Monday, September 25, 2023

पावणेर अर्थात पाहुणचार


पावणेर अर्थात पाहुणचार.....

माणूस हा समाजप्रिय  प्राणी आहे...
समूहाने राहणे त्याल आवडते.....
त्यातूनच त्या समूहाची म्हणून एक संस्कृती उदयाला येते......

संस्कृती म्हणजे सभ्यता.....
सदवर्तनाचा दृश्य आविष्कार....

घराची शोभा ज्याप्रमाणे अंगण सांगते
त्याप्रमाणेच..
माणसांची सभ्यता शालीनता त्यास अवगत असणाऱ्या चालीरीतीतून कळते......

आपल्या घरी आलेल्या पै पाहुण्यांशी आपण जे काही वागतो बोलतो किंवा...
 त्यांचा जो काही आदर सत्कार करतो किंवा...
त्यांची जी काही उठबस करतो....
ठेप ठेवतो.... 
त्याला पावणेर किंवा पाहुणचार असं म्हणतात....

पावणेर हा तसा ग्रामीण शब्द आहे...
पण त्यात खूप अदब आहे...
पाहुणचार या शब्दात कृतीपेक्षा विचारपूस जास्त आहे.....

पूर्वी खेड्यात घर आणि अंगण एकच असल्यासारखं होतं....

त्यामुळे घरी येणारा पाहुणा लांबूनच नजरेस पडायचा....

पाहुणा किंवा पाहूणी दारात आल्याबरोबर घरातली माणसं तटातटा आदरपूर्वक उठून उभी राहायची...

लेकुरवाळी पाहुणी असेल तर भाकरतुकडा ओवाळून टाकला जायचा.......

न्हाणीघरात पायावर पाणी घेतल्या शिवाय घरात प्रवेश नव्हता.....

बसायला घोंगडी टाकली जायची....
उन्हाळ्याच्या दिवसात रांजनातील थंडगार पाण्याचा तांब्या  आणि गुळाचा खडा असा देशी पाहुणचार पाहुण्यांपुढं ठेवला जायचा..

पाहुणे तातडीने निघणार असतील तर गरम दूध आणि शेवया उकडून पितळीत पाहुण्यांच्या पुढे मांडल्या जायच्या...

हातावर पाणी पडल्याशिवाय पाहुणा घराबाहेर जाऊच शकत नव्हता...
हे पावणेर....

पाहुणे निवांत असतील तर चार दोन दिवस ठेवून घेतले जायचे.....

आवडीनिवडीचं भोजन तर व्हायचंच पण पोटभर साऱ्या गणागोताच्या गप्पा मारल्या जायच्या....
त्यात आस्थेवाईकपणा होता...
मला काय त्याचं असं नव्हतं.....

जाताना आपल्या शेतशिवारात पिकलेला वानवळा मोठ्या आवडीने दिला जायचा.....
मग ते आंबे असतील नाही तर खरवस असेल.....
खूप मजा असायची.....

माहेरवाशीण माहेरी आली तर मग तिला न्हाऊमाखू घातलं जायचं...
सासराबद्दल सखोल विचारपूस केली जायची.....

चोळी पातळ घेतलं जायचं....
हातात चुडा भरला जायचा....
हे सवाष्णीचं लेणं आहे.....

लग्न झालेल्या व माहेरी आलेल्या मुलींच्या देखील खूप काही अपेक्षा नसायच्या......

आईवडील भाऊ भावजय यांच्या राज्यात ....
तिचं जे काही पावणेर व्हायचं
त्यात ती संतुष्ट होती.....

काळ्या पोतीत ओवलेली
दोन डोरली चार सोन्याचे मणी
म्हणजे तिचं मणीमंगळ सूत्र....
पायात पावलीभर चांदी घालून घडवलेली खणखणीत जोडवी...
कानात कर्णफुले...
हातात हिरवा चुडा....
कपाळाला ठसठशीत कुंकू..
एवढ्या माफक साजशिनगारात घरी आलेली माहेरवाशीण आनंदी असायची.......

सासरी जाताना सर्व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून मग निघायचं....

सासरी नसणारं आणि माहेरी असणारं
असं म्हणून जे जे काही असेल ते आई आपल्या या लाडक्या लेकीला गाठोड्यात गाठीवर गाठी बांधून द्यायची......

