Wednesday, May 19, 2021

नर्मदा परिक्रमा (दिवस तेरावा) अनसूया माता मंदिर (अंजाली) ते शेष नारायण मंदिर (चांदोद नर्मदा घाट), कुबेर भंडारी (मांडवा), तिलकवाडा, गरुडेश्वर १०.०१.२०२१

 नर्मदा परिक्रमा (दिवस तेरावा)


  अनसूया माता मंदिर (अंजाली) ते शेष नारायण मंदिर (चांदोद नर्मदा घाट), कुबेर भंडारी (मांडवा), तिलकवाडा, गरुडेश्वर

१०.०१.२०२१

सकाळी सहा वाजता जाग आली. उदय होणाऱ्या भास्कराच्या  प्रथम दर्शनाने मन एकदम प्रसन्न झाले.

  पायी चालणारे बरेच परिक्रमवासी निघण्याच्या तयारीत होते. आन्हिके  आटोपून मैंय्येचे पूजन केले. महासती अनसूया मातेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो. अनसूया मातेचे स्वयंभू दर्शन पाषाण रुपात आहे.अंगावर भरजरी शालू आणि मुखकमलावरील हळदी वस्त्रातून मातेचे दयाद्र नेत्र दर्शन झाले.
परिक्रमा करणारे एक बाबाजी एरंडी खाईत घेऊन गेले. तेथील गंगा मातेचे उगम स्थळ दाखविले.

अंजाली गावात कोरडा दुष्काळ असताना, तप साधना पूर्ण झाल्यावर पती अत्री ऋषीना तहान लागली. पतिव्रता अनसूया मातेने तेव्हा गंगा मैयाला प्रकट व्हायचे आवाहन केले. गंगा मैय्येने अनसूया मातेकडे पतिव्रत आणि अतिथी सत्काराचे एक वर्षाचे तपफल आणि पुण्य मागितले. अनसूया मातेने एक वर्षाचे तपफल देऊन गंगा मातेला येथे स्थापित केले आहे. त्यामुळे या गावात गंगा मातेचे जल सर्वांना मिळते. दोन युगे उलटून गेल्यावर सुद्धा ज्या स्थानावर अनसूया मातेने तप केले आहे तेथील माती अंगाला लावताच त्वचेच्या सर्व व्याधी आजही नाहीश्या होतात. या एरंडी खाई मधून वाहणारी गंगा मैय्या पुढे नर्मदा मातेशी संगम पावते.
या संपूर्ण पुण्यक्षेत्राचे दर्शन घेतले.  थोडावेळ ध्यानमग्न होऊन आम्ही मातेच्या चरणी लीन झालो. बालभोग म्हणून शेव भुरभुरलेले कांदापोहे आणि चहा मिळाला. अनसूया मैयेच्या या पवित्र भूमीतून निघताना... थोडी हुरहूर लागली... मैयेचा सहवास आणखी मिळावा हीच कामना ठेऊन... साष्टांग नमस्कार करून मंदिरातून पुढची पारिक्रमा सुरू केली.

पुढील नर्मदा मैयेची भेट घ्यायचे ठिकाण चांदोद घाट होता. जवळपास २० किमी अंतर पार करून सव्वा तासात चांदोद गावात  पोहोचलो. मकर संक्रात जवळ आल्यामुळे गावाच्या बाजारात पंतगांची आरास दिसली.

चांदोद हे नर्मदा नदीच्या काठावर वसलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे.  नर्मदा मैय्या किनारी श्री महादेवाची अनंत मंदिरे आहेत, पण हे महाविष्णू श्री शेष नारायण मंदिर सुद्धा नर्मदा किनारी आहे.  नारायणालासुद्धा नर्मदा मैय्येच्या किनारी यावे लागले आहे. 

वैष्णव जन तसेच प्रत्येक परिक्रमवासी या मंदिराला आवर्जून भेट देतात.

चांदोद येथील अतिशय विस्तीर्ण घाट आणि संथपणे वाहणारी नर्मदा मैय्या मनाचा ठाव घेत होती.

  भूत किंवा भविष्यात भरकटणाऱ्या मनाला वर्तमानात आणून आनंदमय करणारी मैय्या... तिला तिचाच जलाभिषेक करून अर्ध्य दिले...

मन करा रे प्रसन्‍न ।   सर्व सिद्धीचें कारण ।

मोक्ष अथवा बंधन ।   सुख समाधान इच्छा ते ॥

ही तुकाराम महाराजांची ओवी आठवली.

खूप सुंदर परिसर एकदम भावला ...मन विरक्तीच्या मार्गाने निघाल्याची जाणीव झाली.

बरेच भक्तगण, पर्यटक पूजा आणि दिपदान आदी विधी करीत होते. काही पर्यटक नावेतून सफर करीत होते. या घाटावर दशक्रिया, तर्पण इत्यादी विधी सुद्धा सुरू होते. थोडी उसंत घेऊन पुढील सफर सुरू झाली.

तासाभरात जुना मांडवा गावात पोहोचलो. हमरस्त्यावरच गावकऱ्यांनी पारिक्रमावासीयांसाठी बालभोगची व्यवस्था केली होती.

चहा बिस्किटे आणि कंदापोहे प्रत्येक परिक्रमावासींना थांबवून थांबवून प्रेमाने खाऊ घालत होते. हा बालभोग म्हणजे दुपारची भोजनप्रसादीच होती. येथून दोन किमी अंतरावर कुबेर भंडारीचे मंदिर होते.

कुबेर भंडारी मंदिराकडे पोहोचलो. कुबेर म्हणजे अगणित संपत्ती असणारा देव. हिरे मोती सोन्याने मढविलेले हे कुबेराचे स्थान...

कुबेराची गरज कोणाला लागत नाही... संपत्ती तर प्रत्येकाला हवी असते...  संपत्ती हे जीवन जगण्यासाठी साधन आहे पण जीवनाचे साध्य होऊ शकत नाही... पैसे हे साध्य नाही असेच कुबेर सांगत असावा काय?

या ठिकाणी खूप मोठा भक्तसमुदाय कुबेराचे दर्शन घ्यायला आला होता. परंतु आम्ही मनाचे धन गोळा करायला कुबेर भंडारीकडे आलो होतो.

येथे कुबेराने भगवान शिवाची घोर तपस्या केली होती. कुबेर भंडारीचे दर्शन घेऊन मंदिरामधून नर्मदा घाटावर उतरलो.

या मंदिरात दक्षिणेकडील पोयछा तटावरून  बरीच भक्त मंडळी नर्मदा मैय्या पार करून येत होती. तेथून राजपिपला १५ किमी अंतरावर आहे. कुबेर भंडारीचा नर्मदा घाट भक्तगण आणि परिक्रमवासी यांनी फुलून गेला होता. या घाटाजवळच सिद्धबाबा महर्षी अरविंदजी यांच्या तपस्या स्थळाचे दर्शन घेतले. बाबा अरविंदजी यांना येथे महाकालीचा साक्षात्कार झाला होता.  श्री अवधूत स्वामींचा "श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन्" हा मंत्र भिंतीवर विराजमान होता.

