Saturday, April 10, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस आठवा)देडिया पाडा ते राज पिपाला... हरसिद्धी मंदिर ०५.०१.२०२१

  नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस आठवा)

 देडिया पाडा ते   राज पिपाला...

 हरसिद्धी मंदिर

 ०५.०१.२०२१

पहाटे रामधून ऐकून जाग आली. एक पायी परिक्रमावासी पहाटेच भजन आरती करत होता. लहानपणी गावाची आजी पहाटे पहाटे अशा प्रकारे देवपूजा करायची त्याची आठवण झाली.

मंगल भवन अमंगल हारी...

द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी...

राम सियाराम सियाराम जय जय राम...

भजन तुम करलो परामानंदका ।

मौका मिले न बारंबार ।।

आनंद लेलो रे संतसंग का

मौका मिले न बारंबार

भरम मिट जायेगा तेरे मनका ।।

मौका मिले न बारंबार ।।

गुरू वचनो का पालन कर लो ।

मौका मिले न बारंबार ।।

पायी परिक्रमा करणाऱ्या मूर्ती पहाटे पहाटेच  उठून आन्हिके आटपून पुढील परिक्रमेची सुरुवात करीत होते.

संजय त्यांच्या मुलाखती घेण्यात गर्क झाला होता. पांढरा सदरा-लुंगी अशा पेहरावात पाठीवर नर्मदा मैंय्येची बाटली आणि पूजेच्या सामानाची पिशवी तसेच आवश्यक कपड्यांची पिशवी त्यावर अंथरुणाची वळकटी आणि हातात पाण्याचा डबा  घेऊन, हे परिक्रमावासी रामनामाचा जप करीत मार्गक्रमण करण्याच्या तयारीत होते.

प्रातर्विधी आटपून नर्मदा मय्येची यथासांग पूजा केली. जलराम बाप्पाच्या मंदिरात श्री राम-सीतामाई तसेच गोपाळ कृष्णाचे दर्शन घेतले. महामंडलेश्वर श्री सुरेंद्रनाथजी महाराजांनी बालभोग म्हणून चहा बिस्किटे दिली.

आश्रमाचा परिसर फुलांनी झाडांनी बहरलेला होता. फुलांचा मंद सुगंध आनंद लहरी निर्माण करीत होत्या. वातावरणातील सुखद गारवा उत्साहाच्या वारू वर स्वार होत होता. सुरेंद्रनाथजींचा आशीर्वाद घेऊन सायकलिंग सुरू झाले.

सकाळ सकाळी सायकलिंगचा उत्साह जोमदार होता. या परिक्रमेच वैशिट्य म्हणजे प्रत्येक दिवस पहिला दिवस वाटत होता. "याला" गावाजवळील कर्जन नदीच्या पुलावर डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्या गावकरी महिलांची रांग पुढे पुढे सरकत होती.

पहाटे उठून रानातील वाळकी लाकडे गोळा करून, अतिशय लयबद्ध चालीने त्या महिला लगबगीने लाकूडफाटा डोक्यावर घेऊन घराकडे निघाल्या होत्या. ग्रामीण जीवनाची ही झलक कॅमेराबद्ध करण्याचा मोह आवरला नाही. सकाळच्या कुंद प्रकाशात एक झकास लँड्स्केप डोळ्यांच्या कॅमेऱ्यात समाविष्ट झाले. ढगाआड लपलेला सूर्य सुद्धा अनिमिष नेत्रानी त्या लालनांना न्याहाळत होता. आनंदाचे तरंग मनी उमटले निसर्गाची रूपे न्याहाळताना...

सकाळी नऊ च्या दरम्यान हायवे वरील भोवी गावात पोहोचलो. सपाटून भूक लागली होती. मेथी भजी, आलू भजी आणि चहावर ताव मारला.

येथून एक रस्ता बडोद्याकडे चालला होता. आम्हाला दुसऱ्या रस्त्याने नेतरंग मार्गे  राजपिपाला शहराच्या दिशेने जायचे होते.

