Monday, March 29, 2021

पृथ्वीचे प्रेमगीत

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

कविवर्य   कुसुमाग्रज 

कुसुमाग्रजांनी पृथ्वी सोबत स्त्रीचे मन सुद्धा कथन केले आहे. 

भव्य आणि विशाल प्रेमाची ही कथा आहे. युगानुयुगे सूर्याच्या प्रेमाची याचना करीत तुझ्या भोवती मी फिरते आहे. तरीपण सदैव माझी वंचना होत आहे. असं किती काळ धावू? तारुण्याचा यौवनाचा बहर ओसरला आहे. तरीसुद्धा मनाच्या अंतरंगात तुझ्या प्रेमाची अखंड ज्योत सदैव तेवत आहे. तुझ्या भोवती प्रेमायचना करीत मी अविरत भ्रमण करणार आहे. 

अनंत युगे पृथ्वी सूर्याच्या कक्षेत  करत फिरत आहे.

 तसेच प्रेमभराने प्रेरित झालेली लालना प्रियकराला विचारते आहे, 'तुझ्या मागे मागे किती काळ येऊ; तुझ्या प्रीतीची याचना किती वेळा करू, अशी विचारणा करते आहे. प्रत्येक प्रेयसीची ही आराधना आहे.

स्त्री (पृथ्वी) जेव्हा एखाद्यावर (सूर्यावर) नितांत प्रेम करते. तेव्हा तारे, चंद्र, ध्रुव, धूमकेतू, शुक्र, मंगळ यांच्या विविध अंगाने विविध ढंगाने केलेल्या प्रेम याचना तिला निरर्थक वाटतात. सूर्याच्या दिव्य तेजापुढे इतरांचे प्रेमालाप काजव्याच्या शूद्र चमचमी सारखे भासतात. 
माझ्या प्रेमासाठी अनेक तारे, ग्रह, धूमकेतू मला लुभावण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझ्या अंगअंगावर उल्कामय पुष्प वर्षाव करीत आहेत. परंतु तुझ्या शिवाय मला काहीही प्रिय नाही.
तुझ्या भव्य तेजापुढे, काजव्या प्रमाणे असणाऱ्या ग्रह ताऱ्यांचा प्रेमाचा स्वीकार मला मान्य नाही. त्या पेक्षा तुझा दुरावा मला प्रिय आहे.

तिच्या अंतरीच्या कळा लाव्हा रसासारख्या उफाळून येतात, त्यामुळेच आपल्या (पृथ्वी आणि सूर्य) दोघांतली  दुरी सलत राहते. तुझे तेजोमय रूप धारण करून, तुझी गळा भेट घ्यावी. तुझ्या दाहकतेत विरघळून जावे. अशीच मनोकामना आहे. एव्हढे अमर्याद, अनंत प्रेम आहे.

तुझ्या प्रेमाच्या अंगार माझ्या अंतरंगात धगधगतो आहे. तुझ्या आठवणीने सौंदमीनीचे आसूड माझ्यावर मनावर  कोसळतात आणि त्याचा ज्वालामुखी द्वारे उद्रेक होतो. तुझ्या विरहाने मन भूकंपाद्वारे विदीर्ण होते. 

परंतु हे प्रेम मला एकतर्फी वाटत नाही, कारण तिच्या वर असलेल्या प्रेमामुळेच सूर्य तिला आपल्या मागे घेऊन चालला आहे. त्यामुळेच पृथ्वीच्या प्रीतीची ज्योत अविश्रात तेवत आहे. त्याच्या मागची प्रेरणा सुर्यच आहे. 

या ठिकाणी एक जाणवते, सूर्य (पुरुष) सर्वांनाच आपल्या मागे खेचतो आहे. सर्वांवर प्रेम करतो आहे. परंतु पृथ्वी (स्त्री) नितांत प्रेम,  फक्त एकावरच करू शकते. त्यामुळेच ती इतरांच्या प्रेमाचा अव्हेर करते.
तुझ्या विराट रुपात मिसळून जावे हीच कामना आहे.   तुझ्या तेजोमय ज्वालात सामावून जावे आणि आलिंगनाने प्रीतीची  तीव्रता अनुभवायची आहे. तुझ्या अमर्याद थोरावीची मला जाणीव आहे. तुझ्या पुढे एखाद्या धुळीकणाप्रमाणे मी शुद्र आहे. तरी सुद्धा तुझ्यात सामावून जाण्याची तीव्र लालसा आहे

स्त्रीला (पृथ्वीला) सूर्याची अमर्याद थोरवी माहीत आहे. त्यांच्यापुढे आपण यत्किंचित आहोत हे सुद्धा तिला ज्ञात आहे. तरी सुद्धा सूर्याच्या चरणी आपले प्रेम अर्पण करण्यासाठी त्याच्या पायाची धूळ होणे सुद्धा तिला मान्य आहे.

