Thursday, January 7, 2021

नर्मदा परिक्रमा... दवाना ते बावन्नगजाजी (परिक्रमेचा दिवस तिसरा)

नर्मदा परिक्रमा...

दवाना ते बावन्नगजाजी (परिक्रमेचा दिवस तिसरा)

३१.१२.२०२०

पहाटे पाचला जाग आली. महंत तवरदासजी रामाचे दोहे गात होते. वातावरण खूपच गारवा होता, म्हणून सुस्वर दोहे अंथरुणातच बसून ऐकण्यात तल्लीन झालो.8

तासाभरात तयार होऊन या आ in poli Ii NM 7 konihi KJश्रमाची महती सांगण्याची तवरदासजींना विनंती केली.

भौसिंग बाबांनी संजीवन समाधी दवाना येथे घेतली. तेथेच त्यांचे समाधी मंदिर आहे. बाबाजीच्या समाधीवर छिद्र आहेत. भौसिंग बाबा अजूनही संजीवन  आहेत असे भक्तगण मानतात.  भौसिंग बाबा श्री कृष्णाचे निस्सीम भक्त होते. गेली जवळपास ऐशी वर्ष परिक्रमावासीयांची या आश्रमातर्फे सेवा केली जाते.

सकाळी महंत तवरदासजींनी चहा दिला. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढील परिक्रमा सुरू झाली.

आजचा पहिला पडाव लोहारा येथील कपिलेश्वर  महादेव मंदिर होते. दवाना येथून दिड तासात कपिलेश्वर महादेव मंदिराजवळ पोहोचलो. गावातील रस्ता ऑफ रोडिंग होता. गावाच्या टोकाला नर्मदेच्या किनारी हे मंदिर आहे. 

 या मंदिराच्या बाजूनेच नर्मदा मैय्या वाहते. सरदार सरोवर प्रकल्पामुळे येथील घाटाचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे.  येथे नर्मदेच्या पाण्याला सागरासारख्या लाटा उसळत होत्या. मैयेच्या जलात डुबकी मारली. स्नान करताना सुद्धा लाटा अंगावर कोसळत होत्या. समोर असलेल्या अंबामातेच्या मंदिरात सोबतच्या मैयेची पूजा केली.

  येथे नर्मदेच्या किनारी कपिलेश्वर महादेव मंदिर स्थापित आहे. अतिशय पुरातन आहे हे मंदिर.

कपिलमुनींनी येथे घोर तपस्या केली होती आणि येथेच कपिलमुनी विराजमान झाले आहेत. पुजारी पंडित शिवप्रसाद म्हणतात, 'हे मंदिर सत्ययुगातील आहे. कपिला गायीच्या खुरातून निर्माण झालेल्या कपिला नदीचा येथेच नर्मदेबरोबर संगम होतो. कपिल मुनींकडे असलेली ही कपिला गाय साक्षात अन्नपूर्णा होती.

आसपासचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नर्मदेच्या किनारी दोघेही निवांत बसलो होतो... अगदी निशब्द... शांततेचा आवाज ऐकत होतो...

तासाभराने मंदिरातून निघालो आणि थोड्याच वेळात मुख्य रस्त्यावर आलो. येथे दबंग दुनिया वर्तमानपत्राचे वार्ताहर भेटले. त्यांनी संजयची मुलाखत घेतली. 'प्रदूषण मुक्त नर्मदा' हा संदेश घेऊन आम्ही परिक्रमा करतोय, हे संजयने सांगितले.

येथून चकेरी गावात पोहोचलो. रामारोटी म्हणून पोळी भाजी आणि वरणभात मिळाले. येथे इंजिनियर बाबाजी कल्पेश महाराज आहेत.