करनाळी गावातीळ कुबेर भंडारीच्या मंदिराजवळच वरसंग नदी, गुप्त सरस्वती आणि नर्मदा मैय्या यांचा त्रिवेणी संगम आहे, तेथे पोहोचलो. याला दक्षिण प्रयाग म्हणतात.

वरसंग नदी, गुप्त सरस्वती नदीसह महाकाय नर्मदेमध्ये विलीन होत होती.  हा अद्भुत रम्य संगम सोहळा पाहत होतो. संपूर्ण परिसर राहुट्यांनी फुलून गेला होता. बरेच पुरोहित मंडळी सामुदायिक पूजा करीत होते. सर्व परिसर पाहून पुढे प्रस्थान केले.

तासाभरात तिलकवाडा येथे पोहोचलो. येथे कैलास मानसरोवर सेवा समिती तर्फे परिक्रमावासींसाठी अन्नक्षेत्र सुरू होते. जेव्हा जेव्हा तहान लागली तेव्हा तेव्हा अन्नक्षेत्र हजर... ही स्थिती म्हणजे मैय्येशी केलेले हितगुज होते... आम्ही मागावे आणि तिने पूर्ण करावे...

स्वामी चंद्रमौली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  राजेश कुलकर्णी आणि मनोज शहा यांच्यातर्फे हे सेवा केंद्र चालविण्यात येत होते. येथे चहा कंदापोहेचा बालभोग मिळाला.

जवळच मणिनागेश्वर मंदिर आहे. तिकडे प्रस्थान केले. प्राचीन मणिनागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होता. येथे मणिनागेश्वराचे मुख्य मंदिर आहे त्याच बरोबर  सुवर्णजडीत हनुमान आणि विस्मय गणपती यांचे दर्शन झाले.

मणिनाग या सर्पाने महादेवाची घोर तपस्या केली. म्हणून येथे प्राचीन मणिनागेश्वर मंदिर स्थापित आहे. सरदार सरोवर धरण प्रकल्पामुळे येथील नर्मदा मैंय्येचा घाट आता अस्तित्वात नाही. मंदिराच्या काठड्यावरून नर्मदा मैय्येचे दर्शन घेतले.

  मणिनागेश्वर तीर्थाची कथा :   काश्यप ऋषींना दोन पत्नी होत्या. एक कदू आणि दुसरी विनता. दोघींमध्ये एकदा विवाद झाला की, "उचै:श्रवा घोडा श्वेत आहे की शाम आहे"  विनताने सत्य सांगितले की तो घोडा श्वेत आहे. परंतु कदूने तीला खोटे ठरविण्यासाठी आपल्या सर्व काळ्या सर्प पुत्रांना सांगितले, "तुम्ही सर्वजण उचै:श्रवाच्या संपूर्ण शरीराला लपेटून घ्या, जेणे करून तो श्याम दिसेल". परंतु सत्य आणि धर्म पारायण मणीनाग या पुत्राने मातेच्या आज्ञेला नकार दिला. त्यामुळे माता कदूने त्याच्या त्याग केला. म्हणून तो दुःखी होऊन रडत रडत नर्मदेच्या उत्तर तटावर शिवाच्या चरणी लीन झाला. त्याच्या अश्रूतून मणी अर्थात मेण नदीचा उद्गम झाला. हीच मेण नदी नर्मदा मैय्येला विलीन होते. श्वेत घोडा उचै:श्रवा; सापांमुळे श्याम झाल्याने विनता विवादात हरली आणि ती कदूची दासी झाली.

विनताचा पुत्र गरुड... त्याला आपली आई दासी झाली आहे कळल्यावर; तो कदूकडे आला आणि म्हणाला, माते; विनता आईला दास्यमुक्त करण्यासाठी मी काय करू? कदूने आपल्या पुत्रांचा उद्धार करण्यासाठी त्यास स्वर्गातून अमृत आणावयास सांगितले. गरुडाने इंद्राला पराजित करून अमृत घेऊन आला. अमृतकुंभ माता कदूच्या पुढ्यात ठेऊन आई विनताला दास्यमुक्त केले.

इंद्राने ब्राम्हण वेष करून कदू आणि सर्व सर्पांना सांगितले, "नर्मदा स्नान करून पवित्र व्हा आणि मग अमृतपान करा". सर्व स्नान करायला गेले असता, इंद्र अमृतकलश घेऊन गेला. ज्या ठिकाणी अमृत कलश ठेवला होता तेथे कुश गवत उगवले होते. त्या गवतावर अमृताचे काही थेंब पडले असतील म्हणून सर्प ते कुश गवत चाटायला लागले. त्यामुळे त्यांच्या जिव्हा (जीभ) दोन भागात दुभंगल्या.

कदूला आपल्या  कर्माचा पश्चाताप झाला आणि तिने मणिनागाला आपला पुत्र म्हणून स्वीकार करून त्याचे सत्य कर्माबद्दल अभिनंदन केले. "भगवान आशुतोष शिवाला" प्रसन्न करून मणिनाग ह्या स्थानावर आजही विराजमान आहेत. हे तीर्थ "मणिनागेश्वर" नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या प्रांगणात स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान आहे, हे खूपच प्रेरणादायी होतं.

आता पुढची परिक्रमा गरुडेश्वर पर्यंत होती. मैय्येच्या किनाऱ्याने;  गावागावातून जाणारा आणि वळणावळणाचा रस्ता निवडला होता. सव्वा तासात गरुडेश्वर येथील श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बेस्वामींच्या मंदिराजवळ पोहोचलो. सध्याच्या काळात येथे पारिक्रमा वासीयांची निवास व्यवस्था नव्हती. म्हणून तेथून जवळच असलेल्या माँ भगवती अन्नक्षेत्र येथे पोहोचलो.  तेथील गायत्री मंदिरात परिक्रमवासी तसेच साधुसंत यांची भोजनप्रसादी आणि निवास व्यवस्था होती. श्री टेम्बेस्वामींचे दर्शन उद्या करणार होतो.

आज जवळपास ८० किमी सायकल पारिक्रमा झाली होती. गायत्री मंदिरात बरेच पायी परिक्रमवासी होते.  स्नानसंध्या आटपल्यावर नर्मदा मैयेची पूजा केली.  थोड्याच वेळात गायत्री मातेची आरती सुरू झाली. आम्ही सर्वांनी मनोभावे गायत्री आरती मध्ये भाग घेतला.

गायत्री मातेला भोग दाखविल्यावर भोजनप्रसादिला आम्ही सर्व परिक्रमावासी एकत्र पंगतीत बसलो. मंदिराच्या पुजारी बाबाजींनी भोजनाला सुरुवात करण्या अगोदर गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली ... भोजना अगोदर म्हटलेली प्रार्थना जठराग्नी उद्विपित करतात... यांची प्रचिती आली. सात्विक डाळ खिचडी पंचपक्वान्ना सारखी भासली.

