Friday, October 16, 2020

सत्तीपट्टान विपश्यना

सत्तीपट्टान विपश्यना  

दि. ०२.०४.२०१९ ते १०.०४.२०१९

सतिपट्टान म्हणजे विपश्यनेचा सूक्ष्म अभ्यास. हा अभ्यास करण्याचा योग वरील कालावधीत धम्मगिरी, इगतपुरी येथे आला. हा अभ्यास करण्यासाठी दहा दिवस विपश्यनेचे पाच कोर्स करणे आणि एक वेळ दहा दिवस धम्म सेवक म्हणून सेवा देणे अनिवार्य आहे.


सति म्हणजे सजगता, जागरूकता  आणि
पट्टान म्हणजे प्रतिष्ठापन...

म्हणजेच "जागरूकतेचे प्रतिष्ठापन" याचा अर्थ आपण करत असलेल्या कर्माप्रती सतत सजग असणे...

विपश्यनेची चार स्मृती प्रस्थानें आहेत. त्याचा अभ्यास सतिपट्टानाच्या अनुषंगाने करता येतो.

कायानुपश्यना .... शरीराच्या अंगाने

वेदनानुपश्यना..... संवेदनांच्या अनुषंगाने

चित्तानुपश्यना ......  मनाच्या अनुषंगाने
आणि
धम्मानुपश्यना ..... धर्माच्या म्हणजेच निसर्ग नियमांच्या अनुषंगाने

विपश्यनेच्या या सूक्ष्म अभ्यासात,  आपल्याला, स्वतः बद्दलच्या जागरूकतेला अंतिम सीमेपर्यंत प्रतिष्ठापित करण्याचे काम करता येते. त्यामुळे आपल्या संबंधीचे (शरीर आणि मन) सर्व सत्य प्रकाशात येते. ते सुद्धा स्वतःच्या अनुभूतीने;  हे सर्व सत्य आपल्या साडेतीन हाताच्या कायेमध्ये प्रत्यक्ष ज्ञानाने प्रकट होते.

विपश्यना म्हणजे स्वतःला विशेष रीतीने पाहणे. याची सुरुवात  "आनापान" द्वारे होते. नाकपुड्यातून आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मन एकाग्र होते. त्या नंतर ह्या एकाग्र झालेल्या मनाला नाकपुड्याच्या खाली तसेच वरील ओठाच्या वर होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष देण्याची कामगिरी दिली जाते. हा अभ्यास सतत तीन दिवस केल्यावर चौथ्या दिवशी विपश्यना दिली जाते.

आनापानाची पुढील पायरी विपश्यना आहे. यामध्ये सूक्ष्म झालेले मन टाळूवर, ब्रम्हरंघ्रावर नेऊन तेथे होणाऱ्या संवेदना मनचक्षुने पहायच्या असतात. त्यानंतर मन संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवावर नेऊन तेथील संवेदना समता भावाने, स्थितप्रज्ञतेने पहायच्या.  सुखद किंवा दुःखद संवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. याद्वारे शरीरात आणि मनात चाललेल्या घडामोडींची अनुभूती होते. ही झाली विपश्यना साधनेची व्यवहार्य बाजू.

विपश्यना एक विद्या आहे, जिच्या नियमित साधनेमुळे आपण शांतीचे निरामय जीवन जगू शकतो.

अडीच हजार वर्षांपूर्वी "सिद्धार्थ गौतम" याने या विद्येचे पुनरुज्जीवन केले आणि विपश्यना साधना करून वयाच्या ३५ व्या वर्षी निर्वाण (अरहत) अवस्था प्राप्त केली. जन्म मरणाच्या भवचक्रातून तो मुक्त झाला, सम्यक संबुद्ध झाला. ही विद्या त्याने पुढील ४५ वर्ष सर्व मानव समाजाला वाटली. या कालावधीत हजारोनी निर्वाण अवस्था प्राप्त केली, तर करोडो गृहस्थाश्रमी आणि भिक्षुक, आसक्तीमुक्त आणि क्रोधमुक्त अवस्था प्राप्त करून सुखशांतीचे जीवन जगू लागले. ह्या विद्येचा प्रसार प्रचार भारतासह कंबोडिया, थायलंड, लाओस, श्रीलंका, ब्रम्हदेश या पूर्वेकडील देशात सुद्धा झाला.

त्या पुढील ५०० वर्षानंतर ही विद्या भारतातून लुप्त झाली. ब्रह्मदेशात हीच विद्या गुरुशिष्य परंपरेने तिच्या मूळ आणि शुद्ध रुपात टिकून राहिली. ही विद्या भारतात १९६९ साली पुन्हा श्री. सत्यनारायणजी गोयंका यांनी आणली आणि आता तिचा प्रचार प्रसार भारतात आणि भारताबाहेर सुद्धा होत आहे.

विपश्यनेचे पाहिले निवासी केंद्र इगतपुरी येथे १९७६ साली बांधले गेले. आता भारतात आणि जगभरात मिळून एकूण १८५ विपश्यना केंद्र आहेत. लाखो व्यक्तींनी विपश्यनेचा अभ्यास, साधना करून आपले जीवन सुख, शांतीमय केले आहे.

आपल्या जीवनात येणाऱ्या जवळपास ९९ टक्के व्याधी, आजार मनोविकारामुळे (सायको सोमॅटीक आजार) निर्माण होतात. डायबिटीज, रक्तदाब, मायग्रेन, हृदयविकार, अर्धांगवायू, ब्रेन हामरेज इत्यादी सर्व आजार मानसिक ताणतणावामुळे निर्माण होतात. जीवनात ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण आसक्ती आणि क्रोध हे आहे. आसक्ती आणि क्रोध हे दोन्ही रिपू बाहेरील गोष्टीवर अवलंबून नसून ते आपल्या मनातच असतात; यांची जाणीव विपश्यना साधनेमुळे होते. त्यामुळे विपश्यना साधनेद्वारे आसक्ती आणि क्रोध या पासून मुक्तता मिळविता येते आणि जीवनात सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होते.

स्त्री असो किंवा पुरुष, धनवान असो की गरीब, हिंदू असो की मुस्लीम किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही प्रांताचा असो की कोणत्याही देशाचा असो; प्रत्येकाला सुख समाधान आणि शांती हवी असते. हे सार्वजनिन त्रिकालाबाधित सत्य आहे.

प्रत्येकाला रात्रीची निवांत झोप हवी असते. पण असे घडते का? याचे मूळ कारण आहे, मानसिक अशांतता आणि ताणतणाव; तसेच आसक्ती आणि क्रोध.   विपश्यना जीवनात निर्माण होणाऱ्या दुःखातून बाहेर पडण्याची कला शिकवते. त्यामुळे आपण तर सुखी होतोच असेच  आपले कुटुंब, समाज, देश आणि सारे विश्व सुखी होते.

विपश्यना " बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हाच संदेश सर्व विश्वाला देते. निसर्ग नियमांचे पालन आपल्या जीवनात कसे करायचे याचे प्रशिक्षण देते. धर्माचे पालन करणे म्हणजेच निसर्गाचे नियम आपल्या जीवनात उतरविणे. या निसर्ग नियमाच्या विपरीत वागला की ताणतणावाचे दुःख होते तर अनुरूप वागण्यामुळे शांतीचे सुख मिळते.

विपश्यना जीवन जगण्याची कला तर शिकवतेच तसेच मरणाला सुद्धा कसे सामोरे जावे ही मरण मरण्याची कला सुद्धा शिकविते.


मंगल हो !

*सतीश विष्णू जाधव*

6 comments: