आता निसर्गाच्या रंगात पहाडी रंग सामील झाला. निसर्गाला कवेत घेऊन पुढची राईड सुरू केली.
Monday, May 25, 2020
Mumbai to Kanyakumari Cycling ( Day Eighth) 01.11.2019 Bangalore to Salem मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) बंगलोर ते सेलम
आता निसर्गाच्या रंगात पहाडी रंग सामील झाला. निसर्गाला कवेत घेऊन पुढची राईड सुरू केली.
Sunday, May 24, 2020
Mumbai to Kanyakumari Cycling (Day Seven) 31.10.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सातवा) सिरा ते बंगलोर
सर्व सवंगड्यांची साथ साथ सफर सुरू होती.15 किमी वरच्या सिरा टोल प्लाझाला तासाभरात पोहोचलो. टपरीवर नानखटाई, केक आणि मसाला चहा घेतला. सर्वजण एकत्रच होतो.
वाटेत बंगलोर 100 किमी माईल स्टोन लागला.
ध्यानीमनी नसताना आजची सायकल सफर, अतिशय आल्हाददायक, पाऊस विरहित आणि बंगलोरच्या प्राईम रस्त्यावरून झाली होती. दुपारी उन्हाचा दाह सुद्धा जाणवला नव्हता. आज निसर्गाचा वरदहस्त आमच्यावर झाला होता.
सातव्या दिवशीच हजार किमी अंतर पादाक्रांत केले होते. आयुष्यातील पहिली मोठी राईड दोस्तांच्या साथीने भन्नाट अनुभवली होती. पुण्यात प्रथमच भेटलेले दोस्त आता माझ्या जिवाभावाचे मित्र झाले होते.
एखाद्या व्यक्तीला मित्र म्हणून स्वीकारायचे असेल तर त्याला सोबत, सायकलिंगसाठी न्या. दिवस रात्र एकत्र राहिल्यावर त्याचे मूळ स्वभाव आपल्याला समजतात. यातून झालेली मैत्री कायमची असते. त्यांची ओळख खूप जुनी आहे, असेच मग प्रतीत होते.
Tuesday, May 19, 2020
Mumbai to Kanyakumari (Day Six) 30.10.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सहावा) दावनगिरी ते सिरा
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
(दिवस सहावा) 30.10.2019
*दावनगिरी ते सिरा *
सकाळी सहा वाजता दावनगिरीच्या पोलीस गेस्ट हाऊस मधून राईड सुरू झाली.
रस्त्यावर वाहने तुरळक होती. सरळसोट क्षितीजाकडे जाणार रस्ता, शेवटी एका बिंदूपाशी संपत होता. जणूकाही पुढील वाट आसमंतातील असावी. त्या वाटेवर काळे निळे ढग आमच्या स्वागताची तयारी करत होते.
दाटले आकाशी ढग काळेशार ...
ओथंबले धरेवर अधीर अनिवार
मनी अधीरता लक्ष्य गाठण्याची ...
भ्रांत सोबत्यांची तशीच स्वतःची
तरीही चालणे वाट अतिआनंदाची ...
असे ती भरतभूच्या प्रदूषण मुक्तीची
15 किमी वरच्या बिनधास्त ढाब्यावर आलो. याच धाब्यावर रात्रीचे जेवण जेवलो होतो. मस्त गरमागरम पराठे खाल्ले आणि सुरू झाली पुढची राईड. लवकर लवकर सायकलिंग करा म्हणून सोपानराव घाई करत होता. तेव्हढ्यात या धाब्यावर कोल्हापूरहुन बालाजीला जाणारे पाटील कुटुंब भेटले. त्या कुटुंबातील दोन मुली सायकलिस्ट होत्या. आमच्या बरोबर फोटो काढले. सोपान, विकास आणि नामदेव यांनी राईड सुरू केली.
पहाटे पाऊस पडला होता, त्यामुळे रस्ते ओले होते. रस्त्यावर पसरलेल्या ओलसर मातीमुळे, टायरमधून चर.. चर.. आवाज येते होते. वातावरण अजूनही ढगाळ होते, कधीही पाऊस पडावा असे.
वाटेत लोटस मंदिर लागले.