तिला मुलबाळ असेल तर त्याला अंगडं टोपडं घ्यायचं....
गाठोडं जड झालं तर आई किंवा भाऊ बैलगाडी करून या पोरीला सासरी सोडवून यायचे......

लेकीच्या सासरी पुन्हा या माहेराहून आलेल्या मंडळींचं स्वागत व्हायचं...
जेवू खाऊ घालून किमान एक रात्र मुक्काम केल्यानंतरच त्यांची सुटका व्हायची.........

त्यात एकमेकां विषयीचा मान सन्मान आदर यांचं प्रकटीकरण असायचं.....
गोडवा असायचा....

श्रद्धेने केलेल्या या आटापिटीस 
पावणेर अथवा पाहुणचार असं म्हणायचं...........

घरी आलेली पाहुणी जवळची का लांबची याचा विचार न करता हातात बांगडया तर भरल्या जायच्याच....

जाताना  पिढयावर बसवून परातीत गहू तांदूळ व खोबरं घेऊन घसघशीत हातानं हळदीकुंकू लावून खणा नारळानं ओटी भरली जायची.....

पुरुष पाहुण्यास टॉवेल अथवा उपरणे व टोपी गंध लावून दिली जायची...

यात देण्याचा भाव होता...
अंतरीचा उमाळा होता...

पदरातील ओटी काढून ठेवताना त्यातील मूठभर धान्य पुन्हा त्या परातीत टाकलं जायचं.....

त्यामुळे धनधान्यास बरकत येते अशी समजूत आहे.....
अशी ओटी भरून केलेलं पावणेर आपल्यातील कितीतरी माता भगिनींच्या वाट्याला आलं असेल....

घरोघरी आलेल्या पाहुण्यांचं ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार पावणेर व्हायचं...

अगदी शेजारच्या घरात सुध्दा रोज वाटीभर का होईना पण भाजी ज्याला खेड्यात कालवण म्हणतात नित्यनेमाने दिलं घेतलं जायचं....
बेगमीचा मसाला जरी केला तरी तो पहिला शेजीबाईच्या घरी मासला म्हणून दिला जायचा.....

नाहीचा पाढा न लावता आहे त्यातूनच घासातील घास देण्याची भावना म्हणजे पावणेर.....
आणि दिल्यानं वाढतं.....
म्हणून चहासाठी कप आणि बशी...
बशीतला पिऊ आणि कपातला देऊ...
हे सहजसाध्य अगत्य......

त्यातून सुखदुःखाची वाटणी व्हायची..
कितीएक प्रसंग तर परस्पर निभावले जायचे.....

घराचं दार सदैव उघडं....
माणसं मनानं मोकळी ढाकळी होती..

यात कृती आणि त्यामागची भावना दोन्ही महत्वाच्या मानल्या जायच्या....

*शेजी आली घरा कशी बोलते हासून..*

*मनुष्य जन्म असा काय जायचं साधून....*

माणसाचा जन्म म्हणजे पाण्यावरला बुडबुडा....
तेव्हा कपाळावर आठी न पडता हशी खुशीनं राहावं.......
प्रेमानं अदबीनं वागावं.....
तेवढंच संगती येतं असं शिकविणारा संस्कार त्याचं नाव पावणेर......

आता काळ बदलला आहे....
सगळ्या गोष्टीत नको एवढा औपचारिकपणा आला आहे....
अनौपचारिक असं काही असतं हेच मुळी लक्षात येत नाही.....

त्यामुळं माणसं मनात कुढतात...
आणि स्वहस्ते स्वतःचा ऱ्हास करून घेतात......

पाहुणचाराच्या जुन्या पद्धती जरा अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया..

चेहऱ्यावर चोवीस तास संकोचाचं बेगड लावून जगणं जरा बंद करू.....
व्यक्त होऊ...

समोरच्याच व्यक्त होणं आणि आपण समरसून समजून घेणं हे सुध्दा पावणेरच आहे......

असं पावणेर वाढीस लागलं म्हणजे आपण जगातील सगळ्यात श्रीमंत झालो आहोत असं समजावं......

मंगल हो.... !!!

संकलित....

2 comments:

  1. पावणेर बाबत केलेले विश्लेषण अतिशय सुंदर👌🌹🌿🙏

    ReplyDelete