Showing posts with label भटकंती.... Show all posts
Showing posts with label भटकंती.... Show all posts

Wednesday, July 30, 2025

धोदाणी धबधबा... निसर्गाचा श्वास... सायकल निसर्ग संगम...

धोदाणी धबधबा... निसर्गाचा श्वास...  सायकल निसर्ग संगम...

दि. २९ जुलै २०२५

खांदेश्वर स्टेशन जवळ विकास कोळी पहाटेच सायकलवरून आला... काल अचानक ठरलं... पनवेल जवळच्या धोदाणी धबधब्याला भेट द्यायची ती सुद्धा सायकल वरून...

खांदेश्वर स्टेशन पासून 22 किमी अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या नयनरम्य धबधब्याला भेट देण्याचे खूप दिवस मनात होते... आणि काल  विकासचा फोन आला... सर उद्या मला सुट्टी आहे... जायचं का धोदाणीला... नेमकी विजयची सुट्टी रद्द झाली... त्यामुळे एकट्यानेच विकासला होकार दिला...

आज खास सखी सोबतीला होती... नवीन पनवेल सोडलं आणि हिरवळीचा रस्ता सुरू झाला... दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, भुरभूरणारा पाऊस... मंद धुंद वारा... पक्षांची किलबिल... भुंग्यांचा गुंजारव... पारिजातकाचा सुगंध... या बेहोशीत वाटेतील गाडेश्वर मंदिरात पोहोचलो... 

शिवलिंगाची पूजा सुरू होती... निवांत दर्शन झाले...


आता हळूहळू चढाचा रस्ता सुरू झाला... नेरे गाव सोडले आणि एकपदरी परंतु सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावरून पेडलिंग सुरू होते... मागून एस टी महामंडळाची लाल पारी आली आणि तिला वाट देण्यासाठी  मातीत उतरून सायकल थांबवावी लागली... 

धोदाणी गावातील मंदिराकडे पोहोचलो... गावातील चिंचोळ्या रस्त्यावरून वळणे घेत एका ओढ्याजवळ आलो... बाजूच्या घराच्या पडवीत सायकल ठेवून ट्रेकिंग सुरू झाले...  डोंगरातून वाहणारे तीन ओढे पार केले...

आणि अनंत चौधरीच्या निसर्ग वडापाव सेंटरकडे पोहोचलो... 

आता धबधब्याचा आवाज येऊ लागला... दूरवर दिसणारे डोंगराच्या कपारीतून बरेच धबधबे खाली कोसळत होते...

 पुढे एकत्र होऊन धोदाणी धबधब्याचा प्रचंड झोत जमिनीवर अवतीर्ण होत होता...

धबधब्याची एक कड हवेत उंच झेप घेत होती...


हवेत विरघळून जात होती...  माझ्यासह विकास या मनोहरी दृश्यात हरवून गेलो... जिथे पावसाच्या सरी झरझर कोसळतात, तिथे निसर्गाचा उत्कट आविष्कार भरभरून अनुभवण्यासाठी आलो होतो धोदाणी धबधब्याकडे...

माथेरानच्या पायथ्याशी, घनदाट जंगलात दडलेलं एक अनोखं रत्न… धोदाणी गावाजवळचा हा धबधबा म्हणजे निसर्गाचा उत्कट आविष्कार आहे...

पावसाच्या सरी अंगावर घेत होतो... टेकड्यांमधून कोसळणाऱ्या शुभ्र जलधारेचा आवाज म्हणजे  जणू पृथ्वीच्या हृदयाची स्पंदने होती... 

धोदाणी धबधब्याजवळ पोहोचलो... आणि निसर्ग अधिकच बोलका झाला. वाऱ्याच्या तालावर झाडांची पानं नाचत होती... ढग जमिनीवर उतरत होते... धोदाणी धबधब्याचा लयीत खळखळणारा... तो आवाज मनाच्या खोल कप्यात दडलेल्या शांततेचा होता...


उंचावरून कोसळणाऱ्या जलधारा... निसर्ग संगीत गात होत्या... त्यांच्या प्रत्येक थेंबात एक सळसळती ऊर्जा होती.. मनात स्पंदन निर्माण करणारी...

त्या जलतुषारांचं सौंदर्य इतकं तरल होत की, काही क्षणांत त्यांनी  धुक्याची एक स्वप्नवत चादर विणली... त्या चादरीतून उगवली एक पांढऱ्याशुभ्र पंखांची जलपरी... नजरेत क्षणभर तरंगणारी, आणि पुढच्याच क्षणी हवेत विरून जाणारी... ती कुणालाच सापडणारी नव्हती... अनुभव देणारी होती...  अंतर्मनाला स्पर्श करून जाणारी होती... आणि त्या स्पर्शातून उठत होते  अनेक तरंग... भावनांचे, आठवणींचे,  रम्य शांततेचे...

