Monday, September 28, 2020

श्री हरिहरेश्वर सायकल राईड दिवस १

श्री हरिहरेश्वर सायकलिंग दिवस १

२६ सप्टेंबर, २०२०

आज विजयला ऑफिस मधून लवकर सुट्टी मिळाली, त्यामुळे दुपारी बारा वाजता भाऊच्या धक्क्याकडे सायकल राईड सुरू झाली. साडेबारा वाजता धक्क्याला पोहोचलो आणि मांडव्याला जाणारी रो रो बोट डोळ्यासमोरून पसार झाली.

 विजय रेवस बोटीची तिकीट काढायला गेला. तर रेवस मार्ग बंद होता. मोरा लॉन्च सर्व्हिस सुरू होती. परंतु मोरा लॉन्च न पकडता, मांडावा लॉन्च पकडण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरून गेट वे ऑफ इंडियाला गेलो. पण तेथील बोट सर्व्हिस सुद्धा बंद होती. म्हणून पुन्हा भाऊच्या धक्क्यावर सायकलिंग करत आलो. 
 
 अडीच वाजता मोरा साठी लॉन्च होती. तासाभरात मोरा जेट्टीवर पोहोचलो. तेथून दहा किमी ऑफ रोडिंग सायकलिंग करत कारंजा बंदरावर आलो. 

तेथून लॉन्चने रेवस बंदरावर आलो. साडेचार वाजले होते. अलिबाग ला राहणारा शाळकरी मित्र कुणालला फोन करून उशीर झाल्याची माहिती दिली. मान गावाच्या फाट्याजवळील कुणालचा औदुंबर बंगला रेवस वरून वीस किमी अंतरावर आहे. रेवस ते अलिबाग सुद्धा ऑफ रोडिंग सायकलिंग होती. 

आता जोरदार राईड सुरू केली आणि तासाभरातच कुणालच्या बंगल्यावर पोहोचलो. गेट जवळच गार्गीची  भेट झाली. कुणाल स्वागताला पुढे आला. तेवढ्यात मुलगा शुभम सुद्धा हसत हसत भेटायला आला. बंगल्यातून संध्या आली. विजय आणि माझे थाटात स्वागत झाले.

संध्याच्या हातच्या खुसखुशीत इडल्याचा नास्ता आला. फक्कड कॉफी आणि शुभमने बनविलेला झकास ब्राऊनी केक सुद्धा आला.  सर्वांबरोबर गप्पा मारत मारत सर्व नास्ता फस्त केला. 

कुणाल आम्हा दोघांना कार मधून थळच्या टेकडी वरील दत्त मंदिरात  घेऊन गेला. अतिशय निसर्गरम्य वातावरणात  संध्याकाळ अवतीर्ण झाली होती. थळ RCF चा संपूर्ण परिसर आणि मोठेमोठे प्लांट लाईटमध्ये चकाकत होते.  तेथील शांतता आणि निवांतपणामुळे सायकलिंगचा शिण कुठल्या कुठे पळाला. 

कुणाल...,  रेडिओ ऑफिसर म्हणून मर्चंट नेव्हीच्या नोकरी निमित्ताने संपूर्ण जग फिरला असल्यामुळे त्याच्याकडे माहितीचा खजिना आहे. तो कोणत्याही विषयावर सहज बोलू शकतो.  सकारात्मक विचार करणारा कुणाल सतत काहींना काही काम करीत असतो. तोच वसा मुलगा, शुभमने घेतला आहे. 

शुभम गाड्या पार्किंगसाठी नजाकतदार गॅरेज बनवितो आहे. विविध विषयात त्याची मास्टरी आहे. मुलगी गार्गी सुद्धा पी एच डी करून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे.

रात्री संध्या आणि गार्गीने बनविलेल्या शाकाहारी जेवणाची लज्जत काही औरच होती. पोळ्या, चवळीची भाजी, वरण, भात, घरगुती लोणचे आणि लवंग, वेलची घालून बनविलेला आमरस, सर्व एकदम फार्मास !!!

असे हे चाकोनी कुटुंब गेली सात महिने मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून अलिप्त होऊन, अलिबागला राहतंय. कुणालच्या औदुंबर या बंगल्याच्या परिसरात आंबा, फणस, चिकू, नारळ पोफळीची झाडे आहेत. तसेच परसदारात असलेले सोनटक्का फुलांचे झाड मंद आणि आल्हाददायक सुवास पसरवीत होते. रात्री व्हऱ्यांड्यात गप्पा मारायला बसल्यावर पारिजातकाच्या सुवासाने मनाला वेगळी ऊर्जा मिळाली. 

कुणालच्या गावचे नाव सुद्धा वैशिट्यपूर्ण आहे "मान तर्फे झिराट". उद्या पहाटे पाच वाजता सायकल सफर सुरू करायची असल्यामुळे, फार कमी कालावधी मिळाला या कुटुंबासोबत गप्पा मागण्यासाठी.

या कुटुंबाबाबत  एक मात्र जाणलं... "आजचा दिवस माझ्या उर्वरित जीवनातील पहिला दिवस आहे" अशा उस्फुर्त आणि आश्वासक पद्धतीने हे कुटुंब जीवन जगत आहे.

आजची ३५ किमी सायकलिंग ऑफ रोडिंग, दोन दोन लॉन्च सफरीने नटलेली, विविधरंगी होती. तसेच माझा शाळकरी मित्र कुणाल आणि त्याच्या कुटूंबाची  नव्याने झालेली ओळख  मनात एक सुखद कप्पा निर्माण करून गेली. ही ओळख माझ्या मर्म बंधातली ठेव झाली आहे.

आणखी एक गोष्टींची प्रचिती आली... आपलं ध्येय निश्चित झाले असेल तर,  कितीही अडचणी आल्या तरी ध्येय पूर्तीसाठी मनापासून सतत प्रयत्नशील राहिले की निसर्ग सुद्धा तुम्हाला साथ देतो. 

सतीश जाधव
आझाद पंछी .....

12 comments:

  1. सतीश सर,
    खूप मस्त enjoy करताय 👌👍

    ReplyDelete
  2. Kiti sundar varnan kelay
    Asa vatt ki mi suddha ya pravasat aahe aani ya pravasacha aanand ghetey

    ReplyDelete
  3. मित्र कुडतरकरचे अभिप्राय

    काय सुरेख वर्णन आहे अलिबाग येथील शाळकरी मित्र कुणाल यांच्या घराचे आणि प्रेमळ सकारात्मक विचार असणारे कुटुंब.👍🏻🌷

    ReplyDelete