Monday, August 3, 2020

मैत्री दिवस सायकलिंग

मैत्री दिवस सायकलिंग

२ ऑगस्ट २०२०

सकाळीच शाळेतला परममित्र संजय कोळवणकर बरोबर बोलणे झाले, त्याच वेळी आजचा मैत्री दिवस विजय मित्रासोबत सायकलिंग करून साजरा करायचा हे मनाने ठरविले.

चार दिवसापूर्वी कोणीतरी बेलार्ड पियरचे फोटो पोष्ट केले  होते, गुलमोहर फुललाय म्हणून. आज गुलमोहर दर्शन करायचे म्हणून संध्याकाळी पाच वाजता विजयसह सायकल राईड सुरू केली. 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला पोहोचलो. तो परिसर सायंकाळच्या सोनेरी सूर्य किरणांनी न्हाऊन निघाला होता. रहदारीसुद्धा शांत झाली होती. स्टेशनच्या मुख्य इमारती बाहेरील कुंपणावर निळसर गुलाबी रंगांच्या फुलांनी एक वृक्ष बहरला होता. 
हेरिटेज बिल्डिंगच्या कॅनव्हासवर हिरव्यागच्च वृक्षावर गुलाबी निळी फुले म्हणजे इंग्रजी इमारतीवर निसर्गरूपी छत्रपती शिवाजी महाराजांचे आक्रमणच जाणवले. म्हणूनच स्टेशनला व्हिक्टोरियाचे नाव बदलून छत्रपतींचे नाव दिले असावे. मन एकदम प्रसन्न झाले. 

 स्टेशनच्या बाहेर इमारतीचे फोटो काढत असतानाच, माझ्या सोगो कराओके संगीत  मैफिलीची मैत्रीण गीताची भेट झाली.
 आजच्या दिवशी तिची भेट म्हणजे संपूर्ण सोगो परिवाराची भेट होती. तिला सुद्धा सायकलिंगचा श्रीगणेशा लवकरच करायचा आहे. तेथे खूप फोटो काढून बेलार्ड पियरकडे वळलो. 

काय आश्चर्य... मुलांच्या गुलमोहरानी बेलार्ड पियर फुलून गेला होता. आसपासची खूप मुले संपूर्ण परिसरात क्रिकेट खेळत होती. गुलमोहराचा मागमूस कुठेच नव्हता. बेलार्ड पियरच्या सर्व मार्गिका फिरलो. 
अचानक एक वेगळेच दृश्य समोर दिसले. एका मार्गात ढोलताशा लेझीमसह एक मिरवणूक निघाली होती. जवळ जाऊन पाहिले तर एका ऐतिहासिक चित्रपटाची शूटिंग सुरू होती. आश्चर्य वाटले... या मिरवणुकीच्या शूटिंगला करोना काळात परवानगी कोणी आणि कशी दिली, याचे. 

 या मिरवणुकीचे शूटिंग करून गेटवे ऑफ इंडियाकडे निघालो.

सगळ्या ठिकाणी बॅरिकेट लावून गेटवे ऑफ इंडिया परिसर बंद केला होता. ताजमहाल हॉटेल समोरील चौपाटीवरसुद्धा जायला बंदी होती. नेहमी तुडुंब  गजबजलेला हा परिसर एकदम शांत वाटला. माणसांच्या कोलाहलाऐवजी पक्षांचे पंख फडफडण्याचे आवाज आसमंतात घुमत होते. 


आकाशातील काळे पांढरे ढग गेटवे ऑफ इंडियाच्या चार बुरुजांशी हितगुज करत होते. विचारात होते, 'कधी येणार तुझी लाडकी माणसे, तुला भेटायला'.

नीलवर्णी आकाश छताखाली काळे पांढरे ढग हातात हात गुंफून वारा वाहिल तसे स्वछंदी भरकटत होते . ते सागराच्या संथ लाटांशी मान डोलावून  हितगुज करत होते.  लाटाही ढगांशी हळुवारपणे गुजगोष्टी करत होत्या. 

पोलिसांची गाडी येण्याअगोदर दोनचार फोटो काढून तेथून सटकलो. थेट मारिन लाईन्स चौपाटी गाठली. आज खूप मोठा जनसमुदाय चौपाटीवर दिसत होता. सोशल डिस्टनसिंगमुळे तातडीने फोटो काढून पुढे प्रस्थान केले. 
गिरगाव चौपाटीवरून वाळकेश्वरला चढणाऱ्या रस्त्यावर थांबलो. तेथून मारिन लाईन्स चौपाटी परिसर अतिशय विहंगम दिसतो. सूर्य अस्ताला गेला होता, परंतु त्याची लाली राणीच्या रत्नाहाराला सोन्याचा मुलामा देत होती.
 समुद्राच्या निळाईवर तो हिरेजडित रत्नहार चमचम चमकत होता. सागर निळ्या नभाच्या रंगाने न्हाऊन निघाला होता. आकाशाची निळाई पाहून सागराचे पाणी आनंदाने उचंबळून येत होते. 
त्या क्षितिजा जवळ नभाचे आणि सागराचे जेथे मिलन होते, तेथे मनाची सैर सुरू झाली. शांत चित्ताने ती एकरूप अवस्था,  समाधी अवस्था अनुभवायला लागलो.

 लाजेने चुर होऊन थरथरणारी लाट आजच्या मैत्री दिनानिमित्त प्रिय "मित्राला" आर्जव करत होती, 'थांब ना थोडावेळ, नको ना मावळूस एवढ्या लवकर. मित्र तिला हसत हसत सांगत होता, उद्या सकाळी लवकरच भेटूया. अच्छा तो हम चलते है.

हे दोघांचे हितगुज ऐकून मित्र विजयला म्हणालो, चल आपणसुद्धा निघुया इथून. जास्त वेळ थांबलो तर आपले पोलीस मित्र येतील आपल्या भेटीला. विजय हसला... आम्ही कमला नेहरू पार्ककडे प्रस्थान केले. रस्ते वर्दळ नसल्यामुळे निवांत होते. समुद्रही त्या शांततेचा कानोसा घेत शांत झाला होता. संपूर्ण तीनबत्ती परिसर निर्जन झाला होता. फक्त तुरळक गाड्यांची रहदारी सुरू होती. 

