Friday, January 14, 2022

लडाख सायकलिंग भाग ५ दि. ०६ ते ०८ऑगस्ट २०२१

लडाख सायकलिंग भाग ५
दि. ०६ ते ०८ऑगस्ट २०२१

सकाळी साडेसहा वाजता स्पंगमीक गावातील बस स्टँड जवळ पोहोचलो. येथे दोन बायकर्सची ओळख झाली दाहोद गुजरात वरून फिरोज आणि केरळ वरून आलेला दिबु हे सोलो बायकर होते.

एकमेकांना वाटेत भेटले.. आता मित्र होऊन एकत्र बायकिंग करत आहेत. संपूर्ण लडाख फिरून ते श्रीनगरला जाणार आहेत. आणखी तीन सोलो ट्रेकर भेटले. विशेष म्हणजे स्थानिक बसने हे तिघे लडाख फिरत आहेत.


  एक मुंबईचा, दुसरा त्रिवेंद्रमचा, तिसरा जम्मूचा... समविचारी एकत्र आले आणि निसर्गभ्रमणाला निघाले... कधी बसने, कधी लिफ़्ट मागून, कधी ट्रेक करत... त्यांची सफर सुरू आहे. जेमतेम बावीस-पंचवीस वर्षाचे हे तरुण... जीवन जगण्याची कला शिकत आहेत... स्पंगमीक गावात हे तीन दिवस राहिले होते... पेंगोंगला  लेकला मनात, हृदयात  साठविण्यासाठी... यालाच टुरिंग म्हणतात... जे आवडले त्याचा भरभरून आस्वाद घेणे... 


 आठवण झाली एव्हरेस्ट बेस कॅम्प (EBC) ट्रेक मध्ये भेटलेल्या सुएझ या जगभ्रमणासाठी  निघालेल्या इस्रायली तरुणाची...  एकवीस वर्ष वय झाल्यावर इस्रायलमधल्या प्रत्येक तरुण तरुणीला आर्मी मध्ये तीन वर्षे सेवा द्यावी लागते. मग हीच मंडळी पुढील वर्षभर जगभ्रमण करतात... केवढा प्रचंड जीवनानुभव येतो यांच्या गाठीला...  या तीन भारतीय तरुणांत तीच ऊर्जा दिसली.  यांनीच हानलेच्या परमिट साठी लेह मधील फिरोजचा नंबर दिला. तीन वेगळ्या ठिकाणचे वेगळ्या संस्कृतीचे तरुण एकत्र येऊन प्रवास करतात तेव्हा त्याच्या अनुभवाच्या कक्षा अतिविशाल होत जातात...

आठ वाजता येणारी बस साडेनऊ वाजता आली. सायकल टपावर बांधून सुरू झाली बस सफर खारूकडे... 

बसच्या टपावर सायकल कशी बांधायची हे आदित्य काका कडून शिकलो होतो. पेंगोंगचा थ्री ईडीयट  विव्ह पॉईंट पाहायला बस थांबली. परंतु रस्त्यापासून व्हीव पॉईंट  एक किमी अंतरावर होता. बसमधील बरेच प्रवासी तिकडे गेले. परंतु टपावर सायकल आणि सोबत समान असल्यामुळे आम्ही बसमध्येच थांबलो. पेेंगोंग परिसरातील आकाशाची निळाई आणि हिमालयाचे रंग बसच्या खिडकी मधून पाहताना भान हरपून गेले.

बस फुल्ल भरलेली होती. ट्रेकिंग करणारी भली मोठी गॅंग बस मध्ये होती. कर्नाटक मधील हे तरुण नॉन स्टॉप गप्पा मारत होते. सकाळी भेटलेल्या तीन तरुणांमधल्या मालाडच्या हिकेत वीराची मुलाखत घेतली.

 इंजिनिअरींग केलेला हिकेत म्हणतो, "वाटलं आणि सुटलो फिरायला... काहीही न ठरवता... प्रवासातच नवीन मित्र भेटले आणि  सुरू झाली सफर लडाखची... आणखी चार पाच दिवस एकत्र असू... मग माहीत नाही कधी यांची पुन्हा भेट होईल... पण ही साथ जीवनभर आठवणीत राहील..." "जिंदगी के सफर मे लोग मिलते है... पलभर के लिये... और दे जाते है जीवनभर की खुशीया" हिकेत चांगला वक्ता होता. 
 
दुसरा जम्मू मधील खटूआ जिल्ह्यातील अंकुश राजपूतला बोलते केले. ग्रॅज्युएशन पूर्ण करून हा यु ट्युबर एक देश ते दुसरा देश असे भ्रमण करतोय. गेल्या महिन्यात तो अफगाणिस्थानात होता. पण युद्ध परिस्थिती तसेच वॅक्सिन घ्यायला त्याला भारतात परतावे लागले. त्याचे वैशिट्य म्हणजे जगातील जो प्रदेश अनएक्सप्लोअर आहे, अशा ठिकाणी भेटी देऊन त्याची सर्व माहिती यु ट्यूबवर टाकणे... आता त्याचा भारत भ्रमणाचा कार्यक्रम  आहे. संपूर्ण लडाख फिरल्यावर.. काश्मीर मधील खेड्यापाड्यातून फिरणार आहे. तेथून तो नॉर्थ ईस्ट सेव्हन सिस्टर्स करणार आहे. फिरणे आणि युट्युब द्वारे कमाई करणे... आवडीच्या क्षेत्रातून पैसे कमावण्याची कला छान आत्मसात केली आहे अंकुशने...

अंकुश नवीन मित्रांबद्दल भरभरून बोलत होता... चार दिवस तिघेही केलॉंगला लँड स्लाईडिंगमुळे अडकून पडले होते.  तिथेच तिघे सोलो रायडर एकत्र आले. आलेले नवीन अनुभव शेअर करण्याची संधी  मित्रांमुळे मिळली... नवीन गोष्टी, नवीन भाषा, वेगळी संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळली. फिरण्याच्या एका समान धाग्यामुळे तिघे एकत्र आले होते. 

केरळीयन डेसल बरोबर बोलताना उच्चारांची गडबड होत होती. त्याचे मल्याळम उच्चाराचे इंग्लिश डोक्यावरून जात होते. कॉम्प्युटर प्रोग्रामर असलेला डेसल सहा महिन्यांपूर्वी BMS या कंपनीत जॉईन झाला आहे. कोणताही प्लॅन न करता घराबाहेर पडलेला डेसल कोणा बरोबर ही सफर करू शकतो. वर्क फ्रॉम होममुळे प्रवास करता करता कंपनीचे काम सुद्धा सुरू आहे. नोकरी आणि सफरीची छान सांगड घातली आहे डेसलने...

असे हे भटके मित्र... इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. हे भेटलेले तरुण खूप काही शिकवून गेले होते...

डुरबुकला बस जेवणासाठी थांबली. तेथे आमलेट पराठा खाऊन पुढचा प्रवास सुरु झाला.  ४५ किमीचा "चांगला पासचा" घाट खूपच वेडावाकडा आणि दगडांचा होता. 


ऑफ रोडिंग रस्त्यामुळे बस सावकाश चालली होती. वातावरण थंड व्हायला लागल्यामुळे जाकीट आणि कानटोपी चढवली. रस्त्याच्या आजूबाजूला ग्लेशियर दिसू लागले. हायवे असल्यामुळे ट्रक आणि टँकरची सतत वाहतूक सुरू होती. दोन्ही बाजूला गाड्या असल्यामुळे अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू होती. "चांगला" टॉपवर   सायंकाळी सव्वाचार वाजता पोहोचलो.
 

१७६८८ फूट उंचीवरचा हा पास गारठलेला होता. ट्राफिक खूपच असल्यामुळे पाच मिनिटातच बस सुरू झाली.

उताराचा रस्ता सुद्धा ऑफ रोडिंग होता थेट खारू पर्यंत..  खारूला पोहोचायला सव्वा सहा  वाजले. हे गाव मनाली लेह हायवे वर आहे.  नाक्यावरच्या सुकू गेस्ट हाऊस मध्ये पडाव टाकला.


तेथेच मनाली ते लेह सायकलिंग करणारे चार मराठी सायकलिस्ट भेटले. आठव्या दिवशी ते खारूला पोहोचले होते. या गावाचे वैशिट्य म्हणजे येथे मांसाहार वर्ज आहे. पंजाबी धाबे सुद्धा शुद्ध वैष्णव धाबे आहेत.

सिंधू नदीच्या किनारी वसलेल्या खारू गावावरून सकाळी सो मोरीरी साठी पेडलिंग सुरू केले. वाटेत त्रिशूल वॉर मेमोरील लागले. शाहिद जवानांना मानवंदना करून पुढे प्रस्थान केले. 

लेह मनाली हायवे वरून १४ किमी वरच्या उपशी गावात पहिला पडाव होता. या गावापासून हायवे सोडून डाव्या बाजूला वळायचे होते. सिंधूच्या किनाऱ्यानेच ही सफर होती. एका सायकलिस्ट मित्राने, एक किमी माईल्स स्टोनचे फोटो शेअर करायला सांगितले होते.

त्या साठी खास उपशी एक किमीचा फोटो काढला. उपशीला चेक पोस्ट वर परमिट दाखवले आणि दहा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. या प्रदेशात तासाला १२ ते १४ किमी पेडलिंग करणे अतिशय योग्य आहे. 
डाव्या बाजूला वाळल्यावर मोठा माईल्स स्टोन लागला. सोमोरीरी आणि हानले एकाच दिशेला होते. परंतु आमच्याकडे हानलेचे परमिट नव्हते. त्यामुळे सो मोरीरी लेक करूनच मागे परतावे लागणार होते. 

हेमीया गावाजवळ सिंधू नदीवर छान पैकी लाकडी झुलता पूल होता. सायकल अलीकडे ठेऊन झुलत्या पुलावरून सिंधू नदी ओलांडून पलीकडे गेलो.
  सिंधू नदीला येथे "सिंघे खबाब" (सिहाच्या तोंडातून येणारी) म्हणतात.  अतिशय सुंदर कॅम्प साईट होती. छोटसं हॉटेल सुद्धा होतं. एका कोपऱ्यात हिरवळीवर टेंट लावले होते.


लहान मुले खेळत होती.  दुपारचे दिड वाजले होते आणि आणखी पुढे जायचे होते, म्हणून येथे राहायचे टाळले. चहाचा स्वाद घेता घेता सर्व निसर्ग सौंदर्य न्याहाळत होतो. 

ऊन वाढले होते. हेमीया गावजवळच्या प्रेयर व्हील जवळ सायकलने थोडी विश्रांती घेतली.
  

अतिशय छान डांबरी रस्ता होता. वळणे आणि चढ उतार याची आता सवय झाली होती. सर्व सामान सायकलवर लादून या रस्त्यावर विशिष्ट गतीने सायकल चालवावी लागते. परंतु दोन मोठी वाहने जवळ आली असता, थांबण्याशिवाय पर्याय नसतो. 

टेरी स्कुडुंग गावाजवळ पोहोचलो. येथे मुक्काम करण्यासाठी नदीपालिकडे जाऊन संपूर्ण गावात फिरलो. एकही घर उघडे नव्हते.


एका होम स्टे चा दरवाजा जोरजोरात खटखटवून सुद्धा कोणी ओ देईना. काही कळेना काय झालंय ते. गावाच्या टोकाला एक गाडी उभी होती तेथे जाऊन घराजवळ हाक मारल्यावर एक गावकरी बाहेर आला... "गावातील सर्व माणसे बाजाराला गेली आहेत, इथे राहायची व्यवस्था होणार नाही. पुढे पाच किमीवर "गायक" गावात राहायची व्यवस्था होईल."

वाटेत कुठेही साधी चहाची टपरी सुद्धा लागली नाही. सायकलिंग करत होतो पण "गायक" गाव सुद्धा सापडले नाही. आता आम्हीच गात होतो... सायंकाळचे साडेसहा वाजले "केरी" गावात पोहोचायला... खूप दमछाक झाली होती. आर्मी कॅम्प च्या बाजूलाच एक नवीन होम स्टे झाला होता, तेथे पडाव टाकला.


आजी आजोबा घरात होते. त्यांनीच एक रूम उघडून दिली. या होम स्टे चे ओपनिंग आमच्या हस्ते झाले होते. वातावरण अतिशय थंड झाले होते, त्यामुळे सोलरच्या पाण्याने हातपाय तोड धुतले.  रात्रीच्या जेवणानंतर लवकरच झोपी गेलो. आज ८५ किमी राईड झाली होती. 

सकाळी चहा नास्ता करून माहे गावाकडे सायकल सफर सुरू झाली. या लडाख परिसरात व्यवस्थित जेवणखाण आणि आराम असला की येणारा दिवस एकदम नवा असतो. येथून माहे ६० किमी होते. दोन तास सफर झाल्यावर, वाटेत चुशूल १०० किमी बोर्ड लागला.
  

पेंगोंग वरून चुशूल मार्गेच सो मुरीरीला येणार होतो, याची आठवण झाली. 

चुमाथांग गावात पोहोचलो. येथे सिंधू नदी किनारी गरम पाण्याची कुंड आहेत.


कडकडीत उकळतं पाणी कुंडात साठवून तेथे बरेच गावकरी आणि रस्त्यावर काम करणारे मजूर कपडे धूत होते. काही आंघोळ करत होते.  थंड प्रदेशात नैसर्गिक गरम पाणी ही सर्वसामान्यांना परमेश्वराची देणगीच असते. "हॉट स्प्रिंग कॅफे" मध्ये सब्जी रोटी दही जेऊन पुढची सफर सुरू झाली...

 संपूर्ण प्रवास सिंधू नदीच्या किनाऱ्यानेच चालला होता. आमच्या उलट्या दिशेला सिंधू वाहत होती त्यामुळेच प्रवास चढाच्या दिशेने सुरू होता. माहे सात किमी असताना सिंधू नदीकिनारी सुंदर हिरवळीचा पट्टा लागला. तेथे थांबून हिरवळीवर मस्त ताणून दिली. आता प्रत्येक वैशिट्यपूर्ण पाट्यांजवळ फोटो काढायची चढाओढ लागली.
 
माहे ब्रिज जवळ पोलीस चेक पोस्ट आहे.


तेथे मोबाईल वरचे परमिट दाखविले. खाटेवर आडवे झालेले पोलीस महाशय म्हणाले, "झेरॉक्स कॉपी किधर है, नही है तो वापस जावं". काहीही विनवण्या करून तो ऐकेना. चक्क दोन्ही हात जोडले, तेव्हा त्यानेच आम्हाला रजिस्टर मध्ये एन्ट्री घ्यायला सांगितले.  पठ्ठ्या चष्मा घरी विसरून आला होता...  

संध्याकाळ झाली होती वातावरण थंड व्हायला लागले होते.  मुख्य माहे गाव अजून तीन किमी पुढे होते. परंतु माहे ब्रिज वरूनच सो मोरीरीकडे जायचा रस्ता होता, त्यामुळे पुढे गावात जाणे आवश्यक नव्हते. पोलिसाला राहण्याबद्दल विचारल्यावर, नव्या ब्रिजच्या कामासाठी आलेल्या कामगारांचे टेंट बाजूच्या मैदानात लागले आहेत, तेथे बघा काय जमते का. 

BRO चा एक जवान कामगारांवर सुपरवायझर होता. त्याची तसेच कामगारांची परवानगी घेऊन सिंधू नदीच्या किनारी टेंट स्थानापन्न झाला.


विष्णू आणि लक्ष्मण यांची ओळख झाली. त्यांना सायकल चालवायची इच्छा होती, ती पूर्ण होताच पुढ्यात गरमागरम काळा चहा आला. सुपरवायझर शंकर रात्री आठ वाजता वरणभात खायला बोलावणार होता.  रात्री पाऊस सुरू झाला त्यात थंड वारे सुद्धा वाहू लागले. शंकरचा मेसेज येईल म्हणून वाट पाहत होतो... रात्रीचे नऊ वाजले शेवटी खजूर खाऊन झोपी गेलो.

लडाख सफरीत काही खाण्याच्या वस्तू सोबत असणे फार महत्वाचे आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला... 

एक गोष्ट शिकलो... विपरीत परिस्थितीत सुद्धा तग धरणे... त्यामुळे या प्रदेशात उंच उंच शिखरावर पहारा देणाऱ्या भारतीय सैनिकांचे मनोबल किती उच्च असेल याची जाणीव झाली... 

सॅल्युट तरुणांना आणि जवानांना...



सतीश जाधव
मुक्त पाखरे...

मुंबई सिक्कीम - दार्जिलिंग टूर..... ३ जानेवारी २०२१

मुंबई  सिक्कीम-दार्जिलिंग टूर

३ जानेवारी २०२१

सकाळीच गंगटोकच्या ड्रीफ्ट हॉटेल मधून मॉर्निंग वॉकला निघालो.



शहरातील वळणावळणाच्या आणि चढत जाणाऱ्या रस्त्यावरून फेरफटका मारणे म्हणजे इथल्या थंड वातावरणाशी एकरूप होणे होते.
  

गुरुद्वारा आणि बौद्ध मंदिर (गुरू कुंभ टाकलुंग मॉंनेस्ट्री)  समोरासमोरच होते. 
  

वळणावर मिलिटरी गंजू लावा द्वार होते. आणखी वर चढून गेल्यावर भोलेबाबा सिद्धेश्वर शिव मंदिर लागले. या कौटुंबिक सहलीसाठी तीनही देवतांचे आशीर्वाद मिळाले होते.

 साधारण ४ किमी चढून गेल्यावर महात्मा गांधी मार्केट परिसर लागला. मार्केट बंद होते. खास टुरिस्टना फिरण्यासाठी तसेच खरेदीसाठी हा परिसर आहे. येथे गाड्याची रहदारी नाही. पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. आता अक्षरशः धावतच खाली उतरू लागलो. वेगळा मार्ग अवलंबला... पायऱ्याने खाली उतरू लागलो. वाटेत सिलिगुडी बस स्टँड लागला. स्थानिकांची खूप गर्दी होती या स्टँड जवळ...

 सरकारी बस स्टँड MG मार्केटच्या वर आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक हे शहर पूर्व हिमालयाच्या कुशीत वसलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे.  येथे विनाकारण कोणीही हॉर्न वाजवत नाही. तसेच नागरिक स्वच्छतेची विशेष काळजी घेतात. शहराच्या मुख्य परिसरात फिरताना कोठेही कचरा आढळला नाही. महत्वाचे म्हणजे येथे प्लास्टिक बॅन तर आहेच, तसेच बिसलेरीच्या प्लास्टिक बाटल्या सुद्धा निषिद्ध आहेत.  येथील नळाला येणारे पाणी शुद्ध आहे आणि सर्वजण त्याचाच वापर करतात. हे खूपच भावले. 


सकाळचा नास्ता हॉटेलवर करून साडेदहा वाजता दोन ईनोव्हा गाडीने लाचुंगकडे सफर सुरू झाली.
दोन दिवस लाचुंगला राहणार होतो. त्यामुळे आवश्यक तेवढे कपडे घेऊन; एक्सट्रा लगेज हॉटेल वर ठेऊन दिले. येथून लाचुंग ११० किमी आहे. या मिलिटरीच्या नियंत्रणात असणाऱ्या टुरिस्ट गावासाठी लागणाऱ्या परमिटची व्यवस्था टूर ऑपरेटर चंद्राने आधीच करून ठेवली होती. आज ५५०० फूट उंची वरून ९००० फुटावरील लाचुंगला जाणार होतो... 

गाड्या डोंगरातील वळणावळणाच्या रस्त्याने वर वर चढू लागल्या...


डोंगर माथा पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकला गेला होता... थंडीत खास बर्फाची मजा घेण्यासाठीच ही सहल होती. छोट्या रस्त्यावरून एकदम हळूहळू गाड्या पुढे जात होत्या. रस्त्यात लागणारी प्रेक्षणीय स्थळे पाहणार होतो. 

दिड तासात बटरफ्लाय धबधब्याकडे पोहोचलो... अतिशय मनमोहक स्थळ...


बर्फाचं थंडगार दुधाळ जलप्रपात वातावरणातील थंडावा आणखी वाढवत होता. चारही बाजूला हिरवी टच्च झाडी आणि हुरहूरणारी थंडी ... धबधब्या समोरच्या व्हीव पॉईंटवर चढून गेलो. झोम्बणाऱ्या वाऱ्याला अंगावर घेत धबधब्याच्या लोकेशन वर फोटो काढले...


आमचे महिला मंडळ एकदम खुश होते. अशा स्थळावर फोटोग्राफीला बहर येतो. या परिसरसतील विविध रंगसंगतीच्या फुलपाखरांमुळे धबधब्याला बटरफ्लाय नाव पडले होते.

आता थंडी वाढू लागली होती. ढगाळ वातावरणामुळे  सूर्यदर्शन नव्हते. तिस्ता नदीच्या धिखू खोला पुलावर आलो... पुढे बांधलेल्या धरणामुळे नदी एकदम स्तब्ध झाली होती.


हिरव्यागार पाण्यात पडलेल्या डोंगर, ढगांचे प्रतिबिंब म्हणजे निसर्ग स्वतःला स्वतःच्या आरशात न्याहाळलो आहे, असे भासले...

मंगशिला गावाजवळील हॉटेल तिमोन मध्ये ऑथेंटीक सिक्कीमी जेवण मिळाले.  येथील पुलके पुरी एव्हढे बारीक होते. सिक्कीम मधील मुख्य अन्न भात असल्यामुळे पोळी हे येथील पक्वान्न आहे. परंतू चायनीज पदार्थ सर्रास मिळतात.

चुमाथांग कडे पुढील सफर सुरू झाली. सायंकाळच्या सूर्याची सोनेरी किरणे ढगांना सुवर्ण साज चढवत होती.

डोंगराच्या कपारी कपारीतून जाणारा रस्ता बऱ्यापैकी दुतर्फा होता. डोंगर चढायचा आणि उतरून परत दुसरा डोंगर चढायचा अशी सफर सुरू असताना मियांचू नाल्याजवळ पोहोचलो.

डोंगराच्या कपारी कपारीतुन खाली कोसळणाऱ्या ह्या धबधब्या जवळ जाताच थंडीची लहर धावून आली. याच्या थंडगार पाण्याचे थेंब अंगावर शिरशिरी आणत होते... परंतु नात शबरी या वातावरणाशी एव्हढी एकरूप झाली होती की तीला थंडी जाणवतच नव्हती. 
         अर्ध्या तासात चुंगथांग गावात पोहोचलो... गावाच्या वेशीवर रंगीबेरंगी पताका फडकत होत्या. ६००० फुटावर वसलेले हे गाव स्ट्रीट लाईट ने सजलेले होते.


गावात देवीचा वार्षिक उत्सव सुरू असल्यामुळे पंचक्रोशीतील बऱ्याच भाविकांच्या गाड्या डोंगराच्या  कडेला उभ्या होत्या... हळू हळू या गर्दीतून वाट काढत बाहेर पडलो... 

अंधार पडायला सुरुवात झाली आणि गाडीचा वेग आणखी कमी झाला... चुंगथांग ते लाचुंग  फक्त २१ किमी राहिले होते... रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता ग्लेशियर दिसू लागले होते...काही ठिकाणी आजूबाजूची झाडे झुडपे, दरीच्या कडेला असलेले रेलिंग सुद्धा बर्फाने आच्छादले होते... सायंकाळच्या संधीप्रकाशातील धुक्याची चादर रस्तासुद्धा भुरकट करत होती... वर चढत जाणरा   खडबडीत रस्ता... चमकणारा बर्फ, धुक्यातील वाट, गाडीच्या काचा बंद करून सुद्धा बोचणारी थंडी... यात गाण्यांच्या मस्तीत चालणारी सावध गाडी... मानलं पाहिजे दोन्ही सारथ्यांना... तेव्हाच दोघांना पायलट ही उपाधी दिली... विमान चालविणे सुद्धा एव्हढे खडतर नसावे...

थोडा वेळ मार्गक्रमण केल्यावर एका वळणावर गाडी थांबली. एका मागोमाग एक बऱ्याच गाड्या थांबल्या होत्या. वाहतुकीच्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत होत्या... हॉर्न नाही की गाड्यांच्या दोन रांगा नाही... भारताचा भाग असलेल्या सिक्कीममध्ये रहादरीची ही शिस्त पाहून खूप अभिमान वाटला... जवळपास पाऊण तास एकाच जागेवर उभे होतो.

 भूस्खलनामुळे बराच मोठा ढिगारा रस्त्यावर पडला होता...तो हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाहतूक सुरू झाली तरी कोणीही हॉर्न वाजवत नव्हते... स्वयंशिस्त हा सिक्कीमच्या टुरिझमचा पाया आहे... विशेष म्हणजे  गाडीतील कोणाला नैसर्गिक विधीसाठी जायचे असेल तर... जंगलात.. झाडाजवळ.. रस्त्यात कुठेही ड्रायव्हर गाडी थांबवत नाहीत... तर जेथे टॉयलेटची व्यवस्था आहे तेथेच थांबवतात... अर्जुन ड्रायव्हर म्हणाला, 'वर्षातून एकदा आमचे सेमिनार होते'. तेव्हा टुरिस्टशी कसे वागायचे तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण कसे करायचे आणि पर्यावरण प्रेम या बाबत माहिती दिली जाते. विनाकारण कोणताही ड्रायव्हर हॉर्न वाजवत नाही. पर्यावरण प्रदूषित होऊ न देण्याचे महत्व सिक्कीमच्या प्रत्येक नागरिकाने जाणले आहे.  हे भारताचे भाग्यच म्हटले पाहिजे...

सात वाजता लाचुंग हेरिटेज हॉटेल वर पोहोचलो. हॉटेल अंधारात गुडूप झाले होते... हॉटेलची लाईट गेली होती... प्रचंड गारठा पडला होता... जनरेटर पण नव्हते. कन्हय्या ट्रॅव्हलला सांगून बाजूला असलेल्या  ताशी गारहिल हॉटेल मध्ये व्यवस्था झाली... हिटर पण मिळाले.  त्यावेळी  -१ तापमान होते. सर्वांसाठी हिटरची व्यवस्था झाल्यामुळे रात्रीचे -८ तापमान सुध्दा सुसह्य झाले होते... 

दोन जानेवारीला सकाळी ७ वाजता समुद्र सपाटीवरील मुंबईत होतो आणि आज तीन तारखेला रात्री सात वाजता (३६ तासात)  ९००० फुटावरच्या लाचुंग गावात पोहोचलो होतो... वातावरणातील प्रचंड बदल शरीराने स्वीकारण्यासाठी मनाची शक्ती कामी येणार होती...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...