Showing posts with label गीत संगीत. Show all posts
Showing posts with label गीत संगीत. Show all posts

Sunday, April 2, 2023

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

शाहीर दादा कोंडके यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्ताने मराठी भाषा पंधरवड्यात दौलत दादा कोंडकेंची हा युगुल गीतांचा बहारदार कार्यक्रम दिनांक १८ मार्च रोजी पार पडला. या कार्यक्रमाची संकल्पना, रचना आणि दिग्दर्शन मुंबई महापालिका कर्मचार्‍यांच्या सोगो संगीत संस्थेने केले होते. महापालिकेच्या आजीमाजी  ३२ गायक कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमात होता. 

अतिशय अप्रतिम आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला... या कार्यक्रमामधील प्रत्येक युगुलगीत... कलाकार जोडीने सादर करताना दादा कोंडके आणि त्यांच्या चित्रपटातील नायिका यांचा पेहराव परिधान केल्यामुळे या कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली होती. 

या कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवलेली आणि भावलेली एक गोष्ट म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन... 

सर्वसाधारणपणे गीतसंगीताच्या कार्यक्रमात प्रत्येक गाणे साडेतीन चार मिनिटांचे असते..  तसेच दोन गाण्यामध्ये  सूत्रसंचालकास  एक ते दीड मिनिटाची वेळ दिली जाते... परंतु  आजच्या या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेने आयोजकांकडून दोन गाण्यामध्ये तीन मिनिटांचा वेळ मागून घेतला होता... सोगो आयोजकांनी पण ते मान्य केले होते... 

कार्यक्रम सुरू झाल्यावर दोन गाण्याच्या मधल्या वेळात सूत्रसंचालिकेने दादांचा जीवनपट उलगडायला सुरुवात केली... आणि जाणीव झाली की दादा कोंडकेंसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जीवनपट इतक्या कमीवेळेत, अचूक अन् मोजक्या आणि आक्षेपविरहित शब्दांत मांडण्यासाठी  सूत्रसंचालिकेने प्रचंड अभ्यास केला आहे...

 युगुलगीताला साजेशा वाक्यरचनेतून गीतांबरोबरच, चित्रपटाचा अभ्यास... तसेच दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालकाने भरपूर वाचन केलं आहे...  

अतिशय मार्मिक आणि दखलपात्र निवेदन करण्यासाठी भाषेवर तितकच प्रभुत्व असणं आवश्यक असते... ते पदोपदी निवेदिकेच्या शब्दांमधून जाणवत होते... त्यामुळे गाण्याबरोबरच दादांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकाधीक  बळावत होती.....

दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालिकेने दादांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून गाण्याला अनुरूप आणि विषयाला साजेसे असे वेचक मुद्दे निवडून ते तारतम्यतेने आणि मनोवेधकपणे सादर केले होते... 

सूत्रसंचालिकेची जिज्ञासू वृत्ती आणि विषयाचा व्यासंग यामुळेच सूत्रसंचालनाची  कला अतिशय उत्तमपणे आत्मसात केल्याचे तिच्या निवेदनातून पदोपदी जाणवत होते...

 सूत्रसंचालिकेच्या या प्रशंसनीय कामगिरी मुळेच तिच्या कामाची दाखल घेऊन शाबासकी देण्यासाठी आणि दादांच्या चित्रपट जीवनासाठी हा पत्रप्रपंच आहे...

एकापाठोपाठ एक अशा सलग नऊ चित्रपटांचा रौप्य महोत्सव  साजरा करून गिनीज बूक मध्ये जागतिक विक्रमाची नोंद करणारे दादा... आपल्या विनोदाने सार्‍या महाराष्ट्राला हसवणारे दादा... आपल्या स्वतःच्या आयुष्यात कसे एकटा जीव सदाशिव होते... याचा प्रत्यय सर्व रसिक प्रेक्षकांना येत होता...

दादांनी आपल्या चित्रपटांतून तात्कालिक समाज आणि राजकारणातील  वैगुण्यांवर नेमके भाष्य केले होते...

द्व्यर्थी संवादफेकीचा बादशहा ...  विनोदाची मर्मभेदी जाण असणारा.. नेमक्या ठिकाणी पॉज घेऊन हशा घेणारा विनोदवीर... निर्माता... लेखक... दिग्दर्शक... गायक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दादा वैयक्तिक जीवनात एकटा जीव सदाशिव होते...   याची जाणीव झाली... 

दादांच्या जीवनात घडलेला प्रत्येक प्रसंग अंतर्मुख करणारा होता... किंबहुना दादांची जीवन कहाणी ऐकताना हसू आणि आसू यांचे संमिश्र भाव  मनात येत होते... 