गुजरात मध्ये इंजिनियर असलेले कल्पेश बाबाजी मागच्या एक वर्षांपासून चकेरी येथे परिक्रमवासींना रामरोटी देत आहेत. एक वर्षापूर्वी परिक्रमा उठविलेले हे बाबाजी बडवानी वरून आलेल्या गुरुजीच्या आदेशाने अन्नसेवा देत आहेत. 'मैंयेजिके मनमे जब आयेगा तब मेरी परिक्रमा शुरू होगी, लेकीन परिक्रमा पुरी करकेही घर लौटुंगा". आपल्या जीवनाची नैया; मैयेच्या ताब्यात देणाऱ्या इंजिनियर बाबांची भेट अंतरंगात स्नेहाचे तरंग उठवून गेली. अशा व्यक्ती जीवनात येणे आमचे अहोभाग्यच होते.…

अंजार गावाजवळ  सायकलच्या कॅरियरचा स्क्रू ढिला झाल्यामुळे पॅनियर बॅग मागच्या मागे धाडकन पडली. बॅगेची शिलाई उसवली होती. गावात एक टेलरींग करणारे आजोबा मिळाले.

बॅग शिवल्यावर पैसे विचारले असता, 'आपके दिलको अच्छा लगे इतने देना' आजोबा म्हणाले, 'नर्मदा मैयेमुळेच तुमची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे, आणखी मला काय हवे'...  निरपेक्ष सेवा हा सद्गुण मैयेच्या सान्निध्यामुळेच मनात दृढ होतो... याची प्रचिती आली...

बडवानी शहरात प्रवेश केला... येथील पशु महाविद्यालया जवळील चहावाल्याकडे थांबलो. चहावाला म्हणाला 'साब आपके लिये स्पेशल चाय बनाता हूँ', त्यांची मसालेयुक्त चहा खुप आवडली म्हणून आणखी एक कप चहा प्यायलो... आता कमालच झाली. तो चहावाला पैसे घेईना...

'बडवानी मध्ये मैय्या आपली बडदास्त  ठेवते आहे' संजय म्हणाला.

तेथेच बडवानीच्या पी जी कॉलेजचे प्राध्यापक श्री उपाध्याय भेटले.

ते म्हणाले, 'आपको मिलके मुझे बहोत खुशी हुई और ये मेरा सौभाग्य है... क्या मैं आपके साथ फोटो ले सकता हूँ'... आप नर्मदा स्वच्छता अभियान का बहोत बडा काम कर रहे हो...  मेरे कॉलेज के छात्रोको आपकी फोटो दिखाके उन्हे भी प्रोत्साहित करुंगा'... श्री उपाध्याय यांच्या बोलण्याने अंगावर मूठभर मास चढले.

परिक्रमा करणाऱ्यांना मैय्या दर्शन, दृष्टांत देते म्हणतात... मला तर मैंयेचा रूपानेच वरील सर्व व्यक्ती भेटल्या होत्या... जगणे काय असते हे शिकविणाऱ्या...

बडवानी पासून पाच किमी अंतरावर असलेल्या राजघाटकडे पोहोचलो. जेथे-जेथे महात्मा गांधीजींच्या अस्थी विसर्जन केल्या त्या सर्व ठिकाणांना राजघाट म्हणतात.

नर्मदेवरील नवागाव प्रकल्पच्या  धरणाची उंची वाढविल्यामुळे राजघाट परिसर आणि जवळच असणारे दत्त मंदिर आता पाण्याखाली गेले आहे.

परिक्रमा करणारी मंडळी आता नर्मदा मैयेच्या दर्शनाला येथे येतात. तेथे पूजा-अर्चना करतात... त्यात काही खायच्या वस्तू, नारळ, पैैसे शोधणारी मुले पहिली.

त्यांना बॅगेत असलेले पेरू खायला दिले. त्यांचे खुललेले चेहरे पाहून  खूप आनंद झाला.

पुढचा १५ किमीचा सातपुडा पर्वताचा रस्ता चढ-उताराचा आणि शेवटी ४ किमी घाटाचा होता. घाट चढताना सूर्याचे विहंगम दर्शन झाले.

दमछाक झाली होती. पण नेटाने पेडलिंग सुरू होते. दीड तासात बावन्नगजा येथील मां नर्मदा अन्नपूर्णा अन्नक्षेत्र येथे पोहोचलो.

येथील प्रमुख स्वामी ज्ञानानंद बाबा (भोलेबाबा) आमची वाट पाहत होते. दवानावरून त्यांना आमची वर्दी मिळाली होते. आल्या आल्या गरमागरम मसाले चहा आणि टोस्ट मिळाले. सर्व थकवा नाहीसा झाला...  मला तर युथ होस्टेलच्या ट्रेकिंगची आठवण झाली.

येथून साधारण एक किमी अंतरावर जैन सिद्धक्षेत्र आहे. श्री आदिनाथजींची बावन्न गज म्हणजे १५६ फूट डोंगरात कोरलेली उभी मूर्ती या ठिकाणी स्थित आहे. सातपुडा पर्वतरांगेतील हे प्रसिद्ध  शूलपाणी जंगल आहे.

सायकलवरील सर्व सामान समोरील शाळेत ठेऊन आम्ही बावन्नगजाजीच्या मुख्य सभा मंडपाकडे गेलो. तेथील केअरटेकर यांनी आज येथे महापर्व आहे आणि १३ जैन दिगंबर साधू येथे आले आहेत, त्यांचे दर्शन घ्या. ही माहिती दिली. या सर्व साधूंची प्रत्यक्ष भेट झाली.


मुख्य साधू श्री विनम्र सागराजी महाराज यांना नर्मदा परिक्रमा सायकल वरून करतोय हे  सांगितल्यावर, 'मला सुद्धा नर्मदा मैयेची परिक्रमा करायची आहे, बघू केव्हा मैय्या बोलावते आहे', हे त्यांचे उद्गार ऐकून धन्य झालो. त्यांनी दिलेला आशीर्वाद म्हणजे मैंयेचा प्रसाद होता.

२०२१ या नववर्षाच्या पूर्वसंध्येला १३ दिगंबर जैन साधूंचे दर्शन झाले. त्यांच्याशी बोलता आले. सर्वांचे आशीर्वाद मिळाले. हे खरोखरच खूप भाग्याचे होते. असा योग खूप दुर्मिळ आहे आणि तो जुळून आला. हा आमच्या जीवनातील सुवर्णकांचन योग होता.

अन्नक्षेत्रात आज रामतोटी खाऊन तृप्त मनाने झोपेच्या अधीन झालो.

आजच्या परिक्रमेत मैयेच्या किनारी "शांततेचा आवाज ऐकला"

ही नवीन वर्षासाठी मिळालेली अलौकिक भेट होती...

नर्मदे हर !!!


सतीश जाधव

मुक्त पाखरे

Monday, January 4, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दुसरा) बकावां ते दवाना

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दुसरा) बकावां ते दवाना
३०.१२.२०२०

पहाटे चार वाजता बाजूच्या राम मंदिरातील रामधून कानावर पडली. सीताराम बाबांनी सकाळी साडेचार वाजता मंदिरात काकड आरतीला बोलावले होते. तयार होऊन दोघेही राम मंदिरात पोहोचलो. आरतीला सुरुवात झाली आणि आम्हा दोघांना घंटा वाजविण्याची कामगिरी मिळाली. मंदिराच्या खिडकीतून नर्मदा मैंयेची सुद्धा काकड पूजा झाली. बाबाजींनी सकाळीच चहा पाजला. तसेच पायी परिक्रमा करणाऱ्यांसाठी शूलपाणी जंगलातून जाणारा परिक्रमा मार्गाचा चार्ट दिला.

सकाळीच गावातील मुले आमच्या भोवती जमा होऊन 'नर्मदे हर' म्हणत पाया पडू लागली. सुनील केवट या मुलाने घरी येऊन कृपाप्रसादी म्हणून चहा पिण्याचा आग्रह धरला.

त्याच्या घरी जाताना, वाटेत शिवलिंग कारखान्यांना भेटी दिल्या. बारवां गाव शिवलिंग बनविण्याच्या कुटीरोद्योहासाठी जगप्रसिद्ध आहे.   एक इंचापासून २२  फुटापर्यंत शिवलिंग येथे बनविले जातात.

बारवां गावातून वाहणाऱ्या नर्मदा मैयेच्या पात्रात एक टापू आहे. तेथील पत्थर आणून त्यातून शिवलिंगाची निर्मिती केली जाते. ही शिवलिंग भारतात आणि भारताबाहेर विक्री केली जातात. नर्मदा मैयेच्या पत्रातील प्रत्येक कंकर हा शंकर असतो, याची प्रचिती आली.

सुनीलच्या घरात वडील पत्थर घेऊन येतात आणि  आई शिवलिंग तयार करते. केवट आणि माझी समाजाच्या लोकांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. सुनील गावात येणाऱ्या प्रत्येक परिक्रमवासींना आपल्या घरी येण्याचा आग्रह करतो. त्याची आई म्हणते, 'आप लोग जब घर आते हो, तो नर्मदा मैय्याकी कृपा हमपर रहती है'... अतिशय श्रद्धा पूर्वक आणि हसतमुखाने, लोकसेवा करण्याचे काम बकावांचे गावकरी करीत होते.

गावाच्या सुरुवातीलाच गोपालकृष्णाचे भव्य मंदिर आहे. विशेष म्हणजे गावातील सर्व महिला या मंदिरात पूजा अर्चना करीत होत्या. गावचे मुखीया म्हणाले,  'या गावाला आणि आमच्या अन्नछत्रामध्ये पुन्हा जरूर या'.

  बेडगी मिरची, गहू, कापूस, चणे या प्रदेशात पिकविले जातात.

तसेच विटांचे कारखाने सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. या गावाला सहकुटुंब भेट देण्याचे ठरवून निरोप घेतला. येथून तेली भटीयाण येथील सियाराम बाबांचा आश्रम १४ किमी अंतरावर आहे.

नगावा गावात गीता बहेन आहेत. त्या सर्व परिक्रमावासींना चहा बिस्कीट देऊन त्याची सेवा करतात.

येथे मुले छोटी चक्री चालवत होते. चक्रीला येथे टका म्हणतात. एक मुलगा टका पळवत सायकल बरोबर स्पर्धा करत होता. या गावात आरंडी (एरंडेल) ची मोठ्या प्रमाणात शेती आहे.

साडेनऊ वाजता तेली भटीयाण गावातील सीयाराम बाबांच्या आश्रमात पोहोचलो. बाबांचे दर्शन घेतले.


बाबा भेट देणाऱ्या  प्रत्येक भक्ताला चहा पाजतात. त्यांचे विशेष म्हणजे कोणी त्यांना दान दिले तर फक्त दहा रुपयेच घेतात. पाचशेची नोट दिली तर चारशे नव्वद परत करतात. 

आश्रमाबाजूलाच नर्मदा मैय्या आहे. 

 मैयेच्या पाण्यात डुबकी मारून तेथेच पूजा केली आणि बाबांच्या भोजन प्रसादीचा लाभ घेतला. आज दालबाटीचे भोजन होते.

बाबांच्या आश्रमातून  जवळच असलेल्या निमाड अभ्युदय संचालित भारतीताई ठाकूर यांच्या नर्मदालायला भेट दिली. येथे ताईंची भेट झाली नाही. तेथून लेपा पुनर्वास येथील नर्मदालायला भेट दिली. भारती ताईंची भेट झाली.

येथे आजूबाजूच्या गावातील जवळपास ९०० मुले शिक्षण घेत आहेत. मुले व्यवसायभिमुख प्रशिक्षण घेतात. गवंडीकाम, सुतार, वेल्डींग, फॅब्रिकेशन या कामाचे प्रशिक्षण येथे घेतलेली खूप मुले आता स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. मुलांनी सोलार ड्रायर आणि सोलर कुकर बनविला आहे.

भारती ताई नर्मदा परिक्रमा करीत असताना, गावातील मुलांची शिक्षणाबाबत दयनीय परिस्थिती पहिली.  परिक्रमापूर्ण झाल्यावर येथील मुलांसाठी काहीतरी करायचे या भावनेतून भारतीताई नोकरी सोडून लेपा येथे स्थायिक झाल्या.  आज त्या नऊशे मुलांच्या आई आहेत. नर्मदा मैयेच्या सहवासामुळे काय चमत्कार होऊ शकतो... हे भारतीताईच्या या कार्यामुळे लक्षात येते.
एका मुलीने जखमी झालेला पाणबगळा (पॉन्ड हेरॉन) भारतीताईंकडे आणला. त्याला आईच्या मायेने भारतीताई कुरवाळत होत्या.

त्याच्या पंखाला इजा झाली होती, त्यावर आता औषोधोपचार केले जाणार आहेत. शाळेतील मुलांनी संपूर्ण शाळा आम्हाला दाखविली. पहिल्या माळ्यावर तयार होणाऱ्या वर्गाचे लोखंडी दरवाजे शाळेतील मुलांनीच बनविले आहेत. संगीत कक्ष, शिवण वर्ग  पाहिले. तीन वर्षांपूर्वी यशोधन तर्फे बांधण्यात आलेल्या हॉलला सुद्धा भेट दिली. ताईच्या कार्यालय कक्षात लावलेली नर्मदा मैयेची फोटो फ्रेम खूपच भावली. ताईच्या या कार्यासाठी यथाशक्ती देणगी दिली. सायकल परिक्रमेसाठी भारती ताईंचे आशीर्वाद  घेतले. मुलांसोबत फोटो काढून नर्मदालायचा निरोप घेतला.
आता आम्हाला खलघाट मार्गे दवाना येथे जायचे होते. वाटेत आग्रा मुंबई रस्ता लागला. खलघाट गावात जवळ वेदा नदी लागली. पुढे जाऊन ती नर्मदेला मिळते. नंतर ठिकरी गाव लागले. तेथील गोकुळ स्वीट दुकानातील बलराम यांनी नमकीन आणि सुप्रसिद्ध गजक मिठाई तसेच चहा पाजली.
नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांची सेवा करणे हे बलरामने घेतलेले व्रत आहे.

रस्ते अतिशय टकाटक होते. त्यामुळे आमची राईड राजेशाही पद्धतीने सुरू होती. दवाना येथील भौसिंग बाबांच्या आश्रमात साडेसहा वाजता पोहोचलो. वातावरण थंड झाले होते. आश्रमाचे महंत तवरदासजी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचे सेवक आमची जातीने चौकशी करून... काय हवे ते विचारात होते. 

रात्री भोजन प्रसादी म्हणून मसाले भात आणि ताक होते. तृप्त मनाने झोपेच्या अधीन झालो.

नर्मदा मैयेच्या कृपेने आज "बाबांची छाया आणि आईची माया" ह्यांचा लाभ झाला.

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे…..

  

Friday, January 1, 2021

नर्मदा परिक्रमा.. ओमकारेश्वर ते बकावां (परिक्रमेचा पाहिला दिवस)

नर्मदा परिक्रमा...ओमकारेश्वर ते बाकावां
(परिक्रमेचा पहिला दिवस)

२९.१२.२०२०

सकाळी गजानन महाराज मंदिरात आम्हाला परिक्रमवासी म्हणून पांढरी लुंगी आणि सदरा तसेच छोटी वही भेट मिळाली. गजानन महाराज आश्रमात परिक्रमा करणाऱ्या सर्व बाबाजी मैयाजी यांची राहण्याची आणि जेवणाची निशुल्क व्यवस्था होते. परिक्रमेला अंथरून, पांघरून अथवा स्लीपिंग बॅग घेणे आवश्यक आहे. तसेच स्वतःचे ताट, वाटी, पेला घेणे सोईचे असते.

सकाळी ओमकारेश्वर मंदिराच्या दक्षिण तटावरील प्रवेशद्वाराला भेट दिली.  

 तेथून दक्षिण तटावरील ममलेश्वर मंदिराजवळील गोमुख घाट येथे संकल्प पूजा करण्यासाठी पोहोचलो.

प्रथम नर्मदा मैंयेचे दर्शन घेऊन स्नान केले. पाठक गुरुजींनी यथासांग संकल्प पूजन केले. सायकलचे नर्मदा मैयेसोबत फोटो काढले.  

बाटलीत घेतलेली नर्मदा मैया सतत आपल्या सोबत ठेवा. तसेच दररोज  तिचे पूजन करा.हे गुरुजींनी सांगितले.

नवीन बस स्टँड जवळील मंगलदासबाबांच्या आश्रमाला पुन्हा एकदा भेट देऊन बाबांचे आशीर्वाद प्राप्त केले. बाबाजींनी आज काही सूचना केल्या. ते म्हणाले, 'परिक्रमेमध्ये आपल्या उजव्या बाजूला नर्मदा मैयाजीला ठेऊन परिक्रमा करायची आहे. या परिक्रमेत जबलपूर जवळील भेडाघाटला जायचे नाही... कारण कोठेही नर्मदा मैयेला ओलांडायचे नाही. विशेष करून अमरकंटक येथे सुद्धा नर्मदा मैय्या ओलांडणार नाही याची काळजी घ्या'.

मनोज मानेची सुद्धा भेट झाली. आज दत्त जयंती असल्यामुळे दत्त नामाचा जयघोष करून दुपारी बारा वाजता परिक्रमेची सुरुवात केली.

आमच्या पहिल्या प्लॅन प्रमाणे दिवसाला साधारण शंभर किमी सायकलिंग करायचे ठरविले होते. परंतु आता किलो मीटर्स कन्सेप्ट मनातून काढून टाकला. जास्तीत जास्त नर्मदेच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच प्रमाणे किनाऱ्यावरील मठ, आश्रम, देवळे, भोजन प्रसादीचे अन्नछत्र, यांना भेट देण्याचे नक्की केले.

सनावत गाव हा पहिला पडाव  एकदम जोशात पार केला. दुपारी सुद्धा वातावरणात गारवा होता. तेथून खरगोन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. दोनच्या दरम्यात बेडीया गावात पोहोचलो. येथील मिरची मंडी मध्य प्रदेश मधील बेडीया (म्हणजेच बेगडी) मिरचीची सर्वात मोठी मंडई आहे. येथून रावेरखेडी गाव बारा किमी आहे. दोन तासात बेडगी पर्यंत ३६ किमी सायकलिंग केले होते.

मंडईतील प्रेमलालजी मुच्छाला या दुकानाच्या मालकाने आम्हाला थांबविले. आमची प्रेमाने चौकशी करून चहा पाजला. 

मैयेच्या कृपा प्रसादला सुरुवात झाली होती. मैयेकडून ही परिक्रमा आमच्या कडून करवून घेतली जात आहे.  हा मान मैयेचा आहे आमचा नाही. हाच मनातील भाव अतिशय सर्वांना जवळ आणतो आहे.

वाटेत गावकरी सुरेन बिर्ला भेटला. त्याने  रावेरखेडीचा रस्ता समाजवला, तसेच बकावां गावात थांबण्याचा सल्ला दिला.

 बकावां गाव शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. तेथील घराघरात चालणारे कारखाने  जरूर पहा,  हे सांगितले.

निपाणी-सिपाणी गावापासून रावेरखेडी बायपास सुरू झाला. येथून दहा किमीवर रावेर आहे. खेडी गाव मागे टाकून आता रावेरकडे पेडलिंग सुरू झाले.

 थोड्याच वेळात रावेरला पोहोचलो. 

थोरले बाजीराव पेशवे हे एक अजिंक्य मराठा पेशवे होते. त्यांनी ४२ लढाया केल्या आणि सर्व जिकल्या होत्या. . यांनीच अटकेपार मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला होता. वयाच्या ३९ वर्षी त्याचे रावेरखेडी येथे निधन झाले.

 मराठा सरदार ग्वाल्हेरचे शिंदे यांनी रावेर खेडी येथे नर्मदा तटावर थोरले बाजीराव पेशवे यांची ही समाधी बांधली.

समाधी समोरच्या चबूतऱ्यावर दोन मिनिटे बसून बाजीराव पेशव्यांना मूक श्रद्धांजली वाहिली. नर्मदेच्या विशाल पत्रात टक लावून पाहत होतो... पेशव्यांच्या तलवारीचे  खणखणीत आवाज कानात घुमू लागले... महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीने ही समाधी आवर्जून पहिली पाहिजे.

समाधीचा परिसर अतिशय विहंगम आहे. तसेच तेथील कर्मचाऱ्याला आता सरकारने पगार सुरू केला आहे. मराठयांच्या इतिहासात थोरले बाजीराव पेशव्यांचे नाव सुवणाक्षराने कोरले गेले आहे.


समाधी परिसरात फोटोग्राफी करून रावेर येथील प्रेमदासजी महाराज यांच्या आश्रमात आलो. 

ते  सुद्धा त्यांनी मारलेली प्रेमाची हाक ऐकून... महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज आणि प्रेमपूर्वक भाव त्यांच्या नावाची साक्ष देत होते.

बाबाजींच्या आश्रमात आम्ही बसलो असताना पायी चालणारे तीन परिक्रमावासी आले. प्रथमच आम्हाला  दोन बाबाजी आणि एक मैयाजी भेटले होते. संध्याकाळचे साडेचार वाजल्यामुळे हे पारिक्रमवासी त्याच आश्रमात विश्राम करणार होते.

यात, ठाण्यातील सुप्रसिद्ध डिस्कव्हरी ताई, रुपाली पारखे देसिंगकर या परिक्रमेत होत्या. त्या कॉलमिस्ट आहेत. त्यांनी मोबाईल फोन बंद करून टाकला आहे. आता त्या  नर्मदा मैयेच्या स्वाधीन झाल्या आहेत. त्यात कोणाचाही हस्तक्षेप किंवा साधा संवाद सुद्धा त्यांना नको आहे. त्या फक्त आणि फक्त नर्मदा मैयेशी संवाद साधणार आहेत... एक साधक बनून... एक परिक्रमिक म्हणून... परिक्रमेच्या कालावधीत त्या स्वतःसाठी जगणार आहेत... जगण्याचा उद्देश शोधणार आहेत... नर्मदा मैयाजी त्यांच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल...

रुपाली ताईचे सर्व कुटुंब दत्त संप्रदायातील असल्यामुळे... त्यांना लहानपणापासून नर्मदेची ओढ होते... त्यांची परिक्रमेची इच्छा नर्मदा मैयेने घडवून आणली आहे...

बालभोग (चहापान) घेऊन सर्वांचा निरोप घेतला आणि पुढे प्रस्थान केले. आज तेली भाटीयाणच्या सियाराम बाबांच्या आश्रमात विश्रांती घेण्याचा विचार होता. सव्वापाच वाजता बकावां येथे पोहोचलो. येथील चौरस्त्यावर उभे असलेली गावकऱ्यांनी आमची चौकशी केली आणि गावातील मां नर्मदा रेवा अन्नछत्रालायचा लाभ घ्यावा हो विनंती केली. येथे भोजनप्रसादी आणि निवासाची व्यवस्था सेवाभाव म्हणून केली जाते. भटीयाणला जायला रात्र होईल. याची त्यांनी कल्पना दिली. मैंयेचा आदेश मानून आम्ही गावातील मां रेवा अन्नछत्र सेवा समिती आश्रमात विश्रांती घेतली. आश्रमाच्या समोरच नर्मदा मैंयेचे दर्शन झाले.


नर्मदा मैयेच्या घाटावर स्नान करण्याचा मोह आवरता आला नाही.  दोघांनी डुबकी मारून... तयारी केली...  सोबत असलेल्या नर्मदा जलाची यथासांग पूजा अर्चना केली.

थंडी वाढू लागली होती. आठ वाजता भोजन प्रसादीची व्यवस्था झाली. आमच्या सोबत बकावां केंद्रात  नागपूरचे पाच परिक्रमावासी होते.

भोजन प्रसादी आटपल्यावर बाजूच्या सीताराम धाम आश्रमात गेलो. सीताराम बाबा आणि रामदास बाबा यांचे आशीर्वाद घेतले. येथील राम मंदिरात सुरू असलेले सुंदररकांड श्रवण करण्यासाठी बसलो.  सुंदरकांडातील दोहे हिंदी नेमाडी भाषेत होते. परंतु त्यात असलेला ताल आणि बाबाजींचे स्वर यांनी ब्रह्मनंदी टाळी लागली.

दिवसभरात ६० किमी सायकलिंग झाले होते. रात्री साडेदहा वाजता निवांत झोपी गेलो.

आमच्या सायकल परिक्रमेचा प्रथम दिवस...   सकाळपासून रात्री पर्यंत ...नव्या गाठी-भेटींनी तुडुंब भरलेला होता... परंतु या सर्व भेटी... खूप जुने ऋणानुबंध असावेत अशा  होत्या...

ही तर नर्मदा मैयेची कृपाच होती...

एका समान धाग्याने सर्व जोडलेले होते... तो म्हणजे प्रेमाचा धागा... आणि नर्मदा मैया साथीला असणे...

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे....