Showing posts with label विपश्यना. Show all posts
Showing posts with label विपश्यना. Show all posts

Sunday, July 16, 2023

*विपश्यना "मरण मरण्याची कला"*

 *विपश्यना "मरण मरण्याची कला"*
 
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव नियंत्रण तसेच मानसिक व शारीरिक आजारांच्या नियंत्रणाकरिता योगासन आणि नियमित व्यायामाबरोबरच ध्यानधारणेची नितांत आवश्यकता आहे. 

या धावपळीच्या जीवनातील ताणतणाव, चिंता, दुःख यापासून मुक्ती मिळवून देणाऱ्या; शरीर व  मन निरोगी ठेवणार्‍या; सुख, मन:शांती, समाधान आणि आनंदाचा मार्ग दाखविणाऱ्या विपश्यना ध्यानधारणेचं अनन्यसाधारण महत्त्व  आहे. 

प्राचीन भारतीय परंपरेतील ऋषी हे शास्त्रज्ञ होते.  निसर्ग नियमाप्रमाणे कसे जगावे, अंतर्मन कसे निर्मळ करावे  याबाबत विपश्यना साधनेची आदर्श पद्धती त्यांनी विकसित केली होती. प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात विपश्यनेचा उल्लेख आहे.

ऋषी मुनींनी विपश्यना ध्यान धारणेद्वारा मन निर्मळ करून समतोल मनाने उच्च अध्यात्मिक प्रगती साध्य केली होती. परंतु  ही विपश्यना विद्या काळाच्या ओघात भारतातून लुप्त झाली. 

भगवान गौतम बुद्धांनी सुमारे २५०० वर्षापूर्वी या विद्येचे पुनर्संशोधन केले. या विद्येद्वारे त्यांना वयाच्या ३५ व्या वर्षी निर्वाण अवस्था प्राप्त झाली.  मानव जातीच्या कल्याणाकरिता त्यांनी पुढील  ४५ वर्ष विपश्यना साधनेचा भारतात व भारताबाहेर  प्रसार, प्रचार केला. भगवान गौतम बुद्धांनी  विपश्यना ध्यानधारणेद्वारा संपूर्ण मनुष्य जातीचे कल्याण केले आहे. विपश्यना ध्यानधारणा लोककल्याणाचा जीवनदायिनी व मुक्तिदायीनी राजमार्ग आहे.

 भगवान गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५०० वर्षे ही विद्या संपूर्ण भारतभर मानवाच्या उत्थानाचे अखंड कार्य करीत राहिली. परंतु त्यानंतर मात्र ही विद्या भारतातून समुळ नष्ट झाली.  परंतु विपश्यना साधना गुरू-शिष्य परंपरेने ब्रह्मदेशात तिच्या मूळ स्वरूपात जतन करून ठेवण्यात आली होती.

ब्रह्मदेशात स्थायिक झालेले मूळ भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. सत्यनारायणजी गोयंका यांना या अद्भुत विद्येचा लाभ मिळाला.  ही विद्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, तसेच भारतातून लुप्त झालेली ही विद्या पुन्हा भारतात यावी अशी प्रेरणा त्यांना गुरूवर्य श्री ऊ बा खिन यांच्यामुळे मिळाली. 

श्री गोयंकाजींनी भारतात येऊन १९६९ पासून लहान लहान शिबिरांमधून जास्तीत जास्त लोकांना या विद्येचा लाभ देण्याचे कार्य सुरू केले. १९७६ मध्ये आचार्य गोयंकाजी यांनी  भारतात पहिले विपश्यना केंद्र नाशिक मधील इगतपुरी येथे सुरू केले. 
 
मानवाचा उद्धार करणारी जीवनदायिनी व मुक्तिदायिनी विद्या भारतात आणून व तिचा प्रचार, प्रसार  सर्व जगात करून श्री गोयंका यांनी मानव जातीवर फार मोठे उपकार केले आहेत. मानव जातीच्या कल्याणाकरिता त्यांनी ही साधना भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली आहे...
आजमितीस भारतात १०५ पेक्षा जास्त विपश्यना साधना प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यात महाराष्ट्रातील ३४ केंद्रांचा समावेश आहे.  जगाच्या पाठीवरील २५५ पेक्षा जास्त विपश्यना केंद्राद्वारे जीवनात मूलभूत परिवर्तन करणाऱ्या या विद्येचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत अव्याहतपणे पोहोचविण्याचे काम सुरू आहे. 
  
विपश्यना साधनेचा उद्देश:

प्रत्येक व्यक्ती ताणतणाव विरहित जीवन जगू इच्छितो. परंतु  आपले मन ताब्यात नसल्यामुळे तसेच मनात आसक्ती, द्वेष, क्रोध, मोह असल्यामुळे; सुखी, समाधानी आणि निरामय जीवन जगणे कठीण होते...

आपले मन आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे आपले मन निर्मळ असणे... त्यासाठी  मन एकाग्र करणे ही पहिली पायरी आहे... आपले मन ताब्यात असल्यास आपण नक्कीच शांततामय जीवन जगू शकतो.  विपश्यना साधनेद्वारे मन ताब्यात येऊन निर्विचार आणि निर्विकार होऊन क्रोध, आसक्ती, मोहापासून विमुक्त होते.

विपश्यना म्हणजे विशेष रूपाने पाहणे.  या ध्यानधारणा पद्धती मध्ये स्वभाविक श्वासाचे सजग तटस्थ मनाने सतत निरीक्षण करणे व त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या सूक्ष्म मनाने शरीरातील प्रत्येक अवयवातील संवेदनांचे (स्थूल व सूक्ष्म) क्रमवार निरीक्षण करत राहणे व त्याचवेळी संवेदनांची अनित्यता, नश्वरता व भंगुरता यांची सतत जाणीव ठेवणे.  ही आहे विपश्यना साधना...

ही साधना साधकांना दहा दिवसीच्या शिबिराद्वारे शिकविली जाते. या प्रशिक्षणाकरिता राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था केली जाते. याकरिता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. साधकांनी दिलेल्या ऐच्छिक  दानातून शिबिरांची पुढील सत्रे आयोजित केली जातात. या प्रशिक्षणाकरिता नेमण्यात आलेले आचार्य देखील कोणतेही मानधन स्वीकारीत नाहीत. सेवा भावनेने ही साधना शिकविली जाते.

सकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत हे प्रशिक्षण चालविले जाते. या साधने दरम्यान १० दिवस आर्यमौन ठेवावे लागते. हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, नशा न करणे, ब्रह्मचर्यपालन हे पंचशील पालन करावे लागते.  या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी दोन महिने अगोदर ऑन लाईन बुकिंग करणे आवश्यक आहे...

प्रशिक्षणातील महत्त्वाचा भाग:

बहुतांश ध्यानधारणा पद्धती मध्ये मनाची एकाग्रता वाढविणे यावर भर दिलेला असतो. परंतु विपश्यना ध्यानधारणा पद्धतीमध्ये स्वाभाविक श्वासाचे निरीक्षण करता करता करता मनाची एकाग्रता वाढविणे व भटकणारे मन;  विचार व आठवणी यापासून परावृत्त करून शरीरातील संवेदनांची अनित्यता, नश्वरता व भंगुरता यांची सतत जाणीव ठेवणे आणि विकार विमुक्त ( क्रोध आणि लोभ विरहित ) निरामय जीवन जगणे हे शिकता येते... 

अंतर्मन निर्मळ व स्वच्छ करणे हा या कलेचा मुख्य उद्देश आहे. या क्रियेत क्रोध आणि आसक्ती हे मनाचे प्रमुख विकार व इतर सर्व प्रकारचे विकार हळूहळू दूर होत जातात. मन निर्मळ व स्वच्छ होऊन आपल्या ताब्यात येते. मानसिक आणि शारीरिक आजार व दुःख दूर होत जातात. मानवी मनात शांतता, स्थिरता व समाधान प्राप्ती होते...

विपश्यना एक शास्त्र:

स्थूलमानाने मनात चार प्रकारच्या प्रक्रिया घडतात 

जाणीव (विज्ञान) (Consciousness)- हा भाग  माहिती गोळा करणे व तिची नोंद करण्याचे काम करतो. परंतु त्याला कुठलीही लेबल देत नाही. 

आकलन (संज्ञा) (Perception)- जाणिवेने गोळा केलेल्या नोंदीची छाननी करून वर्गीकरण करून त्यांना योग्य ते लेबल लावणे. नोंदीचे योग्य-अयोग्य अनुकूल-प्रतिकूल असे मूल्यांकन येथे होते.

संवेदना (वेदना)(Sensation)-मिळालेल्या माहितीचे मूल्यांकन झाले की संवेदना सुखदायक किंवा दुःखदायक आहेत हे या भागाकडून ओळखले जाते.

प्रतिक्रिया (संस्कार) (Reaction)  जेंव्हा संवेदना सुखकारक असतात, तेंव्हा त्या अधिक हव्याशा वाटतात आणि दुःखकारक असतात, तेंव्हा त्या नकोशा वाटतात. अशाप्रकारे मन आसक्तीच्या व द्वेषाच्या प्रतिक्रिया करत असते, जे संस्कार बनविण्यास कारणीभूत असते.

उदाहरणार्थ आपल्या कानावर संगीत पडले तर पहिला भाग आपल्याला त्याची जाणीव करून देतो. दुसरा भाग ते आपल्या पूर्वीच्या अनुभवावर पडताळून पाहतो म्हणजे आकलन होते व ते आपल्याला आवडणारे गीत आहे असा ध्वनित अर्थ काढतो व पुढच्या क्षणी आपले मन सुखद संवेदनाच्या जाणीवेने भरून जाते हे तिसऱ्या भागाच्या कामामुळे घडते... व ते संगीत पुन्हा पुन्हा ऐकावे अशी इच्छा चौथ्या भागात निर्माण होते. ही  प्रतिक्रिया असते.

मन निर्मळ करण्याकरिता मनाच्या तिसऱ्या भागाचा अर्थात संवेदनांचे तटस्थ भावनेने पाहणे होय... प्रत्येक गोष्ट अनित्य / भंगुर /अशाश्वत समजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तटस्थपणे निरीक्षण करणे आवश्यक असते. ह्या प्रतिक्रिया नवीन संस्कार बनविण्याचे कार्य करीत असतात. तटस्थ भावनेने निरीक्षण केल्याने नवीन संस्कार निर्माण होऊ शकत नाहीत व जुने संस्कार ध्यानधारणेच्या नियमित तटस्थ साधनेमुळे हळूहळू नष्ट होत जातात व मन शुद्ध होत जाते. 

स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. परंतु ही साधना नियमितपणे केल्यास स्वभावात नक्की परिवर्तन येऊ शकते हा अनेक साधकांचा अनुभव आहे.

फायदे:

विपश्यना ही अंतर्मनात परिवर्तन करणारी भारतीय पुरातन साधना असून हजारो वर्ष ऋषी, मुनी, साधू, संत यांनी ही साधना निरामय जीवन जगण्यासाठी उपयोगात आणली असून या साधनेद्वारे अध्यात्मिक उंची गाठली आहे. 

विपश्यना साधनेचा नियमित सराव केल्यास त्याचे खूप चांगले व सकारात्मक परिणाम दिसून येतात. या धकाधकीच्या व ताण-तणावाच्या जीवनात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकविण्याकरिता मनाची शांतता व समाधान प्राप्त करण्याकरिता विपश्यना साधना अत्यंत उपयुक्त आहे. त्याबरोबर ही जीवन जगण्याची एक कला असून आध्यात्मिक उंची गाठण्याचा एक राजमार्ग आहे... त्यामुळे  सुख व समाधानी जीवनात उत्तरोत्तर वाढच होत जाते..

मानवी बाह्यमन व अंतर्मनात सतत संघर्ष चालू असतो. त्यामुळे निर्णय प्रक्रिया जलद होत नाही व ताण तणाव निर्माण होतो. विपश्यना साधनेचे प्रशिक्षण पूर्ण करून या साधनेचा नियमित सराव केल्यास मनाची शक्ती एकत्र होते. निर्णय प्रक्रिया जलद होते. मन निर्मळ झाल्यामुळे कुठलाही संशय/संदेह मनात राहत नाही.

ह्या साधने द्वारे आपले मन नेहमीच सजग व वर्तमानात असल्यामुळे आपल्याला मानसिक आजारांपासून दुर ठेवते. आपण नियमितपणे ही साधना केल्यास मनोविकारापासून निर्माण होणारे सर्व आजार तसेच  मुख्यत्वे रक्तदाब, शुगर, हृदय विकार, कॅन्सर मायग्रेन, अर्धांगवायू, ब्रेनस्ट्रोक यासारखे गंभीर आजारांपासून दूर ठेवतो..

विपश्यना साधना  सखा, मित्र, सोबती म्हणून आयुष्याच्या अंतापर्यंत आपल्याला साथ देते. विपश्यना साधनेचा नियमित सराव केल्यास आसक्ति, क्रोध मोह, द्वेष, नकारात्मकता, हव्यास, आळस हे मनाचे दोष (विकार) कमी होत जातात...  सुख, आनंद, मनशांती, सद्भावना, करुणा, मैत्री भावना, सकारात्मकता, उत्साह हे गुण वाढीस लागतात.  मनाचे व शरीराचे व्यवस्थापन करून तुम्हाला सुखी व समाधानी बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही विपश्यना साधना आहे. 

माणसाच्या जीवनात व अंतर्मनात परिवर्तन करू शकणारी अशी ही विद्या आहे.  नियमित साधना करून कित्येक लोकांनी त्यांच्या शारीरिक व मानसिक व्याधींपासून मुक्तता मिळविली आहे. त्याचबरोबर  ताणतणाव मुक्त आनंदी व समाधानी जीवन जगत आहेत. 

 आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी सुरू केलेल्या व जगाच्या पाठीवर सर्वत्र प्रसार झालेल्या विपश्यना साधनेत केवळ मानव जातीचा उद्धार, कल्याण व सर्वांचे मंगल व्हावे हा उद्देश आहे. त्यामुळे जगातील सर्व जाती धर्माचे लोक गेल्या ५४ वर्षांपासून विपश्यना साधनेचा लाभ घेत आहेत...  
 
द्वेष, क्रोध, भीती, आसक्ती, मोह, सूडाची भावना व ताण- तणाव दूर करण्याकरिता व मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता लाखो लोकांना या साधनेचा फायदा झाला आहे.  मानवाची दुःखातून संपूर्ण मुक्ती हा या साधनेचा उच्च अध्यात्मिक हेतू आहे...

अत्त दिप भव:  अर्थात स्वतःचे मार्गदर्शक स्वतःच बना, असे भगवान गौतम बुद्धांनी प्रतिपादन केलेले आहे. स्वत: अनुभूती घ्या व स्वत:ला अनुभव आला तरच विश्वास ठेवा... भगवान गौतम बुद्धांचा हा दृष्टीकोन अतिशय शास्रीय आहे...

 विपश्यना साधनेमुळे जीवन जगण्याच्या कले बरोबर मरण मरण्याची कला सूद्धा अवगत होते... नियमित विपश्यना करणारा साधक मरणाला सहजपणे सामोरा जातो... मूर्च्छित अवस्थेत साधकाचे प्राणोत्करण होत नाही...
 
एकटेपणात वृद्धापकाळात अगदी अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देणारा... आत्मविश्वास व समाधान देणारा... तुमचे कल्याण करणारा... विपश्यना हा राजमार्ग आहे.

 चला... आपण या प्राचीन भारतीय विद्येच्या साह्याने आपल्या मनाचे व शरीराचे व्यवस्थापन करूया...  या विद्येचा लाभ घेऊन ताणतणाव मुक्त, आनंदी, समाधानी आणि निरामय जीवन जगू या.

