Sunday, June 13, 2021

ऋणानुबंध राईड... १३ जून २०२१

ऋणानुबंध राईड... १३ जून २०२१

ठाण्याला सायकल राईड करत जाणे आता परिपाठ झाला आहे. छोटसं कारण ही ठाण्याला जायला पुरते. सायकलचा तुटलेला स्पोक बदलण्यासाठी उद्या राईड करायचे ठरविले.

मग परममित्र डॉ. राजेश कांबळेला भेटायचे पण नक्की केले. समर्पयामिची नवीन सायकल शॉपी आता उपवन जवळ उघडल्यामुळे सोईचे झाले होते. सायकलची बारीक सारीक कामे या शॉपीवर करणे सोपे झाले होते. 

सकाळी सहा वाजता लोअर परेल वरून राईड सुरू केली. रस्ता ओला होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. ओल्या  रस्त्यामुळे लो गियरवर सायकल मार्गक्रमण करत  होती.
         एकटे राईड करणे म्हणजे तल्लीनता असते. सकाळच्या वातावरणात जुकबॉक्सवर किशोरजींचे "जीवन से भरी तेरी आँखे" हे अतिशय आवडणारे गाणे लागले होते. या गाण्यातील अंतऱ्यात आलेली  "रंगो  छंदोमे समायेगी किस तरह से इतनी सुंदरता" ही ओळ अंतर्मुख करून गेली... विचारांचे वारू चौखूर उधळले.
         
 "निसर्गाचे अनंत रंग आपल्या डोळ्यात सामावू शकत नाहीत, एव्हढा प्रचंड आनंद या सृष्टीत सामावला आहे". फक्त आणि फक्त निसर्गावरचे प्रेमच या आनंदाला जवळ आणू शकते.... असेच काहीसे विचार मन पटलावर तरळत होते. एकांतातली हीच तल्लीनता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आणि प्रत्येक प्रसंगाला सामोरे जायचे  सामर्थ्य देत होते.

गाण्याच्या धुंदीत आणि पहाट वाऱ्याच्या मस्तीत राईड सुरू होती. पाखरांचा पूर्वेकडे झेप घेणारा थवा   किरणांच्या साथीने भविष्याचा वेध घेत होता. 

दीड तासात समर्पयामिच्या उपवन मधील नवीन शॉपीमधे पोहोचलो. कॅडबरी जंक्शनच्या पुढे राजेशची भेट झाली. 

आज रविवार म्हणजे सायकलिस्ट मित्रांच्या भेटीचा दिवस... प्रथम हसतमुख  बलजीत आला. त्याचा खास मित्र नटखट ब्रिजेशने आज सुट्टी घेतली होती. पाठोपाठ प्रविणकुमार आले. सायकलिंगमुळे खूपच स्लिम ट्रिम झाले होते. त्यांची झुबकेदार मिशी भारदस्त आहे. उत्सवमूर्ती यशवंत जाधव आले.  बलजीत आणि प्रवीण कुमार यांना लवकर निघायचे असल्यामुळे समर्पयामिच्या लोकेशनवर फोटो सेशन झाले. 

इतक्यात फ्रिलांस सायकलिस्ट अनिल वामोरकर यांची एन्ट्री झाली. संयमी पण बोलकं व्यक्तिमत्व मनाला भावलं. "तुम्हीच जाधव काय !!!" "तुमचे ब्लॉग वाचतो, खुप आनंद झाला तुम्हाला भेटून" ही त्यांची पहिली प्रतिक्रिया... 

मिस्कील आणि भारदस्त अडव्होकेट अंबर जोशी आला.  अंबर म्हणजे हास्याचा खजिना आहे. तो बोलायला लागला की आपण फक्त ऐकत राहायचे. कोर्टात तो प्लास्टिकच्या खुर्चीतुन कसा पडला, याचे बहारदार वर्णन अंबरने केले. स्वतःवर विनोद करण्याचे कसब त्याच्या कडून शिकावे. जो स्वतःवर विनोद करतो, तो सर्वांना प्रिय असतो. निरंजन कार मधून आला. आज तो घाईत दिसत होता. 

चैतन्यमयी सिद्धार्थ बागाव नवीन सायकलसह शॉपीवर आला.
  नवीन सायकल बद्दल भरभरून बोलत होता. आम्ही बोलत असताना हिरेन पटापट सायकलची कामे करत होता. तो खरं तर सायकलचा डॉक्टर आहे. राजेशला काहीतरी काम असल्यामुळे तो घरी निघाला. 

सिध्दार्थच्या मनात नवीन सायकल बद्दल ट्रीट द्यायचे होते. आणि आडनाव बंधु यशवंत जाधव मला न्याहरी दिल्याशिवाय सोडणार नव्हते.

नौपड्यातील गोखले उपहारगृहामध्ये मिसळपावचा स्वाद चाखायला आलो. येथे बसण्याची व्यवस्था होती. आजची ट्रीट सिद्धार्थने दिली. या उपहार गृहामागेच अनिल राहतात. 

मिसळ आणि तर्रीचा स्वाद घेताना, "छोटे छोटे आनंदाचे क्षण आपण वेचले पाहिजेत", यशवंत जाधव चटकन बोलून गेले. खरं आहे, या आनंदाच्या छोट्या छोट्या क्षणातून आपण समृद्ध होतो.  सायकलिंगच्या आनंदामुळे नवनवीन मित्रांचा खजिना वाढत आहे.  जुन्या मित्रांची नव्याने वेगळी ओळख होत आहे.  नवीन विषय आणि विचारांची देवाण घेवाण यामुळेच जीवन समृद्ध होत जाते.

गोखल्यांच्या मिठाईच्या दुकानातून मुगाचा साजूक तुपातील शिरा घेतला. तेथून केशव वडा टी सेंटर मध्ये आलो. येथील चहा एव्हढा फर्मास होता की दोन कप चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. 

पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन सर्वांचा निरोप घेतला. मिसळ आणि चहाचा स्वाद मुखात घोळवत परतीचा प्रवास सुरु झाला.

काहीतरी ऋणानुबंध असल्यामुळेच असे प्रिय मित्र माझ्या जीवनात आले आहेत.


सतीश जाधव
मुक्त पाखरे...