अतिशय भोळा भाबडा नायक... नायिकेला का भावतो... याचे समर्पक उत्तर प्रत्येक चित्रपटात आपल्याला मिळते... याच वैशिष्टयपूर्ण खासियतीमुळे ग्रामीण प्रेक्षकांबरोबर शहरी प्रेक्षकांना सुद्धा दादांचे चित्रपट पसंतीला उतरत.. 

त्यांच्या जीवन चरित्रपटातील ठळक वैशिष्ठ्यांचा आढावा सूत्रसंचालकाने प्रत्येक गाण्याच्या मध्ये घेतला होता... त्याची झलक खालील प्रमाणे... 

समाजातील  रुढी, परंपरा, बुवाबाजी यावर उपहासात्मक किंवा व्यंगात्मक चित्रण म्हणजे सटायर चित्रपटातून सादर करणे ह्यात दादांचा हातखंडा होता... त्यामुळे त्या काळातील प्रस्थापित बुवाबाबांचा रोष सुद्धा दादांनी ओढावून घेतला होता... 

शांताराम बापू आणि दादा कोंडके यांच्यातील चित्रपट शीतयुद्ध जगजाहीर होते... बापूंच्या असला नवरा नको ग बाई  या चित्रपटावर कडी म्हणून  ह्योच नवरा पाहिजे  ह्या  चित्रपटाचे नाव दादांनी जाहीर केले... त्यावेळी त्यांच्याकडे चित्रपटाचे कोणतेही कथानक सुद्धा नव्हते... पण प्रचंड जिगर मात्र होती... 

सेवादलाच्या सांस्कृतिक विभागात काम करताना सदानंद वर्दे, वसंत बापट, नाथ पै अशा नामवंत मंडळींच्या ओळखी झाल्या.. तसेच सेवादलाच्या कार्यक्रमात निळू फुले, राम नगरकर हे कलाकार दादा सोबत एकत्र आले... येथून त्यांची पथनाट्य कारकीर्द सुरू झाली... 

विच्छा मधील दादांचे काम पाहून चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांनी तांबडी माती या चित्रपटात दादांना काम दिले. हा चित्रपट अपयशी झाला. त्याचे खापर पत्रकारांनी दादांवर फोडले... परंतु पेंढारकरांनी ते अपयश आपल्या माथ्यावर घेतले आणि दादांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन वर्तमानपत्रात येणार्‍या बर्‍यावाईट बातम्यांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला... 

वसंत सबनीस, दादा आणि भालजी यांनी सोंगाड्याचे पटकथा लेखन केले. या चित्रपटाचे   यश  तुझे असेल तर अपयश पूर्णतः माझे असेल आणि   हा चित्रपट अपयशी झाला तर संपूर्ण खर्च मी उचलेन असे भालजींनी दादाला आश्वासन दिले...  त्यामुळे साकार झाला दादांचा सोंगाड्या  चित्रपट... आणि तो तुफान यशस्वी झाला... शून्यातून विश्व निर्माण करण्याचे दादांचे प्रयत्न फळाला आले... विच्छा मधील माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी आणि  काय ग सखू काय ग साखू ही दोन गाणी दादांनी सोंगाड्या मध्ये घेतली होती... 

चांगले कथानक असलेला  ये रे माझ्या मागल्या हा भालजींचा चित्रपट आपटला... त्यावर दादांनी रिमेक बनविला आली अंगावर...  हा चित्रपट सिल्वर ज्युबिली झाला. चांगल्या कथानकाबरोबर चित्रपटाचे शीर्षक आकर्षक आणि विनोदी असेल तर रसिक प्रेक्षक आपोआप खेचला जातो... याचे हे उत्तम उदाहरण आहे.. 

दादांचा सडेतोडपणा खालील प्रसंगात दिसतो...

 येऊ का घरात या चित्रपटात दादांनी उषा नाईक या अभिनेत्रीला नायिका म्हणुन घेतले होते... हसताना तिचा चेहरा रडवेला दिसतो... हे दादांच्या लक्षात आल्यावर... हसताना आपण कशा दिसतो याचे निरीक्षण करण्यास  तिला सांगितले... आणि नीट हसा असा सल्ला दिला... 

माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दादांच अतिशय सुंदर मैत्रीच नातं होत... बाळासाहेबांना कलेविषयी आणि कलाकारांबद्दल वाटणारा आदर... झटपट निर्णय घेण्याचा स्वभाव, स्पष्टवक्तेपणा यामुळे दादांना बाळासाहेबांबद्दल खूप आदर होता... दादांच्या चित्रपटातील एखादी गोष्ट आवडली नाही की बाळासाहेब ती परखडपणे सांगत... त्यामुळे दादा आपला चित्रपट सेन्सॉरला पाठविण्या अगोदर बाळासाहेबांना दाखवत असत... 

अनेक राजकारणी व्यक्तींसोबत सुद्धा दादांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते... तात्कालिक मुख्यमंत्री वसंत दादा पाटीलांच्या आग्रहाखातर पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमावर गंगाराम वीस कलमे हा चित्रपट दादांनी बनविला... पण चित्रपट प्रदर्शित होताना इंदिरा गांधीची राजवट जाऊन जनता दलाचे राज्य आले होते...

एकटा जीव सदाशिव मधील राणी नावाची बकरी दादां सोबत प्रसिद्ध पावली... तिला कॅडबरी खूप आवडायची... एका सीनमध्ये दादा वडिलांबरोबर जायला निघतात तेव्हा बकरी पळत येते आणि दादांचा सदरा धरते. राणीने सदरा पकडावा म्हणून दादांनी सदऱ्यात कॅडबरी लपविली होती... राणी बकरीच्या सदरा सीनला प्रेक्षक आवर्जून टाळ्या द्यायचे... या बकरीला दादांनी मरेपर्यंत सांभाळलं... 

चित्रपटातील नायिका  दादांसारख्या  बावळट, गबाळा, लांब नाडीवाली हाफपँट  घालणाऱ्या नायकावर का भाळते?  या बाबत पटकथाकार मुजूमदार यांच्याशी बराच खल व्हायचा... त्यामुळेच  प्रेक्षकांना पटेल असे कारण चित्रपटात असे... 

त्याकाळी रंगीत चित्रपट बनविण्यासाठी खुप खर्च यायचा... सकस कथानक, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, काटेकोर दिग्दर्शन तसेच गाणी आणि संगीत दमदार असेल तर कृष्णधवल चित्रपट सुद्धा पाहायला प्रेक्षक येतात... यावर दादांचा विश्वास होता... रंगीत चित्रपटापेक्षा कथानकात आणि कलाकाराच्या अभिनयात रंग असले की प्रेक्षकांना ते भावतात... असे दादा म्हणत... म्हणुनच पांडू हवालदार हा चित्रपट कृष्णधवल बनविला होता. 

दादांच्या बोट लावीन तेथे गुदगुल्या  या भरपुर हास्यमय पंचेस असलेल्या चित्रपटावर पत्रकारांनी कथा नसलेला चित्रपट अशी टीका केली होती... दादांचे म्हणणे होते की विनोदी चित्रपटात कथानक रंगवत नेले की पंचेस कमी होतात... त्यासाठी चार्ली चॅपलीनच्या चित्रपटाचे उदाहरण द्यायचे... 

सर्व लोकांना आपल्या द्व्यर्थी संवादाने खिळवून ठेवणारे दादा आपल्या कुटुंब सौख्याबाबत मात्र अपूर्णच राहिले... लग्नानंतर चौथ्या वर्षीच त्यांचा घटस्फोट झाला... त्यांचा पुतण्या विजय कोंडके यांनी  आर्थिक बाबीत दादांना अडचणीत आणले... विजय कोंडकेंच्या माहेरची साडी या चित्रपटाला तोडीस तोड असा  सासरचं धोतर हा चित्रपट दादांनी काढला... 

चित्रपटाच्या नावात द्व्यर्थी मिनींग नसलेला दादांचा सातवा चित्रपट बोट लावीन तिथ गुदगुल्या  हा होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर... पुण्यातील झाडून सर्व पत्रकारांनी दादांचा "सातवा मजला कोसळला" असं मोठ्या हेडिंग मध्ये वर्तमानपत्रात लिहिले होते... पण गुदगुल्या सुपरहिट झाला... पुण्याच्या एका चित्रपटगृहात तर तो पंच्याहत्तर आठवडे चालला... ह्या चित्रपटाच्या ज्युबिली समारंभात पत्रकारांना दादांनी आवर्जून बोलावले होते... आणि सांगितले "तुमच्या लिखाणाचा माझ्या चित्रपटावर काहीच परिणाम होत नाही"... "प्रेक्षक माझा आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे"... तुम्ही आणखी पेपर छापा... लहान मुलांना नक्कीच कामाला येतील... 

