Sunday, May 3, 2020

Mumbai To Kanyakumari Cycling (मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग) (दिवस पहिला) 25.10.2019

 25.10.2019  दिवस पहिला  

   मुंबई ते पुणे सायकलिंग

मुंबई ते कन्याकुमारी राईडचा आजचा पहिला दिवस होता. 1760 किमी सायकलिंग 11 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय घेऊन, तसेच या संपूर्ण सायकल वारीत "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश जनमानसात रुजविण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरू झाली सायकलवारी. सोबत माझा सायकलिस्ट मित्र लक्ष्मण नवले पण होता.

पहाटे साडेतीन वाजता मुंबईवरून सायकल राईड सुरू झाली. कन्याकुमारी गाठायचे असल्यामुळे मागील कॅरियरवर बरेच समान होते. चौकपर्यंत सकाळी आठ वाजता पोहोचलो. पुढचा खोपोली पर्यंतचा रस्ता अतिशय खराब होता. त्यात सेल्फ सपोर्ट राईड, म्हणून अशा रस्त्यावर सांभाळून सायकल चालवत होतो. आणखी तासाभरात खोपोलीला  पोहोचलो.

माझ्या सायकलला MTB टायर असल्यामुळे, ही सफर सोपी झाली. खोपोलीत जेवण घेतले. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, 'तुमचे मागील चाक आउट आहे'. जेवल्यावर चाक फिरवून पाहिले. खरेच आउट होते, मागचे चाक.

पुण्याला जाऊन आउट काढायचे ठरले. आता खंडाळा घाट सुरू झाला. आज आम्ही पहिल्यांदा सर्व सामनासह घाटात सायकलिंग करत होतो. पहिला हॉल्ट शिंगरोबा मंदिराजवळ घ्यायचा ठरले.

लक्ष्मण त्याच्या वेगाने हळूहळू पुढे सरकू लागला. शिंगरोबा मंदिराच्या आधी एक अवघड वळण आहे. तेथे माझ्या सायकल मधून "खाड्खुड" आवाज झाला. झटक्यात सायकल थांबली. सावधगिरीने ताबडतोब सायकल मुख्य रस्त्यावरून बाजूला  घेतली आणि आडवी झोपवली. सायकलची चेन गियरमध्ये अडकली होती. तसेच एक तार तुटून पडली होती. खूप प्रयत्न करून चेन सोडवली. तार एका बाजूने तुटून लटकत होती.  लक्ष्मणला फोन लावला. त्याने निखळलेली तार बाजूच्या स्पोक मध्ये गुंतवायला सांगितले.  लक्ष्मण शिंगरोबा मंदिराकडे सायकल ठेऊन खाली यायला निघाला. मी सायकल ढकलत घाट चढत होतो. रस्त्यात लक्ष्मण भेटला. त्याने सायकल तपासली आणि ढकलण्यापेक्षा सायकलिंग करायला सांगितले. मारली टांग सायकलवर आणि सुरु केली. लक्ष्मण मागून सायकल ढकलत  होता. आम्ही आता मंदिराकडे पोहोचलो. घामाने  थबथबलो होतो. माठातील गार पाणी पिऊन निवांत झालो. तेवढ्यात लक्ष्मणने पुण्याला सत्यजितला फोन करून पुण्यात सायकल मॅकेनिकची व्यवस्था करण्यास सांगितले.

चाक थोडेसे वेडेवाकडे झालेले,  त्यात एक तार तुटलेली. मागील चाकावर सामानाचे ओझे. अशा परिस्थितीत लोणावळा गाठायचे होते.  अमृतांजन पुलावर पुन्हा चेन लॉक झाली. आता लक्ष्मणला फोन न करताच मीच मॅकेनिक झालो. चेन सोडवली आणि अतिशय सावकाश सायकलिंग करत राजमाची पॉईंटकडे पोहोचलो. माझ्या उशिरा येण्याचे कारण लक्ष्मणाला समजले होते.

राजमाची पॉइंटवर मस्त थंडगार वारे सुटले होते.  समोरील हिरव्यागार डोंगरमाथ्यावरून झकास पांढराशुभ्र धबधबा खालच्या झाडीत लुप्त होत होता.  निळेशार आकाश आणि त्यात काळ्याभुऱ्या ढगांची गर्दी, प्रकाशाच्या विविध छटा अनुभवताना, डोळ्याचे पारणे फिटले होते.
*दिवाळीतील धनत्रयोदशीचा आजचा दिवस, या  निसर्गाच्या समवेत व्यतीत करण्याचे भाग्य माझ्या जीवनात आले होते. सोबत हसतमुख दोस्त लक्ष्मण होताच. जीवनाची "सेकंड इंनिग" अशीच नेहमीच अफलातून असावी, अशी मनोमन प्रार्थना केली.*पुढचा लोणावळ्यापर्यंतचा सायकल प्रवास याच आनंदलहरीवर झुलत डोलत पूर्ण झाला. शिवाजी नगरला आल्यावर आमचा लेह सायकलिस्ट मित्र सत्यजित  मदतील आला. त्यानेच कर्वे रोडवरील ट्रॅक अँड ट्रेलचे दुकान दाखवले.

या दुकानातील मॅकेनिक राजू , देवासारखा धावून आला. दुकान बंद होण्याच्या बेतात होते. माझ्या सायकलची अडचण समजताच राजुने भराभर काम सुरू केले आणि अर्ध्या तासात सायकल टकटकीत झाली.

हा राजू सुद्धा सायकलिस्ट आहे. दरवर्षी पुण्याचा एक गृप घेऊन सायकलिंग करत गोव्याला जातो. आम्ही कन्याकुमारीला सायकलिंग करत जाणार, हे कळल्यावर त्याने पेढे दिले. आम्हाला पाहून खूप आनंदाला होता राजू !! तेथून  आम्ही शिवाजी पुतळ्याजवळ आलो. येथे सत्यजितला निरोप दिला. आजचा मुक्काम कोथरूड मध्ये होता. आज 152 किमी सायकलिंग झाले होते.

पहिल्या दिवसाची सायकल सफर  खडतर होती पण अश्यक्य नव्हती.  कठीण गोष्ट साध्य केली की तीचा आनंद अपरिमित आणि अविस्मरणीय असतो. एक गोष्ट  लक्षात आली, जीवनात अशक्य असे काहीही नसते, परंतु ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक असते.


सतीश विष्णू जाधव

4 comments:

  1. ���� अभिप्राय लिहिण्यासाठी तेच ते शब्द किती वेळा वापरायचे ?
    आमचा शब्द संग्रह मर्यादित आहे.
    तरीही म्हणेल,
    " अतिशय छान "
    ����

    ReplyDelete
    Replies
    1. लक्ष्मण भाऊ, तुमच्या अभिप्रायामुळे प्रभावित झालो

      Delete