जेव्हा ही दृश्यं मनाच्या कप्प्यांत साठतात...तेव्हा धोदाणीचा धबधबा फक्त नजरेत राहात नाही... तो हृदयात वाहतो...

 खरं सांगायचं तर... इथे आल्यावर मोबाईल विसरावासा वाटला... कारण डोळ्यांच्या कॅमेराने टिपलेली दृश्यंच चिरकाल टिकतात...

 जलाशयात उतरलो प्रचंड झोत आणि तुषारांची बरसात अनुभवण्यासाठी... त्यात वाऱ्याचा लपंडाव... सर्व कसे अवर्णनीय... नखशिखांत चिंब झालो होती... पण मन भरत नव्हते... 

विकास मोबाईल सांभाळत लांबूनच फोटो काढत होता... जवळपास अर्धातास पाण्यात खेळत होतो... आता सपाटून भूक लागली... मधला दिवस असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजणारे  पर्यटक होते  त्या परिसरात...

निसर्ग सेंटरवर  गरमगरम कांदापोहे आले त्यात विकासने आणलेला डाएट चिवडा टाकून क्षुधा शांत केली... चहा घेतला आणि परतीची सफर सुरू झाली...

गाडेश्वर धरणाजवळ आलो, आणि एक फलक नजरेस पडला... देहरंग धरण... क्षणभर थांबलो... अहो, काय कल्पक नाव... जेथे निसर्गाचे असंख्य रंग मुक्तपणे खेळतायत...  जल, नभ, डोंगर, हिरवळ, आणि पक्षी यांचे रम्य मिश्रण... तेथे देहरंग नावच शोभून दिसते...

वाटेतल्या गप्पा सुद्धा... वाऱ्याच्या झुळुकीसारख्या हळुवार होत्या...कधी मन हलकं करत होत्या... तर कधी जीवनाचे सार सांगत होत्या... या गप्पांच्या ओघात अण्णाच हॉटेल कधी आलं कळलंच नाही...

खांदेश्वर येथे येऊन अण्णाच्या हॉटेल मध्ये डोसा, उत्तप्पा आणि कॉफी घेतली... आजची सर्व ट्रीट विकासची होती... 

परममित्र विकासचा निरोप घेऊन घराकडे परतीची सफर सुरू झाली...

आजची ५२ किमीची राईड निसर्गाला अर्पण केली...

जर शांततेचा शोध घेत असाल, तर हे ठिकाण उत्तर आहे.... आणि जर थोडं साहस हवं असेल, तर धोदाणी त्यासाठीही तयार आहे... मग थांबू नका… पावसाच्या सरी झेलत, हिरवळीच्या कुशीत एक दिवस स्वतःला हरवून बघा... धोदाणी धबधबा एकदा तरी अनुभवायलाच हवा...

सतीश जाधव

7977690693


Sunday, April 27, 2025

मुंबई ते पुणे आणि गाणगापूर ते मुंबई रेल्वेने सायकलचा प्रवास...

मुंबई ते पुणे आणि गाणगापूर ते मुंबई रेल्वेने सायकलचा  प्रवास...

IAS च्या पुणे ते पंढरपूर या 250 किमी सायकल वारीसाठी पुण्याला रेल्वेने जायचे ठरले... लगेजमध्ये सायकल ठेवणे सोपे जावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे स्टेशन असे रेल्वे बुकिंग केले होते...

सायकल लगेज मध्ये लोड करताना किमान दोन तास आधी स्टेशनवर पोहोचणे आवश्यक असते. तसेच आधारकार्डच्या दोन झेरॉक्स आणि सायकलच्या  सीटला तांदळाच्या गोणीने बांधणे आवश्यक असते... हेच काम स्टेशनवरच्या अटेंडंटला सांगितले तर तो किमान शंभर रुपये मागतो... सायकल फ्रेम सुद्धा थर्मो शिटने बांधली असेल तर सायकल फ्रेमला ओरखडे पडत नाहीत... लगेज फॉर्मवर नाव पत्ता  आधार कार्डाचा नंबर तिकिटांचा pnr नंबर तसेच मोबाईल नंबर लिहावा लागतो... तसेच जुनी वापरलेली सायकल असे सुद्धा लिहावे लागते...

पुण्याला जाणारे बारा सायकलिस्ट असल्यामुळे सर्व सायकलचे एकत्र बुकिंग करून एकाच गाडीत पाठविण्यासाठी बुकिंग क्लार्कने असमर्थता दर्शवली...

एकत्र बारा सायकल लगेज मध्ये जाणे शक्य नसल्यामुळे फक्त आठ सायकलचे लगेज बुकिंग केले तर उर्वरित सायकल  त्याच रेल्वेने बोगीतून नेण्याचे नक्की केले... ज्या बोगीत बुकिंग होते त्या बोगीच्या दोन डब्यांच्या शंटिंग मध्ये सायकल ठेवण्याचे आयोजन होते...