प्रत्येक माणसाने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केले तर यश आपोआपच येतं... दादांचे सुद्धा असंच होतं... त्यांचा कुठलाही गाजलेला चित्रपट काही काळानंतर त्यांनी पाहिल्यावर त्यांना वाटायच हा सीन जास्ती चांगला करू शकलो असतो... एखादा विनोदी प्रसंग थोड्या वेगळ्या पद्धतीने केला असता तर प्रेक्षकांचा आणखी हशा मिळवू शकलो असतो...  त्यामुळेच चित्रपट पूर्ण झाल्यावर सुद्धा नवनवे सीन दादा चित्रपटात टाकत असत.. 

शांताराम बापू आणि दादा यांच शीतयुद्ध असायचं... पिंजरा चित्रपटात बापूंनी दादांना खूप टोमणे मारले होते... त्यानंतर दादांनी एका चित्रपटात नायक गटारातून मोडका पिंजरा बाहेर घेऊन येताना दाखविला होता... 

परंतू दोघांना एकमेका बद्दल नितांत आदर होता... बापू दादांचे सर्व चित्रपट राजकमल स्टुडिओत प्रिंट मागवून पाहत असत... 

राजेश मुजूमदार आणि दादा पांडू हवालदार च्या निमित्ताने एकत्र आले. दादांनी एखादा पंच सांगितला की मुजुमदार पुढचा पंच तयार करायचे.. अशा प्रकारे कथानक तयार व्हायचे... 

राम कदम यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत द्यायला नकार दिल्यावर... दादांना नव्या संगीतकाराची गरज होती...  एकॉर्डीयन प्लेअर लक्ष्मण पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे यांनी कलातरंग ऑर्केस्ट्रा सुरू केला होता.. दादांनी त्यांना आपल्या काही गाण्यांना चाली करायला दिल्या... त्यांच्या चाली भावल्यामुळेच दादांनी त्यांना रामलक्ष्मण हे नाव दिले आणि पुढे रामलक्ष्मण यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत दिले. 

*एकटा जीव* च्या यशानंतर शुल्लक कारणावरून दादांची जुनी टीम दादांना सोडून गेली... त्यामुळे  आंधळा मारतो डोळा या चित्रपटात दादा सोबत सर्व नवी मंडळी काम करत होती. हा सुद्धा चित्रपट ज्युबली झाला... याचे कारण म्हणजे दादा स्वतःच एक चित्रपट इंडस्ट्री होते... 

त्यांच्या चित्रपटात काम करण्याऱ्या नायिकांमुळे दादांना खुप अडचणींना सामोरे जावे लागले..  परंतु कितीही त्रास झाला, संकटे आली तरी दादा कधीच डगमगले नाहीत... 

 दादांचं सेन्सॉर बोर्डाशी असलेले हाडवैर जगजाहीर होतं.. सेन्सॉर बोर्डाने द्व्यर्थी संवादाबद्दल दादांना खूप त्रास दिला... पण दादा नमले नाहीत... ते आपला मुद्दा नेटाने मांडत... तुमच मन मलीन असल्यामुळे शब्दांचे अश्लील अर्थ तुम्ही लावता... पुढेपुढे तर सेन्सॉरशी वाद घालता यावा म्हणुन दादा मुद्दाम द्व्यर्थी संवाद टाकू लागले...
 
 दादा एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करतात की सेन्सॉर बोर्डामुळे माझ्या चित्रपटांची खूप चर्चा व्हायची... त्यामुळेच चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळायची... म्हणूनच माझे चित्रपट तुफान चालल्याचे दादा कबूल करतात.... 

दादांना  शिकारीचा प्रचंड नाद होता... शिकारीसाठी जनावर शोधण्यात ते एव्हढे मग्न व्हायचे की सार जग विसरून जायचे... शिकारीला गेल्यावर ते खुप रिलॅक्स होत असत... त्यामुळे चित्रपटातील जास्तीत सीन, गाणी दादांनी जंगलात  लिहीली आहेत... 

शिकारीत असताना एखादा अचानक वळवाचा जोरदार पाऊस आला... म्हणुन सर्वजण एका झाडाखाली थांबले... पाऊस थांबल्यावर झाडातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांना पाहून तिथल्या तिथे एक गाणे तयार केले... ते म्हणजे अतिशय प्रसिद्ध झालेलं  ढगाला लागली कळ... पाणी थेंब थेंब गळ... हे गाण होय... दादांची कलासक्ती जंगलात बहरून यायची याचेच हे उदाहरण आहे... 

