Monday, February 22, 2021
नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सहावा) तोरणमाळ ते प्रकाशा
Monday, January 25, 2021
नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस पाचवा) पिपरीकुंड ते तोरणमाळ
०२.०१.२०२१
सकाळी मैयेची पूजा केली. रेवसिंगला पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले. चहा बिस्कीट घेऊन रेवसिंग कुटुंबाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्याने काहीही पैसे घेतले नाहीत. अतिशय प्रेमाने सेवा देण्याची वृत्ती खरोखरच रेवसिंगकडून शिकावी. ही माणसं पाहिली की आपण किती छोट्या जगात जगतो आहोत याची अनुभूती झाली.
ग्रामीण जीवन किती सुंदर आहे याची जाणीव झाली... अतिशय कमी गरजा आहेत त्यांच्या...
खरोखरच रेवसिंगची आनंदी झोपडी खूप भावली...
डोंगराच्या आडून सुर्योदय झाला होता. रस्ता दिसू लागला होता. पुढचा रस्ता ऑफ रोडिंग, दगड धोंड्यांचा आणि घाटीचा होता. काही ठिकाणी सायकल सामानासह ढकलावी लागली. रस्ता अतिशय निसरडा आणि धुळीचा होता. पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा अवघड अशी ही वाट...
सायकलिंगवाल्यांसाठी तर अतिशय बिकट होती. तीन किलो मीटरचा झरार गावाकडे नेणारा रस्ता... प्रचंड दमछाक करणारा होता. दम खात... थांबत... झरार गावात पोहोचलो. रस्त्यावर एकमेव दुकान होते. गावातली सर्व घरे वरच्या उंच टेकाडावर होती. सकाळीच... दोघेही घामाने थबथबलो होतो.रस्त्यावरील त्या एकमेव दुकानात चहा बनवायला सांगितले. 'हाऊ' दुकानातील बाबाजींचा होकार आला. अतिशय छोटेखानी घर, त्यात दुकान आणि गाईचा गोठा होता. चुलीजवळ काम करणाऱ्या मैय्येने चहा आणला. काळया चहा सोबत बिस्कीटे खाल्ली. दुकानदाराने फक्त बिस्किटाचे पैसे घेतले. अतिशय कमी गरजांमध्ये ही माणसे गुजराण करीत असून सुद्धा प्रेमाने देण्याची दानत आणि सेवाभाव विशेष जाणवला.
झरार गावाचा अतिशय विहंगम परिसर... वातावरण आल्हाददायक आणि प्राणवायूने ओतप्रोत भरलेले...
येथेच मध्यप्रदेशचा वनरक्षक नाका आहे. पुढे दोन किमी वर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. तेथून सोळा किमीवर तोरणमाळ आहे. अजूनही खडकाळ रस्ता संपला नव्हता. मध्येच सायकल ढकलावी लागत होती. महाराष्ट्र चेकपोष्ट आले. कोणीही नव्हते तेथे.
महाराष्ट्रात शिरलो तरीही रस्त्याची स्थिती सुधारली नव्हती. आता तर अवघड चढ उतार होते. सामानासह सायकल चढविणे... एक-एक गियरवर सुद्धा कठीण होते. काही ठिकाणी सायकल चढविताना गावकऱ्यांची मदत घ्यावी लागली.
तोरणमाळ पर्वतरांगांच्या शिखरावर पोहोचलो... शिखराच्या वरच्या बाजूला एक बुरुजबंद भिंत लागली. म्हणून सायकल खाली ठेऊन टेकाड चढून गेलो. दगडी भिंतीच्या पुढे गुंफा लागली.
