नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस नववा)
राज पिपाला ते अंकलेश्वर रामकुंड आश्रम
०६.०१.२०२१
सकाळी मैंय्येची पूजाअर्चना करून पुन्हा एकदा हरसिद्धी मातेचे दर्शन घेतले. राजपिपाला मधील हे हरसिद्धी मातेचे मंदिर शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे.
पुढील परिक्रमेचा आरंभ झाला. सकाळच्या तुरळक रहादारीमुळे तसेच आल्हाददायक वातावरणामुळे पेडलींगला नवा जोश मिळाला होता. तासाभरात हायवे वरील धारिखेडा गावात पोहोचलो. सूर्यनारायण आसमंतात आपल्या सात पांढऱ्या शुभ्र अश्वांच्या रथातून पूर्वेकडून दौडत येत होते.
रथाचा सारथी अरुण अश्वांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत संयत गतीने गगन भ्रमण करीत होता. "आरोग्यं भास्करात् इच्छेत्" - म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी असे शास्त्रवचन आहे... या वचनाला स्मरून आदित्य महाराजांना नमन केले. पोटपूजेसाठी धारिखेड्याच्या नर्मदा साखर कारखान्याजवळ सद्गुरू स्नॅक्सबारकडे थांबलो. सकाळी न्याहारी तयार नसल्यामुळे पापडी, कुरमुरे भेळ आणि शंकरपाळी हा बालभोग केला. सोबत फक्कड चहाचा आस्वाद घेतला. आणखी तासाभराच्या राईडनंतर सारसा गावात थांबलो. केळी खात असताना, येथे छोटे उस्ताद सायकल स्वार भेटले. गियरवाल्या सायकलबद्दलचे कुतूहल त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. "सायकल चालवायची आहे काय" हे विचारताच तो आनंदाने लाजला. थोडा वेळ आमच्या बरोबर सायकलिंग केली. त्याला प्रोत्साहन म्हणून, आमच्या पुढे त्याची सायकल ठेवली होती. खूप खुश झाला तो बालक. त्याला टाटा करून पुढे निघालो. तासाभरात नावावीधा गावात पोहोचलो. रस्त्याला कडेला बरेच तंबू लागत होते. कोवळे कोवळे हुरड्याचे कोंब वाळूत भाजण्याचे काम सुरू होते. दिनेश भाईच्या स्टॉलवर थांबलो. येथे हुरड्याला "पोंग" म्हणतात. गरमागरम भाजलेला हुरडा त्यावर रतलामी शेव आणि चाट मसाला... त्यावर लिंबू पिळलेले... नुसत्या वासानेच तोंडाला पाणी सुटले होते... हुरडा म्हणजे इन्स्टंट एनर्जी... खूप वर्षांनी हुरडा पार्टीचा स्वाद... तो ही नर्मदा परिक्रमेमध्ये... हे तर मैय्याने पूरविलेले लाडच होते... सोबत रात्रीच्या प्रसादासाठी एक प्लेट हुरडा बांधून घेतला.झगरिया गावाजवळ हायवे सोडून मढीकडे निघालो. मढी येथे नर्मदा मैयेचा "रामघाट" प्रसिद्ध आहे.
नर्मदा मैय्येच्या विशाल रूपाचे दर्शन घेतले. बरेच भक्तगण, परिक्रमावासींच्या पूजा सुरू होत्या. रंगीबेरंगी कापड्यामधील महिला उपासक घाटाची शोभा वाढवीत होत्या. येथील मंगलेश्वर मंदिरात श्रीरामजी, सितामैय्या आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतले. या मंदिरात अखंड रामधून "श्री राम जय राम जय जय राम" सुरू आहे. सन १९८७ पासून ३४ वर्ष दिवस रात्र रामधून सुरू आहे. एखादी गोष्ट सतत आणि अव्याहतपणे करणे, यासाठी खरच आध्यत्मिक अनुष्ठान असावे लागते.मोठं वडाचं झाड, त्यावर किलबिलणारे पक्षी, आजूबाजूला हिरवी टच्च शेती, शीतल वारे यामुळे मनपटलावर आनंदाचा बहर आला होता. तसेच नर्मदा मैंयेचे संथ वाहणे... म्हणजे जणूकाही अखंड चाललेल्या रामधूनमध्ये ती तल्लीन झाली आहे.
थोडावेळ रामधून मध्ये मग्न झालो. सिध्दनाथ बाबांच्या आश्रमात दुपारच्या अन्नप्रसादीची व्यवस्था होती. दालचावल, सब्जी असा सुंदर बेत होता. बाबाजींनी प्रेमाने जेवुखाऊ घातलं. मैय्येच्या किनारी झाडांच्या गर्द वनराईमध्ये असलेला हा आश्रम मनाला आनंदमय शांतता देत होता. संथ वाहणारी नर्मदा आणि मढीचा आध्यात्मिक संवेदनांने भारावलेला हा परिसर मनास अतीव निस्तब्धता देत होता.
ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील ओवी मनात रुंजी घालू लागली....
देशियेचेनि नागरपणें, शांतु शृंगारातें जिणें ।
तरी ओवीया होती लेणे, साहित्यासी ।।
आश्रमाचे महंत जगदीशबापू रामचरणदास बाबांचे आशीर्वाद घेऊन पुढे निघालो.
पुन्हा झगरिया गावात आलो. या गावातील घराघरात पतंगीचा मांजा बनविण्याचे कारखाने सुरू होते.
गुजरात मध्ये मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कार्यक्रम भरविला जातो. या महोत्सवात देश विदेशातील पतंगप्रेमी भाग घेतात. या महोत्सवासाठीच लाल, पिवळा नारंगी रंगांचा मांजा बनविण्याचे काम सुरू होते. धाग्याला रंग, फेविकॉल, ग्लू, काच यांचे कोटिंग दिले जाते. सायकलच्या रीम पासून मोठी फिरकी बनवून त्याला बनविलेला मांजा लपेटून ठेवतात. दोन दिवस उन्हात कडकडीत सुकविल्यावर तो मांजा छोट्या फिरकीत गुंडाळून विक्री साठी पाठविला जातो. या परंपरागत पतंग व्यवसायाला आता आंतरराष्ट्रीय ख्याती मिळत आहे. अर्ध्या तासात गुमानदेव हनुमान मंदिरात पोहोचलो. बाजूलाच शिवमंदिर सुद्धा आहे. विशेष म्हणजे या मंदिराचा कळस म्हणजे एक शिवलिंग आहे. येथे मारुतीरायाने शंकराची कठोर तपश्चर्या केली होती. गुमान याचा अर्थ अहंभाव, घमेंड... याचा नाश करणारे बाबा गुमानदेव हनुमान साक्षात रुपात येथे सदैव निवास करतात. हनुमंताच्या स्वयंभू मूर्तीच्या समोरच्या भागावर चांदीचा लेप लावलेला होता तर मागचा भागावर शेंदुर लिंपण केले होते. मंदिर समोरून कुलूपबंद असल्यामुळे बाजूच्या खिडकीतून फोटो काढला. गळ्यात घातलेल्या रुईच्या पुष्पपानमालेवर चंदनाने राम राम लिहिलेले होते.मंदिराच्या आतील भिंतींवर रामकथा चित्ररूपाने दाखविल्या होत्या. शबरीची बोरे ही कथा माझ्या खूप आवडीची...
निर्व्याज भक्तीची गोष्ट... देव भावाचा भुकेला असतो... त्यामुळेच भगवंताला शबरीची उष्टी बोरे अमृतासमान लागतात... आपल्या दैवताला जे द्यायचे ते उत्तम असले पाहिजे. त्यातील हिणकसपणा आपण काढून टाकला पाहिजे हाच संदेश उष्ट्या बोरातून मिळतो आणि म्हणूनच उष्टी बोरे देणारी शबरी भावते. सर्वांना द्यायचे ते उत्कृष्ट असावे हाच प्रतीत होतो. सातबारा" फाट्यावर पोहोचलो... हे गावचे नाव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जमिनीच्या सातबाऱ्याशी अतिशय जवळीक साधणारे... त्यामुळे मनात हास्याची लकेर उठली. हा परिसर अंकलेश्वर जवळील इंडस्ट्रियल पट्टा आहे. येथे दुपारच्या वेळी रसरशीत कलिंगड खाण्याची एक वेगळीच मजा होती. येथून अंकलेश्वर सहा किमी अंतरावर होते. अंकलेश्वर येथील भिडभंज हनुमान मंदिरात पोहोचलो. बरेच नर्मदा परिक्रमवासी मंदिरात बसले होते. येथे बालभोग चहाची व्यवस्था होती. येथून अर्धा किमी अंतरावर सुप्रसिद्ध रामकुंड आहे.अंकलेश्वर येथील प्रसिद्ध आणि प्राचीन रामकुंड तीर्थक्षेत्रावर पोहोचलो.
रामकुंडाजवळच श्री रामानंददास बापू महाराजांची धर्मशाळा आहे. गौशाळेत सायकल बांधून महंत गंगादास बापूंची भेट घेतली. बाजूच्या धर्मशाळेत निवासाची व्यवस्था झाली. सितामैय्या आणि श्रीरामाचे श्री राधाकृष्ण यांचे दर्शन घेतले.
दिवसा उजेडी अंकलेश्वर बाजारपेठेत फिरून ड्रायफ्रूट घ्यायचे ठरले. छुट्टा बाजारमधील जेनी चिक्कीवला यांच्याकडे जवळपास पन्नास प्रकारच्या चिक्क्या होत्या...
ड्रायफ्रूट चिक्की, मलाई चिक्की, पानबहार चिक्की यांचा स्वाद घेतला तसेच रात्रीच्या आरती प्रसादीसाठी खरेदी केल्या.रामकुंड धर्मशाळेत मोहनदास बाबांची भेट झाली. साडेतीन फूट उंचीचे बाबाजी आश्रमातील भोजनाची सर्व व्यवस्था सांभाळत होते.
जमानगर येथील आपली सर्व संपत्ती आप्तस्वकीयांना देऊन मोहनदासजी महाराजांनी रामसेवेसाठी रामानंददास आश्रमात सर्व जीवन समर्पित केले आहे.धर्मशाळेत स्नानसंध्या करून नर्मदा मैंय्येची पूजा केली. सोबतचा हुरडा आणि चिक्की प्रसादी सर्व परिक्रमावासींना अर्पण केली.
रात्रीची भोजन प्रसादी मोहनदासजी महाराज अतिशय प्रेमाने खाऊ घालत होते. रात्री थोडावेळ त्याच्याशी सत्संग केला.
मोरोपंतांची केकावली मनात तरळली...
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो !
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो!!
निरंतर सत्संग लाभो... सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो.. मनाचा पापदोष झडून जावो... ऐहिक सुखोपभोगाची लालसा सर्वस्वी नष्ट होवो.
नर्मदा परिक्रमेचे हेच फलित असावे काय...
सतीश जाधव
मुक्त पाखरे ...
You are a good storeyteller, beautiful photos.I get inspiration from you to come out of my comfort zone........thanks for sharing
ReplyDeleteमामा काय सुंदर लिहता. छान शब्दरचना सुंदर छायाचित्रे लिहायला काय शब्द वापरू तेच सुचत नाही. मस्तच.
ReplyDelete