मंगल हो...

सतीश जाधव...
माहिती संकलित

Friday, October 16, 2020

सत्तीपट्टान विपश्यना

सत्तीपट्टान विपश्यना  

दि. ०२.०४.२०१९ ते १०.०४.२०१९

सतिपट्टान म्हणजे विपश्यनेचा सूक्ष्म अभ्यास. हा अभ्यास करण्याचा योग वरील कालावधीत धम्मगिरी, इगतपुरी येथे आला. हा अभ्यास करण्यासाठी दहा दिवस विपश्यनेचे पाच कोर्स करणे आणि एक वेळ दहा दिवस धम्म सेवक म्हणून सेवा देणे अनिवार्य आहे.


सति म्हणजे सजगता, जागरूकता  आणि
पट्टान म्हणजे प्रतिष्ठापन...

म्हणजेच "जागरूकतेचे प्रतिष्ठापन" याचा अर्थ आपण करत असलेल्या कर्माप्रती सतत सजग असणे...

विपश्यनेची चार स्मृती प्रस्थानें आहेत. त्याचा अभ्यास सतिपट्टानाच्या अनुषंगाने करता येतो.

कायानुपश्यना .... शरीराच्या अंगाने

वेदनानुपश्यना..... संवेदनांच्या अनुषंगाने

चित्तानुपश्यना ......  मनाच्या अनुषंगाने
आणि
धम्मानुपश्यना ..... धर्माच्या म्हणजेच निसर्ग नियमांच्या अनुषंगाने

विपश्यनेच्या या सूक्ष्म अभ्यासात,  आपल्याला, स्वतः बद्दलच्या जागरूकतेला अंतिम सीमेपर्यंत प्रतिष्ठापित करण्याचे काम करता येते. त्यामुळे आपल्या संबंधीचे (शरीर आणि मन) सर्व सत्य प्रकाशात येते. ते सुद्धा स्वतःच्या अनुभूतीने;  हे सर्व सत्य आपल्या साडेतीन हाताच्या कायेमध्ये प्रत्यक्ष ज्ञानाने प्रकट होते.

विपश्यना म्हणजे स्वतःला विशेष रीतीने पाहणे. याची सुरुवात  "आनापान" द्वारे होते. नाकपुड्यातून आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मन एकाग्र होते. त्या नंतर ह्या एकाग्र झालेल्या मनाला नाकपुड्याच्या खाली तसेच वरील ओठाच्या वर होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष देण्याची कामगिरी दिली जाते. हा अभ्यास सतत तीन दिवस केल्यावर चौथ्या दिवशी विपश्यना दिली जाते.

आनापानाची पुढील पायरी विपश्यना आहे. यामध्ये सूक्ष्म झालेले मन टाळूवर, ब्रम्हरंघ्रावर नेऊन तेथे होणाऱ्या संवेदना मनचक्षुने पहायच्या असतात. त्यानंतर मन संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवावर नेऊन तेथील संवेदना समता भावाने, स्थितप्रज्ञतेने पहायच्या.  सुखद किंवा दुःखद संवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. याद्वारे शरीरात आणि मनात चाललेल्या घडामोडींची अनुभूती होते. ही झाली विपश्यना साधनेची व्यवहार्य बाजू.

विपश्यना एक विद्या आहे, जिच्या नियमित साधनेमुळे आपण शांतीचे निरामय जीवन जगू शकतो.

अडीच हजार वर्षांपूर्वी "सिद्धार्थ गौतम" याने या विद्येचे पुनरुज्जीवन केले आणि विपश्यना साधना करून वयाच्या ३५ व्या वर्षी निर्वाण (अरहत) अवस्था प्राप्त केली. जन्म मरणाच्या भवचक्रातून तो मुक्त झाला, सम्यक संबुद्ध झाला. ही विद्या त्याने पुढील ४५ वर्ष सर्व मानव समाजाला वाटली. या कालावधीत हजारोनी निर्वाण अवस्था प्राप्त केली, तर करोडो गृहस्थाश्रमी आणि भिक्षुक, आसक्तीमुक्त आणि क्रोधमुक्त अवस्था प्राप्त करून सुखशांतीचे जीवन जगू लागले. ह्या विद्येचा प्रसार प्रचार भारतासह कंबोडिया, थायलंड, लाओस, श्रीलंका, ब्रम्हदेश या पूर्वेकडील देशात सुद्धा झाला.

त्या पुढील ५०० वर्षानंतर ही विद्या भारतातून लुप्त झाली. ब्रह्मदेशात हीच विद्या गुरुशिष्य परंपरेने तिच्या मूळ आणि शुद्ध रुपात टिकून राहिली. ही विद्या भारतात १९६९ साली पुन्हा श्री. सत्यनारायणजी गोयंका यांनी आणली आणि आता तिचा प्रचार प्रसार भारतात आणि भारताबाहेर सुद्धा होत आहे.

विपश्यनेचे पाहिले निवासी केंद्र इगतपुरी येथे १९७६ साली बांधले गेले. आता भारतात आणि जगभरात मिळून एकूण १८५ विपश्यना केंद्र आहेत. लाखो व्यक्तींनी विपश्यनेचा अभ्यास, साधना करून आपले जीवन सुख, शांतीमय केले आहे.

आपल्या जीवनात येणाऱ्या जवळपास ९९ टक्के व्याधी, आजार मनोविकारामुळे (सायको सोमॅटीक आजार) निर्माण होतात. डायबिटीज, रक्तदाब, मायग्रेन, हृदयविकार, अर्धांगवायू, ब्रेन हामरेज इत्यादी सर्व आजार मानसिक ताणतणावामुळे निर्माण होतात. जीवनात ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण आसक्ती आणि क्रोध हे आहे. आसक्ती आणि क्रोध हे दोन्ही रिपू बाहेरील गोष्टीवर अवलंबून नसून ते आपल्या मनातच असतात; यांची जाणीव विपश्यना साधनेमुळे होते. त्यामुळे विपश्यना साधनेद्वारे आसक्ती आणि क्रोध या पासून मुक्तता मिळविता येते आणि जीवनात सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होते.

स्त्री असो किंवा पुरुष, धनवान असो की गरीब, हिंदू असो की मुस्लीम किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही प्रांताचा असो की कोणत्याही देशाचा असो; प्रत्येकाला सुख समाधान आणि शांती हवी असते. हे सार्वजनिन त्रिकालाबाधित सत्य आहे.

प्रत्येकाला रात्रीची निवांत झोप हवी असते. पण असे घडते का? याचे मूळ कारण आहे, मानसिक अशांतता आणि ताणतणाव; तसेच आसक्ती आणि क्रोध.   विपश्यना जीवनात निर्माण होणाऱ्या दुःखातून बाहेर पडण्याची कला शिकवते. त्यामुळे आपण तर सुखी होतोच असेच  आपले कुटुंब, समाज, देश आणि सारे विश्व सुखी होते.

विपश्यना " बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हाच संदेश सर्व विश्वाला देते. निसर्ग नियमांचे पालन आपल्या जीवनात कसे करायचे याचे प्रशिक्षण देते. धर्माचे पालन करणे म्हणजेच निसर्गाचे नियम आपल्या जीवनात उतरविणे. या निसर्ग नियमाच्या विपरीत वागला की ताणतणावाचे दुःख होते तर अनुरूप वागण्यामुळे शांतीचे सुख मिळते.

विपश्यना जीवन जगण्याची कला तर शिकवतेच तसेच मरणाला सुद्धा कसे सामोरे जावे ही मरण मरण्याची कला सुद्धा शिकविते.


मंगल हो !

*सतीश विष्णू जाधव*

Monday, July 13, 2020

विपश्यना (भाग तीन)

१३.०७.२०२० 

धर्म, निसर्गाचे नियम आणि विपश्यना.



विपश्यना, म्हणजे जे जसे आहे, तसे त्याला पाहणे.

 विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन ध्यानपद्धतींपैकी एक आहे. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी तिचे पुनरुज्जीवन केले.

या विद्येद्वारे  जीवन जगण्याची कला शिकता येते. 

 या ध्यानपद्धतीचे प्रमुख लक्ष्य  मानसिक अशुद्धता पूर्णपणे काढून टाकणे आणि मुक्तीचा सर्वोच्च आनंद मिळवणे हे आहे. 

विपश्यना ही आत्म-निरीक्षणाद्वारे स्व-परिवर्तन करण्याचा एक मार्ग आहे. याद्वारे मन आणि शरीरामध्ये असलेल्या खोल आंतरिक संबंधावर लक्ष केंद्रित करता येते.

शरीरामध्ये चेतना निर्माण करणाऱ्या भौतिक, शारीरिक संवेदनांवर शिस्तीने लक्ष देऊन विपश्यना अनुभविली जाऊ शकते. स्थितप्रज्ञ राहून स्वनिरीक्षणद्वारे करायचा हा  मनाचा प्रवास आहे. याद्वारे मानसिक अशुद्धता नाहीशी होते व मन प्रेम आणि करुणायुक्त स्थितीमध्ये परिवर्तित होते.

आपले विचार, भावना, निर्णय आणि संवेदना ह्या निसर्ग नियमानुसार चालतात हे स्पष्ट होऊ लागते. प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला समजते की, विकार कसे उत्पन्न होतात, बंधने/गाठी कशा बांधल्या  जातात आणि त्यापासून कशी मुक्तता मिळू शकते. जागृतता, भ्रांतीमुक्तता, स्व-नियंत्रण आणि शांतता हे जीवनाचे गुणधर्म बनून जातात.

ही संपूर्ण प्रक्रिया वस्तुत: मनाचा व्यायाम आहे. शरीराच्या व्यायामातून जसे आपण शरीराला सुदृढ ठेवतो, तसेच सुदृढ मन विकसित करण्यासाठी विपश्यनेचा उपयोग होतो.

विपश्यना साधनेचा अभ्यास करताना निसर्गाचे नियम काय आहेत याची जाणीव होते. यालाच धर्म म्हटले आहे. (स्वभावधर्म किंवा गुणधर्म).

मानवास होणारे सुख किंवा दुःख याची निर्मिती आणि त्याचे निराकरण याचा मार्ग विपश्यना साधनेद्वारे अवगत होतो.

 सृष्टीतील प्रत्येक गोष्ट  नित्य परिवर्तनशील आहे, अनित्य आहे. तर  जी नैसर्गिक तत्वे आहेत त्यावर या जगाचे रहाटगाडगे चालल आहे. 