अंजाली येथून अनसूया मातेच्या आशीर्वादाने सुरू केलेली पारिक्रमा चांदोद येथील शेषणारायण मंदिर, करनाळी येथील कुबेर भंडारी मंदिर, तिलकवाडा येथील मणिनागेश्वर मंदिर आणि पवित्र गरुडेश्वर येथील गायत्री मंदिरापर्यंत नर्मदा मैयेच्या किनाऱ्याने झाली होती. आजची परिक्रमा या सर्व पवित्र स्थळांना समर्पित केली..

कार्यकारण भाव आता कमीकमी होऊ लागला आहे.

सर्व काही नर्मदा मैय्येच्या कृपेने घडते आहे...

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

Saturday, May 15, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस बारावा) भरुच (निलकंठेश्वर मंदिर) ते नारेश्वर रंगावधुत स्वामी महाराज मंदिर ते अनसूया माता मंदिर (अंजाली निवास) ०९.०१.२०२१

 नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस बारावा)
   भरुच (निलकंठेश्वर मंदिर) ते नारेश्वर रंगावधुत स्वामी महाराज मंदिर ते अनसूया माता मंदिर (अंजाली निवास)

०९.०१.२०२१

भरुच जवळच्या झाडेश्वर गावातील निलकंठेश्वर महादेव मंदिरा बाहेरच्या पडवीत आमचा विश्राम होता. आज पहाटे तीन वाजताच जाग आली. नर्मदा मैय्येची साद कानात गुंजत होती. थंड वारे मंदगतीने वाहत होते.  निरभ्र आकाशात चांदण्या चमचमत होत्या. आज सफला एकादशी होती. झाडांची सळसळ ऐकत नर्मदेच्या किनारी आलो. येथे नर्मदा शांत रुपात वाहते. 

घाटावर थांबून आकाश दर्शन केले. उत्तरेकडे स्थित ध्रुव तारा एकटक माझ्याकडे पहात होता. नर्मदे किनारी  एका रांगेत लावलेली पाम झाडे चांदण्याच्या प्रकाशने न्हाऊन निघाली होती.
थोडावेळ पहाटेच्या निसर्गात रममाण होऊन पुन्हा पडवीत आलो आणि ध्यानमग्न झालो. 

पुन्हा सकाळी सहा वाजता अंथरूणाबाहेर आलो. प्रातर्विधी आटपले आणि नर्मदा पूजन करून निलकंठेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. बाजूलाच असलेल्या संकटमोचन हनुमानाचे दर्शन घेतले.

   नारळ, पिंपळ, चिंचेच्या झाडांनी  अच्छादलेला मंदिराचा भव्य परिसर...  मंदिराला केलेली लाल आणि पिवळ्या रंगांची रंगसंगती प्रांगणाची शोभा वाढवीत होती.   आ... हा... हा... हा... नर्मदा मैय्येचे अतिशय विहंगम स्वरूप पहायला मिळाले. अद्भुत चुंबकीय क्षेत्राची जाणीव या परिसरात झाली. मिठी तलाईच्या नर्मदेच्या उत्तर तटावर आल्यावर कालचा नर्मदा तिरावरचा पहिलाच मुक्काम होता. प्रत्येक पारिक्रमावासी या मंदिराला भेट देतात.

थोड्याच वेळात हायवेला पोहोचलो. हायवेच्या चौरस्त्यावर रांगेत खाण्याच्या टपऱ्या लागल्या होत्या. येथे बऱ्याच बस सुद्धा उभ्या होत्या.भरुचचे प्रसिद्ध शेंगदाणे आणि चणे पाकिटे घेतली. कालच संजयने कांदापोहे खायची इच्छा प्रकट केली होती आणि आज जवळच्या टपरीवर कांदापोहे आणि चहा बालभोग मिळाला. मैय्या मनातल्या इच्छा सहज पूर्ण करते. मंदिर परिसरातून एकदम हायवेवर आल्यामुळे शांतते मधून कोलाहलात प्रवेश झाला होता.

पुढची परिक्रमा सुरू झाली आणि भव्य स्वामींनारायण मंदिराचे दर्शन झाले.

अतिशय अप्रतिम असे हे मंदिर... राधा-कृष्ण, सितामैय्या पुरुषोत्तम रामजी... वृषभदेव यांची मंदिरे... हा मनमोहक आणि भव्यदिव्य मंदिर परिसर पाहून मन प्रसन्न झाले.  हे मंदिर अप्रतिम कलाकृतीचा नमुना आहे. स्वच्छता आणि शांतता यांचा संगम आढळला. घनश्यामजी महाराज, शिवपार्वती आणि लक्ष्मीनारायण यांचे सुद्धा दर्शन झाले. मंदिराच्या पवित्र वातावरणात थोडा वेळ व्यतीत केला. परिक्रमेत पाहायला मिळालेले नितांत सुंदर मंदिर म्हणून या स्वामींनारायण मंदिराचा उल्लेख करावा लागेल.

पुढे भनोदकडे जाणाऱ्या मार्गाने श्री रंगावधुत महाराजांच्या मठाकडे प्रस्थान केले. हायवे वरून उजव्या बाजूला वळल्यावर थोड्याच वेळात कॅनॉलच्या बाजूने जाणारा रस्ता सुरू झाला.

जागोजागी या कॅनलची साफसफाई सुरू होती. जेसीबी लावून पाण्यात जमलेले शेवाळ, रानटी झाडे झुडपे, वाहत येणारा केरकचरा नाल्या बाहेर काढला जात होता. या रस्त्यावर गाड्यांची वर्दळ नसल्यामुळे सायकल निवांत पळत होत्या.

बरोबर साडेबारा वाजता नारेश्वर येथील श्री रंगावधुत स्वामी महाराजांच्या आश्रमात पोहोचलो.

श्री पांडुरंग विठ्ठल उर्फ श्रीरंग अवधूत महाराजांनी गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींच्या आदेशाने गुजरातेत दत्तभक्ती परंपरा वाढीस लावली. " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" भजनाने अवघा गुजरात दत्तभक्तीच्या सुगंधाने दरवळू लागला. धन, मान, कीर्ती या पलीकडे आनंददायी विश्व आहे याची जाणीव अखिल जगाताला झाली.

"धाव धाव दत्ता किती वाहू आता । चैन नसे चित्ता येई वेगीं" ।। या आर्त स्वरांनी श्रीरंग अवधूत स्वामींनी चाळीस वर्षे नारेश्वराच्या लिंबाच्या वृक्षाखाली कठोर तपश्चर्या केली. स्वामींच्या तपोबलामुळे त्या लिंबाने आपला कडूपणा सोडून मधुर झाला आणि खाली झुकून धरणीला स्पर्श केला. येथेच रंगावधुत स्वामींना श्री दत्त गुरूंचा साक्षात्कार झाला.
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी गुरूंच्या आदेशान्वये श्री दत्त पुराणाच्या १०८ पारायणांचे अनुष्ठान श्री रंगावधुत स्वामींनी पूर्ण केले. त्याच्या उद्यापना प्रित्यर्थ रंगावधुत स्वामींनी नर्मदामैयेची पायी पारिक्रमा १०८ दिवसात  केली.

