Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Sunday, April 11, 2021

कवी कुसुमाग्रज " यौवन"

यौवन... (तारुण्य)
*अशी हटाची अशी तटाची*

*उजाड भाषा हवी कशाला*

*स्वप्नांचे नवं गेंद गुलाबी*

*अजून फुलती तुझ्या उशाला.*


*अशीच असते यौवनयात्रा*

*शूल व्यथांचे उरी वहावे*

*जळत्या जखमा -- वरी स्मितांचे* 

*गुलाबपाणी शिंपित जावे.*

*जखमा द्याव्या जखमा घ्याव्या*

*पण रामायण कशास त्याचे*

*अटळ मुलाखत जशी अग्नीशी*

*कशास कीर्तन असे धुराचे.*

*उदयाद्रीवर लक्ष उद्यांची*

*पहाट मंथर जागत आहे*

*तुझ्यासाठीच लाख रवींचे*

*गर्भ सुखाने साहत आहे.*


*//कुसुमाग्रज//*

 *यौवन म्हणजे रसरसलेले तारुण्य, तरुण पिढी*

हे तरुणा!   अशी अरेरावीची (हटातटाची) भाषा का करतोस. यातून तुझी निराशा दिसतेय, जीवनाबद्दलची हताशा दिसतेय.

तुझ्या हाती तारुण्य आहे, तू नवनवीन स्वप्न पाहू शकतोस, धमक आहे तुझ्या मनगटात. जे हवे ते मिळविण्याची जिद्द ठेव.

जीवनप्रवास खूप खडतर आहे याची जाणीव ठेव. या दुःखांच्या वेदना उरात लपवून, कठोर परिश्रमाचे,  आनंदाचे गुलाबपाणी त्यावर शिंपड !!

या अपमानाच्या, मानहानीच्या जखमा कशाला कुरवाळत बसला आहे, त्याचे रामायण का करतो आहेस.

लक्षात ठेव ! जीवनाच्या या दाहकतेला तुला सामोरे जायचे आहे, मग अपयशाच्या अंध:काराची (धुराची) तमा का बाळगतो आहेस.

तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी, भविष्यासाठी   उद्याचा दिवस  उजाडतो आहे, पहाट प्रकाशमान होतेय. त्या उंच पूर्वेच्या पर्वतातून (उदयाद्री-- सूर्य उगवणारा पर्वत) पहाटेच्या आशेचे किरण भूतलावर विराजत ( मंथर -- अंथरणे, पसरणे) आहेत.

तुझ्यासाठीच प्रचंड यशाच्या, सुखाच्या वाटा, या पहाटेच्या गर्भात लपलेल्या आहेत, वसलेल्या आहेत.

परिश्रमाच्या वाटेने पुढे पुढे जात रहा, तुझ्या आशाआकांक्षा पूर्ण होणार आहेत.

 तत्ववेत्यांनी मानवाच्या उत्क्रांती विषयी जी मते मांडली आहेत त्या मतांचा आशावादी आविष्कार कुसुमाग्रजांच्या या कवितेतून होतो.

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

Monday, March 29, 2021

पृथ्वीचे प्रेमगीत

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

कविवर्य   कुसुमाग्रज 

कुसुमाग्रजांनी पृथ्वी सोबत स्त्रीचे मन सुद्धा कथन केले आहे. 

भव्य आणि विशाल प्रेमाची ही कथा आहे. युगानुयुगे सूर्याच्या प्रेमाची याचना करीत तुझ्या भोवती मी फिरते आहे. तरीपण सदैव माझी वंचना होत आहे. असं किती काळ धावू? तारुण्याचा यौवनाचा बहर ओसरला आहे. तरीसुद्धा मनाच्या अंतरंगात तुझ्या प्रेमाची अखंड ज्योत सदैव तेवत आहे. तुझ्या भोवती प्रेमायचना करीत मी अविरत भ्रमण करणार आहे. 

अनंत युगे पृथ्वी सूर्याच्या कक्षेत  करत फिरत आहे.

 तसेच प्रेमभराने प्रेरित झालेली लालना प्रियकराला विचारते आहे, 'तुझ्या मागे मागे किती काळ येऊ; तुझ्या प्रीतीची याचना किती वेळा करू, अशी विचारणा करते आहे. प्रत्येक प्रेयसीची ही आराधना आहे.

स्त्री (पृथ्वी) जेव्हा एखाद्यावर (सूर्यावर) नितांत प्रेम करते. तेव्हा तारे, चंद्र, ध्रुव, धूमकेतू, शुक्र, मंगळ यांच्या विविध अंगाने विविध ढंगाने केलेल्या प्रेम याचना तिला निरर्थक वाटतात. सूर्याच्या दिव्य तेजापुढे इतरांचे प्रेमालाप काजव्याच्या शूद्र चमचमी सारखे भासतात. 
माझ्या प्रेमासाठी अनेक तारे, ग्रह, धूमकेतू मला लुभावण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझ्या अंगअंगावर उल्कामय पुष्प वर्षाव करीत आहेत. परंतु तुझ्या शिवाय मला काहीही प्रिय नाही.
तुझ्या भव्य तेजापुढे, काजव्या प्रमाणे असणाऱ्या ग्रह ताऱ्यांचा प्रेमाचा स्वीकार मला मान्य नाही. त्या पेक्षा तुझा दुरावा मला प्रिय आहे.

तिच्या अंतरीच्या कळा लाव्हा रसासारख्या उफाळून येतात, त्यामुळेच आपल्या (पृथ्वी आणि सूर्य) दोघांतली  दुरी सलत राहते. तुझे तेजोमय रूप धारण करून, तुझी गळा भेट घ्यावी. तुझ्या दाहकतेत विरघळून जावे. अशीच मनोकामना आहे. एव्हढे अमर्याद, अनंत प्रेम आहे.

तुझ्या प्रेमाच्या अंगार माझ्या अंतरंगात धगधगतो आहे. तुझ्या आठवणीने सौंदमीनीचे आसूड माझ्यावर मनावर  कोसळतात आणि त्याचा ज्वालामुखी द्वारे उद्रेक होतो. तुझ्या विरहाने मन भूकंपाद्वारे विदीर्ण होते. 

परंतु हे प्रेम मला एकतर्फी वाटत नाही, कारण तिच्या वर असलेल्या प्रेमामुळेच सूर्य तिला आपल्या मागे घेऊन चालला आहे. त्यामुळेच पृथ्वीच्या प्रीतीची ज्योत अविश्रात तेवत आहे. त्याच्या मागची प्रेरणा सुर्यच आहे. 

या ठिकाणी एक जाणवते, सूर्य (पुरुष) सर्वांनाच आपल्या मागे खेचतो आहे. सर्वांवर प्रेम करतो आहे. परंतु पृथ्वी (स्त्री) नितांत प्रेम,  फक्त एकावरच करू शकते. त्यामुळेच ती इतरांच्या प्रेमाचा अव्हेर करते.
तुझ्या विराट रुपात मिसळून जावे हीच कामना आहे.   तुझ्या तेजोमय ज्वालात सामावून जावे आणि आलिंगनाने प्रीतीची  तीव्रता अनुभवायची आहे. तुझ्या अमर्याद थोरावीची मला जाणीव आहे. तुझ्या पुढे एखाद्या धुळीकणाप्रमाणे मी शुद्र आहे. तरी सुद्धा तुझ्यात सामावून जाण्याची तीव्र लालसा आहे

स्त्रीला (पृथ्वीला) सूर्याची अमर्याद थोरवी माहीत आहे. त्यांच्यापुढे आपण यत्किंचित आहोत हे सुद्धा तिला ज्ञात आहे. तरी सुद्धा सूर्याच्या चरणी आपले प्रेम अर्पण करण्यासाठी त्याच्या पायाची धूळ होणे सुद्धा तिला मान्य आहे.

असे नितांत प्रेम फक्त स्त्रीच करू शकते.

सतीश जाधव
मुक्त पाखरे......