Sunday, August 23, 2020

गवत फुला रे गवत फुला... राईड

गवत फुला रे गवत फुला... सायकल राईड

२२ ऑगस्ट, २०२०

सकाळी चहा बिस्कीट आणि कोकणफेम कुरमुरा लाडू खाल्ला आणि पडलो बाहेर सायकल सफरीवर. 

गावागावातून राईड करायची होती.  म्हणून हायवेला जाणारा रस्ता टाळून डावीकडे वळलो. सुरुवात चढाने झाली. छोटी घाटी चढत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोनतल, तिरडा, शिरवट ही गवतफुले पसरली होती. कोकणात आज येणाऱ्या बाप्पाच्या डोक्यावर मखरला हीच सोनतल गवतफुले लावली जातात. 

घाटी संपली आणि वाल्ये गावची हद्द संपून बंदीवडे गाव सुरू झाले. वाटेत भारद्वाज पक्षी बसला होता. मला पाहताच पंख फडफडत उडून गेला.  त्याने उडताना हवेत सूर मारल्या सारखी पोज घेतली. त्या बरोबर त्याच्या करड्या पंखांची पांढरी टोके एकत्र आली,  ती अतिशय विलोभनीय दिसत होती.  जणूकाही विमानातून बाहेर पडणाऱ्या धुरासारखी भासली.  खंड्या (किंग फिशर) चे दर्शन झाले.  त्याची अणकुचीदार चोच शरीराच्या मानाने खूप मोठी होती. सुतार पक्षी झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर कलाबाजी करत होता.

बंदीवडे गाव ओलांडल्यावर पुन्हा घाटी सुरू झाली. एक मुलगा हातात काहीतरी घेऊन चालला होता. त्याच्या टीशर्टच्या मागे ऋषी नाव लिहिले होते. त्याच्या जवळ पोहोचल्यावर मला आनंद झाला. त्याला म्हणालो, 'काय ऋषी, सोलतोयस नारळाची किशी, चाललास कुठे खुशी खुशी..." ऋषी म्हणाला, "गणपती आनूक चाललंय". 

बुलबुल पक्षांची जोडी दिसली. किलबिलाट करत, एकमेकांशी मस्ती करत होते. चढाच्या एका वळणार मोठा सरडा, रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला तुरुतुरु पळताना दिसला.  झाडाच्या खोडावर चढला. सायकल थांबवून हसत त्याच्याकडे पाहिले. तो माझ्याकडे एकटक पहात होता. मला स्माईल देत टाटा करत होता. निसर्गातील निरागस प्राणी जगत सुद्धा निसर्गाचे वेगळे रुप दाखवत होते. 

  हा घाट बऱ्यापैकी उंच होता. घाट संपवून वरच्या टोकावर आलो.  समोरील विस्तीर्ण सह्याद्री डोंगर हिरव्याटच्च झाडांनी व्यापून गेला होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या जगबुडी नदीचे विशाल पात्र तसेच खारेपाटण गाव आणि त्याच्या जवळ असलेला पूल ह्या सड्यावरून विहंगम दिसत होता. डोंगराचा उतार आंबा, काजूंच्या झाडांनी बहरून गेला होता.
  
 काळ्या राखाडी ढगांनी आकाश भरलेले होते. माळढोक पक्षांचा थवा आकाशात विहार करीत होता. त्यांना पाहून आपल्याला उडता आलं असत तर काय बहार आली असती, हा विचार आला. हे सर्व पाहिल्यावर घाट चढताना लागलेला दम क्षणात नाहीसा झाला.
  

 आता डोंगरावरील सडा लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्या गवतावर लाल, पिवळ्या, निळ्या गवतफुलांचा बहर आला होता. हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर काय किंवा सातारचे कास पठार काय, माझा कोकण कणभरही कमी नाही फुलांच्या  विविधतेमध्ये.
 

आता प्रिंदावन गावात प्रवेश केला. घरातून गणपतीच्या आरतीचा गजर ऐकू येत होता. रस्त्यावरील टपरीवजा दुकाने बंद होती. त्यानंतर पुन्हा चढाचा रस्ता सुरू झाला. आजुबाजुला कलमी आंब्याच्या वाड्या दिसत होत्या. प्रत्येक कलमाच्या खाली पिवळ्या फुलांनी फेर धरला होता. 

जुवाटी गावात प्रवेश केला. रस्त्याच्या बाजूला भाताची पाती तरारून आली होती. मध्ये मध्ये पावसाचा शिडकावा होत होता. जुवाटी तिठ्या वरून जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाकडे रस्ता जात होता. येथून जैतापूर २५ किमी आहे. 

अडीच तास राईड झाल्यामुळे जैतापूरला न जाता हायवेला यायचे नक्की केले. वाटेत रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब मराठे डिगरी कॉलेज लागले. संपूर्ण परिसरात शुकशुकाट होता. तेथुन हातीवले हायवेला आलो.  

हातीवले वरून राजापूर दहा किमी अंतरावर होते. राजापूरच्या घाटीत छानसा धबधबा आहे. त्यामूळे राजापूर खाडीपर्यंत जायचे नक्की केले. 

 टोल नाक्यापर्यंत चढ चढून उतार सुरू झाला. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरील उतारावर सायकल रॉकेट सारखी पळत होती. राजापूरच्या खाडी पुलावर आलो. राजापूर पर्यंत समुद्राच्या भरतीचे पाणी येते. सह्याद्रीतून वाहणारी अर्जुना नदी पावसाळ्यात खाडीच्या पाण्याला समुद्रापर्यंत ढकलत नेते. पंधरा दिवसांपूर्वी हा अर्जुना नदीवरील पूल,  पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जवळपास सहा तास बंद ठेवण्यात आला होता. तयार होणाऱ्या एक्सप्रेस वे वर आता खूप उंचावर नवीन पूल तयार होतो आहे. 

परतीच्या प्रवासात राजापूर घाट चढत धबधब्यावर आलो. हायड्रेशन ब्रेक घेतला. धबधब्याकडे फोटो काढूले. हायवे वरून राईड करत हातीवले, कोंडीये गाव पार करून वाल्ये गावाकडे वळसा घेतला.

आजची ८० किमी सफर गावागावातून होती. गवतफुलांच्या प्रदेशातून होती. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून होती.

एक मावळा घोड्याऐवजी सायकल वरून या पावन भूमीला वंदन करीत होता. वाऱ्यावर डोलणाऱ्या गवत फुलांचा आस्वाद घेत होता.


क्षणभंगुर हे आयुष्य तुमचे...

क्षणभंगुर ही नाती...

क्षणा क्षणाला आनंद देता...

अनंत जगण्यासाठी...


सतीश जाधव
आझाद पंछी...

Saturday, August 22, 2020

पाऊस वारे... नटलेले झरे... सायकल राईड

पाऊस वारे... नटलेले झरे... सायकल राईड

२१ ऑगस्ट २०२०

पहिल्यांदाच सायकलची चाके काढून फ्रेम काररॅकला लावून कारने मुंबई राजापूर प्रवास केला होता. आज सकाळीच सायकल असेंबल केली. आता सुरू झाली राजापुरातील वाल्ये गावातून सायकल सफर. कुठे जायचे, कुठपर्यंत जायचे याचा काहीच थांग नव्हता. मनाला मोकाट सोडून, छोट्या रस्त्यावरून हुंदडणे हाच एक कलमी कार्यक्रम होता. 

वातावरणात सुखद गारवा होता. ओलसर वाट आणि दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ मनाला अल्हाद देत होती. गावाच्या वाटांचे एक मस्त असते. रहदारी नाही वर्दळ नाही, फक्त आणि फक्त निसर्ग.
हा निसर्ग, कधी झुळझुळ वाहणाऱ्या  ओढ्याच्या खळखळटात दिसतो. तर कधी पक्षांच्या विविधअंगी किलबिलाटात दिसतो. फुलपाखरांच्या रंगीबेरंगी पंखात दिसतो, तर कधी खारुताईच्या झुबकेदार शेपटीत दिसतो. हंबरणाऱ्या गाईंच्या तांड्यात दिसतो, तर कधी देवळाच्या नादमय घंटीत दिसतो. ही निसर्गाची सर्व रूपे पाहताना मन मोहरून जाते.

वाटेत कोकणातल्या हिरवाईने हिरवटलेला मैलाचा दगड लागला. मैलाच्या दगडाभोवती लालपिवळ्या गवतफुलांनी फेर धरला होता. आपल्या पांढऱ्या रंगाचा मुलामा निसर्गाला अर्पण करून, हिरवी दुलई अंगावर ओढून तो फुलांशी हितगुज करत होता. 
हे पाहून  सायकल त्याच्या पुढे नतमस्तक झाली आणि म्हणाली,  "किती भाग्यवान आहेस तू, कोकणच्या वातावरणात तुही रंगून गेलास."  माईल स्टोन हसला आणि म्हणाला, "अग वेडे, तुझं नशीब थोर म्हणून थोड्याच कालावधीत कन्याकुमारीला जाऊन पण आलीस."  दोघांचा सुसंवाद सुरू असताना बाजूच्या कातळावरून पडणाऱ्या पाण्याचा स्वाद घेत होतो. 

 पावसाचा पाण्याने ओघळणाऱ्या आणि लाल रंगाने माखलेल्या गावागावातून जाणाऱ्या छोट्या पाऊल वाटा सह्याद्रीचा रांगडेपणा सांगत होत्या. राकट देशा... महाराष्ट्र देशाचे अंतरंग काटेरी फणसासारखे रसाळ आहे,  हेच त्या वाटे भोवतालची हिरवीगच्च आंबा, काजूची झाडे;  शेगला, अळूची रानवट रोपटी सांगत होती. 

वेडावाकडा आणि चढ उताराचा रस्ता महामार्गाकडे निघाला होता. या रस्त्यावरून चढला एक बाय दोनवर गियर सेट करून चढ चढावा लागत होता. तर उताराच्या भन्नाट वेगावर ब्रेकने नियंत्रण ठेवावे लागत होते.
 वाल्ये गावच्या वेशीवर खळखळत वाहणारा ओढा लागला. दगडावरून उसळी घेणाऱ्या पाण्याचे थेंब अंगावर घेण्यासाठी समोरच्या हिरवळीवर बसकण मारली. एव्हढ्यात पावसाची बरसात सुरू झाली.  वरून कोसळणाऱ्या जलधारा आणि ओढ्याच्या पाण्याचा मारा यामध्ये अंग अंग रोमांचले.
 
