Tuesday, August 20, 2024

अंबरीश गुरव आणि शतकी राईड... दि. २० ऑगस्ट २०२४

अंबरीश गुरव आणि शतकी राईड...

दि. २० ऑगस्ट २०२४

काल संध्याकाळी विजयचा फोन आला... उद्या मुलुंड पर्यंत राईड करायची काय... मंगळवारी विजयला सुट्टी असते... त्यामुळे मंगळवार खास त्यांच्यासाठी राखून ठेवलेला असतो... 

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने घरात कौटुंबिक कार्यक्रम होता... खूप नातेवाईक म्हणजे भरपूर गप्पा... रात्री उशिरा पर्यंत कार्यक्रम चालणार हे ठरलेले होते... तरीही विजयला आश्वासन दिले... भेटूया सकाळी सहा वाजता... महेश्वरी उद्यानाजवळ... सायकलिंग म्हटले की तहान भूक आणि झोप सुद्धा हरपते...

काल सायंकाळी नारळी पौर्णिमेनिमित्ताने  नवनीतने वरळी कोळीवाड्यात सागराला सोन्याचा नारळ देण्याचा कार्यक्रम पहायला बोलावले होते... तेथे अंबरीशची भेट झाली... अंबरीश सुद्धा मुलुंडला सायकलिंगसाठी यायला तयार झाला...

आज सकाळी सहा वाजता माटुंगा महेश्वरी उद्यानाजवळ विजयची भेट झाली... अंबरीश नुकताच वरळीवरून निघाला असल्यामुळे त्याने सायकलिंग करत पुढे जाण्यासाठी सांगितले...

पावसाचा  भुरभुरत वर्षाव सुरू होता... तो सुद्धा थांबत थांबत पडत होता... सायनला वर्षाव तर कुर्ला सुके... पुढे घाटकोपरला पाऊस धारा तर विक्रोळीला  तेज वारा... पावसाने भिजलो आहे की घामाने... याचा पत्ता लागत नव्हता... पावसामुळे सायकलिंगची सावधानता वाढली होती... बऱ्याच ठिकाणी साचलेल्या पाण्यातून सायकल चालविताना खड्डे टाळण्यासाठी अतिशय हळू मार्गक्रमण सुरू होते...

आज मोबाईल कव्हर घ्यायचे विसरल्यामुळे मोबाईल रुमालात गुंडाळून ठेवला होता...  त्यामुळे वाटेत फोटो काढले जात नव्हते... मुलुंडला पोहोचता पोहोचता... अंबरीशने आम्हाला गाठले होते...  

मुलुंड म्हाडा कॉलनीतील भटाची चहा टपरी आमचा हायड्रेशन पॉइंट होता... भटाने बनविलेला फर्मास उकाळा पिताना मोबाईल बाहेर काढला तर आतापर्यंत २५ किमी राईड झाली होती...  अंबरीश म्हणाला आज शंभरी गाठायची काय... तात्काळ होकार दिला... 

 आज सुट्टीच्या दिवशी घरगुती कामे आटपायची असल्यामुळे विजय घराची वाट धरणार होता... पन्नास किमी वर समाधान मानणार होता... 

परतीची राईड सुरू झाली... आणि विक्रोळी सर्व्हिस रोडवर दिपक नीचितची भेट झाली... फिटनेस फ्रिक दिपक ५८ किमी मॅरेथॉनची तयारी करतोय... हिमालयात सहकुटुंब फिरताना त्याचा डावा हात दुखावला होता... त्यामुळे दोन महिने पोहणे बंद होते... पण चालणे, धावणे सुरू आहे... अशी चळवळी माणसे नेहमीच कार्यरत असतात... उत्तम फिटनेस आणि काळ्या केसांमुळे तो आणखी तरुण दिसायला लागला आहे... 

दिपक एकदा बोलायला लागला की ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नसते त्याला थांबविणे... पण हाडाचा शिक्षक असलेल्या  दिपकचे बोलणे नेहमी ऐकत रहावेसे वाटते... आम्हाला शंभरी गाठायची आहे... हे समजल्यावर त्याने रजा घेतली...

