लडाख सायकलिंग भाग ५
दि. ०६ ते ०८ऑगस्ट २०२१
सकाळी साडेसहा वाजता स्पंगमीक गावातील बस स्टँड जवळ पोहोचलो. येथे दोन बायकर्सची ओळख झाली दाहोद गुजरात वरून फिरोज आणि केरळ वरून आलेला दिबु हे सोलो बायकर होते.
एकमेकांना वाटेत भेटले.. आता मित्र होऊन एकत्र बायकिंग करत आहेत. संपूर्ण लडाख फिरून ते श्रीनगरला जाणार आहेत. आणखी तीन सोलो ट्रेकर भेटले. विशेष म्हणजे स्थानिक बसने हे तिघे लडाख फिरत आहेत.
आठवण झाली एव्हरेस्ट बेस कॅम्प (EBC) ट्रेक मध्ये भेटलेल्या सुएझ या जगभ्रमणासाठी निघालेल्या इस्रायली तरुणाची... एकवीस वर्ष वय झाल्यावर इस्रायलमधल्या प्रत्येक तरुण तरुणीला आर्मी मध्ये तीन वर्षे सेवा द्यावी लागते. मग हीच मंडळी पुढील वर्षभर जगभ्रमण करतात... केवढा प्रचंड जीवनानुभव येतो यांच्या गाठीला... या तीन भारतीय तरुणांत तीच ऊर्जा दिसली. यांनीच हानलेच्या परमिट साठी लेह मधील फिरोजचा नंबर दिला. तीन वेगळ्या ठिकाणचे वेगळ्या संस्कृतीचे तरुण एकत्र येऊन प्रवास करतात तेव्हा त्याच्या अनुभवाच्या कक्षा अतिविशाल होत जातात...
आठ वाजता येणारी बस साडेनऊ वाजता आली. सायकल टपावर बांधून सुरू झाली बस सफर खारूकडे...
बसच्या टपावर सायकल कशी बांधायची हे आदित्य काका कडून शिकलो होतो. पेंगोंगचा थ्री ईडीयट विव्ह पॉईंट पाहायला बस थांबली. परंतु रस्त्यापासून व्हीव पॉईंट एक किमी अंतरावर होता. बसमधील बरेच प्रवासी तिकडे गेले. परंतु टपावर सायकल आणि सोबत समान असल्यामुळे आम्ही बसमध्येच थांबलो. पेेंगोंग परिसरातील आकाशाची निळाई आणि हिमालयाचे रंग बसच्या खिडकी मधून पाहताना भान हरपून गेले.
बस फुल्ल भरलेली होती. ट्रेकिंग करणारी भली मोठी गॅंग बस मध्ये होती. कर्नाटक मधील हे तरुण नॉन स्टॉप गप्पा मारत होते. सकाळी भेटलेल्या तीन तरुणांमधल्या मालाडच्या हिकेत वीराची मुलाखत घेतली.
इंजिनिअरींग केलेला हिकेत म्हणतो, "वाटलं आणि सुटलो फिरायला... काहीही न ठरवता... प्रवासातच नवीन मित्र भेटले आणि सुरू झाली सफर लडाखची... आणखी चार पाच दिवस एकत्र असू... मग माहीत नाही कधी यांची पुन्हा भेट होईल... पण ही साथ जीवनभर आठवणीत राहील..." "जिंदगी के सफर मे लोग मिलते है... पलभर के लिये... और दे जाते है जीवनभर की खुशीया" हिकेत चांगला वक्ता होता.
दुसरा जम्मू मधील खटूआ जिल्ह्यातील अंकुश राजपूतला बोलते केले. ग्रॅज्युएशन पूर्ण करून हा यु ट्युबर एक देश ते दुसरा देश असे भ्रमण करतोय. गेल्या महिन्यात तो अफगाणिस्थानात होता. पण युद्ध परिस्थिती तसेच वॅक्सिन घ्यायला त्याला भारतात परतावे लागले. त्याचे वैशिट्य म्हणजे जगातील जो प्रदेश अनएक्सप्लोअर आहे, अशा ठिकाणी भेटी देऊन त्याची सर्व माहिती यु ट्यूबवर टाकणे... आता त्याचा भारत भ्रमणाचा कार्यक्रम आहे. संपूर्ण लडाख फिरल्यावर.. काश्मीर मधील खेड्यापाड्यातून फिरणार आहे. तेथून तो नॉर्थ ईस्ट सेव्हन सिस्टर्स करणार आहे. फिरणे आणि युट्युब द्वारे कमाई करणे... आवडीच्या क्षेत्रातून पैसे कमावण्याची कला छान आत्मसात केली आहे अंकुशने...
