Sunday, July 16, 2023

*विपश्यना "मरण मरण्याची कला"*

 *विपश्यना "मरण मरण्याची कला"*
 
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव नियंत्रण तसेच मानसिक व शारीरिक आजारांच्या नियंत्रणाकरिता योगासन आणि नियमित व्यायामाबरोबरच ध्यानधारणेची नितांत आवश्यकता आहे. 

या धावपळीच्या जीवनातील ताणतणाव, चिंता, दुःख यापासून मुक्ती मिळवून देणाऱ्या; शरीर व  मन निरोगी ठेवणार्‍या; सुख, मन:शांती, समाधान आणि आनंदाचा मार्ग दाखविणाऱ्या विपश्यना ध्यानधारणेचं अनन्यसाधारण महत्त्व  आहे. 

प्राचीन भारतीय परंपरेतील ऋषी हे शास्त्रज्ञ होते.  निसर्ग नियमाप्रमाणे कसे जगावे, अंतर्मन कसे निर्मळ करावे  याबाबत विपश्यना साधनेची आदर्श पद्धती त्यांनी विकसित केली होती. प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात विपश्यनेचा उल्लेख आहे.

ऋषी मुनींनी विपश्यना ध्यान धारणेद्वारा मन निर्मळ करून समतोल मनाने उच्च अध्यात्मिक प्रगती साध्य केली होती. परंतु  ही विपश्यना विद्या काळाच्या ओघात भारतातून लुप्त झाली. 

भगवान गौतम बुद्धांनी सुमारे २५०० वर्षापूर्वी या विद्येचे पुनर्संशोधन केले. या विद्येद्वारे त्यांना वयाच्या ३५ व्या वर्षी निर्वाण अवस्था प्राप्त झाली.  मानव जातीच्या कल्याणाकरिता त्यांनी पुढील  ४५ वर्ष विपश्यना साधनेचा भारतात व भारताबाहेर  प्रसार, प्रचार केला. भगवान गौतम बुद्धांनी  विपश्यना ध्यानधारणेद्वारा संपूर्ण मनुष्य जातीचे कल्याण केले आहे. विपश्यना ध्यानधारणा लोककल्याणाचा जीवनदायिनी व मुक्तिदायीनी राजमार्ग आहे.

 भगवान गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५०० वर्षे ही विद्या संपूर्ण भारतभर मानवाच्या उत्थानाचे अखंड कार्य करीत राहिली. परंतु त्यानंतर मात्र ही विद्या भारतातून समुळ नष्ट झाली.  परंतु विपश्यना साधना गुरू-शिष्य परंपरेने ब्रह्मदेशात तिच्या मूळ स्वरूपात जतन करून ठेवण्यात आली होती.

ब्रह्मदेशात स्थायिक झालेले मूळ भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. सत्यनारायणजी गोयंका यांना या अद्भुत विद्येचा लाभ मिळाला.  ही विद्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, तसेच भारतातून लुप्त झालेली ही विद्या पुन्हा भारतात यावी अशी प्रेरणा त्यांना गुरूवर्य श्री ऊ बा खिन यांच्यामुळे मिळाली. 

श्री गोयंकाजींनी भारतात येऊन १९६९ पासून लहान लहान शिबिरांमधून जास्तीत जास्त लोकांना या विद्येचा लाभ देण्याचे कार्य सुरू केले. १९७६ मध्ये आचार्य गोयंकाजी यांनी  भारतात पहिले विपश्यना केंद्र नाशिक मधील इगतपुरी येथे सुरू केले. 
 
मानवाचा उद्धार करणारी जीवनदायिनी व मुक्तिदायिनी विद्या भारतात आणून व तिचा प्रचार, प्रसार  सर्व जगात करून श्री गोयंका यांनी मानव जातीवर फार मोठे उपकार केले आहेत. मानव जातीच्या कल्याणाकरिता त्यांनी ही साधना भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली आहे...
आजमितीस भारतात १०५ पेक्षा जास्त विपश्यना साधना प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यात महाराष्ट्रातील ३४ केंद्रांचा समावेश आहे.  जगाच्या पाठीवरील २५५ पेक्षा जास्त विपश्यना केंद्राद्वारे जीवनात मूलभूत परिवर्तन करणाऱ्या या विद्येचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत अव्याहतपणे पोहोचविण्याचे काम सुरू आहे. 
  
विपश्यना साधनेचा उद्देश:

प्रत्येक व्यक्ती ताणतणाव विरहित जीवन जगू इच्छितो. परंतु  आपले मन ताब्यात नसल्यामुळे तसेच मनात आसक्ती, द्वेष, क्रोध, मोह असल्यामुळे; सुखी, समाधानी आणि निरामय जीवन जगणे कठीण होते...

