Wednesday, June 28, 2023

बेधुंद पावसाळी राईड


बेधुंद पावसाळी राईड

रंगबिरंगी  दिवस होता... वातावरण मदहोश करणारे होते... कारने बोरिवलीला लग्नाला जातानाच... पावसाचे प्रताप सुरू झाले... तेव्हाच ठरविले आज पावसात राईड करायची.. बेधुंद भिजण्यासाठी...

धुवाधार पावसाची सायंकाळ आली... आणि तेव्हढ्यात नवनीतचा फोन आला... चला पावसात सायकलिंग करायला... मनातले मित्राच्या ओठावर आले... आणि सखी निघाली भिजायला... पावसाचे गाणे गायला....

तुडुंब पावसात सखीवर स्वार झालो... सखी शिरशिरली... बावरली... मोहरली... आणि मग सरसावली... दिलं पाण्यात झोकून... 

नवनीतसह स्वारी निघाली नरिमन पॉइंटला... जलाधरांनी अंग अंग झाले ओलेचिंब... पाण्याचे फव्वारे काढत सुसाटत धावत होतो... चष्म्या वरून ओघळणाऱ्या जलबिंदूना जिभेच्या टोकावर घेऊन दिमाखात हवेत उडवत होतो... भन्नाट  गेलो NCPA कडे... बसलो कठड्यावर सागराची गाज ऐकत... पाऊस पडतच होता... किनाऱ्यावरून चालणारी मंडळी छत्र्या रेनकोटचे अस्तर घेऊन पावसाला थोपावत होते... भिजण्यात काय मजा असते... हे त्यांना कोण सांगणार... 

तिकडून निघालो गेट वे ऑफ इंडियाकडे... वरचे टप नसलेली मुंबई दर्शनची रिकामी बस सखीकडे टकमक पाहत होती... दीडशे रुपयात साऊथ मुंबई फिरविणारी बस आज ताज हॉटेलच्या समोर निवांत विसावली होती... 

भर पावसात फोटो काढले... आणि आलो ऑपेराहाऊसच्या तिवारी स्वीटकडे...नवनीतने मस्त ट्रीट दिली...दोघात एक स्टफिंग केलेली जंबो दही कचोरी खाताना सायकल मैत्रीण शुल्लुची आठवण झाली... 

नाना चौकातून हाजी अली कॉर्नरला आलो... स्कूटर वरच्या दोन तरुणांनी भिजताना पाहिले... पुढच्याने रेनकोट घातला होता तर मागचा छत्री घेऊन बसला होता... विचारले... "पावसात भिजताय"... होय सखिसह मस्त भिजतोय... ठरवूनच घरातून बाहेर पडलोय... बालपणीच्या आठवणी ताज्या करण्याचा हाच तर रामबाण उपाय आहे... 

सिग्नल सुरू होण्या अगोदर स्कूटरस्वाराने रेनकोट उतरवला... मागच्याने छत्री बंद केली... आणि रममाण झाले पावसात... 

आनंदाचा झरा कसा बेधुंद असतो... याची प्रचिती आली... आजची चौतीस किमी राईड सार्थकी लागली होती...

सतीश जाधव...



Sunday, June 25, 2023

सायक्लोथॉन २०२३

मध्य मुंबईत प्रथमच मनसे सायक्लोथॉन २०२३ वारीचे आयोजन करण्यात आले होते... मनसे मा. नगरसेवक श्री संतोष धुरी यांच्या मार्फत... 

या वारीचे स्लोगन होते... सायकल स्पर्धा नव्हे... पर्यावरण अभियान आहे... प्रदूषण टाळा आणि निसर्ग वाचवा... कार, मोटारसायकल, स्कूटरच्या ऐवजी जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवून शरीर स्वास्थ्याबरोबर पर्यावरण स्वास्थ्य राखणे ही काळाची गरज आहे...

सकाळी  साडेपाच वाजल्या पासूनच आदर्श नगरातील वेल्फेअर सेंटर मैदानावर सायकल प्रेमी जमायला सुरुवात झाली होती... पावसाचा शिडकावा सुरू असल्यामुळे मस्तपैकी आल्हाददायक वातावरण होते... बाहेरून येणाऱ्या सायकल वीरांना बिब वाटपाचे काम सुरू झाले होते... एका बाजूला सेल्फी पॉइंट सुद्धा बनविण्यात आला होता... ठाणे, घोडबंदर, ऐरोली, घणसोली विरार येथून सायकल वीर या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते...

 मनसे नेते श्री संदीप देशपांडे यांनी स्वतः सायकल चालवून   सकाळी साडेसहा वाजता या सायकल वारीची सुरुवात करून दिली...