अंकुश नवीन मित्रांबद्दल भरभरून बोलत होता... चार दिवस तिघेही केलॉंगला लँड स्लाईडिंगमुळे अडकून पडले होते. तिथेच तिघे सोलो रायडर एकत्र आले. आलेले नवीन अनुभव शेअर करण्याची संधी मित्रांमुळे मिळली... नवीन गोष्टी, नवीन भाषा, वेगळी संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळली. फिरण्याच्या एका समान धाग्यामुळे तिघे एकत्र आले होते.
केरळीयन डेसल बरोबर बोलताना उच्चारांची गडबड होत होती. त्याचे मल्याळम उच्चाराचे इंग्लिश डोक्यावरून जात होते. कॉम्प्युटर प्रोग्रामर असलेला डेसल सहा महिन्यांपूर्वी BMS या कंपनीत जॉईन झाला आहे. कोणताही प्लॅन न करता घराबाहेर पडलेला डेसल कोणा बरोबर ही सफर करू शकतो. वर्क फ्रॉम होममुळे प्रवास करता करता कंपनीचे काम सुद्धा सुरू आहे. नोकरी आणि सफरीची छान सांगड घातली आहे डेसलने...
असे हे भटके मित्र... इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. हे भेटलेले तरुण खूप काही शिकवून गेले होते...
डुरबुकला बस जेवणासाठी थांबली. तेथे आमलेट पराठा खाऊन पुढचा प्रवास सुरु झाला. ४५ किमीचा "चांगला पासचा" घाट खूपच वेडावाकडा आणि दगडांचा होता.
ऑफ रोडिंग रस्त्यामुळे बस सावकाश चालली होती. वातावरण थंड व्हायला लागल्यामुळे जाकीट आणि कानटोपी चढवली. रस्त्याच्या आजूबाजूला ग्लेशियर दिसू लागले. हायवे असल्यामुळे ट्रक आणि टँकरची सतत वाहतूक सुरू होती. दोन्ही बाजूला गाड्या असल्यामुळे अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू होती. "चांगला" टॉपवर सायंकाळी सव्वाचार वाजता पोहोचलो.
१७६८८ फूट उंचीवरचा हा पास गारठलेला होता. ट्राफिक खूपच असल्यामुळे पाच मिनिटातच बस सुरू झाली.
उताराचा रस्ता सुद्धा ऑफ रोडिंग होता थेट खारू पर्यंत.. खारूला पोहोचायला सव्वा सहा वाजले. हे गाव मनाली लेह हायवे वर आहे. नाक्यावरच्या सुकू गेस्ट हाऊस मध्ये पडाव टाकला.
सिंधू नदीच्या किनारी वसलेल्या खारू गावावरून सकाळी सो मोरीरी साठी पेडलिंग सुरू केले. वाटेत त्रिशूल वॉर मेमोरील लागले. शाहिद जवानांना मानवंदना करून पुढे प्रस्थान केले.
लेह मनाली हायवे वरून १४ किमी वरच्या उपशी गावात पहिला पडाव होता. या गावापासून हायवे सोडून डाव्या बाजूला वळायचे होते. सिंधूच्या किनाऱ्यानेच ही सफर होती. एका सायकलिस्ट मित्राने, एक किमी माईल्स स्टोनचे फोटो शेअर करायला सांगितले होते.
त्या साठी खास उपशी एक किमीचा फोटो काढला. उपशीला चेक पोस्ट वर परमिट दाखवले आणि दहा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. या प्रदेशात तासाला १२ ते १४ किमी पेडलिंग करणे अतिशय योग्य आहे.
डाव्या बाजूला वाळल्यावर मोठा माईल्स स्टोन लागला. सोमोरीरी आणि हानले एकाच दिशेला होते. परंतु आमच्याकडे हानलेचे परमिट नव्हते. त्यामुळे सो मोरीरी लेक करूनच मागे परतावे लागणार होते.
हेमीया गावाजवळ सिंधू नदीवर छान पैकी लाकडी झुलता पूल होता. सायकल अलीकडे ठेऊन झुलत्या पुलावरून सिंधू नदी ओलांडून पलीकडे गेलो.
सिंधू नदीला येथे "सिंघे खबाब" (सिहाच्या तोंडातून येणारी) म्हणतात. अतिशय सुंदर कॅम्प साईट होती. छोटसं हॉटेल सुद्धा होतं. एका कोपऱ्यात हिरवळीवर टेंट लावले होते.
ऊन वाढले होते. हेमीया गावजवळच्या प्रेयर व्हील जवळ सायकलने थोडी विश्रांती घेतली.
टेरी स्कुडुंग गावाजवळ पोहोचलो. येथे मुक्काम करण्यासाठी नदीपालिकडे जाऊन संपूर्ण गावात फिरलो. एकही घर उघडे नव्हते.
वाटेत कुठेही साधी चहाची टपरी सुद्धा लागली नाही. सायकलिंग करत होतो पण "गायक" गाव सुद्धा सापडले नाही. आता आम्हीच गात होतो... सायंकाळचे साडेसहा वाजले "केरी" गावात पोहोचायला... खूप दमछाक झाली होती. आर्मी कॅम्प च्या बाजूलाच एक नवीन होम स्टे झाला होता, तेथे पडाव टाकला.
सकाळी चहा नास्ता करून माहे गावाकडे सायकल सफर सुरू झाली. या लडाख परिसरात व्यवस्थित जेवणखाण आणि आराम असला की येणारा दिवस एकदम नवा असतो. येथून माहे ६० किमी होते. दोन तास सफर झाल्यावर, वाटेत चुशूल १०० किमी बोर्ड लागला.
चुमाथांग गावात पोहोचलो. येथे सिंधू नदी किनारी गरम पाण्याची कुंड आहेत.
संपूर्ण प्रवास सिंधू नदीच्या किनाऱ्यानेच चालला होता. आमच्या उलट्या दिशेला सिंधू वाहत होती त्यामुळेच प्रवास चढाच्या दिशेने सुरू होता. माहे सात किमी असताना सिंधू नदीकिनारी सुंदर हिरवळीचा पट्टा लागला. तेथे थांबून हिरवळीवर मस्त ताणून दिली. आता प्रत्येक वैशिट्यपूर्ण पाट्यांजवळ फोटो काढायची चढाओढ लागली.
माहे ब्रिज जवळ पोलीस चेक पोस्ट आहे.
संध्याकाळ झाली होती वातावरण थंड व्हायला लागले होते. मुख्य माहे गाव अजून तीन किमी पुढे होते. परंतु माहे ब्रिज वरूनच सो मोरीरीकडे जायचा रस्ता होता, त्यामुळे पुढे गावात जाणे आवश्यक नव्हते. पोलिसाला राहण्याबद्दल विचारल्यावर, नव्या ब्रिजच्या कामासाठी आलेल्या कामगारांचे टेंट बाजूच्या मैदानात लागले आहेत, तेथे बघा काय जमते का.
BRO चा एक जवान कामगारांवर सुपरवायझर होता. त्याची तसेच कामगारांची परवानगी घेऊन सिंधू नदीच्या किनारी टेंट स्थानापन्न झाला.
लडाख सफरीत काही खाण्याच्या वस्तू सोबत असणे फार महत्वाचे आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला...
एक गोष्ट शिकलो... विपरीत परिस्थितीत सुद्धा तग धरणे... त्यामुळे या प्रदेशात उंच उंच शिखरावर पहारा देणाऱ्या भारतीय सैनिकांचे मनोबल किती उच्च असेल याची जाणीव झाली...
सॅल्युट तरुणांना आणि जवानांना...
सतीश जाधव
मुक्त पाखरे...