श्री रंगावधुत स्वामी उच्च कोटीचे सिद्ध संत असून सुद्धा मातेच्या आज्ञेनेच सर्व कामे करीत. मातेच्या स्मृती प्रित्यर्थ "मातृस्मृतीशैल" स्मारकाची स्थापना नारेश्वर येथे केली.

श्री रंगावधुत स्वामी संस्कृतचे प्रकांड पंडित होते. रंगहृदयम् या ग्रंथात अनेक देवदेवतांच्या प्रार्थना, स्तोत्रे आणि संकीर्तने त्यांनी संस्कृतात रचल्या. स्वामींनी बावन्न ओळींची दत्त स्तुती रचली... तेच *दत्तबावनी स्तोत्र समस्त मानव जातीस संकटविमोचन स्तोत्र म्हणून फलदायी ठरले आहे.
 
अशा या पवित्र भूमीत पाऊल ठेवताना मन उचंबळून आले. दुपारी बारा वाजता मंदिर बंद झाले होते. बाजूच्या भोजनगृहात अन्नप्रसादीची व्यवस्था सुरू झाली होती. आमटी-भात, बटाटा-वांग्याची भाजी, शिरा अशी सुग्रास भोजनप्रसादी होती. भोजनगृहाला चारही बाजूने लोखंडी जाळ्या लावल्या होत्या. चौकशी करता कळले, या परिसरात माकडांचा खूपच सुळसुळाट आहे. आल्या आल्या, 'बॅगा आणि सायकलवरील सर्व वस्तू सांभाळा' ह्या सूचना मिळाल्या.

अडीच वाजता रंगावधुत स्वामींचे मंदिर उघडणार होते. हे त्यामुळे बाहेरील व्हरांड्यात थोडावेळ पथारी मांडली.

मंदिराचे प्रवेशद्वार मोराच्या सप्तरंगी पिसाऱ्याच्या कलाकृतीने बनविले होते. श्री रंगावधुत स्वामींच्या मंदिरात प्रवेश केला. शांतता हे मंदिराचे मुख्य अंग होते. स्वामींची अतिशय प्रसन्न आणि हसतमुख मूर्ती मनाचा ठाव घेऊन गेली. श्री अवधूत दुःख क्लेशाचे विनोदात रूपांतर करतात. श्री अवधुतांचे मौन हेच उत्तम प्रवचन आहे. "परस्पर देवो भव" हे स्वामीजींचे ब्रीद आहे. काही काळ मंदिरात ध्यानमग्न झालो.

खरं तर या आश्रमात थांबून मंदिराची महती समजून घ्यावी, येथील स्पंदनांची अनुभूती घ्यावी आणि  श्री स्वामीजींच्या चरणी लीन व्हावे ही इच्छा होती. परंतु आजचा मुक्काम अनसूया मातेच्या मंदिरात होता त्यामुळे पुढे प्रस्थान केले. येथुन अनसूया मातेचे मंदिर साधारण ४५ किमी अंतरावर होते.

दिड तासात सेगवा चौकडी येथे पोहोचलो. दुपार असल्यामुळे सायकलचा वेग कमी झाला होता. हायड्रेशन ब्रेक घेतला. रस्ता छोटा असला तरी रहदारी कमी होती. बारा किमी अंतर अजून जायचे होते
पुढचा रस्ता ऑफ रोडिंग होता वाटेत कॅनॉल लागत होते त्यामुळे तेथेच गोल गोल फिरतो आहे असेच भासत होते. मॅप रीडिंगचे काम संजय उत्कृष्ट पद्धतीने करत होता.
पावणे सहाच्या दरम्यात अंजाली गावातील अनसूया मातेच्या मंदिरात पोहोचलो.

मातेची आरती सुरू होती. दत्त दिगंबरांची आई महासती अनसूया माता... भव्य मंदिर आणि सुंदर परिसर...

बाजूच्या धर्मशाळेत अगोदरच दहा-बारा पारिक्रमावासी आले होते. एक माताजी जोरजोरात फोनवर कोणाशी तरी वाद घालत होत्या. माताजींना हात जोडले... इतक्यात बाजूला असलेल्या दुकानदाराने आम्हास बोलावले. दोघांना  बिस्कीटचे पुडे तसेच फरसाण पाकिटे बालभोग म्हणून दिली. मातेच्या एका भक्ताने मोठा मोदक आणि दहा रुपये दिले. या परिक्रमेत नव्या नव्या अनुभवांची शिदोरी गाठीला येत होती.

नर्मदा मातेची पूजा झाल्यावर मंदिराचे पुजारी श्री अमित जोशींनी भोजनप्रसादीसाठी भोजनगृहात बोलावले.

भोजनानंतर अमित गुरुजींनी महासती  अनसूया मातेची महती कथन केली.

गुरुजी म्हणाले,  "परिक्रमेत येणाऱ्या साधकाने प्रत्येक स्थळाचे  महत्व समजून घ्यावे, तेथील देवदेवतांचे  दर्शन करावे, त्या तपोभूमीची स्पंदने अनुभवावी, साधुसंतांच्या सहवासाचा लाभ घ्यावा; तसेच आलेले अनुभव, मिळालेले ज्ञान सर्वांना वाटावे;  तेव्हाच सर्वार्थाने परिक्रमा पूर्णत्वाला जाते. जेव्हा अशा प्रकारे पारिक्रमा पूर्णत्वाला जाते तेव्हा सर्व अनुभूतींचा साक्षात्कार तेथेच होईल."

त्यानंतर परिक्रमेबाबत बरीच मंडळी आपला सल्ला घ्यायला येतील. त्यांना योग्य मार्गदर्शन हा परिक्रमेचाच एक भाग आहे. अमित गुरुजींनी परिक्रमेबाबत केलेले विश्लेषण मनाला एकदम पटले.

     अंजाली हे स्थान अनसूया मातेची तपोस्थळी आहे.  तर मूळ स्थान उत्तरप्रदेशातील मंदाकिनी नदी किनारी चित्रकूट आहे. आई देवहूती माँ आणि पिता कर्दम ऋषी होय. अनसूया मातेचा विवाह अत्री ऋषी बरोबर झाला. अत्रिऋषी सप्तर्षी मधील एक होय. ते भूत, भविष्य आणि वर्तमान यांचे ज्ञानी होते. माता अनसूयेने देवप्रजा निर्माण करण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प पूर्ण करण्यासठी अत्री मुनींनी ध्यान लावले. तेव्हा  नर्मदा मैयेच्या उत्तर तटावरील अंजली ह्या स्थानाचा दृष्टांत झाला. समोर असलेल्या दरीला एरंडी खाई म्हणतात. या स्थानला एरंडी संगम म्हणतात. या संगमावर स्नान केले असता सर्व कातडीचे रोग नष्ट होतात.  येथे सती अनसूयेने तपश्चर्या सुरु केली. हे तप करताना मातेचे दोन नियम होते. एक पतिव्रत आणि दुसरे अतिथी सन्मान होय.