आठ सायकल स्टेशनवरील बोगी पर्यंत पोहोचविण्याचे काम प्रत्येक सायकलिस्टने केले तर आपल्या डोळ्यासमोर  सायकल व्यवस्थितरित्या बोगिमध्ये लोड करण्यात येतात... अन्यथा आपल्या अपरोक्ष लोडींग अनलोडींग करताना सायकलचे नुकसान होऊ शकते...

  बुकिंग क्लार्कला काही तरी मिळेल असे अपेक्षित होते... परंतु त्याच्या बोलण्याच्या पद्धती वरून अडवणूकीचे धोरण लक्षात येत होते... एका आधार कार्डवर आठ सायकलचे बुकिंग होते... तरीसुद्धा त्याला प्रत्येकाचे आधार कार्ड हवे होते... हा अनुभव नवा होता...

एक्स्प्रेस ट्रेन फलाटावर लागल्यावर प्रत्येकाने आपल्या सायकलसह लगेज बोगिकडे प्रस्थान केले... सायकल व्यवस्थित लगेज डब्यात लोड केल्या...  तो पर्यंत उर्वरित चार सायकल ज्या बोगीत आरक्षण होते त्या बोगीच्य शंटिंग मध्ये फक्त हॅण्डल सरळ करून लावण्यात आल्या... 

पुण्याला सर्व सायकल व्यवस्थित उतरवून घेतल्या... पुण्यात त्या गाडीचा दोन मिनिटांचा थांबा होता... परंतु सायकल आणि इतर लगेज उतरविण्यासाठी गाडी दहा मिनिटे पुणे स्टेशन मध्ये थांबली होती...

एखाद्या स्टेशन वर गाडी दोन मिनिटे थांबत असली तरी एकदा का रेल्वेचे लगेज बुकिंग झाले की सायकल त्या स्टेशनवर उतरवून घेण्याचे काम गार्डचे असते... मग त्यासाठी गाडीतील  सामान उतरवून घेई पर्यंत जास्त वेळ स्टेशनवर गाडी उभी राहते...

पंढरपूर वारी सुफळ संपूर्ण झाल्यावर आम्ही पाच जणांच्या गृपने पुढील दोन दिवसात अक्कलकोट आणि गाणगापूर वारी पूर्ण केली...

मुंबईला येताना गाणगापूर रेल्वे स्टेशनवर लगेज बोगी उघडत नसल्यामुळे लगेज बुकिंग करता आले नाही... त्यामुळे चार सायकल दोन डब्यांच्या शंटिंगमध्ये आणि एक रोडी सायकल दोन्ही चाके काढून सीट खाली ठेवण्यात आली... 

परंतु आमची स्लीपर S2 बोगी अनरिझर्व्ह डब्याला लागून होती...  रात्री अनरिझर्व्ह डब्याजवळील शंटिंग दरवाजे बंद करण्यात आले... त्यामुळे तेथे लावलेल्या दोन सायकल काढून... आम्ही बसलेल्या कंपार्टमेंटमध्ये चाके वर करून उभ्या स्थितीत लावाव्या लागल्या...... तसेच त्या हलू नयेत म्हणून बंजी कॉर्डने व्यवस्थित बांधल्या... आणि मुंबई गाठली... 

लांब पल्ल्याच्या गाडीतून सायकल कशी न्यावी हे जुगाड...  निव्वळ सोबत असलेला सायकलिस्ट मित्र शिवम खरात याच्या हरहुन्नरीपणामुळे सर्वांना शिकायला मिळाले...

टुरिंग सायकलिंगसाठी हा धडा फार उपयुक्त होता...

जय जय राम कृष्ण हरी...


Tuesday, August 20, 2024

अंबरीश गुरव आणि शतकी राईड... दि. २० ऑगस्ट २०२४

अंबरीश गुरव आणि शतकी राईड...

दि. २० ऑगस्ट २०२४

काल संध्याकाळी विजयचा फोन आला... उद्या मुलुंड पर्यंत राईड करायची काय... मंगळवारी विजयला सुट्टी असते... त्यामुळे मंगळवार खास त्यांच्यासाठी राखून ठेवलेला असतो... 

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने घरात कौटुंबिक कार्यक्रम होता... खूप नातेवाईक म्हणजे भरपूर गप्पा... रात्री उशिरा पर्यंत कार्यक्रम चालणार हे ठरलेले होते... तरीही विजयला आश्वासन दिले... भेटूया सकाळी सहा वाजता... महेश्वरी उद्यानाजवळ... सायकलिंग म्हटले की तहान भूक आणि झोप सुद्धा हरपते...

काल सायंकाळी नारळी पौर्णिमेनिमित्ताने  नवनीतने वरळी कोळीवाड्यात सागराला सोन्याचा नारळ देण्याचा कार्यक्रम पहायला बोलावले होते... तेथे अंबरीशची भेट झाली... अंबरीश सुद्धा मुलुंडला सायकलिंगसाठी यायला तयार झाला...

आज सकाळी सहा वाजता माटुंगा महेश्वरी उद्यानाजवळ विजयची भेट झाली... अंबरीश नुकताच वरळीवरून निघाला असल्यामुळे त्याने सायकलिंग करत पुढे जाण्यासाठी सांगितले...

पावसाचा  भुरभुरत वर्षाव सुरू होता... तो सुद्धा थांबत थांबत पडत होता... सायनला वर्षाव तर कुर्ला सुके... पुढे घाटकोपरला पाऊस धारा तर विक्रोळीला  तेज वारा... पावसाने भिजलो आहे की घामाने... याचा पत्ता लागत नव्हता... पावसामुळे सायकलिंगची सावधानता वाढली होती... बऱ्याच ठिकाणी साचलेल्या पाण्यातून सायकल चालविताना खड्डे टाळण्यासाठी अतिशय हळू मार्गक्रमण सुरू होते...

आज मोबाईल कव्हर घ्यायचे विसरल्यामुळे मोबाईल रुमालात गुंडाळून ठेवला होता...  त्यामुळे वाटेत फोटो काढले जात नव्हते... मुलुंडला पोहोचता पोहोचता... अंबरीशने आम्हाला गाठले होते...  

मुलुंड म्हाडा कॉलनीतील भटाची चहा टपरी आमचा हायड्रेशन पॉइंट होता... भटाने बनविलेला फर्मास उकाळा पिताना मोबाईल बाहेर काढला तर आतापर्यंत २५ किमी राईड झाली होती...  अंबरीश म्हणाला आज शंभरी गाठायची काय... तात्काळ होकार दिला... 

 आज सुट्टीच्या दिवशी घरगुती कामे आटपायची असल्यामुळे विजय घराची वाट धरणार होता... पन्नास किमी वर समाधान मानणार होता... 

परतीची राईड सुरू झाली... आणि विक्रोळी सर्व्हिस रोडवर दिपक नीचितची भेट झाली... फिटनेस फ्रिक दिपक ५८ किमी मॅरेथॉनची तयारी करतोय... हिमालयात सहकुटुंब फिरताना त्याचा डावा हात दुखावला होता... त्यामुळे दोन महिने पोहणे बंद होते... पण चालणे, धावणे सुरू आहे... अशी चळवळी माणसे नेहमीच कार्यरत असतात... उत्तम फिटनेस आणि काळ्या केसांमुळे तो आणखी तरुण दिसायला लागला आहे... 

दिपक एकदा बोलायला लागला की ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नसते त्याला थांबविणे... पण हाडाचा शिक्षक असलेल्या  दिपकचे बोलणे नेहमी ऐकत रहावेसे वाटते... आम्हाला शंभरी गाठायची आहे... हे समजल्यावर त्याने रजा घेतली...

कुर्ल्याच्या प्रियदर्शनी पार्ककडून फ्री वे कडे वळलो... वडाळ्याला विजयने कलटी मारली आणि घरी गेला...  अंबरीश बरोबर आता राईड सुरू झाली... BPT मधून फ्री वे खालून जाणाऱ्या रस्त्यावर गाड्यांची रहदारी कमी असल्यामुळे झकास राईड सुरू होती... 

गेटवे ऑफ इंडिया गाठले तेव्हा ६२ किमी राईड झाली होती...

तेथेच अंबरीशच्या सायकल मधील  मागच्या चाकातली हवा कमी झाली होती... रेडिओ क्लब कडून मुख्य रस्त्यावर येऊन पेट्रोल पंपावर चाकात हवा भरली... 

तेथून नेव्ही नगरचे शेवटचे टोक गाठले... पुन्हा हवा कमी झाल्यामुळे सायकल पंचर झाली आहे हे नक्की झाले...   RC चर्च जवळील दुसऱ्या पेट्रोल पंपावर पुन्हा हवा भरली आणि कैलास परबत जवळच्या सायकल शॉपवर सायकल आणली... मागच्या चाकात  दोन तीन ठिकाणी बारीक बारीक तारा सापडल्या... दोन ठिकाणी ट्यूब पंचर झाली होती.. नवी प्रेस्टा  ट्यूब दुकानात उपलब्ध नव्हती... त्यामुळे दोन पंचर पॅच लाऊन सायकल तयार झाली... 

भूक लागली होती... त्यामुळे ncpa जवळील मनिज् मध्ये नाष्टा करायचे ठरले... मनिज्  कडे नाष्टा करायला आलो... तेव्हा समजले ट्यूबने दगा दिलेला आहे... आता सायकल ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.. डोसा आणि उत्तपा नाष्टा करून अंबरीश सायकल ढकलत ncpa चौपाटी वरून रमतगमत वरळीला निघाला...

