Friday, August 7, 2020

पुन्हा दिंडीगड सायकल सफर

पुनः दिंडीगड सायकल सफर

१ ऑगस्ट २०२०

"आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे काही चालेना" ही म्हण आज तंतोतंत खरी ठरली. आदित्यने आग्रह केला आणि दिंडीगडला जायचे नक्की झाले.

 काल राजेश बरोबर मुंब्रादेवी सायकलिंग करायचे ठरविले होते. निखिल आणि निलेशला सुद्धा तसाच निरोप दिला होता.  परंतु आदित्यची साथ म्हणजे सायकलच्या महाराजांची साथ असते, ती कशी सोडायची?  राजेशला फोन केला परंतु  दिंडीगडला खूप वेळ होणार म्हणून त्याने असमर्थता दर्शविली.
सायकलचे चाक बदलायचे म्हणून मुंबईवरून सकाळी  निघालो.   थेट ठाण्याला काका आदित्यच्या घरी जायचे होते.  मुलुंड टोल नाका ओलांडल्यावर चाक पंचर झाले, त्यामुळे काका रिक्षाने स्टँड बाय चाक घेऊन सर्व्हिस रोडला भेटला. तातडीने चाक बदलून आदित्यच्या घरी पंचर चाक ठेवले आणि तीन हात नाक्यावर बरोब्बर साडेसहा वाजता पोहोचलो.
निलेश डॉट वेळेवर आला, मागोमाग निखिल सुद्धा पोहोचला. काका सोबत अविनाश सुद्धा जॉईन झाला. अविनाशने नुकतीच पिवळ्या रंगाची कॅननडेल घेतली आहे. सायकलसह, अविनाश सुद्धा चमकत होता.  हिरेन आला, त्याने सर्वांच्या गाड्या ओके आहेत हे चेक केले आणि आम्ही दिंडीगडकडे प्रस्थान केले.

खारेगाव टोल नाका ओलांडून अंजुर फाट्यावरून पाईप लाईनच्या मार्गावरून राईड सुरू झाली.

 
हम पाच, चलेंगे साथ साथ, करत पक्षांचा किलबिलाट ऐकत भन्नाट वेगाने पुढे जात होतो. आदित्य सर्वांच्या पुढे जाऊन व्हिडीओ शूटिंग आणि फोटोग्राफी करत होता. गेल्या आठवड्यातच आदित्य सोबत ही राईड केली होती.  त्यामूळे रस्ता सरावाचा होता. 

वाटेत निखीलची गाडी पंचर झाली. आदित्य लागला कामाला. सायकलचा टायर सुद्धा फाटला होता. टायरमध्ये सपोर्ट म्हणून आदित्यने शंभर रुपयांची नोट ठेवली. 
नऊ वाजता सोनाळे गावात पोहोचलो. पायथ्याला एका दुकानात अमूल दूध आणि अंजीर मिठाई खाल्ली. चढ चढताना काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती आजही आदित्यने दिली.

आता सुरू झाली चढाई दिंडीगडाची. माझ्या आतापर्यंतच्या अप हिल राईड मधील ही कठीण राईड होती. गेल्या वेळच्या चढाईत दोन वेळा सायकल ढकलावी लागली होती. त्यामुळेच आजचा प्रयत्न होता, सायकल न ढकलता गड पार करणे. 

"करीता अथक सायास... अशक्य ते शक्य होईल खास"... हेच विचार ठेऊन गड चढायला सुरुवात केली होती.

हायब्रीड सायकलमुळे कोणतीही रिस्क नको म्हणून, निलेश थोड्याच वेळात सायकल ढकलत वर जाऊ लागला. त्याच्या चालण्याच्या वेगापेक्षा माझ्या सायकलचा वेग कमी होता. नेहमीप्रमाणे आदित्य सर्वांना चिअर अप करत होता. फुर्तीला अविनाश भराभर  पेडलिंग करत पुढे गेला होता. अर्ध्या रस्त्यात निखीलची विकेट पडली.  म्हणाला, 'तुम्ही जा पुढे, मी थांबतो इथेच'. आदित्य काकाचा डायलॉग मी मारला, 'वरून जे सृष्टी सौंदर्य दिसणार आहे, ते इथून नाही दिसणार'. 

आदित्यच्या डोक्यात वेगळीच आयडिया घोळत होती.  त्याने सॅक मधून मजबूत पातळ दोरी काढली. दोरीची एक बाजू निखिलच्या सायकल हँडलला बांधली आणि दुसरी बाजू स्वतःच्या सायकल कॅरियरला बांधली. आता सुरू झाली निखीलची टोइंग सायकल. 

खरंच... मानलं पाहिजे या आदित्यला. एव्हढया कठीण चढावर स्वतःची सायकल चढविणे दमछाक करते, तेथे आदित्य दुसऱ्याची सायकल खेचत होता. अचाट आहे आदित्य. खरच अशी व्यक्तिमत्व क्षणाक्षणाला काही नवीन शिकवीत असतात. जीवापाड परोपकार, जे आपल्याकडे आहे ते भरभरून देण्याची कला, आदित्यकडून शिकावी.
या आदित्यचा जास्तीत जास्त सहवास मिळण्यासाठी त्याच्या बरोबर मोठी राईड करायचा मनात संकल्प केला.

एका कठीण चढावर माझी सायकल घसरली आणि मी चक्क उलटा पडलो. झिकझांक करताना सायकल रस्त्याबाजूच्या  मातीत गेली आणि माझा बॅलन्स गेला. समोरचा रस्ता एकदम चढाचा होता. थोडावेळ दमछाक घेऊन सायकल ढकलत तो कठीण पॅच पार केला. त्यानंतर पेडलिंग सुरू केले.

निखिलला वर सोडून, मला मदत करायला आदित्य पुन्हा खाली यायला निघाला होता. परंतु मी पेडलिंग करताना पाहून आदित्य, अविनाश, निलेश आणि निखिल  चिअर अप करायला लागले. शेवटचा शंभर फुटाचा सिमेंट काँक्रीट टप्पा त्याच जोशात  न उतरता पार केला आणि थेट मंदिराच्या पायथ्याला येऊन थांबलो.  

आज एका तासात अप हिल पूर्ण झाले होते. परंतु एक ठरवले, 'मंजिल अभी बाकी है मेरे दोस्त, फिर एक बार आयेन्गे'. नॉन स्टॉप चढाई साठी...
मंदिराच्या पायथ्याला सायकल बांधून,  सर्वांनी शेवटचा पाचशे फुटाचा ट्रेक सुरू केला. गडावरून दिसणारे विहंगम दृश्य पाहून सर्व नवे सदस्य स्तिमित झाले. निलेशने मनोमन ठरविले, या दिंडीगडावर सहकुटुंब यायचे. बऱ्याच वेळा टेकडीवरचे हे दिंडेश्वर महादेव मंदिर निलेशने मोटार सायकलिंग करताना पाहिले होते, पण आज प्रथम तो गडावर आला होता. प्रचंड खुश झाला होता निलेश.
देवदर्शन आटपून खाली सायकल स्टँड जवळ आलो. आज आदित्य आम्हाला नवीन स्पॉट दाखवणार होता. ऑफ रोडिंग सायकलिंग करत पाच मिनिटात दिंडेश्वरी माता भैरवी देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. 
अतिशय निसर्गरम्य परिसर आणि विशेष म्हणजे पाण्याची मुबलक सोय होती. दर्शन घेऊन मंदिरातच नाश्त्यासाठी बसलो. निखिलने कंदापोहे आणले होते, तर निलेशने डायटचिवडा काढला. माझ्याकडचे ड्रायफ्रुट बाहेर आले.  मंदिराच्या पुजारी दादांनी तांब्यातून पाणी दिले. सुरू झाले वनभोजन. पक्षांचे आवाज, झाडांची सळसळ आणि पुजारी दादांचे बोलणे मनाला खूप भावले. निखिलने भरपूर कंदापोहे आणले होते. त्या सोबत निलेशचा डायट चिवडा आणि पायथ्याला घेतलेली अंजीरची मिठाई, एकदम फर्मास बेत होता न्याहरीचा. डायफ्रूट मधील सुका आवळा अविनाशला खूप भावाला. 