चार वर्षाच्या बाळगोपाळापासून ते एकाहत्तर वर्षाच्या तरुणांपर्यंत जवळपास पाचशे सायकलिस्टनी या वारीत भाग घेतला होता... विशेष म्हणजे महिलांचा सहभाग सुध्दा लक्षणीय होता... 

आयोजकांनी जाहीर केले की ही सायकल रेस नाही... त्यामुळे प्रत्येकाने मजेत रमतगमत... पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत... फोटोग्राफी करत या सायकल वारीचा आनंद लुटावा... या सायकल सफरीत सावरकर  स्मारक प्रतिष्ठान, प्रभादेवी डिकॅथलॉन येथे हायड्रेशन पॉइंट ठेवण्यात आले होते... तसेच जागोजागी मनसेचे कार्यकर्ते मार्ग दाखविण्यासाठी झेंडे घेऊन सज्ज होते... 

 पहिल्या पावसात सायकल चालविण्याची मजा काही औरच असते...
शिवाजी पार्क मैदानातील नाना नानी उद्यानाजवळ रंगीबेरंगी छत्र्या टांगून ठेवण्यात आल्या होत्या... जणूकाही आकाशात रांगोळी काढण्यात आली होती...

 चार वर्षाचा पार्थ रेनकोट घालून सायकल चालवत होता... त्याने नंतर रेनकोट काढून पावसाचा आनंद घेतला... काही वयस्क महिलांनी तर प्रथमच या वारीत भाग घेतला होता... उत्साहाच्या भरात तरुण मंडळी तर सुसाटत निघाली होती... 
 
सिद्धिविनायक मंदिराकडून प्रभादेवी डिकॅथलॉन जवळ आल्यावर तेथे एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती... तेथून वरळी चौपाटीवर वारी वळवली होती...  ॲट्रिया  मॉलच्या पुढे वळसा मारून पुन्हा वरळी चौपाटीला आली .. बरेच सायकल वीर वरळी चौपाटीवर सीलिंकच्या लोकेशनवर फोटो काढत होते...तेथून सायकल वारीने आदर्श नगरात प्रवेश केला आणि १५ किमी वारीची सांगता झाली...

वेल्फेअर मैदानाच्या दरवाजात सर्वांना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले... तसेच सर्व सायकल वीरांना लकी ड्रॉ कूपन देण्यात आले... या वारीत भाग घेतलेल्या सर्व सायकल प्रेमींसाठी कांदापोहे उपमा केळी आणि चहाचा अल्पोपहार होता...

मनसे नेते संदीप देशपांडे आणि मा. नगरसेवक संतोष धुरी यांच्या मार्फत... वारीत भाग घेतलेल्या बाल वीरांना भेटवस्तू देण्यात आल्या... विविध क्रीडा क्षेत्रात आणि विशेष म्हणजे ११०  मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून  भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहून जागतिक कीर्ती मिळविलेले डॉ आनंद पाटील या सायक्लोथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते...

 तसेच दिव्यांग आणि अंध सायकल वीरांचा सन्मान करण्यात आला... या वारीत भाग घेतलेल्या वयस्क तरुणांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला...

नंतर सुरू झाली बक्षिसांची खैरात... प्रथम पंचवीस भाग्यवंतांना सायकल घंटी बक्षीस देण्यात आली त्यानंतर सायकल पंप विजेत्यांची नावे जाहीर झाली... पाठोपाठ सायकल लॉक, गॉगल आणि हेल्मेट विजेते जाहीर झाले... सायकलप्रेमी आणि सायकलिस्ट तुषार आंब्रे यांनी गॉगल्स स्पॉन्सर केले होते... शेवटी जाहीर झाले प्रथम बक्षीस... डिकॅथलॉन प्रभादेवी यांनी स्पॉन्सर केलेली सायकल... आणि त्या सायकलचा भाग्यवान विजेता होता... सुहास कोंडुसकर... 

अतिशय शिस्तबद्ध आणि सुनियोजित अशा या सायकल वारीसाठी खूप परिश्रम घेतले ते सचिन पारकर, अंबरीश गुरव, दापोली सायकल क्लबचे सदस्य आणि सर्व मनसे स्वयंसेवक यांनी... या सर्वांचे नगरसेवक संतोष धुरी यांनी विशेष आभार मानले...

सचिन आणि अंबरीश यांचा यथोचित गौरव केला... वरळी दादर आणि प्रभादेवी पोलिसांचे सुध्दा अतिशय मोलाचे सहकार्य लाभले या वारीला...

संपूर्ण मुंबईला भूषणावह असणारी ही सायकल वारी खूप मोठा संदेश देऊन गेली आहे सर्व जनतेला... 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकल चालवा... आणि निसर्गाच्या जवळ जाऊन शरीर स्वास्थ्य सुद्धा सुदृढ ठेवा...

आयुष्य हे सायकल चाविण्यासारखं असतं... तोल सांभाळायचा असेल तर सतत पुढे जात रहावं लागतं... हिच जीवन जगण्याची कला आहे...

माननीय श्री संतोष धुरी यांचे सायकल वारी आयोजनचे हे पहिले पाऊल सर्वांसाठी दिशादर्शक ठरणार आहे...

मंगल हो ... !!!

सतीश जाधव

Friday, June 16, 2023

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा... काश्मीर ते कन्याकुमारी

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा...
 काश्मीर ते कन्याकुमारी

काश्मीर ते कन्याकुमारी हे 3651  किमी अंतर सहा दिवस तेवीस तास आणि 39 मिनिटात पार करून जागतिक विक्रम  प्रस्थापित करणारे डॉ अमित समर्थ यांची आज भेट झाली... 

मोनिलच्या वांद्रे येथील बाईकइंडिया या सायकल शॉपी मध्ये असलेल्या टॉक शो मध्ये...

दररोज साधारण 550 किमी अंतर पार करत... दिवस-रात्रभरात फक्त एक तास झोप घेत ही सायकल रेस विक्रमी वेळात पूर्ण करून डॉ अमित यांनी  जागतिक सायकल क्षेत्रात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आहे... 

 "रेस  अँक्रॉस अमेरिका" या सायकल रेसिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका सायकलिस्टला पन्नास लाख रुपये खर्च येतो... तर ह्या भारतीय स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला पाच लाख रुपये खर्च आला... 

या स्पर्धेत एकूण बारा स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील एक स्पर्धक साठ वयाचा होता... एक स्पर्धक सिंगल गियर सायकलिस्ट होता.. तर तीन स्पर्धक अपंग होते...  सर्वांनी नियोजित वेळेआधी यशस्वीरीत्या ही स्पर्धा पूर्ण केली...

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन अतिशय देखणे आणि नियोजनबद्ध होते... तसेच अमेरिकन स्पर्धेच्या तोडीसतोड होते... भारतीयांनी भारतीयांसाठी  भारताच्या भूमिवर आयोजित केलेली  स्पर्धा होती... ही प्रचंड अभिमानाची बाब आहे... 

BRM / SR / LRM / RAAM इत्यादी परदेशातील सायकल स्पर्धांना पर्याय म्हणून ही स्पर्धा अतिशय उपयुक्त असून भारतीय तरुणांना आणि रेसिंग सायकलिस्टना नवनवीन जागतिक विक्रम पादाक्रांत करण्याची एक सुसंधी उपलब्ध झाली आहे भारत भूमिवर... 

डॉ. अमितच्या मार्गदर्शनाखाली पुढील स्पर्धा नोव्हेंबर 2024 मध्ये असणार आहे... साठीच्या पुढील तसेच MTB रायडर्स सुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकतात...

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी डॉ अमित समर्थ (मोबाईल नंबर 8956433351) यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे...

तर सुरू करा तयारी... आणि मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना हातभार लावा...

 मंगल हो

सतीश जाधव 

Thursday, June 8, 2023

अनिल भोसले एक जिंदादिल माणूस...

अनिल भोसले एक जिंदादिल माणूस...

काल अनिलचा फोन आला... "सतीश, सायकल वर आहेस काय"

"मुंबईत आहे" 

हे ऐकताच अनिल म्हणाला... गॅगरीन झाल्यामुळे माझा उजवा पाय गुढग्यातून कापला आहे...

व्हील चेअरवर आहे...

सध्या एक दिवसा आड डायलिसिस करावे लागते...

सर्व दात काढल्यामुळे पातळ पदार्थांचे भोजन घेतो...

दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे...

हेवी डायबिटिजमुळे इन्सुलिनपण सुरु आहे...

काळजात धस्स झालं...

एव्हढ्या प्रचंड आजारपणात हा माणूस माझ्याशी हसत हसत बोलत होता...