 माझा थोडासा हिरमोड झाला होता... पण अंबरीशने ठरविलेले टारगेट पूर्ण करण्याचे मनावर घेतले होते... मग निघालो गिरगाव चौपाटी वरून पेडर रोड मार्गे सुसाटत वरळीला... तेथून सिद्धिविनायक मंदिर गाठले... आज मंदिरात खूप गर्दी होती... म्हणून तेथे ट्रॅफिक जाम झाली होती... त्यात कोणीतरी VIP येणार म्हणून पोलिसांनी रस्ते बंद केले होते... सायकलसह कसाबसा सटकलो आणि वांद्रे सिलींक गाठले... 

सीलिंकच्या अलीकडच्या वळणावर महर्षी व्यास मुनींचा ध्यानमुद्रेतला मोठा पुतळा आहे... तो पाहिला आणि पुन्हा अंबरीशची आठवण झाली... तेथून घरी येई पर्यंत १०० किमी पूर्ण झाले होते...

 पण अंबरीश डोक्यातून जात नव्हता... कसं घडवलंय परमेश्वराने या माणसाला... अतिशय मितभाषी... पण जेव्हा बोलतो तेव्हा ते नेमक आणि मार्मिक असतं... दापोली सायकलिंग क्लबची धुरा गेली पाच वर्ष समर्थपणे सांभाळत असलेला अंबरीश अजातशत्रू आहे... इतरांसाठी त्याचा मदतीचा हात सतत तत्पर असतो... त्याला कधीही रागावलेला पाहिला नाही... प्रत्येक घटनेवर त्याची अतिशय सौम्य आणि मृदू प्रतिक्रिया असते... आणि सदा हसतमुख...

आज त्याच्या ट्यूबने दगा दिला... पण चौपाटी वरून चालताना... त्याच्या चेहऱ्यावर निराशेचा लवलेश नव्हता... मस्तपैकी निसर्गाचा आनंद  घेत तो एकदम मजेत मार्गक्रमण करत होता... असं व्यक्तिमत्त्व माझ्या जीवनात मित्र म्हणून लाभणं हे माझं भाग्यच आहे...

निव्वळ त्याच्या साठीच आज १०० किमी राईड पूर्ण केली होती...


तेरा तुझको अर्पण...

जय श्री राम....

Sunday, August 18, 2024

२० किमी सायकलिंग आणि ११४ वे रक्तदान... दि.१८ ऑगस्ट २०२४

२० किमी सायकलिंग आणि ११४ वे रक्तदान...  दि. १८ ऑगस्ट २०२४

उमलिंगला पास करून आल्यावर रक्तदान करायचे डोक्यात होते... आणि नेमकी मुंबई अल्ट्रा रक्तदान मोहीमेची पोष्ट वाचनात आली... दादर शिवाजीपार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आज हे रक्तदान शिबिर होते... मनातली गोष्ट प्रत्यक्षात उतरणार... या पेक्षा मोठा आनंद काय असू शकतो...

या वेळी एक छान गोष्ट घडली होती... ती म्हणजे रक्तदानासाठी ऑन लाईन रजिस्ट्रेशन होते... कालच याची नोंदणी केली होती...  आज सकाळी साडेआठची वेळ नक्की केली... आज रविवार असल्यामुळे खूप सायकल मित्रांच्या गाठीभेटी होतील याची खात्री होती...

सकाळी घरीच न्याहारी करून सायकल सखीसह स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात निघालो... मोठी राईड करून जर रक्तदान करायला गेलो  तर रक्तदाब वाढलेला असतो... ते टाळण्यासाठी रमतगमत केंद्रावर पोहोचलो... 

अहो आश्चर्यम् ...!!! जायंट सायकल क्लब, पेडल वॉरियर्स आणि दक्षिण मुंबई डिकॅथलॉन गृप मधील खूप सायकलिस्ट मित्र भेटले... खूप दिवसांनी रवी अग्रवालची भेट झाली होती...


माझ्या सायकलिंग पोष्ट वाचणारे कित्येक जण भेटत होते... हात मिळवत होते आणि फोटो काढत होते...


मराठी द्रष्ट्या विर सावरकर यांच्या स्मारकात भरलेल्या या रक्तदान शिबिरात इंग्रजी बोलणारे खूप तरुण तरुणी भेटले... त्यांच्याशी मराठीत बोलायला सुरुवात केल्यावर... आपसूकच ही मंडळी मातृभाषा मराठीत बोलू लागली...   तुमचे इंग्रजी समजत नाही हे बोलल्यावर... त्यांना हसू येत होते...

साऊथची सौदामिनी भेटली... म्हणते कशी... सर हिंदिमे बात करो... तिला विचारले... साऊथ मध्ये हिंदी बोलतात का ग... मुंबईत येऊन हिंदी शिकलीस ना तसेच मराठी पण शिक... 

एक जाणवले... आपणच सार्वजनिक ठिकाणी आपली मातृभाषा विसरून इंग्रजीत किंवा हिंदीत बोलतो... हे आपल्यापासूनच बदलता येईल... असो...

