकार दादा सोबत एकत्र आले... येथून त्यांची पथनाट्य कारकीर्द सुरू झाली... 

विच्छा मधील दादांचे काम पाहून चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांनी तांबडी माती या चित्रपटात दादांना काम दिले. हा चित्रपट अपयशी झाला. त्याचे खापर पत्रकारांनी दादांवर फोडले... परंतु पेंढारकरांनी ते अपयश आपल्या माथ्यावर घेतले आणि दादांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन वर्तमानपत्रात येणार्‍या बर्‍यावाईट बातम्यांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला... 

वसंत सबनीस, दादा आणि भालजी यांनी सोंगाड्याचे पटकथा लेखन केले. या चित्रपटाचे   यश  तुझे असेल तर अपयश पूर्णतः माझे असेल आणि   हा चित्रपट अपयशी झाला तर संपूर्ण खर्च मी उचलेन असे भालजींनी दादाला आश्वासन दिले...  त्यामुळे साकार झाला दादांचा सोंगाड्या  चित्रपट... आणि तो तुफान यशस्वी झाला... शून्यातून विश्व निर्माण करण्याचे दादांचे प्रयत्न फळाला आले... विच्छा मधील माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी आणि  काय ग सखू काय ग साखू ही दोन गाणी दादांनी सोंगाड्या मध्ये घेतली होती... 

चांगले कथानक असलेला  ये रे माझ्या मागल्या हा भालजींचा चित्रपट आपटला... त्यावर दादांनी रिमेक बनविला आली अंगावर...  हा चित्रपट सिल्वर ज्युबिली झाला. चांगल्या कथानकाबरोबर चित्रपटाचे शीर्षक आकर्षक आणि विनोदी असेल तर रसिक प्रेक्षक आपोआप खेचला जातो... याचे हे उत्तम उदाहरण आहे.. 

दादांचा सडेतोडपणा खालील प्रसंगात दिसतो...

 येऊ का घरात या चित्रपटात दादांनी उषा नाईक या अभिनेत्रीला नायिका म्हणुन घेतले होते... हसताना तिचा चेहरा रडवेला दिसतो... हे दादांच्या लक्षात आल्यावर... हसताना आपण कशा दिसतो याचे निरीक्षण करण्यास  तिला सांगितले... आणि नीट हसा असा सल्ला दिला... 

माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दादांच अतिशय सुंदर मैत्रीच नातं होत... बाळासाहेबांना कलेविषयी आणि कलाकारांबद्दल वाटणारा आदर... झटपट निर्णय घेण्याचा स्वभाव, स्पष्टवक्तेपणा यामुळे दादांना बाळासाहेबांबद्दल खूप आदर होता... दादांच्या चित्रपटातील एखादी गोष्ट आवडली नाही की बाळासाहेब ती परखडपणे सांगत... त्यामुळे दादा आपला चित्रपट सेन्सॉरला पाठविण्या अगोदर बाळासाहेबांना दाखवत असत... 

अनेक राजकारणी व्यक्तींसोबत सुद्धा दादांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते... तात्कालिक मुख्यमंत्री वसंत दादा पाटीलांच्या आग्रहाखातर पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमावर गंगाराम वीस कलमे हा चित्रपट दादांनी बनविला... पण चित्रपट प्रदर्शित होताना इंदिरा गांधीची राजवट जाऊन जनता दलाचे राज्य आले होते...

एकटा जीव सदाशिव मधील राणी नावाची बकरी दादां सोबत प्रसिद्ध पावली... तिला कॅडबरी खूप आवडायची... एका सीनमध्ये दादा वडिलांबरोबर जायला निघतात तेव्हा बकरी पळत येते आणि दादांचा सदरा धरते. राणीने सदरा पकडावा म्हणून दादांनी सदऱ्यात कॅडबरी लपविली होती... राणी बकरीच्या सदरा सीनला प्रेक्षक आवर्जून टाळ्या द्यायचे... या बकरीला दादांनी मरेपर्यंत सांभाळलं... 

चित्रपटातील नायिका  दादांसारख्या  बावळट, गबाळा, लांब नाडीवाली हाफपँट  घालणाऱ्या नायकावर का भाळते?  या बाबत पटकथाकार मुजूमदार यांच्याशी बराच खल व्हायचा... त्यामुळेच  प्रेक्षकांना पटेल असे कारण चित्रपटात असे... 