नववा ज्युबिली चित्रपट आली अंगावर  मुळे दादांचे खूप कौतुक झाले... सलग नऊ ज्युबिली चित्रपट म्हणुन जागतिक विक्रम झाला... पण दादांना आनंद वाटत नव्हता... त्यांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला... विच्छाच्या अफाट यशामुळे आता मिळणार्‍या यशाचे दादांना महत्त्व वाटत नव्हते... या मानसिक दोलायमान परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दादांनी खूप उपचार केले पण फारसा उपयोग झाला नाही... त्यांची निरीच्छ वृत्ती वाढत गेली... 

अमाप पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर, मानसन्मान मिळून सुद्धा दादा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात एकटा जीव  राहिले... 

पुढचा जन्म देवाकडे मागताना "मला पैसाअडका काहीही नको फक्त जिवाभावाची माणस दे" हेच दान मागितले... 

मित्रांनो... 

दादांचा हा सर्व जीवनपट उलगडून सांगितला सूत्रसंचालिका गीता डांगे यांनी... दादांचे आत्मचरित्र एकटा जीव सदाशिव तसेच इतर लेखकांनी सांगितलेल्या माहितीचे समग्र रसग्रहण करून गीता ताईंनी मेहनतीने संकलित केलेली माहिती रसिक प्रेक्षकांना  सादर केली... त्याबद्दल निवेदिकेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. 

खरं तर गीता ताईंनी लिहिलेलं दादांच्या जीवन चरित्राचे रसग्रहण कोणत्याही वर्तमानपत्रात दादांच्या आत्मचरित्राची समीक्षा म्हणुन सुद्धा प्रसिद्ध करता येईल... 

दादांचा माहितीपट उलगडताना गीता ताईंची संवादफेक, शब्दांतील चढउतार, देहबोली यातून दादा एकदम मनाला भिडले... त्यांच आत्मचरित्र वाचण्यासाठी मन अधीर झाले ... 

तसेच गीता ताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सुद्धा सविस्तर  मनोगत लिहावे ही उर्मी जागृत झाली... 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
9869560266

Friday, October 15, 2021

सोगो संगीताचा आनंदघन"" हम तुम साहिर के संग" २६ सप्टेंबर २०२१

"सोगो संगीताचा आनंदघन"

"हम तुम साहिर के संग" २६ सप्टेंबर २०२१
कार्यक्रम करायचा म्हटले की नियोजन हे आलेच... ही प्रक्रिया सुरू होते तीन महिने अगोदर... कोविड मुळे सर्व गोष्टी थांबल्या होत्या. परंतू महिनाभर अगोदर सरकारी नियम थोडे शिथिल झाल्यावर आठवड्यातून तीन दिवस तालीम सुरू झाली. सर्वजण हिरीरीने प्रॅक्टिस करू लागले. 

भायखळ्याच्या हॉलचे वैशिट्य म्हणजे स्टेज, पडदे खुर्च्या, लाईट्स यांचे परिपूर्ण  आयोजन... सोबत चहा-कॉफी डिस्पेन्सर सुद्धा... त्या बरोबर बिस्किटे...  जेव्हा सर्व गायक मित्र-मंडळींची भेट होते तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही... तालीम सुद्धा प्रत्येकजण मनापासून करतात... काही कलाकार पुन्हा प्रॅक्टिस करता यावी म्हणून उशिरापर्यंत थांबतात... आवाज कसाही असो... पण ज्याला गाण्याची आवड आहे आणि मेहनत करायची तयारी आहे अशा सर्व मनपा कलाकारांना या संगीत शाळेत घडविले जाते... त्याच्या आवाजाचा पोत पाहून गाणे दिले जाते.. मग प्रॅक्टिस करता करता त्याला घडविले जाते... रंगीत तालमी मध्ये अंतिम शो चे फिलिंग सर्वांमध्ये उतरते.

मुख्य शो चे पण अजब होते. सद्य परिस्थितीत हॉल मिळणे कठीण होते. म्हणूनच कोविड काळात कार्यरत असलेले पडद्यामगाचे  कलाकार म्हणून सर्व मनपा गायकवृंदाचा कोविड वरीयर्स म्हणून सन्मान करण्या निमित्ताने नेहमीचा हॉल मिळवीला.  ऐन वेळेला बॅकड्रॉप म्हणून भव्य LED ची व्यवस्था झाली. सर्व कलाकार चॉकलेटी रंगाच्या विविध छटा असलेल्या वेशात दोन वाजल्या पासूनच यायला लागले होते. 

प्रत्येकाला कामे वाटून दिली होती. गाण्याची स्क्रिप्ट देणे. चहा पाण्याची व्यवस्था, मेकअप, स्टेजवरील तयारी, गायक कलाकारांचे व्यवस्थापन, बसण्याची तसेच लाईट्सची व्यवस्था, या सर्व कामामध्ये काटेकोरपणा आणि सुसूत्रता होती. गम्मत म्हणजे पडेल ते काम प्रत्येक कलाकार करायला सज्ज होता. यावेळचे सुत्रसंचालन दोन कसलेल्या कलाकारांकडे सोपवले होते. 

रंगदेवतेची पूजा झाली... आणि संगीत मैफिलीला सुरुवात झाली... जवळपास १४ नवीन कलाकारांनी प्रथमच सोगोच्या स्टेज वर आपले गाणे सादर केले.  साहिरच्या विविध गाण्याच्या वेगवेगळ्या रंगछटा सर्व कलाकारांनी गायल्या.

या वेळच्या मध्यंतर पर्यंतच्या आणि मध्यंतर नंतरच्या गाण्यांमध्ये एक चढती भाजणी होती... त्यामुळे एक गोष्ट झाली... ती म्हणजे नृत्य करण्याची  हौस दोन्ही हाफ मध्ये भागवीता आली... बऱ्याच जुन्या जाणत्या कलाकारांनी पहिल्या हाफ मध्ये कला सादर केली... विशेष म्हणजे सर्व नवीन कलाकार सुद्धा पट्टीचे निघाले... आधी कसून केलेल्या सरावा मुळे सर्व नवीन कलाकारांमध्ये आत्मविश्वास जाणवला... जुन्या कलाकारांनी तर या संगीत मैफिलीला एक वेगळी उंची दिली. ताना, मुरक्या, आलाप, चेहऱ्याचे भाव, साथीदाराला नेत्र कटाक्ष देणे... या मध्ये प्रत्येक जण माहीर झाले होते. प्रत्येक कलाकाराला मिठाई आणि गुच्छ देऊन सत्कार करण्याची आयडिया एकदम भन्नाट.  सुत्रसंचालनाची खुमारी अतिशय वेगळी होती. सवाल जवाब अशी जुगलबंदीच होती. पण हो... या साठी सुद्धा खूप कसून पूर्व तयारी केली होती... 

एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम आनंदाचा कौटुंबिक सुखसोहळा होता... कलाकारांबरोबर त्यांच्या कुटुंबाने.. आप्तस्वकीय... मित्र... सर्वांनी कार्यक्रम एन्जॉय केला... खूप महिन्यांनी झालेला "हम तुम साहिर के संग"  हा कार्यक्रम म्हणूनच विशेष लक्षात राहील.

# कार्यक्रमाचे अंतरंग #

सोगोच्या संगीत कार्यक्रमानिमित्त त्याचे जाणवलेले अंतरंग :- 

तालमीला नवे जुने कलाकार येतात तेव्हा प्रॅक्टिस सह एकमिकांना भेटणे हा सुद्धा उद्देश असतो...

 वैयक्तिक सुखद गोष्टी शेअर केल्या जातात... आणि कलाकार भेटल्यामुळे अंतरंगीचे दुःख पार नाहीसे होते... 
 
प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करणे... स्वतःचे अथवा  मुलामुलींचे लग्न सेलिब्रेट करणे म्हणजे आनंदाचे प्रक्षेपण असते...

सर्वांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे "मैत्रीचा" यात स्त्री-पुरुष, लहान-मोठा असा भेद नाही...

कार्यक्रम आणि प्रॅक्टिस यामुळे;  व्याधी, आजारपण, शास्त्रकिया त्यामुळे आलेले नैराश्य पळून जाते....

 निकटवर्तीयांचा मृत्यू; त्यामुळे कोसळणारे पहाडाएव्हढे दुःख, शीतल करण्याचे जालीम औषध म्हणजे सोगो मित्रपरिवार आहे....
 
येथे तयार झालेले कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत आहेत.. गायन, संगीत, वाद्यवादन, नाटक, सूत्रसंचालन, टीव्ही शो, यु ट्यूब इत्यादी क्षेत्रांत चमकत आहेत... आता तर घरगुती कौटुंबिक कार्यक्रमात सुद्धा सोगो कलाकार हिरीरीने भाग घेतात. कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडतात. सोसायटीतील सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा आपली चमक दाखवितात... या मुळे कलाकारांचा सोगो बाहेरील मित्र परिवारात सुद्धा वाढ होत आहे...

येथील कलाकारांचे सुप्त गुण प्रचंड विकसित झाले आहेत.. कोणाही मध्ये आता स्टेजची भीती राहिलेली नाही.. माहीत नसलेले गुण उभारून आले आहेत..
हे सर्व टॅलंट पाहिल्यावर आपले कुटुंबीय, मित्रपरिवार सुद्धा भारावून जातात... 

घरातली मंडळी, कुटुंबीय सुद्धा आता गायला लागले आहेत.  सोगो कलाकारांसोबत गणपती, नवरात्रीत सर्व कार्यक्रमात भाग घेत आहेत... त्यांना सुद्धा इंस्पायरेशन मिळत आहे...

 घरच्यांसाठी चर्चा करायला गीत-संगीत हा एक नवीन विषय; आनंदाचे वाटप करण्यासाठी मिळाला आहे...
 
 यामुळे नव-नवीन संकल्पनांचा उदय होतोय आणि कल्पकता वाढीस लागते आहे...
 
 व्याधी मुक्त होण्याचे औषध म्हणजे सोगो...
 
 नवनवीन कलाकारांचा उदय होतोय सोगो मुळे...
 
 कलाकारांचे वक्तृत्व सुधारलय.. आत्मविश्वास वाढला...
 
 नवीन कपडे घालण्याचा सोस पूर्ण करता येतो...
 
 मुख्य कार्यक्रमात एकाच रंगाच्या निकशामुळे कौटुंबिक बॉंडिंग  वाढले ...
 
 सर्वांच्या कपड्यांचा  एक रंग पाहून इतरांना अप्रूप वाटते...
 
 सर्व जोडले गेले आहेत निव्वळ मैत्रीच्या धाग्याने...
 
 स्त्री पुरुष भेद कमी झाला आहे...
 
मैत्रीचे स्नेहाचे नाते सख्ख्या नात्यापेक्षा दृढ झाले आहे...

 प्रत्येकाच्या जीवनात  दुःखद घटना घडत असतात पण ते ते पचवण्याची ताकद सोगो ने दिलीय ...
 
 दुःख निवारण्याची सुखद गोळी आहे सोगो...
 
 नवीन क्षेत्रांत घवघवीत यश... इतरांकडून कौतुक...
 
 रिटायरमेंट नंतर एक पोकळी निर्माण होते.. तीसुद्धा भरून निघालीय... 
 
 सो गो म्हणजे आनंदाचे प्रक्षेपण....
 
 जीवनाचा नवा अर्थ सापडलाय..
 
सजण्या-धजण्या साठीचे ठिकाण हक्काचे ठिकाण...
 
 ताणतणाव विसरणे...
 
 संगीतात मशगुल होऊन रिलॅक्स होणे...
 
तारुण्य टिकविण्याचे साधन म्हणजे सोगो...

गंभीर शस्त्रक्रिया झालेले कलाकार सोगो मुळे लवकर बरे झाले आहेत...

स्वतःच्या तब्बेतिकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील झालाय...  खूप वर्ष आनंदी जीवन जगायचंय प्रत्येकाला...  सोगोच्या संगतीने...
 
निर्माण झालेला ऊर्जा स्रोत इतर क्षेत्रांत सुद्धा चपलखपणे वापरता येऊ लागलाय..
 
मुख्य कार्यक्रमा अनुषंगाने :-

 प्रत्येकाच्या कामाचे वाटप त्यामुळे बंधुभाव वाढीस लागतो... कोणतही काम करण्याची प्रत्येकाची तयारी...
 
 लहान मोठे पद,  प्रतिष्ठा; समान पातळीवर आणली सोगोने...
 
कार्यालयात कोणत्या पदावर आहे या पेक्षा,  तो माझा मित्र किंवा मैत्रिणी आहे याचा आदरभाव वाढीस लागला आहे...
 
बोलताना प्रत्येकाच्या डोळ्यात प्रेमभाव दिसतो..
 
आपली वैगुण्ये विसरली जातात...
 
स्वतःला आहे तस स्वीकारण्याची कला प्राप्त झाली आहे...
 
त्यामुळे इतरांचे दोष सुद्धा दुर्लक्षित केले जातात...
 
आनंदी जीवन घडविण्याचा कारखाना सोगोने उघडलाय..
 
प्रत्येकाच्या तारुण्याला बहर आला आहे...

 जीवन जगण्याची कला प्राप्त झालीय...
 
 कुटुंबला सुद्धा विरंगुळा मिळण्याचे साधन; मुख्य कार्यक्रम...
 
 करोना सारख्या मोठ्या अवघड परिस्थितीतून मानसिकरीत्या सावरण्याची कला अवगत झाली...
 
 सोगो आता जिव्हाळ्याचे कुटुंब झाले आहे...
 
 एकमेकांना भेटलं; की फक्त गाणे आठवत...
 
 एक नवीन विषय इतर मित्रांमध्ये चर्चेला मिळतो.
 
आता वयाचे बंधन संपले आहे...

वेळेला मदतीचा हात पण सोगो देतंय...

जीवनाचा अर्थ समजू लागलाय...

कलाकार म्हणून उभारी आलीय.. कार्यक्रमात नाचणे बगडणे...  हे एक स्ट्रेस मॅनेजमेंट आहे...

स्वतःवर विनोद करण्याची कला अवगत झालीय...

स्वतःची कमतरताच स्ट्रॉग पॉईंट कसे बनवायचे हे उमजलय...

स्वतःवर प्रेम करायला शिकलाय प्रत्येक जण...

मित्राला मित्र म्हणून पाहणे... एकदम निरपेक्ष भावनेने...
 
सोगो म्हणजे आनंदाचा खजिना आहे.... जीवनभर पुरणारा...


सोगो ने बढती बदली रिटायरमेंट सुद्धा पाहिलीय कलाकारांची...

 नवरा , बायको, नात, नातू,  मूले, आई,  बाबा, आजी, आजोबा; तसेच आप्तस्वकीय आणि मित्रमंडळी सोगो कलाकारांचं  कौतुक करतात या पेक्षा मोठा आनंद काय असू शकतो...
 
आपण सर्व आनंदाचे भुकेले आहोत... त्याची गुरू किल्ली सापडली आहे सोगो मधून...

आनंदी जीवन जगण्यासाठी प्रभावी माध्यम ... 

सोगो कलाकारांच्या व्हिडीओ क्लिप देश, परदेशात सुद्धा पोहोचल्या आहेत....

परदेशात राहणारे स्वजन अतिषय जवळ आले आहेत... तिकडंन सुद्धा कौतुक होतंय...

युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक येथून सुद्धा प्रचंड लाईक्स मिळत आहेत..

कार्यक्रमाची पूर्व तयारी :- 

मेकअपमन,  लाईटवाले, led स्क्रीनवाले, साउंड सिस्टीमवाले,  फोटोग्राफर , व्हिडीओग्राफर, सायनाचे रंगमंच कामगार, कराओके एडिटर आणि कंपोजर, कट आऊट, बॅनर, प्रॉप, नास्ता आणि चहा बनविणारे, सर्व कामे करणारे, देणगीदार, हॉल मिळवण्यासाठी आयडिया देणारे हे सर्व पडद्यामगाचे कलाकार आहेत...

 गाणी मॅनेजमेंट:-
 
गाण्याच्या सिक्वेस, त्याची वेळ, पहिला आणि दुसरा अंतरा सुरू होण्याच्या टाइम, सुत्रसंचालकांना दिलेला वेळ,  सुरुवात, माध्यतर, समाप्ती या सर्वांचा सेकंद-सेकंदाचा अभ्यास म्हणजे phd होईल.... यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांचा सुद्धा मोठा हात आहे कार्यक्रम बहारदार करण्यासाठी...

कल्पक थीम निवडणे:- 

थीम ठरविणे, गाणी निवडणे, ती नेट वरून डाउनलोड करणे, कलाकारांना त्याच्या गायकी प्रमाणे गाणी वाटप, त्यांना एनकरेज करणे. गाण्यातील हरकती, चढउतार, पट्टी आणि जागा दाखविणे. ही म्हणजे प्रयोगशाळा आहे....

प्रॅक्टिस हॉल :- 

आता जो प्रॅक्टिस साठी हॉल बनविला आहे, "उसका क्या कहना"..  टाईल्स, रंग, जुन्या शोचे कट आऊट चहा, कॉफी, बिस्कीटची इन्स्टंट व्यवस्था... 

टेबल, खुर्च्या, लॅपटॉप, मोठा स्क्रीन, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम ही तर प्रॅक्टिससाठी  पर्वणी आहे...

सर्वाचा सकारात्मक भाव आणि संगीताची आस्था येथे काम करते...
आता पर्यंत १०० पेक्षा जास्त कलाकार जॉईन झाले आहेत.
 ही या सर्व व्यवस्थेची पोचपावती आहे...

सोगो संगीताचा "आनंदघन" बरसतो आहे सर्वांवर...
 या संगीत सागरात चिंब भिजतो आहे प्रत्येक कलाकार... आणि सोगोला साथ देणारे पडद्यामगाचे किमयागार....
सतीश जाधव
मुक्त पाखरे...