निसर्गातील दृष्य ,अदृश्य सर्व गोष्टी ह्या नैसर्गिक तत्वाने बांधील आहेत आणि मनुष्यप्राणी सुद्धा या नैसर्गिक तत्त्वांचा भाग  असल्यामुळे ही तत्वे  समजून घेऊन जर आपण  आपले आयुष्य जगलो तर आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. 

 विपश्यनेचा अभ्यास करताना  "धर्म"  बाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात येते.

  धर्म म्हणजेच "निसर्गाचे नियम" (विधिका विधान) होय. ते त्रिकालाबाधित आहेत आणि चिरंतन सत्य आहे.

विपश्यनेचा दररोज सराव केल्यावर आपले मन विकार-रहित होते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या प्रकृतीवर तसेच  कार्यक्षमतेवरही होतो.

हे निसर्गाचे नियम सर्वांना सारखेच लागू आहेत.  राजा आहे की रंक, गरीब अथवा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही संप्रदायाचा असो, भारतीय असो की परदेशी, काळा असो की गोरा, या सर्वांवर निसर्ग नियमांची सारखीच हुकूमत आहे.

मग काय आहेत निसर्गाचे नियम, काय आहे धर्म...

धर्म म्हणजे गुणधर्म, स्वभावधर्म...

आगीचा धर्म काय आहे ?....

जळणे आणि जाळणे....

या आगी पासून आपण अन्न शिजवू शकतो किंवा एखाद्याचे घर पण जाळू शकतो. 

आग तिचा धर्म सोडणार नाही.


झाडाचा धर्म काय आहे....

फुले देणे, फळे देणे, शीतलता देणे...

मग त्या झाडाखाली चोर येवो की साव येवो, डाकू येवो की सज्जन येवो; झाड  अव्याहतपणे सर्वांना फुले, फळे आणि शीतलता देण्याचे कार्य करीतच राहते.

झाड त्याचा धर्म सोडत नाही.

माणसाच्या जीवनात हेच निसर्गाचे नियम  कार्यरत आहेत...

क्रिया तशी प्रतिक्रिया....

पेराल तसे उगवेल...

जर आपण एखाद्याला प्रेमाने हसून नमस्कार केला तर त्याची प्रतिक्रिया सुद्धा तशीच असणार आहे, तो सुद्धा तुम्हाला प्रेमाने नमस्कार करील. एखाद्यावर आपण रागावलो तर, तो सुद्धा आपला राग करील. 

विपश्यनेद्वारे ह्या निसर्गाच्या त्रिकालाबाधित सत्याची आपल्याला अनुभूती होते. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे आपण स्थितप्रज्ञ दृष्टीने, साक्षीभावाने पाहू शकतो. 

आपण लिंबाचे बीज लावले तर त्याच्या झाडाला आंबे येतील काय?  बिलकुल नाही.

त्यामुळे कसले बीज पेरायचे हे आपण ठरवू शकतो.

"शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी"

हा तुकाराम गाथेतील श्लोक हाच निसर्ग नियम सांगतोय.

निसर्गाचे नियम कळले की ते जीवनात उतरविण्याचे काम विपश्यनेच्या अध्ययनाद्वारे करता येते. याच्या चिरंतन अभ्यासाने, अध्ययनाने स्वतःचे जीवन सुखमय, शांतीमय आणि निरामय करता येते.

त्यातून मिळणारा आनंद हा चिरंतन असतो.

 विपश्यना हे जीवनात सुख-शांती प्राप्त करण्यासाठी एक प्रभावशाली तंत्र आहे.


सतीश विष्णू जाधव

Sunday, July 12, 2020

विपश्यना (भाग एक)

विपश्यना 

विपश्यना म्हणजे स्वतःला विशेष रीतीने पाहणे. 

विपश्यना ध्यानाची सुरुवात  "आनापान" द्वारे होते. नाकपुड्यातून आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मन एकाग्र होते. त्या नंतर ह्या एकाग्र झालेल्या मनाला नाकपुड्याच्या खाली तसेच वरील ओठाच्या वर होणाऱ्या सवेदनांकडे लक्ष देण्याची कामगिरी दिली जाते. हा अभ्यास सतत तीन दिवस केल्यावर चौथ्या दिवशी विपश्यना दिली जाते. 

आनापानाची पुढील पायरी विपश्यना आहे. या मध्ये सूक्ष्म झालेले मन टाळूवर, ब्रम्हरंघ्रावर नेऊन तेथे होणाऱ्या संवेदना मनचक्षुने पहायच्या असतात. त्यानंतर मन संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवावर नेऊन तेथील संवेदना समता भावाने, स्थितप्रज्ञतेने पहायच्या.  सुखद किंवा दुःखद संवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही.  याद्वारे शरीरात आणि मनात चाललेल्या घडामोडींची अनुभूती होते. ही झाली विपश्यना साधनेची व्यवहार्य बाजू.

विपश्यना एक विद्या आहे, जीच्या नियमित साधनेमूळे आपण शांतीचे निरामय जीवन जगू शकतो. 

