Tuesday, November 28, 2023

१७.११.२३... आगरतळा सायकल सफर... दुसरा दिवस

१७.११.२३...  आगरतळा सायकल सफर...

आगरतळा येथे रात्रभर पाऊस पडत होता... रात्री गारठा वाढला होता... पूर्वेकडच्या प्रांतात पहाटेच उजाडते... ब्रम्हमुहूर्तावर श्री  जगन्नाथाची काकड आरती सुरु झाली...  प्रातर्विधी आटपून ध्यानधारणा झाली... परमेश्वराचे दर्शन घेऊन जाकीट कानटोपी आणि रेनकोट घालून चौकात चहा प्यायला गेलो... पाऊस सुरूच होता...

चहाची नवीन रेसिपी पहायला मिळाली... चहाची पावडर पाण्यात उकळवून घेतली होती. एका ग्लासात दोन चमचे दुधाची पावडर आणि एक चमचा साखर घेऊन त्यात उकळते चहाचे पाणी ओतले... आणि चमच्याने मस्त घुसळले... झाली फक्कड चहा तयार... काही जण काळी चहा पीत होते...

सात वाजता देबाशिश मुजुमदार भेटायला येणार होता...  देबाशिशचा फोन आला... सतत पाऊस सतत पडत असल्याने त्याचे भेटणे पुढे गेले होते.  नंदूची सायकल असेंबल करायची होती. प्रथम प्लॅस्टिक रॅपर फाडून काढले... टॅग कापून सायकलचे  सर्व भाग सुटे केले. छोटा बटू गोविंद वल्लभदास सायकल जोडायला मदत करत होता...

त्यानंतर हक्काने माझ्या मोबाईलवर सुपर सॉनिक कार्टून पाहत होता...

पाऊस पडत असल्यामुळे बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मंदिरातच न्याहरी करायचे ठरविले... न्याहारीला गरमागरम डाळखिचडी मिळाली... पातळ खिचडी बोटांनी खाणे आणि ती अंगावर न सांडणे याला वेगळे कसब लागते... बाजूला बसलेल्या बाबूजीचे खिचडी खाणे पाहिले आणि यातली मेख कळली. तो हाताच्या पंजाने पातळ खिचडी ओरपत होता... यासाठी सराव करावा लागणार होता... म्हणून तूर्तास कागदी पानच तोंडाला लावले आणि खिचडी पिऊन टाकली.. तूपातील खिचडीमूळे मन तृप्त झाले...

नंदुची सायकल जोडून तयार झाली. आता दोन्ही सायकल अप टू डेट झाल्या होत्या. ... लोकल साईट पहायच्या होत्या पण पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. आज संपूर्ण त्रिपुरा पावसात चिंब झाले होते. मंदिरात आलेल्या देवांश बरोबर ओळख झाली. 

त्रिपुरा मधील महत्त्वाच्या स्थळांची माहिती मिळाली... "जवळच असलेला उज्जयंता महाल आणि रविंद्र भवन आठवणीने पाहा" देवांश म्हणाला...

दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला... येथे सर्वजण भात खातात... जेवण वाढण्याची नवीन पद्धत कळली. भातावर प्रथम पालक वाटाण्याची सुकी भाजी आली. ती भाजी आणि भाताचे चार घास खाल्ले... मग वरण वाढले गेले... पण भातावर नाही तर पत्रावळीच्या एका बाजूला... थोडासा डाळ भात खाल्ल्यावर केळीची भजी आली.. मग आली मिक्स भाजी त्यात पनीर पण होते... मग आली फ्लॉवरची भाजी... त्यानंतर आंबटगोड पायसम आणि शेवटी खीर... सर्व जेवणात भात कॉमन होता... हवा तेवढा घ्या... प्रत्येक पदार्थ गरमागरम खाण्यासाठीच ही पद्धती असावी... जेवणाची ही पद्धती विलक्षण भासली... आणि भावली सुद्धा...

अखंड पडत असलेल्या पावसामुळे आज आराम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते...जोरदार थंड वारेसुद्धा वाहत होते... कानटोपी आणि जाकीट घालूनच मच्छरदाणीत  बसलो होतो...

सायंकाळी पुन्हा भोजन प्रसादीचा लाभ घेतला... जेवणासोबत गो मातेचे दूध मिळाले... सात्विक जेवण झाल्यावर सर्वांना फोन करण्याचा आनंद घेतला...

 परममित्र नवनीतला  फोन केला तेव्हा तो भरभरून सांगत होता...  रशिया वरून एक सायकलिस्ट सायकलिंग करत... मुंबईतील वरळी किल्ला पाहायला आला होता.  त्याला घरी घेऊन गेलो आणि त्याचा पाहुणचार केला...रशियन  ॲबीशी  आता जिगरी दोस्ती झाली आहे... या घटनेचा  झालेला आनंद नवनीतच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता...  

मित्र गजानन तर फोनवर तासातासाची खबर घेऊन... हवामान अंदाज आणि आवश्यक माहिती देत होता... मुंबईची बॅक अप टीम  त्रिपुराच्या महत्त्वाच्या बातम्या पुरवत होत्या...

आज सायकलिंग करायला मिळाले नाही म्हणून नंदू थोडा नाराज झाला होता...

आले देवाजीच्या मना... तेथे कोणाचे चालेना...

तुका म्हणे उगेचि राहा... होईल ते सहज पाहा...

शांत रहा... वृत्तीने स्थिर रहा... भगवंताच्या इच्छेने जे जे घडते ते साक्षी रूपाने पाहा.. निष्कारण अस्वस्थ होऊ नका... 

हेच त्या जगन्नाथाला सांगायचे होते काय...

*मंगल हो...*

7 comments:

  1. छान लेख आवडला.....

    ReplyDelete
  2. खूप छान 🚴✌️

    ReplyDelete
  3. खूपचं छान sir...

    ReplyDelete
  4. Good going, enjoy the ride

    ReplyDelete
  5. खुप छान वाटले,तुम्हाला तुमच्या सखी बरोबर भटकंती करताना

    ReplyDelete
  6. सुंदर शब्दरचना. फारच छान

    ReplyDelete
  7. खुप सुंदर वाटले

    ReplyDelete