आपले मन आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे आपले मन निर्मळ असणे... त्यासाठी  मन एकाग्र करणे ही पहिली पायरी आहे... आपले मन ताब्यात असल्यास आपण नक्कीच शांततामय जीवन जगू शकतो.  विपश्यना साधनेद्वारे मन ताब्यात येऊन निर्विचार आणि निर्विकार होऊन क्रोध, आसक्ती, मोहापासून विमुक्त होते.

विपश्यना म्हणजे विशेष रूपाने पाहणे.  या ध्यानधारणा पद्धती मध्ये स्वभाविक श्वासाचे सजग तटस्थ मनाने सतत निरीक्षण करणे व त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या सूक्ष्म मनाने शरीरातील प्रत्येक अवयवातील संवेदनांचे (स्थूल व सूक्ष्म) क्रमवार निरीक्षण करत राहणे व त्याचवेळी संवेदनांची अनित्यता, नश्वरता व भंगुरता यांची सतत जाणीव ठेवणे.  ही आहे विपश्यना साधना...

ही साधना साधकांना दहा दिवसीच्या शिबिराद्वारे शिकविली जाते. या प्रशिक्षणाकरिता राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था केली जाते. याकरिता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. साधकांनी दिलेल्या ऐच्छिक  दानातून शिबिरांची पुढील सत्रे आयोजित केली जातात. या प्रशिक्षणाकरिता नेमण्यात आलेले आचार्य देखील कोणतेही मानधन स्वीकारीत नाहीत. सेवा भावनेने ही साधना शिकविली जाते.

सकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत हे प्रशिक्षण चालविले जाते. या साधने दरम्यान १० दिवस आर्यमौन ठेवावे लागते. हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, नशा न करणे, ब्रह्मचर्यपालन हे पंचशील पालन करावे लागते.  या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी दोन महिने अगोदर ऑन लाईन बुकिंग करणे आवश्यक आहे...

प्रशिक्षणातील महत्त्वाचा भाग:

बहुतांश ध्यानधारणा पद्धती मध्ये मनाची एकाग्रता वाढविणे यावर भर दिलेला असतो. परंतु विपश्यना ध्यानधारणा पद्धतीमध्ये स्वाभाविक श्वासाचे निरीक्षण करता करता करता मनाची एकाग्रता वाढविणे व भटकणारे मन;  विचार व आठवणी यापासून परावृत्त करून शरीरातील संवेदनांची अनित्यता, नश्वरता व भंगुरता यांची सतत जाणीव ठेवणे आणि विकार विमुक्त ( क्रोध आणि लोभ विरहित ) निरामय जीवन जगणे हे शिकता येते... 

अंतर्मन निर्मळ व स्वच्छ करणे हा या कलेचा मुख्य उद्देश आहे. या क्रियेत क्रोध आणि आसक्ती हे मनाचे प्रमुख विकार व इतर सर्व प्रकारचे विकार हळूहळू दूर होत जातात. मन निर्मळ व स्वच्छ होऊन आपल्या ताब्यात येते. मानसिक आणि शारीरिक आजार व दुःख दूर होत जातात. मानवी मनात शांतता, स्थिरता व समाधान प्राप्ती होते...

विपश्यना एक शास्त्र:

स्थूलमानाने मनात चार प्रकारच्या प्रक्रिया घडतात 

जाणीव (विज्ञान) (Consciousness)- हा भाग  माहिती गोळा करणे व तिची नोंद करण्याचे काम करतो. परंतु त्याला कुठलीही लेबल देत नाही. 

आकलन (संज्ञा) (Perception)- जाणिवेने गोळा केलेल्या नोंदीची छाननी करून वर्गीकरण करून त्यांना योग्य ते लेबल लावणे. नोंदीचे योग्य-अयोग्य अनुकूल-प्रतिकूल असे मूल्यांकन येथे होते.

संवेदना (वेदना)(Sensation)-मिळालेल्या माहितीचे मूल्यांकन झाले की संवेदना सुखदायक किंवा दुःखदायक आहेत हे या भागाकडून ओळखले जाते.

प्रतिक्रिया (संस्कार) (Reaction)  जेंव्हा संवेदना सुखकारक असतात, तेंव्हा त्या अधिक हव्याशा वाटतात आणि दुःखकारक असतात, तेंव्हा त्या नकोशा वाटतात. अशाप्रकारे मन आसक्तीच्या व द्वेषाच्या प्रतिक्रिया करत असते, जे संस्कार बनविण्यास कारणीभूत असते.