कुर्ल्याच्या प्रियदर्शनी पार्ककडून फ्री वे कडे वळलो... वडाळ्याला विजयने कलटी मारली आणि घरी गेला...  अंबरीश बरोबर आता राईड सुरू झाली... BPT मधून फ्री वे खालून जाणाऱ्या रस्त्यावर गाड्यांची रहदारी कमी असल्यामुळे झकास राईड सुरू होती... 

गेटवे ऑफ इंडिया गाठले तेव्हा ६२ किमी राईड झाली होती...

तेथेच अंबरीशच्या सायकल मधील  मागच्या चाकातली हवा कमी झाली होती... रेडिओ क्लब कडून मुख्य रस्त्यावर येऊन पेट्रोल पंपावर चाकात हवा भरली... 

तेथून नेव्ही नगरचे शेवटचे टोक गाठले... पुन्हा हवा कमी झाल्यामुळे सायकल पंचर झाली आहे हे नक्की झाले...   RC चर्च जवळील दुसऱ्या पेट्रोल पंपावर पुन्हा हवा भरली आणि कैलास परबत जवळच्या सायकल शॉपवर सायकल आणली... मागच्या चाकात  दोन तीन ठिकाणी बारीक बारीक तारा सापडल्या... दोन ठिकाणी ट्यूब पंचर झाली होती.. नवी प्रेस्टा  ट्यूब दुकानात उपलब्ध नव्हती... त्यामुळे दोन पंचर पॅच लाऊन सायकल तयार झाली... 

भूक लागली होती... त्यामुळे ncpa जवळील मनिज् मध्ये नाष्टा करायचे ठरले... मनिज्  कडे नाष्टा करायला आलो... तेव्हा समजले ट्यूबने दगा दिलेला आहे... आता सायकल ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.. डोसा आणि उत्तपा नाष्टा करून अंबरीश सायकल ढकलत ncpa चौपाटी वरून रमतगमत वरळीला निघाला...

 माझा थोडासा हिरमोड झाला होता... पण अंबरीशने ठरविलेले टारगेट पूर्ण करण्याचे मनावर घेतले होते... मग निघालो गिरगाव चौपाटी वरून पेडर रोड मार्गे सुसाटत वरळीला... तेथून सिद्धिविनायक मंदिर गाठले... आज मंदिरात खूप गर्दी होती... म्हणून तेथे ट्रॅफिक जाम झाली होती... त्यात कोणीतरी VIP येणार म्हणून पोलिसांनी रस्ते बंद केले होते... सायकलसह कसाबसा सटकलो आणि वांद्रे सिलींक गाठले... 

सीलिंकच्या अलीकडच्या वळणावर महर्षी व्यास मुनींचा ध्यानमुद्रेतला मोठा पुतळा आहे... तो पाहिला आणि पुन्हा अंबरीशची आठवण झाली... तेथून घरी येई पर्यंत १०० किमी पूर्ण झाले होते...

 पण अंबरीश डोक्यातून जात नव्हता... कसं घडवलंय परमेश्वराने या माणसाला... अतिशय मितभाषी... पण जेव्हा बोलतो तेव्हा ते नेमक आणि मार्मिक असतं... दापोली सायकलिंग क्लबची धुरा गेली पाच वर्ष समर्थपणे सांभाळत असलेला अंबरीश अजातशत्रू आहे... इतरांसाठी त्याचा मदतीचा हात सतत तत्पर असतो... त्याला कधीही रागावलेला पाहिला नाही... प्रत्येक घटनेवर त्याची अतिशय सौम्य आणि मृदू प्रतिक्रिया असते... आणि सदा हसतमुख...

आज त्याच्या ट्यूबने दगा दिला... पण चौपाटी वरून चालताना... त्याच्या चेहऱ्यावर निराशेचा लवलेश नव्हता... मस्तपैकी निसर्गाचा आनंद  घेत तो एकदम मजेत मार्गक्रमण करत होता... असं व्यक्तिमत्त्व माझ्या जीवनात मित्र म्हणून लाभणं हे माझं भाग्यच आहे...

निव्वळ त्याच्या साठीच आज १०० किमी राईड पूर्ण केली होती...


तेरा तुझको अर्पण...

जय श्री राम....

1 comment: