नर्मदा परिक्रमा...
दवाना ते बावन्नगजाजी (परिक्रमेचा दिवस तिसरा)
३१.१२.२०२०
पहाटे पाचला जाग आली. महंत तवरदासजी रामाचे दोहे गात होते. वातावरण खूपच गारवा होता, म्हणून सुस्वर दोहे अंथरुणातच बसून ऐकण्यात तल्लीन झालो.8
तासाभरात तयार होऊन या आ in poli Ii NM 7 konihi KJश्रमाची महती सांगण्याची तवरदासजींना विनंती केली.
भौसिंग बाबांनी संजीवन समाधी दवाना येथे घेतली. तेथेच त्यांचे समाधी मंदिर आहे. बाबाजीच्या समाधीवर छिद्र आहेत. भौसिंग बाबा अजूनही संजीवन आहेत असे भक्तगण मानतात. भौसिंग बाबा श्री कृष्णाचे निस्सीम भक्त होते. गेली जवळपास ऐशी वर्ष परिक्रमावासीयांची या आश्रमातर्फे सेवा केली जाते.
सकाळी महंत तवरदासजींनी चहा दिला. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढील परिक्रमा सुरू झाली.आजचा पहिला पडाव लोहारा येथील कपिलेश्वर महादेव मंदिर होते. दवाना येथून दिड तासात कपिलेश्वर महादेव मंदिराजवळ पोहोचलो. गावातील रस्ता ऑफ रोडिंग होता. गावाच्या टोकाला नर्मदेच्या किनारी हे मंदिर आहे.
या मंदिराच्या बाजूनेच नर्मदा मैय्या वाहते. सरदार सरोवर प्रकल्पामुळे येथील घाटाचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. येथे नर्मदेच्या पाण्याला सागरासारख्या लाटा उसळत होत्या. मैयेच्या जलात डुबकी मारली. स्नान करताना सुद्धा लाटा अंगावर कोसळत होत्या. समोर असलेल्या अंबामातेच्या मंदिरात सोबतच्या मैयेची पूजा केली.येथे नर्मदेच्या किनारी कपिलेश्वर महादेव मंदिर स्थापित आहे. अतिशय पुरातन आहे हे मंदिर.
कपिलमुनींनी येथे घोर तपस्या केली होती आणि येथेच कपिलमुनी विराजमान झाले आहेत. पुजारी पंडित शिवप्रसाद म्हणतात, 'हे मंदिर सत्ययुगातील आहे. कपिला गायीच्या खुरातून निर्माण झालेल्या कपिला नदीचा येथेच नर्मदेबरोबर संगम होतो. कपिल मुनींकडे असलेली ही कपिला गाय साक्षात अन्नपूर्णा होती.आसपासचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नर्मदेच्या किनारी दोघेही निवांत बसलो होतो... अगदी निशब्द... शांततेचा आवाज ऐकत होतो...
तासाभराने मंदिरातून निघालो आणि थोड्याच वेळात मुख्य रस्त्यावर आलो. येथे दबंग दुनिया वर्तमानपत्राचे वार्ताहर भेटले. त्यांनी संजयची मुलाखत घेतली. 'प्रदूषण मुक्त नर्मदा' हा संदेश घेऊन आम्ही परिक्रमा करतोय, हे संजयने सांगितले.
येथून चकेरी गावात पोहोचलो. रामारोटी म्हणून पोळी भाजी आणि वरणभात मिळाले. येथे इंजिनियर बाबाजी कल्पेश महाराज आहेत.
गुजरात मध्ये इंजिनियर असलेले कल्पेश बाबाजी मागच्या एक वर्षांपासून चकेरी येथे परिक्रमवासींना रामरोटी देत आहेत. एक वर्षापूर्वी परिक्रमा उठविलेले हे बाबाजी बडवानी वरून आलेल्या गुरुजीच्या आदेशाने अन्नसेवा देत आहेत. 'मैंयेजिके मनमे जब आयेगा तब मेरी परिक्रमा शुरू होगी, लेकीन परिक्रमा पुरी करकेही घर लौटुंगा". आपल्या जीवनाची नैया; मैयेच्या ताब्यात देणाऱ्या इंजिनियर बाबांची भेट अंतरंगात स्नेहाचे तरंग उठवून गेली. अशा व्यक्ती जीवनात येणे आमचे अहोभाग्यच होते.…अंजार गावाजवळ सायकलच्या कॅरियरचा स्क्रू ढिला झाल्यामुळे पॅनियर बॅग मागच्या मागे धाडकन पडली. बॅगेची शिलाई उसवली होती. गावात एक टेलरींग करणारे आजोबा मिळाले.
बॅग शिवल्यावर पैसे विचारले असता, 'आपके दिलको अच्छा लगे इतने देना' आजोबा म्हणाले, 'नर्मदा मैयेमुळेच तुमची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे, आणखी मला काय हवे'... निरपेक्ष सेवा हा सद्गुण मैयेच्या सान्निध्यामुळेच मनात दृढ होतो... याची प्रचिती आली...बडवानी शहरात प्रवेश केला... येथील पशु महाविद्यालया जवळील चहावाल्याकडे थांबलो. चहावाला म्हणाला 'साब आपके लिये स्पेशल चाय बनाता हूँ', त्यांची मसालेयुक्त चहा खुप आवडली म्हणून आणखी एक कप चहा प्यायलो... आता कमालच झाली. तो चहावाला पैसे घेईना...
'बडवानी मध्ये मैय्या आपली बडदास्त ठेवते आहे' संजय म्हणाला.तेथेच बडवानीच्या पी जी कॉलेजचे प्राध्यापक श्री उपाध्याय भेटले.
ते म्हणाले, 'आपको मिलके मुझे बहोत खुशी हुई और ये मेरा सौभाग्य है... क्या मैं आपके साथ फोटो ले सकता हूँ'... आप नर्मदा स्वच्छता अभियान का बहोत बडा काम कर रहे हो... मेरे कॉलेज के छात्रोको आपकी फोटो दिखाके उन्हे भी प्रोत्साहित करुंगा'... श्री उपाध्याय यांच्या बोलण्याने अंगावर मूठभर मास चढले.परिक्रमा करणाऱ्यांना मैय्या दर्शन, दृष्टांत देते म्हणतात... मला तर मैंयेचा रूपानेच वरील सर्व व्यक्ती भेटल्या होत्या... जगणे काय असते हे शिकविणाऱ्या...
बडवानी पासून पाच किमी अंतरावर असलेल्या राजघाटकडे पोहोचलो. जेथे-जेथे महात्मा गांधीजींच्या अस्थी विसर्जन केल्या त्या सर्व ठिकाणांना राजघाट म्हणतात.
नर्मदेवरील नवागाव प्रकल्पच्या धरणाची उंची वाढविल्यामुळे राजघाट परिसर आणि जवळच असणारे दत्त मंदिर आता पाण्याखाली गेले आहे.परिक्रमा करणारी मंडळी आता नर्मदा मैयेच्या दर्शनाला येथे येतात. तेथे पूजा-अर्चना करतात... त्यात काही खायच्या वस्तू, नारळ, पैैसे शोधणारी मुले पहिली.
त्यांना बॅगेत असलेले पेरू खायला दिले. त्यांचे खुललेले चेहरे पाहून खूप आनंद झाला.पुढचा १५ किमीचा सातपुडा पर्वताचा रस्ता चढ-उताराचा आणि शेवटी ४ किमी घाटाचा होता. घाट चढताना सूर्याचे विहंगम दर्शन झाले.
दमछाक झाली होती. पण नेटाने पेडलिंग सुरू होते. दीड तासात बावन्नगजा येथील मां नर्मदा अन्नपूर्णा अन्नक्षेत्र येथे पोहोचलो. येथील प्रमुख स्वामी ज्ञानानंद बाबा (भोलेबाबा) आमची वाट पाहत होते. दवानावरून त्यांना आमची वर्दी मिळाली होते. आल्या आल्या गरमागरम मसाले चहा आणि टोस्ट मिळाले. सर्व थकवा नाहीसा झाला... मला तर युथ होस्टेलच्या ट्रेकिंगची आठवण झाली.येथून साधारण एक किमी अंतरावर जैन सिद्धक्षेत्र आहे. श्री आदिनाथजींची बावन्न गज म्हणजे १५६ फूट डोंगरात कोरलेली उभी मूर्ती या ठिकाणी स्थित आहे. सातपुडा पर्वतरांगेतील हे प्रसिद्ध शूलपाणी जंगल आहे.
सायकलवरील सर्व सामान समोरील शाळेत ठेऊन आम्ही बावन्नगजाजीच्या मुख्य सभा मंडपाकडे गेलो. तेथील केअरटेकर यांनी आज येथे महापर्व आहे आणि १३ जैन दिगंबर साधू येथे आले आहेत, त्यांचे दर्शन घ्या. ही माहिती दिली. या सर्व साधूंची प्रत्यक्ष भेट झाली.
मुख्य साधू श्री विनम्र सागराजी महाराज यांना नर्मदा परिक्रमा सायकल वरून करतोय हे सांगितल्यावर, 'मला सुद्धा नर्मदा मैयेची परिक्रमा करायची आहे, बघू केव्हा मैय्या बोलावते आहे', हे त्यांचे उद्गार ऐकून धन्य झालो. त्यांनी दिलेला आशीर्वाद म्हणजे मैंयेचा प्रसाद होता.
२०२१ या नववर्षाच्या पूर्वसंध्येला १३ दिगंबर जैन साधूंचे दर्शन झाले. त्यांच्याशी बोलता आले. सर्वांचे आशीर्वाद मिळाले. हे खरोखरच खूप भाग्याचे होते. असा योग खूप दुर्मिळ आहे आणि तो जुळून आला. हा आमच्या जीवनातील सुवर्णकांचन योग होता.
अन्नक्षेत्रात आज रामतोटी खाऊन तृप्त मनाने झोपेच्या अधीन झालो.
आजच्या परिक्रमेत मैयेच्या किनारी "शांततेचा आवाज ऐकला"
ही नवीन वर्षासाठी मिळालेली अलौकिक भेट होती...
नर्मदे हर !!!
सतीश जाधव
मुक्त पाखरे