Monday, February 22, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सहावा) तोरणमाळ ते प्रकाशा

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सहावा)  तोरणमाळ ते प्रकाशा
०३.०१.२०२१

सकाळी पाच वाजता जाग आली. बाजूला असलेल्या बाबाजींच्या घंटा नादाने मन एकदम प्रसन्न झाले. त्यांची पूजा सुरू होती. थोडावेळ मेडिटेशन केले आणि बाजूच्या नर्मदा तलावावर आंघोळ करायला गेलो. 
पहाटेच्या वेळी नर्मदा तलावाचे वेगळे रूप पहायला मिळाले. सकाळच्या थंड वाऱ्याच्या झुळकीवर तलावात उठणाऱ्या लहरी... मनातील विचारांचे तरंग शांत करीत होते. खूप वेळ अनिमिष नजरेने नुसत्या लहरणाऱ्या लाटांकडे पाहत होतो.

आन्हिके आटपून... बरोबर असलेल्या नर्मदा मैयेची पूजा करून... गुरू गोरखनाथ बाबांच्या  मंदिरात गेलो. बाबांसह मंदिरातील दोन शिवलिंगाचे दर्शन घेतले. तेथील महंत संजूनाथ बाबांनी बालभोग दिला. त्यांचे आशीर्वाद घेऊन तोरणमाळ वरून प्रस्थान केले.

मच्छिन्नद्रनाथ गुंफा तोरणमाळ पासून साडेतीन किमी अंतरावर आहे. अपहील आणि ऑफ रोडिंग रस्ता होता. एका ठिकाणी रस्ता संपला. सायकल तेथेच ठेऊन, पायऱ्या उतरत उतरत गुंफेत जावे लागले. गुंफेजवळ केसरी पताका लावल्या होत्या. तसेच गुंफेचा आतील भाग शेंदुराने रंगविलेला होता. गुहेच्या आतमध्ये जवळपास शंभर पावले चालत जावे लागले. काही ठिकाणी खूप खाली वाकून पुढे जावे लागले. समोरील एक चौथऱ्यावर गुरू मच्छिन्नद्रनाथांची मूर्ती विराजमान होती. त्यांच्या मागे कपारीतून पाणी ठिबकत होते.
 विशेष म्हणजे गुंफेतील वातावरण अतिशय ऊबदार होते. तसेच या गुंफेत मोबाईल नेटवर्क एकदम झकास होते. जवळपास कुठेही टॉवर नव्हता. तसेच निबिड जंगलात डोंगराच्या कपारीत ही गुंफा होती. मग एव्हढे स्ट्रॉंग नेटवर्क कसे... अंतराळातील एकवटलेल्या रेडिओ लहरींचे ज्ञान आपल्या ऋषी मुनींना होते...  याची प्रचिती आली. आपले ऋषी वैज्ञानिक सुद्धा असावेत. असाच प्रत्यय समर्थ रामदास स्वामींच्या शिवथरघळ येथे आला होता. थोडा वेळ या गुंफेत ध्यानस्थ बसलो... येथून मित्र, आप्तस्वकीयांना फोन लावले...तसेच फोटो सुद्धा शेअर केले. तोरणमाळला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही गुंफा जरूर पहावी.
 
शहादाकडे सायकलिंग सुरू झाले. नंदुरबारच्या माईलस्टोन  बोर्डाजवळ जेम्स बॉण्डच्या अविर्भावात संजयचा फोटो काढला.
पुढे तोरणमाळच्या वेशीवर नागार्जुन देवाचे मंदिर लागले. ही देवता संन्यास, वैराग्य, तत्वज्ञान आणि धर्म विचारांचा आशय सांगणारी आहे. येथील मूर्ती ११ व्या शतकातील यादवकालीन आहेत. 
तोरणमाळ घाट उतरायला सुरुवात केली. रस्त्याच्या वळणावर एक साप मरून पडलेला आढळला. गाड्यांच्या चाकाखाली त्याच्या चिंधड्या झाल्या असत्या... सायकल थांबवून त्या मृत सर्पाला बाजूच्या झाडीत अलगद नेऊन ठेवला.

 पुढे निसर्ग पर्यटन केंद्र लागले...अतिशय सुंदर  व्हिव पॉईंट होता. जळगाव वरून आलेले पर्यटक येथे भेटले. आम्ही सायकल वरून नर्मदा परिक्रमा करतोय, याचं त्यांना खूप अप्रूप वाटलं. त्यांनी परिक्रमेबाबत माहिती घेतली, तसेचआवर्जून आमच्या सोबत फोटो काढले. असे भेटणाऱ्या आणि अनभिज्ञ असणाऱ्या मंडळींच्या मनात नर्मदा परिक्रमेबाबत आस्था निर्माण करणे, हा सुद्धा उपयुक्त उपक्रम आहे हे जाणवले.
 
लेघापाणी गावाजवळ औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र लागले.गावातील मुले सायकल पाहण्यासाठी अवतीभोवती जमा झाली. सोबत असलेली चॉकलेट त्यांना दिली. गियरवाल्या सायकल बद्दल त्यांच्या मनात खुपच कुतूहल होते. एक-एक करून सर्वांना सायकल वर बसविले. त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद... खूप काही सांगून गेला...

वाटेत काही मुले डोंगराचा रानमेवा... बोरे घेऊन बसली होती. आम्ही पण लहान झालो. संजय तर त्या मुलांच्या बाजूला मांडी घालून बसला. दोघांनी  बसून  मनसोक्त बोरे खाल्ली आणि पाठपिशवीत सुद्धा भरून घेतली. त्या मुलांनी फक्त वीस रुपये घेतले. परंतु पुढे आल्यावर आम्हा दोघांनाही काहीतरी चुकल्यासारखे वाटले. वीस रुपयात एक वाडगाभर बोरे घेण्याऐवजी जवळपास सर्व बोरे आम्ही पिशवीत भरली होती. त्या लहान मुलांपेक्षा आम्ही छोटे झालो याची जाणीव झाली...

खरं तर आज आमचा फळे खाण्याचा फिस्ट दिवस होता... पुढे लकडकोट गावात रस्त्याजवळच्या एका शेतात ऊस तोडीचे काम सुरू होते. शेतात फतकल मारून ऊस तोडणीचे काम केले.  मालक संतोष महाडिक यांनी ऊसाचे मोठं कांड... काढून दिले. आता दातांची परीक्षा होती... आम्ही उत्तम मार्कने पास झालो होतो... खूप वर्षांनी दातांनी ऊस सोलाला होता.  शाळेजवळ येणाऱ्या गंडेरीवाल्याची आठवण झाली. नर्मदा मैय्या आम्हाला बालपणात घेऊन गेली होती.

म्हसावद गावाच्या सीमेजवळ पोहोचलो. अनिल सूर्यवंशी यांनी सहा एकर शेतामध्ये पपईची प्रचंड मोठी बाग तयार केली होती. त्यांचा धाकटा मुलगा चेतन सूर्यवंशी आमच्या बरोबर बागेत होता. बगीच्यातील झाडे पपईने लगडली होती. तीन पिवळ्या धम्मक पपई आमच्या पुढ्यात आल्या. तजेलदार आणि अतिशय सुमधुर पपई खातांना आम्ही तल्लीन झालो होतो. सूर्यवंशींचा मोठा मुलगा भूषण मुंबईतील वरळीच्या पोतदार रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेतोय, हे ऐकून आनंद झाला. मुंबईला गेल्यावर त्याला भेटण्याचे आश्वासन चेतनला दिले आणि पुढे प्रस्थान केले. 

दुपारचे दोन वाजून गेले होते. विविध फळे खाल्ल्यामुळे पोट तुडुंब भरले होते. एक बरं असतं... सायकलिंग करत असल्यामुळे खाल्लेले सर्व पदार्थ सहजपणे जिरून जातात.  सायकलिंग करताना, खाण्याची आवड... मनसोक्त जोपासता येते. 

तासभर सायकलिंग केल्यामुळे... भुकेने उचल खाल्ली होती. म्हसावद गावातील पंचकृष्ण हॉटेलवाल्याने पंचरंगी नास्ता दिला. भजी, फाफडा, गोड गाठया, जिलेबी चिवडा, कचोरी, मिसळ  या एकामागोमाग एक आलेल्या पदार्थांनी बहार आणली. उन्हाचा कडाका कमी होई पर्यंत बराच वेळ या हॉटेलमध्ये बसलो. येथून प्रकाशा चोवीस किमी आहे. नास्त्या सोबत गावकऱ्यांशी मस्त गप्पा सुद्धा मारता आल्या. 

महाराष्ट्र देशा, कणखर देशा सोबत सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचा उत्तर भाग पहात होतो. येथील काळया कसदार जमिनीत ऊस, कापूस, हरभरा,गहू या पिकांसोबत बराच भूप्रदेश हिरवळीने व्यापला होता. नंदुरबार जिल्हा तसा कमी पर्जन्यमानाचा प्रदेश आहे. परंतु ईरिगेशन प्रकल्प मोठ्या प्रमाणात येथे राबविल्यामुळे जमिनीत खरीप, रब्बी आणि जोड पिके सुद्धा घेण्यात येत आहेत.

वाटेत मेंढपाळ मेंढे, बकरे यांचा कळप घेऊन चालले होते. एक छोट्टस आणि गुबबूबीत कोकरू सायकल जवळ आलं... त्याला  मायेने उचलून घेतले...  त्याला प्रेमाची भाषा समजली... अलगद  कुशीत विसावलं... मायेची ऊब असीम आनंद देऊन गेली... आज नर्मदा मैय्या वेगवेगळ्या रूपाने आपले दर्शन देत होती..

आसमंतात तळपत्या सूर्याभोवती ढगांनी गर्दी केली होती. शेतात उगवलेल्या कापसाच्या बोण्डातून उडणारा कापूस सूर्याभोवती जमा झाला आहे याचाच भास झाला...संजयची राईड "नर्मदे हर" चा जप करत, दिमाखदारपणे सुरू होती. 

काथरडा खुर्द गावात शेताच्या बाजूला एका मचाणावर टोम्याटोची पिशवी घेऊन रामदास भाऊ बसले होते. आम्हाला पाहताच टोम्याटो खायला दिले. आज पोटात एव्हढी जागा कशी होत आहे याचं कोड पडलं होतं.  रामदासभाऊ आपल्या शेतातील ताजे टोम्याटो प्रत्येक परिक्रमावासीला देऊन त्याची सेवा करतात. संजय म्हणाला, 'आज नर्मदा मैय्या आमची मजा मजा करवते आहे'. 

प्रकाशा येथे केदारेश्वर महादेव मंदिरात सव्वा पाचला पोहोचलो. जवळच पुष्पदंतेश्वर मंदिर तसेच काशी विश्वेश्वर मंदिर आहे. श्री सद्गुरू दगाजी महाराज धर्मशाळेच्या मोठ्या हॉल मध्ये आमच्या विश्रामाची व्यवस्था झाली.

तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या प्रकाशाला दक्षिण काशी म्हणतात. येथे पुलिंदा, गोमाई आणि तापी नदी यांचा संगम झाला आहे. तेथेच संगमेश्वर महादेव मंदिर आहे.

आषाढ शुद्ध सप्तमीला  सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव नदीला साडी अर्पण करण्यात येऊन साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या या अनोख्या परंपरेत खान्देशासह गुजरात राज्यातील  शेकडो भाविक सहभागी होऊन तापी मातेचे पूजन  करतात.

 प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिराच्या सभामंडपात सूर्यकन्या तापी मातेची मूर्ती आहे.  संगमरवरी दगडातील  देवीच्या मूर्तीचे दर्शन करण्यासाठी आषाढ महिन्यातील  सप्तमीला येणारा तापी नदीचा जन्मोत्सव भाविकांसाठी पर्वणी ठरतो. तापी नदीची मूर्ती अन्य कोठेही नाही. चार भुजा, डोक्यावर मुकूट, एका हातात शंकराची पिंड, दुसऱ्या हातात डमरु अशी ही मूर्ती पूर्वाभिुमख आहे. 