जालंधरनाथ महाराजांची गुंफा होती... तेथे आता बमबम लहरीनाथ बाबांचे वास्तव्य आहे. अन्नधान्य आणण्यासाठी बाबाजी शहादा गावाच्या बाजारात गेले होते.येथे नाथ संप्रदायाचे संत जालंधरनाथ यांनी घोर तपस्या केली होती. आता परिक्रमावासीयांची येथे सेवा केली जाते. अतिशय अवघड ठिकाणी वसलेले हे मंदिर आणि तेथे दिली जाणारी सेवा पाहून स्तिमित झालो. दोन किमी खाली जाऊन पाणी आणावे लागते. थकला भागलेला पारिक्रमवासी जेव्हा येथे पोहोचतो... तेव्हा येथे मिळणारी सेवा त्याला प्रचंड बळ देते. आपल्या बाळाची काळजी घेणाऱ्या नर्मदा मैयेच्या अपार प्रेमाची जाणीव येथे होते...
भोजन प्रसादीची व्यवस्था झाली.. तेथे असलेल्या मैयेने वांग्याची भाजी आणि रोटी भोजनप्रसादी दिली.
तेथे आलेले परिक्रमा करणारे हटयोगी बाबा नर्मदानाथ बैरागी आमच्या बरोबर भोजनाला बसले... संपूर्ण अंगाला भस्म लावलेले, कानाच्या मधल्या भागात मोठी तांब्याची बिकबाळी आणि काळी कफनी घातलेले बाबा खूप प्रेमाने बोलत होते. सायकल घेऊन या मार्गाने आल्या बद्दल त्यांना खूप अप्रूप वाटले आणि आनंद ही झाला...महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश चेक पोष्ट जवळ आलो. तेथे कोणीही नव्हते. वरच्या टेकाडावर एक मजली पांढरी इमारत दिसली. तेथे फोटो काढून महाराष्ट्रात पाय ठेवला.
महाराष्ट्रातील पहिल्यांदा लागलेले गाव बुरुमपाड्यात आलो.
नंदुरबार जिल्ह्यातील हे टोकाकडचे गाव. सामूहिक वन संवर्धन प्रकल्प येथे राबविला जातो आहे. येथील गावे म्हणजे आदिवासी पाडे आहेत. याला नवे तोरणमाळ सुद्धा म्हणतात. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आल्याबद्दल खूप आनंद झाला. महाराष्ट्रात याच शूलपाणी जंगलातून नर्मदा मैय्या वाहते, त्याचा सुद्धा आनंद होता. या बुरुमपाड्यात सुद्धा चहा देऊन सेवा मिळाली.पुढे तोरणमाळच्या विव्ह पॉईंटवर आलो.
येथून खालच्या दरीत वसलेली अनेक गावे, हिरवेगार जंगल परिसर आणि शेतांचे चौकोन दिसत होते. एका पाठी एक पसरलेल्या तोरणमाळच्या पर्वतरांगा दिसत होत्या. नंदुरबार, शहादा फाट्यावर आलो. तेथे गावांच्या नावाचा बोर्ड मराठीत लावलेला होता.येथून तोरणमाळ, नर्मदा तलाव आणि मुख्य गाव चार किमी अंतरावर आहे.
वर-खाली चढ उताराच्या रस्त्याने तोरणमाळचे मुख्य आकर्षण नर्मदा तलावाजवळ पोहोचलो.
त्याच्या बाजूलाच बाबा गोरखनाथांचा भव्य आश्रम आहे. हे नाथ परंपरांचे सर्वात मोठे सिद्धपीठ आहे. गोरखनाथ बाबा येथे साक्षात विराजमान आहेत. बाबा गोरखनाथांच्या तपश्चर्येने येथे नर्मदा मैय्या पाताळातून प्रकट झाली आहे. म्हणूनच परिक्रमावासी तोरणमाळला आवर्जून भेट देतात. येथील जंगलाला शूलपाणी जंगल म्हणतात.उत्तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. येथे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात यांच्या सीमा आहेत. पावसाळ्यात सर्व ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात, तसेच सकाळी आणि संध्याकाळी धुक्याचे साम्राज्य असते.
गुरू गोरखनाथच्या मंदिरात विश्रांतीची व्यवस्था झाली. तेथून 'सीता खाई' पाहायला गेलो. खाली खोल दरी दिसत होती.