थंडीत ओल्या वस्त्रनिशी... पावसात उघड्यावर भर पावसात.... उन्हात अग्निवलयात... तप साधना करणे ही तर  अतिशय कठोर आणि उग्र तपश्चर्या होती.  तसेच दारात आलेल्या साधुसंत मुनिवर यांना भोजनादी देणे आणि पतिसेवेत तत्पर असणे.

अशा अहोरात्र आणि वर्षानुवर्षे केलेल्या साधनेमुळे या तपाचा ताप स्वर्गलोकांपर्यंत पोहोचला. इंद्रासन डोलू लागले. नारदाने सांगितले देवराज आपल्या आसनाला बिलकुल धोका नाही.

हीच गोष्ट नारदाने पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना सांगितली. भूलोकावर तपसाधनेस बसलेल्या  अनसूया मातेमूळे देवलोकामध्ये ताप उत्पन्न झाला आहे.  या घटनेमूळे तीनही शक्तीमध्ये ईर्षा उत्पन्न झाली.  तीनही देवतांनी आपल्या पतींना अनसूया मातेचे तप भंग करण्यास सांगितले. ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी समजूत काढून सुद्धा तीन देवता  ऐकेनात.

त्रिदेव साधूंच्या वेशात अनसूया मातेच्या आश्रमात भिक्षा मागू लागले. पण ही भिक्षा मातेने विवस्त्र होऊन द्यावी अशी अट घातली. अनसूया मातेने तपोबालाने  ओळखले हे तीनही साधू सृष्टीचे पालनकर्ता आहेत. मातेने हातात जल घेऊन संकल्प केला,' जर  मी मन, वाचा आणि कर्माने पतिव्रत सेवा केली असले आणि अतिथी सन्मान केला असेल तर दारात साधूरुपात आलेले सृष्टीचे रचयिता त्रिदेव एकाच स्वरुपात तीन बालक बनतील.  त्या साधूंवर  जल शिंपडताच तीनही देव एकाच रूपाचे तीन बालक झाले, जेणे करून त्यांची भिक्षेची इच्छा मातेला पूर्ण करता आली.

ही तीळी सारखीच दिसणारी बालके तब्बल सहा महिने अनसूया मातेचे स्तनपान करीत होते. विशेष म्हणजे ब्रम्हा विष्णू महेश यांना माता नाही.     परब्रम्ह ओंकारातून शंकराचा जन्म झाला. महेशच्या हृदयातून महाविष्णू अवतीर्ण झाले. तर विष्णूच्या नाभीमधून ब्रह्माचा उदय झाला. हे त्रिदेव अजन्मा आहेत. परंतु अनसूया मैयेच्या तपोबलामुळे त्यांना विवश होऊन बालक स्वरूपात मैयेच्या मातृकृपाछत्राखाली रहावे लागले. अशा रितीने ह्या तीनही देवांची मातेच्या ममत्वाची इच्छा सुद्धा पूर्ण झाली होती.

आता तीनही आदिशक्ती पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना संकट पडले. आपले पती अजून का येत नाहीत त्या बद्दल....

तीनही देवता अनसूया मातेकडे येऊन आपल्या पतींची चौकशी करू लागल्या. माता म्हणाली गेल्या सहा महिन्यांपासून तुमचे पती बालक रुपात माझ्याकडे आहेत. तुमच्या पतींना ओळखून घेऊन जा !  हुबेहूब सारखीच दिसणारी तीन बालके पाहून तीनही देवता अचंबित झाल्या. यातील आपला पती कोण हे ओळखू शकल्या नाहीत. त्यांचे गर्वहरण झाले आणि त्या अनसूया मातेला शरण गेल्या.

आम्ही तुमची परीक्षा घ्यायला पतीदेवांना पाठविले परंतु आमचीच परीक्षा झाली. आम्हाला क्षमा करा.  आमच्या पतींना आपण पुत्र बनविलेत, त्यामुळे आम्ही तुमच्या सुना आहोत. त्यामुळे तुम्हीच आमचे पती द्यावेत. येथे अनसूया मातेचा देवप्रजा निर्मिती करण्याचा संकल्प पूर्ण झाला. तीनही देवांवर संकल्प जल शिंपडताच, ब्रम्हा, विष्णू, महेश आपल्या मूळ रुपात प्रकट झाले. तीनही आदिशक्तींनी अनसूया मातेला महासतीचे वरदान दिले तर तीनही देवांनी अनसूया मातेला आपला सदैव सहवास राहील असा वर दिला.

तीनही देवांमधून  दिव्य तेज प्रकट झाले. ब्रम्हाजीच्या तेजातून चंद्रमा, विष्णुजींच्या तेजातून श्री दत्तात्रय आणि महेशांच्या तेजातून दुर्वास ऋषींचा जन्म झाला आणि हे तीनही देव अनसुया मातेसह बालस्वरूपात येथे विराजमान आहेत. भक्तांनी सद्भावनेने अनसूया मैय्याकडे व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्याचे काम सृष्टीचे रचयिता त्रिदेव पूर्णत्वाला नेतात.  इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा अनसूया मातेचे दर्शन घेऊन भक्तगण तिचे आशीर्वाद  प्राप्त करतात.

महासती अनसूया मातेची महती तीनही देवांच्या दिव्यत्वाची अनुभूती आणि नर्मदा मैयेची प्रचिती असा त्रिवेणी संगम स्थानाच्या सहवासाचे परमभाग्य आमच्या पदरी आले.

काय हवे असते माणसाचे जीवन जगण्याला !!!

नारेश्वरचे श्री रंगावधुत स्वामी मंदिर, मातृस्मृतीशैल मातृमंदिर आणि अंजलीचे महासती अनसूया माता मंदिर ही पवित्र स्थाने सांसारिक जीवनाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेली.

सतीश जाधव
मुक्त पाखरे.....

Thursday, May 13, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस अकरावा) विमलेश्वर (रत्नसागर) ते भरुच०८.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस अकरावा)
  विमलेश्वर  (रत्नसागर) ते भरुच

०८.०१.२०२१

विमलेश्वर तिर्थधाम... याला मैय्येचे चरण स्थल म्हणतात... रावणाने येथे घोर तपश्चर्या केली होती. दक्षिण तटावरील शेवटचे आणि अतिशय महत्वाचे आध्यत्मिक स्थळ... मनात एक अनामिक हुरहूर होती. हे समुद्र (रत्नसागर) आणि नर्मदा मैया यांच्या संगमाचे हे पवित्र ठिकाण आहे.