 सायंकाळी जवळच्या तापी नदीत स्नानसंध्या आटपून नर्मदा मैयेची पूजा केली. संत श्री दगाजी महाराज आश्रमाकडून रात्रीच्या अन्नप्रसादीची व्यवस्था झाली. आश्रमाच्या धर्मशाळेत चार बस मधून जवळपास दोनशे परिक्रमावासी आले होते. 

 बाजूच्या श्री राम मंदिरात 'हरे कृष्णा, हरे राम' चा अखंड जप रात्रभर चालू होता. आता सर्व परिस्थितीशी जुळवून घेण्याची शक्ती नर्मदा मैयेच्या सहवासाने मिळत होती. फोन वरून सर्वांना खुशाली सांगून झोपेच्या अधीन झालो.

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

Monday, January 25, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस पाचवा) पिपरीकुंड ते तोरणमाळ

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस पाचवा)  पिपरीकुंड ते तोरणमाळ

०२.०१.२०२१

सकाळी मैयेची पूजा केली.   रेवसिंगला पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले. चहा बिस्कीट घेऊन रेवसिंग कुटुंबाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्याने काहीही पैसे घेतले नाहीत. अतिशय प्रेमाने सेवा देण्याची वृत्ती खरोखरच रेवसिंगकडून शिकावी. ही माणसं पाहिली की आपण किती छोट्या जगात जगतो आहोत याची अनुभूती झाली.

ग्रामीण जीवन किती सुंदर आहे याची जाणीव झाली... अतिशय कमी गरजा आहेत त्यांच्या...
खरोखरच रेवसिंगची आनंदी झोपडी खूप भावली...

डोंगराच्या आडून सुर्योदय झाला होता.  रस्ता दिसू लागला होता. पुढचा रस्ता ऑफ रोडिंग, दगड धोंड्यांचा आणि घाटीचा होता. काही ठिकाणी सायकल सामानासह ढकलावी लागली. रस्ता अतिशय निसरडा आणि धुळीचा होता. पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा अवघड अशी ही वाट...

सायकलिंगवाल्यांसाठी तर अतिशय बिकट होती. तीन किलो मीटरचा झरार गावाकडे नेणारा रस्ता... प्रचंड दमछाक करणारा होता. दम खात... थांबत... झरार गावात पोहोचलो. रस्त्यावर एकमेव दुकान होते. गावातली सर्व घरे वरच्या उंच टेकाडावर होती. सकाळीच... दोघेही घामाने थबथबलो होतो. 

रस्त्यावरील त्या एकमेव दुकानात चहा बनवायला सांगितले. 'हाऊ' दुकानातील बाबाजींचा होकार आला. अतिशय छोटेखानी घर, त्यात दुकान आणि गाईचा गोठा होता. चुलीजवळ काम करणाऱ्या मैय्येने चहा आणला.  काळया चहा सोबत बिस्कीटे खाल्ली. दुकानदाराने फक्त बिस्किटाचे पैसे घेतले. अतिशय कमी गरजांमध्ये ही माणसे गुजराण करीत असून सुद्धा प्रेमाने देण्याची दानत आणि सेवाभाव विशेष जाणवला.

झरार गावाचा अतिशय विहंगम परिसर... वातावरण आल्हाददायक आणि प्राणवायूने ओतप्रोत भरलेले...

येथेच मध्यप्रदेशचा वनरक्षक नाका आहे. पुढे दोन किमी वर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. तेथून सोळा किमीवर तोरणमाळ आहे. अजूनही खडकाळ रस्ता संपला नव्हता. मध्येच सायकल ढकलावी लागत होती. महाराष्ट्र चेकपोष्ट आले. कोणीही नव्हते तेथे.

महाराष्ट्रात शिरलो तरीही रस्त्याची स्थिती सुधारली नव्हती. आता तर अवघड चढ उतार होते. सामानासह सायकल चढविणे... एक-एक  गियरवर सुद्धा कठीण होते. काही ठिकाणी सायकल चढविताना गावकऱ्यांची मदत घ्यावी लागली.

तोरणमाळ पर्वतरांगांच्या  शिखरावर पोहोचलो... शिखराच्या वरच्या बाजूला एक बुरुजबंद भिंत लागली. म्हणून सायकल खाली ठेऊन टेकाड चढून गेलो. दगडी भिंतीच्या पुढे गुंफा लागली.

जालंधरनाथ महाराजांची गुंफा होती... तेथे आता बमबम लहरीनाथ बाबांचे वास्तव्य आहे.  अन्नधान्य आणण्यासाठी बाबाजी शहादा गावाच्या बाजारात गेले होते.

येथे नाथ संप्रदायाचे संत जालंधरनाथ यांनी  घोर तपस्या केली होती. आता परिक्रमावासीयांची येथे सेवा केली जाते. अतिशय अवघड ठिकाणी वसलेले हे मंदिर आणि तेथे दिली जाणारी सेवा पाहून स्तिमित झालो. दोन किमी खाली जाऊन पाणी आणावे लागते. थकला भागलेला पारिक्रमवासी जेव्हा येथे पोहोचतो... तेव्हा येथे मिळणारी सेवा त्याला प्रचंड बळ देते. आपल्या बाळाची काळजी घेणाऱ्या नर्मदा मैयेच्या अपार प्रेमाची जाणीव येथे होते...

भोजन प्रसादीची व्यवस्था झाली..  तेथे असलेल्या मैयेने वांग्याची भाजी आणि रोटी भोजनप्रसादी दिली.

तेथे आलेले परिक्रमा करणारे हटयोगी बाबा नर्मदानाथ बैरागी आमच्या बरोबर भोजनाला बसले... संपूर्ण अंगाला भस्म लावलेले, कानाच्या मधल्या भागात मोठी तांब्याची बिकबाळी आणि काळी कफनी घातलेले बाबा खूप प्रेमाने बोलत होते. सायकल घेऊन या मार्गाने आल्या बद्दल त्यांना खूप अप्रूप वाटले आणि आनंद ही झाला...

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश चेक पोष्ट जवळ आलो. तेथे कोणीही नव्हते. वरच्या टेकाडावर एक मजली पांढरी इमारत दिसली. तेथे फोटो काढून महाराष्ट्रात पाय ठेवला.

महाराष्ट्रातील पहिल्यांदा लागलेले गाव बुरुमपाड्यात आलो.

नंदुरबार जिल्ह्यातील हे टोकाकडचे गाव. सामूहिक वन संवर्धन प्रकल्प येथे राबविला जातो आहे.   येथील गावे म्हणजे आदिवासी पाडे आहेत.  याला नवे तोरणमाळ सुद्धा म्हणतात. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आल्याबद्दल खूप आनंद झाला.  महाराष्ट्रात याच शूलपाणी जंगलातून नर्मदा मैय्या वाहते, त्याचा सुद्धा आनंद होता. या बुरुमपाड्यात सुद्धा चहा देऊन सेवा मिळाली.

पुढे तोरणमाळच्या विव्ह पॉईंटवर आलो.

येथून खालच्या दरीत वसलेली अनेक गावे, हिरवेगार जंगल परिसर आणि शेतांचे चौकोन  दिसत होते. एका पाठी एक पसरलेल्या तोरणमाळच्या पर्वतरांगा दिसत होत्या.  नंदुरबार, शहादा फाट्यावर आलो. तेथे गावांच्या नावाचा बोर्ड मराठीत लावलेला होता.
येथून तोरणमाळ, नर्मदा तलाव आणि मुख्य गाव चार किमी अंतरावर आहे.

वर-खाली चढ उताराच्या रस्त्याने तोरणमाळचे मुख्य आकर्षण नर्मदा तलावाजवळ पोहोचलो.

त्याच्या बाजूलाच बाबा गोरखनाथांचा भव्य आश्रम आहे. हे नाथ परंपरांचे सर्वात मोठे सिद्धपीठ आहे. गोरखनाथ बाबा येथे साक्षात विराजमान आहेत. बाबा गोरखनाथांच्या तपश्चर्येने येथे नर्मदा मैय्या पाताळातून प्रकट झाली आहे. म्हणूनच परिक्रमावासी तोरणमाळला आवर्जून भेट देतात. येथील जंगलाला शूलपाणी जंगल म्हणतात.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. येथे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात यांच्या सीमा आहेत.  पावसाळ्यात सर्व ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात, तसेच सकाळी आणि संध्याकाळी धुक्याचे साम्राज्य असते.

गुरू गोरखनाथच्या मंदिरात विश्रांतीची व्यवस्था झाली. तेथून 'सीता खाई' पाहायला गेलो. खाली खोल दरी दिसत होती.

सीता मैय्या येथेच भूमातेमध्ये विलीन झाली होती. हा एको पॉईंट सुद्धा आहे. येथून मध्य प्रदेशाचा भूभाग दिसतो.

प्रचंड वारे सुटले होते. वाटेत आदिवासी पाडे लागले. तेथील लहान लहान मुले "नर्मदे हर" म्हणत आमच्या मागे धावत होती. एक टपरीवजा दुकान लागले. सायकल थांबवून सर्व मुलांना चॉकलेट वाटले. तेथेच संजयने माझे नामकरण केले, "चॉकलेट बाबा".

समोरच्या झाडातून सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन झाले. काळया ढगांतून डोकावणारे सोनेरी कवडसे निसर्गाचे संगीत गात होते.

मंदिराच्या मागे असलेल्या नर्मदा तलावाच्या काठावर  निवांत बसलो...  सर्व भावना आणि विचार विरहित अवस्थेत या ठिकाणी तल्लीन झालो. वातावरण थंड व्हायला लागले होते.

गोरखनाथ सिध्द पिठाचे मुख्य महंत योगी संजूनाथजी यांनी भोजन प्रसादीची सर्व व्यवस्था केली. मंदिराच्या खालीच विश्रामाची व्यवस्था होती.

ग्रामीण जीवन आणि सेवा भाव यांची फार जवळून ओळख झाली...

मनाचा... मुंबईच्या छोट्या जगातून गावाकडच्या विशाल विश्वात प्रवेश झाला होता.

नर्मदे हर...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Wednesday, January 13, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस चौथा)बावन्नगजा ते पिपलाकुंड ०१.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस चौथा)

बावन्नगजा ते पिपलाकुंड

०१.०१.२०२१

सकाळी बालभोग घेऊन बावन्नगजाजी येथील जैन  तीर्थांकर आदिनाथ भगवान यांच्या भव्य मूर्ती असलेल्या स्थानाला भेट दिली.

या सिद्धक्षेत्रात नवीन वर्षानिमित्त जैन समुदयातर्फे मोठी पूजा अर्चना सुरू होती. डोंगरात कोरलेली ही विशाल मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटले. "श्री आदिनाथ जीनेंद्राय" याचा अर्थ ज्याने मन, वचन आणि काया यावर ताबा मिळवला आहे आणि केवलज्ञान प्राप्त केले आहे.

काल  दर्शनी असणाऱ्या भगवान श्री आदिनाथ मंदिराला भेट दिली होती. सायंकाळच्या सूर्यप्रकाशात हे मंदिर सुर्यप्रभेमुळे सुवर्ण किरणांनीं उजळले होते.

श्री आदिनाथ भगवान यांच्या या पवित्र क्षेत्रास चुलगिरी म्हणतात. चारही बाजूला सातपुड्याच्या पर्वत रांगा आहेत. एका पर्वताच्या माथ्यावर सती मंदोदरीचे (रावणाची पत्नी) मंदिर आहे.

अन्नक्षेत्राचे बाबाजी, स्वामी ज्ञानानंदजी यांचा निरोप घेऊन चुलगिरी घाट चढायला सुरुवात केली. वातावरणात सुखद गारवा होता. तसेच आम्ही सुद्धा जोशात होतो. त्यामुळे घाटमाथ्यावर थोड्या वेळातच पोहोचलो. येथे नितांत सुंदर विव्ह पॉईंट होता. याचे नाव सुद्धा अतिशय सुखदायक होते, "पर्यावरण चेतना केंद्र".

येथिल बगिच्यात सगळीकडे बोगनवेल फुलल्या होत्या. येथील वॉच पॉईंट वर गेलो. संपूर्ण सातपुड्याच्या पर्वतरांगा चारही बाजूला दिसत होत्या. या ठिकाणी मोबाईल रेंज सुद्धा चांगली मिळाली. या नितांत सुंदर ठिकाणावरून प्रिय व्यक्तींना फोन केले. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा थोडा वेळ येथे व्यतीत करून, पुढे मार्गक्रमण सुरू केले.