तेथून महालक्ष्मी, वरळी मार्गे घरी पोहोचलो. दोन तासात पस्तीस किमी राईड झाली होती. 

आजच्या मैत्री दिनानिमित्त जिवलग मित्र संजय बरोबर बोलणे झाले, मित्र विजय बरोबर सायकल राईड झाली.  सोगो मैत्रीण गीताची भेट झाली. गेटवे ऑफ इंडियाची ढगांशी झालेली मैत्री पाहिली आणि गिरगाव चौपाटी नाक्यावरून सागरी लाट आणि सूर्य नारायणाची मैत्रीसुद्धा अनुभवली होती.

आजचा मैत्री दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला होता.

आझाद पंछी....

Wednesday, July 29, 2020

दिंडीगड सायकल सफर

दिंडीगड राईड

२६ जुलै २०२०


सकाळी पावणे पाच वाजता सायकल राईड सुरू झाली. बरोबर  पाच वाजता दादरच्या प्रीतम हॉटेल जवळ विजय तयारच होता. सायकलच्या हँडलला लावलेला हाय पॉवर हेड लाईट आणि हेल्मेटला लावलेला लाल ब्लिन्कर लाईट  चालू  केला. सकाळच्या पावसाळी वातावरणात नवीनच घेतलेला  हेड लाईट अतिशय प्रखर उजेड रस्त्यावर टाकत होता. आम्ही दोघेही सर्व सेफ्टीगियरसह सज्ज होतो.

आज दिंडीगड सायकल राईड करायची होती. विशेष म्हणजे आजच्या राईडचे प्लॅनिंग चिरागने केले होते. पंधरा दिवसापूर्वी समर्पयामीचे दहा शिलेदार याच दिंडीगड सायकल सफरीवर जाऊन आले होते. त्यांचे फोटो पाहिल्यावर आपण ही राईड नक्कीच करायची हे आझाद पंछी सदस्यांना वाटतच होते आणि त्याला मूर्तरूप चिरागने दिले होते. 

कालच खास निलेश शिंदेच्या समवेत घोडबंदर फाउंटन हॉटेल राईड केली होती. तेव्हाच चिरागने आजच्या राईडचे शिक्कामोर्तब केले होते.

दादरवरून सकाळी  पाच वाजता, ब्रम्हमुहूर्तावर  राईड सुरू झाली होती. रात्री पाऊस पडून गेला होता, त्यामुळे रस्ता ओलसर होता. अतिशय आल्हाददायक आणि अंमळ शांतनिवांत वातावरण होते.  सुंदर गुलाबी वारे सुटले होते. विजयची साथ असली की सायकलिंग साठी एक रिदम असतो. कधी तो पुढे कधी मी पुढे, अशी जुगलबंदी आम्हा दोघांत चालली होती. एका विशिष्ट वेगाने आम्ही सायकलिंग करत होतो. 

सायन रुग्णालयाजवळ अद्ययावत शौचालय दिसले. खास महिलांसाठी  शौचालय आहे हे वाचून खूप आनंद झाला.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी उड्डाणपुलावर पोहीचलो आणि सूर्यनारायणाची प्रभा, तांबूस सोनेरी रंग उधळत नभांगणात अवतीर्ण झाली होती. 

जसे की,  भास्कराच्या आगमनाची दवंडी पिटत होती. ह्या सोनेरी रंगाचा मुकुट रुपेरी ढगांनी परिधान केला होता. रस्त्याच्या एका बाजूला हिरव्यागार झाडांना झाकून टाकणाऱ्या जाळीदार वेली आणि दुसऱ्या बाजूला  मऊ मुलायम  गवताचा  हिरव्या रंगाचा घनदाट गालिचा  पसरला होता.  सकाळ सकाळीच पाखरांची इकडून तिकडे उडण्याची लगबग आणि किलबिल निसर्गाच्या मनमोहक रंगांना संगीताचा साज चढवत होता.

खरोखरच... निसर्गाचे हे विराट रूप पाहताना हरखून जायला होते. जाणीव होते,  "देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी". निसर्गाच्या या विश्वात रममाण झाल्यावर सायकलिंग म्हणजे आनंदाचा झोका असतो. तेथे दमछाकीला थारा नसतो

तासाभरातच सकाळी सहा वाजता मुलुंड चेक नाक्यावर पोहोचलो. विजय सोबत आज पंचवीस किमीची भन्नाट सायकलिंग झाली होती. 

विजयने आजच्या राईडसाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. त्याची सुट्टी घेण्याची कल्पना एकदम फर्मास होती.  आम्ही मुलुंडला हायड्रेशन ब्रेक घेतला तेव्हा विजयने आपल्या साहेबाला,  'मी आज रजेवर आहे'  हे  सांगितले. 

आता भूक लागली होती. विजयने फर्मास साजूक तुपाचा शिरा बनवून आणला होता. टोलनाक्या जवळील बाकड्यावर बसून शिरा फस्त केला. चिराग इतर सदस्यांबरोबर  साडेसहा वाजता तीन हात नाक्यावर येणार होता, त्यामुळे पंधरा मिनिटात  पुढची राईड सुरू केली.

टोल नाका पार करण्याअगोदरच सायकलच्या मागच्या चाकातून खर्र खर्र आवाज येऊ लागला. मी सायकलला ओढतोय असे जाणवले. सायकल थांबवून मागचे चाक फिरवले तर ते वेडेवाकडे फिरत होते. तारा तपासल्या. चार पाच तारा तुटल्याचे लक्षात आले. तातडीने मयुरेश आणि आदित्यला फोन लावले. त्यांचे फोन लागले नाहीत. मग हिरेनला फोन लावला. त्याने सायकल येऊरला घेऊन यायला सांगितले. 

बऱ्याच तारा तुटल्यामुळे अतीशय सावधगिरीने आणि संथगतीने ठाण्याकडे निघालो. तीन हात नाक्यावर पोहोचायला दहा मिनिटे उशीर झाला. तेथे चिराग, प्रशांत, अतुल, प्रिन्स यांची भेट झाली. तेवढ्यात राजेशचा फोन आला, पावणे सात वाजता तो खारेगाव टोल प्लाझाला उभा राहणार होता.

