Tuesday, May 19, 2020

Mumbai to Kanyakumari (Day Six) 30.10.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सहावा) दावनगिरी ते सिरा

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
(दिवस सहावा)   30.10.2019

*दावनगिरी ते सिरा *

सकाळी सहा वाजता दावनगिरीच्या पोलीस गेस्ट हाऊस मधून राईड सुरू झाली. 

रस्त्यावर वाहने तुरळक होती. सरळसोट क्षितीजाकडे जाणार रस्ता, शेवटी एका बिंदूपाशी संपत होता. जणूकाही पुढील वाट आसमंतातील असावी.  त्या वाटेवर काळे निळे ढग आमच्या स्वागताची तयारी करत होते.

दाटले आकाशी ढग काळेशार ...

ओथंबले धरेवर अधीर अनिवार

मनी अधीरता लक्ष्य गाठण्याची ...

भ्रांत सोबत्यांची तशीच स्वतःची 

तरीही चालणे वाट अतिआनंदाची ...

असे ती भरतभूच्या प्रदूषण मुक्तीची

15 किमी वरच्या बिनधास्त ढाब्यावर आलो.  याच धाब्यावर रात्रीचे जेवण जेवलो होतो.  मस्त गरमागरम पराठे खाल्ले आणि सुरू झाली पुढची राईड. लवकर लवकर सायकलिंग करा म्हणून सोपानराव घाई करत होता.  तेव्हढ्यात  या धाब्यावर कोल्हापूरहुन बालाजीला जाणारे पाटील  कुटुंब भेटले. त्या कुटुंबातील दोन मुली सायकलिस्ट होत्या. आमच्या बरोबर फोटो काढले. सोपान, विकास आणि नामदेव यांनी राईड सुरू केली.


पहाटे पाऊस पडला होता, त्यामुळे रस्ते ओले होते. रस्त्यावर पसरलेल्या ओलसर मातीमुळे, टायरमधून चर.. चर.. आवाज येते होते. वातावरण अजूनही ढगाळ होते, कधीही पाऊस पडावा असे.


वाटेत लोटस मंदिर लागले.

 हे मंदिर उघडे बोडके  होते. विशेष म्हणजे चारही कडांना साखळी बांधून मध्ये मूर्तीच्यावर स्टीलची मेघडंबरी छत्र म्हणून लटकवण्यात आली होती. एकदम आगळे वेगळे वाटले हे मंदीर. मंदिरावर कानडीत लिहिले होते, त्यामुळे ते कोणत्या देवाचे आहे ते कळले नाही.

वेळ न दवडता आम्ही पुढे निघालो. रस्त्यात आम्ही कप्तान सोपान आणि कंपनीला गाठलेच. तासाभरात एव्हरग्रीन ढाब्यावर येऊन  डोसा आणि गरम इडली भरपेट खाल्ली.

आज लक्ष्मण आणि मी सर्वांच्या पुढे होतो, ते थेट चित्रदुर्ग पर्यंत. कालच्या मिटिंगनुसार मागे राहायचे नाही हे मी आणि लक्ष्मणने ठरविले होते.  दावनगिरी ते चित्रदुर्ग ही जवळपास 75 किमी राईड होती.  सकाळी वातावरण ढगाळ होते. त्यामुळे आज सूर्यदर्शन झाले नाही. दहा नंतर लागणाऱ्या उन्हाचा चटका सुद्धा नव्हता.  पुढचा स्टॉप चित्रदुर्गला जेवणासाठी होता.

लक्ष्मण आणि मी भराभर पुढे जात होतो. अभिजीतची तब्बेत नरम गरम होती,  आज दिपक अतिशय उत्साहाने आणि दमदार राईड करत होता. नामदेव त्यांना कंपनी देत होता.  विकास आणि सोपानराव एका विशिष्ट गतीने पुढे चालले होते. आम्ही चित्रदुर्ग या छोटेखानी शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सहकाऱ्यांची वाट पाहत थांबलो. पावणे अकरा वाजले होते.  

तेव्हढ्यात पंधरा मिनिटे लक्ष्मणने छान डुलकी काढली.   'मागे या' म्हणून कप्तान सोपनचा फोन आला. आमच्या भेटीचे ठिकाण 2 किमी मागे होते.

चित्रदुर्गच्या शून्यपिठाला भेट म्हणजे दिपकच्या ओळखीची पराकाष्ठा होती. आम्हाला आराम करायला एक मोठी खोली मिळाली. स्वामी शिवमूर्ती बसवेश्वरांची झालेली भेट आणि त्यांनी आमच्या कन्याकुमारी राईडला दिलेल्या आशीर्वादाने आम्ही सर्व भारावून गेलो. याच मठात दुपारच्या भोजन-प्रसादाचा आम्ही लाभ घेतला. या चित्रदुर्गला प्राचीन किल्ला आहे. तसेच  महाभारतातील भीम पत्नी हिडीम्बाचे हे गाव आहे.

पुढची राईड सुरू झाली . जोरदार वारे वाहत होते त्यामुळे दोन तासात जवळपास 30 किमी राईड झाली. पुढे अचानकपणे मळभ भरून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसात पुढचे काही दिसेनासे झाले, तरी सुद्धा लक्ष्मण आणि मी हेड लाईट चालू करून भिजत सायकलिंग करत होतो. जवळपास तासभर झाला तरी पाऊस थांबायची लक्षणे नव्हती. तेव्हढ्यात एक धाबा लागला. आम्ही दोघांनी त्याचा आसरा घेतला. पाऊस थांबल्यावर पुढची राईड सुरू केली.

 अर्ध्या तासात पुन्हा ढगांनी दाटी  केली. पुन्हा पाऊस सुरू झाला. 

आम्ही दोघेही चिंब भिजलो होतो.  आता आसरा पाहत होतो. पुढे एका धाब्यावर थांबलो. पाऊस थांबायची काहीही लक्षणे नव्हती.

धाब्यावर भाषेची अडचण जाणवू लागली. सिरा कडे जाणारा रस्ता कसा आहे. राहण्याची व्यवस्था कुठे होईल याची माहिती मिळाली नाही.

तेवढ्यात एक टेम्पो त्या धाब्यावर आला. त्याच्याकडून माहिती मिळाली. अजून चाळीस किमी वर सिरा गाव होते. पुढची राईड सुरू झाली, रस्तावर ट्राफिक तुरळक होती. पाऊस सुरूच होता, परंतू त्याचा जोर कमी झाला होता.

पुढे चालणाऱ्या गाड्यांमुळे सायकल आणि आम्ही नखशिखांत बरबटलो  होतो.  चाकातून उडणाऱ्या चिखल मिश्रित पाण्यामुळे गावाच्या जत्रेत नाचणाऱ्या खेळीया सारखा चेहरा झाला होता. अशा अवतारात घरच्यांनी सुध्दा आम्हाला ओळखले नसते.
अंधार पडायला सुरुवात झाली, रस्त्यात चौकशी केली असता सिरा अजून दहा किमी पुढे आहे हे समजले.

पाऊस थांबला होता पण रस्ते ओले होते. अंधार पडला होता. सायकलचे लाईट चालू करून आम्ही चाचपडत सिराला पोहोचलो.

शेवटच्या काही किलो मीटर्समध्ये दिपक सुद्धा प्रचंड थकला होता.. सोपान, विकास , नामदेव आणि अभिजित आमच्या मागोमाग  सिराला पोहोचले.  आज 140 किमी राईड झाली होती.

सिराला अभिजितच्या ओळखीने पीडब्लूडी गेस्ट हाऊसमध्ये राहायची व्यवस्था झाली. दोन खोल्यात सर्वांना ऍडजस्ट व्हावे लागले.

आंघोळ करून सॅकमधील कपडे काढून सुकविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागला. जेवून झोपायला रात्रीचे 11 वाजले.

 आम्हाला पावसाने झोडपले, चिखलाने माखविले  आणि जिद्दीने  सिरा पर्यंत  पोहोचविले

 एक थ्रिलिंग आणि वेगळा अनुभव होता, धुवाधार पावसात राईड करण्याचा.  पावसाचा जोर एव्हढा होता की चष्म्याला सुद्धा वायपर लावायला हवे होते.

निसर्गाचे अनंत आविष्कार आजच्या राईड मध्ये पाहायला मिळाले.

किती सुंदर आहे हे आयुष्य ! !

आणि असे अनुभव जीवनाचे सौंदर्य आणखी वाढवत होते ! ! !

सतीश विष्णु जाधव

Saturday, May 16, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Five) 29.10.2019 Dharawad to Davangiri. मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस पाचवा) धारवाड ते दावनगिरी

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
29.10.2019   (दिवस पाचवा)

धारवाड ते दावनगिरी

धारवाडच्या कृषी विद्यापीठ हॉस्टेल मधून सकाळी साडेपाच वाजता सायकलिंग सुरू केले.

  20 किमी राईड करून,  हुबळी जवळील टोल नाक्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला. चहा, बिस्किटे खाल्ली.

सोपान म्हणाला,  'लवकर चला आज मोठा पल्ला मारायचा आहे'. नामदेव निघण्यासाठी चुळबुळ करत होता. तो आमचा खजिनदार असल्यामुळे चहावाल्याचे पैसे दिल्याशिवाय त्याला निघता येत नव्हते. विकास लांबूनच त्याची गंम्मत पाहत होता. सोपान आणि विकासकडे हायब्रीड सायकल होती, तर नामदेवकडे MTB, त्यामुळे नामदेवला सायकलिंग करताना जादा जोर काढावा लागत होता. नामदेवाने व्रत घेतले होते, सोपान आणि विकासची पाठ सोडायची नाही. जसे की संत जनाबाईने नामदेवांची पाठ कधीच सोडली नाही.

40 किमी वर 'वीरालमेना' गावात एक टपरी लागली. दिवाळी निमित्त बाजूचा प्रणव धाबा बंद होता. टपरीवरच्या काकीने झकास उपिट खायला घातले. वर चहा पिऊन पुढची राईड सुरू केली.  मी आणि लक्ष्मण निसर्ग भ्रमंतीमुळे मागे राहिलो होतो. मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया, हे गाणे प्रत्यक्ष अनुभवत होतो.

सहा पदरी हायवे वर गाड्यांची रहदारी कमी होती. सकाळी दहाच्या दरम्यान पांढऱ्याशुभ्र  ढगांनी आकाश भरून टाकले होते. ढगांचे वेगवेगळे आकार मनाला भावले होते.   ओठावर "दिवाना हुवा बादल, सावन की घटा छायी" गाणे तरळले. लक्ष्मण दोन्ही हात पसरून ढगांना कवेत घेत होता.

आणखी 18 किमी राईड झाली दहा वाजले होते. उन्हे चढू लागली होती. 

वाटेत एका टपरीवर थांबलो. मुंबईवरून आलेले नाईक कुटुंब भेटले. त्या कुटुंबातील मुलांना आम्ही प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन "मुंबई ते कन्याकुमारी" सायकलिंग करतोय, याचे खूप अप्रूप वाटले. सर्व कुटुंबियांनी आमच्यासह फोटो काढले.

दिवाळी फराळ खायला दिला. आपली मराठी माणसे जेव्हा परप्रांतात भेटतात तेव्हा घरातील माणूस भेटल्याचा आनंद होतो.

पुढची राईड सुरू झाली, आता सर्व बाजूला मोठमोठया पवनचक्क्या फिरत होत्या.

या भागात वाहणाऱ्या वाऱ्याचा, वीजनिर्मितीसाठी प्रचंड उपयोग करण्यात आला होता. रस्त्यात मोठे मोठे ट्रेलर्स; पवनचक्यांचे सुटे भाग, पाती घेऊन चालले होते.  पांढऱ्या ढगांनी आच्छादलेले निळेभोर आभाळ आणि त्यावर पवनचक्यांची रांगोळी, खरच निसर्ग सुद्धा दिवाळी साजरी करत होता. लहानपणी जत्रेत मिळणाऱ्या 'भिरभिऱ्यांची' आठवण पवनचक्क्या देत होत्या. आमचे सुपर सवंगडी पुढे सटकले होते. लक्ष्मण आणि मी 'साथ साथ' चाललो होतो. पण जेव्हा सायकलवर असतो तेव्हा मनाची साथ असते भन्नाट वेगाने पळणाऱ्या.

ऊन वाढल्यामुळे 12 किमी वर शिंगगाम गावात श्री जयलक्ष्मी परिवार धाब्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला. "अनिया पकोडा" म्हणजे  कांदा भजीची ऑर्डर दिली पण भजी तयार नव्हती. म्हणून मी कोल्ड ड्रिंक आणि लक्ष्मणने कॉफी घेतली आणि पुढची सफर सुरू केली.

आता ऊन आणि वारा यांचा दमछाक करणारा मारा सुरू झाला. दुपार झाली होती. सोपान आणि सुपर सवंगडी हवेरी गावाच्या आसपास राजस्थानी ढाब्यावर जेवायला थांबले होते. आम्ही दोघे हवेरी गावात शिरलो. कुठेही ढाबा सापडेना. गावातील गावकरी आमची विचारपूस करत होते. तेव्हढ्यात मोटरसायकलवर दोन राजस्थानी भेटले.

त्यांनी सांगितले हायवे बायपास वर राजस्थानी धाबा आहे. तुम्ही आता गावात आला आहात. आमची आस्थेने चौकशी करून त्यांनी मस्त चहा पाजला.

हायवेला आलो वाटेत 'हवेरी नाला' तुडुंब भरून वाहत होता.

त्यावरील जुना दगडी पुल,  विजयनगर साम्राज्यातील तुंगभद्रा नदीवरील हंपीच्या पुलाची आठवण देऊन गेला.

तसेच हायवे वर आलो, तर राजस्थानी धाबा मागे गेला होता आणि दुसरा दहा किमी पुढे होता. पुढे जायचे ठरविले. रणरणत्या उन्हात पेडलिंग करत होतो. 

तेवढ्यात लाल शर्ट घातलेला मोटर सायकलवाला पुढे जाऊन थांबला.  आम्ही जवळ आल्यावर आमची चौकशी केली. 'रवींद्र' पण सायकलिस्ट होता. आम्ही प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन कन्याकुमारीला जातोय, हे ऐकल्यावर त्याने आईने बनविलेल्या करंज्या खायला दिल्या. पोटात भुकेचा डोंब उसळला होता, त्यात घरची करंजी म्हणजे 'वाळवंटात ओयासिस' सापडले होते. त्याच्या शुभेच्छा आणि प्रेमाने दिलेले करंज्याचे पाकीट घेऊन पुढे निघालो.

जवळपास 105 किमी सायकलिंग झाले होते. मोतिबिनोर गावाच्या जवळ घुमर राजस्थानी ढाबा लागला. दुपार झाली होती.  जेवायची इच्छा नव्हती. चहा बिस्कीटे खाल्ली. लक्ष्मणाला झोप येत होती. दुपारच्या कडक उन्हात माझी सुद्धा सायकल चालवायची इच्छा नव्हती. थोडा आराम करून पुढे निघालो.

आणखी तीन किमी वर मोतिबिनोर बस स्टँड होता. राजस्थानी पाणीपुरीवाल्याकडे रगडापुरी खाल्ली. स्टँड जवळच एक ऑटोवाला होता. त्याने आमची कानडीत  चौकशी करायला सुरुवात  केली. आम्ही मुंबईवरून आलो समजताच मराठी बोलायला लागला. त्याने पुढील रस्त्याची माहिती दिली.

दावनगीरीचे अंतर अजून 58 किमी होते. दुपारचे तीन वाजले होते.  पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.   20 किमी सायकलिंग केले.  रानेबेंनूर गावातील टपरीवर चहा नानखटाई खाल्ली.

पुढे 11 किमी चालेगिरी टोल प्लाझाला थांबलो,  सूर्यबिंब आता मावळतीला लागले होते.  ढगाआड लपू लागले. 

काळ्या ढगांबरोबर किरणांचा लपंडाव सुरू झाला. काळे पांढरे मेघ सुवर्णकडांनी आरक्त झाले होते. निसर्गाचे हे आगळे वेगळे रूप डोळ्यांचे पारणे फेडत होता.

प्रभाकर जोगांच्या व्हायोलिनवरील जुनी गाणी मोबाईल वर लावली होती.

सायकलचा वेग वाढला आणि पुढील 27 किमी दीड तासात पार करून दावणगिरी गाठले. आज 168 किमी सायकलिंग झाले होते.

दावणगिरी हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या मध्यभागी असलेले मोठे शहर आणि दावणगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे कापसाचे  हब असून भारताचे "मँचेस्टर" म्हणून प्रसिद्ध आहे.

सध्या त्याची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाली आहे.

दावनगिरीला सुद्धा दिपकने कमाल केली होती. तेथील पोलीस सुप्रीन्टेंडेंटच्या ओळखीने, पोलीस गेस्ट हाऊसमध्ये आमची राहायची आलिशान व्यवस्था होती. येथेच दिपकचा आणखी एक मित्र ड्रायफ्रूट आणि फळे घेऊन आमच्या स्वागताला आला होता.

त्याच्याबरोबर गप्पा मारत असतानाच,  खुद्द पोलीस सुप्रीन्टेंडेंट साहेब आले. आमची आस्थेने चौकशी आणि सन्मान केला.

  दोन इन्स्पेक्टर आणि पोलीस व्हॅन देऊन रात्री सामिष भोजनाची व्यवस्था सुद्धा केली. बिनधास्त फॅमिली ढाब्यावर जेवण झाले.

पुढील सायकलिंग साठी सर्वांची मिटिंग झाली. दुपारच्या जेवणपर्यंत सर्वांनी कटाक्षाने एकत्र राहायचे ठरविले. कालच्या सायकलिंगमध्ये तसे झाले नव्हते.

मिटिंगमध्ये विकासने एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली, ' जेव्हा घाट किंवा चढ लागतो तेव्हा खूप वर पाहिलं तर चढ अंगावर येतो.  पुढे गेलेल्या सायकलिस्टला आपण गाठू का, असा नकारात्मक भाव निर्माण होतो, आणि आपला रिदम तुटतो. अशावेळी फक्त पुढच्या चाकाच्या थोडेसे पुढे पाहून पेडलिंग करत राहणे'.  खरे होते विकासचे म्हणणे,

   आपले अंतिम लक्ष कन्याकुमारी असताना, छोटे छोटे घाट का बरे पहायचे?'. अनुभवानेच अशा गोष्टी शिकायला मिळतात.

या वेळी सोपानरावांचे हसतमुख आणि हावभावयुक्त  बोलणे, एकदम फर्मास होते. व्यवसायिक असल्यामुळे, समोरच्याला पटविण्याची हातोटी सोपानकडे अफलातून आहे, हे समजले.   लिडरशीप क्वालिटीज त्यात खच्चून भरल्या होत्या.

दिपकच्या मित्राने आणलेले कलिंगड रवाळ तर  सफरचंद एकदम कडक आणि रसरशीत होते.  फळे खाऊन निद्राधीन झालो, सकाळी चार वाजता उठण्यासाठी.

सतीश विष्णू जाधव.

Friday, May 15, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Four) 28.10.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा) संकेश्वर ते धारवाड

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा)  २८.१०.२०१९ संकेश्वर ते धारवाड
संकेश्वरमधील राजधानी हॉटेलच्या टेरेसवरून सायकल खाली घेऊन सामानाची बांधाबांध करून सायकलिंग सुरू करायला सकाळचे सहा वाजले.
प्रभातीच्या सुवर्णछटांनी आसमंत दरवळून निघाला होता.
.
तुरळक काळे मेघ क्षितिजावरील सुवर्णप्रभांमध्ये गहिरे रंग भरत होते. शांत धुंद गुलाबी हवा ढगांच्या रथावर आरूढ होऊन, सुवर्ण किरणांचे आगमन भूतलावर प्रशस्त करीत होती.
सकाळी सर्वांनी स्प्रिंट मारायचे ठरविले. 22 किमी अंतर एका तासात पार केले आणि हत्तरगी टोल प्लाझाला पोहोचलो.
.
तेथे चहा, बिस्कीट खाऊन तडक सायकलिंग सुरू केले.
सकाळचे वातावरण अतिशय आल्हाददायक होते. थोड्या वेळातच आसमंत सोनेरी रंगाने प्रकाशमान झाला.
.
दारमानकी गावाजवळ, सायकलवर एक वयस्क गृहस्थ चालले होते. त्यांच्या जवळून सायकल चालवायला लागलो आणि नाव विचारले, 'बाळाप्पा शिवाप्पा पवार' वय वर्ष ७०,
.
वयाच्या १५ वर्षांपासून सायकल चालवितो, आता दररोज १० किमी राईड करतो', पवार आजोबांनी, त्यांचा सायकल प्रवास सांगितला. खूप आनंद झाला पवार आजोबांना भेटून. अजूनही धडधाकट आणि तुकतुकीत चेहऱ्याचे आजोबा खूप भावले. आम्ही कन्याकुमारीला सायकलवरून "प्रदूषणमुक्त भारत" हा संदेश घेऊन निघालोय, हे सांगितल्यावर, त्यांनाही आनंद झाला. त्यांच्यासह फोटो काढून, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालो.
मध्ये एक छोटा घाट लागला . घाट चढण्याअगोदर दोन केळी खाल्ली, त्यामुळे मस्त एनर्जी आली होती. माथ्यावर पोहोचलो, पलीकडून येणाऱ्या वाऱ्यावर पाण्याचे दोन घोट मारले.
आता भन्नाट उतार सुरू झाला, वाऱ्यावर आम्ही सर्व विहरत होतो. सोपान, विकास आणि नामदेव सुसाटत पुढे निघाले होते. त्यांच्या मागे अभिजित आणि दिपक अगोदर केलेल्या सायकलिंगच्या गप्पा मारत चालले होते. लक्ष्मण आणि मी निसर्गभ्रमणचा आनंद घेत आणि फोटो काढत पेडलिंग करत होतो.
नऊ वाजेपर्यंत जबरदस्त राईड झाली ४५ किमी अंतर सहज पार केले होते. हा प्रदेश कर्नाटकमध्ये असून सुद्धा खूप मराठी माणसे भेटत होती.
ककती गावात नास्ता घेण्यासाठी थांबलो. प्रशांतचा सायकालिस्ट मित्र निखिल आम्हाला भेटायला आला होता. प्रशांतला खूप आनंद झाला. त्याने आमच्यासह १० किमी सायकलिंग केले. त्याच्या शुभेच्छा घेऊन पुढील राईड सुरू झाली.
रस्त्त्यात ७२ वर्षाचे 'कृष्णाप्पा बोंगाळे' काका भेटले. सायकलिंग करत शेतावर निघाले होते. आम्ही कन्याकुमारीला प्रदूषणमुक्तीचा संदेश घेऊन चाललोय याचे खूप अप्रूप वाटले त्यांना. काकांनी, सर्वांच्या खाऊसाठी वीस रुपये बक्षीस दिले आणि योग जागृतीचा सुद्धा प्रसार करा हा संदेश दिला. काकांकडून उस्फूर्तपणे मिळालेले बक्षीस आमच्या प्रदूषण मुक्तीच्या प्रयत्नांना मिळालेले सर्वात मोठे प्रशस्तीपत्र होते.
आता दुपारचे बारा वाजले होते. वरमुंटी घाट चढायला सुरुवात केली. माझ्या सोबत लक्ष्मण सायकलिंग करत होता. घाटात सोपान, विकास, नामदेव, अभिजित आणि दीपक आमच्या पुढे गेले.
घाटाच्या माथ्यावर गेल्यावर तेथे असलेला ऊसाचा रसवाला धावत आला आणि तुमच्या माणसाने रसाचे २० रुपये दिले नाही म्हणून सांगितले. प्रत्यक्षात आम्हाला रस पाजावा, म्हणून अभिजीतने त्याला २० रुपये आगाऊ दिले होते. अशी पण माणसे जीवनप्रवासात भेटतात आणि शिकवून जातात.
पुढे सायकलिंग करताना 'भीमा संताजी' आजोबा भेटले. ते म्हणाले, 'सायकलिंग करतच, मी तालुक्याच्या बाजारात नियमित जात असतो. त्यामुळे गावातील सहकाऱ्यांची खूपशी कामे पटापट होतात'. काटक पण धडधाकट भीमा आजोबांना नमस्कार करून पुढे निघालो.
दरम्यात 'इरेबागेवाडी' येथे चहा प्यायला थांबलो. तेथे तरुण 'संगू गायकवाड' भेटला. आमची आस्थेने चौकशी केली, "हुबळीला काय मदत हवी असेल तर सांगा" हे त्याचे बोल, जवळच्या परिचितासारखे वाटले. गम्मत म्हणजे, तू काय करतो हे विचारल्यावर, "पॉलिटिक्स माझा व्यवसाय आहे आणि सर्व पक्षांना माणसे पुरविण्याचे काम करतो", हसत हसत 'संगू' म्हणाला.
नवनवीन माणसे त्याचे स्वभाव, आस्था, आपुलकी, बोलण्याची कला यामुळे ज्ञानात प्रचंड भर पडली होती. ही माणसे आता जवळची वाटू लागली होती. एका गोष्टीची जाणीव प्रकर्षाने झाली, ती म्हणजे, 'चांगलं काम करायला निघालो की सर्व माणसे आणि निसर्गसुद्धा भरभरून मदत करतो'.
राजस्थान धाब्यावर दुपारी दोन वाजता पोहोचलो ८७ किमी राईड झाली होती. अतिशय सुमार धाबा होता हा. दुपारीच तेथील भाजी संपली होती. दालराईस खावा लागला. राजस्थानातील तरुण मुले कर्नाटकात धाबा चालवितात. परंतु महाराष्ट्रातील तरुण, अशी खाद्य चळवळ परप्रांतात चालविताना तुरळक दिसतो.
जवळच पाण्याचा मस्त हौद होता, त्यामध्ये फ्रेश झालो. आमच्या आधी सोपान, नामदेव, अभिजित, दीपक आणि विकास यांचे जेवण झाले होते. आम्ही आलो आणि ते पुढे निघाले.
दुपारचे ऊन होते, पण वारा छान सुटला होता. लक्ष्मण म्हणाला, ' निसर्ग संगीताच्या तालावर माझ्या सायकलवरील तिरंगा लयबद्ध फडकत आहे'. लक्ष्मणसुद्धा निसर्गावर भाळला होता.
.
नुसती सायकल दामटण्यापेक्षा, लक्ष्मणने निसर्गाबरोबर धरलेला फेर, मन उल्हसित करत होता.
हायवेच्या मध्ये रंगीबेरंगी फुलांचे ताटवे फुलले होते. पिवळी, गुलाबी, निळी, केसरी रंगाची ती रानफुले वाऱ्यावर छानपैकी डोलत होती.
.
या फुलांच्या ताटव्यावर रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत होती. आणि हे काय !, काही फुलपाखरे त्या डांबरी रस्त्यावर धडपडत गतप्राण झाली होती. एवढ्या सुंदर वातावरणात, मस्त हवेवर बागडणाऱ्या फुलपाखरांची अशी अवस्था का बरे व्हावी? एक वोव्हो बस माझ्या बाजूने सुसाटत गेली. त्या बसच्या प्रचंड झोताबरोबर, हायवेच्या मधोमध असलेल्या फुलांच्या ताटव्यातून मधूकण भक्षून रानाकडे परतणारी आणखी दोन फुलपाखरे गतप्राण होऊन माझ्या सायकल जवळ पडली. कोमल हाताने त्यांना उचलून एका झुडपाच्या पानावर ठेवले. खूप चटका लावून गेला तो प्रसंग. मनोमन ठरविले, कर्नाटक सरकारला पत्र लिहायचे, 'हायवेच्या मधे फुलझाडे लावू नका म्हणून'.
त्यानंतर थोडा वेळ आम्ही सर्व्हिस रस्त्यावरून सायकली चालविल्या.
.
पुढे टोल नाका आला, तेथे चहा आणि नानखटाई खाल्ली. आमचे पाच स्प्रिंटर खूप पुढे गेले होते.
वाटेत बेळगाव शहराच्या थोडे पुढे हलगा गावाजवळ कर्नाटक सरकारचे सुवर्ण विधान भवन लागले.
.
निसर्ग रम्य परिसरात अतिशय भव्य आणि विलोभनीय राजवाडा सदृश्य इमारतीचे बांधकाम होते. जवळचे जलमंदिर सुदधा निसर्गाचे सौंदर्य वाढवत होते.
त्यानंतर लक्ष्मण आणि मी, जोरदार पेडलिंग केल्यावर धारवाड जवळच्या टोल नाक्यावर, पुढे गेलेले आमचे पाच साथीदार भेटले. आणखी पुढे जायचे होते. पण दिपकचा मित्र, संजय भाटियाने आमची धारवाड कृषी विद्यापीठात, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती.
येथेच संजय बरोबर संतोषची पण ओळख झाली. संतोष धारवाड मध्ये अक्षयपात्र अन्नदान योजना चालवितो. अक्षयपात्र ही आशियातील सर्वात मोठी किचन आहे. तिचे नाव लिम्का रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाले आहे.
खरच दिपकच्या अफाट जनसंग्रहामुळे आमची ही सायकल सफर अतिशय मजेत आणि कमी खर्चात चालली होती. आपल्याला सहलीत-सफरीत खूप माणसे भेटतात. पण भेटलेल्या माणसांशी संपर्क ठेऊन, वेळप्रसंगी त्यांना मदत करण्याचे काम किती जण करतात. ही हातोटी जपलीय दिपकने, त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी अशी मैत्री जपलेली माणसे लोहचुंबकासारखी खेचत येतात. मैत्री वाढविण्याची आणि जपण्याची अतिशय मस्त कला आहे दिपककडे.
धारावाडच्या कृषी विद्यापीठातील VIP हॉस्टेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती. अतिशय आलिशान होते हॉस्टेल. जेवणसुद्धा सात्विक होते.
धारवाड कृषी विद्यापीठामध्ये सेंद्रिय (ऑरगॅनिक) खते वापरून तयार झालेल्या धान्यातून बनविलेले अन्नपदार्थ रात्रीच्या जेवणात चाखता आले. हा एक वेगळा आणि आनंंददायी अनुभव होता. त्यामुळे १३० किमी सायकल चालविल्याचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता.
कृषी विद्यापीठाचे केअर टेकर राजशेखर सायंटिस्ट आहेत आणि स्वतः ऑरगॅनिक शेती करतात. त्यांनी आमचे यथोचीत आदरातिथ्य केले. प्रदुषण मुक्तीच्या आमच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांच्या शेतीच्या प्रोजेक्ट्ची माहिती दिली.
.
आजची संकेश्वर ते धारवाड सायकल सफर रंगीबेरंगी होती. परंतु फुलपाखरांचा प्रसंग चटका लावून गेला होता. या प्रवासात भेटलेले गावकरी पर्यावरण रक्षणाबाबत खूपच सजग आहेत, याचा प्रत्यय आला. वयस्क गावकरी सायकलिंगमुळे अतिशय सुदृढ आणि कार्यक्षम होते. तसेच धारवाडला भेटलेल्या मित्रांमुळे या सायकल सफारीचा आनंद इंद्रधनुष्यी झाला होता.
त्यामुळे रात्रीच्या गप्पा जबरदस्त रंगल्या. स्वप्नात आलेल्या फुलपाखरांना मी अभय दिले होते.
सतीश विष्णू जाधव

Friday, May 8, 2020

Mumbai To Kanyakumari Cycling (Day 3) मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा)* कराड ते संकेश्वर सायकलिंग*

27.10.2019

Mumbai to Kanyakumari Cycling (Day 3)
मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा)*कराड ते संकेश्वर सायकलिंग*

कराडच्या अलीकडे 6 किमी असलेल्या  आराम हॉटेल पासून पहाटेच आजची राईड सुरू झाली.   सकाळी सर्वांनी स्ट्रेचिंग केले. आज  75 किमी चा पहिला टप्पा कोल्हापूर पर्यंत होता.  आजचे सायकलिंग सरळसोट परंतु चढ उताराचे होते.

कराड पार केले, आणि लक्ष्मणची सायकल चढाला दमछाक करायला लागली. बरीकशा पंचरमुळे हवा कमी झाली होती. नवीन ट्यूब टाकली. त्याच्या सोबत मी होतोच.

बाकीचे सवंगडी पुढे निघाले होते.  आता रस्ता दोन पदरी होता. सिमेंटचा मुख्य रस्ता आणि त्याच्या बाजूला डांबरी रस्ता. या दोन्हीच्या मध्ये एक बारीक चर होता. 

हायवेला सकाळी मोठ्या व्होल्वो प्रवासी बसची खूपच वर्दळ होती. त्यात ह्या बस मोठया कंटेनरला डाव्या बाजूने ओव्हर टेक करताना सायकलच्या खूपच जवळून पुढे जात होत्या. त्यामुळे मुख्य रस्ता सोडून डांबरी रस्त्यावरुनच सर्वांना सायकलिंग करावे लागत होते.  बाजूचा चर सोडून अतिशय काळजीपूर्वक पुढे पुढे चाललो होतो. हायब्रीड सायकलला तर सावधपणे तो बारीक चर टाळावा लागत होता. त्या चरा मध्ये माझी सायकल जाडजुड टायर असूनसुद्धा हडबडली. सायकलच्या मागे असलेले लाल  ब्लिंकर  खूपच महत्वाचे काम करत होते.

वातावरण कुंद झाले होते. काळ्या ढगांची दाटी नभांगणात झाली होती.

हिरव्यागार शेतावर विहरणारे पहाटपक्षी पावसाच्या आगमनाची चाहूल आपल्या किलबिलाटाने देत होते.   रस्त्याच्या कडेला आणि शेतांच्या बांधावर असणारी सुबाभूळ, भेंडा, नारळाची झाडे सुद्धा वाऱ्यावर माना डोलावत पक्षांना साथ देत होते. अशा धुंद निसर्गात, मनाच्या तारा झंकारल्या, "सुहाना सफर है ये मौसम हसी, हमे डर है हम खो न जाये कही" हे बोल आपसूक मुखातून बरसू लागले. देहभान विसरणे याचा अर्थ आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. या निसर्गात विरघळून जावे, हे भाव मनात उमटले.

आता टक्क उजाडले होते. दीड तासातच छोट्या टपरी वजा सरस्वती हॉटेल मध्ये थांबलो.  कांदापोहे नास्ता केला.  विजयने दिलेला  जडिबुटी-हळद मिश्रित दुधाचा मसाला घालून प्रत्येकाने एक एक ग्लास दूध घेतले. या मसाले दुधाने अतिशय मस्त एनर्जी आली. आठ वाजले आणि सूर्याचा प्रकाश त्याचे तेज दाखवू लागला. सोपानराव सर्वांना सांगत होते, 'दुपारपर्यंत आपणास 100 किमी मारायचे आहेत', जरा जोर मारा.

वाटेत 'नेरले गाव' लागले. "आधार फाउंडेशन" तर्फे मुख्य रस्त्यावर सामूहिक दिवाळी साजरी करणे सुरू होते. आम्हाला पाहून आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते  पुढे आले, आमची चौकशी केली. कोल्हापूर सकाळचा वार्ताहर विजय लोहारची सुद्धा भेट झाली.

त्याने "प्रदूषण मुक्त भारत" या उपक्रमाबद्दल, दिपक आणि माझी मुलाखत घेतली.  सामूहिक दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व गावकरी एकत्र आले होते. गावकऱ्यांनी प्रदूषणमुक्ती  उपक्रमाच्या निमित्ताने आमचा सन्मान केला तसेच  समृद्धी नास्ता सेंटर द्वारे, मसाले दूध प्यायला दिले.

कोल्हापूर पर्यंतचा पुढील रस्ता चढ उताराचा होता. मध्ये मध्ये लागणारे पूलसुद्धा 'हेडविंड' मुळे (विरुद्ध दिशेने वाहणारे वारे) दमछाक करत होते. मध्ये टोल नाका लागला, खूप वर्षांनी गोटी-सोडा प्यायला मिळाला. वातावरण अजूनही ढगाळ होते. हिरव्यागार गालिच्यावर नभांची नक्षीदार रांगोळीच दीपावलीच्या मुहूर्तावर सजली होती.


परंतू पाऊस पडत नव्हता. वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे ढग सुद्धा सैरावैरा पळत होते. जणूकाही आमच्या सायकल बरोबर लपंडाव खेळत होते.

दीड वाजता कोल्हापूर गाठले होते.  करवीर नगरामधील हायवेला उजलाईवाडी  येथे "ऑरेंज हॉटेल" मध्ये जेवणासाठी थांबलो.

अतिशय मस्त ऐम्बीयन्स होता या हॉटेलचा. हॉटेल मधील सर्व कामगार वेटर्स यांनी ऑरेंज रंगाचे कपडे घातले होते. चिकन मसाला थाळीचे जेवण सुद्धा फर्मास होते. पुन्हा पांढरा आणि तांबडा रश्यावर ताव मारला. या रश्यामुळे सायकलींगचे श्रम हवेत विरून गेले होते.

पुढील सायकलिंग सुरू झाले. दुपारच्या उन्हाचा कडाका आता वाढला होता. कागल बस स्टँड पर्यंत 91 किमी सायकलिंग झाले होते. कागल येथील हायवेला असलेल्या बाजारपेठेत आम्ही पोहोचलो. लक्ष्मण आणि मी हायड्रेशन ब्रेक घ्यायचे ठरविले. बाकीची मंडळी पुढे निघाली होती.

सायकलवर असलेल्या सामानामुळे तसेच सायकलिंगच्या पोशाखामुळे आम्ही तेथील गावकऱ्यांचे केंद्रबिंदू होतो. आमची चौकशी सुरू झाली.  लक्ष्मण आणि माझी दमछाक झाली होती. इतक्यात जवळच असलेल्या भेळपुरीवाल्याने झक्कास भेळपुरी आणून दिली. तेथील गावकऱ्यांनी आम्हाला गराडा घातला होता. कुठून आले, कुठे निघालात? या सर्व प्रश्नांची उत्तरे लक्ष्मण तडफेने देत होता. 

सायकलला लावलेला "मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग आणि प्रदूषणमुक्त भारत"  हा बोर्ड वाचून विस्फारीत नजरेने त्या जमावातील  तरुण प्रश्न  विचारू लागले. आता लक्ष्मण मधील व्याख्याता जागृत झाला. सविस्तर माहिती तसेच या सायकल वारीचे प्रयोजन लक्ष्मणभाऊ सर्वांना समजावून सांगू लागले.

मी निमूटपणे भेळपुरी खात होतो. हळूच त्या गर्दीतून सटकून भेळपुरी गाडीजवळ आलो आणि पाणीपुरी सुद्धा गटकावली. आता त्या जमावाचा चार्ज मी घेतला आणि लक्ष्मणला भेळपुरीवाल्याकडे पिटाळले.  पंधरा मिनिटात सर्वांचे समाधान केले, तसेच प्रदूषण मुक्तीचे महत्व सांगितले. पुढे प्रस्थान करणार इतक्यात चहाचा कप सुद्धा हातात आला. आमच्या भेळपुरी आणि चहाचे पैसे त्या जमावातील कोणीतरी दिले होते.

सर्वांचे आभार मानून पुढची सफर सुरू झाली. पुढील दहा किमी टप्प्यात बाकीच्या सायकलिस्ट मंडळींची भेट झाली. त्यानंतर तीन तासात संकेश्वर गाठले. दाभाळे कॉम्प्लेक्स मधील 'राजधानी हॉटेल' मध्ये राहायची व्यवस्था झाली.

  सायंकाळचे सहा वाजले होते, संकेश्वर गाठायला.   आज 133 किमी राईड झाली होती.

हॉटेलच्या टेरेसवर सायकल ठेवल्या. उजेड आल्यामुळे संकेश्वर बाजारपेठ फिरलो. छान सफरचंद मिळाली. विक्रेते प्रामाणिक आणि हसतमुख होते. केळी सुद्धा रसरशीत मिळाली. रात्री बाजूच्याच "वीरशैव लिंगायत धाबा" मध्ये शाकाहारी जेवण जेवलो. दिवाळीचे लक्ष्मीपूजन प्रत्येक दुकानात चालू होते. मराठी बोलणारे बरेच मिळाले.

आता दिवसेंदिवस आम्हा सर्वांचा आत्मविश्वास वाढत होता. आजच्या सफरीत जी जी मंडळी भेटली त्यांनी खूपच प्रेमाने आमचे आदरतिथ्य केले होते. उदात्त ध्येय असेल तर प्रभावित जनप्रवाह उदारहस्ते मदत करतो याचा प्रत्यय आला.

पूर्वी ऋषी-मुनी साधु-संत अशाच कारणांसाठी भ्रमंती करत असावेत काय?

आज नितांत सुंदर निसर्ग दर्शन झाले होते तर नटखट ढग आमच्या सायकलशी स्पर्धा करत होते. या सौंदर्याला मनात साठवून निद्रेच्या अधीन झालो.

सतीश विष्णू जाधव


Wednesday, May 6, 2020

पाली गणपती सायकल भेट* 03.03.2020

03.03.2020 * पाली गणपती सायकल भेट*

*पाली गणपती सायकल भेट*

मंगळवार म्हणजे गणपतीचा वार. आज ठरले, पालीच्या गणपतीला भेट द्यायची. विजयची संकल्पना मी उचलून धरली आणि आजची सायकल सफर सुरू झाली.

अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा *बल्लाळेश्वर* ओळखला जातो. बल्लाळ या गणपती बाप्पाच्या असीम भक्तामुळेच त्याला बल्लाळेश्वर म्हणतात.

पंधरा दिवसांपूर्वीच ओझरच्या बाप्पाची भेट घेतली, आज पालीच्या गणपतीच्या भेटीला निघालोय. अशा प्रकारे निसर्ग भ्रमणाबरोबर गणरायाचे दर्शन तर घडणार आहेच. तसेच *प्रदूषण मुक्त भारत*  या संकल्पनेसह शारीरिक स्वास्थ्य; या बहुआयामी कार्यावर विजयसह निघलो आहे.

सकाळी पावणे आठ वाजता खोपोली वरून सायकल सफर सुरू झाली. खोपोली ते पाली 42 किमी अंतर आहे. हा रस्ता पुढे कोलाडला जातो. अजूनही कोकणात जाणारे चाकरमानी पेण, वडखळ मार्ग टाळून खोपोली, कोलाड मार्ग अवलंबतात, त्यामुळे या रस्त्याला सतत ट्राफिक होती.

हा रस्ता चौपदरी करण्याचे काम प्रगती पथावर आहे. परंतु मध्ये काही काही पॅच अतिशय खराब आहेत. कभी खुशी कभी गम, तर कधी हसू कधी आसू असे ऑफ रोडिंग सायकलिंग होते. सिमेंटच्या रस्त्यावर सुसाट धावणारी सायकल अचानक दगड धोंढ्यात येते आणि सर्व अंग व्हायब्रेट होते.

सध्यातरी हा रस्ता फक्त MTB साठीच योग्य आहे. याचा वेळी "हम है राही प्यार के हमसे कुछ ना बोलीये, जो भी प्यारसे मिला हम उसीके हो लिये" गाणे लागले होते. निसर्ग;  येणारी प्रत्येक परिस्थिति स्वीकारण्याचा मंत्रच आमच्याकडून गिरवून घेत होता.

दीड तासात अर्ध्या रस्त्यातील परळी गावात पोहोचलो. डोळे, कान, नाक, चेहरा सर्व धुळीने माखला होता. तोंडाला स्कार्फ असून सुध्दा नाकाच्या आत धूळ चिकटली होती. हाताला घातलेला स्किनर सुद्धा काळा पट्टेरी झाला होता. आज खूप दिवसांनी रीयल ऑफ रोडिंग सायकलिंग केली होती. चेहरा व्यवस्थित साफ करून, टपरीवर चहा घेतला आणि पुढची राईड सुरू केली.

दहा वाजता पाली मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराच्या  मार्गावरून बदलापूर नगर परिषद शाळेचे बरेच विद्यार्थी बाप्पाचे दर्शन घेऊन परत निघाले होते.

त्यांनी आम्हा दोघांना गराडा घातला. त्या सर्वांना प्रदूषण मुक्तीचा आणि सायकल चालावा, तसेच झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला. तर विजयने गुरुजींना सांगितले तुम्ही सायकल चालविली तर विद्यार्थी तुमचे अनुकरण करतील. सर्वांबरोबर ग्रुप फोटो काढून त्यांना निरोप दिला.

आम्ही बाप्पाच्या मंदिरात गेलो. पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.  हे मंदिर साडेतीनशे वर्षाचे पेशवे कालीन आहे. काळ्या पत्थराचा गाभारा आणि वरच्या गोल घुमटावरील आर्च अप्रतिम आहे. काळा दगड व्हर्निश लावल्यामुळे चमकत होता.

बल्लाळेश्वराची मूर्ती वालुकामय आहे. तीला शेंदूर लेपन केले आहे. अष्टविनायकापैकी एक असलेले हे स्वयंभू देवस्थान आहे. बाहेरील सभामंडप, शिसवी लाकडाच्या खांबावर आहे. संपूर्ण लाकडी महिरप आणि महिलांसाठी गवाक्ष त्या खांबावर बनविलेला आहे. पेशवेकाळात आरतीच्या वेळी महिलांसाठी खास बसण्याची व्यवस्था या गवाक्षात होती. मंदिराच्या सभागृहात बसविलेले पंखे, झुंबर, घड्याळ तसेच स्टीलचे रेलिंग आणि लोंबणाऱ्या विजेच्या वायर, या सुंदर दगडी आणि लाकडी पुरातन शिल्पाच्या कलात्मकतेला बाधा आणत होत्या. मंदिराच्या आत फोटो काढणे निषीद्ध आहे

मंदिराच्या प्रांगणात  भलेमोठे दगडी "जाते" आहे.

या जात्यात चुना आणि गूळ दळून मंदिराच्या 
बांधकामासाठी, दगडी चिरे जोडण्यासाठी वापर करण्यात आला होता, अशी माहिती साठे गुरुजींनी दिली. या मंदिराच्या मागेच सरस गड आहे. बाप्पासाठी जागृत पहारा देणारा गण असावा.

बाप्पाचा परम भक्त बल्लाळच्या धुंडी विनायकाचे प्रथम दर्शन घ्यावे लागते.

अकरा वाजता महाप्रसाद सुरू होतो. फक्त वीस रुपयात सुग्रास भोजन प्रसाद  मिळतो. तो भक्षण करून परतीच्या प्रवासाला बारा वाजता सुरुवात केली.

आता उन्हाचा कडाका जबरदस्त होता. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि खोपोलीकडे सुसाटत निघालो. तीन तासात खोपोली फाट्यावर पोहोचलो. थंडगार ऊसाचा रस पिऊन ताजेतवाने झालो.

विजयची रग अजून शिल्लक होती. तेथून 14 किमी असलेल्या कर्जत स्टेशनकडे कूच केले. खोपोली, पळसदरी, कर्जत रस्ता चारपदरी आणि टकाटक आहे. बरोबर चार वाजता कर्जत गाठले आणि सायकल सफरीची सांगता झाली.

*आज शंभर किमी राईड झाली होती.*  ही राईड विजयने दमछाक न होता सहजपणे पूर्ण केली होती. हे आजच्या सायकल सहलीचे फलीत होते.

माझ्या काही दोस्तांना, माझे हे  सायकलिंग  अतिरेक वाटतो. तर काही मित्रांनी, रक्तदानाची शंभरी झाली, आता बस कर!, असाही सल्ला दिलाय.

*खरं तर सायकलिंग सोबत "प्रदूषण मुक्त भारत" आणि "रक्तदान म्हणजे जीवनदान" या संकल्पनांचा मी प्रचार, प्रसार करतो आहे. या कार्यासाठी माझे शंभर वर्षाचे जीवन सुद्धा फार तोकडे आहे आणि जेव्हा असे सल्ले येतात, तेव्हा माझा जीवन प्रवास  योग्य मार्गाने सुरू आहे याची खात्री पटते.*

*शेवटी किती जगला यापेक्षा कसा जगला हेच महत्वाचे आहे.*

*गणपती बाप्पा मोरया*

सतीश विष्णू जाधव