Tuesday, May 5, 2020

*//प्रकाश बाबुराव सरवदे तळेगावचे अथांग तळे//*

22.06.2019

// प्रकाश बाबुराव सरवदे तळेगावचे अथांग तळे //

काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात,  प्रथम भेटीतच भारावून टाकतात.

मुंबई पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली. लक्ष्मण नवलेंचे मित्र *प्रकाश बाबुराव सरवदे*

हाडाचा शिक्षक आणि विद्या प्रसारिणी सभा, पुणे यांच्या विविध शाळांमध्ये अध्यापनाची धुरा पस्तीस वर्षे यशस्वीपणे सांभाळून निवृत्त झालेले प्रकाश सरवदे, प्रथम भेटीतच माझे जिवलग मित्र झाले.

काही व्यक्तींना प्रथमतः  भेटल्यावर असे जाणवते की आपण यांना आधीही भेटलेलो आहोत,  का बरे असे होते?

पंढरपुर सायकल वारीमध्ये माझ्यासह लक्ष्मण नवले, अतुल ओझा आणि संतोष शिर्के सामील झाले होते. संतोषचे नुकतेच डोळ्याचे ऑपरेशन झाले होते, तरीही तो माऊलीच्या ओढीने सायकल वारीत सामील झाला होता.

दुपारच्या जेवणाचा मुक्काम तळेगावमधील माझा शाळकरी वर्गमित्र प्रकाशच्या घरी करूया,  हा लक्ष्मण नवलेचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. दुपारी बारा वाजता लोणावळ्याला पोहोचलो.  तेथून तळेगावसाठी जोरदार स्प्रिंट मारली. साडेतीन वाजता तळेगावला प्रकाश सरवदेंच्या घरी पोहोचलो. हॉलमध्ये सुदर्शनचक्रधारी श्री कृष्णाची फ्रेम होती.

दुपारच्या जेवणास अंमळ वेळच झाला होता. पण सरवदे गुरुजी आमची वाट पाहत थांबले होते. शांत, धीरोदात्त, हसतमुख व्यक्तिमत्व; सफेत सदरा-लेंग्यात आणखी उठून दिसत होते. शिवाजी महाराजांसारखी दाढी त्यांच्या व्यक्तिमत्वाला भारदस्तपणा आणत होती. घरात शिरताच प्रकाश आणि त्याच्या सौ. त्रिवेणी यांनी सुहास्य वदनाने स्वागत केले.

पंगतीची तयारी झाली. आंम्ही सर्वजण जमिनीवरील सतरंजीवर मांडी घालून बसलो.  प्रकाश भाऊ सुद्धा आमच्या सोबत जेवायला बसले.

सुंदर शाकाहारी बेत  होता. वरण-भात आणि  त्यावर साजूक तूप तसेच पोळ्या,  हिरवे वाटणे बटाटा रस्सेदार आमटी, हिरवी चटणी, लोणचं  आणि गोड पदार्थ म्हणून काजू कतली होती.

  जोरदार भूक लागली होती. जेवणाला सुरुवात करण्याअगोदर *"यज्ञ शिष्टाशिनः सन्तो"*  प्रार्थना झाली. पोटात जठराग्नी सोबत भक्तीरस सुद्धा पाझरला होता. प्रकाशाची पत्नी सौ. त्रिवेणी साक्षात अन्नपूर्णा होती. जेवणाला अप्रतिम चव होती. सायकलिंगचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. या सुंदर शाकाहारी पाहूणचारामुळे मन प्रसन्न झाले.

आता सुरू झाली गप्पांची मैफिल. चौकसपणामुळे प्रकाश भाऊंना विचारले, ' जेवणा अगोदर प्रार्थना का?'   आपल्या रसना उद्विपित करण्यासाठी तसेच जठरातील पाचकरस पाझरण्यासाठी प्रार्थना महत्वाची आहे. प्रथमतः जेवणाचा आस्वाद डोळ्याने, नाकाने, कानाने, त्वचेने आणि जिव्हेने घेणे  अतिशय आवश्यक आहे.  अन्नाचा परिपूर्ण आस्वाद पंचेंद्रियाने आणि मनाने घेतल्यामुळे त्याचे पचन सुफळ संपूर्ण होते. अतिशय अभ्यासपूर्ण आणि  वैज्ञानिक  उत्तर प्रकाशभाऊंनी  दिले होते.

विद्या प्रसारिणी सभा, पुणे यांच्या विविध शाळांमध्ये अध्यापन क्षेत्रात ३५ वर्षांची सेवा त्यांनी दिली आहे.  त्यातील २८ वर्ष मुख्याध्यापक म्हणून  कार्यरत होते. सुविद्य पत्नी सौ त्रिवेणी आणि दोन मुली प्रियांका व मधुरा असा चौकोनी संसार. नुकतेच मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. प्रकाशभाऊ मे २०१८, मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर स्वाध्याय परिवारासाठी पूर्ण वेळ कार्यरत आहेत.

पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादाजींच्या स्वाध्याय परिवाराचे वरिष्ठ सदस्य आहेत, प्रकाश भाऊ.         त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर सात्विक भाव प्रकर्षाने जाणवत होते.

स्वाध्याय परिवार आणि दादाजींच्या कार्याच्या अनुषंगाने प्रकाश भाऊंशी चर्चा सुरू झाली.

ज्ञान, कर्म आणि भक्ती ही स्वाध्यायची त्रिसुत्री त्यांनी सविस्तरपणे सांगितली.

*मनुष्य गौरव* हा स्वाध्यायचा पाया आहे.  श्रीमद भागवत गीतेतील तत्वज्ञान सर्वांना समजावणे आणि आचरणात आणण्यासाठी दादाजी कार्यरत होते.  त्यांनी स्थापन केलेल्या  तत्वज्ञान विद्यापीठामध्ये सर्वांना प्रवेश आहे. स्वाध्यायचा अर्थ आहे,  स्वतःला जाणणे, स्वतःचे अध्ययन करणे.

प्रकाश भाऊंशी चर्चा करताना, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींनी मनात पक्के घर केले.

*"भक्ती प्रेमातून हवी भीतीतून नको"*

*परमेश्वराने आपल्याला सर्व काही बहाल केले आहे,  त्यामुळे मंदिरात जाऊन काही मागणे मागण्याऐवजी या जन्मासाठी परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजेत* (Thanks Giving To God)

परमेश्वराची भक्ती प्रेममय असायला हवी. काही मागण्यासाठी किंवा भीती पोटी नको. हे तत्व मला पटले.