सायकलचे काम केल्याशिवाय मला दिंडीगडला जाणे शक्य नव्हते. अतुलने फोनाफोनीला सुरुवात केली. यशवंत जाधव माझ्यासाठी सायकल घेऊन यायला तयार झाले. अतुलने आणखी एका मित्राला फोन केला. इतक्यात काका उर्फ आदित्य देवासारखा हजर झाला. आदित्य म्हणजे सर्व अडचणीचे उपाय असणारा सायकलचा डॉक्टर आहे. त्याने सायकलची अवस्था पाहिली आणि हिरेनला फोन करून एक स्टँड बाय चाक आणायला सांगितले.

इतक्यात यशवंत जाधव यांचे सुद्धा आगमन झाले. चिराग, प्रशांत आणि प्रिन्सला डॉ राजेशच्या भेटीला खारेगाव टोल नाक्याकडे पाठवले.  सायकलचे चाक रिपेअर करून मी, विजय आणि अतुल त्यांना जॉईन होणार होतो. वर्तकनगर जवळ हिरेन स्टँडबाय चाक घेऊन आला. आदित्यने ताबडतोब चाक बदलले आणि सायकल तयार झाली. 

आता आदित्य काका, यशवंत जाधव सुद्धा दिंडीगड राईडला तयार झाले. आदित्य येतोय याचा सर्वात जास्त आनंद मला झाला. अतुलने सर्वांसाठी केळी घेतली. अतुल, राजेश, प्रशांत आणि प्रिन्स टोल नाक्यावरून पुढे निघाले होते. माझ्यासह विजय आणि यशवंतने सायकलिंग सुरू केली. कॅडबरी जंक्शन जवळ अतुल आणि आदित्य; सिद्धार्थ  येणार म्हणून त्याची वाट पाहत थांबले.

 खारेगाव टोल नाका पार करून अंजुर फाट्याकडून पाईप लाईनच्या आत आम्ही शिरलो. येथून सोनाले फाट्यापर्यंत सोळा किमी राईड करायची होती. पाईप लाईनचा रस्ता जणू काही आम्हा सायकलिस्ट साठीच मोकळा होता. दोन्ही बाजूला पाण्याचे भलेमोठे पाईप आणि मध्ये छोटा रस्ता.  पाईपच्या पायथ्याला हिरवी खुरटी गवताळ झाडे वाऱ्यावर डोलत होती. ओवाळे फाट्याजवळ मागून येणारे आदित्य, अतुल आणि सिध्दार्थ यांची भेट झाली. 

अजून दहा किमी राईड करायची होती.  आम्ही सहाजण भराभर पेडलिंग करत सोनाळे गावाकडे निघालो. या पाईप लाईनच्या उजव्या बाजूला मुंबई नाशिक हायवे आहे, तर डाव्या बाजूला मोठी मोठी वेअर हाऊसेस आहेत. इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी मोठ्या मोठ्या कंपन्यांना विकून ह्या या वेअर हाऊसेसची निर्मिती केली आहे. हा सर्व परिसर ड्रायपोर्ट म्हणूनच आता उदयाला आला आहे. 

पुन्हा आम्ही सर्व पाईपलाईन मधून मार्गक्रमण करू लागलो. या पाईप लाइनचे एक वैशिष्ट्य आहे. त्या अजस्त्र पाईप कडून दूरवर पाहिलं की दोन्ही पाईप एकमेकांना मिळाल्याचे दिसतात आणि मधला रस्ता नाहीसा होतो. हे तर मृगजळासारखे असते. एक सुसाट अनुभव गाठीला आला होता. आदित्य आज जॉईन झाल्यामुळे आजची सफर भन्नाट आणि जबरदस्त होणार याची मला खात्री झाली होती. 
मुंबई महापालिका या पाईपचा अतिशय चांगला मेंटेनन्स ठेवते. त्यामुळे जागोजागी पाईपच्या रंगरंगोटीची खबरदारी घेतलेली दिसत होती. तसेच या रस्त्यात कुठेही अतिक्रमण झालेले नव्हते.

साडेनऊ वाजता  आम्ही सोनाळे फाट्यावर पोहोचलो  वाटेत राजेश आम्हाला रिसिव्ह करायला सायकलिंग करत आला होता. राजेशने वजन खूपच कमी केले आहे. सोनाळे फाट्यावर गरमागरम वडापाव आणि अतुलने आणलेली केळी हादडली. 

 सोनाळे गावात लोकवस्तीपेक्षा कारखानेच दिसत होते. आदित्य काकाने दिंडीगड चढताना काय काय काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती सर्वांना दिली.

काका म्हणाला, 'काही ठिकाणी एक बाय एक गियर सुद्धा जास्त वाटेल, त्यामुळे दोघांमध्ये योग्य अंतर ठेवा, चिंचोळा रस्ता आणि अतिशय उंच चढाई असल्यामुळे झिकझाक सायकल चालावा. एखाद्याला थांबायचे असेल तर रस्त्याच्या किनाऱ्याला थांबा. मागून येणाऱ्याला वाट द्या'.

 सोनाळे गावातून दिडेश्वर महादेव मंदिर फाट्यावरून उंच चढाई सुरू झाली. तीन किमी चढाई होती. आदित्य, राजेश, चिराग, प्रिन्स पुढे सरकले. माझ्या सोबत विजय, अतुल, यशवंत, प्रशांत आणि सिद्धार्थ अतिशय धीम्या गतीने चढाई करत होतो. थोड्याच वेळात अतुल सायकल ढकलायला लागला.  माझ्या मागोमाग विजय अतिशय आत्मविश्वासाने घाट चढत होता. दहा वाजून गेल्यामुळे सूर्याचा पारा चढला होता. पंधरा वीस मिनिटातच मी नाका ऐवजी तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात केली. आता हायड्रेशन ब्रेक घेणे गरजेचे होते. 
 

माझ्या पुढे  यशवंत, प्रशांत आणि सिद्धार्थ होते. पाऊण तासातच त्यांची दमछाक झाली. हळूहळू पुढे सरकताना, यशवंत म्हणाला, 'तुम्ही व्हा पुढे, आम्ही थांबतो इथेच'.