थोड्याच वेळात शूलपाणी घाट सुरू झाला. पोट भरले असल्यामुळे आरामात घाटी चढत होतो. मागून एक मोटारसायकल भर्रकन पुढे गेली आणि आचके देत बंद पडली. मोटारसायकलच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात एक मोठा लाकडाचा ओंडका होता. मोटारसायकल रायडर किक मारून मारून दमला... सायकल बाजूला ठेऊन, हळूच पुढे आलो. मोटारसायकलची चावी बंद करून स्पार्क प्लग बाहेर काढला.. एक जोरदार फुक मारली स्पार्क प्लगला आणि पुन्हा इंजिनला लावला. नर्मदे हर... अशी मैय्येला साद घातली आणि रायडरला किक मारायला सांगितले... एका फटक्यात मोटारसायकल सुरू झाली. त्या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य खूप काही देऊन गेले... खरच मैंय्येची लीला अगाध... या आनंदाच्या दुर्मिळ क्षणांचे मोल कशातही करता येणार नाही...

घाटातील "गाडीत" गावात थांबलो. येथे परिक्रमावासीसाठी चहाची व्यवस्था होते. शहापूरचे विनय जोशी यांची भेट झाली.

ते पायी परिक्रमा करीत होते. शास्त्रोक्त पद्धतीने अंशात्मक जन्मकुंडली बनविण्यात ते माहीर  
आहेत. जन्मकुंडली बाबत नवीन माहिती मिळाली. अतिशय काटक शरीरयष्टी परंतु बोलायला एकदम चटपटीत असे जोशी बुवा एकदम भावले.

शेगावच्या गजानन महाराज मठाच्या त्यांनी शहापूर ते शेगाव अशी चालत पाच वाऱ्या केलेल्या आहेत.  तेथूनच त्यांना नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा मिळाली. २०१७ साला पासून मनात असलेल्या  जाज्वल्य इच्छाशक्तीमुुळे परिक्रमा घडून आलेली आहे. आतापर्यंतच्या मैय्याच्या परीक्रमेमध्ये सर्वत्र त्यांना प्रेमभावाची अनुभूती झाली आहे.

"आम्ही निमित्त आहोत, सर्व घडवून आणणारी मैय्या आहे. परिक्रमेत लोकांनी जेवणखाण, चहापाणी हात धरून, बसवून प्रेमाने खाऊ घातले. एव्हढं प्रेम घरात सुद्धा मिळत नाही", जोशी भरभरून बोलत होते.

"माझा अनुभव वाचून मैय्येची परिक्रमा करण्यास कोणी प्रेरित झाला तर नर्मदा मैय्येचे आणखी एक लेकरू जन्माला आले म्हणून, मला खूप आनंद वाटेल" हे जोशी बुवांचे उद्गार  भरावून टाकणारे होते.  मुंबईत आपली पुन्हा भेट घेऊ असे सांगून त्यांचा निरोप घेतला.

आता नर्मदा घाटातून पेडलिंग सुरू होते. जवळच कर्जन नदीवरचा पाणलोट क्षेत्राचा भाग दिसत होता.
तासाभरात राजपिपाला शहराच्या वेशीवर गावरान कवठ फळाच्या गाडीजवळ थांबलो.

गुजरातीमध्ये याला कोठा म्हणतात. सर्दी खोकल्यावर अतिशय उपयुक्त असे हे आंबटगोड फळ नुसतं पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटलं. कवठ फोडून त्यात गूळ तसेच मीठ-मसाला  टाकून आम्ही मिटक्या मारीत "कोठा" खात.. पोटाचा कोठा भरून घेतला.

राजपिपला शहराच्या मध्यभागी असलेल्या  हरसिद्धी माता मंदिराकडे सायकलिंग सुरू झाले. मंदिरात पोहोचताच त्याच्या कार्यालयात सायकलवरचे सामान काढून ठेवले.

