यौवन... (तारुण्य)
*अशी हटाची अशी तटाची*
*उजाड भाषा हवी कशाला*
*स्वप्नांचे नवं गेंद गुलाबी*
*अजून फुलती तुझ्या उशाला.*
*अशीच असते यौवनयात्रा*
*शूल व्यथांचे उरी वहावे*
*जळत्या जखमा -- वरी स्मितांचे*
*गुलाबपाणी शिंपित जावे.*
*जखमा द्याव्या जखमा घ्याव्या*
*पण रामायण कशास त्याचे*
*अटळ मुलाखत जशी अग्नीशी*
*कशास कीर्तन असे धुराचे.*
*उदयाद्रीवर लक्ष उद्यांची*
*पहाट मंथर जागत आहे*
*तुझ्यासाठीच लाख रवींचे*
*गर्भ सुखाने साहत आहे.*
*//कुसुमाग्रज//*
*यौवन म्हणजे रसरसलेले तारुण्य, तरुण पिढी*
हे तरुणा! अशी अरेरावीची (हटातटाची) भाषा का करतोस. यातून तुझी निराशा दिसतेय, जीवनाबद्दलची हताशा दिसतेय.
तुझ्या हाती तारुण्य आहे, तू नवनवीन स्वप्न पाहू शकतोस, धमक आहे तुझ्या मनगटात. जे हवे ते मिळविण्याची जिद्द ठेव.
जीवनप्रवास खूप खडतर आहे याची जाणीव ठेव. या दुःखांच्या वेदना उरात लपवून, कठोर परिश्रमाचे, आनंदाचे गुलाबपाणी त्यावर शिंपड !!
या अपमानाच्या, मानहानीच्या जखमा कशाला कुरवाळत बसला आहे, त्याचे रामायण का करतो आहेस.
लक्षात ठेव ! जीवनाच्या या दाहकतेला तुला सामोरे जायचे आहे, मग अपयशाच्या अंध:काराची (धुराची) तमा का बाळगतो आहेस.
तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी, भविष्यासाठी उद्याचा दिवस उजाडतो आहे, पहाट प्रकाशमान होतेय. त्या उंच पूर्वेच्या पर्वतातून (उदयाद्री-- सूर्य उगवणारा पर्वत) पहाटेच्या आशेचे किरण भूतलावर विराजत ( मंथर -- अंथरणे, पसरणे) आहेत.
तुझ्यासाठीच प्रचंड यशाच्या, सुखाच्या वाटा, या पहाटेच्या गर्भात लपलेल्या आहेत, वसलेल्या आहेत.
परिश्रमाच्या वाटेने पुढे पुढे जात रहा, तुझ्या आशाआकांक्षा पूर्ण होणार आहेत.
तत्ववेत्यांनी मानवाच्या उत्क्रांती विषयी जी मते मांडली आहेत त्या मतांचा आशावादी आविष्कार कुसुमाग्रजांच्या या कवितेतून होतो.
सतीश जाधव
जीवन जगण्याचे तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत कुसुमाग्रज यांनी सांगितले आहे आणि त्याचा मतितार्थ आपण साध्या भाषेत वर्णन केला अतिशय सुंदर !!!
ReplyDelete- स्वप्निल नागरे
👌👌👌👍🌹🙏
ReplyDelete