धुंद पावसाळी राईड१०, ११ जून २०२१

धुंद पावसाळी राईड
१०, ११ जून २०२१

धुवादार पावसात राईड करूया काय? संजयचा मेसेज आला. नऊ ते बारा जून दरम्यान मुंबई आणि आसपासच्या भागात धुवाधार पाऊस पडणार आहे, असे वेधशाळेने जाहीर केले होते. याचा संधीचा फायदा घेऊन पावसात खंडाळा सायकल सफर करण्याचे ठरले...

आज सकाळी साडेपाच वाजता सायकल राईड सुरू झाली. सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला होता. सुरुवातीलाच पावसात भिजणे, एकदम अंगावर येते. त्यामुळेच पोंचू घालून पावसाची तमा न बाळगता पेडलिंग सुरू केले. पावसामुळे रस्त्याला अंधार होता. संततधारेमुळे चष्म्यावर पडणारे टप टप थेंब रस्ता दिसेनासा करीत होते. परेल हिंदमाता जवळ पाणी तुंबायला नुकतीच सुरुवात झाली होती. संजयने सुद्धा दहिसर वरून सायकलिंग सुरू केली होती. 

आज पावसाचा आवेश काही वेगळाच होता. दादर चित्रा सिनेमा जवळील पुलाखालून जाताना; पुलावरून मोठी बस गेल्यामुळे पाण्याचा प्रचंड झोत धाडकन डोक्यावर कोसळला. सायकल सकट होलपटलो. MTB सायकल असल्यामुळे पटकन सावरलो. अंगात पॉंचू असून सुद्धा नखशिखान्त भिजलो होतो. पाऊस सतत पडत असल्यामुळे सायकलचा वेग अतिशय कमी झाला होता. 

"आता थांबायचं नाही गड्या"...  "जिद्दीने पेडल करत रहायचं.." हे मनाला समजावले...  आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचे... तेव्हाच आनंदाची आगळी वेगळी सकाळ प्रकाशमान होणार होती. तब्बल दिड तास लागला वाशी स्टेशन जवळील हायवेला पोहोचायला. वाशी उड्डाण पुलाखाली तुतारी वाजविणाऱ्या मावळ्याचा पुतळा होता.मावळा खरच तुतारी वाजवून माझे स्वागत करीत होता. संजय घाटकोपर पर्यंत पोहोचला होता. आम्ही दोघे पनवेलच्या पुढे दत्त स्नॅक्स हॉटेल जवळ भेटण्याचे ठरविले होते.
 आता जलधारांनी थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे पुढची सफर पामबीच रोड वरून सुरू केली. पामबीच म्हणजे सायकलिस्ट मंडळींचे अतिशय आवडते ठिकाण... पण गम्मत म्हणजे पामबीच मार्गे नवी मुंबई महापालिके पर्यंत एकही सायकलिस्ट दिसला नाही. 

बेलापूर हायवेला आल्यावर गाड्याच्या रहदारीत सायकलिंग सुरू झाली. पॉंचू काढून आता हिरवा फ्लुरोसंट विंडचिटर घातला. पाऊस थांबला तरी नभात काळ्या ढगांनी दाटी केली होती. बाजूने जाणाऱ्या गाड्या स्प्रे सारखे पाण्याचे तुषार अंगावर उडवत होते. हा तर जमिनीवरून अंगावर कोसळणारा पाऊस होता. खांदेश्वर गाव आले आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. चोही बाजूनी जलधारांनी माझ्या भोवती फेर धरला होता. थेंब अन् थेंब जणू मित्रच वाटत होता. खरं तर पावसात भिजायचे कारण हवे होते. या निसर्गानेच चैतन्याचे धडे शिकविले होते.  या धुंद पावसात रममाण होत मुंबई गोवा हायवेच्या सुरवातीला असलेल्या  दत्त स्नॅक्स कॉर्नरला पोहोचलो. 

पंधरा मिनिटात संजय तेथे पोहोचला. चरचरीत भूक लागली होती. खमंग कांदा भजी आणि वडापाव वर ताव मारला. सोबत आणलेला सुकामेवा साथीला होताच.

 आता सुरू झाली मैत्रीची राईड... नर्मदा परिक्रमा केल्या नंतर आज पुन्हा एकदा आम्ही दोघे एकमेकांच्या संगतीत तुडुंब राईड करणार होतो. पाऊस पुन्हा बरसतोय...  अशा वेळी मित्राचा सहवास लाभतोय...  कोन गावाजवळ एक्सप्रेस वे ला जुना हायवे क्रॉस करतो, त्या ब्रिजवर थांबलो आणि सरळ रेषेत जाणाऱ्या एक्सप्रेस वे चे दर्शन घेतले. दूरवर डोंगरांच्या कपारीत रस्ता गडप झाला होता. तेथे नभ काळ्या मेघांनी झाकोळले होते. ढगांचे डोंगरांशी मिलन झाल्याचे अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवत होतो.

खोपोलीकडे राईड सुरू झाली आणि गेल्या वर्षी केलेली एकविरा देवी राईड आठवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेले गर्द गहिरे हिरवे रान... हरवून जाई धुंद मनाचे भान... अशी स्थिती झाली होती. रसायनी बस स्टँड जवळ आलो. तेथे पुणे १०० किमी मैलाचा दगड लागला.
तेथे फोटो काढला आणि मित्रांना पोष्ट केला.  काय आश्चर्य शरदचा मेसेज आला... तुम्ही नक्की कुठे चालला आहात... मुंबई कन्याकुमारी सायकलिंग करताना याच मार्गाने बंगलोर लागले होते त्याची आठवण झाली. 

पुढे मार्गक्रमण करत असताना विने गावाजवळील निशीलँड पार्क मध्ये एक खरेखुरे विमान ठेवले होते. विमानाच्या लोकेशनवर फोटो काढले. हिरवळीच्या जंगलात उतरलेले विमान सायकल पुढे खुजे वाटत होते. मुंबई पुणे जुना हायवे चारपदरी मार्ग अतिशय सुस्थितीत होता. दोन्ही बाजूला हिरवळ आणि  तरारलेल्या झाडांच्या मधून नागमोडी सायकलिंग मनाच्या डोहात शांतीचे तरंग उमटवित होते. 

"आनंदाचे डोही आनंद तरंग" या तल्लीनते मध्ये महडच्या वरदविनायक गणेश मंदिराकडे आलो. मंदिर बंद असल्यामुळे, बाप्पाचे दर्शन बाहेरून घेतले. मंदिराच्या जवळच राहण्याची सोय आहे, हे समजल्यावर हुरूप आला. खंडाळ्याला राहण्याची सोय झाली नाही तर महडला यायचे ठरविले.  आता खंडाळ्याच्या घाट चढण्याचे नक्की केले. 

भूक लागली होती पण जेवल्यावर घाट चढणे कठीण झाले असते म्हणून खोपोलीच्या अलीकडे हाल गावाजवळ अननसाचा टेम्पो उभा होता. त्याच्या कडून एक रसरशीत अननस घेतले. सुकामेवा खाऊन सुरू झाली चढाई खंडाळ्याच्या घाटाची...  या घाटाला बोरघाट पण म्हणतात. अतिशय कठीण घाट म्हणून याची ख्याती होती. परंतु एक्सप्रेस वे झाल्यामुळे या घाटाची रहदारी कमी झाली आहे. तसेच रुंद केलेल्या रस्त्यामुळे अपघात सुद्धा कमी झाले आहेत.

 अतिशय बाकदार वळणे आणि उभ्या चढाईचा खंडाळ्याचा रस्ता भल्या भल्या सायकलिस्ट मंडळींना जेरीस आणतो. म्हणूनच लेह लढाखची पूर्व तयारी म्हणून भर पावसात खंडाळा चढायचे ठरविले होते. 

नव्या ऊर्जेने चढाई सुरू केली. पाऊस थांबला तरी आकाश ढगाळ होते. आता जलधाराशिवाय अंग घामाने चिंब झाले होते. शिंगरोबा मंदिराकडे पोहोचलो आणि देवाला प्रसाद दाखवून रसरशीत अननसाचा फडशा पडला. मस्तपैकी तासभर हायड्रेशन ब्रेक घेतला. आता सुरू झाली अमृतांजन पुलाकडे चढाई. 

घाटात पुढे धबधबा लागला. दोघेही घुसलो पाण्यात आणि जी धम्माल केली त्याला तोड नाही. निव्वळ आम्ही दोघेच डुंबत होतो. चहा घेऊन अमृतांजन ब्रिजकडे प्रस्थान केले.  ढगात दडलेल्या नागफणी  कड्याचे (ड्युक्स नोज) दर्शन झाले. निळ्याभोर आकाशावर पांढऱ्याफेक ढगांचा शिडकावा त्या कॅनव्हासवर नागफणीचा डोंगर, हे निसर्ग चित्र पाहिल्यावर भान हरपून गेले.फोटो काढण्याची आता आमची चढाओढ लागली.

आता शेवटचा चढ सुरू झाला. "खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार" हे गाण्याचे बोल आठवले. या थंडगार हवेतून पुरेपूर प्राणवायू नसानसात भरून घेतला. त्यामुळे हा चढ सहजपणे चढून गेलो. राजमाची व्हीव पॉईंटकडे आलो. या टप्यावर निसर्गाचे बहारदार रूप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करू लागलो. दूरवर डोंगराच्या माथ्यावरून कोसळणारा धबधबा पायथ्याला हिरवळीत गडप झाला होता. पुढे नागमोडी धावत जाणारा ओहळ लहान बालकासारखा अवखळ झाला होता. भान हरपून गेले. 

येथून खंडाळा गावात आलो. येथेच मुंबई बँकेच्या स्वप्नपूर्ती विश्रामधाम मध्ये राहायची सोय संजयमुळे झाली... ते पण रात्रीच्या जेवणासह. संध्याकाळच्या प्रहरी पाऊस सुरू झाला... संपूर्ण कॉटेज परिसर धुक्याने भरून गेला. येणारा प्रकाश सुद्धा धुक्यात हरवला होता. जेवणाच्या अगोदर खंडाळ्याचा एक फेरफटका मारला. तलावावर जाऊन पावसांच्या तुषारासह थंड वारे अंगावर घेतले. 

 तलावात उमटलेले तरंग आणि संधीप्रकाशात लाभलेला शांत एकांत, सोबत मित्राचा संग... आणखी काय हवे असते जीवन अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी....

भरपेट नास्ता करून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता परतीचा प्रवास सुरु झाला.
आता वेगाला मागे टाकत सुसाटत मुंबईकडे निघालो होतो. पाऊस पाठशिवणीचा खेळ खेळत होता... हिरवे प्लुरोसंट विंडचिटर घातल्यामुळे खूप सुरक्षित वाटत होते. तसेच पावसाळी सायकलिंग सँडल्सवर करणे खूप सुखकारक आहे, याचा प्रत्यय आला.  वाटेत अमृतांजन पुलाजवळ मयुरेश पॉईंट लागला. याच ठिकाणी समर्पयामिच्या मयुरेशने टि शर्ट काढून डान्स केला होता.

  तीन ठिकाणी हायड्रेशन ब्रेक घेतले.  वाशी गावात केळी खाल्ली. संजयने मानखुर्दवरून दहिसरला जाण्यासाठी घाटकोपर कडे प्रस्थान केले.
  
    पावसात तुडुंब भिजत २१० किमी राईड दोन दिवसात पूर्ण झाली. विशेष म्हणजे अवघड खंडाळ्याचा घाट सहज पार करत... हिरवटलेले डोंगर.. खळखळणारे नाले... आणि भिरभरणारे काळपट पांढरट ढग...यांच्या संगतीत दोन दिवस अविस्मरणीय झाले होते.


सतीश जाधव
मुक्त पाखरे

Saturday, May 29, 2021

नर्मदा परिक्रमा (दिवस पंधरावा) चापरिया ते कवाट, कढीपानी (निळकंठ महादेव), हापेश्वर (कलहंसेश्वर महादेव) ते उमरट १२.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (दिवस पंधरावा)

  चापरिया ते कवाट, कढीपानी (निळकंठ महादेव), हापेश्वर (कलहंसेश्वर महादेव) ते उमरट

१२.०१.२०२१

साडेपाच वाजता उठून सकाळचे कार्यक्रम आणि मैंय्येची पुजा करून सायकलवर खोगीर चढवले. आमच्या अगोदरच पायी परिक्रमावासी मार्गस्थ झाले होते. बंगल्याची चावी गेट जवळच्या खुंटीला लावून सकाळी सात वाजता पेडलिंग सुरू केले.

