Showing posts with label त्रिपुरा सायकल वारी. Show all posts
Showing posts with label त्रिपुरा सायकल वारी. Show all posts

Monday, November 27, 2023

डोंबुर तलाव...

डोंबुर तलाव...

त्रिपुरा मधील सुप्रसिद्ध डोंबुर तलाव साऊथ कारबुक गावावरून २५ किमी अंतरावर आहे.  त्या ठिकाणी उत्तर बाजूने सायकलिंग करून जाणार होतो. परंतु सायकल ब्रेक डाऊन झाल्यामुळे रणजित मामाच्या ऑटोने जायचे नक्की झाले. रबरच्या शेतावरून आल्यावर फ्रेश होऊन ऑटोने जतनबारीकडे प्रस्थान केले. जतनबारी वरून मुख्य रस्ता सोडून नारीकेल कुंजच्या  घाट रस्त्याने सफर सुरू झाली... 

रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे ऑफ रोडींग प्रवास होता. खडबड रस्त्यावरून ऑटोतून प्रवास करणे म्हणजे शरीराचा तंबोरा वाजविणे होते... परंतु घाटाच्या दरीतून वाहणारा पाण्याचा पाट... आणि चारही बाजूची हिरवीकंच वनराई... सफर सुसह्य करत होती... 

काही ठिकाणी चढावर रिक्षा थांबत होती... पण रणजित पट्टीचा ड्रायव्हर... आम्हाला गाडीच्या खाली न उतरवता... अशी काही रिक्षा एक्सलरेट करायचा की रिक्षा चटकन चढ चढत असे...  डोंबुर वॉटर फॉल ओलांडून तीर्थमुखला पोहोचलो.

येथे गोमती नदीने असा काही गोलाकार वळसा घेतला आहे की ते  वळण डोळ्याचे पारणे फेडतो...

येथे कालीमातेचे मंदिर आहे. मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा असते... त्यासाठीच मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदी करणाचे काम सुरू होते. तेथून पाच किमी वरील मंदिर घाट गावात पोहोचलो...

येथून डोंबूर तलावातील नारिकेल कुंज आयलंडवर जाण्यासाठी बोट केली... आमच्या बरोबर पंजाबचे पाच जण होते... त्यामुळे बोटीचे भाडे सात जणात समान वाटल्यामुळे प्रत्येकी चारशे रुपयांमध्ये आमची डोंबुर तलावाची राईड सुरू झाली... 

झाडाझुडुपातील तलावाच्या ओहळातून नाव पुढे सरकत होती... जणूकाही नाव पाण्याबरोबर लपंडाव करत होती... वीस मिनिटांनी नाव विस्तीर्ण तलावात आली... आणि डोळ्याचे पारणे फिटले...

उंच डोंगरामध्ये विस्तीर्ण पसरलेला तलाव आणि आजूबाजूच्या किनाऱ्यावरील झुडपात लपलेली झावळ्यावाली आदिवासी घरे पाहून...

बालकवींच्या "त्या तिथे पलिकडे" कवितेच्या ओळी मनपटलावर तरळून गेल्या... आकाशाच्या क्षितिजावर  लांबवर पसरलेला  हिरवागार किनारा तलावाच्या पाण्यात प्रतिबिंबीत होत होता... बोटीमुळे उठणाऱ्या पाण्याच्या लहरींमुळे  त्या प्रतिमा लयबध्द डोलत होत्या...

एक टक निसर्गाच्या या रंगांचे अवलोकन करत होतो... त्यामुळे पाण्यावरून बोटीशिवाय मीच तरंगत पुढे सरकत असल्याचा भास होत होता... नभाच्या निळाईत बोटीच्या एका टोकावर काढलेला फोटो... "किती घेशील दोन्ही करांनी... देणाऱ्याचे हात हजार... याची जाणीव करून देत होते...

हा आनंदाचा बहर... माझ्या दुबळ्या झोळीतून ओसंडून वाहत होता...

तर नंदूचा आनंद त्याच्या स्मित हास्यातून परावर्तित होत होता...त्या आनंदाला दोन्ही हातांनी गच्च पकडण्याचे नंदुचे प्रयत्न थिटे पडत होते...

पाच पंजाबी पोरांचे बोटीत वेगवेगळ्या अँगलने फोटो काढणे सुरू होते... 

नारिकेल रिसॉर्टच्या किनाऱ्यावर उतरलो... हा रिसॉर्ट तलावाच्या मधोमध असलेल्या आयलंडवर बांधण्यात आला आहे... थ्री स्टार कॅटेगरीच्या या रिसॉर्ट मधील सर्व कॉटेजेस फुल होते... प्रशस्त परिसर आणि शिस्तबद्ध पद्धतीने केलेली तलाव फेसिंग असलेल्या लाकडी घरांची रचना मनाला शांततेचा फिल देत होती...

या आयलंडच्या पलिकडच्या किनाऱ्यावर तुरळक वस्ती होती... तेथे खाण्याच्या टपऱ्या लावल्या होत्या... तेथील उकडलेले पिवळे जर्द टपोरे वटाणे कांदा चटणी मिक्स करून खाताना... रसना चमचमीत झाली होती... 

आयलंडचा संपूर्ण नजारा पाहून रिसॉर्टच्या रेस्टॉरंट मध्ये दाखल झालो...  ते काहीतरी लोकल खाण्याच्या इराद्याने...  भाताबरोबर स्थानिक भाजी गोडवाखची ऑर्डर दिली...

राईची पाने वाफवून त्यात पपई, बीन आणि हर्ब घालून  घट्ट बनविलेली  स्पायसी गोडवाख भाजी भाताबरोबर खाताना... एक वेगळीच लज्जत येत होती... 

पंजाबी मुलांनी स्पीड बोटीचा आनंद घेतला... बराच वेळ झाल्यामुळे बोटवाला आम्हाला शोधायला आला होता... रिक्षावाल्या रणजितचे पण फोन येऊन गेले... बोटीने पुन्हा मंदिर घाट येथे आलो.जवळच एक ग्रामीण महिला हातमागावर भरजरी शाल तयार करत होती... तिच्या कामात अप्रतिम सफाईदारपणा होता... 

रणजितने मग डोंबुर तलावातून गोमती नदीत येणाऱ्या पाण्यावर बांधलेले धरण आणि वीज निर्मिती करून नदीत कोसळणारा धबधबा दाखविला...


तेथून डोंबुर तलावाच्या बंधाऱ्यामुळे विस्थापित झालेल्या रीफ्युजी लोकांचे गाव कलजारी दाखविले... विस्थपितांची घरे सरकारी खर्चाने बांधली जात होती... तसेच आज मोफत रेशन वाटपाचा कार्यक्रम त्या गावात सुरू होता...  टेकडीच्या दुर्गम भागात वसलेल्या ह्या आदिवासी गावासाठी पक्का रस्ता सुद्धा तयार होत होता.

त्रिपुरा मधील महत्त्वाचे  प्रेक्षणीय स्थळ  डोंबुर तलाव  आमच्या सायकल वारीचा एक भाग होता... तो उत्तर बाजूने पूर्ण करताना आम्हाला ११० किमी राईड करावी लागणार होती... तोच रिक्षाने दक्षिण मार्गाच्या शॉर्टकटने पूर्ण केला... त्यामुळे दोन दिवसांच्या सायकल वारीची भरपाई झाली होती... 

साडेचार वाजता कारबुक गावात रिक्षातून उतरताना  रिक्षापेक्षा सायकल बरी असेच भाव मनात होते... 

मंगल हो...