असे नितांत प्रेम फक्त स्त्रीच करू शकते.

सतीश जाधव
मुक्त पाखरे......

Monday, March 8, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सातवा) प्रकाशा ते देडिया पाडा ०४.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सातवा)   प्रकाशा ते देडियापाडा

०४.०१.२०२१

प्रकाशाला दक्षिण काशी सुद्धा म्हणतात. तापी महात्म्यात उल्लेख आहे की, शिव महादेवाने एका सिद्धमहात्म्याच्या स्वप्नात येऊन सांगितले की एकाच स्थानावर एका रात्रीत १०८ शिवमंदिरांची निर्मिती झाली तर त्या गावात  माझा कायम निवास असेल. तापी, पुलिंदा आणि गोमाई नदीच्या संगमा जवळील गावामध्ये १०८ शिवमंदिर निर्मितीचे काम सुरू झाले. शिवभक्तांनी १०७ मंदिरांची निर्मिती केली, परंतु १०८ व्या मंदिराचे निर्माण कार्य सुरू असतानाच सूर्य प्रकाशित झाले. त्यामुळे या गावाला काशी एवढे महत्व मिळाले नाही. 

       आजसुद्धा हे मंदिर;  भिंती विरहित अर्धवट अवस्थेत आहे. ह्या मंदिर निर्मितीच्या वेळी प्रकाश आल्यामुळे या गावाला प्रकाशा हे नाव पडले.

तापीच्या किनाऱ्यावर जाऊन सुर्यनारायणाचे दर्शन घेतले. मैयेची पूजा केली. केदारेश्वर, काशीविश्वेश्वर महादेव तसेच पुष्पदंतेश्वर मंदिरांचे दर्शन घेऊन पुढे प्रस्थान केले.

आज देडिया पाडा पर्यंत जवळपास ९५ किमी सायकलिंग करायची होती. या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कधी महाराष्ट्र तर कधी गुजरात पुन्हा महाराष्ट्र असा दोन्ही राज्यांच्या वेशी वरून प्रवास सुरु होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला महाराष्ट्र तर उजव्या बाजूला गुजरात... येथे भेटणाऱ्या व्यक्ती मराठी आणि गुजराती भाषा याची सळमिसळ करून बोलतात.
या भागात कापूस आणि ऊस याचे मोठ्या प्रमाणात पीक येते. पहिला टप्पा १८ किमी वरील तळोदा शहर होते. रस्त्यात एक गोदाम लागले.  कापसाची छाननी करून तो ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते.

कापसाच्या वेगवेगळ्या प्रती समजल्या. येथे प्रसाद म्हणून चहा देण्यात आला.

तळोदा येथील कणकेश्वर महादेव मंदिराला भेट दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करताना येथे तळ ठोकला होता. म्हणून या गावाला तळोदा हे नाव पडले.  एका धनगराच्या मेंढरांच्या खाजणात, छत्रपतींच्या मावळ्यांनी घोडे घुसवले, म्हणून त्या धनगराने हातातील काठीने मावळ्यांशी सामना केला होता. त्याचा पराक्रम पाहुन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या सैन्यात सामावून घेतले होते.

तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतिक, सामाजिक  इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे, पहेलवानकी गाजवणारे अशी तळोद्याची ओळख आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणाऱ्या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात विशेष प्रसिद्ध आहे.

तळोदा पार करून तासाभरात मेंढवड या गावाजवळ पोहोचलो. या पट्ट्यात जागोजागी ऊसाची गुऱ्हाळे लागली होती. एका ऊसाच्या गुऱ्हाळात प्रवेश केला.

चार मोठ्या कढईत ऊसाचा रस उकळत होता. घट्ट झालेला ऊसाचा रस पत्र्यांच्या डब्यात भरून थंड केला जात होता. लाल रसरशीत केमिकल विरहित गुळ खायला मिळाला. त्याच बरोबर दोन मोठे ग्लास ऊसाचा रस समोर आला. रस काढलेली ऊसाची चिपाड सुद्धा जळण म्हणून तसेच गुरांच खाद्य म्हणून उपयोगात येतात. त्यातून निघणारी मळी खत म्हणून वापरात येते. कारखान्यात कामकरी महिला मोठया प्रमाणात होत्या.