पहिले ठिकाण कढीपानी होते. पुढील पारिक्रमा सुरू झाली. थोड्याच वेळात पायी परिक्रमा वासीयांना नर्मदे हरची साद घालून पुढे जात होतो.  जंगलाचा रस्ता होता. आज मस्त धुकं पडलं होतं त्याचा आनंद घेत विंध्याचल जंगलातून वरखाली चढउताराच्या रस्त्यावरून रमतगमत चाललो होतो. पूर्वेकडून उदयाला येणारा सूर्य धुक्यात आपली कांती हरवून मार्गक्रमण करीत होता. झाडांच्या लोकेशनवर दिसणारा पांढराफेक सूर्य  पौर्णिमेच्या चंद्रासारखा भासत होता.

सकाळच्या वातावरणात घाट चढ उतार करताना वरून थंडी वाजते आहे आणि आतून घामाने ओलाचिंब झालोय अशी अवस्था झाली होती. धुक्यातून वाट काढणाऱ्या मोटारसायकल सुद्धा मंदगतीने चालल्या होत्या.  दीड तासात कढीपानी येथे हायड्रेशन ब्रेक घेतला.

कढीपानी गावात बालभोगसाठी एका चहाच्या टपरीवर थांबलो. चहा बिस्कीट खाताना एक गोष्ट लक्षात आली. चहा पिणारे गावकरी चहाचे कागदी कप आणि बिस्किटांचे रॅपर इतरत्र टाकत होते. त्यामूळे टपरीच्या चोहीकडे खूपच कचरा दिसत होता. संजय उठला आणि सर्व कचरा उचलू लागला. तसा चहा दुकानवाला पटकन पुढे आला आणि म्हणाला, "बाबाजी मै साफ करता हुँ."  संजय पुढे म्हणाला, "हम हापेश्वर जाके वापस आ रहे है."

पुढे हापेश्वर पाच किमी होते. शूलपाणी जंगलातून जाणारा रस्ता एकदम ओबडखाबड होता. जवळपास बारा घाट लागले. ऑफ रोडिंग घाट चढताना अक्षरशः धापा टाकाव्या लागत होत्या, तर अतिशय तीव्र उतारावर खुप सावधगिरी घ्यावी लागत होती. उतारामध्ये वळण आणि दगडमाती आली की सायकल थांबविण्या शिवाय पर्याय नसतो. पाच किमी जाण्यासाठी पाऊण तास लागला.

हापेश्वर जवळील नर्मदा  जलाशयाकडे आलो.

सरदार धरण प्रकल्पामुळे मुळ पुरातन हापेश्वर मंदिर आणि परिक्रमेचा जंगलातून जाणारा मार्ग  जलाशयात बुडाला होता. या ठिकाणी वीज प्रकल्पाचे काम सुद्धा सुरु होते. या जलाशया जवळच नवीन मंदिर बांधले होते. नर्मदा मैय्येचे दर्शन घेतले. हापेश्वरच्या नर्मदेच्या पलीकडच्या तटावर महाराष्ट्र आहे. कलहंसेश्वर महादेव मंदिरात आलो. मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले. रामजानकी, लक्ष्मण आणि मुळ मंदिरातून आणलेला वटवृक्ष यांचे सुद्धा दर्शन घेतले. अतिशय विस्तीर्ण परिसरात वीस फुट महादेवाच्या बसलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.कलहंसेश्वर ऋषींनी या ठिकाणी घोर तपश्चर्या केली त्यांना शिवशंकर प्रसन्न झाले. तेव्हा भोलेनाथाकडे वरदान मागितले, आपण येथेच विराजमान व्हा आणि ह्या भूमीला पावन करा. तसेच भक्तांना आपल्या दर्शनाचा लाभ द्या. कलहंसऋषींच्या संकल्पमुळे शिवमहादेव येथे स्थापित आहेत म्हणून हे देवस्थान कलहंसेश्वर महादेव नावाने प्रसिद्ध झाले. भक्तांना बारा डोंगर पार करून येथे धापा टाकत, हापत यावे लागते म्हणून याला हापेश्वर सुद्धा म्हणतात. मंदिरातील बाबाजींनी बालभोग म्हणून चहा नानखटाई दिली.

कढीपानी कडे परतीची सफर सुरू झाली. रस्ता सरावाचा झाल्यामुळे परतीचे पाच किमी अंतर लवकर पार झाले. रमेश भाईच्या चहा दुकानजवळ आलो आणि काय आश्चर्य दुकान जवळचा सर्व कचरा गायब झाला होता. कोपऱ्यातल्या एका कचरा पेटीत कचरा बंदिस्त झाला होता. विशेष म्हणजे आता चहा पिणारी सर्व मंडळी कागदी कप आणि रॅपर कचरा पेटीतच टाकत होते. चहावाल्या रमेश भाईचा सर्व गिऱ्हार्ईका समक्ष संजयने  नानखटाई आणि खारी देऊन हृद्य सत्कार केला.

खूप आनंद झाला; साफसफाई कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्या बद्दल...
कढीपानीच्या नीलकंठ महादेव मंदिरात आलो. शंभू महादेव दर्शन घेतले.  पायी पारिक्रमा करणारा आदित्य मंदिरात भेटला. अगोदर त्याची भेट चापरियाला झाली होती. या मंदिरात, "केसरीया... पधारो मारो... देस.." हे गाणे  मनापासून गायला. अक्षरशः डोळे मिटून हे गाणे ऐकले. आदित्य आणि त्याचे पायी पारिक्रमा करणारे तीन मित्र हापेश्वरच्या जंगलातून नर्मदेच्या काठाने परिक्रमा करणार आहेत. जर मनाने ठरविले आणि मैय्येवर नितांत विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही... हेच त्याच्या बोलण्यातून प्रतीत होत होते.

खाच खळगे आणि वर खाली होणाऱ्या रस्त्यामुळे दुपारच्या उन्हात आमचा कस लागत होता. ऑफ रोडिंग सायकलिंग करत 'वागन' गावात पोहोचायला दीड तास लागला. बजरंग नास्ता हाऊस टपरी जवळ थांबलो.

जेवणाची वेळ होती पण कडक उन्हात त्याची आवश्यकता वाटत नव्हती. पपई खात असलेल्या दुकानदाराने आम्हाला पाहताच अर्धी पपई दिली. उकडलेले वाटणे आणि बटाटा यांचे चाट बनवून दिले. "बाबाजी ठहरो, आपको गरमागरम भजी खिलाता हूँ."  ही खातिरदारी भोजनप्रसादी पेक्षा भारी होती.

थोड़ी उसंत घेतली. येथून शंभर मीटरवर गुजरात आणि मध्य प्रदेशची सीमा होती. हापेश्वरच्या जंगलातून गेलो असतो तर प्रथम महाराष्ट्र आणि नंतर मध्यप्रदेश लागले असते. आजचा मुक्काम डही गावात होता. येथून डही गाव साधारण ५५ किमी आहे. एव्हढ्यात परम मित्र लक्ष्मणचा फोन आला. त्याच्याशी गप्पा मारणे म्हणजे एनर्जी बुस्टिंग असते. त्याच्याबरोबर सुद्धा नर्मदा परिक्रमा करायची आहे. याची त्याने आठवण करून दिली.

आता हेडविंड सुरू झाली होती. येथे रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू होते. त्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तर मध्येच दगड धोंडे मातीचा रस्ता असा सुख दुःखाचा मार्ग  होता. जीवनाचे पण असेच असते. सुखाने हुरळून जायचे नसते तर दुःखाने खचून जायचे नसते. याच वेळेस माझ्या जुकबॉक्स मध्ये, " तुझको चलना होगा" हे गाणे लागले होते. खरचं सायकलिंग म्हणजे मेडिटेशन असते. आपणच आपल्याशी बोलत असतो.

दोन तासात कोसारीया गावात पोहोचलो रुलसिंह भाई येथे अन्नक्षेत्र चालवतात.  दारात असलेल्या गोंडस शेळीच्या कोकराला उचलून घ्यायचा मोह टाळता आला नाही.

ते लहान पिल्लू घरातील नातवडांची आठवण देऊन गेला. 

दुपारचे साडेतीन वाजले होते आणि रुलसिंह भाई आम्हाला राहण्याचा आग्रह करत होते. चाळीस किमी वरील डही गाठण्याचा निर्धार होता. परंतु शेवटी नर्मदा मैंय्येची इच्छा...  कोसारीयाला चहा घेऊन पुढे मार्गक्रमण केले.

उमरट येथे पोहोचायला सायंकाळचे पाच वाजले होते. आज जवळपास ९० किमी परिक्रमा झाली होती. एका घराबाहेर भगवा झेंडा आणि माँ नर्मदा अन्नक्षेत्रचा बॅनर होता. दारात उभ्या असलेल्या गरासिया भगत भाई  प्रेमाने त्यांच्या घरात घेऊन गेले.
  शेणाने सारवलले घर आणि घरातील मैय्येने आदराने केलेले स्वागत पाहून मन खूप प्रसन्न झाले.  येथेच आजचा विश्राम करायचा हा विचार मनात आला... नेमकं संजय पण म्हणाला आपण येथेच राहूया... मनाची भाषा मनाला कळली होती. खरंच संजयचे आणि माझे ट्युनिंग हृदयातून जुळले होते.
 
"श्रमिक हो घ्या इथे विश्रांती" हे सायकलचे बोल सुद्धा कानावर पडले. चहा घेतल्यावर प्रथम सायकलची तेलमालिश केली. सायंकाळी वातावरणात गारवा जाणवू लागला होता. त्यामुळे मागच्या शेतात केलेली थंड पाण्याची आंघोळ शरीर आणि मनाला थंडावा देऊन गेली.

भगत पतिपत्नीच्या उपस्थितीत मैय्येचे पूजन झाले.

मोलमजुरी करणारे भगतकुटुंब गेली अठरा वर्ष परिक्रमावासीयांची अव्याहतपणे सेवा करत आहेत. खरंच हीच आहे मनाची श्रीमंती... स्वतः अर्धपोटी राहून दुसऱ्याला जेवू घालणे... हा निरंतर चालणारा लोकसेवेचा महायज्ञ  राजसूय यज्ञापेक्षा महान आहे. आम्ही दोघांनी भगत यांचे बँक डिटेल्स घेतले... या लोकसेवेच्या यज्ञात खारीचा वाटा उचलण्यासाठी...

घरातली  जमिन शेणाने सारवताना सुद्धा कलात्मकता होती. शेणाचे जमिनीवर उमटलेले पट्टेसुद्धा रांगोळी सारखे भासले. चवळीच्या शेंगांची भाजी, नाचणी आणि ज्वारीची मिश्र भाकरी, आणि आमटी-भात असा सुग्रास बेत सोबत मैयेची, मायेने वाढण्याची किमया... आईची आठवण देऊन गेली.

परमेश्वर कुणाच्या तरी रुपात आपल्या आसपासच वावरत असतो आणि आपली सेवा करतो... मैय्येचे हे आगळे वेगळे रूप पाहून मन सद्गदित झाले.

विचारांच्या या संक्रमणात निद्रादेवीच्या अधीन कधी झालो हे कळलेच नाही.

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Tuesday, May 25, 2021

नर्मदा परिक्रमा (दिवस चौदावा) गरुडेश्वर ते जीवनपूरा (नानी अंबाजी) ते चापरिया११.०१.२०२१

  नर्मदा परिक्रमा (दिवस चौदावा)
  गरुडेश्वर  ते जीवनपूरा (नानी अंबाजी) ते चापरिया

११.०१.२०२१

पहाटे पाच वाजताच जाग आली. गायत्री मंदिरातून नर्मदा तटावर आलो. पहाटेच्या संधीप्रकाशात नर्मदा मैयेच्या किनारी स्नान करणे म्हणजे पर्वणी होती. दोन लोटे डोक्यावर घेतल्यावर एकदम उबदार वाटू लागले. संजयने तर मस्त डुबक्या मारल्या. सचैल स्नान करून गायत्री मंदिरात आलो. तयारी करून मैंय्येची पूजा केली.
सायकलची साफसफाई करून तीला तेलपाणी दिले.  सायकलवर सर्व सामान व्यवस्थित बांधून गरुडेश्वर मंदिरात आलो.