जवळपास पाऊण घाट चढून गेलो होतो.  एका झाडाखाली पाणी प्यायला थांबलो. पाच मिनिटे विश्रांती घेऊन सायकलला पेडल मारायचा प्रयत्न केला, परंतु तो पॅच एकदम स्टीफ होता. त्यामुळे सायकल ढकलतच तो चढ चढावा लागला. पुढे थोडा प्लेन रस्ता आल्यावर पुन्हा पेडलिंग सुरू केले. शेवटचा शंभर फुटाचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होता. तसेच पावसामुळे तेथे शेवाळ जमलेले होते. तो  पॅच पुन्हा सायकल ढकलत चढावा लागला. 

आदित्य आणि चिराग पुन्हा खाली गेले आणि यशवंत,  प्रशांत, विजय यांना ऊर्जा देऊन, त्यांना सुद्धा वर घेऊन आले. जवळपास दीड तास लागला संपूर्ण चढ पार करायला. आदित्य आणि चिरागची कमाल होती.  कोणालाही गिव्ह अप करू दिलं नाही. आदित्यच एकच म्हणणं होतं. वरून दिसणारा अप्रतिम निसर्ग तुम्हाला खालून दिसणार नाही. थोडे आणखी परिश्रम घ्या आणि निसर्गाचा आनंद लुटा. 

मंदिराच्या पायथ्याला सर्व सायकली लॉक करून शेवटचा पाचशे फुटाचा ट्रेक सुरू केला.  एका उंच टेकाडावर दिंडीगड महादेवाचे मंदीर होते. ओम नमः शिवाय चा घोष सुरू होता. अतिशय पवित्र वातावरणात, निसर्गाचा हिरवागार आविष्कार पाहताना मन अतिशय उल्हसित झाले. चढाचा थकवा क्षणात नाहीसा झाला. चिरागच्या प्रयत्नांना मूर्त रूप मिळाले होते.

आजच्या सायकल सहलीची गम्मत एक होती. सुरुवातीला फक्त पाच सदस्य होते, परंतु ऐनवेळी दहा सदस्य झाले होते. आजच्या  नेतृत्वाचा झेंडा आदित्यच्या साथीने चिरागच्या खांद्यावर होता. त्याने समर्थपणे तो पेलला होता. डॉ राजेशने त्याला स्पेशल थँक्स दिले.  देवदर्शन झाले, आता निसर्ग दर्शन होते. राजेशने कल्याण परिसर आणि डोंबिवली परिसर दाखवला. दोन्ही बाजूंनी जाणारी पाईप लाईन पहिली.  त्या मध्ये ठाणे खाडीचा तयार झालेला पाचूचा हार पहिला. 


त्यातून जाणारी रेल्वे लाईन आणि गर्द हिरवाई, जसेकाही एखाद्या विमानातूनच आमचे निसर्गदर्शन सुरू होते.

आकाशाची अथांग गहिरी निळाई, शुभ्र ढगांच्या पक्ष्यांचा विहार, तजेलदार हिरवीगार झाडे, पायवाटे जवळची हिरवट पोपटी झुडुपे, त्यात हळूच डोकावणारी नाजूक लहानशी पिवळी तृण फुले वाऱ्यावर डोलताना डोळ्यांना सुखावत होती. मंद वाऱ्यासोबत हिरव्यागार पानांची हळुवार चाललेली कुजबुज कानी येत होती. 

ती मंद सुरावट मन आनंदित करत होती. झाडांच्या हिरव्या रंगाचा ओला दर्प नाकाला जाणवत होता . वातावरणातील हिरवाई डोळे, नाक, कान याद्वारे मनाला आनंद देत होती. आजूबाजूला बागडणारी असंख्य फुलपाखरे निसर्गाचा आनंद आणि  जिवंतपणा साजरा करीत होती. एकमेकांच्या पंखाला पंख लावून या फुलावरून त्या फुलावर त्याचे विहरणे मला बालपणात घेऊन गेले.

फुलपाखरू  छान किती दिसते,  फुलपाखरू ।।

या वेलीवर फुलांबरोबर

गोड किती हसते फुलपाखरू ।।

पंख चिमुकले निळे जांभळे

हालवुनी झुलते फुलपाखरू ।।

डोळे बारिक करिती लुकलुक

गोल मणी जणु ते फुलपाखरू ।।

मी धरू जाता येइ न हाता

दूरच ते उडतें फुलपाखरू ।।

निसर्गाचा मनोरम नजारा मनाच्या गाभाऱ्यात ठासून भरला. 

आता परतीची राईड सुरू झाली. पायथ्याला आलो. सर्वांना भूक लागली होती. खाली एका दुकानाजवळ थांबलो. अमूल दूध आणि मिठाईवर ताव मारला. 

काका आणि राजेशला महत्वाचे काम असल्यामुळे दोघे तातडीने ठाण्याकडे  निघाले. आता आम्ही कल्याण ठाणे हायवे वरूनच परतीची सफर सुरू केली. उन्हाचा पारा चढला होता. तसेच गाड्या, ट्रेलर यांची उदंड रहदारी सायकलचा वेग सीमित करत होती. 

ठाणे गाठण्यासाठी दोन ठिकाणी हायड्रेशन ब्रेक घेतला. दुपारचे अडीच वाजले ठाण्यात पोहोचायला. येथून चिराग, प्रशांत, यशवंत, प्रिन्स आणि सिद्धार्थ ठाण्यातच राहत असल्यामुळे जेवायला घरी जाणार होते. परंतु अतुल, विजय आणि मला आणखी तीस किमी राईड करायची होती. त्यामुळे माजीवडे जंक्शन जवळ दुर्गा हॉटेल मधून पार्सल दालखीचडी घेऊन हॉटेलच्या पायरीवर बसून जेवलो. 

जेवण झाल्यावर अतुल घोडबंदर मार्गे गोरेगावकडे निघाला, तर मी आणि विजय पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईकडे निघालो.  दुपारचे ऊन आणि पोटातले जेवण यामुळे अतिशय धीम्या गतीने आम्ही सायकलिंग सुरू केले. सायंकाळी पाच वाजता सुखरूप घरी पोहोचलो. आज 105 किमी राईड झाली होती.

आजच्या सायकलिंग मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आदित्य आणि चिरागने गृपमध्ये मोटिव्हेशनचे काम केले, त्यामुळेच सर्वजण दिंडीगड टॉपला पोहोचू शकले.
दिंडीगड सायकल राईड हा माईंड गेम होता

आझाद पंछी....

Friday, July 24, 2020

मनाली-लेह-खारदुंगला सायकलिंग (दिवस पहिला)


*सोलांग व्हॅली*
०८.०७.२०१९

आज सकाळी साडेसात वाजता मनाली जवळच्या  15 माईल्स येथील युथ हॉस्टेल बेस कॅम्प मध्ये प्रवेश केला. गेल्याच वर्षी सायकलिंग सुरू केले आणि  आज मनाली लेह सायकलिंग करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी करून कॅम्प मध्ये दाखल झालो होतो. यामधे समर्पयामि ग्रुपचा सर्वात मोठा वाटा आहे. मधल्या काळात झालेले वेगवेगळे सायकलिंग ट्रेल, माथेरान, कसारा घाट,  जुन्नर माळशेज घाट आणि खंडाळा घाट सायकलिंग,  हिमालयन जालोरी पास सायकलिंग तसेच पंढरपूर सायकल वारी, या सर्व सायकल सफरीमुळे मनाली ते लेह  सायकलिंगसाठी प्रचंड मनशक्ती ऊर्जा प्राप्त झाली होती.



बेस कॅम्पचा पहिला दिवस  विश्रांतीचा होता.  अतिशय निसर्गरम्य परिसर होता बेस कॅम्पचा. मागे हिमालयाच्या हिरव्यागार पर्वत रांगा होत्या. कॅम्पच्या बाजूने बियास नदी वाहत होती. नदीच्या बाजूलाच हिरवळीवर तंबू ठोकण्यात आले होते. एक तंबू दहा सदस्यांना देण्यात आला होता. आजूबाजूला सफरचंदाची झाडे बहरली होती. सिमेंटच्या जंगलापासून दूर निसर्गात राहण्याचा अनुभव रोमांचकारी होता.


विश्रांतीचा दिवस असल्यामुळे लक्ष्मण नवले, ब्रिजेश सिंग आणि भरत दळवी यांच्या सोबत सोलांग व्हॅली पाहण्याचे ठरविले. कॅम्पमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट घेऊन आम्ही मेनरोड वरील स्पॅन हॉटेल जवळ मनाली बस पकडली. बसमध्ये एक वयस्क तिबेटीयन महिला पुढील सीटवर बसली होती. तिच्या बाजूला बसायला जागा मिळाली. साधारण 80 वर्ष वय असावे तिचे. हातातील जपमाळेचे मणी ओढत मंत्र म्हणत होती. तिच्या परवानगीने मी तिच्यासह सेल्फी काढला. 

तेव्हढ्यात एक रुबाबदार व्यक्ती बस मध्ये चढली. "कुठे निघालात तुम्ही" या त्याच्या मराठीतून विचारलेल्या प्रश्नाने मी आश्चर्य चकित झालो. मी मुंबईकर, पार्ल्याचा डोंगरे, या ठिकाणी मनाली नगरपलिकेसाठी घन कचरा व्यवस्थापनाचे प्रोजेक्ट् राबवतो, डोंगरेने सांगितले. मनालीमध्ये दररोज एक टन प्लास्टिक बॉटलचा कचरा निर्माण होतो  त्याची विल्हेवाट लावण्यासाठी   मनाली शहराच्या जवळच रांगडी येथे थर्मल प्लांट उभारला आहे. ह्या प्लांटचे वैशिट्य की याचे प्रदूषण शून्य टक्के आहे. 1400 सेंटिग्रेडला हा कचरा जाळला जातो. एक मराठी माणूस पर्यावरणावर प्रचंड काम करतो आहे हे पाहून खूप बरं वाटलं.

मनाली बस स्टँडला उतरून सोलांगला जाणाऱ्या बसची चौकशी केली. ती बस दुपारी दीड वाजता होती, म्हणून आम्ही चौघांनी टॅक्सीने सोलांगला जाण्याचे नक्की केले.  बाराशे रुपयात अन्नू ड्रायव्हर तयार झाला. मनाली पासून साधारण चौदा किमी वर सोलांग व्हॅली आहे.

रस्त्याच्या डाव्या बाजूने बियास नदी खळखळाट करत वाहत होती. थोडे अंतर गेल्यावर सीबीएस  शाळा लागली त्या शाळेजवळच मोठी संरक्षक बांधली होती.  बियास नदीला पूर आला तरी शाळेला आणि रस्त्याला कोणतीही हानी होऊ नये या साठी ही संरक्षक भिंत उभारली आहे.  ह्या भिंतीवरून समोरील व्हॅलीचे खूप फोटो काढले. 


पाच किमीवर पाण्याचे नेहरूकुंड लागले. अतिशय थंडगार आणि मिनरल पाण्याचा वाहणारा झरा होता. जवळील बाटल्या पाण्याने भरून घेतल्या तसेच ओंजळीने मनसोक्त पाणी प्यालो.

गाडीत ड्रायव्हर अन्नूची बडबड चालूच होती. येथील घोडेवाले, गाडीवाले, BMX  बाईकवाले तसेच पॅराग्लायडिंग करणारे टुरिस्टना कसे फसवतात याचे किस्से सांगत होता. टुरिस्ट बरोबर सचोटीने वागत नसल्यामुळे बियास नदीला खूप मोठी बाढ येणार असे छातीठोकपणे अन्नू सांगत होता. खरंतर त्याच्या मनातील भडास तो बाहेर काढत होता.

सोलांग टुरिस्ट स्पॉटवर पोहोचल्यावर समोरच पॅराग्लायडिंग सेंटर होते. सर्वात मोठ्या  पॅराग्लायडिंगसाठी गंडोलाने दोन हजार फूट उंचीवर नेत होते.  तेथून साधारण पंधरा मिनिटे आकाशात विहार करून खाली व्हॅलीमध्ये लँडिंग करत होते. अन्नूने सांगितल्या प्रमाणे आम्ही हिमालय डोंगरात दोन किमी अंतरावर असलेल्या अंजनी महादेव मंदिर आणि धबधबा यांना भेट द्यायचे ठरविले. ब्रिजेश ट्रेकिंग करायचे टाळत होता तरी त्याला आम्ही घेऊन गेलो.

सर्वत्र हिरवळ पसरली होती. बाजूने  BMX टॉय जीप टुरिस्टना घेऊन मंदिराकडे चालल्या होत्या.  काही जण पायीसुद्धा चालले होते. अर्ध्या तासातच अंजनी महादेव मंदिराकडे पोहोचलो.

एका भल्यामोठ्या चौथऱ्यावर विशाल शिवलिंग होते आणि  डोंगराच्या उंच कपारीतून प्रचंड पाण्याचा धबधबा त्या शिवलिंगावर पडत होता. त्याचे थंडगार तुषार आसमंतात पसरले होते. या तुषारांमुळे मन उल्हासित झाले.  

समोरच्या हिरव्यागार टेकडी वरून पाण्याचा पांढराशुभ्र  ओढा खाली वाहत होता. निळ्याभोर नभातील शुभ्र ढगांची प्रतिमाच जलधारा होऊन सुरूंच्या डोंगरातून खाली कोसळत होती. तो पांढराशुभ्र जलप्रपात हिरव्या  धरणीवर कोसळताना खळखळत वाहणारे पाणी  आसमंतात अवखळ नाद निर्माण करत होते.


आसमंती निळ्या निळ्या
धवल पहा या मेघमाला

हिरव्या गर्द पाचू राशी
हिऱ्यामोत्याची त्यावर नक्षी 

जल प्रपात अति अधिर
अलींगनास ते भूशीर

रम्य निसर्ग हा मनोहारी
किमयाच  आहे ही भारी

उन्हाळातल्या  ऊन झळांनी
तप्त जाहले सगळे डोंगर

पावसातल्या  टपोर थेंबानी
शांत कसे ते झाले सत्वर

मऊ मखमली हिरव्या शाली
डोंगर माथी  लेवून सजली 

पायवाटांची  साद हळुवार
त्यास देऊनी प्रतिसाद सत्वर

घेतली बळे ही धाव पहा
आनंद सभोवार अहा अहा !!!

सोलांग व्हॅलीचा मनमुराद आस्वाद घेत, आनंदाच्या जल तुषारांवर तरंगतच बेस कॅम्पकडे परतलो.

सतीश विष्णू जाधव

Thursday, July 23, 2020

पवई सायकल राईड

*पवई सायकल राईड*

सकाळी सहा वाजता सायकलवर टांग मारली आणि निघाली स्वारी निसर्गाकडे. सकाळी बायकोने विचारले, 'कुठे आजची राईड'  म्हणालो, 'माहीत नाही'.

खरं तर आज निसर्गात राईड करायची एव्हढेच ठरविले होते. कुठे जायचे तर मन नेईल तिकडे, हा एकच विचार. 

सेनापती बापट मार्गावरून दादरकडे निघलो आणि पाऊस सुरू झाला. दादर स्टेशन जवळचा केशवसुत पूल ओलांडला. समोर भाज्यांच्या टेम्पो आणि ट्रकची तुडुंब गर्दी होती. अजूनही प्लाझा भाजी मार्केट सुरू न झाल्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या गाड्या रस्त्यावरच भाजीपाल्याची विक्री करत होते. 
पावसाच्या सरीसारखा भाजीपाला ओसंडून वाहत होता. त्यातून वाट काढत माहीम गाठले. माहीमच्या खाडी जवळ पावसाने वाऱ्यासह फेर धरला होता. 

 पाडगावकरांची कविता मनात फेर धरू लागली.

कुरवाळित येतिल मजला  श्रावणांतल्या जलधारा  /
सळसळून भिजलीं पानें  मज करतिल सजल इषारा //

पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. सकाळच्या मंद प्रकाशात रस्त्यावरच्या पाण्यावर समोरून येणाऱ्या गाडीचे लाईट परावर्तित होतात, तेव्हा पाण्याखालून आणखी एक गाडी चालल्याचा भास होतो.

बांद्राचा पूल ओलांडून पश्चिम द्रुतगती महामार्गावर आलो. येथे रहदारी खूपच वाढली होती. आता पावसासह वाऱ्याचा वेग वाढला होता, त्यामुळे सायकलचा वेग कमी झाला. हायवे रस्त्याच्या डाव्या बाजूने पाण्याचे पाट वाहत होते.  त्यातून सायकल चालविताना पाणी बाजूला उडत होते, परंतु मडगार्ड लावल्यामुळे रस्त्यावरचे पाणी तोंडावर येत नव्हते. बाजूने जोरात जाणाऱ्या गाड्या रस्त्यावरच्या पाण्याचा तिरकस मारा अंगावर करीत होत्या. 

आता नखशिखांत भिजलो होतो. पावसाच्या धारा शरीरावरुन खाली ओघळत होत्या. जसेकी पाण्यात स्पीडबोट चालवतोय. जोगेश्वरीला हायड्रेशन ब्रेक घेतला. विक्रोळी लिंक रोडला सायकल वळवली आणि चढाचा रस्ता सुरू झाला. या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याचा मध्यभाग पत्रे मारून बंद केला आहे.  त्यामुळे चिंचोळ्या रस्त्यावरून सावधपणे सायकल चालवीत होतो. थोड्या वेळातच एका ब्रिजवर आलो.  समोरच पवई तलाव परिसर दिसू लागला. 


आता पाऊस थांबला होता. दोन फोटो काढून पवईच्या मुख्य व्हिव पॉईंटवर आलो. व्हिव पॉईंटचा हिरवागार परिसर तसेच पवई जलाशयाचे शांत पाणी आणि पलीकडे डोंगरमाथा हा निसर्गाचा नयनरम्य नजारा पाहिल्यावर मन मोहरून गेले.

सायकल रेलिंगला लावली. त्या पॉईंट वर मी एकटाच होतो. बसायची पायरी सुद्धा ओलसर होती. सुकामेव्याचा डबा काढला आणि बदाम काजूचा एक एक दाणा खात तो विहंगम निसर्ग मनात साठवू लागलो.


आकाशात विहारणारे काळे सावळे मेघ, तलावा जवळील टेकड्यांचे पाण्यावरील प्रतिबिंब, ते धारण केलेला तलाव ,त्याभोवतीची हिरवी हिरवळ,त्यानंतर दिमाखात उभी सायकल आणि तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा आनंदी भटक्या !!!   हे रेखाचित्र मनात तयार झाले. 

तेथे काढलेले फोटो गृपवर शेअर केले आणि पंधरा मिनिटांनी विक्रोळी हायवेकडे निघालो. येथून विक्रोळीकडे उताराचा रस्ता आहे. त्यामुळे सायकल भन्नाट वेगाने पळू लागली. पूर्व द्रुतगती हायवेला आलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्गरम्य हिरवाई दिसू लागली. पश्चिम महामार्गावर दोन्ही बाजूला सिमेंटच जंगल दिसत तर पूर्व महामार्गावर एका बाजूला हिरवाईने नटलेले कांदळवन तर दुसऱ्या बाजूला गच्च हिरवीगार वनराई दिसते. 

येथून मार्गक्रमण करताना कवयित्री शांताबाई शेळकेंची कविता गुणगुणू लागलो.

पावसाच्या धारा, येती झरझरा 
झांकळलें नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्यालें ओहळ, जाती खळखळ 
जागोजागीं खाचांमध्यें तुडुंबलें जळ 

ढगांवर वीज, झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज 

झोंबे अंगा वारे, काया थरथरे 
घरट्यांत घुसूनिया बसलीं पांखरें

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी 
पानोपानीं खुलतसें रंगदार छवी

थांबला पाऊस, उजळे आकाश 
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश 

किरण कोंवळे, भूमीवरी आले 
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुलें

पावसात न्हाली, धरणी हांसली,
देवाजीच्या करणीने, मनी संतोषली !

या कवितेच्या स्वरांचा पाऊस अंगावर घेत निवांत घरी पोहोचलो


सतीश विष्णू जाधव

Saturday, July 18, 2020

ईशावास्योपनिषद

ईशावास्योपनिषद  (भाग  दुसरा)

परमेश्वर सर्वत्र आहे


ईशावास्यमिदम् सर्वम् यत्किञ्च जगत्यां जगत् ।

तेन त्यक्तेन भुञ्जीथा  मा गृधः कस्य स्विद् धनम् ।। 

या श्लोकातील पहिली ओळ अतिशय महत्वाची आहे.

"ईशवास्यमिदम् सर्वम्" "यत्किञ्च जगत्यां जगत्"

म्हणजेच ईश्वराचा वास सर्वत्र आहे. जी सृष्टी निर्माण झाली आहे, तिच्यात तो भरून उरला आहे. त्याच्याविना एक कणही नाही. 

हे सर्व विश्व  ईश्वराचेच असल्यामुळे माझे काहीच नाही.  इतरांकडे असलेले सुद्धा माझे नाही.  हीच भावना सतत मनात असेल तर मनात कोणतेही ताणतणाव निर्माण होत नाहीत. जीवन आहे तसे स्वीकारले की जीवन जगण्याचा आनंद आपण पूर्णपणे घेऊ शकतो. यामुळे आपण  सुखी, समाधानी होतोच आणि इतरांना सुद्धा सुखी करतो.

"यत्किञ्च जगत्यां जगत्"

 हा देव सर्व चराचरात भरलेला आहे, तो कणाकणात, अणुरेणुत आहे.  या जगात किंचितही अशी जागा नाही, जी ईश्वराने व्यापलेली नाही.

'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः

  'जो त्यागतो, जो सोडतो   तो भोगतो' असा या सूत्राचा अर्थ आहे. 

 वाक्य म्हणजे विरोधाभास आहे. तुझ्या वाट्याला जे आले आहे ते तुझे झाले असे समजू नकोस. तुझ्याकडे आहे ते अनासाये आलेले आहे. त्याचा विवेकाने उपभोग घे. याचाच अर्थ तुला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा निर्लेपपणे उपभोग घे. जे दुसऱ्याकडे आहे त्याचा लोभ ठेऊ नकोस. तुला जे मिळाले ते तुझे झाले असे समजू नकोस. 

कोणत्याही गोष्टीवर ताबा सांगणे सोडून दिले की ती गोष्ट भोगण्यात मजा येते. माझे माझे म्हणतो तेव्हा त्या गोष्टींच्या किमतीचे गणित आपण मांडत बसतो, त्यामुळेच मोकळेपणाने त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही.

तुमच्या वाट्याला आलेल्या सर्व गोष्टींचा भोग घ्या, तुमच्या साठीच आहेत त्या.   परंतु हे सर्व माझेच आहे,  असा भ्रम ठेऊ नका.  प्रकाशमान तेजोमय सूर्य माझ्यासाठीच आहे, हे शक्य आहे काय.

सारे तुमचेच आहे याचाच अर्थ असा असतो की, तुमचे काहीही नाही !

 त्यामुळे  "तेन त्यक्तेन भुञ्जीथाः" या श्लोकात जीवन कसे जगायचे या बद्दल सुद्धा अर्थबोध होतो.

या जगात आपण आहोत तो पर्यंत असे काम करा की जेंव्हा तुम्ही होता त्यापेक्षा आपण जाऊ तेव्हा जग जास्त चांगले झालेले असेल.

आपल्या सहवासात असलेली माणस थोडी जास्त हसायला.. बोलायला लागलेली असावीत. 

आपल्यामुळे त्यांना सुद्धा प्रकाशमान करता आले पाहिजे....  ज्ञानाच्या प्रकाशाने...

आपण कुठलेलंही चांगले काम करत असतो, त्या वेळी कामातला आनंद, यश वाटून घ्यायचे असते.

 प्रेम याचा अर्थच मुळी देण्याची चढाओढ हा आहे.

अशा प्रकारे प्रेम करणारी, देणारी माणसे असतात  ती सूर्य असतात.  आपल्या तेजाने इतरांना सुद्धा प्रकाशमान करतात.
म्हणूनच आपली कामे प्रसन्न मनाने पूर्ण करा, ती कुशलतेने करणे हाच कर्मयोग आहे.

 मा गृधः कस्य स्विद् धनम् 

 दुसऱ्याच्या धन संपत्तीवर कधीही नजर ठेऊ नकोस. हे जग ईश्वराचे आहे, या विश्वात तुला पाठविले आहे ते कर्तव्य करण्याकरिता. दुसऱ्याच्या ऐश्वर्याकडे लक्ष देणे. तसेच दुसऱ्याची वेळ वाया घालविणे चोरी आहे.

 एखाद्याला दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा भेटणे  अथवा तुमच्यामुळे सभेला दहा मिनिटे उशीर झाला असेल तर,  त्या सभेत उपस्थित असलेले सर्वजण गुणिले दहा मिनिटे, तेवढी मिनिटे उपस्थितच्या आयुष्यातील चोरली आहेत.
 दुसऱ्याचे श्रेय घेणे, मेहनत केल्याशिवाय यश अधिकार घेणे, ही सुद्धा चोरी आहे. 

 जेव्हा माझे माझे करणे, मागत राहणे सोडू त्या दिवशी मनाची शांती, गाढ सुखाची झोप,  आनंद हे सर्व आपल्याकडे धावत येईल. 

हा चराचरात भरून राहिलेला ईश, तुझा माझा आपल्या सर्वांचा स्वामी आहे. त्यानेच आपल्या सर्वांचे आयुष्य एकमेकांत गुंफलेले आहे.

हा श्लोक अहंकारमुक्तीचा आणि चिंतामुक्तीचा मार्ग दाखवितो.

 एक राजा रथामधून जात होता. त्याला एक माणूस डोक्यावर जड ओझे घेऊन जाताना दिसला. राजाला त्याची दया आली. त्याने त्या माणसाला रथात घेतले. तो माणूस  ओझे तसेच डोक्यावर घेऊन रथात बसला. 

राजाने ओझे खाली ठेवण्यास सांगितल्यावर तो म्हणाला 'महाराज, तुम्ही मला रथात घेतले हेच मोठे उपकार आहेत. आता या ओझ्याचे वजन मी रथावर का टाकू?"

"आपली अशीच अवस्था झालेली असते"

 परमेश्वराने आपले ओझे वाहण्याची जबाबदारी घेतली आहे. हे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तरी ते वाहणारा तोच परमेश्वर आहे. मग हे  चिंतांचे ओझे आपण आपल्या डोक्यावर का घ्यायचे ?



// श्री कृष्णार्पणमस्तु //

Thursday, July 16, 2020

ईशावास्योपनिषद

ईशावास्योपनिषद  (भाग पहिला)

वेद आणि उपनिषद् 


ईशावास्योपनिषद् हे प्रथम आणि श्रेष्ठ उपनिषद् मानले आहे. कर्म व ज्ञान यांचा  समन्वय हा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे.

 हे उपनिषद कर्मयोग सांगते. 'ईशावास्य' म्हणजेच ईश्वरच सर्व काही आहे. ईश्वर सर्वत्र आहे.  म्हणूनही त्याला 'ईशावास्य उपनिषद' म्हणतात.

माणसाचे जाणतेपण म्हणजेच ऋग्वेद होय. त्यामुळेच ऋग्वेदाची निर्मिती अव्याहत आहे. जे जे पाहिले, ऐकले, त्याचे अनुभवसिद्ध ज्ञान ऋग्वेदातून होते.

 या ज्ञानाचा ठेवा जीवनात कसा उतरवावा आणि सगळीकडे कसा पसरवावा याचे ज्ञान देणारा यजुर्वेद होय.
 
 त्यानंतर मंत्र आणि विचार यांचे स्वरबद्ध, तालबद्ध रूप म्हणजे सामवेद होय.
 
 तसेच आपण अनेक प्रकारची कामे करतो, स्वयंपाक, नोकरी, बागकाम, साफसफाई, विणकाम इत्यादी... ही सर्व कामे कशी  चांगली करता येतील. त्याचे आवश्यक साधनसामुग्री, तंत्रविषयक माहितीचे भांडार म्हणजे अथर्ववेद आहे.
 
परंतु या चार वेदांनी वेद पूर्ण होत नाहीत.
वेदांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना, विचार, आशंका यांचा मेळ घालताना गुरू शिष्यांमध्ये झालेली चर्चा, संवाद म्हणजे उपनिषदे होय. त्यामुळेच उपनिषदांना वेदांत म्हणतात.

या उपनिषदाच्या प्रारंभी एक प्रार्थना येते.  हा शांतीमंत्र  सर्व उपनिषदांचे सार आहे.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥

ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

ते परब्रम्ह पूर्ण आहे; तसेच हे  इंद्रियगोचर विश्वही पूर्ण आहे. 

पूर्ण असलेल्या परब्रह्मातून पूर्ण असलेल्या विश्वाचा उदय झाला आहे. 

एका पूर्णातून दुसरे पूर्ण काढून घेतल्यानंतर पूर्णच शिल्लक राहाते.

पूर्णातून जे जन्मते ते पूर्णच असते....

जसे की साखर घालून केलेली बर्फी, सरबत, श्रीखंड साखरेचा गोडपणा घेऊनच तयार होते. 

सागराच्या एका थेंबात सुद्धा संपूर्ण सागराचे गुणधर्म सामावलेले असतात. 

पणती असो किंवा मडके त्यातून मातीपण वेगळे करता येत नाही.

तसेच पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच शिल्लक राहते...

गंगेतून लोटा भरून घेतला म्हणून गंगा लहान होत नाही.  रिकाम्या पेल्यात आकाश असते, पेला फुटला  की पेल्यात असलेले आकाश अनंतात, आकाशात मिसळून जाते. पेला फुटला म्हणून आकाश फुटत नाही.

तद्वत मनात फुलणारे प्रेम ही अशीच अमर्यादित भावना आहे. प्रेम कोणालाही कितीही दिले तरी अमर्यादितच राहते.  

एका दिव्याने दुसरा दिवा पेटविला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश तेवढाच राहतो. 

अथवा आई मुलाला जन्म देते तरी ती आई पूर्ण आईच राहते.

ब्रह्म हे पूर्ण आहे आणि त्यातून निर्माण झालेले  हे विश्व ही पूर्ण आहे.

विश्व नष्ट झाले अथवा अशी अनेक विश्वे निर्माण झाली.  तरी ब्रह्माला काहीच फरक पडणार नाही असा या शांतीमंत्राचा अर्थ आहे. 

या ब्रम्हात अनेक विश्व आहेत, याचा शोध विज्ञानाने घेतला आहे.

वेद आणि उपनिषद् हे मानवी कल्याण आणि मानवी सुख याच्याशी निगडित आहेत.

// श्री कृष्णार्पणमस्तु //