हे मंदिर उघडे बोडके होते. विशेष म्हणजे चारही कडांना साखळी बांधून मध्ये मूर्तीच्यावर स्टीलची मेघडंबरी छत्र म्हणून लटकवण्यात आली होती. एकदम आगळे वेगळे वाटले हे मंदीर. मंदिरावर कानडीत लिहिले होते, त्यामुळे ते कोणत्या देवाचे आहे ते कळले नाही.
वेळ न दवडता आम्ही पुढे निघालो. रस्त्यात आम्ही कप्तान सोपान आणि कंपनीला गाठलेच. तासाभरात एव्हरग्रीन ढाब्यावर येऊन डोसा आणि गरम इडली भरपेट खाल्ली.
आज लक्ष्मण आणि मी सर्वांच्या पुढे होतो, ते थेट चित्रदुर्ग पर्यंत. कालच्या मिटिंगनुसार मागे राहायचे नाही हे मी आणि लक्ष्मणने ठरविले होते. दावनगिरी ते चित्रदुर्ग ही जवळपास 75 किमी राईड होती. सकाळी वातावरण ढगाळ होते. त्यामुळे आज सूर्यदर्शन झाले नाही. दहा नंतर लागणाऱ्या उन्हाचा चटका सुद्धा नव्हता. पुढचा स्टॉप चित्रदुर्गला जेवणासाठी होता.
लक्ष्मण आणि मी भराभर पुढे जात होतो. अभिजीतची तब्बेत नरम गरम होती, आज दिपक अतिशय उत्साहाने आणि दमदार राईड करत होता. नामदेव त्यांना कंपनी देत होता. विकास आणि सोपानराव एका विशिष्ट गतीने पुढे चालले होते. आम्ही चित्रदुर्ग या छोटेखानी शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सहकाऱ्यांची वाट पाहत थांबलो. पावणे अकरा वाजले होते.
तेव्हढ्यात पंधरा मिनिटे लक्ष्मणने छान डुलकी काढली. 'मागे या' म्हणून कप्तान सोपनचा फोन आला. आमच्या भेटीचे ठिकाण 2 किमी मागे होते.
चित्रदुर्गच्या शून्यपिठाला भेट म्हणजे दिपकच्या ओळखीची पराकाष्ठा होती. आम्हाला आराम करायला एक मोठी खोली मिळाली. स्वामी शिवमूर्ती बसवेश्वरांची झालेली भेट आणि त्यांनी आमच्या कन्याकुमारी राईडला दिलेल्या आशीर्वादाने आम्ही सर्व भारावून गेलो. याच मठात दुपारच्या भोजन-प्रसादाचा आम्ही लाभ घेतला. या चित्रदुर्गला प्राचीन किल्ला आहे. तसेच महाभारतातील भीम पत्नी हिडीम्बाचे हे गाव आहे.पुढची राईड सुरू झाली . जोरदार वारे वाहत होते त्यामुळे दोन तासात जवळपास 30 किमी राईड झाली. पुढे अचानकपणे मळभ भरून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसात पुढचे काही दिसेनासे झाले, तरी सुद्धा लक्ष्मण आणि मी हेड लाईट चालू करून भिजत सायकलिंग करत होतो. जवळपास तासभर झाला तरी पाऊस थांबायची लक्षणे नव्हती. तेव्हढ्यात एक धाबा लागला. आम्ही दोघांनी त्याचा आसरा घेतला. पाऊस थांबल्यावर पुढची राईड सुरू केली.
अर्ध्या तासात पुन्हा ढगांनी दाटी केली. पुन्हा पाऊस सुरू झाला.
आम्ही दोघेही चिंब भिजलो होतो. आता आसरा पाहत होतो. पुढे एका धाब्यावर थांबलो. पाऊस थांबायची काहीही लक्षणे नव्हती.धाब्यावर भाषेची अडचण जाणवू लागली. सिरा कडे जाणारा रस्ता कसा आहे. राहण्याची व्यवस्था कुठे होईल याची माहिती मिळाली नाही.
तेवढ्यात एक टेम्पो त्या धाब्यावर आला. त्याच्याकडून माहिती मिळाली. अजून चाळीस किमी वर सिरा गाव होते. पुढची राईड सुरू झाली, रस्तावर ट्राफिक तुरळक होती. पाऊस सुरूच होता, परंतू त्याचा जोर कमी झाला होता.
पुढे चालणाऱ्या गाड्यांमुळे सायकल आणि आम्ही नखशिखांत बरबटलो होतो. चाकातून उडणाऱ्या चिखल मिश्रित पाण्यामुळे गावाच्या जत्रेत नाचणाऱ्या खेळीया सारखा चेहरा झाला होता. अशा अवतारात घरच्यांनी सुध्दा आम्हाला ओळखले नसते.
अंधार पडायला सुरुवात झाली, रस्त्यात चौकशी केली असता सिरा अजून दहा किमी पुढे आहे हे समजले.
पाऊस थांबला होता पण रस्ते ओले होते. अंधार पडला होता. सायकलचे लाईट चालू करून आम्ही चाचपडत सिराला पोहोचलो.
शेवटच्या काही किलो मीटर्समध्ये दिपक सुद्धा प्रचंड थकला होता.. सोपान, विकास , नामदेव आणि अभिजित आमच्या मागोमाग सिराला पोहोचले. आज 140 किमी राईड झाली होती.
सिराला अभिजितच्या ओळखीने पीडब्लूडी गेस्ट हाऊसमध्ये राहायची व्यवस्था झाली. दोन खोल्यात सर्वांना ऍडजस्ट व्हावे लागले.
आंघोळ करून सॅकमधील कपडे काढून सुकविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागला. जेवून झोपायला रात्रीचे 11 वाजले.
आम्हाला पावसाने झोडपले, चिखलाने माखविले आणि जिद्दीने सिरा पर्यंत पोहोचविले
एक थ्रिलिंग आणि वेगळा अनुभव होता, धुवाधार पावसात राईड करण्याचा. पावसाचा जोर एव्हढा होता की चष्म्याला सुद्धा वायपर लावायला हवे होते.
निसर्गाचे अनंत आविष्कार आजच्या राईड मध्ये पाहायला मिळाले.
किती सुंदर आहे हे आयुष्य ! !
आणि असे अनुभव जीवनाचे सौंदर्य आणखी वाढवत होते ! ! !
सतीश विष्णु जाधव
Saturday, May 16, 2020
Mumbai to Kanyakumari Cycling (Day Five) 29.10.2019 Dharawad to Davangiri. मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस पाचवा) धारवाड ते दावनगिरी
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
29.10.2019 (दिवस पाचवा)
धारवाड ते दावनगिरी
धारवाडच्या कृषी विद्यापीठ हॉस्टेल मधून सकाळी साडेपाच वाजता सायकलिंग सुरू केले.
20 किमी राईड करून, हुबळी जवळील टोल नाक्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला. चहा, बिस्किटे खाल्ली.
सोपान म्हणाला, 'लवकर चला आज मोठा पल्ला मारायचा आहे'. नामदेव निघण्यासाठी चुळबुळ करत होता. तो आमचा खजिनदार असल्यामुळे चहावाल्याचे पैसे दिल्याशिवाय त्याला निघता येत नव्हते. विकास लांबूनच त्याची गंम्मत पाहत होता. सोपान आणि विकासकडे हायब्रीड सायकल होती, तर नामदेवकडे MTB, त्यामुळे नामदेवला सायकलिंग करताना जादा जोर काढावा लागत होता. नामदेवाने व्रत घेतले होते, सोपान आणि विकासची पाठ सोडायची नाही. जसे की संत जनाबाईने नामदेवांची पाठ कधीच सोडली नाही.
40 किमी वर 'वीरालमेना' गावात एक टपरी लागली. दिवाळी निमित्त बाजूचा प्रणव धाबा बंद होता. टपरीवरच्या काकीने झकास उपिट खायला घातले. वर चहा पिऊन पुढची राईड सुरू केली. मी आणि लक्ष्मण निसर्ग भ्रमंतीमुळे मागे राहिलो होतो. मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया, हे गाणे प्रत्यक्ष अनुभवत होतो.
सहा पदरी हायवे वर गाड्यांची रहदारी कमी होती. सकाळी दहाच्या दरम्यान पांढऱ्याशुभ्र ढगांनी आकाश भरून टाकले होते. ढगांचे वेगवेगळे आकार मनाला भावले होते. ओठावर "दिवाना हुवा बादल, सावन की घटा छायी" गाणे तरळले. लक्ष्मण दोन्ही हात पसरून ढगांना कवेत घेत होता.
आणखी 18 किमी राईड झाली दहा वाजले होते. उन्हे चढू लागली होती.
वाटेत एका टपरीवर थांबलो. मुंबईवरून आलेले नाईक कुटुंब भेटले. त्या कुटुंबातील मुलांना आम्ही प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन "मुंबई ते कन्याकुमारी" सायकलिंग करतोय, याचे खूप अप्रूप वाटले. सर्व कुटुंबियांनी आमच्यासह फोटो काढले.
दिवाळी फराळ खायला दिला. आपली मराठी माणसे जेव्हा परप्रांतात भेटतात तेव्हा घरातील माणूस भेटल्याचा आनंद होतो.
पुढची राईड सुरू झाली, आता सर्व बाजूला मोठमोठया पवनचक्क्या फिरत होत्या.
या भागात वाहणाऱ्या वाऱ्याचा, वीजनिर्मितीसाठी प्रचंड उपयोग करण्यात आला होता. रस्त्यात मोठे मोठे ट्रेलर्स; पवनचक्यांचे सुटे भाग, पाती घेऊन चालले होते. पांढऱ्या ढगांनी आच्छादलेले निळेभोर आभाळ आणि त्यावर पवनचक्यांची रांगोळी, खरच निसर्ग सुद्धा दिवाळी साजरी करत होता. लहानपणी जत्रेत मिळणाऱ्या 'भिरभिऱ्यांची' आठवण पवनचक्क्या देत होत्या. आमचे सुपर सवंगडी पुढे सटकले होते. लक्ष्मण आणि मी 'साथ साथ' चाललो होतो. पण जेव्हा सायकलवर असतो तेव्हा मनाची साथ असते भन्नाट वेगाने पळणाऱ्या.ऊन वाढल्यामुळे 12 किमी वर शिंगगाम गावात श्री जयलक्ष्मी परिवार धाब्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला. "अनिया पकोडा" म्हणजे कांदा भजीची ऑर्डर दिली पण भजी तयार नव्हती. म्हणून मी कोल्ड ड्रिंक आणि लक्ष्मणने कॉफी घेतली आणि पुढची सफर सुरू केली.
आता ऊन आणि वारा यांचा दमछाक करणारा मारा सुरू झाला. दुपार झाली होती. सोपान आणि सुपर सवंगडी हवेरी गावाच्या आसपास राजस्थानी ढाब्यावर जेवायला थांबले होते. आम्ही दोघे हवेरी गावात शिरलो. कुठेही ढाबा सापडेना. गावातील गावकरी आमची विचारपूस करत होते. तेव्हढ्यात मोटरसायकलवर दोन राजस्थानी भेटले.
त्यांनी सांगितले हायवे बायपास वर राजस्थानी धाबा आहे. तुम्ही आता गावात आला आहात. आमची आस्थेने चौकशी करून त्यांनी मस्त चहा पाजला.हायवेला आलो वाटेत 'हवेरी नाला' तुडुंब भरून वाहत होता.
त्यावरील जुना दगडी पुल, विजयनगर साम्राज्यातील तुंगभद्रा नदीवरील हंपीच्या पुलाची आठवण देऊन गेला.तसेच हायवे वर आलो, तर राजस्थानी धाबा मागे गेला होता आणि दुसरा दहा किमी पुढे होता. पुढे जायचे ठरविले. रणरणत्या उन्हात पेडलिंग करत होतो.
तेवढ्यात लाल शर्ट घातलेला मोटर सायकलवाला पुढे जाऊन थांबला. आम्ही जवळ आल्यावर आमची चौकशी केली. 'रवींद्र' पण सायकलिस्ट होता. आम्ही प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन कन्याकुमारीला जातोय, हे ऐकल्यावर त्याने आईने बनविलेल्या करंज्या खायला दिल्या. पोटात भुकेचा डोंब उसळला होता, त्यात घरची करंजी म्हणजे 'वाळवंटात ओयासिस' सापडले होते. त्याच्या शुभेच्छा आणि प्रेमाने दिलेले करंज्याचे पाकीट घेऊन पुढे निघालो.
जवळपास 105 किमी सायकलिंग झाले होते. मोतिबिनोर गावाच्या जवळ घुमर राजस्थानी ढाबा लागला. दुपार झाली होती. जेवायची इच्छा नव्हती. चहा बिस्कीटे खाल्ली. लक्ष्मणाला झोप येत होती. दुपारच्या कडक उन्हात माझी सुद्धा सायकल चालवायची इच्छा नव्हती. थोडा आराम करून पुढे निघालो.
आणखी तीन किमी वर मोतिबिनोर बस स्टँड होता. राजस्थानी पाणीपुरीवाल्याकडे रगडापुरी खाल्ली. स्टँड जवळच एक ऑटोवाला होता. त्याने आमची कानडीत चौकशी करायला सुरुवात केली. आम्ही मुंबईवरून आलो समजताच मराठी बोलायला लागला. त्याने पुढील रस्त्याची माहिती दिली.
दावनगीरीचे अंतर अजून 58 किमी होते. दुपारचे तीन वाजले होते. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. 20 किमी सायकलिंग केले. रानेबेंनूर गावातील टपरीवर चहा नानखटाई खाल्ली.
पुढे 11 किमी चालेगिरी टोल प्लाझाला थांबलो, सूर्यबिंब आता मावळतीला लागले होते. ढगाआड लपू लागले.
काळ्या ढगांबरोबर किरणांचा लपंडाव सुरू झाला. काळे पांढरे मेघ सुवर्णकडांनी आरक्त झाले होते. निसर्गाचे हे आगळे वेगळे रूप डोळ्यांचे पारणे फेडत होता.प्रभाकर जोगांच्या व्हायोलिनवरील जुनी गाणी मोबाईल वर लावली होती.
सायकलचा वेग वाढला आणि पुढील 27 किमी दीड तासात पार करून दावणगिरी गाठले. आज 168 किमी सायकलिंग झाले होते.
दावणगिरी हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या मध्यभागी असलेले मोठे शहर आणि दावणगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे कापसाचे हब असून भारताचे "मँचेस्टर" म्हणून प्रसिद्ध आहे.
सध्या त्याची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाली आहे.
दावनगिरीला सुद्धा दिपकने कमाल केली होती. तेथील पोलीस सुप्रीन्टेंडेंटच्या ओळखीने, पोलीस गेस्ट हाऊसमध्ये आमची राहायची आलिशान व्यवस्था होती. येथेच दिपकचा आणखी एक मित्र ड्रायफ्रूट आणि फळे घेऊन आमच्या स्वागताला आला होता.
त्याच्याबरोबर गप्पा मारत असतानाच, खुद्द पोलीस सुप्रीन्टेंडेंट साहेब आले. आमची आस्थेने चौकशी आणि सन्मान केला.
दोन इन्स्पेक्टर आणि पोलीस व्हॅन देऊन रात्री सामिष भोजनाची व्यवस्था सुद्धा केली. बिनधास्त फॅमिली ढाब्यावर जेवण झाले.पुढील सायकलिंग साठी सर्वांची मिटिंग झाली. दुपारच्या जेवणपर्यंत सर्वांनी कटाक्षाने एकत्र राहायचे ठरविले. कालच्या सायकलिंगमध्ये तसे झाले नव्हते.
मिटिंगमध्ये विकासने एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली, ' जेव्हा घाट किंवा चढ लागतो तेव्हा खूप वर पाहिलं तर चढ अंगावर येतो. पुढे गेलेल्या सायकलिस्टला आपण गाठू का, असा नकारात्मक भाव निर्माण होतो, आणि आपला रिदम तुटतो. अशावेळी फक्त पुढच्या चाकाच्या थोडेसे पुढे पाहून पेडलिंग करत राहणे'. खरे होते विकासचे म्हणणे,
आपले अंतिम लक्ष कन्याकुमारी असताना, छोटे छोटे घाट का बरे पहायचे?'. अनुभवानेच अशा गोष्टी शिकायला मिळतात.
या वेळी सोपानरावांचे हसतमुख आणि हावभावयुक्त बोलणे, एकदम फर्मास होते. व्यवसायिक असल्यामुळे, समोरच्याला पटविण्याची हातोटी सोपानकडे अफलातून आहे, हे समजले. लिडरशीप क्वालिटीज त्यात खच्चून भरल्या होत्या.
दिपकच्या मित्राने आणलेले कलिंगड रवाळ तर सफरचंद एकदम कडक आणि रसरशीत होते. फळे खाऊन निद्राधीन झालो, सकाळी चार वाजता उठण्यासाठी.
सतीश विष्णू जाधव.