कोणत्याही नदीचा जेव्हा सागराशी संगम होतो तेव्हा सागर नदीच्या पात्रात घुसून खाडी प्रदेश तयार होतो. येथे नदीचे पाणी खारट होते. येथील नर्मदा मैया आणि सागर संगमा मध्ये वेगळी गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे नर्मदा मैय्या सागरात जवळपास २४ किमी आता घुसली आहे. त्यामुळे नर्मदा पारिक्रमेचा हा टप्पा  पार करताना नावाडी बाजूच्या खाडीतून थेट समुद्रात खोलपर्यंत नाव घेऊन जातो...एका रोमांचकारी अनुभवला आम्ही सामोरे जाणार होतो.

आजची नावेतील पारिक्रमा दक्षिण तटावरील विमलेश्वर ते उत्तर तटावरील मिठी तलाई अशी होती.

पहाटे दोन वाजल्या पासून वर्दळ सुरू झाली. पहाटे उठून सर्व तयारी झाली. विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक मूर्तिकडे खाली अंथरायला कॅरीमॅट होते. पहाटे शाळीग्राम महाराजांकडून  बालभोग चहासुद्धा मिळाला. गेली सात वर्षे शाळीग्राम महाराज नर्मदा पारिक्रमावासीयांची मनोभावे सेवा करीत आहेत. मैयेची पूजा करून पहाटे  पाच वाजता जय्यत तयारीनिशी खाडी ताटाकडे जायला सज्ज झालो. बसने, मोटरसायकलने आणि पायी परिक्रमा करणारे सर्व जत्थे;  नर्मदे हर... ओम नमः शिवाय... जय सियाराम... जयघोष करीत खाडीकडे प्रस्थान करू लागले. सायकल बोटीच्या वर टाकून, तिची सुद्धा नर्मदा पारिक्रमा घडणार होती.

खाडी किनारी प्रचंड जनसागर लोटला होता... सागराचा एक पाट त्या खाडीत आला होता. अजून भरती सुरू न झाल्यामुळे त्या पाटात सागराचे पाणी आले नव्हते... वातावरणात गारवा होता. संजय आलेल्या पारिक्रमावासीयांशी चर्चा करण्यात मग्न झाला. बसने आलेल्या पारिक्रमावासीयांमध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणात होता.

त्यांचे सामूहिक भजन सुरू होते. भक्तिमय वातावरणाने आसमंत भरून गेला होता. सागर किनारचा सूर्योदय अनुभवत होतो.  आजचा सूर्य चंद्रासारखा पांढराफेक दिसत होता. त्याची आसमंतात  पसरलेली सुवर्णप्रभा म्हणजे नेत्रसुखाचा परमावधी होता. बरेच परिक्रमावासी कुतूहलाने आमची सुद्धा विचारपूस करीत होते. आठ वाजता खाडीचे पाणी वाढायला लागले. त्या बरोबर एक-एक नाव किनाऱ्यावर येऊ लागली.

एकूण पाच नाव आल्या. दोन छप्परवाल्या आणि तीन उघड्या होत्या. नावाड्याने अतिशय दाटीवाटीने सर्व पारिक्रमावासींना अक्षरशः कोंबले. सायकल छप्परवाल्या नावेच्या टपावर बांधल्या.

पाच नावेमध्ये साधारण चारशे मूर्ती असाव्यात... नर्मदा मैय्येवर असलेल्या गाढ श्रद्धेमुळे हा खडतर प्रवास अतिशय आनंदात आणि प्रचंड ऊर्जेत सुरू झाला. सकाळी समुद्राकडून वारे वाहत होते. विशेष म्हणजे नावेत जागा नसल्यामुळे माझी टपावर बसण्याची सोय झाली होती.

चारही बाजूला वर्तुळाकार क्षितिज पसरले होते. एका बाजूला कांदळवनाचे अर्धवर्तुळाकार जंगल तर दुसऱ्या बाजूला खाडी आणि समुद्राचे अर्ध वर्तुळाकार क्षितिज; पृथ्वीची गोलाई दाखवत होता.   बोचरे वारे अंगावर घेत नावेतून सफर सुरू झाली. प्रत्येक नावेतून "नर्मदे हर" चा जयघोष सुरू होता. समुद्राच्या भरतीमुळे नाव बरेच हेलकावे खात होती. तासाभराच्या नावेतील सफरी नंतर खाली बसलेले सदस्य टपावर येण्यासाठी चुळबुळ करू लागले. परंतु नावाडी सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही टपावर सोडत नव्हता. फोटो काढण्याच्या निमित्ताने संजय हळूच वर आला. हवेशीर टपावर चणे, शेंगदाणे आणि चिक्की खाणे म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद होता.

तट परिवर्तन करताना सर्व जबाबदारी नावड्याची असते. आपली जीवन नैय्या सुखरूप पार करण्यासाठी नावाड्याला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. काही पारिक्रमावासी कपड्यांच्या भेटवस्तू कोणी रोख रक्कम, तर जे गृपमध्ये आले होते ती मंडळी एकत्रीत भेटवस्तू देत होते.

भर समुद्रात बोट गेल्यावर; समोर एक टापू दिसतो. त्या टापूजवळ नावेने  उजव्या बाजूला वळण घेतले आणि मिठीतलाई किनाऱ्यावर जाऊ लागली.

जवळपास चार तास ही नावेतील रोमांचकारी सफर सुरू होती. मिठीतलाई किनाऱ्यावर उतरून सर्वांनी "नर्मदे हर" चा जोरदार जयघोष केला. सायकल ताब्यात घेऊन पुढची सफर सुरू झाली.

आसपासचा परिसर गुजरात मधील दहेजचा इंडस्ट्रियल पट्टा होता. उन्हे वाढली होती. भूकपण लागली होती. चार किमी अंतरावरील भांगेरा येथील चंद्रमौलेश्वर महादेव मंदिराच्या कृष्णानंद आश्रमात पोहोचलो. तेथील बाबाजी म्हणाले, येथे सदाव्रत मिळेल.  कोणताही आडोसा किंवा घर नसल्यामुळे पुढे जायचे ठरले. रिलायन्स नोसिल कंपनीच्या समोर असलेल्या एका टपरीवर भोजनप्रसादी म्हणून केळी खाल्ली. तेथून पुढील पारिक्रमा सुरू झाली.

हायवेला येऊन भर उन्हात सायकलिंग सुरू झाले. दहा किमी पुढे गेल्यावर पाठपिशवी  केळ्याच्या टपरीवर राहिल्याचे लक्षात आले. संजयला तेथेच थांबवून ऑटोरिक्षा करून नोसिल जवळील टपरीवर गेलो. केळीवाल्या पंडितजींनी पाठपिशवी सांभाळून ठेवली होती. किंबहुना माझ्या पिशवीतील पारिक्रमा वहीवर असलेल्या मोबाईलवर बरेच फोन सुद्धा केले होते. पण फोन लागला नाही. केळीवाल्याचे पोटभर आभार मानून तसेच मागे फिरलो. यामुळे एक गोष्ट लक्षात आली. आपल्या प्रत्येक बॅगेत दोघा-तिघांच्या फोन नंबरचे कागद ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

भोजनप्रसादीची वेळ टाळून गेली होती. जवळच चहाच्या टपरीवर कुरमुरे आणि चहा घेतला. येथून भरुच ५० किमी अंतरावर होते.  अंधार पडायच्या आत भरुच गाठायचे होते. हायवेवरील अतिशय हेवी ट्राफिक आणि हेडविंड अंगावर घेऊन भर उन्हात सायकल चालवणे ही परीक्षाच होती.

सपाट रस्त्यावर लो गियर ठेऊन सुद्धा पेडलिंग करणे जिकरीचे झाले होते. दीड तासात जेमतेम वीस किमी सफर झाली. भेेेलसली  गावात एका छोट्या टपरीवर हायड्रेशन ब्रेक घेतला. ब्रेड पकोडे भजी सोबत चटकदार मिरची आणि चहा घेऊन पुढे प्रस्थान केले.

तासाभरात भरुच उपनगर भागात पोहोचलो. भरुच बांबखाना येथील कोळीवाड्यात गुलाबभाई यांनी थांबविले. त्यांच्या मारुती गाडीच्या मागे माँ नर्मदा लिहिलेले होते. हायवेला रस्त्यात गाडी उभी करून आमच्या पुढ्यात हात जोडून गुलाबभाई उभा राहिला. तुमच्या रूपाने आमच्या दारी नर्मदा मैय्या आली आहे. तेव्हा तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या. सायंकाळ झाली आहे, आज  चहापान भोजनप्रसादी घेऊन येथेच रहा, असे त्याने विनवले.

पुढे दहा किमी अंतरावरील भरुच मधील प्रसिद्ध निलकंठेश्वर  महादेव मंदिरात आज विश्राम करणार होतो. त्यामुळे गुलाबभाई यांच्या घरात चहा बिस्कीट घेतली. गुलाबभाई आणि त्याचा मोठाभाऊ नर्मदा प्रकल्पग्रस्त बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांच्या समवेत काम करतात.

त्यांच्यासह फोटो काढले आणि आभार मानून पुढची सफर भरुच शहरातून सुरू झाली.

भरुचचे शेंगदाणे जगप्रसिद्ध आहेत.   सायंकाळ झाल्यामुळे रस्त्यावर रहदारी वाढली होती. भरुच शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या निळकंठ महादेव मंदिरात पोहोचायला सायंकाळचे सात वाजले.

त्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. बाजूच्या दुकानात चौकशी करता. पारिक्रमावासीयांना साडेसहा पर्यंत आत प्रवेश देतात;  हे समजले. बराच वेळ थांबल्यावर एक बाबाजी आले त्यांनी आम्हाला मंदिरात प्रवेश दिला. ताबडतोब भोजनप्रसादी घेण्याची विनंती केली.

आज बोटीची सफर आणि ६० किमी सायकलिंग असा मोठा पल्ला मारला होता. ताटात भोजनप्रसादी आणून मंदिराच्या एका बाजूला असलेल्या शेड जवळ झाकून ठेवला. जवळच असलेल्या न्हाणीघरात स्नानसंध्या आटपून मैयेची पूजा केली. त्या नंतर भोजनप्रसादी सेवन केली.

नर्मदे किनारी असलेल्या प्राचीन निळकंठ महादेवाचे सुंदर मंदिर, अतिशय विशाल प्रांगण आणि नितांत स्वच्छ परिसर पाहून सर्व शीण नाहीसा झाला. अंधार पडल्यामुळे सकाळी देवदर्शन करायचे ठरविले.

जेवणखाण आटपल्यावर मंदिराजवळच्या नर्मदा घाटावर जाऊन आम्ही निवांतपणे बसलो. चमचमणाऱ्या चांदण्यात नर्मदा मैय्येचे शांतपणे वाहणे मनावर गारुड करून गेले. त्या निरव शांततेशी साधलेला संवाद वेगळी अनुभूती देऊन गेला.


पहाटे चार वाजल्यापासून सुरू झालेला आजचा अतिशय महत्वाचा दिवस मैय्येच्या घाटावर येऊन विसावला होता....

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

Monday, April 26, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दहावा)अंकलेश्वर (रामकुंड आश्रम) ते विमलेश्वर (रत्नसागर) ०७.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दहावा)
अंकलेश्वर (रामकुंड आश्रम) ते विमलेश्वर (रत्नसागर)

०७.०१.२०२१

सकाळी अंकलेश्वर रामकुंड आश्रमातून प्रस्थान केले.  सव्वा तासात महर्षी काश्यप मुनींच्या तपोभूमीमध्ये आम्ही प्रवेश केला होता. भुरुडी-हजात गावाच्या पावनस्थळी "बलबला कुंड" हे जागृत स्थान आहे.

या आश्रमात निलकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील लिंगाला गोंडयांच्या फुलांनी अतिशय कलात्मक रीतीने सजविण्यात आले होते.

लिंगाभोवती नागदेवाची फणी पसरलेली... आणि त्यावर चांदीचे झुंबर... वातावरण भारावलेले होते... अतिशय स्वच्छ गाभारा... त्यासोबत "ओम नमः शिवाय" ची धून मनात आध्यत्मिक तरंग निर्माण करीत होते...

येथील बलबला कुंड अतिशय प्राचीन आहे. नर्मदे हर असा जयघोष करताच या कुंडातील पाण्यातून मोठया प्रमाणावर बुडबुडे पृष्ठभागावर येऊ लागले. जणूकाही उकळत्या पाण्यातून बुडबुडे यावेत तसे... या बुडबुड्यांमुळेच या कुंडाचे नाव बलबला कुंड पडले आहे.
याचे पाणी खारट आणि शीतल आहे. काश्यप ऋषींच्या तपसाधनेमुळे पावन झालेल्या या भूमीमध्ये त्याच्या तापाची ऊर्जा  जाणवते. त्या उर्जेलाच बरोबर घेऊन परिक्रमा करायची आहे. निळ्याशार आकाशाखाली हिरव्यागार पाण्यात पाय टाकून ध्यानस्थ बसलो. थंड आणि खारे पाणी त्यात नर्मदा मैयेचा सहवास... बुडबुड्याच्या या नैसर्गिक चमत्काराने जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन सापडला.

जीवन एक बुडबुड्या सारख आहे... हा बुडबुडा फुटण्या अगोदर जीवनाच्या भवसागराला पार करण्यासाठी अहंभाव, 'मीपणा' या कुंडात विसर्जित करा असा संदेश हे बलबला कुंड देते आहे... याची अनुभूती झाली..

हंसोट येथील सूर्यकुंड जवळ पोहोचलो. अतिशय शांत वातावरण...