नितांत सुंदर परिसर... चारही बाजूला वड, आंबा आणि सुरुची झाडे डोलत होती. मंदिरा समोरच तुळशी वृंदावन होते. पसरलेल्या वेलींनी हरीत सौंदर्यामध्ये भर पडली होती. मंदिरात जाऊन गरुडेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. टेकडीच्या उंचवट्यावर हे मंदिर स्थित होतेे. मन एकदम शांत झाले. परमेश्वराच्या दरबारात, रमणीय जागेत आल्यावर मन भारावून जाते.
गरुडेश्वर कथा:
     या स्थानावर गजासुर नामक राक्षसाने तपस्या करणाऱ्या ऋषी मुनींना अतिशय त्रास देऊन उच्छाद मांडला होता. सर्व ऋषीमुनींनी श्री महाविष्णु भगवंताचा धावा केला. परमेश्वराने गरुडाला गजासुराचा वध करण्याचा आदेश दिला. गजासुर आणि गरुड यांत घनघोर युद्ध झाले. युद्धाला नऊ दिवस झाले तरीही गजासुराचा पाडाव होईना. तेव्हा देवदेवतांनी आणि ऋषीमुनींनी श्री विष्णूची पुन्हा प्रार्थना केली की गरुडाला अशी दिव्य शक्ती प्रदान करा की गजासुराचा वध होईल. दहाव्या दिवशी युद्ध सुरू झाल्यावर महाविष्णूच्या कृपेने गरुडाला रौद्र  स्वरूप प्राप्त झाले. रौद्र स्वरूपात गरुडाने गजासुरावर घणाणते वार केले आणि त्याच्या शरीराचे सहस्त्र तुकडे केले. गजासुराचा वध करून त्याचे मास खाल्ल्यावर गरुड शांत झाला.

तेथे पडलेली गजासुरची हाडे आणि कवटी पावसाच्या पाण्याने वाहत जाऊन नर्मदे मध्ये आली. नर्मदेच्या स्पर्शाने गजासुर पुनर्जीवित झाला. नर्मदा मातेच्या कृपेने आणि मैय्येच्या स्पर्शाने गजासुराची असुरी शक्ती नष्ट होऊन त्याला दिव्य रुप  व ज्ञान प्राप्त झाले. नर्मदा  माताने त्याला गजेंद्र नाव दिले. गजेंद्रने नर्मदा  मातेला विनंती केली की आपली सेवा करण्यासाठी माझ्यावर अनुग्रह करा. तेव्हा नर्मदा मैय्याने गजासुराला दर्शन देऊन स्वउद्धार आणि लोक कल्याणासाठी  शिव-पार्वतीची आराधना करण्यास सांगितले.

         गजेंद्रने शिव-पार्वतीची शंभर वर्ष तपश्चर्या केली.  भोलेनाथ प्रकट होऊन त्याला स्वउद्धार आणि लोक कल्याणासाठी ज्या ठिकाणी त्याचा वध झाला तेथे गरुडेश्वर मंदिरांची स्थापना करण्याचे आदेश दिले. अशा रीतीने गजेंद्रने स्वउध्दार केला आणि गरुडाच्या तापातून मुक्त झाला.  तसेच त्या ठिकाणी नर्मदा मैय्येच्या पात्रात नाभीपर्यंतच्या जलात उभे राहून जे भक्तगण पितृतर्पण करतात त्यांच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो.    
          भगवान भोलेनाथ गजेंद्रला पुष्पक विमानात बसवून कैलाशपुरी घेऊन गेेले आणि त्याला शिवगणात समावून घेतलेे. गजेंद्र आणि गरुड दोघेही संजीवन रुपात येथे आहेत.

प्राचीन गरुडेश्वर मंदिरातून श्री वासुदेवानंद सरस्वती (टेम्बेस्वामी) मंदिर प्रांगणात आलो. प्रथम दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलो. दत्त मंदिराच्या गर्भगृहाचे द्वार बंद होते. त्रिमुखी श्री दत्ताचे दर्शन जाळीतून घेतले. दत्तगुरूंच्या डाव्या बाजूला आद्य शंकराचार्य आणि उजव्या बाजूला सरस्वती मातेची स्थापना केली आहे. समोरच श्री टेम्बेस्वामी महाराजांची पद्मासनात बसलेली, भगवे वस्त्र परिधान केलेली मूर्ती होती.

समोरच्या गुरू महाराजांच्या चरण पदचिन्हावर नतमस्तक झालो.
मंदिरातील श्री आदि शंकराचार्य आणि श्री स्वामी समर्थांच्या तस्विरी मनावर गारुड करून गेल्या.
प्रांगणात असलेल्या पवित्र औदुंबर वृक्षाचे दर्शन घेतले.
तेथून श्री टेम्बेस्वामींच्या  समाधी स्थळी जाऊन स्वामींच्या निर्गुण चरण पादुकांचे दर्शन घेतले. तेथेच थोडावेळ समाधिस्त झालो. "नमो गुरवे वासुदेवाय" मंत्राचा जप केला. मन भावविभोर झाले.
टेम्बेस्वामींच्या समाधी मंदिरात संगमरवरी कमळाचे फुल आहे त्यावर दोन पादुका आहेत, पादुकांच्या मध्ये स्फटिकाचे शिवलिंग आहे. कमळ हे ब्रह्माजींचे, पादुका हे महाविष्णूचे तर लिंग हे शंकराचे प्रतीक आहे. श्री वासुदेवानंद सरस्वतींना दत्त भगवंताचे अवतार मानले गेले आहे. टेम्बेस्वामींच्या निर्गुण निराकार समाधीसह ही तीन प्रतीके म्हणजे श्री दत्ताचे प्रतिकात्मक रूप आहे. या समाधीचे पूजन म्हणजे श्री दत्त भगवंताचे देखील पूजन आहे. 

गरुडेश्वर येथे दत्त मंदिर का बांधले याची माहिती अत्यंत रोचक आहे : 
श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज श्री टेम्बेस्वामींनी; श्री गांडा महाराज यांना सांगितले की, "माझ्या देहाचा आता काही भरवसा नाही, तेव्हा येथील दत्तमूर्ती नरसोबाची वाडी अथवा गाणगापूरला ठेवायला हवी. तेव्हा कोणी सुभक्ताला बोलावून, त्याला ही मूर्ती अर्पण करा".
त्याच रात्री श्री गांडा महाराज यांना श्री दत्तप्रभूंचा दृष्टांत झाला आणि त्यांना सांगितले, "गरुडेश्वर येथेच मला कायम लीला करायच्या आहेत, तेव्हा कोणा श्रद्धावान भक्ताला येथेच माझे मंदिर बांधायला सांगा. या स्थानाची महती नरसोबाची वाडी आणि गाणगापूर पेक्षा वाढत जाईल, याची निश्चितरूपाने खात्री ठेवा.  माझ्या मूर्तीला येथेच स्थापित करून तिच्या  पूजा-अर्चनेचा प्रबंध करा. एव्हढे सांगून श्री दत्त दिगंबर त्या मुर्तीत अंतर्ध्यान पावले.
या पावन घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी श्री गांडा महाराज यांनी वरील दृष्टांताबाबत स्वतःच्या हस्ताक्षरात एक विज्ञप्तीपत्र लिहिले आणि सर्व भक्तगणांना वाचायला दिले. श्री गांडा महाराजांचे हस्ताक्षर पाहून कोणाही भक्तांच्या मनात संदेह राहिला नाही. त्या नंतर गरुडेश्वरला दत्तमंदिर बांधण्याबाबत विचारविमर्श झाला. या दृष्टांताबाबत  श्री दत्त दिगंबरांनी; श्री टेम्बेस्वामी महाराजांना कोणताही संकेत दिला नव्हता. तद्नंतर श्री टेम्बेस्वामींनी श्री गांडा महाराजांना भरुचला पाठविले.
जेव्हा टेम्बेस्वामींच्या हातात गांडा महाराजांच्या हस्ताक्षरातील विज्ञप्तीपत्र पडले; तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि म्हणाले, "माझा संकल्प श्री दत्तगुरूंना पसंत आला नाही, म्हणूनच मला कोणतीही माहिती न देता श्री गांडा महाराजांना दृष्टांत दिला. स्वामी महाराजांनी श्री दत्तात्रेयांची गरुडेश्वरला राहण्याची कामना पाहून श्री दत्त प्रभूंचे मंदिर बांधण्याचा शुभारंभ संवत १९७०, वैशाख शुद्ध सप्तमीचा मुहूर्त काढला. मंंदीराचे  बांधकाम पूर्ण झाल्यावर, मंदिरात श्री दत्त प्रभूंची प्रतिष्ठापना संवत १९७२, माघ वद्य द्वितीयेला श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या शुभहस्ते झाली.

गरुडेश्वर या नितांत सुंदर, पावन आणि पवित्र स्थानी आणखी एक दिवस राहायला हवे होते. मंदिराच्या प्रांगणात बसून मैय्येला पाहणे हे तर आनंदध्यान होते. येथील मैंय्येचा घाट मागील वर्षीच्या पुरात वाहून गेला होता. येथे घाट पुनर्निर्माणाचे काम सुरू होते. बराच वेळ व्यतीत केल्यावर पुढे प्रस्थान केले.

हम रस्त्यावर येऊन आता भारताचे गौरवस्थान सरदार वल्लभभाई पटेल यांचा "एकतेचा पुतळा" या स्थळाकडे प्रयाण केले. अतिशय आलिशान चौपदरी रस्त्यावरून मार्गक्रमण सुरू झाले. अर्ध्या तासातच केवडिया रेल्वे स्टेशनकडे पोहोचलो. येथे, "माननीय पंतप्रधान यांचे स्वागत असो" असे मोठमोठे होर्डिंग लागले होते. लवकरच केवडिया स्टेशनच्या उदघाटन समारंभाला देशाचे पंतप्रधान येणार होते.

   आज नेमका सोमवार असल्यामुळे एकात्मतेचा पुतळा पर्यटन केंद्र बंद होते. पुढील पोलीस चौकी जवळ आम्हाला अडविले. सायकल वरून नर्मदा परिक्रमा  करतोय हे समजल्यावर आम्हाला पुढे सोडले. परंतु पर्यटन स्थळाचे प्रांगण बंद असल्यामुळे रस्त्यावरूनच पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे दर्शन घेतले. 


  भारताला गौरवशाली असणारे हे सरदारांचे स्मारक पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत असतात. आता येथे फ्लोटिंग एअरपोर्ट सुद्धा होतंय. बडोदा, अहमदाबाद येथून आलेली  विमाने सरदार जलाशयात उतरणार आहे. आम्हाला येथपर्यंत आणल्याबद्दल सायकलींचे सुद्धा सरदारांच्या लोकेशनवर फोटो काढले. हा संपूर्ण परिसर तसेच सरदार धरण पहायचे असेल तर संपूर्ण दिवस हवा.
जवळच असलेल्या पंचेंद्रिय बगिच्यात थोडावेळ विश्राम घेतला. या बगिच्यात झाडाचे खोड सदृश्य बसण्याचे ठोकळे बनविले होते. त्यावर बसून सोबत असलेली पार्लेजी बिस्कीट बाहेर काढली. बिस्कीट खाता खाता एक गोष्ट लक्षात आली. बगिच्यात बराच कचरा पडला आहे. संजयने कचरा डब्याजवळ असलेली काळी पिशवी घेऊन बगीच्यातील  कचरा सफाई अभियान सुरू केले. नर्मदा परिसर स्वच्छता अभियान हा सुद्धा परिक्रमेचा एक भाग होता.

एव्हढ्यात प्रकाश तडवी भाऊ जवळ आले आणि आस्थेने चौकशी केली. त्यांनी सरदार पटेलांच्या एकात्मतेच्या पुतळ्याच्या जडण घडणीची  माहिती  सांगण्यास सुरुवात केली.

सरदार धरण आणि एकात्मतेचा पुतळा :

केवडिया येथे नर्मदा नदीच्या मधोमध एक छोटासा टापू होता.  तो साधू बेट म्हणून प्रसिद्ध होता. पूर्वी बऱ्याच ऋषी मुनींनी या उंच टापूवर तपस्या केली होती. या ठिकाणी एकात्मतेचा पुतळा उभारण्यासाठी सन २०१३ मध्ये या जागेचे भूमिपूजन झाले. आणि २०१४ मध्ये एल अँड टी कंपनीने बांधकामाला सुरुवात केली.

साधू बेटाचे सपाटीकरण करून त्यावर दोन  प्रचंड पिलर उभारण्याचे काम सुरू झाले. सिमेंट काँक्रीटच्या पिलरमध्ये एकशे नऊ टन लोखंडाच्या सळ्या वापरण्यात आल्या आहेत. तसेच सहा हजार टन स्टीलचा वापर पुतळ्याचे स्ट्रक्चर बनवण्यासाठी झाला आहे. तर बाहेरील आवरणासाठी मेटल प्लेट्सचा वापर करण्यात आला आहे. एकूण ६५०० प्लेट्सचे आवरण आहे. प्रत्येक प्लेटच्या मागे एक कंप्युटराईज्ड कोड नंबर लिहिलेला आहे. जेणे करून  एखादी प्लेट दुरुस्ती करायची किंवा बदलायची झाल्यास सोपे व्हावे. पाच वर्षांचा करार असताना, एल अँड टी च्या २५० अभियंता आणि ६००० कुशल कामगारांनी बेचाळीस महिन्यात हे काम पूर्ण केले. सातपुडा आणि विंध्याचल पर्वत रांगा मध्ये हे स्थान वसलेले आहे.

