Tuesday, December 15, 2020

सायकलिंग आणि जिजाऊ, शिवरायांचा आशीर्वाद...

सायकलिंग आणि जिजाऊ, शिवरायांचा आशीर्वाद...

१५.१२.२०२०

नियमित सायकलिंग सुरू करून तीन वर्षे पूर्ण झाली... खरच एक गोड स्वप्नच आहे सायकलिंग म्हणजे... या काळात नवनवीन मित्र मिळाले... किंबहुना मित्रमंडळींचे कुटुंबीय सुद्धा ओळखू लागले...  सायकलिंग बरोबर लिहिण्याची उर्मी उफाळून आली... निसर्गाचे नवोन्मेषकारी रूप आकळून... लेखणीद्वारे शब्दरूपाने  प्रकट होऊ लागले... हे लेखन पुन्हा वाचताना.. सायकलिंगचा आनंद द्विगुणित होऊ लागला... 

ना कोणाशी स्पर्धा... ना कोणत्याही BRM सारख्या इव्हेंटमध्ये सहभाग... निव्वळ आणि निव्वळ आनंद मिळविण्यासाठी आणि वाटण्यासाठीच सायकलिंगचा ध्यास... नवनवीन मित्र जमविणे... त्यांच्या अनुभवावरून आपल्या ज्ञानाची कक्षा वाढविणे... तसेच आलेले अनुभव सर्वांना शेअर करणे... हाच ध्यास...

या ध्यास पर्वातूनच आजची राईड करण्याचे ठरविले. प्रात:प्रहरी सायकलिंग अतिशय चांगली आणि जोमदार असते हे बरेच वेळा आदित्य काका कडून ऐकले होते. म्हणून सुरू केली आजची राईड... सकाळी ५.५० वाजता लोअर परेल वरून... 

घनमिल नाक्याजवळ जिजाऊंचा छावा म्हणून अतिशय प्रतिकात्मक शिल्प लावले होते... तळहातावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप असलेले हे शिल्प अतिशय बोलके होते. जणूकाही जिजाऊ मातेने हिंदवी स्वराज्याची जबाबदारी बालपणीच शिवबांना सोपविली होती...

खरं आहे... छत्रपतींच्या हिंदू पतपातशाही... हिंदवी स्वराज्य स्थापनेमुळेच...  आज आपण हिंदू म्हणून भारतात जन्माला आलोय... त्या जिजाऊंना आणि छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आजची राईड सुरु केली...

एक संकल्प केला होता मनात... आणि पेडलिंगला सुरुवात केली. गोखले रोड वरून सेनाभवन पार करून माहीम कॉजवे गाठले... माहीमच्या खाडी जवळ अतिशय थंड वारे वाहत होते. वांद्रे फ्लाय ओव्हर वरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर आलो. सकाळच्या वातावरणात भन्नाट वेगाने मार्गक्रमण करत होतो. 

सव्वा सहा वाजता पार्ले जंक्शन जवळ पोहोचलो. इतक्यात लक्ष्मण नवलेचा फोन आला. 'कुठे पोहोचलात', 'डोमॅस्टिक  विमानतळाजवळ आहे', आज घोडबंदर लूप मारतोय,  हे सांगितल्यावर , लक्ष्मण म्हणाला, मी गोव्यावरून मुंबईला आलोय आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरलोय, सायकलिंग करत येतोय... आपण तीन हात नाक्यावर सकाळी आठ वाजता भेटूया... हे ठरवून, पुढची राईड सुरू केली. 

जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान नाकाबंदीमुळे ट्राफिक जाम होती. सर्व्हिस रोड सुद्धा जाम होता. अक्षरशः फुटपाथ वरून ढकलत सायकल जाम मधून बाहेर काढली आणि सुसाट वेगात टोल नाका पार करून घोडबंदर जवळील फाउंटन हॉटेलकडे जाणाऱ्या घाटावर चढाई केली. टॉपला येताच लालभडक सूर्याचे दर्शन झाले.

 दोन मिनिटे थांबून सुर्योदयाचा फोटो काढला. पुन्हा पेडलिंग सुरू केले. घोडबंदर नाक्यावर खूप रहदारी होती. सिग्नलला वळसा मारला ... जवळच्या टपरीवर चहा प्यायचा मोह आवरता घेतला... 

घोडबंदर घाट चढून ठाण्याकडे प्रस्थान केले. माजीवडा जंक्शनची रहदारी टाळण्यासाठी फ्लाय ओव्हरवर चढलो.  सकाळी बरोब्बर ८.२० वाजता तीन हात नाका येथे पोहोचलो....

लक्ष्मणाला दोन फोन केले परंतू रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याचे लाईव्ह लोकेशन सायनला संपले होते. लक्ष्मणाला ऐरोली मुलुंड नाक्यावर भेटायचे ठरवून पुढे राईड सुरू केली. हायवे टोल नाका पार केला आणि लक्ष्मणचा फोन आला. तो तीन हात नाक्यावर पोहोचला होता. आज तो कळव्याला जाणार होता. वेळीच कम्युनिकेशन न झाल्यामुळे आमची चुकामुक झाली होती. 

रस्त्याला रहदारी वाढली होती. तरीसुद्धा सायकल भन्नाट वेगाने पळत होती. पोटली मधील पाणी संपले होते आणि बाटलीतील पाणी पोटात चालले होते. मनसुद्धा सायकलच्या वेगाशी स्पर्धा करीत होते. नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सोसायटीच्या आवारात सायकलने विश्रांती घेतली.

सकाळी पाच पन्नासला सुरू झालेली राईड चार तासांनी संपली होती... तब्बल ८५ किमी राईड ... सकाळी खाल्लेल्या चार खजूर आणि एक डिंकाच्या भूक लाडूवर... वाटेत दोन लिटर पाणी पिऊन... दरम्यान कुठेही न खाता... पूर्ण केली होती.

जिजाऊ आणि शिवरायांचे आशीर्वाद घेऊन...  मनात संकल्प ठरवून... सुरू केलेली ही राईड... चार तासात पूर्ण झाल्यामुळे... जीवनात अशक्य असे काहीही नाही... याची प्रचिती आली...

जय हो !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे .....

3 comments:

  1. सहज सोपे सुंदर वर्णन

    ReplyDelete
  2. खरंच खुप सुंदर वर्णन

    ReplyDelete
  3. छान!साहेब तुमच्या जिद्दीला आणि तुमच्या उत्साहाला तोड नाही.

    ReplyDelete