उदाहरणार्थ आपल्या कानावर संगीत पडले तर पहिला भाग आपल्याला त्याची जाणीव करून देतो. दुसरा भाग ते आपल्या पूर्वीच्या अनुभवावर पडताळून पाहतो म्हणजे आकलन होते व ते आपल्याला आवडणारे गीत आहे असा ध्वनित अर्थ काढतो व पुढच्या क्षणी आपले मन सुखद संवेदनाच्या जाणीवेने भरून जाते हे तिसऱ्या भागाच्या कामामुळे घडते... व ते संगीत पुन्हा पुन्हा ऐकावे अशी इच्छा चौथ्या भागात निर्माण होते. ही  प्रतिक्रिया असते.

मन निर्मळ करण्याकरिता मनाच्या तिसऱ्या भागाचा अर्थात संवेदनांचे तटस्थ भावनेने पाहणे होय... प्रत्येक गोष्ट अनित्य / भंगुर /अशाश्वत समजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तटस्थपणे निरीक्षण करणे आवश्यक असते. ह्या प्रतिक्रिया नवीन संस्कार बनविण्याचे कार्य करीत असतात. तटस्थ भावनेने निरीक्षण केल्याने नवीन संस्कार निर्माण होऊ शकत नाहीत व जुने संस्कार ध्यानधारणेच्या नियमित तटस्थ साधनेमुळे हळूहळू नष्ट होत जातात व मन शुद्ध होत जाते. 

स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. परंतु ही साधना नियमितपणे केल्यास स्वभावात नक्की परिवर्तन येऊ शकते हा अनेक साधकांचा अनुभव आहे.

फायदे:

विपश्यना ही अंतर्मनात परिवर्तन करणारी भारतीय पुरातन साधना असून हजारो वर्ष ऋषी, मुनी, साधू, संत यांनी ही साधना निरामय जीवन जगण्यासाठी उपयोगात आणली असून या साधनेद्वारे अध्यात्मिक उंची गाठली आहे. 

विपश्यना साधनेचा नियमित सराव केल्यास त्याचे खूप चांगले व सकारात्मक परिणाम दिसून येतात. या धकाधकीच्या व ताण-तणावाच्या जीवनात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकविण्याकरिता मनाची शांतता व समाधान प्राप्त करण्याकरिता विपश्यना साधना अत्यंत उपयुक्त आहे. त्याबरोबर ही जीवन जगण्याची एक कला असून आध्यात्मिक उंची गाठण्याचा एक राजमार्ग आहे... त्यामुळे  सुख व समाधानी जीवनात उत्तरोत्तर वाढच होत जाते..

मानवी बाह्यमन व अंतर्मनात सतत संघर्ष चालू असतो. त्यामुळे निर्णय प्रक्रिया जलद होत नाही व ताण तणाव निर्माण होतो. विपश्यना साधनेचे प्रशिक्षण पूर्ण करून या साधनेचा नियमित सराव केल्यास मनाची शक्ती एकत्र होते. निर्णय प्रक्रिया जलद होते. मन निर्मळ झाल्यामुळे कुठलाही संशय/संदेह मनात राहत नाही.

ह्या साधने द्वारे आपले मन नेहमीच सजग व वर्तमानात असल्यामुळे आपल्याला मानसिक आजारांपासून दुर ठेवते. आपण नियमितपणे ही साधना केल्यास मनोविकारापासून निर्माण होणारे सर्व आजार तसेच  मुख्यत्वे रक्तदाब, शुगर, हृदय विकार, कॅन्सर मायग्रेन, अर्धांगवायू, ब्रेनस्ट्रोक यासारखे गंभीर आजारांपासून दूर ठेवतो..

विपश्यना साधना  सखा, मित्र, सोबती म्हणून आयुष्याच्या अंतापर्यंत आपल्याला साथ देते. विपश्यना साधनेचा नियमित सराव केल्यास आसक्ति, क्रोध मोह, द्वेष, नकारात्मकता, हव्यास, आळस हे मनाचे दोष (विकार) कमी होत जातात...  सुख, आनंद, मनशांती, सद्भावना, करुणा, मैत्री भावना, सकारात्मकता, उत्साह हे गुण वाढीस लागतात.  मनाचे व शरीराचे व्यवस्थापन करून तुम्हाला सुखी व समाधानी बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही विपश्यना साधना आहे. 

माणसाच्या जीवनात व अंतर्मनात परिवर्तन करू शकणारी अशी ही विद्या आहे.  नियमित साधना करून कित्येक लोकांनी त्यांच्या शारीरिक व मानसिक व्याधींपासून मुक्तता मिळविली आहे. त्याचबरोबर  ताणतणाव मुक्त आनंदी व समाधानी जीवन जगत आहेत. 

 आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी सुरू केलेल्या व जगाच्या पाठीवर सर्वत्र प्रसार झालेल्या विपश्यना साधनेत केवळ मानव जातीचा उद्धार, कल्याण व सर्वांचे मंगल व्हावे हा उद्देश आहे. त्यामुळे जगातील सर्व जाती धर्माचे लोक गेल्या ५४ वर्षांपासून विपश्यना साधनेचा लाभ घेत आहेत...  
 
द्वेष, क्रोध, भीती, आसक्ती, मोह, सूडाची भावना व ताण- तणाव दूर करण्याकरिता व मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता लाखो लोकांना या साधनेचा फायदा झाला आहे.  मानवाची दुःखातून संपूर्ण मुक्ती हा या साधनेचा उच्च अध्यात्मिक हेतू आहे...

अत्त दिप भव:  अर्थात स्वतःचे मार्गदर्शक स्वतःच बना, असे भगवान गौतम बुद्धांनी प्रतिपादन केलेले आहे. स्वत: अनुभूती घ्या व स्वत:ला अनुभव आला तरच विश्वास ठेवा... भगवान गौतम बुद्धांचा हा दृष्टीकोन अतिशय शास्रीय आहे...

 विपश्यना साधनेमुळे जीवन जगण्याच्या कले बरोबर मरण मरण्याची कला सूद्धा अवगत होते... नियमित विपश्यना करणारा साधक मरणाला सहजपणे सामोरा जातो... मूर्च्छित अवस्थेत साधकाचे प्राणोत्करण होत नाही...
 
एकटेपणात वृद्धापकाळात अगदी अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देणारा... आत्मविश्वास व समाधान देणारा... तुमचे कल्याण करणारा... विपश्यना हा राजमार्ग आहे.

 चला... आपण या प्राचीन भारतीय विद्येच्या साह्याने आपल्या मनाचे व शरीराचे व्यवस्थापन करूया...  या विद्येचा लाभ घेऊन ताणतणाव मुक्त, आनंदी, समाधानी आणि निरामय जीवन जगू या.

मंगल हो...

सतीश जाधव...
माहिती संकलित

11 comments:

  1. खुपच उपयोगी माहिती.👌👌🙏

    ReplyDelete
  2. अतिशय छान जाधव साहेब.... आपण आपल्या चांगल्या अनुभवातून दुसऱ्याला उदयुक्त करीत असता ही खूप मोलाची गोष्ट आहे...keep it up

    ReplyDelete
  3. वि-पश्यना ह्याची माहिती विस्तृत होईल ती सारांशामधे परंतु संपूर्ण मिळाली… याहून जास्त अनूभूतीच असणार. धन्यवाद !

    ReplyDelete
  4. मंगल हो 🙏🏻

    ReplyDelete
  5. मित्र काशिनाथ चे अभिप्राय...
    अतिशय समर्पक, सोप्या, ओघवत्या भाषेत, या विद्देच्या सर्व मूळ तत्वांची अगदी संगतवार मांडणी केलीयस, सतीश. खूप उपयुक्त, पथदर्शक…

    गोयंका गुरूजींचे, दुःखी, कष्टी जीवांवर अनंत उपकार आहेत. त्यांची या विद्देप्रती निष्ठा, त्यांची अमोघ वाणी, सखोल ज्ञान हे सार मन कायमस्वरूपी भारावून टाकत आणि त्यांच्या प्रवचनातून निर्मळ जीवन जगण्याची अखंड प्रेरणा मिळत राहते. त्यांच्या उपकारांची परत फेड व गुरूदक्षिणा म्हणजे ती विद्या आत्मसात करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे ही होय.

    मंगल हो🙏😊🙏

    ReplyDelete
  6. Replies
    1. ही साधना जरूर करा

      Delete
  7. प्रत्येकाने अनुभव घ्यावा हिच इच्छा आहे...

    ReplyDelete
  8. मला विपश्यना करायची आहे

    ReplyDelete
  9. Thanku so much Satish Sir!!! U have given very important info...I was inspired by you and wanted to take experience ..and with your blessings will be attending 27 mar 24 batch..this will be my first experience and confident that will be able to complete it.tgankd for motivation.to know myself ,to be with my self will be the best experience i hope so 🙏

    ReplyDelete