वडीलधाऱ्यांना  नमस्कार करण्यामुळे त्याचा प्रभाव लहानांवर तर पडतोच तसेच घरातसुद्धा  प्रसन्न आणि शांततामय वातावरण निर्मिती होते. हे विचार तर भन्नाटच.

त्रिकाल संध्या करण्यामुळे वातावरण पवित्र होते.

सकाळी हाताचे दर्शन घेऊन  "कराग्रे वसते लक्ष्मी" .....

दुपारच्या जेवणा अगोदर

  *यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्* ....
 
आणि रात्री झोपण्या अगोदर
*ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने॥ प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥ ....

या प्रार्थना गृहसौख्य राखतात तसेच मनशांती देतात.

राजीव दीक्षित यांच्या व्याख्यानात ऐकलेली एक गोष्ट प्रकाश भाऊ  गेली कित्येक वर्ष आचरणात आणत आहेत.
ती म्हणजे,  "रोज सकाळी उठल्यावर तोंड न धुता, तोंडात असलेली लाळ डोळ्यांच्या बुबुळाला लावणे". यामुळे आश्चर्याची गोष्ट म्हणजे  त्यांच्या चष्म्याचा नंबर नाहीसा झाला आहे.

मेडिटेशनचा  त्यांनी सहज सोपा अर्थ सांगितला,  "ध्यानधारणा म्हणजे जागृतपणी झोपेचा अनुभव घेणे. मन एकाग्र करणे."

प्रकाश भाऊंच्या चेहऱ्यावरील सुहास्य, सतत सकारात्मक ऊर्जा प्रसारित करत होते.

लक्ष्मण भाऊंनी प्रकाशबद्दल आणखी एक माहिती दिली ती म्हणजे, त्यांनी "पुणे कन्याकुमारी आणि परत पुणे"  सायकलिंग केले आहे. खूप आनंद झाला, हे ऐकून.

आनंदाचा एखादा क्षण जरी जीवनात आला तरी खूप काही साध्य केलं असे समजायचे. हा विचार भावला मनाला.

तसेच आज कोणाचे तोंड पाहिले म्हणून दिवस खराब गेला, असे विचार जर येत असतील तर, देवाचे तोंड पाहावे म्हणजे असे नकारात्मक विचार येणारच नाहीत.

मुलगी प्रियांकाच्या लग्नाचा प्रसंग आठवला तेव्हा तर त्यांना स्वतःचे लग्न सुद्धा आठवले.

त्यांचा अभिनिवेश म्हणजे एखाद्या घटनेचे विश्लेषण करताना  मनात सकारात्मक भाव ठेवणे.  गुंता कोणी केला, यापेक्षा तो कसा सोडवता येईल या कडे लक्ष देणे.

प्रकाशभाऊ,  जनसेवा करतात, कोणतीही अपेक्षा न ठेवता.

त्यांना मान, प्रशंसा, पद, पैसा, अधिकार, मोठेपणा याची कसलीही अपेक्षा नाही.

हाती असलेले काम सचोटीने करणे, हेच त्यांचे धेय्य आहे.

देव सतत मनात हवा,  तरच चुकीच्या गोष्टी करण्याची बुद्धी होणारच नाही,  हे त्यांचे भाष्य मनाला उच्च पातळीवर घेऊन गेले.

पूजेची सक्ती नाही तर परमेश्वराचे रूप  आपल्या चित्तात उतरविणे,  त्यांचे गुण आपल्यात मनात रुजविणे आणि ते आचरणात आणणे; हीच खरी ईश्वर भक्ती आहे, हे तत्वज्ञान भावले.

सद्गुणांचा वापर जीवनात होणे महत्वाचे आहे तसेच त्यातून लोककल्याण होणे सुद्धा आवश्यक आहे. या विचारांनी मन भावविभोर झाले.

जवळपासच्या गावात दादाजींकडून मिळालेले स्वाध्याय तत्वज्ञान सांगणे, हा उपक्रम प्रकाश भाऊ गेली ३५ वर्ष करीत आहेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकजीवन सुसह्य करणे हा प्रकाशभाऊंचा ध्यास आहे.

पांडुरंग शात्री आठवलेंच्या (दादाजींच्या)  विचारांचा प्रचंड पगडा आहे प्रकाशभाऊंचा जीवनावर आहे.

खरोखर "ते सेफ हँड मध्ये आहेत"

योग्य गुरू मिळाले हे त्याचे परम भाग्य आहे.

जवळपास पस्तीस-चाळीस गावांशी त्यांचा संपर्क आहे.

परमेश्वराची भक्ती कशी करावी याची प्रेरक महिती प्रकाशभाऊ  या गावात देतात.

त्यामुळे शेकडो कुटुंबांचे  जीवन सुखी समाधानी झाले आहे.

प्रकाशभाऊंनी शेवटी अतिशय प्रेरक गोष्ट सांगितली ती म्हणजे, " आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता हवी, पारदर्शीपणा हवा "

इतक्यात त्रिवेणी वहिनीने मस्त मसालेदार चहा सुद्धा बनविला. तास-दीड तास कसा गेला ते कळलेच नाही. आता आम्हाला पुणे गाठायचे होते.

सरवदे कुटुंबाला शुभ कामना देऊन सायकलने पुण्याला प्रस्थान केले.

आयुष्य खूपच तोकडे आहे, म्हणूनच आपल्या जीवनाला आश्चर्यकारकरीत्या स्तिमित करणाऱ्या व्यक्तिमत्वांची प्रशंसा करायलाच हवी.

प्रकाशभाऊंचा  जीवनपट खालील चार ओळी अधोरेखित करतोय.

वाट होती खडतर, केला खूप प्रयास !

कष्टांच फळ सोन म्हणून त्याचीच धरली कास !

दिला साऱ्यांना आधार, नाही धरला हव्यास !

उज्वल यशाला तुमच्या, आमचा सलाम खास !

*" प्रकाश सरवदे"* म्हणजे तळेगावाचे अथांग तळे*

एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व माझ्या जीवन सफरीत समाविष्ट झाले होते.

खूप भाग्यवान आहे मी  ! ! !

सतीश विष्णू जाधव

Mumbai To Kanyakumari Cycling मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दुसरा दिवस)

26.10.2019    दिवस दुसरा

पुणे ते कराड सायकलिंग

आज दिवाळीच्या मोठ्या दिवशी पुण्याहून सकाळी पाच वाजता सायकल वारी सुरू करायची होती. सकाळीच सौ प्रतिभाताई नामदेव नालावडेंनी आमचे औक्षण केले. या आदरतिथ्याने  भारावून गेलो.  जणूकाही छत्रपती शिवरायांचे मावळेच लढाईला निघाले होते.  दरवाजापुढे काढलेली रांगोळी आणि दिव्यांनी मन अतिशय प्रसन्न झाले. 

निघतानाच,  सायकल पंचर झाली. लक्ष्मण आणि नामदेव यांनी ताबडतोब नवीन ट्यूब टाकली, तर ती सुद्धा बर्स्ट झाली. माझ्याकडे आणखी ट्यूब नव्हती, म्हणून नामदेवरावांनी त्यांच्या mtb ची ट्यूब दिली. ती ओव्हर साईझ असल्यामुळे हिरेनला विचारून ट्यूब टाकली. तो पर्यंत सोपान नलावडे, विकास भोर, अभिजीत गुंजाळ आणि दिपक निचित   नामदेवच्या घरी पोहोचले होते. सकाळी पाच ऐवजी साडेसहा वाजता सायकल सफर सुरू झाली. 

सकाळच्या वेळी वारजे वरून सुरू केलेली सफर सहज पुणे पार करून गेली.  कात्रज घाट सुरू झाला. आता या घाटात जाण्याचे आणि येण्याचे मार्ग वेगळे केल्यामुळे सायकलिंगला गती आली होती. मोठा बोगदा लागला, हा बोगदासुद्धा चढाचाच आहे,  बोगद्यातून पाणी वाहत होते. त्यामुळे लो गियरवर पेडलिंग करावे लागत होते. हायवेहुन सासवड मार्गे प्रति बालाजीला जाणारा रस्ता पार केला.

वाटेत पुस्तकांचे गाव भिलार 82 किमी हा बोर्ड लागला आणि माझे ट्रेकिंगचे गुरू आणि  जीवनाचे मार्गदर्शक,श्री जगन्नाथ शिंदे साहेबांची आठवण झाली. त्यांचे हे आवडते गाव. या पुस्तकाच्या गावी मी भेट दिलेली आहे.पुढे लागलेल्या अन्नपूर्णा हॉटेलच्या बाहेर पांढऱ्या शुभ्र खिल्लारी बैलांची जोडी असलेली बैलगाडी होती. जवळ जाताच लक्षात आले, हे तर पुतळे आहेत. फोटो काढले आणि पुढे निघालो. 

साडेदहा पर्यंत 50 किमी अंतर कापले होते. शिरावळला माझ्या सायकलमध्ये नवीन ट्यूब टाकली.  शिरवळच्या प्रसिद्ध  श्रीराम हॉटेलमध्ये दोन दोन वडापाव खाल्ले. बाहेर फळवाली मावशी ताजे रसरशीत अंजीर  विकत होती. अर्धा किलो अंजीर घेऊन सर्वांनी खाल्ले. खूप दिवसांनी गावरान अंजीर खाताना लहानपणची आठवण झाली. आई पुण्याच्या तुळशीबाग मंडईतील अंजीर आणि गुडदानी खाऊ घालीत असे.

 आता खंबाटकी घाट सुरू झाला. काळ्या ढगांनी आसमंतात दाटी केली होती. या घाटात जायचा मार्ग दुपदरी होता, तरीसुदधा घाटात खूप ट्राफिक झाली होती. बऱ्याच गाड्या बंद पडल्या होत्या, त्यामुळे कडेकडेने सावधतेने सायकलिंग करत होतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे घाटातील झऱ्यांना बऱ्यापैकी खळखळाट होता. तेथे  लक्ष्मण आणि मी थांबून फोटो काढले.

  गाड्या, बस मधील माणसे, लहान मुले कुतूहलाने आमचे सायकलिंग पाहत होते. गाड्या जागेवर थांबल्या होत्या आणि आम्ही पुढे पुढे चाललो होतो. घाट संपला आणि सातारचा उतार लागला.

दुपारचे जेवण सातारजवळाच्या सद्गुरू हॉटेलमध्ये घेतले. खूप मस्त शाकाहारी जेवण होते. सद्गुरुचा मालक सुर्वे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. अतिशय मेहनतीने हे हॉटेल उभे केले होते. आता सतारा परिसरात त्याची तीन हॉटेल्स आहेत. त्याने आम्हाला सायकलवारी साठी शुभेच्छा दिल्या.

पुढे लक्ष्मणची सायकल पंचर झाली. सर्व किट बरोबर असल्यामुळे पंचर झटपट काढले. आता रस्ता चढ-उताराचा होता. पुणे बंगलोर हायवेवर मध्ये लागणाऱ्या गावांना बायपास करण्यासाठी  पूल बांधले आहेत. त्यामुळे विना अडथळा रहदारी सुरू होती. या रस्त्यावर मोठे ट्रक, ट्रेलर, व्हॉवो बसगाड्या याचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे सायकल रस्त्याच्या किनाऱ्याने पांढऱ्या पट्टयाच्या आत आणि एकामागे एक चालवत होतो. सातारा जवळचा टोल नाका पार करून पुढे थांबलो.
डॉ विजय खाडे आणि कुटुंबीय  चियर अप करायला  सवादे गावाजवळ आमच्या भेटीला आले होते. तसेच मित्र स्वरूपने दिपक आणि माझ्यासाठी एक्स्ट्रा ट्यूब आणून दिल्या.

   कराड गाठायचे वेध लागले होते. जोरदार सायकलिंग सुरू होते. दोन्ही घाट परिश्रमपूर्वक पार केल्यामुळे आता शरीरात नवचैतन्य  सळसळत होते. कराडच्या अलीकडील आमचे थांबायचे ठिकाण कधी आले ते कळलेच नाही. आज कराड पर्यंत 156 किमी सायकल राईड झाली होती.

दिपकचा मित्र अमित,  आणि अमितचा मित्र, सागर बामणे, त्याचे हे आराम हॉटेल. सागरच्या या नव्या कोऱ्या हॉटेलचे अजून  उदघाटन सुद्धा झालेले नव्हते. तरी सुद्धा या हॉटेलमध्ये आमची राहायची व्यवस्था झाली होती. मैत्री काय काम करते याचे हे ज्वलंत उदाहरण होते.

रात्री कऱ्हाडी मटणासह तांबडा आणि पांढरा रस्सा मटकावला. सायकली व्यवस्थित बांधून सकाळच्या  प्रवासासाठी लवकर झोपी गेलो.

सतीश विष्णू जाधव

Monday, May 4, 2020

Anjarle Turtle Festival आंजर्ले कासव महोत्सव

16 मार्च 2020
*आंजर्ले कासव महोत्सव*.  Anjarle Turtle Festival

आंजर्ले कासव महोत्सवाची घोषणा झाली होती. चिपळूनची सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि आंजर्ले कासव मित्र संस्था यांच्या सहकार्याने हा कासव महोत्सव 14 ते 31 मार्च दरम्यान जाहीर झाला होता.

या कार्यक्रमाचे संचालक वेळास येथील मोहन उपाध्ये यांना फोन केला. त्यांनी आंजर्लेला कसे पोहोचायचे याची सविस्तर माहिती दिली. 

आज दुपारी परममित्र  विजय कांबळे आणि मी सहकुटुंब गाडी घेऊन निघालो.  रस्त्याला रहदारी कमी होती त्यामुळे जुन्या मुंबई गोवा मार्गाने जायचे ठरविले. वडखळ बायपास पूल झाल्यामुळे तीन तासात माणगावला पोहोचलो. लोणार फाट्यावरून वळून  मंडणगडचा रस्ता पकडला. 

एकपदरी रस्ता असल्यामुळे गाडीचा वेग कमी झाला. आंबेत मार्गे आंजर्लेला पोहोचायला रात्रीचे आठ वाजले. माझी भाची मनीषा आणि भाचेजावई सुनील मेस्त्री तेथे आमची वाट पाहतच होते. आंजर्ले गावातील "केतकी बीच रिसॉर्ट" मध्ये  राहण्याची व्यवस्था सुनीलने केली होती.  त्याने सोबत आणलेले मासे  हॉटेल मध्ये बनवायला दिले.
आंजर्ले गावातील समुद्र किनारी असलेले केतकी रिसॉर्ट अतिशय सुंदर लोकेशनवर वसलेले आहे. नारळ पोफळीची वाडी, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, झाडांच्या ओंडक्या पासून बनविलेल्या बैठक व्यवस्था आणि ठिकठिकाणी लावलेले दोराचे झोपाळे मनाला सुखद समाधान I होते.आंजर्ले गावात पोहोचल्यावर समजले, करोनामुुळे जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढून कासव महोत्सव रद्द केला आहे. त्यामुळे सर्व पर्यटकांचे बुकिंग रद्द करण्यात आले होते. परंतु सुनीलच्या ओळखीमुळे आमच्या निवासाची व्यवस्था झाली होती.  त्या रिसॉर्टमध्ये आम्हा व्यतिरिक्त आणखी एक चार जणांचे कुटुंब होते. त्यामुळे संपूर्ण रिसॉर्ट जणूकाही आमच्या साठीच राखीव होता. मग रात्रीच्या चांदण्यात सुरू झाली गप्पांची मैफिल. जुन्या आठवणी, केलेल्या विविध सहली, त्यात आलेली धमाल यांच्या फुलझड्या बरसू लागल्या. रात्रीचे अकरा वाजले तरी जेवणाचे भान कोणालाही नव्हते. गप्पागोष्टी करतानाच तळलेल्या पापलेटवर ताव मारला होता. त्यानंतर भाकरी आणि कोळंबीचे कालवण सोबत रस्सा भात ही मस्त ट्रीट होती. जेवण झाल्यावर आम्ही किनाऱ्यावर फेरफटका मारला. कासव महोत्सव रद्द झाल्यामुळे आंजर्लेचा समुद्र किनारा जणूकाही आम्हालाच आंदण दिला होता. सागराची गाज आणि क्षितिजाजवळ दिसणाऱ्या मासेमारी जहाजांच्या रांगा एका वेगळ्याच दुनियेत मनाला घेऊन गेल्या होत्या. चराचरात भरलेला आनंद, अथांग मनाच्या गाभाऱ्यात भरभरून साठवत होतो. ओलसर वाळूवर रात्रीच्या निरव शांततेत पावलांचे ठसे उमटवत चालणे आणि चालताना वाळूचा होणारा आवाज मनात साठवणे, हेच जगणे होते. निसर्गात विरघळून जाणे काय असते त्याचा आस्वाद, अनुभव घेत होतो.

  मनातील असंख्य कासव त्या वाळूवर पसरले होते.(खालील फोटो गेल्या वर्षीचा आहे)ते हळूहळू सागरातील पाण्याच्या ओढीने पुढे पुढे सरकत, अलगद आलेल्या लाटेवर स्वार होत होते. दुसऱ्या फेसळणाऱ्या लाटेमध्ये लुप्त होत होते. "मन उधाण वाऱ्याचे" याची देही याची डोळा पहात होतो. "मनातील कासव महोत्सव"  खऱ्या अर्थाने जगलो होतो. जनजीवनातून दूर एकांत, सोबत निवांत समुद्र किनारा आणि निरव रात्र यापेक्षा आणखी काय हवे असते आपल्याला.

   शांताबाई शेळकेंच्या " पावसा आधीचा पाऊस"  या कथा संग्रहाप्रमाणे "कासवांशिवाय कासव महोत्सव" मी जबरदस्त उपभोगला होता.

सतीश विष्णू जाधव

Sunday, May 3, 2020

Mumbai To Kanyakumari Cycling (मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग) (दिवस पहिला) 25.10.2019

 25.10.2019  दिवस पहिला  

   मुंबई ते पुणे सायकलिंग

मुंबई ते कन्याकुमारी राईडचा आजचा पहिला दिवस होता. 1760 किमी सायकलिंग 11 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय घेऊन, तसेच या संपूर्ण सायकल वारीत "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश जनमानसात रुजविण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरू झाली सायकलवारी. सोबत माझा सायकलिस्ट मित्र लक्ष्मण नवले पण होता.

पहाटे साडेतीन वाजता मुंबईवरून सायकल राईड सुरू झाली. कन्याकुमारी गाठायचे असल्यामुळे मागील कॅरियरवर बरेच समान होते. चौकपर्यंत सकाळी आठ वाजता पोहोचलो. पुढचा खोपोली पर्यंतचा रस्ता अतिशय खराब होता. त्यात सेल्फ सपोर्ट राईड, म्हणून अशा रस्त्यावर सांभाळून सायकल चालवत होतो. आणखी तासाभरात खोपोलीला  पोहोचलो.

माझ्या सायकलला MTB टायर असल्यामुळे, ही सफर सोपी झाली. खोपोलीत जेवण घेतले. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, 'तुमचे मागील चाक आउट आहे'. जेवल्यावर चाक फिरवून पाहिले. खरेच आउट होते, मागचे चाक.

पुण्याला जाऊन आउट काढायचे ठरले. आता खंडाळा घाट सुरू झाला. आज आम्ही पहिल्यांदा सर्व सामनासह घाटात सायकलिंग करत होतो. पहिला हॉल्ट शिंगरोबा मंदिराजवळ घ्यायचा ठरले.

लक्ष्मण त्याच्या वेगाने हळूहळू पुढे सरकू लागला. शिंगरोबा मंदिराच्या आधी एक अवघड वळण आहे. तेथे माझ्या सायकल मधून "खाड्खुड" आवाज झाला. झटक्यात सायकल थांबली. सावधगिरीने ताबडतोब सायकल मुख्य रस्त्यावरून बाजूला  घेतली आणि आडवी झोपवली. सायकलची चेन गियरमध्ये अडकली होती. तसेच एक तार तुटून पडली होती. खूप प्रयत्न करून चेन सोडवली. तार एका बाजूने तुटून लटकत होती.  लक्ष्मणला फोन लावला. त्याने निखळलेली तार बाजूच्या स्पोक मध्ये गुंतवायला सांगितले.  लक्ष्मण शिंगरोबा मंदिराकडे सायकल ठेऊन खाली यायला निघाला. मी सायकल ढकलत घाट चढत होतो. रस्त्यात लक्ष्मण भेटला. त्याने सायकल तपासली आणि ढकलण्यापेक्षा सायकलिंग करायला सांगितले. मारली टांग सायकलवर आणि सुरु केली. लक्ष्मण मागून सायकल ढकलत  होता. आम्ही आता मंदिराकडे पोहोचलो. घामाने  थबथबलो होतो. माठातील गार पाणी पिऊन निवांत झालो. तेवढ्यात लक्ष्मणने पुण्याला सत्यजितला फोन करून पुण्यात सायकल मॅकेनिकची व्यवस्था करण्यास सांगितले.

चाक थोडेसे वेडेवाकडे झालेले,  त्यात एक तार तुटलेली. मागील चाकावर सामानाचे ओझे. अशा परिस्थितीत लोणावळा गाठायचे होते.  अमृतांजन पुलावर पुन्हा चेन लॉक झाली. आता लक्ष्मणला फोन न करताच मीच मॅकेनिक झालो. चेन सोडवली आणि अतिशय सावकाश सायकलिंग करत राजमाची पॉईंटकडे पोहोचलो. माझ्या उशिरा येण्याचे कारण लक्ष्मणाला समजले होते.

राजमाची पॉइंटवर मस्त थंडगार वारे सुटले होते.  समोरील हिरव्यागार डोंगरमाथ्यावरून झकास पांढराशुभ्र धबधबा खालच्या झाडीत लुप्त होत होता.  निळेशार आकाश आणि त्यात काळ्याभुऱ्या ढगांची गर्दी, प्रकाशाच्या विविध छटा अनुभवताना, डोळ्याचे पारणे फिटले होते.
*दिवाळीतील धनत्रयोदशीचा आजचा दिवस, या  निसर्गाच्या समवेत व्यतीत करण्याचे भाग्य माझ्या जीवनात आले होते. सोबत हसतमुख दोस्त लक्ष्मण होताच. जीवनाची "सेकंड इंनिग" अशीच नेहमीच अफलातून असावी, अशी मनोमन प्रार्थना केली.*पुढचा लोणावळ्यापर्यंतचा सायकल प्रवास याच आनंदलहरीवर झुलत डोलत पूर्ण झाला. शिवाजी नगरला आल्यावर आमचा लेह सायकलिस्ट मित्र सत्यजित  मदतील आला. त्यानेच कर्वे रोडवरील ट्रॅक अँड ट्रेलचे दुकान दाखवले.

या दुकानातील मॅकेनिक राजू , देवासारखा धावून आला. दुकान बंद होण्याच्या बेतात होते. माझ्या सायकलची अडचण समजताच राजुने भराभर काम सुरू केले आणि अर्ध्या तासात सायकल टकटकीत झाली.

हा राजू सुद्धा सायकलिस्ट आहे. दरवर्षी पुण्याचा एक गृप घेऊन सायकलिंग करत गोव्याला जातो. आम्ही कन्याकुमारीला सायकलिंग करत जाणार, हे कळल्यावर त्याने पेढे दिले. आम्हाला पाहून खूप आनंदाला होता राजू !! तेथून  आम्ही शिवाजी पुतळ्याजवळ आलो. येथे सत्यजितला निरोप दिला. आजचा मुक्काम कोथरूड मध्ये होता. आज 152 किमी सायकलिंग झाले होते.

पहिल्या दिवसाची सायकल सफर  खडतर होती पण अश्यक्य नव्हती.  कठीण गोष्ट साध्य केली की तीचा आनंद अपरिमित आणि अविस्मरणीय असतो. एक गोष्ट  लक्षात आली, जीवनात अशक्य असे काहीही नसते, परंतु ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक असते.


सतीश विष्णू जाधव

Sunday, April 26, 2020

अंतरा सेलबोट साहसी सफर

07.03.2020   ते  09.03.2020
*अंतरा सेल बोट साहसी सफर*
शिडाच्या नावेतून एकट्याने जगप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय  *कमांडर दिलीप दोंदे*  यांच्या समवेत शिडाच्या नावेतून मुंबई ते गोवा सफर करण्याचा दुर्मिळ योग माझे मित्र श्री सतीश टंकसाळे उर्फ बाबा यांच्यामुळे जुळून आला.

या सफरीत माझ्यासह सतीश टंकसाळे, राजेश कांबळे, अनंत दाभोलकर हे परममित्र होते. तर कमांडर दिलीप दोंदेसह त्यांच्या सहकारी सुचेता जाधव होत्या.

सकाळी  नऊ वाजता गेट वे ऑफ इंडियाला पोहोचलो. दिलीप आणि सुचेताची भेट येथेच झाली.  तेथून कुलाबा यॉट क्लबच्या छोट्या बोटीने *अंतरा* सेल बोटीवर दाखल झालो.
सकाळी सव्वादहा वाजता अंतरा बोटीवर पोहोचलो. भर पाण्यात गेल्यावर अंतरा बोटीचे सेल  (प्रचंड मोठा कापडी पडदा) उघडण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले. वाऱ्याने हलणाऱ्या सेलबोटीवर छोट्याच्या कापडी खुर्चीत बसून मी अवकाशात तरंगायला लागलो. नभाच्या निळाईत अंतरावर तरंगत शिडाचे दोर सोडणे, एकदम थ्रिलिंग काम होते. माझ्या नंतर राजेशने सुद्धा सेल सोडण्याचे काम केले.

आता सुरू झाली सेल बोटीवरची साहसी सफर. स्टीलचे मोठे गोल ड्रायव्हिंग व्हील सेल बोट चालविण्यासाठी होते. प्रथमत: टंकसाळे बाबांनी बोटीचे ड्रायव्हिंग चाक ताब्यात घेऊन बोट हाकारायला सुरवात केली. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर, कॅप्टन दिलीप आणि सहकारी सुचेता यांनी अंतरा सेल बोटीची माहिती दिली. अतिशय हायटेक होती अंतरा सेलबोट. डेकवर सहा जणांची बसण्याची व्यवस्था होती तर आतील भागांत पाच बंक बेड तसेच अद्ययावत किचन होते.

किचनमध्ये बोटीच्या हेलकाव्यासह हलणारी गॅसची शेगडी होती, त्यामुळे तिच्यावर ठेवलेले भांडे आणि त्यातील पदार्थ शेगडीबाहेर  पडण्याचा धोका नव्हता. अगदी छोट्याच्या बाथरूममध्ये विमानात असतो तसा कमोड होता. त्याचा फ्लश म्हणजे बोअरवेल मधून पाणी काढण्याचा पंप होता. परंतु हा पंप कमोड मधील पाणी, मैला बाहेर टाकण्यासाठी होता.
सेलमध्ये स्वयंचलित दिशा दर्शक होते तसेच समुद्रातून गोव्याला जाणाऱ्या मार्गाची परिपूर्ण माहिती संगणकात स्टोअर केलेली होती. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे बोटीवरचे शीड फिरवावे लागत होते.
आज वारा बारा नॉटिकल मैल वेगाने वाहत असल्यामुळे, बोट प्रचंड हेलकावे खात होती. बोटीवर व्यवस्थित उभे राहणे सुद्धा मुश्किल होते.
बोट लागणे, हा प्रकार माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अनुभवला. सकाळी केलेला सर्व नास्ता पोटातून पाण्यासकट बाहेर आला. सर्व आतड्या पिळवटून निघाल्या. या प्रकारामुळे दुपारी काहीही जेवण न घेता मी फक्त ज्यूस आणि ताक प्यायलो. थोड्याच वेळात ते सुद्धा
चूळ भरल्यासारखे बाहेर आले. संध्याकाळच्या वेळी संत्र खाल्ले आणि पोटाला आराम पडला. आता हलके हलके वाटत होते.
या दरम्यात सेल बोटीवरील सर्व ऍक्टिव्हिटी टंकसाळे बाबा, राजेश आणि अनंत यांनी दिलीपच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या. सेल बोट चालविताना मासेमारी आरमार आणि त्यांची जाळी यांचे अतिशय काटेकोरपणे निरीक्षण करावे लागत होते. टॅकिंग किंवा जायबिंग मध्ये (वाऱ्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने) सेल चालविण्याची दिलीपची सरांची अदाकारी, हिऱ्याला पैलू पडणाऱ्या कसबी कलाकारासारखी नजाकतदार होती.
संध्याकाळी थंड वारे सुरू झाले. आता भर समुद्रातून सेलबोट प्रवास करीत असल्यामुळे किनाऱ्यावरील डोंगरच दिसत होते. अलिबाग जवळचे खांदेरी उंदेरी किल्ले दुपारीच ओलांडले.  मुरुड जंजिरा  पार करताना संध्याकाळ झाली होती.
सायंकाळच्या सूर्याच्या संधीप्रकाशात राजेश आणि मी बोटीच्या पुढील भागात डेकवर आलो. सेलबोटीच्या भल्यामोठ्या पडद्याच्या बॅगराऊंडवर आता फोटोसेशन सुरू झाले. अंतरा सतत हलत असल्यामुळे एका हाताने दोर पकडून, तोल सांभाळत फोटो काढणे म्हणजे एखाद्या स्टंट चित्रपटात काम करण्यासारखे होते.

पश्चिमेला सागराच्या क्षितीजाला शिवणाऱ्या सूर्याचे मनोहारी रूप मी आणि राजेश डोळ्याच्या कॅमेऱ्याने मनाच्या गाभाऱ्यात साठवत होतो. चारही बाजूला क्षितिज आणि हेलकावे खाणारी अंतरा,  अंतरंगात सामावून गेली होती. किनाऱ्याला लाटांसह खळखळाट करणारा सागर, किनाऱ्यापासून दूर शांत, ध्यानस्थ संतासारखा भासत होता.
सोनेरी प्रकाशाच्या प्रभा आसमंतात भरून, सागरावर परावर्तित होत होत्या. अशा प्रसंगी मनाच्या अंतरंगाचा ठाव घेण्याची उर्मी उफाळून आली. राजेश आणि मी ध्यानस्थ झालो ... त्या हलणाऱ्या डेकवर.
अंतरावर;  अंतरंगात डोकावणे म्हणजे सागराच्या अथांगपणाचा ठाव घेणे होते.   तासभर कसा गेला कळलेच नाही.

सूर्य मावळताना एक विहंगम दृश्य नजरेस भावले. पूर्वेकडे चंद्राचा उदय आणि पश्चिमेकडे सूर्यास्त. सूर्याच्या सोनेरी छटांनी पांढराशुभ्र चंद्रसुद्धा आरक्त झाला होता. होळी पौर्णिमा दोन दिवसांवर होती त्यामुळे पूर्ण गोलाईकडे झुकलेला त्रयोदशीचा गोरागोमटा चंद्रमा;  सुर्यप्रभेमुळे एखाद्या शडोषवर्षीय तरुणी प्रमाणे लाजून लालेलाल झाला होता.

निसर्ग भरभरून देतो निरपेक्षपणे, मग मानव ती दानत ठेवतो काय. मी माझ्या मनाला प्रश्न केला;  ध्यानस्थ अवस्थेत.  उत्तर आले: सामावून जा निसर्गात!  याच निसर्गाकडून दातृत्व मागून घे. भरभरून देण्यासाठी.
थंड वारे वाहू लागले होते.  बाबांची हाक आली, 'लवकर खाली या'. अंतरावरचा हा अविस्मरणीय अनुभव मर्मबंधातली ठेव होती.
अथांग सागरातील शिडाच्या नावेवरची आजची पहिली रात्र होती. नितळ चंद्रप्रकाशात सागराच्या लाटा पाचूसारख्या चमचम करीत होत्या. कमांडर दिलीप यांनी सप्तर्षी, ध्रुव तारा, शुक्र आणि गुरू ग्रहांची तसेच इतर तारकांची माहिती दिली. सेलबोटीवरून ग्रह ताऱ्यांचे दर्शन म्हणजे संगीत-नृत्याची मैफिल होती. नभांगण डोलतेयं की बोट हलतेयं ह्याचा भ्रम व्हावा.
कमांडर दिलीप आणि सुचेता आता आळीपाळीने बोटीची धुरा वाहत होते. आम्ही चौघे आलटून पालटून त्यांच्या सूचनांचे पालन करीत होतो.
या सफरीच्या अनुषंगाने कमांडर दिलीप दोंदे यांचा खूप जवळून सहवास मिळाला. त्यांची ऐतिहासिक सागर परिक्रमा आणि त्या बाबतचे अनुभव या बाबत संवाद साधता आला. अतिशय साधे आणि निरासक्त व्यक्तिमत्व, निसर्गावर असलेले अथांग प्रेम;  या वरून जाणवले की हा माणूस सागरासाठीच जन्माला आला आहे.

परमेश्वराने प्रत्येक माणसाला विशेष व्यक्तिमत्व बहाल केले आहे. ज्याने ते जाणले, अंगिकारले तोच असामान्य कामगिरी करतो, याची जाणीव कमांडर दिलीप दोंदेच्या कर्तृत्वाने समजते.

पृथ्वी प्रदक्षिणेचे प्रचंड काम केल्यावर  गर्वाचा लवलेशसुद्धा जाणवला नाही. यातच त्यांची महानता आहे. सर्व सामान्यांना सुद्धा शिडाची बोट, सागर सफर याची माहिती व्हावी म्हणूनच नेव्हीतून सेवानिवृत्त झाल्यावर, त्यांनी स्वतःची सर्व पुंजी अंतरा बोटीवर खर्च केली आहे. सागराबद्दलचे सर्व भ्रम दूर होऊन जनमानसात ह्या साहसी खेळाची आवड निर्माण व्हावी, हीच त्यांची इच्छा आहे.
रात्री सेल बोट ऑटोवर असल्यामुळे समोरून येणारे मोठे शिप्स, मासेमारी जहाज, ट्रॉलर यांच्या वेगाचा अंदाज घ्यावा लागत होता. मासेमारीच्या दहा बारा बोटी एकत्रित जाळी टाकून मासेमारी करतात. त्या जाळ्यांचा अंदाज घेऊन नाव पुढे पुढे न्यावी लागत होती. रात्रीच्या वेळी मासेमारी करणारे ट्रॉलर्स एकत्रित रिंगण करून जाळी टाकतात. त्या जाळ्यांची वरील टोके चमचम करतात, ते त्याला बांधलेल्या फ्लूरोसंट डब्यांमुळे.  या डब्यांच्या मागोवा घेत, सेलबोटला हाकारणे डोळ्यात तेल घालून करावे लागत होते.
जी पी एस सिस्टीममुळे समोरील बोटीचा वेग, दिशा, अंतरापासूनचे अंतर रडारवर दिसत होते. त्या अनुषंगाने सेलबोटीला दिशा देण्याचे काम, सहाय्यक कप्तान सुचेता मॅडम सुद्धा अतिशय सराईतपणे करत होत्या.  या रात्र सफरीत गाण्यांची मैफिल सुद्धा जमली.

त्यानंतर गप्पांची सुरुवात झाली.  'तुम्ही जग प्रवास केलात, त्या बोटीचे नाव  *म्हादेई*  हे गोव्यातील मच्छीमारांच्या देवी वरून दिलेय', याचा उल्लेख तुमच्या  *"फर्स्ट इंडियन"*  पुस्तकात आलाय. 'मग या बोटीचे नाव  *अंतरा*  कसे दिले?',  मी दिलीप सरांना विचारले.
'गाण्यात पहिला मुखडा असतो, त्या नंतर अंतरा येतो,  म्हादेई माझ्या सागर संगीत सफरीचा *मुखडा* होती, तर माझ्या निवृत्ती नंतर आणलेला सागर सफरीचा हा *"अंतरा"* आहे, गालात हसून कमांडर दिलीप सर उत्तरले.

     एव्हढ्या प्रचंड मोठ्या भारत वर्षात तुमच्या अगोदर कोणीच कशी सेलबोटीतून जग परिक्रमा केली नाही?   हा प्रश्न त्यांना सर्व ठिकाणी विचारला गेला होता. त्या मुळेच कमांडर दिलीपना  सेलिंग हा साहसी क्रीडा प्रकार आता तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे. पूर्वीच्या काळात सागर ओलांडून जाणें निषिद्ध मानले जायचे. त्यामुळे असे साहस कोणी केले नसावे.
*जगाची सफर त्यांनी अमावास्येला सुरू केली. त्या बद्दल त्यांच्या आईने सांगितले होते,  " प्रत्येक दिवस शुभ दिवस असतो". सेल बोटीने माझा मुलगा जगाची परिक्रमा पार करणारच, हा आपल्या मुलावर असलेला प्रचंड विश्वास कमांडर दिलीपने सार्थ केला.*
म्हादेई या शिडाच्या बोटीने 19 ऑगस्ट 2009 रोजी मुंबईहुन एकट्याने सुरू केलेली जगाची सागर सफर 19 जून 2010 मध्ये त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. या बद्दल भारत सरकारने त्यांना  *शौर्यचक्र*  देऊन गौरविले आहे.
दिलीप सरांनी त्यांचे *" सागरी परिक्रमेचा पराक्रम"* हे पुस्तक भेट दिले होते. त्या अनुषंगाने आम्ही काही प्रश्न दिलीप सरांना विचारले. रात्री कडक कॉफीचे घुटके घेत त्यांनी खुमासदार उत्तरे दिली.

"भरती-ओहोटी समुद्र किनाऱ्याला असते खोल समुद्रात त्याचा काहीही परिणाम जाणवत नाही. समुद्रातील अंतरप्रवाह आणि वाहणारे वारे याचा सेलबोटीच्या वेगावर परिणाम होतो." हे दिलीप सरांनी सांगितले.

दुसरा दिवस उजाडला तेव्हा आम्ही रत्नागिरी पार केले होते. सकाळी बाबांनी आणलेले घारगे, पापड्या राजेशने आणलेल्या पुरणपोळ्या दाभोलकरांचे ठेपले आणि कंदापोहे नास्ता होता.  इन्स्टंट चहा-कॉफीचे डेकवर उभे राहून घोट घेणे आणि सागराच्या लाटा न्याहाळणे यात वेगळीच नशा होती. चारही बाजूला समुद्रपार दिसणारे गोलाकार  क्षितिज आणि फक्त अंतरा बोट;   जणू काही पृथ्वीच्या मध्यावर आम्ही आहोत असेच वाटत होते.  अशा वेळी मन शांत होते आणि निसर्गाची वेगवेगळी रूपे मनपटलावर उमटतात.

वाऱ्याच्या दिशेप्रमाणे सुकाणूची डिगरी रडारवर बदलावी लागत होती. गेली दोन वर्ष आम्ही गोव्यात ज्या सेलबोट चालविल्या त्या मॅन्युअल होत्या. प्रत्यक्ष वाऱ्याच्या गती आणि दिशेप्रमाणे शिडांची दिशा सुकाणू द्वारे बदलावी लागत असे. अंतरामध्ये ही जबाबदारी संगणकामार्फत केली जात होती. मुख्य काम म्हणजे समोरून बाजूने येणाऱ्या बोटी आणि मासेमारी जाळी यांच्याकडे लक्ष ठेवणे. समुद्रात असणाऱ्या छोट्या टेकड्या, खडक;  त्या पासूनचे अंतर याची इत्यंभूत माहिती समोतील क्रिनवर मिळत होती. त्यामुळे प्रत्यक्ष सुकाणू धरून बोट चालविण्याची आवश्यकता नव्हती.
उन्हे चढायला लागली तशी वाऱ्याने दिशा बदलली आणि सेल जाईब करावे लागले.  समुद्राची खळखळ वाढली होती.
इतक्यात समुद्राच्या पृष्ठभागावर शेपटीच्या आधारे धावणारा/ उडणारा  मासा दृष्टीस पडला. या समुद्र पृष्ठावरील माशांना पकडण्यासाठी सीगल पक्षांचा  चिवचिवाट सुद्धा मनमोहक होता. ऑस्टिन रिडले कासवाचे दर्शन झाले. ही कासवे हरिहरेश्वर जवळच्या आंजर्ले, हर्णे बंदरावर अंडी घालण्यासाठी  जातात.
वाऱ्याची गती वाढल्यामुळे छोटे शिड फडफडत होते तर मोठ्या शिडामधून  बुम, बुम आवाज संगीत जल सफरीचा अंतरा सुरू झाल्याची जाणीव करून देत  होता.  दोन डॉल्फिन सुद्धा अंतराच्या भोवती आपली कलाकारी दाखवत होते. त्यांचे समुद्रामध्ये लयबद्ध उद्या मारणे एखाद्या कसरतपटूला लाजवेल असे होते. हे सगळं नाविन्यपूर्ण होते.
दुपारच्या जेवणा नंतर राजेश आणि मी आंघोळ करायचे ठरविले. चालत्या अंतराच्या मागच्या रेलिंगवर आम्ही दोघे बसलो कमांडर दिलीप सरांनी पंप चालू करून पाईपद्वारे समुद्राच्या पाण्याचा वर्षाव आम्हा दोघांवर सुरू केला. चालणाऱ्या बोटीतून पाय समुद्रात सोडून डोक्यावर समुद्र घेणे ही पर्वणीच होती. खूप वेळा किनाऱ्यावर सुमुद्रस्नान केले आहे. पण आजची,  नितळ समुद्रातील आंघोळ बेधुंद करणारी होती.
सायंकाळी पाचच्या दरम्यात मालवण किनारा दिसू लागला. त्याच्याच बाजूला दाभोलकरांचे भोगावे गाव आहे.  येथेच चिपी विमानतळ सुद्धा तयार होतंय.
किनाऱ्यावरील चमचमणाऱ्या दिव्यांच्या रांगा आकाशातील ताऱ्यांशी स्पर्धा करीत होत्या. आता महत्वाचे लक्ष होते; वेंगुर्ला रॉक पार करण्याचे. मालवण परिसरातून मासेमारी करायला निघालेल्या बोटी, त्यांची जाळी  चुकवून समुद्रात घुसलेला वेंगुर्ला रॉक पार करायचा होता. वाऱ्याच्या गतीमुळे तसेच आंतरप्रवाहामुळे अंतरा  रॉकच्या जवळ जवळ जात होती.  अतिशय थंड डोक्याने आणि प्रचंड आत्मविश्वासाने कमांडर दिलीप सेल हाकारत होते.  अल्ट्रा साउंड सिस्टीममुळे रॉक पासूनचे अंतर समजत होते. निव्वळ पाचशे फुटावरून अंतरा वेंगुर्ला रॉक पार करीत होती. सायंकाळी सातच्या दरम्यान वेंगुर्ला रॉक पार झाला आणि आम्ही सर्वांनी जल्लोष केला.
एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सुरू झाली खाद्य मैफिल.  स्मोक चिकन तंदुरी,  हर्ब चिकन तंदुरी, वर पुरण पोळी आणि साजूक तूप सोबत अँप्पल ज्यूस फर्मास खादीची चळवळ सुरू झाली.
गोव्यावरून मुंबईला प्रवासी वाहतूक करणाऱ्या *आंग्रीया* जहाजाचे दर्शन झाले. पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चंद्राचा प्रकाश आसमंतात परावर्तीत होत होता. मध्ये मध्ये पुनवेचा चंद्र ढगाआड लपंडाव  खेळत होता. त्यावेळी त्याच्या प्रकाशरेषा अंतरावर आम्हाला न्हाऊ घालत होत्या.
आता आळीपाळीने जागायचे होते. दिलीप सरांशी आमच्या गप्पा सुरू झाल्या. वाचन, गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे हे त्यांचे छंद. तर बोटीवर त्याचे प्रचंड प्रेम. टंकसाळेबाबांनी बोटीवर असलेल्या सर्व सेफ्टी डिव्हाईस बद्दल माहिती जाणून घेतली. गप्पा मारताना सुद्धा दिलीप सरांचे लक्ष पुढच्या टप्प्याकडे होते. भर रात्री तेरेखोलची खाडी पार करून अंतराने गोवा हद्दीत प्रवेश केला होता.
वाऱ्याची गती मंदावली होती, त्यामुळे सेलबोट संथपणे मार्गक्रमण करीत होती. पहाटे पहाटे वातावरण आल्हाददायक आणि थंड होते.
सहा वाजता टकटकीत उजाडले. सकाळच्या नाश्त्याला मल्टीग्रेन  ब्रेड,  भुर्जी,  सॉस,  घारगे, ठेपला हॅजलनट कोल्ड कॉफी असा बेत होता.
आता डोनापावला बंदरावर पोहोचण्याची वेळ जवळ येऊ लागली, तसे मन उल्हसित होऊ लागले. दिलीप सरांचा सहवास संपत आल्याबद्दल मन थोडे खट्टू सुद्धा झाले.
गोव्याच्या राजभवनाच्या अलीकडेच दोन्ही शीड गुंडाळण्याचे काम पूर्ण केले. आतील सामानाची आवराआवर केली. राजभवन ओलांडून डोनापावला बंदरात दुपारी अडीच वाजता अंतरा बोट शिरली.
मुंबई ते गोवा, शिडाच्या नावेने केलेली  एक आगळी वेगळी साहसी सागर सफर,  विक्रमवीर कमांडर दिलीप सरांच्या सहवासात पूर्ण झाली होती. जग प्रवासाच्या छोट्या सागर सफरीची झलक माझ्या अनुभवात सामील झाली होती.
*सतीश विष्णू जाधव*