आज पाऊस असता तर काय मजा आली असती,  असा घोषा निखिल करत होता. निखिलला हसत हसत सांगितले, राजा, जो निसर्ग आता दिसतोय, तो एन्जॉय केला पाहिजे. ना की जे नाही त्याबद्दल दुःख करणे. निसर्ग थोडाच आपल्या म्हणण्याप्रमाणे वागणार आहे. म्हणूनच निसर्ग आता जे देतोय, जे दाखवतोय,  ते भरभरून घेतलं पाहिजे, त्यात खरा आनंद आहे. माझे बोलणे आदित्यला पटले,  तो गालातल्या गालात हसत होता.

पुजारी दादांनी व्हॅलीत असलेल्या पाताळेश्वर भैरव मंदिराची माहिती दिली. त्या मंदिराला सुद्धा भेट द्यायचे ठरले. आदित्य सोबत अविनाश आणि मी सायलकलिंग करत थोडे खाली उतरलो. निखिल आणि निलेश मधल्या पाऊल वाटेने खाली उतरत होते. एका ठिकाणी आल्यावर तेथून सायकलिंग करत खाली व्हॅली मध्ये जाणे शक्य नव्हते. सायकल तेथेच ठेऊन पाचशे फूट दरीत उतरलो.

 सायकलिंग नंतर  ट्रेकिंगला खूप मज्जा आली. व्हॅलीतील एका उतरणीवर पाताळेश्वर भैरवनाथाचे मंदिर विराजमान होते.
 हे पांडवकालीन मंदिर भग्नावस्थेत होते. मंदिराचे मोठे मोठे पत्थर खालील ओढ्यात पडले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खचुन मंदिराच्या भिंती ढासळल्या होत्या.  गाभारा आणि भैरवनाथाचे लिंग शाबूत होते. नुकतच शिवलिंगाला बेलपत्र आणि फुलांनी सजविले होते. 

देवदर्शन करून बाजूच्या ओढ्यात पाय सोडून बसलो. आजूबाजूचा निसर्ग पाहून मन एकदम प्रसन्न झाले.  
संपूर्ण व्हॅली आणि समोर दिसणारा डोंगर हिरवाईने नटला होता. हिरव्या रंगाच्यासुद्धा खूप वेगवेगळ्या छटा दिसत होत्या. झुळझुळ वाहणारा ओढा, त्याचा खळखळ आवाज, मोरांचा केकारव, पक्षांचा किलबिलाट, पानांची सळसळ, आकाशात ढगांचे विहरणे,  एकामागे एक असणारे डोंगरांचे हिरवे पदर पाहून  विंदा करंदीकरांची कविता आठवली.

देणाऱ्याने देत जावें;   घेणाऱ्याने घेत जावें.

हिरव्यापिवळ्या माळावरून;  हिरवीपिवळी शाल घ्यावी...

वेड्यापिशा ढगांकडून;  वेडेपिसे आकार घ्यावे...

घेतां घेतां एक दिवस;  देणाऱ्याचे हात घ्यावे !

निसर्ग भरभरून जे देतोय; तेच सर्वाना वाटण्यासाठी मनात काही शब्दसुमने प्रसवली.

निसर्ग असा अजब लहरी

खेळ दाखवितो कितीतरी

पाहता त्याला  आनंदिसी

सुंदर वर्णन त्याचे  लिहिसी

दृष्टी लाभतसे वाचकास दिव्य

मोद भरतो जीवनी अतिभव्य

सायकल अन् मित्रांसोबत

निसर्ग वेडा फिरतो अविश्रांत !!!

भान हरपून गेले हा निसर्गाचा आविष्कार पाहून. व्हॅलीमध्ये एक पाऊल वाट उतरत होती. खाली ओवळे गाव वसलेले होते. घरांच्या छपराची लाल कौले छोट्या छोट्या पाखरांसारखी दिसत होती. दूरवर हायवे दिसत होता. वेगात जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या परंतु गाड्याचे आवाज येत नव्हते. 
आदित्य आणि अविनाश मंदिराबाजूच्या छोट्या शेडमध्ये पहुडले. निलेश, निखिल आणि मी ओढ्यात गप्पा मारत बसलो होतो. मुंबईच्या जवळ एव्हढा निसर्गरम्य, अदभूत परिसर पाहून सहकुटुंब एकदिवसाची सहल काढायचे मनात ठरविले. आदित्य काकाने तर खाली जाणाऱ्या पाऊल वाटेने ऑफ रोडिंग सायकलिंग करायचे सुद्धा नक्की केले.
अविनाशच्या पायाखाली काहीतरी वळवळले, बघतो तर एक खेकडा होता. त्याला पकडून साहसी खेकडया बरोबर अविनाशचा फोटो काढला. हळूच त्याला दगडात सोडून दिले.

 आदित्यने मग नारळ पाण्याचे पावडर सॅचे काढले. मोठ्या पाण्याच्या बाटलीत ते टाकल्यावर शहाळ्याचे पाणी तयार झाले. बहारदार नारळ पाण्याचा आस्वाद सर्वांनी घेतला. काकाने मंदिराच्या डागडुजीचे काम करणाऱ्या गावकऱ्यांना सुद्धा नारळपाणी  दिले. खरच... समयसूचकता काकाकडून शिकावी.
दुपारचा एक वाजला होता. पुन्हा ती दरी चढत पार करून वर आलो आणि सायकलिंग करत दिंडेश्वरी भैरवी मातेच्या मंदिरात आलो. 

मंदिर परिसरात काही हिंदी भाषिक मंडळी जेवण बनवीत होती. त्यांचा एक मोठा गृप देवदर्शनासाठी ट्रेक करत वर येणार होता. गोवऱ्याच्या चुलीत त्यांनी बटाटे भाजले होते. त्या गावरान धुराच्या वासाने ते भाजलेले बटाटे खाण्याची मनोमन इच्छा झाली. म्हणतात ना.. परमेश्वराच्या दारात मनापासून झालेली इच्छा पूर्ण होते. त्या मुख्य आचाऱ्याने मला बोलावून दोन मोठे भाजलेले बटाटे आणि मीठ दिले. काळपट, मातकट झालेल्या साली काढून मीठ लावून ते बटाटे खाताना आपसूक डोळे मिटले आणि मन त्या बटाट्याचा स्वाद घेण्यात तल्लीन झाले. त्यानंतर पुजारी दादांनी जडीबुटीयुक्त लेमन चहा दिला. या प्रेमळ आदरतिथ्याने सर्वजण प्रचंड आनंदलो.

या आनंदाच्या भरातच दिंडीगड उतरलो. पायथ्याला घरच्यांसाठी मिठाई घेऊन सोनाळे गाव पार करून हायवेला आलो. खारेगाव टोल नाका ओलांडुन मलईदार नारळ पाणी प्यालो. तीन हात नाक्यावर सर्वांना राम राम करून,  एकटाच,  उरात भरलेल्या निसर्गासोबत मुंबईला घराकडे निघालो.

आजची दिंडीगड सफर मित्रांच्या साथीने आणि आदित्य काकाच्या शोधक वाटांमुळे अविस्मरणीय झाली होती.

आझाद पंछी ...

4 comments:

  1. Wow.. masta vatla vachun. Karaylach hawi aata ekhadi Ashi trip. 😄

    ReplyDelete
  2. मित्र गजरे यांचे अभिप्राय

    तुमच्या साहसगिरीला पुन: पुन: सलाम.🙏🙏

    अरे हो.निसर्गाचे छायाचित्रण अप्रतिम आणि त्यावर सुंदर शब्दांची महिरप.🙏

    ReplyDelete