 तेथून नर्मदा मैय्येच्या किनारी असलेल्या २० किमी अंतरावरील गोरा गावाजवळील शूलपाणेश्वर मंदिराकडे प्रस्थान केले.

दुपारचे बारा वाजल्यामुळे उन्हाचा चटका जाणवत होता. परंतु सायकलवर समान नसल्यामुळे प्रेडलिंग हलके झाले होते. वाटेत पायी परिक्रमावासी भेटत होते. दिड तासात नवीन शूलपाणी मंदिरात पोहोचलो.

  प्राचीन शूलपाणी मंदिर आता नर्मदा जलाशयाच्या धरण क्षेत्रात पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे हे नवीन मंदिर जवळच्या टेकडीवर बांधले आहे. मंदिरातील गुरुजींनी शूलपाणी महादेवाची कथा सांगितली...
प्राचीन शूलपाणी मंदिराची कथा:-

प्राचीन शूलपाणी मंदिर, नर्मदा जलाशयाच्या पाण्याखाली गेल्यावर पाच वर्षांनी सन १९९२ मध्ये नवीन मंदिर बांधले आहे. प्राचीन मंदिरातील शिवलिंग स्वतः शंकर महादेवाने स्थापन केलेले होते.

इति श्री स्कंध पुराणातील, रेवा खंडात मार्कंडेय स्वामी म्हणतात, " तीर्थामध्ये तीर्थ ज्याला परमतीर्थ म्हणतात जे शूल (पर्वत) दुभंगून निर्माण झाले ते रेवाच्या (नर्मदेच्या) दक्षिण तटावर स्थित आहे ते शूलपाणेश्वर नावाने स्थापित आहे.

येथे एक अलौकिक आणि अद्भुत गोष्ट आहे, ती म्हणजे  शूलपाणी शिवलिंगमध्ये तीन मणी आहेत. हे तीन मणी प्रत्यक्ष स्वयं शंकर महादेवाच्या त्रिशूलचे प्रतीक आहेत. त्यामुळेच या स्थळाचे नाव शूलपाणी आहे.
शूलपाणी आणखी एक अर्थ आहे... शूल म्हणजे कष्ट आणि पाणी म्हणजे निवारण.. कष्टांचे निवारण करणारे शिवशंभो येथे विराजमान आहेत.

 गोरा कॉलनीच्या टेकडीवर नवीन मंदिराची पुनर्स्थापना झाली. परंतु जुन्या मंदिरातील दोन शिवलिंगतील मुख्य शिवलिंग जुन्या मंदिरातून आणता आले नाही. मुख्य आत्मलिंग काढण्यासाठी ९० फुटापर्यंत ड्रिलिंग केले, परंतु संपूर्ण खडक निघाल्यामुळे ते काढता आले नाही. पांडवांनी स्थापित केलेले दुसरे शिवलिंग नवीन मंदिरात आणले आहे.

ब्रह्माजीचा पौत्र (नातू) अंधक याने एका पायावर उभे राहून वायू भक्षण करून एक हजार वर्षे शिवाची घोर तपस्या केली. घनघोर तपस्येमुळे अंधकाच्या मस्तकातून धूर निर्माण होऊ लागला, त्याने संपूर्ण विश्व अंधकारमय झाले.  शिवशंभो प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडे अंधकाने मोक्ष प्राप्ती मागितली. शिव शंभो म्हणाले तुला मोक्ष दिला तर मला ब्रम्ह हत्येच पातक लागेल. तेव्हा अंधकाने क्रोधीत होऊन शिवाशी युद्ध आरंभले. शिवाने त्रिशूलाने त्याचे मस्तक भेदन केले.त्रिशूळाला त्याचे रक्त लागले होते. तेव्हा आकाशवाणी झाली...  नर्मदेच्या दक्षिण तटावर असलेल्या भृगुतूंग  पर्वतावर त्रिशूलाचा प्रहार केल्यावर रक्ताचे डाग नाहीसे होतील आणि ब्रम्हहत्येच्या पातकातून आपण मुक्त व्हाल.

 त्रिशूळाचा त्या पर्वतावर प्रहार करताच सरस्वती गंगेची उत्पत्ती झाली आणि त्रिशूळावरील डाग धुतले गेले आणि तेथे शूलपाणी शिवलिंगाची उत्पत्ती झाली. त्या भृगुतूंग पर्वतावर केलेल्या  त्रिशूळच्या प्रहरामुळे शिवलिंगावर तीन मणी निर्माण झाले आहेत. महादेव शिवशंकराच्या त्रिशूळापासून उत्पन्न झालेले आणि गंगेच्या पाण्याचा जेथे वास आहे, म्हणूनच या मंदिरास शूलपाणेश्वर महादेव म्हणतात.

सरदार सरोवराची उंची वाढविण्यास प्रखर विरोध होण्याचे मुख्य कारण प्राचीन शूलपाणी मंदिर पाण्याखाली जाणार, हे सुद्धा होते.

शूलपाणी मंदीराची कथा ऐकून मन ब्रह्मानंदात लीन झाले....

तेथून गोरा पुलावरून नर्मदा मैयेच्या विशाल जलशयाजवळ आलो. तब्बल तीन दिवसानंतर मैंयेचे दर्शन झाले होते. मैय्येच्या उत्तर तटावर सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य "एकतेचा पुतळा" (Statue Of Unity) दिमाखात उभा होता.

संजयने नर्मदेच्या तटावर स्वतःला झोकून दिले. नर्मदा जलात पाय सोडून निवांत पहुडला होता

 जुना पूल पाण्याखाली गेला होता.

त्याच्या शेजारीच उत्तर तटावर जाण्यासाठी नवीन पूल बांधला आहे.

बराच वेळ नर्मदा तटावर व्यतीत करून, येथून जवळच्या हरीधाम आश्रमात आलो. येथे स्वामी सर्वेश्वरानंद यांचे दर्शन झाले.

परमेश्वराचे भजन, नर्मदा मैय्येचा  सहवासात  तुम्ही यात्रा पूर्ण करा. प्रत्येक स्थळाचा आनंद घ्या आणि झालेली अनुभूती समाजात सर्वांना सांगा.. जेणेकरून नर्मदा परिक्रमा करण्याची आस प्रत्येकाच्या मनात निर्माण करा... असा संदेश स्वामीजींनी दिला.

स्वामीजींचे आशीर्वाद घेऊन मुख्य रस्त्यावर आलो. सडकून भूक लागली होती. वाटेतच बिलोसी गावात व्हिलेज रेस्टॉरंट लागले. तेथे राजस्थानी थाळी जेऊन , राजपिपला शहराकडे सायकलिंग सुरू केले.

राजपिपला वेशीवर एक मिरवणूक निघाली होती. लाकडी घोडा गळ्यात अडकवून स्वार घोड्यासारख्या उड्या मारत होता.

एका बाबाजींच्या गळ्यात बरेच हार घातलेले होते. मिरवणूक शहरातील मंदिरांना भेटी देणार होती.

हरसिद्धी माता मंदिरात पोहोचलो. संध्याकाळच्या मातेच्या आरतीमध्ये सामील झालो. एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दृष्टीस पडली.

या मंदिरात बरेच कोंबडे आणि कोंबड्या मातेला अर्पण केल्या होत्या. एक कोंबडा आरतीच्या ठेक्यावर एका पायावर नाचत होता. तर दुसरा मान डोलावत, सतत आरवत होता. मंदिरातील पवित्र वातावरणाचा परिणाम पक्षीमात्रांवर  होतो याची प्रचिती आली.