दोन तासात पाटी गावात पोहोचलो. गावाच्या सुरुवातीलाच चहाच्या दुकानात बरेच परिक्रमावासी बसले होते.

परिक्रमावासींसाठी  चहाची व्यवस्था येथे होती. मुसफिर व्यास आणि जाट साहेब यांची ओळख झाली. जाट शायर आहेत तर व्यास शिक्षक आहेत. दोन मित्र परिक्रमा करतायत... आपल्या क्षेत्रांत उन्नत होण्यासाठी... व्यासांचा मोबाईल डेटा जास्त झाल्या मुळे हँग झाला होता. तो डेटा मेमरी कार्ड मध्ये ट्रान्सफर करून दिला. व्यास महाशय प्रचंड खुश झाले... नर्मदा  मैय्या सेवा करण्याची सुद्धा संधी देते... त्यांच्या चेहऱ्यावरचा  आनंद बघून नर्मदा मैयाचे आभार मानले. व्यासजी आता माझे जिगरी दोस्त झाले आहेत.

दोन मोटरसायकालिस्ट मुकेश रावल आणि श्रीकांत कलमकर पाटी गावात भेटले. आम्हाला चहा पाजण्यासाठी थांबले होते. चहा सोबत आलू वडा आणि मिरची भजी त्यांनी दिली.

मुकेश हॉटेलवाल्याला बिल द्यायला गेला, तर हॉटेल मालक यादवजी बिल घेईना... का... तर परिक्रमावासी सोबत तुम्ही सुद्धा आमचे पाहुणे आहात... काय म्हणावं बरं या औदार्याला...

युथ हॉस्टेलशी मुकेश आणि श्रीकांत निगडित आहेत. निसर्गाच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीची चटकन दोस्ती होते... याचा प्रत्यय आला.

पाटी वरून बोकराटोकडे जाणारा रस्ता सतत चढाचा होता. त्यात हेडविंड सुरू होती... दमछाक करणारी... दहा किमी  अंतर कापायला सव्वा तास लागला... वाटेत सवरियापानी गावाच्या जवळ हँड पंप होता. थोडी विश्रांती घेऊन... हँड पंपचे पाणी प्यायलो. एकदम तरतरी आली.

वाटेत टापर गाव लागले... बरेच पारिक्रमवासी रस्त्याच्या कडेला मोकळ्या मैदानात बसले होते. येथे सुद्धा सेवा म्हणून चहा मिळाला. या दुकानात सोरट पाहायला मिळाली. त्याला येथे इलम म्हणतात. लहानपणी प्रभादेवीच्या जत्रेत सोरट पाहायला मिळायची. चिठ्ठी काढायची आणि त्यात जो नंबर येईल त्या नंबर वरची वस्तू मिळायची...

इथे तर चक्क पैसेच नंबरवर चिटकवले होते.

बोकराटोला पोहोचलो. आज बोकाराटा मध्ये आठवड्याचा बाजार होता... रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे सायकल ढकलत तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्यावी लागली.  तोरणमाळ येथून तीस किमी अंतरावर आहे.

आता ऑफ रोडिंग रस्ता सुरू झाला.अतिशय खडबडीत आणि रस्त्यावरचे डांबर निघून गेल्यामुळे सायकल दगड गोट्यातून चालली होती. इलेक्ट्रिक करंटचा झटका लागतो, त्याप्रमाणे हादरे बसत होते. अक्षरशः ब्रेक डान्स सुरू होता.

तेव्हढ्यात बाजूने जीप पास झाली. जीपच्या आत खच्चून माणसे कोंबली होती. तिच्या टपावर, दरवाजाला लटकलेली, पुढच्या बोनेट वर बसलेली जवळपास पन्नास माणसे असावीत त्या जीपमध्ये.

पिपरकुंडच्या वेशीवर पोहोचलो. येथे बोकराटो वरून येणाऱ्या खचाखच भरलेल्या जीप खाली होत होत्या.  येथे मुंबई महापालिकेत काम करणारा रामलाल भेटला. तो पहाडावरच्या आमली गावातला आहे. येथील आदिवासी बायका गळ्यात चांदीचा मोठा तोडा घालतात.

त्याला आदिवासींच्या पावरी भाषेत आहाडी म्हणतात. इतर गावकरी निमाडी भाषा बोलतात.
जीप स्टँड कडून पिपरकुंड गाव सुरू झाला.  वर गावाकडे जाणारा अवघड घाट सुरू झाला. रस्त्याची दुर्दशा त्यात चढाचा आणि वळणावळणाचा रस्ता; या मुळे काही ठिकाणी सायकल ढकलण्या शिवाय पर्याय नव्हता. तीन किमी चढायला एक तास लागला. प्रचंड दमछाक झाली होती. मुख्य गावात पोहोचायला चार वाजले. आणखी सायकलिंग करायची इच्छा नव्हती. म्हणून तेथेच तळ टाकायचा ठरले.

रेवसिंगचे छोटे दुकान असलेले घर लागले.  दुकानाजवळ पोहोचताच रेवसिंगने हसतमुखाने स्वागत केले. दहा मिनिटात चहा आला. मग संजयने हळूच त्याला विचारले, 'हम यहा रह सकते है क्या' तो म्हणाला, 'हाऊ' (म्हणजे हो). आम्हाला हायसे वाटले. बाहेरच असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात सायकल लॉक केल्या आणि समान घेऊन त्याच्या घरात आलो.

शेणाने मस्त सारवलेल घर... घरात टीव्ही.. आणि त्याचे हसतमुख कुटुंब... रेवसिंगच्या बाबाचे नाव कनसिंग. घर एकत्र कुटुंब पद्धतीचे होते. त्याला आठ मुले आणि वीस नात-नातू ... एकूण चाळीस जणांचा मोठा परिवार... रस्त्यावर दुकान आणि वर टेकडीवर त्याचे चौसोपी घर होते. आळीपाळीने त्याची सर्व मुले आणि सुना भेटून गेले.

रेवसिंग बोलायला अतिशय चटपटीत होता. थोड्याच वेळात त्याच्याशी एकदम गट्टी झाली. पिपरकुंड मधील आदिवासी जमातीचा तो प्रमुख होता. सरकारी योजनांचा लाभ घेऊन त्याने दुकान बांधले होते. सायंकाळी आठ वाजताच जेवण आले. शेव खाटो, टमाटर खाटो आणि त्याच्या बरोबर रोटलो जेवण आले.

अतिशय चमचमीत बनविले होते जेवण त्याच्या लाडोने (बायकोने)... त्यानंतर ताक आले.
ताकाला "मोहे किंवा साह" म्हणतात.

जेवल्यावर गप्पांचा सिलसिला सुरू झाला. त्याने पहाडी लोकसंगीत ऐकविले. त्याची वडिलोपार्जित खानदानी तलवार दाखविली. स्वतः तलवारीसह आदिवासी नृत्य करून दाखविले. संजयने पण तसेच नृत्य केले. त्या भारदस्त तलवारीसह फोटो काढले.

रेवसिंगचे शिक्षण झालेले नाही. ही आदिवासी कुटुंब खूप खडतर जीवन जगत असतात.  पावसात नाले भरून वाहतात तेव्हा गावांचा संपर्क तुटतो. एकदा तर त्याने ओढ्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या स्वतःच्या मुलीला वाचविले... सर्व खडतर आणि विपरीत परिस्थितीत सुद्धा ही माणसे मदत करायला तत्पर आणि सदा हसतमुख असतात याचे खूप अप्रूप वाटले...

एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... माणसाच्या गरजा कमी असतील तर दुःख त्याच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही...

शेणाने सारवलेल्या घरातील जमिनीवर निवांत झोप लागली...

आदिवासी कुटुंबासमवेत काढलेली ती सायंकाळ आणि रात्र ... जीवनाच्या अनुभवत प्रचंड भर टाकून गेली.

नर्मदे हर

सतीश जाधव
मुक्त पाखरे...