लीड, झिंक, टिन आणि तांबे या मिश्रधातूच्या प्लेट्स तयार केल्या आहेत. जेणे करून त्यास गंज पकडू नये. ६.५ रीक्टर स्केलचा भूकंप किंवा १८० किमी वेगाचे वादळ सुद्धा या महाकाय पुतळ्यास हानी पोहोचवू शकत नाही. ५९७ फूट उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. महाराष्ट्राचे ख्यातनाम शिल्पकार श्री राम सुतार यांनी ह्या पुतळ्याचे डिझाईन बनविले आहे. या पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जन्मदिनी दि ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

या पुतळ्या पासून चार किमी अंतरावर सरदार धरण  बांधण्यात आले आहे. हे धरण गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर बांधले आहे. धरण १२१० मीटर लांब आणि उंची १६३ मीटर आहे. येथे दररोज १४५० मेगावॅट वीज निर्मिती होते यातील ५७% मध्यप्रदेशला २७% महाराष्ट्राला आणि गुजरातला १६%  वीज मिळते. येथून कच्छ पर्यंत  कॅनॉलद्वारा पाणी पुरविले जाते.

कच्छच्या मांडवी गावापर्यंत या कॅनॉलची लांबी ४५८ किमी आहे. तेथून ७४ किमी कॅनॉल राजस्थानात सुद्धा जातो. या योजने मार्फत गुजरात मधील ८२१५ गावांतील १८ लाख हेक्टर जमीनच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

ही सर्व माहिती मान्यताप्राप्त गाईड प्रकाश तडवी याने दिली ...  काहीही मोबदला न घेता... प्रत्येक परिक्रमावासींनी आणि भारतीयाने जरूर पाहावे हे भारताचे गौरवशाली स्थळ आहे.

वाटेतील आदीत्येश्वर महादेव मंदिराला भेट दिली. येथे चहा मिळाला. पुढे दीड तासात टणकला गावात पोहोचलो. येथे केळी, पेरू आणि द्राक्ष असा फलाहार केला.
आता नानी अंबाजीकडे प्रस्थान केले. जीवनपूरा गावातील नानी अंबाजी मंदिरात पोहोचलो. नानी अंबाजी म्हणजे छोटे अंबाजी महाराज... मन प्रसन्न झाले.

दुपारचा एक वाजल्यामुळे कडकडीत ऊन पडलं होतं. परंतु मंदिर परिसर झाडांचा आणि हिरवळीचा असल्यामुळे थोडा विश्राम घेतला. गुळ खोबरे प्रसाद मिळाला. पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन पुढे प्रस्थान केले.

आता पायी पारिक्रमा मार्गावरून सायकलिंग सुरू केली दोन ठिकाणी पाण्याने भरलेले नाले, सायकल ढकलत ओलांडावे लागले. दगड धोंड्याच्या पाऊल वाटेवर सुद्धा सायकल ढकलाव्या लागल्या.

गठबोरिया गाव पार करून वाहास गावात आलो. येथे वाघेश्वर महादेव मंदिर आहे. येथील बाबाजींनी चहा प्यायला बोलावले. नानी अंबाजी वरून तीन तास सायकलिंग झाली होती. चहाची सुद्धा इच्छा मनात आली होती. मंदिर परिसर हिरवळीने नटलेला होता. विशेष म्हणजे दहा फूट उंचीची शंकराची मूर्ती येथे विराजित होती. 


आज कवाट गावात विश्राम घ्यायचे ठरविले होते. डांबरी रस्ता बराच तापला असल्याने सायकलचा वेग कमी झाला होता. वाटेत एक कलिंगडवाला भेटला. लाला धम्मक आणि रसदार कलिंगड खायला मिळाले. "चापरिया गावात रस्त्यावरच एका घरात अन्नक्षेत्र चालविले जाते; तेथे थांबा", असे कलिंगड बाबाजींनी सांगितले. निवांतपणे अख्खे कलिंगड खाल्ले. त्यामुळे  विश्रांती झाली आणि एनर्जी सुद्धा मिळाली.

सायंकाळी चापरिया गावात पोहोचलो. अमित पटेल यांचा हा फार्म हाऊस होता. आधीच आठ पारिक्रमावासी येथे आले होते.  संपूर्ण बंगल्यात आम्ही दहाजण होतो. पटेल दादांनी संपूर्ण फार्म हाऊस आमच्या ताब्यात दिले. किचनमध्ये सर्वकाही आहे, असे सांगितले आणि काही कामानिमित्त बाहेर गेले. या फार्म हाऊसच्या बाहेरील पोलवर भगवा झेंडा लावलेला आहे, त्या अनुषंगाने परिक्रमावासी येथे थांबतात.  फार्म हाऊस मध्ये घोडा पण बांधलेला होता. प्रेमाने आणि विश्वासाने परिक्रमावासीयांना बंगल्याची चावी देणे... ही मैंय्येची कृपाच म्हणावी...

  स्नानसंध्या केल्यावर मैय्या पूजन झाले. किचनचा ताबा घेतल्यावर पायी चालणाऱ्या  पारिक्रमावासींनी पोळी भाजी बनविण्याचे ठरविले. भांडी घासण्याची कामगिरी आम्ही दोघांनी स्वीकारली.
  तासाभरात भाजी पोळीचे  जेवण तयार झाले. जेवण झाल्यावर रात्री लाईट नसल्यामुळे सायकल टॉर्चच्या प्रकाशात भांडी घासण्या-धुण्याचे काम केले  आणि भांडी व्यवस्थित मांडून ठेवली. आज पर्यंतच्या परिक्रमेतील सदाव्रतचा पहिलाच प्रसंग होता.

रात्री निद्रा देवीच्या अधीन होण्याअगोदर आजच्या परिक्रमेच सिहावलोकन केले... नर्मदा मैय्या  अध्यात्मिकरीत्या महत्वाची आणि पूजनीय आहेच तशीच जीवनदायिनी सुद्धा आहे याची प्रचीती आली.             (श्री दत्त मंदिर, गरुडेश्वर)

सनातन धर्म आणि प्राचीन हिंदू संस्कृती याची माहिती तरुणपणातच व्हायला हवी याची जाणीव झाली.

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...