मंदिराच्या मोकळ्या जागेत आतापर्यंत दहाबारा परिक्रमवासी आले होते. स्नानादी आटपून मंदिरातील चौथऱ्यावर मैयेची पूजा केली. रात्री मंदिरातच भोजनप्रसादीची व्यवस्था होती. मंदिराबाहेरील दुकानातुन  अमूल लस्सी आणि आईस्क्रीम यांचा आस्वाद घेतला. दुकानदाराबरोबर उद्याच्या सायकल परिक्रमेबाबत चर्चा केली. येथून पंचवीस किमी अंतरावर वराछा गावात बसलेल्या गुरू दत्तात्रयाचे दर्शन होईल ही माहिती मिळाली.

रात्री गप्पा मारता मारता कधी झोपी गेलो हे कळलेच नाही...

सतीश जाधव

स्वछंदी पाखरे.....

7 comments:

  1. विजय कांबळेApril 10, 2021 at 7:49 PM

    माणूस जन्माला आल्यानंतर त्याची जगण्याची वाटचाल केवळ दोनच दिशांनी होऊ शकते. एक वाट लौकीका कडे नेणारी असते. प्रपंचात सुख मानणारी माणसं या वाटेने वाटचाल करतात. ही वाट देह सुखाकडे नेते. पण त्या वाटेवर आत्मसुखाचा आंतरिक समाधानाचा अनुभव मिळत नाही. कारण ही बाह्य सुखाशी वाट असते. तेथील सुख हे क्षणिक असतं. जी दुसरी वाट असते ती असते परमार्थाकडे नेणारी. ती पारलौकिक सुखाकडे नेते. या वाटेवर मिळणारा आनंद आणि सुख हे आत्म्याचं सौख्य असतं. ती आत्मसुखाकडून परमात्म्याकडे नेते. तो परमात्माच चिरंतर आनंदाचा अक्षय ठेवा असतो या दोन्ही वाटा परस्पर विरोधी दिशेला जाणाऱ्या असल्या तरीही विनय जोशी, सारखे साधुपुरुष प्रपंचात राहूनही परमार्थ साधू शकतात.
    प्रपंचात राहायचं, जगरहाटीत कर्म करीत राहायचं. पण त्याचं करते पण आपल्याकडे घ्यायचं नाही आणि त्या कर्माची फळ सुखकारक असो, दुःखकारक असो, त्याचाही आस्वाद न घेता ती नर्मदा अर्पण करायची. उपभोगशून्य होऊन आत्मा परमात्म्याशी अनुसंधान ठेवून सख्यभावाने परमानंदात राहायचं. हे सारं अंगी साधुत्व असल्याशिवाय कुणालाही शक्य नाही.
    शूलपाणी मंदिर कथेने मनाची मरगळ दूर झाली. शिवाच्या सगुण अवतारातील रसभरीत लीलांचे वर्णन ऐकून नर्मदामैय्याच्या भेटीची उत्कंठा निर्माण होऊ लागली. आणि नर्मदामैय्याची प्रत्यक्ष भेट आपल्यासारख्या गुरुजींच्या कृपेशिवाय घडू शकत नाही हेही जाणवलं.

    ReplyDelete
  2. फारच सुंदर वर्णन मनाला वेडलावणारे विवेचन वाचून फार आनंद झाला जसे आम्ही ट्रेक करून अनुभवत आहे असे वाटले धन्यवाद सतीश आणि विजय

    ReplyDelete
  3. सुंदर
    कालाय तस्मै नम::🌹🙏

    ReplyDelete
  4. सुंदर
    कालाय तस्मै नम::🌹🙏

    ReplyDelete
  5. सुंदर
    कालाय तस्मै नम::🌹🙏

    ReplyDelete
  6. सुंदर
    कालाय तस्मै नम::🌹🙏

    ReplyDelete
  7. सर फारच छान ! केवळ यात्रा आणि सायकलिंग या दोन गोष्टी शिवाय त्यातील बारकावे तसेच पारंपरिक धार्मिक कथाचे विवेचन यामुळे सर्वोतोपरी माहिती उपलब्ध होऊन मन प्रसन्न झाले.
    - स्वप्निल नागरे

    ReplyDelete