सीता मैय्या येथेच भूमातेमध्ये विलीन झाली होती. हा एको पॉईंट सुद्धा आहे. येथून मध्य प्रदेशाचा भूभाग दिसतो.प्रचंड वारे सुटले होते. वाटेत आदिवासी पाडे लागले. तेथील लहान लहान मुले "नर्मदे हर" म्हणत आमच्या मागे धावत होती. एक टपरीवजा दुकान लागले. सायकल थांबवून सर्व मुलांना चॉकलेट वाटले. तेथेच संजयने माझे नामकरण केले, "चॉकलेट बाबा".
समोरच्या झाडातून सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन झाले. काळया ढगांतून डोकावणारे सोनेरी कवडसे निसर्गाचे संगीत गात होते.
मंदिराच्या मागे असलेल्या नर्मदा तलावाच्या काठावर निवांत बसलो... सर्व भावना आणि विचार विरहित अवस्थेत या ठिकाणी तल्लीन झालो. वातावरण थंड व्हायला लागले होते.
गोरखनाथ सिध्द पिठाचे मुख्य महंत योगी संजूनाथजी यांनी भोजन प्रसादीची सर्व व्यवस्था केली. मंदिराच्या खालीच विश्रामाची व्यवस्था होती.
ग्रामीण जीवन आणि सेवा भाव यांची फार जवळून ओळख झाली...
मनाचा... मुंबईच्या छोट्या जगातून गावाकडच्या विशाल विश्वात प्रवेश झाला होता.
नर्मदे हर...
सतीश जाधव
मुक्त पाखरे...
Wednesday, January 13, 2021
नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस चौथा)बावन्नगजा ते पिपलाकुंड ०१.०१.२०२१
नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस चौथा)
बावन्नगजा ते पिपलाकुंड
०१.०१.२०२१
सकाळी बालभोग घेऊन बावन्नगजाजी येथील जैन तीर्थांकर आदिनाथ भगवान यांच्या भव्य मूर्ती असलेल्या स्थानाला भेट दिली.
या सिद्धक्षेत्रात नवीन वर्षानिमित्त जैन समुदयातर्फे मोठी पूजा अर्चना सुरू होती. डोंगरात कोरलेली ही विशाल मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटले. "श्री आदिनाथ जीनेंद्राय" याचा अर्थ ज्याने मन, वचन आणि काया यावर ताबा मिळवला आहे आणि केवलज्ञान प्राप्त केले आहे.काल दर्शनी असणाऱ्या भगवान श्री आदिनाथ मंदिराला भेट दिली होती. सायंकाळच्या सूर्यप्रकाशात हे मंदिर सुर्यप्रभेमुळे सुवर्ण किरणांनीं उजळले होते.
श्री आदिनाथ भगवान यांच्या या पवित्र क्षेत्रास चुलगिरी म्हणतात. चारही बाजूला सातपुड्याच्या पर्वत रांगा आहेत. एका पर्वताच्या माथ्यावर सती मंदोदरीचे (रावणाची पत्नी) मंदिर आहे.
अन्नक्षेत्राचे बाबाजी, स्वामी ज्ञानानंदजी यांचा निरोप घेऊन चुलगिरी घाट चढायला सुरुवात केली. वातावरणात सुखद गारवा होता. तसेच आम्ही सुद्धा जोशात होतो. त्यामुळे घाटमाथ्यावर थोड्या वेळातच पोहोचलो. येथे नितांत सुंदर विव्ह पॉईंट होता. याचे नाव सुद्धा अतिशय सुखदायक होते, "पर्यावरण चेतना केंद्र".
येथिल बगिच्यात सगळीकडे बोगनवेल फुलल्या होत्या. येथील वॉच पॉईंट वर गेलो. संपूर्ण सातपुड्याच्या पर्वतरांगा चारही बाजूला दिसत होत्या. या ठिकाणी मोबाईल रेंज सुद्धा चांगली मिळाली. या नितांत सुंदर ठिकाणावरून प्रिय व्यक्तींना फोन केले. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा थोडा वेळ येथे व्यतीत करून, पुढे मार्गक्रमण सुरू केले.दोन तासात पाटी गावात पोहोचलो. गावाच्या सुरुवातीलाच चहाच्या दुकानात बरेच परिक्रमावासी बसले होते.
परिक्रमावासींसाठी चहाची व्यवस्था येथे होती. मुसफिर व्यास आणि जाट साहेब यांची ओळख झाली. जाट शायर आहेत तर व्यास शिक्षक आहेत. दोन मित्र परिक्रमा करतायत... आपल्या क्षेत्रांत उन्नत होण्यासाठी... व्यासांचा मोबाईल डेटा जास्त झाल्या मुळे हँग झाला होता. तो डेटा मेमरी कार्ड मध्ये ट्रान्सफर करून दिला. व्यास महाशय प्रचंड खुश झाले... नर्मदा मैय्या सेवा करण्याची सुद्धा संधी देते... त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नर्मदा मैयाचे आभार मानले. व्यासजी आता माझे जिगरी दोस्त झाले आहेत.दोन मोटरसायकालिस्ट मुकेश रावल आणि श्रीकांत कलमकर पाटी गावात भेटले. आम्हाला चहा पाजण्यासाठी थांबले होते. चहा सोबत आलू वडा आणि मिरची भजी त्यांनी दिली.
मुकेश हॉटेलवाल्याला बिल द्यायला गेला, तर हॉटेल मालक यादवजी बिल घेईना... का... तर परिक्रमावासी सोबत तुम्ही सुद्धा आमचे पाहुणे आहात... काय म्हणावं बरं या औदार्याला...युथ हॉस्टेलशी मुकेश आणि श्रीकांत निगडित आहेत. निसर्गाच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीची चटकन दोस्ती होते... याचा प्रत्यय आला.
पाटी वरून बोकराटोकडे जाणारा रस्ता सतत चढाचा होता. त्यात हेडविंड सुरू होती... दमछाक करणारी... दहा किमी अंतर कापायला सव्वा तास लागला... वाटेत सवरियापानी गावाच्या जवळ हँड पंप होता. थोडी विश्रांती घेऊन... हँड पंपचे पाणी प्यायलो. एकदम तरतरी आली.
वाटेत टापर गाव लागले... बरेच पारिक्रमवासी रस्त्याच्या कडेला मोकळ्या मैदानात बसले होते. येथे सुद्धा सेवा म्हणून चहा मिळाला. या दुकानात सोरट पाहायला मिळाली. त्याला येथे इलम म्हणतात. लहानपणी प्रभादेवीच्या जत्रेत सोरट पाहायला मिळायची. चिठ्ठी काढायची आणि त्यात जो नंबर येईल त्या नंबर वरची वस्तू मिळायची...
इथे तर चक्क पैसेच नंबरवर चिटकवले होते.बोकराटोला पोहोचलो. आज बोकाराटा मध्ये आठवड्याचा बाजार होता... रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे सायकल ढकलत तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्यावी लागली. तोरणमाळ येथून तीस किमी अंतरावर आहे.
आता ऑफ रोडिंग रस्ता सुरू झाला.अतिशय खडबडीत आणि रस्त्यावरचे डांबर निघून गेल्यामुळे सायकल दगड गोट्यातून चालली होती. इलेक्ट्रिक करंटचा झटका लागतो, त्याप्रमाणे हादरे बसत होते. अक्षरशः ब्रेक डान्स सुरू होता.
तेव्हढ्यात बाजूने जीप पास झाली. जीपच्या आत खच्चून माणसे कोंबली होती. तिच्या टपावर, दरवाजाला लटकलेली, पुढच्या बोनेट वर बसलेली जवळपास पन्नास माणसे असावीत त्या जीपमध्ये.
पिपरकुंडच्या वेशीवर पोहोचलो. येथे बोकराटो वरून येणाऱ्या खचाखच भरलेल्या जीप खाली होत होत्या. येथे मुंबई महापालिकेत काम करणारा रामलाल भेटला. तो पहाडावरच्या आमली गावातला आहे. येथील आदिवासी बायका गळ्यात चांदीचा मोठा तोडा घालतात.
त्याला आदिवासींच्या पावरी भाषेत आहाडी म्हणतात. इतर गावकरी निमाडी भाषा बोलतात.जीप स्टँड कडून पिपरकुंड गाव सुरू झाला. वर गावाकडे जाणारा अवघड घाट सुरू झाला. रस्त्याची दुर्दशा त्यात चढाचा आणि वळणावळणाचा रस्ता; या मुळे काही ठिकाणी सायकल ढकलण्या शिवाय पर्याय नव्हता. तीन किमी चढायला एक तास लागला. प्रचंड दमछाक झाली होती. मुख्य गावात पोहोचायला चार वाजले. आणखी सायकलिंग करायची इच्छा नव्हती. म्हणून तेथेच तळ टाकायचा ठरले.
रेवसिंगचे छोटे दुकान असलेले घर लागले. दुकानाजवळ पोहोचताच रेवसिंगने हसतमुखाने स्वागत केले. दहा मिनिटात चहा आला. मग संजयने हळूच त्याला विचारले, 'हम यहा रह सकते है क्या' तो म्हणाला, 'हाऊ' (म्हणजे हो). आम्हाला हायसे वाटले. बाहेरच असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात सायकल लॉक केल्या आणि समान घेऊन त्याच्या घरात आलो.
शेणाने मस्त सारवलेल घर... घरात टीव्ही.. आणि त्याचे हसतमुख कुटुंब... रेवसिंगच्या बाबाचे नाव कनसिंग. घर एकत्र कुटुंब पद्धतीचे होते. त्याला आठ मुले आणि वीस नात-नातू ... एकूण चाळीस जणांचा मोठा परिवार... रस्त्यावर दुकान आणि वर टेकडीवर त्याचे चौसोपी घर होते. आळीपाळीने त्याची सर्व मुले आणि सुना भेटून गेले.
रेवसिंग बोलायला अतिशय चटपटीत होता. थोड्याच वेळात त्याच्याशी एकदम गट्टी झाली. पिपरकुंड मधील आदिवासी जमातीचा तो प्रमुख होता. सरकारी योजनांचा लाभ घेऊन त्याने दुकान बांधले होते. सायंकाळी आठ वाजताच जेवण आले. शेव खाटो, टमाटर खाटो आणि त्याच्या बरोबर रोटलो जेवण आले.
अतिशय चमचमीत बनविले होते जेवण त्याच्या लाडोने (बायकोने)... त्यानंतर ताक आले.ताकाला "मोहे किंवा साह" म्हणतात.
जेवल्यावर गप्पांचा सिलसिला सुरू झाला. त्याने पहाडी लोकसंगीत ऐकविले. त्याची वडिलोपार्जित खानदानी तलवार दाखविली. स्वतः तलवारीसह आदिवासी नृत्य करून दाखविले. संजयने पण तसेच नृत्य केले. त्या भारदस्त तलवारीसह फोटो काढले.
रेवसिंगचे शिक्षण झालेले नाही. ही आदिवासी कुटुंब खूप खडतर जीवन जगत असतात. पावसात नाले भरून वाहतात तेव्हा गावांचा संपर्क तुटतो. एकदा तर त्याने ओढ्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या स्वतःच्या मुलीला वाचविले... सर्व खडतर आणि विपरीत परिस्थितीत सुद्धा ही माणसे मदत करायला तत्पर आणि सदा हसतमुख असतात याचे खूप अप्रूप वाटले...
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... माणसाच्या गरजा कमी असतील तर दुःख त्याच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही...
शेणाने सारवलेल्या घरातील जमिनीवर निवांत झोप लागली...
आदिवासी कुटुंबासमवेत काढलेली ती सायंकाळ आणि रात्र ... जीवनाच्या अनुभवत प्रचंड भर टाकून गेली.
नर्मदे हर
सतीश जाधव
मुक्त पाखरे...