त्याकाळी रंगीत चित्रपट बनविण्यासाठी खुप खर्च यायचा... सकस कथानक, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, काटेकोर दिग्दर्शन तसेच गाणी आणि संगीत दमदार असेल तर कृष्णधवल चित्रपट सुद्धा पाहायला प्रेक्षक येतात... यावर दादांचा विश्वास होता... रंगीत चित्रपटापेक्षा कथानकात आणि कलाकाराच्या अभिनयात रंग असले की प्रेक्षकांना ते भावतात... असे दादा म्हणत... म्हणुनच पांडू हवालदार हा चित्रपट कृष्णधवल बनविला होता. 

दादांच्या बोट लावीन तेथे गुदगुल्या  या भरपुर हास्यमय पंचेस असलेल्या चित्रपटावर पत्रकारांनी कथा नसलेला चित्रपट अशी टीका केली होती... दादांचे म्हणणे होते की विनोदी चित्रपटात कथानक रंगवत नेले की पंचेस कमी होतात... त्यासाठी चार्ली चॅपलीनच्या चित्रपटाचे उदाहरण द्यायचे... 

सर्व लोकांना आपल्या द्व्यर्थी संवादाने खिळवून ठेवणारे दादा आपल्या कुटुंब सौख्याबाबत मात्र अपूर्णच राहिले... लग्नानंतर चौथ्या वर्षीच त्यांचा घटस्फोट झाला... त्यांचा पुतण्या विजय कोंडके यांनी  आर्थिक बाबीत दादांना अडचणीत आणले... विजय कोंडकेंच्या माहेरची साडी या चित्रपटाला तोडीस तोड असा  सासरचं धोतर हा चित्रपट दादांनी काढला... 

चित्रपटाच्या नावात द्व्यर्थी मिनींग नसलेला दादांचा सातवा चित्रपट बोट लावीन तिथ गुदगुल्या  हा होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर... पुण्यातील झाडून सर्व पत्रकारांनी दादांचा "सातवा मजला कोसळला" असं मोठ्या हेडिंग मध्ये वर्तमानपत्रात लिहिले होते... पण गुदगुल्या सुपरहिट झाला... पुण्याच्या एका चित्रपटगृहात तर तो पंच्याहत्तर आठवडे चालला... ह्या चित्रपटाच्या ज्युबिली समारंभात पत्रकारांना दादांनी आवर्जून बोलावले होते... आणि सांगितले "तुमच्या लिखाणाचा माझ्या चित्रपटावर काहीच परिणाम होत नाही"... "प्रेक्षक माझा आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे"... तुम्ही आणखी पेपर छापा... लहान मुलांना नक्कीच कामाला येतील... 

प्रत्येक माणसाने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केले तर यश आपोआपच येतं... दादांचे सुद्धा असंच होतं... त्यांचा कुठलाही गाजलेला चित्रपट काही काळानंतर त्यांनी पाहिल्यावर त्यांना वाटायच हा सीन जास्ती चांगला करू शकलो असतो... एखादा विनोदी प्रसंग थोड्या वेगळ्या पद्धतीने केला असता तर प्रेक्षकांचा आणखी हशा मिळवू शकलो असतो...  त्यामुळेच चित्रपट पूर्ण झाल्यावर सुद्धा नवनवे सीन दादा चित्रपटात टाकत असत.. 

शांताराम बापू आणि दादा यांच शीतयुद्ध असायचं... पिंजरा चित्रपटात बापूंनी दादांना खूप टोमणे मारले होते... त्यानंतर दादांनी एका चित्रपटात नायक गटारातून मोडका पिंजरा बाहेर घेऊन येताना दाखविला होता... 

परंतू दोघांना एकमेका बद्दल नितांत आदर होता... बापू दादांचे सर्व चित्रपट राजकमल स्टुडिओत प्रिंट मागवून पाहत असत... 

राजेश मुजूमदार आणि दादा पांडू हवालदार च्या निमित्ताने एकत्र आले. दादांनी एखादा पंच सांगितला की मुजुमदार पुढचा पंच तयार करायचे.. अशा प्रकारे कथानक तयार व्हायचे... 

राम कदम यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत द्यायला नकार दिल्यावर... दादांना नव्या संगीतकाराची गरज होती...  एकॉर्डीयन प्लेअर लक्ष्मण पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे यांनी कलातरंग ऑर्केस्ट्रा सुरू केला होता.. दादांनी त्यांना आपल्या काही गाण्यांना चाली करायला दिल्या... त्यांच्या चाली भावल्यामुळेच दादांनी त्यांना रामलक्ष्मण हे नाव दिले आणि पुढे रामलक्ष्मण यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत दिले. 

*एकटा जीव* च्या यशानंतर शुल्लक कारणावरून दादांची जुनी टीम दादांना सोडून गेली... त्यामुळे  आंधळा मारतो डोळा या चित्रपटात दादा सोबत सर्व नवी मंडळी काम करत होती. हा सुद्धा चित्रपट ज्युबली झाला... याचे कारण म्हणजे दादा स्वतःच एक चित्रपट इंडस्ट्री होते... 

त्यांच्या चित्रपटात काम करण्याऱ्या नायिकांमुळे दादांना खुप अडचणींना सामोरे जावे लागले..  परंतु कितीही त्रास झाला, संकटे आली तरी दादा कधीच डगमगले नाहीत... 

 दादांचं सेन्सॉर बोर्डाशी असलेले हाडवैर जगजाहीर होतं.. सेन्सॉर बोर्डाने द्व्यर्थी संवादाबद्दल दादांना खूप त्रास दिला... पण दादा नमले नाहीत... ते आपला मुद्दा नेटाने मांडत... तुमच मन मलीन असल्यामुळे शब्दांचे अश्लील अर्थ तुम्ही लावता... पुढेपुढे तर सेन्सॉरशी वाद घालता यावा म्हणुन दादा मुद्दाम द्व्यर्थी संवाद टाकू लागले...
 
 दादा एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करतात की सेन्सॉर बोर्डामुळे माझ्या चित्रपटांची खूप चर्चा व्हायची... त्यामुळेच चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळायची... म्हणूनच माझे चित्रपट तुफान चालल्याचे दादा कबूल करतात.... 

दादांना  शिकारीचा प्रचंड नाद होता... शिकारीसाठी जनावर शोधण्यात ते एव्हढे मग्न व्हायचे की सार जग विसरून जायचे... शिकारीला गेल्यावर ते खुप रिलॅक्स होत असत... त्यामुळे चित्रपटातील जास्तीत सीन, गाणी दादांनी जंगलात  लिहीली आहेत... 

शिकारीत असताना एखादा अचानक वळवाचा जोरदार पाऊस आला... म्हणुन सर्वजण एका झाडाखाली थांबले... पाऊस थांबल्यावर झाडातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांना पाहून तिथल्या तिथे एक गाणे तयार केले... ते म्हणजे अतिशय प्रसिद्ध झालेलं  ढगाला लागली कळ... पाणी थेंब थेंब गळ... हे गाण होय... दादांची कलासक्ती जंगलात बहरून यायची याचेच हे उदाहरण आहे... 

नववा ज्युबिली चित्रपट आली अंगावर  मुळे दादांचे खूप कौतुक झाले... सलग नऊ ज्युबिली चित्रपट म्हणुन जागतिक विक्रम झाला... पण दादांना आनंद वाटत नव्हता... त्यांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला... विच्छाच्या अफाट यशामुळे आता मिळणार्‍या यशाचे दादांना महत्त्व वाटत नव्हते... या मानसिक दोलायमान परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दादांनी खूप उपचार केले पण फारसा उपयोग झाला नाही... त्यांची निरीच्छ वृत्ती वाढत गेली... 

अमाप पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर, मानसन्मान मिळून सुद्धा दादा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात एकटा जीव  राहिले... 

पुढचा जन्म देवाकडे मागताना "मला पैसाअडका काहीही नको फक्त जिवाभावाची माणस दे" हेच दान मागितले... 

मित्रांनो... 

दादांचा हा सर्व जीवनपट उलगडून सांगितला सूत्रसंचालिका गीता डांगे यांनी... दादांचे आत्मचरित्र एकटा जीव सदाशिव तसेच इतर लेखकांनी सांगितलेल्या माहितीचे समग्र रसग्रहण करून गीता ताईंनी मेहनतीने संकलित केलेली माहिती रसिक प्रेक्षकांना  सादर केली... त्याबद्दल निवेदिकेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. 

खरं तर गीता ताईंनी लिहिलेलं दादांच्या जीवन चरित्राचे रसग्रहण कोणत्याही वर्तमानपत्रात दादांच्या आत्मचरित्राची समीक्षा म्हणुन सुद्धा प्रसिद्ध करता येईल... 

दादांचा माहितीपट उलगडताना गीता ताईंची संवादफेक, शब्दांतील चढउतार, देहबोली यातून दादा एकदम मनाला भिडले... त्यांच आत्मचरित्र वाचण्यासाठी मन अधीर झाले ... 

तसेच गीता ताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सुद्धा सविस्तर  मनोगत लिहावे ही उर्मी जागृत झाली... 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
9869560266

11 comments:

  1. वा फारच छान गीता ताईंचे अभिनंदन आणि तुम्हीसुद्धा फारच सुंदर शब्दात व अभ्यासपूर्ण रीतीने लेख लिहिला आहे. छान माहिती 👍

    ReplyDelete
  2. वा फारच छान गीता ताईंचे अभिनंदन आणि तुम्हीसुद्धा फारच सुंदर शब्दात व अभ्यासपूर्ण रीतीने लेख लिहिला आहे. छान माहिती 👍

    आशु 🙏

    ReplyDelete
  3. सतीश सर ! कित्ती छान ! किती सुंदर शब्दांत लिहिला आहे ब्लॉग तुम्ही . खूपखूप आभारी आहे सर . खूप छान वाटतयं कौतुकामुळे . तुमचं लेखन मला स्फूर्तिदायक वाटतं . भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी आपोआपच वाढवलीत . खूपखूप धन्यवाद सर तुम्हाला😊😊

    ReplyDelete
  4. सतीश सर ! कित्ती छान ! किती सुंदर शब्दांत लिहिला आहे ब्लॉग तुम्ही . खूपखूप आभारी आहे सर . खूप छान वाटतयं कौतुकामुळे . तुमचं लेखन मला स्फूर्तिदायक वाटतं . भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी आपोआपच वाढवलीत . खूपखूप धन्यवाद सर तुम्हाला😊😊 गीता डांगे

    ReplyDelete
  5. हा कार्यक्रम पाहिला... मी दादा कोंडकेंचा लहानपणापासून फॅन... त्या वेळी म्हणजे ८ वर्षाचा असताना फक्त खळखळून हसणं माहीत होतं... व्दयर्थी विनोद नंतर कळायला लागले... मग दादांचे सर्व सिनेमे पुण्यात अलका, विजय आणि प्रभातला परत परत पाहिले... असो... या कार्यक्रमात गाण्यांनी स्मृती तर जागवल्याच
    ... पण खिळवून टाकले ते निवेदनाने... गाण्यापेक्षा प्रत्येक गाण्यानंतर दादांच्या आयुष्यातली कुठली गोष्ट समोर येतीये याची उत्सुकता पूर्ण कार्यक्रमभर होती... आत्मचरित्रातून नेमके वेचक प्रसंग निवडण्याचे कौशल्य हे वाचनवेड्यांमधेच आढळते... Hats off to Geeta's efforts...

    राजीव इनामदार

    ReplyDelete
  6. विजय कांबळेApril 2, 2023 at 9:41 PM

    जीवन खूप सुंदर आहे आनंद द्या आनंद घ्या हे दादांच्या जगण्याचे तत्त्वज्ञान होते प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाणे हा त्यांचा पिंड होता.
    सतिश सर, अवघा आग्रा फिरवून दमछाक करण्यापेक्षा थेट ताजमहालाच्या दारात सोडणं म्हणजे हा आपला ब्लॉग. एखाद्या आशयाची संपॄत्त्कता (concentration) म्हणजे हा ब्लॉग. एक ग्लास दाट रसातून वीस ग्लास सरबत करणारे आम्ही. तर वीस पेल्यांचा आशय एका लासात सजवणारे ते सतिश सर.

    ReplyDelete
  7. जाधव साहेब.... आपण केलेल्या वृत्तांकाने एका चांगल्या कार्यक्रमाला मुकल्याची चुटपुट लागून राहिली... आपली लेखणी आणि गीता मॅडम दोघांनाही सस्नेह नमस्कार..... रमेश कांबळे

    ReplyDelete
  8. 👍👍🙏🙏 व्वा सतिश दादा !!!!
    नेहमीप्रमाणेच अप्रतिम, ओघवतं, सर्वसमावेशक, मुक्तपणे खळाळल्यागत विविध पैलूंवर प्रेमाने हात फिरवत, सर्व मुद्यांवर तेव्हडेच प्रेम करत बांधनी केलेला, उच्चकोटीच्या शब्द मुसाफिरीने नटलेला, सर्वांनाच महत्त्वपूर्ण मोठेपण देणारा आणि अभ्यासपूर्ण लेखन प्रपंच मनाला मोहून गेला.
    असेच श्रीमंतपणे लिहिते रहा. माता सरस्वतीचा कृपाशीर्वाद आपल्यावर सदैव असो हीच मातेकडे प्रार्थना !!!!
    ..... लक्ष्मण

    ReplyDelete
  9. फारच छान आणि हृदयस्पर्शी

    ReplyDelete