दुपारचा एक वाजला होता. रस्ता बराच खराब होता. धूळ, धूर, ऊन यांचा सामना करीत मार्गक्रमण करीत होतो. वाटेत अक्कलकुवा गावाजवळ एका चहावाल्याने नर्मदे हर करीत आम्हाला साद घातली.

दुपारच्या उन्हात कडक मसालेदार चहा थंडावा देऊन गेला. चुलीतील निखारे धगधगते ठेवण्यासाठी सोनाराकडे असते तशी फुंकणी मशीन चुलीला लावली होती. जुगाड संस्कृतीमुळे या गावाला "अक्कलकुवा" नाव पडले असावे काय?

पावणे तीन वाजता गव्हाली गावात पोहोचलो. गरमागरम भजी आणि जिलेबी खाल्ली.

उन्हात तापल्यामुळे थोड्या विश्रांतीची गरज होती. या टपरीवर एक सुभाषित लिहिले होते "नम्रता हाच माणसाचा सर्वोत्तम गुण आहे" अतिशय खराब रस्त्यांमुळे कातावलेल्या जीवाला नम्रतेचा सहवास मिळाला की पुढ्यात येणारे पदार्थ समाधानाचे सुख देतात. अतिशय चपलखपणे सुभाषिताचा अर्थ समजला होता.

गुजरात राज्यातील दुधलीवार गावाजवळ पोहोचलो. 'नाना माच' आणि 'मोटा माच' घाट्या चढून वर आलो होतो. घाटी चढताना दमछाक झाली परंतु टकाटक रस्त्यामुळे वेगात वाढ झाली होती. रस्त्याच्या किनारी मकेवाला बसला होता. चुलीवरील मोठ्या टोपात मक्याची कणसे उकडत टाकली होती.

 फतकल मारून बसलो आणि मक्याचा आस्वाद घेतला. मक्याला येथे 'डोडा' म्हणतात.  दुपारच्या भोजन प्रसादी ऐवजी वाटेत मिळेल ते हायड्रेशन साठी खात होतो.

दुधलीवार गावाकडून देडियापाडा अवघ्या अठरा किमी अंतरावर आहे. सूर्य अस्ताला चालला होता आणि पुढील प्रवास शूलपाणेश्वर अभयारण्यातून होता. मोठे मोठे कंटेनर या हायवे वरून जात होते. त्यामुळे सायकलिंग अतिशय सावधपणे करत होतो.

वाटेत नर्मदाकुटी गाव लागले. एका झोपडीच्या लोकेशनवर अस्ताला चाललेला सूर्य सुवर्ण शलाकांची उधळण नभांगणात करत होता.

अलगदपणे लाखाची गोष्ट चित्रपटातील " त्या तिथे पलीकडे" गाण्याची आठवण झाली. गाणे अनुभवणे काय असते याची अनुभूती मिळाली.

सायंकाळी साडेसहा वाजता देडियापाडा येथील जलराम बाप्पाच्या आश्रमात पोहोचलो. 

प्रकाशा ते अंकलेश्वर या दिडशे किमी पट्ट्यात परिक्रमावासीयांसाठी कोणतीही सेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे जलराम बाप्पाच्या आशीर्वादाने महामंडलेश्वर श्री सुरेंद्रदासजी महाराज गेल्या सव्वीस वर्षांपासून देडियापाडा येथे परिक्रमावासीयांची सेवा करत आहेत. हे सेवाव्रत म्हणजे एक महायज्ञ आहे... अखंड धगधगत राहणारे...
सुरेंद्रदासजी महाराज म्हणतात "मैने जो देखा दो रोटीमे, वो नही देखा पुछीमे"   विचारपूस करण्यापेक्षा जेवू घाला हाच संदेश देतात बाबाजी.

जलराम बाप्पाच्या मंदिराजवळच मोठा आश्रम परिक्रमावासीयांच्या निवासासाठी होता.  आमच्यासह जवळपास वीस परिक्रमावासी तेथे होते. स्नानसंध्या आटपून नर्मदा मैंय्येची पूजाअर्चना केली. वातावरणात गारवा आला होता. रात्री सर्वांसोबत  दालखीचडी भोजनप्रसादी ग्रहण केली.

आजच्या दिवसाची प्रकाशा ते देडियापाडा ही सायकल वारी स्मरणात राहील अशीच होती... सेवावृत्तीच्या प्रकाशवाटा दैदिप्यमान झाल्या होत्या.


सतीश जाधव

मुक्त पाखरे...

Monday, February 22, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सहावा) तोरणमाळ ते प्रकाशा

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सहावा)  तोरणमाळ ते प्रकाशा
०३.०१.२०२१

सकाळी पाच वाजता जाग आली. बाजूला असलेल्या बाबाजींच्या घंटा नादाने मन एकदम प्रसन्न झाले. त्यांची पूजा सुरू होती. थोडावेळ मेडिटेशन केले आणि बाजूच्या नर्मदा तलावावर आंघोळ करायला गेलो. 
पहाटेच्या वेळी नर्मदा तलावाचे वेगळे रूप पहायला मिळाले. सकाळच्या थंड वाऱ्याच्या झुळकीवर तलावात उठणाऱ्या लहरी... मनातील विचारांचे तरंग शांत करीत होते. खूप वेळ अनिमिष नजरेने नुसत्या लहरणाऱ्या लाटांकडे पाहत होतो.

आन्हिके आटपून... बरोबर असलेल्या नर्मदा मैयेची पूजा करून... गुरू गोरखनाथ बाबांच्या  मंदिरात गेलो. बाबांसह मंदिरातील दोन शिवलिंगाचे दर्शन घेतले. तेथील महंत संजूनाथ बाबांनी बालभोग दिला. त्यांचे आशीर्वाद घेऊन तोरणमाळ वरून प्रस्थान केले.

मच्छिन्नद्रनाथ गुंफा तोरणमाळ पासून साडेतीन किमी अंतरावर आहे. अपहील आणि ऑफ रोडिंग रस्ता होता. एका ठिकाणी रस्ता संपला. सायकल तेथेच ठेऊन, पायऱ्या उतरत उतरत गुंफेत जावे लागले. गुंफेजवळ केसरी पताका लावल्या होत्या. तसेच गुंफेचा आतील भाग शेंदुराने रंगविलेला होता. गुहेच्या आतमध्ये जवळपास शंभर पावले चालत जावे लागले. काही ठिकाणी खूप खाली वाकून पुढे जावे लागले. समोरील एक चौथऱ्यावर गुरू मच्छिन्नद्रनाथांची मूर्ती विराजमान होती. त्यांच्या मागे कपारीतून पाणी ठिबकत होते.
 विशेष म्हणजे गुंफेतील वातावरण अतिशय ऊबदार होते. तसेच या गुंफेत मोबाईल नेटवर्क एकदम झकास होते. जवळपास कुठेही टॉवर नव्हता. तसेच निबिड जंगलात डोंगराच्या कपारीत ही गुंफा होती. मग एव्हढे स्ट्रॉंग नेटवर्क कसे... अंतराळातील एकवटलेल्या रेडिओ लहरींचे ज्ञान आपल्या ऋषी मुनींना होते...  याची प्रचिती आली. आपले ऋषी वैज्ञानिक सुद्धा असावेत. असाच प्रत्यय समर्थ रामदास स्वामींच्या शिवथरघळ येथे आला होता. थोडा वेळ या गुंफेत ध्यानस्थ बसलो... येथून मित्र, आप्तस्वकीयांना फोन लावले...तसेच फोटो सुद्धा शेअर केले. तोरणमाळला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही गुंफा जरूर पहावी.
 
शहादाकडे सायकलिंग सुरू झाले. नंदुरबारच्या माईलस्टोन  बोर्डाजवळ जेम्स बॉण्डच्या अविर्भावात संजयचा फोटो काढला.
पुढे तोरणमाळच्या वेशीवर नागार्जुन देवाचे मंदिर लागले. ही देवता संन्यास, वैराग्य, तत्वज्ञान आणि धर्म विचारांचा आशय सांगणारी आहे. येथील मूर्ती ११ व्या शतकातील यादवकालीन आहेत. 
तोरणमाळ घाट उतरायला सुरुवात केली. रस्त्याच्या वळणावर एक साप मरून पडलेला आढळला. गाड्यांच्या चाकाखाली त्याच्या चिंधड्या झाल्या असत्या... सायकल थांबवून त्या मृत सर्पाला बाजूच्या झाडीत अलगद नेऊन ठेवला.

 पुढे निसर्ग पर्यटन केंद्र लागले...अतिशय सुंदर  व्हिव पॉईंट होता. जळगाव वरून आलेले पर्यटक येथे भेटले. आम्ही सायकल वरून नर्मदा परिक्रमा करतोय, याचं त्यांना खूप अप्रूप वाटलं. त्यांनी परिक्रमेबाबत माहिती घेतली, तसेचआवर्जून आमच्या सोबत फोटो काढले. असे भेटणाऱ्या आणि अनभिज्ञ असणाऱ्या मंडळींच्या मनात नर्मदा परिक्रमेबाबत आस्था निर्माण करणे, हा सुद्धा उपयुक्त उपक्रम आहे हे जाणवले.
 
लेघापाणी गावाजवळ औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र लागले.गावातील मुले सायकल पाहण्यासाठी अवतीभोवती जमा झाली. सोबत असलेली चॉकलेट त्यांना दिली. गियरवाल्या सायकल बद्दल त्यांच्या मनात खुपच कुतूहल होते. एक-एक करून सर्वांना सायकल वर बसविले. त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद... खूप काही सांगून गेला...

वाटेत काही मुले डोंगराचा रानमेवा... बोरे घेऊन बसली होती. आम्ही पण लहान झालो. संजय तर त्या मुलांच्या बाजूला मांडी घालून बसला. दोघांनी  बसून  मनसोक्त बोरे खाल्ली आणि पाठपिशवीत सुद्धा भरून घेतली. त्या मुलांनी फक्त वीस रुपये घेतले. परंतु पुढे आल्यावर आम्हा दोघांनाही काहीतरी चुकल्यासारखे वाटले. वीस रुपयात एक वाडगाभर बोरे घेण्याऐवजी जवळपास सर्व बोरे आम्ही पिशवीत भरली होती. त्या लहान मुलांपेक्षा आम्ही छोटे झालो याची जाणीव झाली...

खरं तर आज आमचा फळे खाण्याचा फिस्ट दिवस होता... पुढे लकडकोट गावात रस्त्याजवळच्या एका शेतात ऊस तोडीचे काम सुरू होते. शेतात फतकल मारून ऊस तोडणीचे काम केले.  मालक संतोष महाडिक यांनी ऊसाचे मोठं कांड... काढून दिले. आता दातांची परीक्षा होती... आम्ही उत्तम मार्कने पास झालो होतो... खूप वर्षांनी दातांनी ऊस सोलाला होता.  शाळेजवळ येणाऱ्या गंडेरीवाल्याची आठवण झाली. नर्मदा मैय्या आम्हाला बालपणात घेऊन गेली होती.

म्हसावद गावाच्या सीमेजवळ पोहोचलो. अनिल सूर्यवंशी यांनी सहा एकर शेतामध्ये पपईची प्रचंड मोठी बाग तयार केली होती. त्यांचा धाकटा मुलगा चेतन सूर्यवंशी आमच्या बरोबर बागेत होता. बगीच्यातील झाडे पपईने लगडली होती. तीन पिवळ्या धम्मक पपई आमच्या पुढ्यात आल्या. तजेलदार आणि अतिशय सुमधुर पपई खातांना आम्ही तल्लीन झालो होतो. सूर्यवंशींचा मोठा मुलगा भूषण मुंबईतील वरळीच्या पोतदार रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेतोय, हे ऐकून आनंद झाला. मुंबईला गेल्यावर त्याला भेटण्याचे आश्वासन चेतनला दिले आणि पुढे प्रस्थान केले. 

दुपारचे दोन वाजून गेले होते. विविध फळे खाल्ल्यामुळे पोट तुडुंब भरले होते. एक बरं असतं... सायकलिंग करत असल्यामुळे खाल्लेले सर्व पदार्थ सहजपणे जिरून जातात.  सायकलिंग करताना, खाण्याची आवड... मनसोक्त जोपासता येते. 

तासभर सायकलिंग केल्यामुळे... भुकेने उचल खाल्ली होती. म्हसावद गावातील पंचकृष्ण हॉटेलवाल्याने पंचरंगी नास्ता दिला. भजी, फाफडा, गोड गाठया, जिलेबी चिवडा, कचोरी, मिसळ  या एकामागोमाग एक आलेल्या पदार्थांनी बहार आणली. उन्हाचा कडाका कमी होई पर्यंत बराच वेळ या हॉटेलमध्ये बसलो. येथून प्रकाशा चोवीस किमी आहे. नास्त्या सोबत गावकऱ्यांशी मस्त गप्पा सुद्धा मारता आल्या. 

महाराष्ट्र देशा, कणखर देशा सोबत सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचा उत्तर भाग पहात होतो. येथील काळया कसदार जमिनीत ऊस, कापूस, हरभरा,गहू या पिकांसोबत बराच भूप्रदेश हिरवळीने व्यापला होता. नंदुरबार जिल्हा तसा कमी पर्जन्यमानाचा प्रदेश आहे. परंतु ईरिगेशन प्रकल्प मोठ्या प्रमाणात येथे राबविल्यामुळे जमिनीत खरीप, रब्बी आणि जोड पिके सुद्धा घेण्यात येत आहेत.

वाटेत मेंढपाळ मेंढे, बकरे यांचा कळप घेऊन चालले होते. एक छोट्टस आणि गुबबूबीत कोकरू सायकल जवळ आलं... त्याला  मायेने उचलून घेतले...  त्याला प्रेमाची भाषा समजली... अलगद  कुशीत विसावलं... मायेची ऊब असीम आनंद देऊन गेली... आज नर्मदा मैय्या वेगवेगळ्या रूपाने आपले दर्शन देत होती..

आसमंतात तळपत्या सूर्याभोवती ढगांनी गर्दी केली होती. शेतात उगवलेल्या कापसाच्या बोण्डातून उडणारा कापूस सूर्याभोवती जमा झाला आहे याचाच भास झाला...संजयची राईड "नर्मदे हर" चा जप करत, दिमाखदारपणे सुरू होती. 

काथरडा खुर्द गावात शेताच्या बाजूला एका मचाणावर टोम्याटोची पिशवी घेऊन रामदास भाऊ बसले होते. आम्हाला पाहताच टोम्याटो खायला दिले. आज पोटात एव्हढी जागा कशी होत आहे याचं कोड पडलं होतं.  रामदासभाऊ आपल्या शेतातील ताजे टोम्याटो प्रत्येक परिक्रमावासीला देऊन त्याची सेवा करतात. संजय म्हणाला, 'आज नर्मदा मैय्या आमची मजा मजा करवते आहे'. 

प्रकाशा येथे केदारेश्वर महादेव मंदिरात सव्वा पाचला पोहोचलो. जवळच पुष्पदंतेश्वर मंदिर तसेच काशी विश्वेश्वर मंदिर आहे. श्री सद्गुरू दगाजी महाराज धर्मशाळेच्या मोठ्या हॉल मध्ये आमच्या विश्रामाची व्यवस्था झाली.

तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या प्रकाशाला दक्षिण काशी म्हणतात. येथे पुलिंदा, गोमाई आणि तापी नदी यांचा संगम झाला आहे. तेथेच संगमेश्वर महादेव मंदिर आहे.

आषाढ शुद्ध सप्तमीला  सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव नदीला साडी अर्पण करण्यात येऊन साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या या अनोख्या परंपरेत खान्देशासह गुजरात राज्यातील  शेकडो भाविक सहभागी होऊन तापी मातेचे पूजन  करतात.

 प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिराच्या सभामंडपात सूर्यकन्या तापी मातेची मूर्ती आहे.  संगमरवरी दगडातील  देवीच्या मूर्तीचे दर्शन करण्यासाठी आषाढ महिन्यातील  सप्तमीला येणारा तापी नदीचा जन्मोत्सव भाविकांसाठी पर्वणी ठरतो. तापी नदीची मूर्ती अन्य कोठेही नाही. चार भुजा, डोक्यावर मुकूट, एका हातात शंकराची पिंड, दुसऱ्या हातात डमरु अशी ही मूर्ती पूर्वाभिुमख आहे. 

 सायंकाळी जवळच्या तापी नदीत स्नानसंध्या आटपून नर्मदा मैयेची पूजा केली. संत श्री दगाजी महाराज आश्रमाकडून रात्रीच्या अन्नप्रसादीची व्यवस्था झाली. आश्रमाच्या धर्मशाळेत चार बस मधून जवळपास दोनशे परिक्रमावासी आले होते. 

 बाजूच्या श्री राम मंदिरात 'हरे कृष्णा, हरे राम' चा अखंड जप रात्रभर चालू होता. आता सर्व परिस्थितीशी जुळवून घेण्याची शक्ती नर्मदा मैयेच्या सहवासाने मिळत होती. फोन वरून सर्वांना खुशाली सांगून झोपेच्या अधीन झालो.

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

Monday, January 25, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस पाचवा) पिपरीकुंड ते तोरणमाळ

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस पाचवा)  पिपरीकुंड ते तोरणमाळ

०२.०१.२०२१

सकाळी मैयेची पूजा केली.   रेवसिंगला पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले. चहा बिस्कीट घेऊन रेवसिंग कुटुंबाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्याने काहीही पैसे घेतले नाहीत. अतिशय प्रेमाने सेवा देण्याची वृत्ती खरोखरच रेवसिंगकडून शिकावी. ही माणसं पाहिली की आपण किती छोट्या जगात जगतो आहोत याची अनुभूती झाली.

ग्रामीण जीवन किती सुंदर आहे याची जाणीव झाली... अतिशय कमी गरजा आहेत त्यांच्या...
खरोखरच रेवसिंगची आनंदी झोपडी खूप भावली...

डोंगराच्या आडून सुर्योदय झाला होता.  रस्ता दिसू लागला होता. पुढचा रस्ता ऑफ रोडिंग, दगड धोंड्यांचा आणि घाटीचा होता. काही ठिकाणी सायकल सामानासह ढकलावी लागली. रस्ता अतिशय निसरडा आणि धुळीचा होता. पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा अवघड अशी ही वाट...

सायकलिंगवाल्यांसाठी तर अतिशय बिकट होती. तीन किलो मीटरचा झरार गावाकडे नेणारा रस्ता... प्रचंड दमछाक करणारा होता. दम खात... थांबत... झरार गावात पोहोचलो. रस्त्यावर एकमेव दुकान होते. गावातली सर्व घरे वरच्या उंच टेकाडावर होती. सकाळीच... दोघेही घामाने थबथबलो होतो. 

रस्त्यावरील त्या एकमेव दुकानात चहा बनवायला सांगितले. 'हाऊ' दुकानातील बाबाजींचा होकार आला. अतिशय छोटेखानी घर, त्यात दुकान आणि गाईचा गोठा होता. चुलीजवळ काम करणाऱ्या मैय्येने चहा आणला.  काळया चहा सोबत बिस्कीटे खाल्ली. दुकानदाराने फक्त बिस्किटाचे पैसे घेतले. अतिशय कमी गरजांमध्ये ही माणसे गुजराण करीत असून सुद्धा प्रेमाने देण्याची दानत आणि सेवाभाव विशेष जाणवला.

झरार गावाचा अतिशय विहंगम परिसर... वातावरण आल्हाददायक आणि प्राणवायूने ओतप्रोत भरलेले...

येथेच मध्यप्रदेशचा वनरक्षक नाका आहे. पुढे दोन किमी वर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. तेथून सोळा किमीवर तोरणमाळ आहे. अजूनही खडकाळ रस्ता संपला नव्हता. मध्येच सायकल ढकलावी लागत होती. महाराष्ट्र चेकपोष्ट आले. कोणीही नव्हते तेथे.

महाराष्ट्रात शिरलो तरीही रस्त्याची स्थिती सुधारली नव्हती. आता तर अवघड चढ उतार होते. सामानासह सायकल चढविणे... एक-एक  गियरवर सुद्धा कठीण होते. काही ठिकाणी सायकल चढविताना गावकऱ्यांची मदत घ्यावी लागली.

तोरणमाळ पर्वतरांगांच्या  शिखरावर पोहोचलो... शिखराच्या वरच्या बाजूला एक बुरुजबंद भिंत लागली. म्हणून सायकल खाली ठेऊन टेकाड चढून गेलो. दगडी भिंतीच्या पुढे गुंफा लागली.

जालंधरनाथ महाराजांची गुंफा होती... तेथे आता बमबम लहरीनाथ बाबांचे वास्तव्य आहे.  अन्नधान्य आणण्यासाठी बाबाजी शहादा गावाच्या बाजारात गेले होते.

येथे नाथ संप्रदायाचे संत जालंधरनाथ यांनी  घोर तपस्या केली होती. आता परिक्रमावासीयांची येथे सेवा केली जाते. अतिशय अवघड ठिकाणी वसलेले हे मंदिर आणि तेथे दिली जाणारी सेवा पाहून स्तिमित झालो. दोन किमी खाली जाऊन पाणी आणावे लागते. थकला भागलेला पारिक्रमवासी जेव्हा येथे पोहोचतो... तेव्हा येथे मिळणारी सेवा त्याला प्रचंड बळ देते. आपल्या बाळाची काळजी घेणाऱ्या नर्मदा मैयेच्या अपार प्रेमाची जाणीव येथे होते...

भोजन प्रसादीची व्यवस्था झाली..  तेथे असलेल्या मैयेने वांग्याची भाजी आणि रोटी भोजनप्रसादी दिली.

तेथे आलेले परिक्रमा करणारे हटयोगी बाबा नर्मदानाथ बैरागी आमच्या बरोबर भोजनाला बसले... संपूर्ण अंगाला भस्म लावलेले, कानाच्या मधल्या भागात मोठी तांब्याची बिकबाळी आणि काळी कफनी घातलेले बाबा खूप प्रेमाने बोलत होते. सायकल घेऊन या मार्गाने आल्या बद्दल त्यांना खूप अप्रूप वाटले आणि आनंद ही झाला...

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश चेक पोष्ट जवळ आलो. तेथे कोणीही नव्हते. वरच्या टेकाडावर एक मजली पांढरी इमारत दिसली. तेथे फोटो काढून महाराष्ट्रात पाय ठेवला.

महाराष्ट्रातील पहिल्यांदा लागलेले गाव बुरुमपाड्यात आलो.

नंदुरबार जिल्ह्यातील हे टोकाकडचे गाव. सामूहिक वन संवर्धन प्रकल्प येथे राबविला जातो आहे.   येथील गावे म्हणजे आदिवासी पाडे आहेत.  याला नवे तोरणमाळ सुद्धा म्हणतात. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आल्याबद्दल खूप आनंद झाला.  महाराष्ट्रात याच शूलपाणी जंगलातून नर्मदा मैय्या वाहते, त्याचा सुद्धा आनंद होता. या बुरुमपाड्यात सुद्धा चहा देऊन सेवा मिळाली.

पुढे तोरणमाळच्या विव्ह पॉईंटवर आलो.

येथून खालच्या दरीत वसलेली अनेक गावे, हिरवेगार जंगल परिसर आणि शेतांचे चौकोन  दिसत होते. एका पाठी एक पसरलेल्या तोरणमाळच्या पर्वतरांगा दिसत होत्या.  नंदुरबार, शहादा फाट्यावर आलो. तेथे गावांच्या नावाचा बोर्ड मराठीत लावलेला होता.
येथून तोरणमाळ, नर्मदा तलाव आणि मुख्य गाव चार किमी अंतरावर आहे.

वर-खाली चढ उताराच्या रस्त्याने तोरणमाळचे मुख्य आकर्षण नर्मदा तलावाजवळ पोहोचलो.

त्याच्या बाजूलाच बाबा गोरखनाथांचा भव्य आश्रम आहे. हे नाथ परंपरांचे सर्वात मोठे सिद्धपीठ आहे. गोरखनाथ बाबा येथे साक्षात विराजमान आहेत. बाबा गोरखनाथांच्या तपश्चर्येने येथे नर्मदा मैय्या पाताळातून प्रकट झाली आहे. म्हणूनच परिक्रमावासी तोरणमाळला आवर्जून भेट देतात. येथील जंगलाला शूलपाणी जंगल म्हणतात.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. येथे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात यांच्या सीमा आहेत.  पावसाळ्यात सर्व ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात, तसेच सकाळी आणि संध्याकाळी धुक्याचे साम्राज्य असते.

गुरू गोरखनाथच्या मंदिरात विश्रांतीची व्यवस्था झाली. तेथून 'सीता खाई' पाहायला गेलो. खाली खोल दरी दिसत होती.

सीता मैय्या येथेच भूमातेमध्ये विलीन झाली होती. हा एको पॉईंट सुद्धा आहे. येथून मध्य प्रदेशाचा भूभाग दिसतो.

प्रचंड वारे सुटले होते. वाटेत आदिवासी पाडे लागले. तेथील लहान लहान मुले "नर्मदे हर" म्हणत आमच्या मागे धावत होती. एक टपरीवजा दुकान लागले. सायकल थांबवून सर्व मुलांना चॉकलेट वाटले. तेथेच संजयने माझे नामकरण केले, "चॉकलेट बाबा".

समोरच्या झाडातून सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन झाले. काळया ढगांतून डोकावणारे सोनेरी कवडसे निसर्गाचे संगीत गात होते.

मंदिराच्या मागे असलेल्या नर्मदा तलावाच्या काठावर  निवांत बसलो...  सर्व भावना आणि विचार विरहित अवस्थेत या ठिकाणी तल्लीन झालो. वातावरण थंड व्हायला लागले होते.

गोरखनाथ सिध्द पिठाचे मुख्य महंत योगी संजूनाथजी यांनी भोजन प्रसादीची सर्व व्यवस्था केली. मंदिराच्या खालीच विश्रामाची व्यवस्था होती.

ग्रामीण जीवन आणि सेवा भाव यांची फार जवळून ओळख झाली...

मनाचा... मुंबईच्या छोट्या जगातून गावाकडच्या विशाल विश्वात प्रवेश झाला होता.

नर्मदे हर...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...