नर्मदा परिक्रमा...ओमकारेश्वर ते बाकावां
(परिक्रमेचा पहिला दिवस)
२९.१२.२०२०
सकाळी गजानन महाराज मंदिरात आम्हाला परिक्रमवासी म्हणून पांढरी लुंगी आणि सदरा तसेच छोटी वही भेट मिळाली. गजानन महाराज आश्रमात परिक्रमा करणाऱ्या सर्व बाबाजी मैयाजी यांची राहण्याची आणि जेवणाची निशुल्क व्यवस्था होते. परिक्रमेला अंथरून, पांघरून अथवा स्लीपिंग बॅग घेणे आवश्यक आहे. तसेच स्वतःचे ताट, वाटी, पेला घेणे सोईचे असते.
सकाळी ओमकारेश्वर मंदिराच्या दक्षिण तटावरील प्रवेशद्वाराला भेट दिली.
तेथून दक्षिण तटावरील ममलेश्वर मंदिराजवळील गोमुख घाट येथे संकल्प पूजा करण्यासाठी पोहोचलो.
प्रथम नर्मदा मैंयेचे दर्शन घेऊन स्नान केले. पाठक गुरुजींनी यथासांग संकल्प पूजन केले. सायकलचे नर्मदा मैयेसोबत फोटो काढले.
बाटलीत घेतलेली नर्मदा मैया सतत आपल्या सोबत ठेवा. तसेच दररोज तिचे पूजन करा.हे गुरुजींनी सांगितले.
नवीन बस स्टँड जवळील मंगलदासबाबांच्या आश्रमाला पुन्हा एकदा भेट देऊन बाबांचे आशीर्वाद प्राप्त केले. बाबाजींनी आज काही सूचना केल्या. ते म्हणाले, 'परिक्रमेमध्ये आपल्या उजव्या बाजूला नर्मदा मैयाजीला ठेऊन परिक्रमा करायची आहे. या परिक्रमेत जबलपूर जवळील भेडाघाटला जायचे नाही... कारण कोठेही नर्मदा मैयेला ओलांडायचे नाही. विशेष करून अमरकंटक येथे सुद्धा नर्मदा मैय्या ओलांडणार नाही याची काळजी घ्या'.
मनोज मानेची सुद्धा भेट झाली. आज दत्त जयंती असल्यामुळे दत्त नामाचा जयघोष करून दुपारी बारा वाजता परिक्रमेची सुरुवात केली.
आमच्या पहिल्या प्लॅन प्रमाणे दिवसाला साधारण शंभर किमी सायकलिंग करायचे ठरविले होते. परंतु आता किलो मीटर्स कन्सेप्ट मनातून काढून टाकला. जास्तीत जास्त नर्मदेच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच प्रमाणे किनाऱ्यावरील मठ, आश्रम, देवळे, भोजन प्रसादीचे अन्नछत्र, यांना भेट देण्याचे नक्की केले.
सनावत गाव हा पहिला पडाव एकदम जोशात पार केला. दुपारी सुद्धा वातावरणात गारवा होता. तेथून खरगोन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. दोनच्या दरम्यात बेडीया गावात पोहोचलो. येथील मिरची मंडी मध्य प्रदेश मधील बेडीया (म्हणजेच बेगडी) मिरचीची सर्वात मोठी मंडई आहे. येथून रावेरखेडी गाव बारा किमी आहे. दोन तासात बेडगी पर्यंत ३६ किमी सायकलिंग केले होते.
मंडईतील प्रेमलालजी मुच्छाला या दुकानाच्या मालकाने आम्हाला थांबविले. आमची प्रेमाने चौकशी करून चहा पाजला.
मैयेच्या कृपा प्रसादला सुरुवात झाली होती. मैयेकडून ही परिक्रमा आमच्या कडून करवून घेतली जात आहे. हा मान मैयेचा आहे आमचा नाही. हाच मनातील भाव अतिशय सर्वांना जवळ आणतो आहे.वाटेत गावकरी सुरेन बिर्ला भेटला. त्याने रावेरखेडीचा रस्ता समाजवला, तसेच बकावां गावात थांबण्याचा सल्ला दिला.
बकावां गाव शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. तेथील घराघरात चालणारे कारखाने जरूर पहा, हे सांगितले.निपाणी-सिपाणी गावापासून रावेरखेडी बायपास सुरू झाला. येथून दहा किमीवर रावेर आहे. खेडी गाव मागे टाकून आता रावेरकडे पेडलिंग सुरू झाले.
थोड्याच वेळात रावेरला पोहोचलो. थोरले बाजीराव पेशवे हे एक अजिंक्य मराठा पेशवे होते. त्यांनी ४२ लढाया केल्या आणि सर्व जिकल्या होत्या. . यांनीच अटकेपार मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला होता. वयाच्या ३९ वर्षी त्याचे रावेरखेडी येथे निधन झाले. मराठा सरदार ग्वाल्हेरचे शिंदे यांनी रावेर खेडी येथे नर्मदा तटावर थोरले बाजीराव पेशवे यांची ही समाधी बांधली.समाधी समोरच्या चबूतऱ्यावर दोन मिनिटे बसून बाजीराव पेशव्यांना मूक श्रद्धांजली वाहिली. नर्मदेच्या विशाल पत्रात टक लावून पाहत होतो... पेशव्यांच्या तलवारीचे खणखणीत आवाज कानात घुमू लागले... महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीने ही समाधी आवर्जून पहिली पाहिजे.
समाधीचा परिसर अतिशय विहंगम आहे. तसेच तेथील कर्मचाऱ्याला आता सरकारने पगार सुरू केला आहे. मराठयांच्या इतिहासात थोरले बाजीराव पेशव्यांचे नाव सुवणाक्षराने कोरले गेले आहे.
समाधी परिसरात फोटोग्राफी करून रावेर येथील प्रेमदासजी महाराज यांच्या आश्रमात आलो.
ते सुद्धा त्यांनी मारलेली प्रेमाची हाक ऐकून... महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज आणि प्रेमपूर्वक भाव त्यांच्या नावाची साक्ष देत होते.बाबाजींच्या आश्रमात आम्ही बसलो असताना पायी चालणारे तीन परिक्रमावासी आले. प्रथमच आम्हाला दोन बाबाजी आणि एक मैयाजी भेटले होते. संध्याकाळचे साडेचार वाजल्यामुळे हे पारिक्रमवासी त्याच आश्रमात विश्राम करणार होते.
यात, ठाण्यातील सुप्रसिद्ध डिस्कव्हरी ताई, रुपाली पारखे देसिंगकर या परिक्रमेत होत्या. त्या कॉलमिस्ट आहेत. त्यांनी मोबाईल फोन बंद करून टाकला आहे. आता त्या नर्मदा मैयेच्या स्वाधीन झाल्या आहेत. त्यात कोणाचाही हस्तक्षेप किंवा साधा संवाद सुद्धा त्यांना नको आहे. त्या फक्त आणि फक्त नर्मदा मैयेशी संवाद साधणार आहेत... एक साधक बनून... एक परिक्रमिक म्हणून... परिक्रमेच्या कालावधीत त्या स्वतःसाठी जगणार आहेत... जगण्याचा उद्देश शोधणार आहेत... नर्मदा मैयाजी त्यांच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल...
रुपाली ताईचे सर्व कुटुंब दत्त संप्रदायातील असल्यामुळे... त्यांना लहानपणापासून नर्मदेची ओढ होते... त्यांची परिक्रमेची इच्छा नर्मदा मैयेने घडवून आणली आहे...
बालभोग (चहापान) घेऊन सर्वांचा निरोप घेतला आणि पुढे प्रस्थान केले. आज तेली भाटीयाणच्या सियाराम बाबांच्या आश्रमात विश्रांती घेण्याचा विचार होता. सव्वापाच वाजता बकावां येथे पोहोचलो. येथील चौरस्त्यावर उभे असलेली गावकऱ्यांनी आमची चौकशी केली आणि गावातील मां नर्मदा रेवा अन्नछत्रालायचा लाभ घ्यावा हो विनंती केली. येथे भोजनप्रसादी आणि निवासाची व्यवस्था सेवाभाव म्हणून केली जाते. भटीयाणला जायला रात्र होईल. याची त्यांनी कल्पना दिली. मैंयेचा आदेश मानून आम्ही गावातील मां रेवा अन्नछत्र सेवा समिती आश्रमात विश्रांती घेतली. आश्रमाच्या समोरच नर्मदा मैंयेचे दर्शन झाले.
नर्मदा मैयेच्या घाटावर स्नान करण्याचा मोह आवरता आला नाही. दोघांनी डुबकी मारून... तयारी केली... सोबत असलेल्या नर्मदा जलाची यथासांग पूजा अर्चना केली.
थंडी वाढू लागली होती. आठ वाजता भोजन प्रसादीची व्यवस्था झाली. आमच्या सोबत बकावां केंद्रात नागपूरचे पाच परिक्रमावासी होते.
भोजन प्रसादी आटपल्यावर बाजूच्या सीताराम धाम आश्रमात गेलो. सीताराम बाबा आणि रामदास बाबा यांचे आशीर्वाद घेतले. येथील राम मंदिरात सुरू असलेले सुंदररकांड श्रवण करण्यासाठी बसलो. सुंदरकांडातील दोहे हिंदी नेमाडी भाषेत होते. परंतु त्यात असलेला ताल आणि बाबाजींचे स्वर यांनी ब्रह्मनंदी टाळी लागली.
दिवसभरात ६० किमी सायकलिंग झाले होते. रात्री साडेदहा वाजता निवांत झोपी गेलो.
आमच्या सायकल परिक्रमेचा प्रथम दिवस... सकाळपासून रात्री पर्यंत ...नव्या गाठी-भेटींनी तुडुंब भरलेला होता... परंतु या सर्व भेटी... खूप जुने ऋणानुबंध असावेत अशा होत्या...
ही तर नर्मदा मैयेची कृपाच होती...
एका समान धाग्याने सर्व जोडलेले होते... तो म्हणजे प्रेमाचा धागा... आणि नर्मदा मैया साथीला असणे...
नर्मदे हर !!!
सतीश जाधव
मुक्त पाखरे....
सुंदर प्रवास वर्णन रोज नर्मदा मैयेची महती आम्हाला सांगा
ReplyDeleteसुंदर वर्णन सुंदर फोटो
ReplyDeleteनर्मदे हर. खूप छान वाटते वाचायला. सगळे माहिती असले तरी परत परत वाचून आनंद मिळतो.
ReplyDeleteबाबाजी भाग्यवान आहात तुम्ही,सतिशबाबा
ReplyDeleteअतिशय चांगला सवंगडी भेटला भाग्यवान आहेस
नर्मदामैयाची कृपा
पाय लागो भैय्या अशीच अविरत कृपा तुमच्या दोघांवर घडो 🙏👍🌹
बाबाजी भाग्यवान आहात तुम्ही,सतिशबाबा
ReplyDeleteअतिशय चांगला सवंगडी भेटला भाग्यवान आहेस
नर्मदामैयाची कृपा
पाय लागो भैय्या अशीच अविरत कृपा तुमच्या दोघांवर घडो 🙏👍🌹
नर्मदे हर.सुंदर प्रवास वर्णन. ओघवती लेखनशैली. नर्मदे हर.
ReplyDelete