 आता शेजवली गावातून राईड सुरू झाली. गावात गणपतीची लगबग दिसली. परंतू एका घरातील दोन किंवा तीन माणसेच बाप्पाची मूर्ती घेऊन येत होते. अजूनही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर संशयाचे सावट होते.  हेल्मेट घालून सायकलिंग करणाऱ्या नवख्याकडे आश्चर्याने पहात होते. 
 
शेजवली गावच्या शाळेच्या फळ्यावर एक  कविता लिहिली होती. क्षणभर थांबून कविता वाचली 

 "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...
 
एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे" 

 कविवर्य विंदा करंदीकर यांची कविता पाहून, निसर्गाकडून भरभरून मिळालेला आनंद शब्दरूपाने सर्वांकडे पोहोचविण्याची उर्मी उफाळून आली. शेजवलीचा रस्तासुद्धा चढ उताराचा होता. तसाच पावसाचा शिडकावा कधी हलकासा तर कधी भरात येत होता.

मुंबई गोवा हमरस्त्यावर आलो. हा हायवे सिमेंट काँक्रीटचा  चार पदरी झाला आहे. या प्रशस्त महामार्गावरून सायकलिंग करताना त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यात निसर्गाचे प्रतिबिंब परावर्तित होत होते. हायवेवर असलेल्या मैलाचा दगडावर सायकल थांबवून आरश्यासारख्या रस्त्यासह फोटो काढला.
 या हायवेला सर्व्हिस रस्ता सुद्धा आहे. पांढऱ्या पट्ट्याच्या आतून सायकल हाकणे अतिशय सुखरूप होते. हायवेला दर दहा फुटावर झाडे लावली आहेत. कालांतराने हा प्रशस्त हायवे सुद्धा हिरवाईने भरून जाईल याची खात्री आहे.   रस्ते प्रशस्त करताना पर्यावरणाचे भान आहे याचा आनंद झाला. 

मधूबन हॉटेल जवळील नदी ओलांडून खारेपाटण म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. तेथे ट्राफिक पोलिसांनी अडवून चौकशी केली. खारेपाटण बाजारात जातोय हे कळल्यावर सोडून दिले. खारेपाटण बाजाराला एक फेरफटका मारला. भैरोबा मंदिराकडे आलो, सोशल डिस्टनसिंगमूळे मंदिरात जाणे टाळले.  
  
  तीस किमी राईड करून रिमझिम पावसाच्या धारा अंगावर घेत घरी परतलो. या परतीच्या प्रवासात मनाच्या पटलावर काही ओळी आल्या...

आवडेल मलाही पाऊस व्हायला …

एकट्या मनाची सोबत करायला …

कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला …

मन तरुण असेल तर...

जगण्याची आहे नशा…

म्हणूनच सगळे विसरा

आणि निसर्गात पाय पसरा ....
पाऊस वाऱ्यात... नटलेल्या झऱ्यात... कोकणातील पहिल्या दिवसाची सायकल सफर अतिशय अप्रतिम झाली होती.

सतीश जाधव
आझाद पंछी...

Monday, August 17, 2020

झेंडा वंदन राईड १५ ऑगस्ट २०२०

झेंडा वंदन राईड
१५ ऑगस्ट, २०२०


स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राईड करायची हे ठरवले होते. निलेशला ४५ किमी राईड करायची होती. आदित्य आणि मयुरेशसुद्धा समर्पयामि परिवारासाठी सायकल राईड प्लॅन करीत होते. चिखलोली धरण राईड करायचे नक्की झाले. या राईडला  समर्पयामीच्या वीस सदस्यांनी आपली नावे सुद्धा नोंदविली. विजय या राईडसाठी खास सुट्टी घेऊन यायला तयार झाला होता.

आज सकाळी साडेचार वाजता सायकलला तिरंगा झेंडा लावून झेंडावंदन राईड सुरू झाली. दादरला विजयची भेट झाली. रात्रीच तयार केलेला झेंडावंदन फोटो सर्व मित्रांना शेअर केला होता. 

"यु हवा आज क्यू गा रही है" हे गाणे सुरू होते. रात्री पाऊस पडल्याच्या खुणा रस्ता सांगत होता. पाण्याने भरलेले खड्डे चुकवत सायनला  पोहोचले. जोरदार पाऊस सुरू झाला. मिनीटभरात दोघेही संपूर्ण भिजलो. थांबायचे नाही हे मनाने ठरविले होते. चष्म्यावर पावसाचे थेंब पडत असल्यामुळे समोरचे धुरकट दिसायला लागले.  त्यामुळे चष्मा काढून राईड सुरू ठेवली.  सायन सर्कल ओलांडून चुनाभट्टी एव्हराड नगर जवळ पोहोचताच एक विहंगम दृश्य दिसले. नवीन बांधलेल्या सायन BKC फ्लाय ओव्हरच्या खाली तिरंग्याच्या रंगांची आरास केली होती.
सकाळी पाच वाजता येथे फोटो काढले. ही खुप आनंदमय गोष्ट होती.

पाऊस आम्हाला तुडुंब भिजवत होता. पावसाबरोबर जोरदार वारा सुटला होता.  पावसाचे थेंब हेल्मेटवर तडतड वाजत होते. वाऱ्याच्या झोतावर सायकल डोलत होती. जणूकाही पावसाच्या तालावर कथ्थक नृत्यच करीत होती. हेडविंडमुळे सायकलचा वेग सुद्धा मंदावला होता. पाऊस, वारा, अंधार, धुके तसेच हेडलॅम्पचा मंदावणारा प्रकाश यातसुद्धा नेटाने पेडलिंग सुरू होते.

 पावसाचा ताशा, वाऱ्याचा मारा आणि त्यात तिरंग्याची डौलाने चाललेली फडफड त्यामुळे अंगात नवीन उर्मी उठत होती. अफलातून मजा आली तिरंगा झेंड्याच्या फडफडण्याने.  या पावसात सतत भिजत भिजत पाच वाजून पन्नास मिनिटाने मुलुंड टोलनाक्या अलीकडील ब्रिजखाली पोहोचलो. विजयने आणलेले गरमागरम मसाले दूध हायड्रेशन ब्रेकसाठी होते. आता अंगात वेगळी शक्ती संचारली होती.

तीन हात नाक्यावर अतुल, प्रशांत, यशवंत आणि चिराग हे सर्व आझाद पंछी भेटले. निलेशने एका विशेष कामासाठी रजा घेतली होती. स्वातंत्रदिनानिमित्त आज  ४५ किमी सायकलिंग आणि १५ किमी रनींग हा त्याचा संकल्प होता.

माजीवडे नाक्यावर पोहोचलो. तेथे अविनाश, सुमित, मुन्ना, अनु, आदित्य, मयुरेश, एल्डन यांची भेट झाली. शेवटी अरुणा आली. एक्सपर्ट तंत्रज्ञ हिरेन सुद्धा आज राईड करणार होता. आज प्रथमच मुन्ना आणि अनुची ओळख झाली.

आदित्यने "बोलो भारतमाता की"  असा जोरदार निनाद  केल्यावर सर्वांनी एकसाथ केलेल्या   "जय" अश्या  जयघोषाने माजीवडा जंक्शन दणाणून सोडला. हिरेनने सर्वांच्या सायकली तपासून ठाकठीक केल्या. मयुरेशने सर्वांना तिरंगा बिल्ले वाटले. आदित्यने  सर्वांना सायकलिंग करताना घ्यायची काळजी बद्दल सांगितले. आता सुरू झाली चिखलोली धरणाकडे सायकल राईड.

पाऊस सुरूच होता. सात वाजता खारेगाव जंक्शनला पोहोचलो. सर्वांना कचोरी दिली. अरुणाने कानटोपी, त्यावर फ्लॅपवाली टोपी आणि त्यावर हेल्मेट असा पक्का बंदोबस्त डोक्याचा केला होता. आज डॉ सुमित जाम खुशीत दिसत होता. तानसा राईडमध्ये मागे राहणारा सुमित आज सर्वांच्या पुढे होता. एक्सट्रा एनर्जी घेऊन आला होता सुमित. त्याच्या बरोबर प्रशांत सुद्धा पुढे होता. आजच्या मोठी राईड झोकात करायची असा विचार दोघांनी केला असावा.

खारेगावकडून शिळफाट्याकडे जाण्यासाठी मुंब्रा बायपासकडे वळलो.  बायपासचा चढ सुरू झाला. बाजूने मोठेमोठे कंटेनर जात होते. त्यामुळे जपून आणि एकामागे एक सायकलिंग करत होतो. चढ संपला आणि मुंब्रादेवी मंदिराच्या पायथ्याला मोठा धबधबा लागला. 

कड्यावरून कोसळणारे प्रचंड पाणी पाहून सायकली आपोआप धबधब्याकडे वळल्या. लागलेला दम पळून गेला. आता सुरू झाली मस्ती. प्रथम सुमित आणि मुन्ना शिरले धबधब्यात. मुन्नाने अनु सह भन्नाट सायकल पोज दिली धबधब्याखाली. 

 एका मोठ्या दगडावर  चढून धबधब्याचा झोत अंगावर घेत, तिरंगा झेंडा फडकवत सर्वांनी फोटो काढले. अतुल तर धबधब्याच्या कड्यावर चढायचा प्रयत्न करत होता. तर बलवंतने "सायकल वरीयर"  स्टाईल धबधब्याखाली फोटो काढला. 
फुलटू धम्माल आली तुषार अंगावर घेताना. प्रत्येक जण अक्षरश बेभान होऊन धबधब्यात रमला होता. आजच्या सायकलिंगची सुरुवात मनाच्या स्वातंत्र्याची होती. 

 निसर्गाने मुक्त  उधळलेल्या सौंदर्याने तन, मन तृप्त झाले. तसेच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याने सर्व आनंदाने बेहोश झाले होते.

पुन्हा पेडलिंग सुरू झाले. मुंब्रा टोलनाका ओलांडून दिवा गावात शिरलो. भन्नाट उतारावरून वळसे घेत सायकल चालवणे अतिशय कसबी काम होते. सायकल मोटरसायकलच्या वेगाने पळत होती. पण एक जाणवले हायड्रोलीक डिस्क ब्रेकमुळे सायकल कंट्रोल करणे खूपच सहज होते. 

दिवा नाक्यावर लहान मुलांचा घोळका झेंडे विकत होता. मयुरेशने एका लहान मुलीकडून काही झेंडे हातात घेऊन तिला सांगितले, ' तुझे सर्व झेंडे मला दे'. त्या मुलीने मयुरेशच्या हातातील झेंडे मागून भेटले. मयुरेश  सर्व झेंड्यांचे पैसे आपल्याला देणार नाही असा भ्रम तिला झाला असावा. सुमित पटकन म्हणाला 'मयुरेश तुझी फेस व्हॅल्यू तीने केली आहे'. मयुरेशने तीला पैसे दिल्यावर तीने सर्व झेंडे  दिले. आता प्रत्येकाच्या सायकलवर तिरंगा फडकू लागला. आदित्यने त्या सर्व मुलांसोबत फोटो काढला. तसेच आम्हा सर्वांचा फोटो काढताना, जोरदार गर्जना मारली, " भारत माता की जय".


पावसाची रिमझिम सुरू होती. आम्ही पेडलिंग करत शिळफाट्यावर पोहोचलो.  मागे राहिलेल्या अरुणाला आदित्य घेऊन येत होता.  थोडा वेळ थांबलो शिळफाट्याजवळ. तेथून उजवीकडे वळून देसाई गाव, लोढा नाका ओलांडून बदलापूर पाईप लाईन रोडवर आलो. आता जोरदार पाऊस सुरू झाला होता. 

मी अविनाश बरोबर सायकलिंग करत होतो. थोडा पुढे सुमित पाश्चात्य संगीतावर डोलत सायकलिंग करत होता. अविनाश म्हणाला, 'अँपलच्या शिरीने सुद्धा सांगितले,  आज दिवसभर पाऊस पडणार म्हणून'. तरुणाईला एक मोठं अस्त्र मिळालंय काहीही प्रश्न पडला तर, गुगल, ऍपल मधून शोधणे. अविनाश पुढे म्हणाला, 'आता खंडाळ्याला घाटात काय मजा आली असती ना... सायकलिंग करायला !!!'.  'राजा, आताची पाईप लाईन राईड एन्जॉय कर, नंतर जाऊच आपण खंडाळ्याला'  मी म्हणालो. 

खरं तर प्रत्येक ठिकाणची मजा वेगळी आणि युनिक असते, त्यामुळे सकारात्मकते बरोबर स्विकारात्मक सुद्धा असणे फार महत्वाचे आहे. समोर आलेल्या परिस्थितीला आपण आहे तसे स्वीकारतो, तेव्हाच त्यातील आनंद लुटू शकतो. मग त्याचे कम्पॅरिझन करण्याची आवश्यकता लागत नाही.

पाईप लाईन रस्त्यावर सर्वांच्या सायकली झोपवून, एक ग्रुप फोटो काढला. ही मयुरेशची आयडिया होती.
 नऊ वाजता  कल्याण फाट्यावर पोहोचलो. येथे गरमागरम वडापाव त्यावर केळी, पपई असा हायड्रेशन ब्रेक घेतला. यशवंत सर्वांना प्रेमाने पपई खाऊ घालत होता. तर मयुरेश सर्वांवर केळ्याची बरसात करीत होता.

बदलापूर पाईप लाईन वरील डी मार्ट ओलांडले आणि पुढे चिखलोली गाव लागले. येथे बदलापुरच्या लोकल सायकालिस्टची भेट झाली.  आम्हाला धरणाचा रस्ता  दाखविण्यासाठी ते धरणापर्यंत आमच्या सोबत आले. आता गावातून ऑफ रोडिंग सुरू झाले. कच्च्या रस्त्याच्या चढावर दगड आणि चिखल असल्यामुळे, अतिशय कमी गियरवर पेडलिंग करावे लागत होते. 

सर्व परिसर हिरवळीने भरलेला होता. एका छोट्या पुलावर थांबलो. खालून पाण्याचा पाट वाहत होता. गार वारा आणि पाऊस यांची संगत होती. पुलाखालून खळखळत वाहणारे पाणी, त्यातून उठणारा पाण्याचा पांढरा रंग, निसर्गाचे नित्य नूतन रूप दाखवत होता. येथे माझी साथ संगत करणाऱ्या सायकलचा  फोटो काढला. तिरंगा डौलाने फडकून सायकलला साथ देत होता. 


निसर्गाचे सौंदर्यधन मनमुराद लुटून नेत्र भिंगात बद्ध केलं आणि आज सोबत नसलेल्या मित्रवर्यासाठी अन् चिरंतन आठवणीसाठी कॅमेराबद्ध सुद्धा केले.

आकाशाला काळ्या पांढऱ्या ढगांनी निरनिराळे आकार घेऊन कवटाळले होते. तरीही आकाशाला धरणीवरील पाणी प्रवाहाची प्रचंड ओढ दाटली होती.  त्यासाठी ढगांच्या राशींचाच आधार घेत डोंगरावरून ती निळाई पाण्यात उतरली होती. आकाशभेटीने पाणी ही लहरत होते. आनंदाने वेगही वाढला होता पाण्याचा वाहण्याचा.  सागराशी असलेल्या प्रेमाच्या ओढीने खळाळत, तटावरील झुडूपांशी कान गोष्टी करत,  जलाचे वेगाने  वाहणे चालले होते.

शेवटचा ऑफ रोडिंग चढाव अतिशय स्टीफ होता. अगोदरच एक बाय एक गियर सेट करून तो चढाव चढायला सुरुवात केली.  आदित्य, अविनाश, चिराग, प्रशांत मला चिअर अप करत होते. शेवटच्या दहा फुटात " भारत माता की जय" अशी जोरदार गर्जना करून चढ चढून गेलो.  

समोरच तलावाचे विहंगम दृष्य पाहून मन मोहरून गेले. मातीच्या बंधारा घालून डोंगरातून येणाऱ्या नदीचे पाणी अडविले होते. तलावात पसरलेल्या अथांग पाण्यात ढगांचे रंग उतरले होते. आजूबाजूला असलेले डोंगर जलधारांचा अभिषेक जलाशयात अव्याहतपणे करत होते.  मातीच्या बंधाऱ्यावर उगवलेली गवताची हिरवळ, त्यात दिसणारी पिवळी लाल तृण फुले, त्यावर बागडणारी फुलपाखरे तसेच या बंधाऱ्यावरून जाणारी पाऊलवाट;  सारे काही अदभूत होते. सृष्टी जणूकाही पाचूच्या शालूवर हिरवी वेलबुट्टी लेऊन सजली होती.

हे बघतानाच मीच निसर्ग झालो. निरव शांततेने मन गहिरे झाले आणि निसर्ग गीत स्फुरले. 

पाऊलवाटा हिरव्या ओल्या 

 पानांवर पागोळ्या गळल्या 
 
 सुवासिक फुलांनी मोहविलें
 
 फुलपाखरांना  रंगही  दिलें
 
 सुरंगी फुले लाल लाजली
 
 हिरवी पाने हळूच डोलली
 
 पानावरचे थेंब  छान चमकले
 
 रवी तेज पिऊन ते सजले 
 
 सप्तरंगाचा रम्य नजराणा
 
 मिरवितो हा निसर्ग राणा
 
 एक दृष्टी पडता त्यावर 
 
 सुखविते हे अपुले अंतर

या अप्रतिम निसर्गात मला आणणाऱ्या सायकलचा बहुमान करायचे मनात आले. तीला एका हाताने उचलून आजच्या मोठ्या दिवशी मानवंदना दिली.


अतुल आणि प्रशांत आज सुद्धा हिरवे टीशर्ट घालून आले होते. त्यामध्ये मी सुद्धा हिरवे टीशर्ट घालून सामील झालो होतो. दोघांना परत जुळे भाऊ म्हणताच  प्रशांत म्हणाला मी काळा आणि चिराग गोरा मग कसे शक्य आहे.  मी म्हणालो, ' तू अमावस्येला आणि चिराग पौर्णिमेला जन्माला आले आहेत. या वर दोघेही खळखळून हसले.

  मातीच्या बांधाऱ्यावरील पाऊल वाटेवरून सायकलिंग सुरू झाली, पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी.  मागून आदित्य,  मुन्ना, सुमित आणि एल्डन येत होते. त्यांना कॅमेराबद्ध केले. त्या पाऊल वाटेवरून सायकल चालवणे म्हणजे कसरत होती. पाणथळ जागेत चाक रुतत होते, सायकल घसरत होती. एका बाजूला तलाव तर दुसऱ्या बाजूला शंभर फूट खड्डा यातून अतिशय सावधपणे सायकल हाकारात पलीकडच्या किनाऱ्याला आलो. 

या किनाऱ्यावरून तलाव अजूनही विस्तीर्ण दिसत होता.  मातीच्या पठारावर बाजूच्या डोंगरातून जलधारा वाहत होत्या.  

आता सुरू झाली मैफिल नाच-गाण्याची.  सुमित भांगडा गाण्यावर असे काही ठुमके मारत होता की सर्वजण त्याचे फॅन झाले. त्याचे पदलालित्य अप्रतिम होते. प्रत्येक जण आता नाचू लागले. मुन्ना, अविनाश, बलवंत, चिराग, प्रशांत, हिरेन, यशवंत सारे भांगडा मध्ये सामील झाले. मयुरेश एका हातात झेंडा फडकवत लाजत डान्स करत होता. काका उर्फ आदित्य इलेक्ट्रिक शॉक लागल्या सारखा नाचत होता. एल्डन फक्त हाताने नाचत होता. तर अन्नू हात उंचावून हसत नाचत होती.
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने बालपणात, शालेय जीवनात गेलो होतो. कोणताही अभिनिवेश नाही, कोणताही भेद नाही , फक्त आणि फक्त निसर्गाचा आनंद लुटणे. निसर्गात रममाण होणे. ठाण्यावरून साधारण ४५ किमी राईड करून चिखलोली धरणावर पोहोचलेले आम्ही सर्वजण एकमेकांत गुंफून गेलो होतो. " दिलसे मिले दिल" च्या अनुभूतीमध्ये सर्व समर्पयामि सामावून गेलो होतो. सध्या चालू असलेल्या बंधनातून सर्व मुक्त झाले होते. 

त्यानंतर सुरू झाले तलावाच्या किनारी आनंद भोजन. अविनाश  घरून आणलेला झुणका भाकर आवर्जून सर्वांना वाढत होता. बलवंतने उकडलेले चणे आणले होते. मी आणलेल्या पनीर बुर्जीवर सर्व आझाद पंछी तुटून पडले. विजयने  डबाभरून साबुदाणा खिचडी आणली होती. अतुलने ठेपले आणि गोड छुन्दा आणला होता. काकाने दही, अरुणाची बिस्किटे, यशवंतचे खजूर आणि एल्डनचे चॉकलेट;  या आनंद भोजनाची लज्जत वाढवत होते. 

कमी बोलणारा विजयसुद्धा आज खुलला होता. त्याचे खूप फोटो काढले. तसेच स्लोमोशन व्हिडीओ शूट केला.  या स्पॉटवर खूप मौजमस्ती केली. अक्षरशः बागडत होतो, लहान मुलांसारखे, सर्वकाही विसरून.

आता सुरू झाली परतीची सफर. मयुरेश, चिराग, प्रशांत आणि मी पुढे निघालो. बलवंत काही काम असल्यामुळे अगोदरच निघाला होता. मागोमाग सर्वजण निघाले. अरुणाला घेऊन चिअर अप करत अतुल सर्वांच्या मागून  येत होता.

 येताना पुन्हा कल्याण फाट्यावर थांबलो. पाऊस तुडुंब कोसळत होता. आदित्य पोहोचल्यावर  पुढची सफर सुरू झाली. विजयने आज मला टीशर्ट प्रेझेंट दिले होते. परतीच्या सफरीत मी ते शर्ट घातले. हा नवा टीशर्ट सुमितला खूप आवडला होता. ते सांगण्यासाठी सायकलिंग करताना सुमित माझ्या जवळ आला होता. 


डोंबिवली शीळफाटा रस्ता लागला. कटाई नाका येथील बस स्टॉप वर थांबलो. येथे मुन्नाभाई बोलता झाला, सायकलिंगमुळे गेल्या तीन वर्षात त्यात क्रांतिकारी बदल झाले आहेत.  तो ९५ किलोचा ७५ किलो झाला आहे. त्याचा डायबिटीज कायमचा नाहीसा झाला आहे. लाईफ स्टाईल बदलली आहे त्याची. सायकलिंगमुळे काय घडू शकते याचे जिवंत उदाहरण माझ्या समोर होते.  त्याने खूप लोकांना सायकलिंग साठी मोटिव्हेट केले आहे. मुन्ना आता समर्पयामिला कायमचा जोडला गेला आहे. मुन्नाने त्याची मैत्रीण अनुची ओळख करून दिली. तीचे वडील सुद्धा स्पोर्ट्स मन आहेत. खेळामुळे माणसाचा चेहरा ताजातवाना राहतो, तसेच त्यांचे वय कमी वाटते. यासाठी अनुने वडिलांचे उदाहरण दिले. 

कटाई नाक्यावर  ट्राफिक जास्त असल्यामुळे थोडे पुढे जाऊन लोढा नाका, निळजे येथे थांबलो. चुकमुक होऊ नये म्हणून  शेवटी राहिलेल्या अरुणाची वाट पाहत होतो. अतुल अरुणाला सोबत घेऊन येणार याची खात्री होती. तेव्हढ्यात अतुल आणि अरुणा येताना चिरागला दिसले. त्याने जोरात अतुलला हाक मारली, त्या बरोबर भर ट्राफिक मध्ये अरुणा थांबली. मागून येणाऱ्या गाड्यांचे तिला भान राहिले नाही. मयुरेशला सकाळीच अरुणाने सांगितले होते. मी सायकल हळू चालविणार तुम्हाला त्रास झाला तर सांभाळून घ्यायचे. अरुणा अजूनही खड्ड्यांना घाबरते. म्हणूनच मयुरेश तिला सायकलिंगसाठी सतत प्रोत्साहित करत असतो. 

लोढा नाक्यावरील अभिमान अमृततुल्य चहावाल्याला चहाची ऑर्डर दिली. तेवढ्या वेळेत हिरेनने मुन्नाच्या सायकलचा टायर बदलून टाकला.  डॉ सुमितच्या सायकलची घंटी एकदम भारी वाजत होती. 

अमृततुल्य चहा एकदम फार्मास बनला होता. माझ्यासह काही जणांनी डबल चहा घेतला. सर्वांना एव्हढा आवडला की अमृततुल्य चहाच्या टपरीवर त्याच्या मालकासह सर्वांचा गृप फोटो काढला. या चहावाल्याचे स्लोगन होते  'एकदा चहा प्याल,  तर पुन्हा पुन्हा याल' 


आदित्य काका सर्वाना आग्रहाने चहा पाजत होता. पण स्वतः पीत नाही हे विशेष आहे. त्यामुळे काका नो पार्किंग बोर्ड खाली उभा होता.

प्रशांत सायकलिंग करताना आज खूप रिलॅक्स वाटला. टेस्ट राईड साठी मयुरेशने दिलेल्या कॅननडेल सायकल त्याला सूट झाली होती. जुनी हायब्रीड काढून नवीन MTB सायकल घेण्याचे त्याच्या डोक्यात घोळत होते.

