Wednesday, August 12, 2020

तानसा सायकल राईड


तानसा राईड 

९ ऑगस्ट२०२०

आदित्य काकाने निरोप दिला, सकाळी सहा वाजता तीन हात नाक्यावर आपण जमतोय, तानसा राईड करायची आहे.  तयारी झाली आणि सकाळी साडेचार वाजता मुंबई वरून सायकलिंगला सुरुवात केली.  खूप दिवसांनी एव्हढ्या पहाटे राईड करत होतो. तानसा पल्ला मोठा होता, परंतु मनाने ठरविले होते, हा टप्पा पूर्ण करायचाच.

पुढचा आणि मागचा लाईट लावला.  स्पीकरवर 'ओम नमः शिवाय' धून चालू करून पेडलिंगला सुरुवात केली. रात्री मोठा पाऊस पडून गेला होता. पहाटे कुत्र्यांनी स्वागत केले.  वातावरण अतिशय शांतनिवांत होते. रस्त्यावर एखादं दुसरी गाडी दिसत होती.

 सोलो रायडिंगची एक वेगळी मजा असते. कोणाची वाट पाहणे नाही, कोण मागे राहिलाय, कोण पुढे गेलाय याची चिंता नाही. कोणासाठी थांबणे नाही. आपल्याच मस्तीत, गाणी गुणगुणत, निसर्गाचा आस्वाद घेत सायकलिंग करणे म्हणजे एक प्रकारची ध्यानधारणा असते. आपणच आपणाशी बोलत असतो. 

 विशिष्ट वेगाने चाललो होतो. सायकलच्या हँडलला लावलेला प्रखर दिव्याबरोबर, हेल्मेटला लावलेला हेडलॅम्प सुद्धा सुरू केला. त्याचा एक फायदा जाणवला. अंधारात कोणत्या गियरमध्ये सायकल आहे, ते पाहता येत होते. तसेच डाव्या किंवा उजव्या बाजूला वळताना मागील गाडीला हात दाखवताना, हातात घातलेल्या रिफलेक्टिव्ह  ग्लोव्हजवर हेडलॅम्पचा प्रकाश टाकून व्यवस्थित इंडिकेशन देता येत होते.

पावणे सहा वाजता मुलुंड ऐरोली फाट्यावर पोहोचलो आणि सायकल पंचर झाली. ज्या ठिकाणी पंचर झाली तो भाग अंधारात होता. मुलुंड ऐरोली सिग्नल पर्यंत सायकल ढकलत न्यायचे ठरविले, इतक्यात आदित्य काकाचा फोन आला. काकाला परिस्थिती सांगितल्यावर काका म्हणाला, 'एक दीर्घ श्वास घेऊन रिलॅक्स व्हा आणि आहात तेथेच ट्यूब बदला'. मी एकदम रिलॅक्स झालो. हेड लाईटचा ब्लिन्कर चालू करून सायकलच्या मागे ठेवला. ओल्या रस्त्यावर बैठक मारली आणि अंधारात सायकल उलटी करून हेल्मेटच्या लाईटचा उजेड मागच्या चाकावर टाकून चाक बाहेर काढले. संपूर्ण टायर तपासून बारीक खिळा काढून टाकला आणि नवीन ट्यूब घालून,  चाक ओके केले. खरंच काकाच्या एका फोन कॉलने मला लयभारी ऊर्जा दिली होती. आता ढगातून सूर्य किरणे धरणीवर यायचा प्रयत्न करीत होती.
अंमळ पंधरा मिनिटे उशीर झाला,  तीन हात नाक्यावर पोहोचायला. काका आणि अतुल यांनी मला चियर अप केले. बाकीची मंडळी माजीवडे जंक्शनला उभी होती. राजेश खारेगाव नाक्यावर भेटणार होता. 

पाच मिनिटात माजीवडे जंक्शनला पोहोचलो. आदित्य काकाने सर्वांची ओळख परेड स्वतः पासून सुरू केली. माझी ओळख आझाद पंछी म्हणून करून दिली. अविनाश, शशिकांत, ब्रिजेश, बलवंत, ऍल्डन उर्फ अल्लादिन, सुप्रिय, डॉ सुमित राठोड,  चिराग, प्रशांत, अतुल आणि डॉ राजेश असे तेरा  समर्पयामि साथीदार निघाले होते तानसा निसर्ग भ्रमणाचा आनंद लुटायला.

 चिराग आणि प्रशांत जुळे भाऊ वाटत होते, दोघांनी हिरवा फ्लूरोसंट टीशर्ट घातला होता.

एक्सपर्ट तंत्रज्ञ हिरेन आमच्या सेवेला हजर होता. त्याने सर्वांचे टायर तपासले, हवा भरली तसेच सायकलचे नट बोल्ट टाईट केले. राजेशची खारेगाव नाक्यावर भेट झाली. आज एकदम खुशीत होता राजेश.

पूर्व द्रुतगती मार्गावरून राईड सुरू झाली. आज पाईप लाईन टाळून हायवे वरून राईड करायची होती.  काकाने सर्वांना सांगितले, ' जोडी जोडीने सायकलिंग करायची नाही. एकामागे एक पेडलिंग करा'. हायवेला रहदारी खूप जास्त असल्यामुळे अतिशय महत्त्वाची होती ही सूचना. 

सायकलिंग करताना एक कार, मागच्या स्टँडला सायकल अडकवून पुढे जाताना दिसली. थोडे पुढे जाऊन ती कार थांबली. माझे परममित्र प्रविणकुमार कुलथे बाहेर आले. तानसा राईड बद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रवीण आपल्या गावाला नांदेडला सहकुटुंब सायकल घेऊन निघाले होते. मागे अडकवलेल्या सायकलची दोन्ही चाके गाडीच्या बाहेर आली होती. 

सायकलिंग मध्ये माहीर असलेले अविनाश, शशिकांत, ब्रिजेश, बलवंत, ऍल्डन, अतुल आणि डॉ राजेश वेगात पुढे निघाले.  आदित्य थोडावेळ पुढे थोडावेळ मागे राहून मागे राहणाऱ्यांना चिअर अप करत होता. मी सुप्रियच्या मागे पेडलिंग करत होतो.
साधारण तीस किमी पुढे गेल्यावर बोयसरपाडा येथे सुप्रियची सायकल पंचर झाली. नवखा सुप्रिय जरा अपसेट झाला होता. मी पुढे येऊन थांबलो. त्याला धीर दिला आणि तातडीने सायकल उलटी करून मागचे चाक बाहेर काढले. टायर मध्ये बारीक खिळा निघाला. नवीन ट्यूब टाकून सुप्रियची सायकल टकाटक केली. ऐरोली मुलुंड जवळ माझ्या सायकलचे पंचर काढणे, येथे कामी आले होते.

इतक्यात मागून आदित्य आला. सुप्रियची सायकल अपडेट केल्याबद्दल त्याने धन्यवाद दिले. पुनः सुरू झाली मागच्या फळीची सायकलिंग. 
सूर्य वर आला होता. आकाशात ढग असल्यामुळे प्रकाश मंद होता. भुरभुर पावसामुळे रस्ते ओले होते.  सर्वांच्या मध्ये एकदम मजेत सायकल राईड सुरू झाली होती. 

आता ठाण्यावरून जवळपास पन्नास किमी राईड झाली. पडघा टोल नाका पार करून शहापूर हायवे जवळील मॅक्डोनाल्डकडे  हायड्रेशन ब्रेक घेतला. काकाने ड्रायफ्रूट आणि काढा काढला. शशिकांतने खजूर तर बलवंतने चटपटीत चणे काढले. माझ्या ड्रायफ्रूट डब्यातील शेंगदाणे अविनाशला आवडले. 

ब्रिजेशने तेव्हढ्यात जोक केला, "आपल्या गृप मध्ये सर्वात कमी शिकलेले फक्त दोनच व्यक्ती दिसतात" आता त्या कोण व्यक्ती हे ब्रिजेशकडूनच ऐकावे. इतक्यात एल्डनच्या डोक्यावरील लाईटला एक वायर लटकताना दिसली,  कसली वायर हे विचारताच, एल्डन म्हणाला हॉर्नची.  हेल्मेटवरचे बटन दाबून त्याने हॉर्न वाजवून दाखवला. सायकल चालू असताना हँडल वरचा हात काढून हेल्मेटला असलेले बटन दाबून हॉर्न वाजविणे मला खूप रिस्की वाटले.

सर्व रायडर एकत्र येण्यासाठी थोडावेळ थांबलो. शेवटचा रायडर सुप्रिय थोड्याच वेळात आला. पाणी भरून घेतले. पुढची राईड सुरू झाली. पुढे दोन किमी वर तानसा बायपास लागणार होता. 

आटगाव स्टेशन जवळील रेल्वे फाटक ओलांडले आणि हायवे सोडून तानासाकडे राईड सुरू झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आणि भातशेती बहरली होती. 
हिरव्या हिरव्या गवतावर छोटी छोटी पिवळी लाल फुले उगवली होती. निसर्गाची ही रांगोळी पाहून मन प्रसन्न झाले. या वातावरणात काही शब्द सुमने सहज अवतरली.

पाऊलवाटा हिरव्या ओल्या 

 पानांवर पागोळ्या गळल्या 
 
 सुवासिक फुलांनी मोहविलें
 
 फुलपाखरांना  रंगही  दिलें
 
 सुरंगी फुले लाल लाजली
 
 हिरवी पाने हळूच डोलली
 
 थेंब पाण्याचे छान चमकले
 
 रवी तेज पिऊन ते सजले 
 
 सप्तरंगाचा रम्य नजराणा
 
 मिरवितो हा निसर्ग राणा
 
 एक दृष्टी पडता त्यावर 
 
 सुखविते हे अपुले अंतर

रम्य निसर्गानंद दाटे नयनात

आनंद तरंग लहरले तनामनात

आता राजेशच्या मागे माझी पेडलिंग सुरू होती. शेतातून झुळझुळ वाहणारे पाणी खुणावत होते. 


पुढे  छोट्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली सुबाभूळ आणि भेंडाची झाडे, रस्त्याला एक राजेशाही थाट आणत होती. या मार्गातून सायकल चालविताना डोक्यावर छत्रचामर असल्याचा भास होत होता. 

 चार किमी पुढे गेल्यावर तानसा तलावचे चेक पोष्ट लागले. चेक पोष्टच्या थोडे पुढे हायड्रेशन ब्रेक घेतला. सर्व सवंगडी एकत्र आल्यावर बरेच फोटो काढले.


थोड्याच वेळात तानसा धरणाजवळ पोहोचलो. धरणाकडे जाणारा रस्ता बंद होता म्हणून मुख्य प्रवेशद्वाराजवळ फोटो काढले.  तसेच मोडकसागरला जाणाऱ्या तलाव रस्त्याने पुढे निघालो. येथून मोडक सागर धरण बावीस किमी अंतरावर आहे. 

चार किमी पुढे गेल्यावर रस्त्यात एक पोलीस चौकी लागली. तेथे मोडकसागर आणि तानसा तलावाच्या बोर्डावर बृहन्मुंबई महानगर पालिकेचे नाव वाचून मन उचंबळून आले. प्रेमाने त्या बोर्डला
 मिठी मारली. माझ्या महानगर पालिकेच्या अतिशय उत्कृष्ट आणि कर्तृत्ववान अभियंत्यांनी ही दोन्ही धरणे बांधली आहेत. महापालिकेचे प्रमुख अभियंता माननीय मोडक साहेबांच्या अथक प्रयत्नाने मुंबईला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी वैतरणा नदीवर मोठे  धरण बांधले गेले.  त्यांच्या गौरवप्रित्यर्थ वैतरणा धरणाला मोडकसागर धरण नाव देण्यात आले आहे.

दोन  किमी पुढे गेलो, तेथे कौलारू घरे दिसू लागली. कोकणासारखी  टिपिकल घरे होती.  घरांच्या आसपास भातशेती तरारून आली होती.

 तानसा तलावा मधून मुंबईकडे जाणाऱ्या पाईपलाईन रस्त्याने मार्गक्रमण सुरू झाले.

 हा रस्ता तानसा तलावाच्या कडेकडेने जातो. मोठ्या पाईप लाईनच्या मधून आमची सफर सुरू होती. एका पुलाजवळून तानसाचे पाणलोट क्षेत्र दिसू लागले. त्या ठिकाणी ब्रिजेश, सुप्रिय आणि सुमित थांबले. 
बाकीचे पुढचा मोठा चढ पार करायला निघाले.  माझ्या सोबत अतुल, चिराग आणि प्रशांत होता. बाकी फास्ट रायडर पुढे गेले होते. एका ठिकाणाहून तानसा तलावाचे विहंगम पात्र दिसत होते. त्याठिकाणी आम्ही चौघांनी पडाव टाकला. सुरू झाले आमचे वनभोजन.

 घरून बायकोने पनीर बुर्जी आणि पोळ्या दिल्या होत्या तर अतुलने बाजरीच्या रोटल्या आणि गूळ आणला होता.  बुर्जी प्रशांतला खूप आवडली. जबरदस्त भूक लागल्याने सर्व जेवण फस्त झाले. आम्ही सर्व आता त्या भल्यामोठ्या पाईप वर चढलो. पाईपवरून तानसा परिसर विहंगम दिसत होता. पाईपवर बसून फोटो काढले.

 नंतर पाऊस आला म्हणून पाईपच्या खाली बसलो. भल्या मोठ्या पाईपवरून घरंगळत येणारे पाणी डोक्यावर टपकत होते. त्या पडणाऱ्या थेंबांचे ओघळ बालपणात घेऊन गेले. आम्ही पाईपच्या वरखाली अक्षरशः बागडत होतो. 
पुढे लूप मारायला गेलेल्या मंडळींची तेथेच वाट पाहत होतो. तानसा तलावाला मनात साठवत होतो.

  राजेश, अविनाश, आदित्य, शशिकांत, एल्डन आणि बलवंत पुढचा लुप मारून परत फिरले.
लूप मारताना आदित्यला तलावात मासेमारी करणारी गावकरी मावशी भेटली. मावशीला आदित्यने आपला गॉगल डोळ्यावर लावायला दिला आणि तिच्याबरोबर फोटो काढले.

 मागे आल्यावर सर्वांसह तानसाच्या पहिल्या पडावाकडे आलो.  तेथून ब्रिजेश, सुप्रिय आणि सुमितसह पोलीस चेकपोष्ट पर्यंत सायकलिंग केले.

येथे मयुरेश टेम्पो आणि जेवण घेऊन जिनेश आणि हिरेनसह पोहोचला होता. दुपारचे अडीच वाजले होते. आमची तानसा सायकल राईड पूर्ण झाली होती. हिरेनने सर्व सायकलींची चाके काढून  फ्रेम आणि चाक टेम्पोत भरले. 

 मयुरेशने आमटी, भात, पोळी आणि बटाटा भाजी घरून  आणली होती. जिनेश त्याच्या मदतीला होता. पोलीस चेकपोष्ट जवळच आम्ही जेवायला सुरुवात केली. तेव्हढ्यात झोपेतून उठलेला पोलीस हवालदार, 'तुम्ही येथे कसे आलात, तुम्हाला परिस्थिती काय चालली आहे माहीत आहे काय'. 'आता सर्वांनी हॉस्पिटल मध्ये चला, सर्वांची करोना टेस्ट करूया', अशी भाषा करू लागला. आता आम्हाला पुढ्यातले जेवण सुद्धा खाल्ले जाईना.
 
 इतक्यात ब्रिजेशने आपला मोबाईल त्या हवालदाराच्या हातात दिला.  मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी मोरे साहेबांनी (आमचे सायकालिस्ट मित्र) त्या हवालदाराची समजूत काढली. तेव्हा कुठे तो शिपाई शांत झाला. विश्वनाथ मोरे सर  अतिशय सहृद आणि सतत  मदतीसाठी तत्पर असतात याचा प्रत्यय आला.  सायकलिंगमुळे निसर्गाची जवळीक होते आणि त्यामुळेच मदत करण्याची प्रवृत्ती आणखी वाढते, हे आदित्यचे  म्हणणे मला पटले.
 
कसेबसे जेवण जेवून सर्व जण गाडीतून ठाण्याकडे ताबडतोब निघालो. आदित्यच्या मेहुण्याच्या गाडीत मी, अतुल, शशिकांत, अविनाश आणि आदित्य बसलो. कपडे ओले होते.  बाकीचे मयुरेशच्या आणि जिनेशच्या गाडीत बसले. टेम्पोमध्ये ड्रायव्हरसह हिरेन बसला. 

खर्डी नाक्यावर गाडी थांबली. तेथे आदित्यने गावरान भाज्या घेतल्या, आणि इतरांना ही भरभरून दिल्या. परोपकार किती पराकोटीचा असू शकतो हे आदित्य कडून शिकावं.

 खारेगाव टोल नाक्याच्या पुढे रुस्तमजी पार्क जवळ गाड्या आणि टेम्पो थांबला. तातडीने सर्वांच्या सायकली हिरेनने टेम्पोतून बाहेर काढल्या. मग सुरू झाली प्रत्येकाची चाक लावायची प्रॅक्टिस. अविनाशने सायकलला दोन्ही चाके लावली.  तरी बरोबर लावली का, हे माझ्याकडून तपासून घेतले. 
 
सर्व सायकल टकाटक तयार झाल्या. राजेश कळव्याला जवळच राहायला आहे, त्याचा पहिला निरोप घेतला. बाकीची मंडळी ठाणे परिसरात राहणारी होती. मला लोअर परेल गाठायचे होते, तर अतुलला गोरेगाव पर्यंत राईड करायची होती.

 माजीवडे जंक्शनला अतुल घोडबंदरकडे वळला. माझ्यासह चिराग, प्रशांत आणि अविनाश तीन हात नाक्याकडे निघालो. अविनाशला कॅडबरी जंक्शन जवळ आणि अतुलला तीन हात नाक्यावर तर प्रशांतला मुलुंड टोल नाक्यावर राम राम करून निरोप दिला. 

माझी राईड सुरू झाली घराकडे. अजून तीस किमी सायकलिंग करायची होती. मध्ये गॅप घेऊन पुन्हा सायकलिंग करणे, त्यासाठी शरीर वॉर्म अप करणे अतिशय आवश्यक असते. म्हणून सावकाश पेडलिंगला सुरुवात केली. मांड्या जवळ हुळहुळत होते. विक्रोळी गोदरेज गार्डन जवळ जोरदार पाऊस सुरू झाला. नखशिखान्त भिजलो.  सर्व मोटारसायकलवाले आडोसा शोधत झाडाखाली थांबले होते. वरून जोरदार पाऊस आणि रस्त्यावरून उडणारे  पाण्याचे तुषार म्हणजे माझी पर्वणी होती. सायन पर्यंत सतत पाऊस पडत होता. पाऊस थांबला आणि गरम व्हायला सुरुवात झाली. कमरेच्या खालील भागात खाज सुरू झाली. सीटवर बसणे सुद्धा आता कठीण वाटत होते. त्यामुळे सायकल धीम्या गतीने चालवत सुखरूप घरी पोहोचलो. रात्रीचे पावणे आठ वाजले होते. आज एकूण 151 किमी राईड झाली होती.

आदित्यचा फोन आला, त्याला सायकलिंग सुखरूप झाले हे त्याला सांगितले. मांड्याच्या आणि कमरे खालच्या भागातील खाजेसाठी कडूलिंबाचे तेल अतिशय गुणकारी आहे, ही माहिती आदित्यने दिली. 

मोठ्या सायकलिंग ट्रेलसाठी, मानवी एनर्जीचे तीन लेव्हल असतात आणि ते कसे काम करतात याची माहिती आदित्यने दिली. सकाळची एनर्जी लेव्हल खूप उच्च असते, त्यामुळे सकाळी जेवढ्या लवकर पेडलिंग करता येईल ते करावे. दुपार नंतर जेवणामुळे तसेच उन्हामुळे एनर्जी लेव्हल खूप कमी होते. त्यामुळे सकाळपेक्षा तेवढ्याच वेळात अर्धेच अंतर जाऊ शकतो. आणि तिसरी एनर्जी लेव्हल फक्त डू ऑर डाय सिच्युएशन मध्येच जागरुत होते.  ही सर्व माहिती  आदित्य काकाच्या अनुभवाचे बोल होते. ह्या एनर्जी लेव्हलची प्रचिती  मुंबई कन्याकुमारी सायकल ट्रेल मध्ये घेतली होती.

आजच्या तानसा सायकलिंग सफरीत नवीन समर्पयामि सदस्यांच्या ओळखी झाल्या. तसेच प्रत्येकाला फार जवळून पारखता आले. अविनाश सारखा केअरींग मित्र मिळाला,  तर डॉ राठोड मधला जिंदादिल सुमित पहिला. सुमितचा अर्थ सुंदर आणि सुशील आहे. सुप्रिय माझ्या सायकल पंचर मदतीने भरवला होता. आपणसुद्धा वेळप्रसंगी इतरांना मदत करायला पाहिजे, ही भावना त्यात जागृत झाली होती.  एल्डन आणि शशिकांत सुद्धा खुष मिजाज आहेत. शशिकांतची इच्छा होती, टेम्पो ऐवजी ठाण्यापर्यंत सायकलिंग करायची. परंतु साथीला कोणीही नसल्यामुळे त्याला बेत रद्द करावा लागला. 

मस्तीखोर ब्रिजेश उर्फ बिरजू  आणि आयर्नमॅन बलवंत माझे जुने दोस्त आहेत. ब्रिजेशला आता दिल्ली मुंबई राईड करायची आहे.  बाकीचे सर्व माझे जिगरी आझाद पंछी आहेत.

 आदित्य काका आम्हा सर्वांचा मुकुटमणी आहे.

तानसाच्या निसर्ग सौंदर्याबरोबर सुंदर मनाच्या मित्रांची नव्याने ओळख झाली होती. 

सतीश जाधव
आझाद पंछी....

13 comments:

  1. नेहमीप्रमाणेच अप्रतिम. हर एक राईड नाव अनुभव देते.हे अनुभव तुमच्या खास शैलीत ऐकणे खुपच आनंददायी आहे.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच अप्रतिम. हर एक राईड नाव अनुभव देते.हे अनुभव तुमच्या खास शैलीत ऐकणे खुपच आनंददायी आहे.

    ReplyDelete
  3. भाई आहेस तू
    साष्टांग नमस्कार 🌹👍👌🙏

    ReplyDelete
    Replies
    1. राजेश भाऊ!!!

      तुझ्या सारखा दोस्त असेल तर सारं काही शक्य आहे.

      Delete
  4. भाई आहेस तू
    साष्टांग नमस्कार 🌹👍👌🙏

    ReplyDelete
  5. भाई आहेस तू
    साष्टांग नमस्कार 🌹👍👌🙏

    ReplyDelete
  6. क्या बात हे सर.. 👍🏻👍🏻 अप्रतिम 🤘🏻

    ReplyDelete
  7. लेख आवडला! फोटो मस्त आलेत. मुंबईची खूप आठवण येतेय.

    ReplyDelete
  8. निनाद ये लवकर सायकलिंग करायला.....

    वाट पाहतोय!!!

    ReplyDelete
  9. अप्रतिम व सुरेख लेख वाचल्यावर स्वतः राइड केल्याचा भास झाला. नेहमीप्रमाणेच अप्रतिम.हे अनुभव तुमच्या खास शैलीत ऐकणे खुपच आनंददायी आहे..........


    ReplyDelete
  10. भास्कर राव,

    धन्यवाद !!!

    तुमच्या सोबत सायकलिंग करायची आहे.

    ReplyDelete