सूर्यकुंडाच्या समोरच हंसेश्वर महादेवाचे मंदिर आहे... येथे महर्षी जबालि मुनींनी तपस्या केली होती. जबालिपुरम आणि आता जबलपूर हे शहराचे नाव जबालि मुनींशी जोडलेले आहे. नर्मदेच्या किनारी त्यांनी कित्येक वर्षे तपस्या केली होती. प्रकांड पंडित आणि चारही वेदांचे ज्ञान असलेले जबालि ऋषी नर्मदेचे निस्सीम भक्त होते.

हंसोट गावात आलो... येथे " मेथीना गोटा" अतिशय प्रसिद्ध आहे.

  थाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या भजी आल्या... सोबत आंबट गोड चटणी आली... बालभोग मनसोक्त झाला... सोबत चहा होताच... पुढच्या प्रवासासाठी  ऊर्जा भरून घेतली.

वाटेत अब्दुल वाडीवाला याची भेट झाली.  चहा पाजून अब्दूलभाई  सर्व परिक्रमावासीयांची सेवा करतात.

संत तुलसीदासजींचे दोहे त्यांना अवगत होत  "दया धरम का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये जब तक घट में प्राण" परोपकार हेच अब्दुलच्या जीवनाचे ब्रीद आहे.

वाटेत ऊसाची एक वेगळ्या जातीची शेती पाहायला मिळाली. या ऊसाच्या जातीला येथे 'दुक्कड' म्हणतात.

या उसाच्या डोक्यावर आलेले तुरे राजाच्या मुकुटासारखे भासत होते.  भरीव ऊसाचे खोड अतिशय कडक परंतु एकदम रसदार असते. हे कापायला कठीण असते. कारखान्यात याला चांगला भाव मिळतो.

पुढे दंतराई गावातील हनुमान टेकडी मंदिरात पोहोचलो. हनुमान मंदिर देवालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापित आहे.

   मारुतीरायचे दर्शन घेतले... त्यानंतर शनिदेवाच्या पायी नतमस्तक झालो... येथे नवग्रहांचे मंदिर सुद्धा होते. केेतू सोडला तर सर्व नवग्रह उग्र दृष्टीचे आहेत. केतूचे फक्त धड आहे.  मुंडके नसल्यामुळे त्याची उग्रता समजत नाही. सुंदर परिसर ... बरेच नर्मदा परिक्रमावासी येथे विश्रांती घेत होते.
 मोठया वडाच्या झाडाशेजारीच रामसेवक बाबाजींची कुटी होती. बाबाजींनी प्रथम चहा  आणि नंतर भोजनप्रसादी दिली. बाबाजी येथेच राहण्याचा आग्रह करीत होते. दुपारचे बारा वाजले असल्याने विमलेश्वर पर्यंत पोहोचण्याचे  लक्ष होते.

दोन तासात कठपोर येथील कोटेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो. कोटेश्वर महादेव मंदिरातील लिंग, वरच्या बाजूला शंकूकृती आहे.

येथेच कोटीतीर्थ आहे. या कोटीतीर्थ कुंडाच्या मधोमध छोटेसे शिवलिंग मंदिर स्थापित आहे. या कुंडात सहस्त्र तीर्थांचे जल समाविष्ट आहे.
रत्नसागराकडे जाणारा प्रत्येक परिक्रमवासी या कुंडाचे दर्शन घेतो.  कुंडाच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण नारळाच्या झाडांमुळे रत्नसागर (समुद्र) जवळ आल्याची चाहूल लागली होती. या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम मोठया प्रमाणावर चालू होते. बरेच परिक्रमवासी येथे विश्राम करत होते.

अर्ध्या तासात विमलेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो.

येथूनच पुढे बोटीरून प्रवास करून रत्नसागर पार करायचा होता. पावणे चार वाजले होते. विमलेश्वर मंदिर परिसरात परिक्रमावासीयांची खूप गर्दी होती. बसने, मोटरसायकलने, पायी आणि सायकलने प्रतिक्रमा करणारे (आम्ही दोघे) सर्वजण एका ठिकाणी जमा झालो होतो... सायकल व्यवस्थित बांधून; हॉलच्या एका कोपऱ्यात बस्तान टाकले. काही वयस्क मंडळींची मुलाखत घेण्याचे काम संजय करत होता... उद्या समुद्र पार करणार म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह विलसत होता.

मंदिर परिसर प्रशस्त होता. नर्मदा परिक्रमेमधील दक्षिण तटावरचे हे शेवटचे आणि महत्वाचे देवस्थान आहे. त्यामुळे रत्नसागर पार करण्यासाठी प्रत्येक परिक्रमवासी विमलेश्वर महादेवाच्या चरणी येतो.

देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले ते स्थळ नर्मदा मैय्या आणि सागर यांच्या संगमाचे आहे. तेथेच समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली होती. म्हणूनच या संगम स्थळाला रत्नसागर म्हणतात. 

केवट रामजीभाई सायंकाळी लॉन्च बुकिंगसाठी आले.  जे पायी किंवा सायकलने परिक्रमा करणारे आहेत त्यांच्या कडून १५० रुपये तर बस अथवा मोटारसायकल परिक्रमावासींसाठी २५० रुपये तिकीट होते. सायकलचे भाडे म्हणून प्रत्येकी एक तिकिटाचे पैसे घेतले.

मोटार सायकल पारिक्रमावासींसाठी उत्तर तटावर गाडी पोहोचविण्याची व्यवस्था होती. 

सायंकाळपर्यंत विमलेश्वर मंदिरात खूपच गर्दी झाली होती. दोन मोठ्या बस मधून जवळपास शंभर यात्रेकरू आले होते. धर्मशाळेच्या प्रांगणात पथाऱ्या मांडल्या गेल्या. गाडीवाल्या परिक्रमवासीं बरोबर जेवण बनविणारी मंडळी सुद्धा होती. बाकी पायी पारिक्रमावासींसाठी देवस्थानातर्फे भोजनप्रसादीची व्यवस्था होती.
स्नानसंध्या आटपून, मैयेची यथासांग पूजा केली. सोबत आणलेला प्रसाद मंदिरातील सर्व यात्रेकरूंना वाटला. विशेष म्हणजे सर्वांना देऊन प्रसाद उरला होता. मंदिराच्या पुजारींना प्रसाद देऊन त्याची सांगता केली. मैंय्येचा महिमा खरच अगाध आहे... कोणाला काहीच कमी पडत नाही...

भोजन प्रसादी घेऊन अंमळ लवकरच झोपी गेलो. पहाटे खाडीचा दक्षिण किनारा गाठायचा होता.

ओंकारेश्वरवरून सुरू केलेल्या रत्नसागरपर्यंतच्या परिक्रमेची  सांगता उद्या होणार होती. एकूण जवळपास ५०० किमी पारिक्रमा परिपूर्ण झाली होती.

नर्मदा मैयेला उजव्या हाताला ठेऊन केलेली दक्षिण ताटावरची एक स्वप्नवत सफर  पूर्णत्वाला गेली होती...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...