या मुलांनीच माझा फॉर्म भरला... खरं तर ऑन लाईन रजिस्ट्रेशन केल्यावर असे फॉर्म भरण्याची पाळी येऊ नये... सर्व माहिती भरून... त्या फॉर्मवर सही केली... त्या नंतर हिमोग्लोबिन तपासले... ते १४.५ ग्रॅम प्रती डेसी लिटर भरले... चक्क दोन ग्रॅम जास्त... रक्तदाब सुद्धा नॉर्मल होता... याचा अर्थ प्रकृती ठणठणीत आहे आणि अजूनही रक्तदान करायला सक्षम आहे... याची खात्री झाली...

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील ब्लड बँक डॉक्टर आणि कर्मचारी रक्त घ्यायला तत्पर होते... एक रंगीत रबरी चेंडू हातात देऊन दाबायला सांगितला... तेव्हढ्यात उजव्या हाताच्या मधल्या भागात नाजूकपणे  सुई  टोचली... बारीक मुंगी चावल्याचा भास झाला...

  

   माझे  ११४ वे रक्तदान आहे हे तोपर्यंत माझ्या सायकलिस्ट मित्रांनी तेथील कार्यकर्त्यांना सांगितले होते...

मग काय... मुंबई अल्ट्रा रक्तदान शिबिराचे सदस्य, कार्यकर्ते, फोटोग्राफर... अभिनंदन करायला सरसावले... माझे रक्तदान चालू असतानाच... माईक हातात आला... सर्वांना सांगितले की... रक्तदानासाठी सक्षम असणे... म्हणजे आपण सुदृढ असण्याचे लक्षण आहे... तसेच रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होते... ऊर्जेचे संक्रमण होते... बोलत असतानाच रक्ताची पिशवी कधी भरली ते कळले सुद्धा नाही...

रक्तदान केल्यावर एकदम कॉन्टिनेन्टल अल्पोपहार मिळाला... ब्रेड आणि जाम बटर, केळी, बिस्कीट, मिठाई आणि गरमागरम कॉफी... त्यानंतर मिळाली गुडी बॅग... त्यात एनर्जी ड्रिंक होते आणि Run Donate and Save Life हे स्लोगन असलेले टीशर्ट मिळाले...

शेवटी मोठी घंटा तीन वेळा वाजविण्याची मान मिळाला... या घंटेच्या निनादाने... माझे रक्तदान कार्य सर्वांपर्यंत पोहोचले होते...

या वेळी माझ्या बऱ्याच सायकलिस्ट मित्रांनी सुद्धा रक्तदान केले... आज झालेली २० किमी सायकल राईड सुद्धा हेच सांगत होती... रक्तदान केल्यामुळे कसलाही थकवा येत नाही...

हे रक्तदान नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असेल...

जय श्री राम...

Monday, April 29, 2024

दापोली सागरी सायकल सफर आणि चिपळूण उन्हाळी सायकलिंग... २८.०४.२०२४

दापोली सागरी सायकल सफर आणि चिपळूण उन्हाळी सायकलिंग... २८.०४.२०२४

मोटारकारच्या  मागे सायकल लावून... मुंबई वरून पहाटे साडेचार वाजता सहकुटुंब दापोलीला पोहोचलो...

सायकल उतरवून घेतली... कुटुंबिय चिपळूण येथील खेर्डी गावात गेले... पहाटे दापोली सायकल क्लबचा सक्रिय कार्यकर्ता अंबरीश गुरव स्वागताला तयारच होता... सायकल असेंबल करायला त्याने मदत केली... 

ताबडतोब फ्रेश  होऊन पहाटे साडेपाच वाजता सुरू होणाऱ्या  दापोली समर  सायक्लोथॉन साठी तयार झालो....

हळूहळू या सायकल वारीत भाग घेणारे सदस्य येऊ लागले...  मुंबई वरून डॉ. चिमा, प्रवीण कुलथे, महेश दाभोळकर, छत्रपती संभाजीनगरचा  अनंत सहस्त्रबुध्ये, खेडचा विनायक वैद्य, मुंबई वरून सायकलिंग करत आलेला चिन्मय फोंडबा, तसेच धनंजय, सुवर्णा आणि हर्षदा यांच्या भेटी झाल्या... जेव्हा  घनिष्ट मित्र वेगळ्या प्रदेशात सायकलिंग साठी एकत्र येतात तेव्हा आनंदाला पारावर रहात नाही...

दापोली वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर चमू आमच्या सेवेला हजर झाला...  बघता बघता जवळपास २०० सदस्य... या सायकल वारीसाठी एकत्र आले होते... 

दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांनी गणपती बाप्पा मोरया घोषणा देऊन सकाळी साडेपाच वाजता वारीची  सुरुवात करून दिली... 

पहाटेच्या वेळी दापोली ते हर्णे पर्यंत वळणावळणाचा आणि उताराचा रस्ता भन्नाट वेगाचा होता... सायकल कंट्रोल करत या मार्गावर सायकलिंग करणे अतिशय कुशल काम होते... जुक बॉक्स वर "हरहर शंभोचा" नारा देत...  हा पल्ला सफाईदारपणें पार झाला होता...


पाजपंढरी येथील राम मंदिरातील ... रामधुन ऐकून मन एकदम प्रसन्न झाले... तेथून पुढे जाणारा  घाट रस्ता टाळुन जुईकर गावाच्या समुद्र किनाऱ्याने जोग नदीवरील अंजर्ले पुलावर आलो... 

सव्वा सहा वाजता छान उजाडले होते... जोग नदीच्या खाडीत समुद्रातून आलेल्या मासेमारी नौका विसावल्या होत्या... अशा सुंदर लोकेशनवर फोटो काढणे क्रमप्राप्त होते...


सोबत धनंजय, सुवर्णा आणि हसरी हर्षल होती... अंबरीशने लवकर पुढे यायच्या सूचना दिल्या...

अर्ध्या तासात आंजर्ले ताडाचाकोंड येथील समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो... येथून डॉल्फिन दर्शन होते... अतिशय सुंदर अशा धुकाळलेल्या वातावरणात सागराची गाज ऐकणे ही पर्वणी होती...

पूर्वेकडून आसमंतात उगवणाऱ्या सूर्याला... सागर लाटांच्या गाजेने खुणावत होता ... मित्राला साद घालत होता... आंजर्ले द्वीपगृहाच्या मागून उदयाला येणारा सूर्य आपल्या तांबूस सोनेरी किरणांनी सागराला प्रतिसाद देत होता...

आपल्या प्रभा किरणांचा वर्षाव आसमंतात करत होता...  निसर्गाच्या या विविधरंगी लपंडावाने... मनाची सूरमयी सतार झांकरत होती... ऊर्जेचा स्रोत रोमरोमात ठासून भरत होती...

अशा वेळी हर्षलचे बालपण एकदम खुलत होते... लहानपणी सायकल बरोबर केलेली मस्ती... ती पुन्हा जगत होती... 

आता आंजर्ले ते आडे सायकल सफर सागरी किनाऱ्याने सुरू होती... चढ उताराच्या नितांत सुंदर अशा  आंजर्ले समुद्र किनाऱ्यावरून हर्षल आणि सुवर्णा प्रथमच राईड करत होत्या... पहाटेची ओहटी जुक बॉक्सवर लागलेल्या गाण्यांना... दूरवर आवाज करत पसरणाऱ्या लाटांनी पार्श्वसंगीत देत होत्या...  प्रभात वाऱ्यातून संगीताचे तराणे झुळझुळत होते... विहंगांचे चिवचिव गाणे... सायकलवर तरंगणाऱ्या जिवाला मदहोश करत होते...

याच बोहोषीमध्ये आडे पुलावर पोहोचलो... 

पुलावर हायड्रेशन पॉइंटवर अल्पोपहार आणि सरबत होते... तब्बेतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर टीम हजर होती... डोक्यावर सरबताचे ग्लास ठेऊन जाखडी नृत्य केले...


तरुण डॉक्टर मंडळी एकदम भारावून गेली होती... "आम्ही अँब्युलन्स घेऊन येण्या ऐवजी तुमच्या बरोबर सायकलिंग करायला हवे होते... असे उद्गार डॉ. मारकड यांनी काढले... सायकलिंगसाठी तरुणांना प्रेरित करणे हा आम्हा वरिष्ठ तरुणांचा उद्देश सफल होत होता... येथे तीस किमीची सफर पूर्ण झाली होती...  परममित्र संजय सावंत भेटण्यासाठी खास केळशी वरून आला होता...

परतीच्या सफरीत आंजर्ले पुलावरून घाटाच्या रस्त्याने गेलो... चिपळूण जवळील कुंभार्ली घाट सायकल वारीची तयारी त्यामुळे होणार होती... सर्वांना एका दमात... न थांबता तो घाट चढायला सांगितला... आणि सर्वांनी तो पूर्ण पण केला...

त्यानंतर आंजर्ले मधील व्हीसलिंग व्हेवज आणि साई सावली रिसॉर्टवर अल्पोपहाराची व्यवस्था होती...

येथील खडकाळ किनाऱ्यावरून  सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या लोकेशन वर मनमुराद फोटग्राफी केली...

सालदुरे गावावरून दापोली घाट सुरु झाला... हा नऊ किमीचा घाट न  थांबता न थकता चढायचा होता... सर्व साथीदारांनी हे आव्हान तासाभरात सहज पार केले...  

सकाळी साडेपाच वाजता सुरू झालेली ६० किमीची दापोली सायकल वारी  पावणे दहा वाजता... सव्वाचार तासात सुफळ संपूर्ण झाली होती... सर्वांनी झोकात ही वारी पूर्ण केली होती... 

उपमा, केळी, चहाचा अल्पोहार घेतल्यावर सन्माननीय पाहुण्यांना मेडल आणि प्रशस्ती पत्रकासह दापोली सायकल क्लबचे सन्मानचिन्ह सुध्दा देण्यात आले... सर्वांचे फोटो सेशन सुरू झाले...  

पुढील  सायकल वारीसाठी दापोली सायकल क्लबला भरगोस शुभेच्छा दिल्या आणि अंबरीश गुरवला जादुकी झप्पी दिली... आणि चिपळूण जवळील खेर्डीकडे खडतर सायकल सफर सुरू झाली... 

दापोली ते चिपळूण ही पुढील ६२ किमीची राईड भर उन्हात करायची होती..

बऱ्याच जणांनी अशा उन्हात सायकलिंग करू नका असा सल्ला दिला होता...

जगातील सर्वात उंचावराचा रस्ता... लडाख मधील उमलींगला पास  (१९०४५ फूट)...  येथे सायकल सफर करणार आहे जुलै महिन्यात... त्याच्या पूर्व तयारी साठी विपरीत परिस्थितीत सायकलिंग करण्याची मानसिकता अजमावण्यासाठी... रखरखत्या उन्हात ४० अंश सेल्सिअस मध्ये सायकलिंग करण्याचे स्वतःलाच आव्हान दिले होते...

सोबत भरपूर पाणी होते... चॉकलेट आणि केळी होती... 

दापोली ते खेड भरणा नाका पर्यंतचा रस्ता चढ उताराचा आणि  झाडाझुडपातून जाणारा  होता... उन्हाचा तडाखा सुसह्य वाटत होता... खेड बस स्टँड जवळील भूषण सूर्वेच्या हॉटेल मध्ये थंडगार सोलकढी  तर भरणा नाक्यावर स्मार्ट बाजारात अमुल ताक आणि लस्सी प्यायलो... भरणा नाक्यावरून वळल्यावर मुंबई गोवा हायवेवर आता खरा कस लागणार होता... 

दुपारचा एक वाजला होता... भोस्ते घाट सुरु झाला... वेडीवाकडी वळणे, सिमेंटचा रस्ता... कठीण चढ आणि उन्हाचा भर... यात घाट चढण्याचे आव्हान होते... दर दहा मिनिटांनी थांबून केळी, चॉकलेट, पाणी खात-पित होतो...


अर्ध्या तासात घाट पार करून एका राजस्थानी धाब्यावर थांबलो... नेमका त्याच्याकडे अर्धा लिटर ताकाचा सॅचे होता.. मालक दिनेशने स्वतःसाठी आणलेला सॅचे मला दिला... आपण जेव्हा एखादं काम मनापासून करतो...  तेव्हा सर्व सृष्टी तुम्हाला मदत करते... याची प्रचिती आली... सर्व पाणी संपले होते... ब्लॅडर भरून घेतला... हात पाय डोके पाण्याने ओले केले... आणि पंधरा मिनिटे विश्रांती घेऊन पुढील सफर सुरू झाली...

हायवे सुद्धा चढ उताराचा होता... ऊन एकदम बहरात आले होते... वाफाळलेले वारे वहात होते... घामाच्या धारा ओसंडून वहात होत्या... काचा बंद करून गाड्यानीं जाणारी माणसे... काच खाली करून स्तिमित नजरेने न्याहाळत होती...  पुढच्या पेट्रोल पंपावर पुन्हा ब्लॅडर पाण्याने भरून घेतले...संपूर्ण अंग ओले केले...  अतिशय धीम्या गतीने  पेडलींग सुरू केले... 

लोटे परशुराम घाटाच्या पायथ्याला शिरकाई गुळाचा चहा मिळाला...


टप्पा आवाक्यात आल्यामुळे ऊन आनंददायी झाले होते... वारे गुलाबी झाले होते... 

लोटे गावातून परशुराम घाट चढणे सोपे होते... परंतु उतारावर सायकल कंट्रोल करणे जिकरीचे होते... पुढे बहाद्दूर शेख नाक्यापर्यंत धुळीच्या रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागले... दुपारी साडेचार वाजता घामाने आंघोळलेल्या परिस्थितीत खेर्डीला भाचे जावई सुनीलच्या घरी पोहोचलो... 

आज दिवसभरात १२१ किमी राईड झाली होती...

आदल्या रात्रभर मोटारकारने सफर करून पहाटे पासून सायंकाळपर्यंत सायकलिंग करताना वातावरणातील बदल आनंदाने अनुभवले होते... 

स्वतःला दिलेले एक अवघड आव्हान... सहज पेलले होते...

विपरीत परिस्थितीत... आणि प्रचंड उन्हात सायकलिंग करू शकतो... याची तपासणी झाली होती...त्यात पूर्ण यशस्वी झालो होतो...

मन कणखर असेल तर सर्व शक्य आहे...

जिंदगी एक सफर है सुहाना...

जय श्री राम* 🚩🚩