हाडाचा ट्रेकर... मिश्किल स्वभावाचा... दिलदार... हरहुन्नरी... हसतमुख... YHAI चे हिमालयातील बरेच ट्रेक केलेला... दररोज भांडुप मुलुंडच्या डोंगरावर प्रभात फेरी करणारा... अमरनाथ यात्रा... लेह लडाख... आणि बऱ्याच कौटुंबिक सहलीत सहभागी असलेला माझा प्रिय मित्र अनील... अतिशय गंभीर आणि कठीण प्रसंगातून जात असताना सुद्धा... त्याच्या बोलण्यात कोणतीही खंत नव्हती... ना आजारपणा बद्दल दुःख होते...

अनिलला उद्या सकाळी भेटण्याचा निर्धार करून... गृपवर मेसेज टाकला... उद्या सकाळी साडेपाच वाजता मुलुंड सायकल राईड...

अंबरीश आणि शिवम यांनी होकार दिला...

आज सकाळीच राईड सुरु झाली...
  सायकलच्या चेनचे दाते खराब झाल्यामुळे वेग घेता येतं नव्हता... कॅसेट आणि चेन बदलणे आवश्यक होते... पण त्यापेक्षा अनिलला भेटणे अत्यावश्यक होते...

 कामावर लवकर जायचे असल्यामुळे शिवम  विक्रोळी  वरून यु टर्न घेऊन घरी परतला... दिड तासात  चेकनाक्याजवळील मुलुंड बोर्डाकडे पोहोचलो...
महेश दाभोळकर भेटायला येणार म्हणून त्याला फोन लावला... प्रतिसाद मिळाला नाही... काहीतरी कामात असावा... 

अनिल भोसलेला फोन लावला... 

सांगितले, "येतोय भेटायला"... 

अनिल एकदम खुश... 

म्हणाला... "सतीश एकदम सरप्राइज"... 

अनिल... तूच माझ्यासाठी सरप्राइज आहेस...

पत्नी अश्विनीने दरवाजा उघडला... आणि तडक अनिलचे बेडरूम गाठले... बेडच्या किनाऱ्यावर उघडा बंब बसलेला अनिल तुटका पाय हलवत हसत होता... 

हृदय हेलावले...

 दोन महिन्यांपूर्वी अंगठ्याला झालेली शुल्लक जखम डायबबिटिजमुळे चिघळली... गॅंगरीन झाले... प्रथम पायाचा अंगठा काढला मग बोटे काढली... गँगरीन वाढतच होते म्हणून उजवा पाय गुढग्यापासून काढावा लागला... गुढग्याचे टाके आता बऱ्यापैकी सुकले होते... सहा महिन्यात जयपूर पाय लावण्याचा विचार आहे... 

सर्व आजारांचा खजिना असलेला अनिल... अशा विपरीत परिस्थितीत...  प्रचंड सकारात्मक उर्जा असलेला आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला अवलिया भासला... 

आनंद मधील राजेश खन्नाचे सुप्रसिद्ध वाक्य आठवले...

 " बाबुमोशाय जिंदगी बडी होनी चाहिए... लंबी नही... 
 
खरोखरच कीती जगलास... यापेक्षा कसा जगालास... हेच महत्त्वाचे आहे ना !!!

सोबत असलेला अंबरीश दिक:मुढ होऊन दोघांचे संभाषण ऐकत होता... 

अनपेक्षितपणे  तातडीने  भेट घेतल्यामुळे अनिल जाम खुश झाला होता...  बॅगेतून काढून  सुदाम्या सारखी सोबत असलेली राजगिरा चिकी खायला दिली... बोळक्या तोंडाने अनिल आनंदाने चिक्की  खात होता... चिक्कीत असलेले शेंगदाणे चावता येत नाहीत म्हणून बाहेर काढून ठेवत होता...

 इतक्यात अश्विनीने चहा बिस्किटे आणली... या माऊली मुळेच अनिल हिमालयासारखा उभा आहे याची जाणीव झाली...

अनिलसह पत्नी अश्विनी, मुलगा बाळा यांच्याशी दिड तास मस्त गप्पा मारल्या... दुःखाची किनार असलेल्या त्या हसऱ्या घरात... आनंदाचे कारंजे फुलविले... बायको स्वप्नाला घेऊन पुन्हा भेटायला येण्याचे आश्वासन देऊन भोसले कुटुंबाची रजा घेतली...

 परममित्र अनिल जयपूर फूट लाऊन पुन्हा चालू फिरू लागणार... या साठी आजची ६३ किमीची सायकल राईड समर्पित...

विक्रोळी कन्नमवार नगर जवळ अंबरीशची सायकल पंचर झाली...
 
सोबत पंचरचे सर्व साहित्य असल्यामुळे भराभर सायकल ठीकठाक करुन  दोघे घरी परतलो...
 
मंगल हो !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...