अडीच हजार वर्षांपूर्वी "सिद्धार्थ गौतम" याने या विद्येचे पुनरुज्जीवन केले आणि विपश्यना साधना करून वयाच्या 35 व्या वर्षी निर्वाण (अरहत) अवस्था प्राप्त केली. जन्म मरणाच्या भवचक्रातून तो मुक्त झाला, सम्यक संबुद्ध झाला. ही विद्या त्याने पुढील 45 वर्ष सर्व मानव समाजाला वाटली. या कालावधीत हजारोनी निर्वाण अवस्था प्राप्त केली, तर करोडो गृहस्थाश्रमी आणि भिक्षुक, आसक्तीमुक्त आणि क्रोधमुक्त अवस्था प्राप्त करून सुखशांतीचे जीवन जगू लागले.  ह्या विद्येचा प्रसार प्रचार कंबोडिया थायलंड  लाओस श्रीलंका ब्रम्हदेश या पूर्वेकडील देशात सुद्धा झाला. 

त्या पुढील 500 वर्षानंतर ही विद्या भारतातून लुप्त झाली. ब्रह्मदेशात हीच विद्या गुरुशिष्य परंपरेने तिच्या मूळ आणि शुद्ध रुपात टिकून राहिली. ही विद्या भारतात 1969 साली पुन्हा श्री सत्यनारायण गोयंका यांनी आणली आणि आता तिचा प्रचार प्रसार भारतात आणि भारताबाहेर सुद्धा होत आहे.

विपश्यनेचे पाहिले निवासी केंद्र इगतपुरी येथे 1976 साली बांधले गेले. आता भारतात आणि जगभरात मिळून एकूण 185 विपश्यना केंद्र आहेत. लाखो व्यक्तींनी विपश्यनेचा अभ्यास, साधना करून आपले जीवन सुख शांतीमय केले आहे.


आपल्या जीवनात येणाऱ्या जवळपास 99 टक्के व्याधी, आजार;  मनोविकारामुळे (सायको सोमॅटीक आजार) निर्माण होतात. डायबिटीज, रक्तदाब, मायग्रेन, हृदयविकार, अर्धांगवायू, ब्रेन हामरेज इत्यादी सर्व आजार मानसिक ताणतणावामुळे निर्माण होतात. जीवनात ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण आसक्ती आणि क्रोध हे आहे. विपश्यना साधनेद्वारे आसक्ती आणि क्रोध या पासून मुक्तता मिळविता येते आणि जीवनात सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होते. 

स्त्री असो किंवा पुरुष, धनवान असो की गरीब, हिंदू असो की मुस्लीम किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही प्रांताचा असो की कोणत्याही देशाचा असो; प्रत्येकाला सुख, समाधान आणि शांती हवी असते. हे सार्वजनिन त्रिकालाबाधित सत्य आहे.

प्रत्येकाला रात्रीची निवांत झोप हवी असते. पण असे घडते का? याचे मूळ कारण आहे, मानसिक अशांतता आणि ताणतणाव; तसेच आसक्ती आणि क्रोध.   विपश्यना, जीवनात निर्माण होणाऱ्या दुःखातून बाहेर पडण्याची कला शिकवते. त्यामुळे आपण तर सुखी होतोच असेच  आपले कुटुंब, समाज, देश आणि सारे विश्व सुखी होते.

 विपश्यना जीवन जगण्याची कला तर शिकवतेच तसेच मरणाला सुद्धा कसे सामोरे जावे ही मरण मरण्याची कला सुद्धा शिकविते.

विपश्यना " बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हाच संदेश सर्व विश्वाला देते. निसर्ग नियमांचे पालन आपल्या जीवनात कसे करायचे याचे प्रशिक्षण देते. धर्माचे पालन करणे म्हणजेच निसर्गाचे नियम आपल्या जीवनात उतरविणे. या निसर्ग नियमाच्या विपरीत वागला की ताणतणावाचे दुःख होते तर अनुरूप वागण्यामुळे शांतीचे, समाधानाचे सुख मिळते.

मंगल हो !

सतीश विष्णू जाधव

विपश्यना (भाग दोन)

कर्म सिद्धांत आणि विपश्यना
(संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग वरून संकलित)


 भगवान गौतम बुद्धांनी या जीवनातील दु:खावर उपाय शोधताना अनेक प्रयोग केले. त्यातून तथागत भगवान बुध्दांना जे ज्ञान झाले त्यात कर्म सिद्धांताला  महत्व आहे. 

भगवान बुद्धांनी याला  'कर्म'  नाव न देता 'संस्कार' (पाली भाषेत 'संखर') असे नाव दिले.
 तथागतांनी  'भवचक्र' ('भव' म्हणजे 'असणे' 'भवचक्र' म्हणजे परत परत जन्म घेणे ) कसे चालते हे सांगताना या संस्कारांची किंवा कर्माची त्यामागे  काय भूमिका असते हे स्पष्ट केले आहे. 
 भगवान बुद्धांचा आग्रह प्रत्यक्ष अनुभूतीवर होता.
 ही अनुभूती मिळविण्यासाठी आणि त्याद्वारे दु:खातून आणि भवचक्रातून सुटका होण्यासाठी बुद्धांनी  विपश्यना (विपस्सना) ध्यानाचा मार्ग सांगितला आहे. विपश्यनेत प्रगती केल्यावर  संस्कार (कर्म) साठविण्याची प्रवृत्ती, तिचा जीवनावर होणारा  परिणाम याची स्पष्ट अनुभूती होते.

विपश्यना ह्या विद्येचे पुनरुज्जीवन भगवान गौतम बुद्धांनी केलं आणि ह्या विद्येच्या मार्गाने जाऊन निर्वाण अवस्था प्राप्त केली.

बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत अगदी सरळ, सोपा आहे.

आपल्या पाच इंद्रियांना आणि मनाला बाह्य गोष्टीचा स्पर्श होतो. उदा, डोळ्याला काहीतरी दिसते, त्वचेला स्पर्श होतो, कानावर आवाज पडतो, जिभेवर चवीची जाणीव होते, नाकाला वास येतो, मनात विचार येतात. आपली  इंद्रिये ही केवळ ती संवेदना ग्रहण करण्याचे काम करतात.

ही संवेदना  मेंदूपर्यंत पोचल्यावर मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि त्या संवेदनेचे विश्लेषण करतो. आपल्या पूर्व-स्मृतीतून अशी संवेदना या पूर्वी कधी झाली होती काय हे आठवतो.


ही आठवण झाल्यावर मेंदूचा दुसरा हिस्सा काम करू लागतो आणि ही पूर्वी संवेदना सुखद होती का दु:खद याची चाचपणी करतो. 

यावेळी पूर्वीचे संस्कार (कर्मे) जागृत होतात आणि वेगाने मनाच्या पृष्ठभागावर येऊ लागतात. हे संस्कार सुखद असतील तर संपूर्ण शरीरावर सुखद तरंग अनुभवास येतात, दु:खद असेल तर दु:खद तरंग अनुभवास येतात. सुखद तरंग सुद्धा काही काळच टिकतात. तसेच सुखद तरंगांच्या इच्छेमुळे परत दु:खच वाट्याला येते.

हे संस्कार शरीरावर प्रकट झाल्यावर आपण अनवधानाने प्रतिक्रिया देतो. हे संस्कार आपल्या अंध प्रतिक्रियेमुळे वृद्धिंगत होतात, त्यांना बळ मिळते आणि ते परत अंतर्मनात खोलवर जातात. पुन्हा संधी मिळताच ते उफाळून वर येतात. परंतु प्रतिक्रिया न दिल्यास त्यांची उर्जा संपते (निर्जरा होते) आणि ते नष्ट होतात.

हे संस्कार देहाच्या (रूपस्कंद) पुढील क्षणाला सतत जन्म देतात आणि आपल्याला देहाचे सातत्यीकरण जाणवते.

माणसाच्या मृत्युच्या क्षणी यातील एखादा संस्कार (इच्छा) डोके वर काढते आणि हे संस्कारांचे (पूर्वसंचीत कर्मांचे ) गाठोडे नवीन  शरीराला (रूपस्कंद) जाऊन चिकटते आणि नवा जन्म मिळतो. यालाच भवचक्र म्हणतात.  हा मृत्युच्या क्षणी जागा झालेला संस्कार आपले पुढील आयुष्य ठरवितो.

विपश्यनेत ध्यानात खोलवर गेल्यावर हे पूर्वसंस्कार जागृत कसे होतात आणि आपण नकळत त्याला प्रतिक्रिया करून त्यांचे सामर्थ्य कसे वाढवितो हे स्पष्ट जाणवते. संस्कार जागृत झाल्यावर त्याला प्रतिक्रिया न करणे आपल्या हातात असते. त्यामुळे पूर्वसंस्कार (कर्मे) निर्जरा होऊन नष्ट होतात आणि मानसिक शांतता अनुभवास येते. 

हा वैयक्तिक अनुभव असल्याने त्याचे सामाजीकरण होऊ शकत नाही.

सुखद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पुण्यकर्म म्हणता येईल तर दु:खद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पापकर्म म्हणता येईल. पुण्यकर्म आणि पापकर्म हे एकमेकांना Cancel करीत नाहीत.

 पुण्यकर्म आणि पापकर्म यांना पांढऱ्या आणि काळ्या दगडांची उपमा देता येईल. माणूस या पुण्यकर्म आणि पापकर्म या दगडांनी भरलेली झोळी घेऊन फिरत असतो. काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही प्रकारच्या दगडांना वजन असते आणि ते नेताना तो माणूस थकून जातो.

विपश्यना ध्यान हे संस्कारांना प्रतिक्रिया न देण्याची प्रक्रिया आहे. त्याचा कोठल्याही देवाशी, परमेश्वराशी संबंध नाही. 

 संस्कार जागृत होतात तेव्हा सावध राहून प्रतिक्रिया न दिल्यास अंतर्मनात दडलेले (अनुशय) संस्कार वेगाने बाह्यमनावर येतात आणि प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची निर्जरा होते.

ज्यावेळी सर्व कर्मसंस्कार शून्य होतात तेव्हा माणूस कैवल्यावस्थेत / मुक्तावस्थेत / निर्वाण अवस्थेत पोहोचतो. 

तसेच कोठलेही काम करताना मनाच्या समतोल अवस्थेत असलो म्हणजेच,  चांगले/वाईट, हर्ष/दु:ख याच्या पलीकडे जाऊन मन समतोल असेल तर नवी कर्मे निर्माण होत नाहीत. 
विपश्यना ध्यानाच्या सहाय्याने अशा समतोल अवस्थेपर्यंत पोचता येते.
कर्माचा अर्थ बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अनुभवातून समजण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. 

विपश्यनेच्या नियमित साधनेद्वारे स्थितप्रज्ञ अवस्थेत पोहचून, आत्मिक समाधान, शांती प्राप्त करता येते.


सतीश विष्णू जाधव