अविनाशने आणखी एक गोष्ट सांगितली. त्याचे मित्र माझ्या ब्लॉगचे फॅन आहेत. तसेच ते सर्व समर्पयामिनां नावाने ओळखायला लागले आहेत. त्यांनी पण सायकली चालवाव्यात आणि भरभरून आनंद मिळवावा हीच माझी विनंती आहे.

वाटेत देसाई गाव लागले. जास्त रहदारीमुळे खड्या खुड्ड्याचा रस्ता होता.  शिळफाट्याकडे जाताना मध्ये डायघर (शिक्षण महर्षी नारायण चौधरी चौक) चौरस्ता लागला येथून छोट्या घाटीचा चढ सुरू होतो. रस्त्याला ट्राफिक असूनसुद्धा सायकली सहजपणे पुढे पुढे जात होत्या. शिळफाट्याला डावीकडे वळण घेऊन महापे नाक्याकडे राईड सुरू झाली. एक भन्नाट उतार लागला त्यावर एल्डन सुसाटत पुढे गेला. माझ्या मागे विजय होता. निर्माण भवन जवळ एल्डन थांबला होता. त्याच्या जवळ  विजय आणि मी थांबलो. 

समोर एक बसस्टॉप होता. त्यावर हेलन केलर नाव लिहिले होते. खूप आश्चर्य वाटले ते नाव वाचून. पाऊण तास थांबलो मागून येणारा कोणीही सायकलिस्ट आम्हाला दिसेना. खूप जणांना फोन केले, पण लागले नाहीत. तेवढ्या वेळात कृझ फोटोग्राफर एल्डन बरोबर खूप गप्पा मारल्या. जगातले १५० देश तो फिरला आहे आणि पाच वर्षात पाच वेळा पृथ्वी प्रदक्षिणा झाली आहे त्याची. याची नोंद गुगलने घेतली आहे. अतिशय तरुण वयात जग पादाक्रांत केल्यामुळे खूप मॅच्युअर्ड आहे एल्डन. आई शिक्षिका तर वडील अभ्युदय बँकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. 

एक जाणवले सायकलिंग सर्वांना एकाच पातळीवर आणते. निसर्गात एक जादू आहे. प्रत्येक माणूस निसर्गात एव्हढा खुलतो की प्रत्येकजण एकमेकांचे  घनिष्ठ मित्र होतात. मग आपली सुखदुःख सहजपणे शेअर करतात. प्रथमच भेटलेल्या मुन्ना आणि एल्डन आज माझे जिवलग मित्र आहेत. आहे ना कमाल सायकलिंगची. एल्डनला मी आणलेले सुके आवळे खूप भावले.

आता आम्ही तिघांनी राईड सुरू केली. महापे ओलांडून रबाळे मार्गे ऐरोली गावात पोहोचलो. तेथून ऐरोली मुलुंड सिग्नल पर्यंत सायकलिंग करून एल्डनला निरोप दिला.

आता विजयसह मुंबईकडे निघालो. शेवटचा सव्वीस किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी मनाची तयारी केली आणि सुरू झाली सायकल दौड. विक्रोळी जवळ पावसाने गाठले. पुन्हा भिजतच सायकल सफर सुरू ठेवली. कुर्ल्याला पाऊस थांबला. आता पेडलिंग करताना पायाच्या पोटरीत दुखू लागले होते. लक्षात आले, शरीरातले पाणी कमी झाले आहे. प्रियदर्शिनी बिल्डिंग बायपास जवळ सायकल थांबवून पाण्याच्या बाटलीत आदित्यने दिलेली नारळ पाणी पावडर टाकली आणि सर्व पाणी प्यालो. थोडा वेळ बसल्यावर तरतरी आली. 

 पावसात सतत भिजत असल्यामुळे शरीरातील पाणी कमी झाले आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे सायकलिंग करताना दर तासाला तहान लागली नसेल तरी पाणी पिणे किती आवश्यक आहे याची जाणीव झाली. 

शेवटच्या दहा किमीची सायकल राईड अतिशय सावकाश आणि रमत गमत केली. आज १२६ किमी राईड झाली होती. घरी जाऊन फ्रेश झाल्यावर स्ट्रेचिंग साठी वीस मिनिटे वज्रासनात बसलो. त्यामुळे पुन्हा एकदम ताजातवाना झालो, पुढील राईड ठरविण्यासाठी.

आजच्या राईडला झेंडावंदन राईड म्हणायचे एक विशेष कारण होते. ते म्हणजे शाळेत असताना आजच्या दिवशी सुट्टी असायची, पण या दिवशी सकाळी शाळेत युनिफॉर्म घालून झेंडावंदनसाठी जावे लागे. पाहुण्यांच्या हस्ते तिरंगा झेंडा अनावरण झाल्यावर राष्ट्रगीत होत असे आणि त्यानंतर आम्हाला खाऊ मिळत असे. विशेष म्हणजे सकाळीच लताबाईंचे  "हे मेरे वतन के लोगो" गाणे ऐकायला मिळायचे. 

खऱ्या अर्थाने,  जसे आपण परमेश्वराला, आईवडिलांना वंदन करतो तीच भावना झेंडा वंदनमध्ये आहे. झेंडा वंदन म्हणजेच राष्ट्राला वंदन होय. 


सतीश जाधव
आझाद पंछी....