Wednesday, August 12, 2020

तानसा सायकल राईड


तानसा राईड 

९ ऑगस्ट२०२०

आदित्य काकाने निरोप दिला, सकाळी सहा वाजता तीन हात नाक्यावर आपण जमतोय, तानसा राईड करायची आहे.  तयारी झाली आणि सकाळी साडेचार वाजता मुंबई वरून सायकलिंगला सुरुवात केली.  खूप दिवसांनी एव्हढ्या पहाटे राईड करत होतो. तानसा पल्ला मोठा होता, परंतु मनाने ठरविले होते, हा टप्पा पूर्ण करायचाच.

पुढचा आणि मागचा लाईट लावला.  स्पीकरवर 'ओम नमः शिवाय' धून चालू करून पेडलिंगला सुरुवात केली. रात्री मोठा पाऊस पडून गेला होता. पहाटे कुत्र्यांनी स्वागत केले.  वातावरण अतिशय शांतनिवांत होते. रस्त्यावर एखादं दुसरी गाडी दिसत होती.

 सोलो रायडिंगची एक वेगळी मजा असते. कोणाची वाट पाहणे नाही, कोण मागे राहिलाय, कोण पुढे गेलाय याची चिंता नाही. कोणासाठी थांबणे नाही. आपल्याच मस्तीत, गाणी गुणगुणत, निसर्गाचा आस्वाद घेत सायकलिंग करणे म्हणजे एक प्रकारची ध्यानधारणा असते. आपणच आपणाशी बोलत असतो. 

 विशिष्ट वेगाने चाललो होतो. सायकलच्या हँडलला लावलेला प्रखर दिव्याबरोबर, हेल्मेटला लावलेला हेडलॅम्प सुद्धा सुरू केला. त्याचा एक फायदा जाणवला. अंधारात कोणत्या गियरमध्ये सायकल आहे, ते पाहता येत होते. तसेच डाव्या किंवा उजव्या बाजूला वळताना मागील गाडीला हात दाखवताना, हातात घातलेल्या रिफलेक्टिव्ह  ग्लोव्हजवर हेडलॅम्पचा प्रकाश टाकून व्यवस्थित इंडिकेशन देता येत होते.

पावणे सहा वाजता मुलुंड ऐरोली फाट्यावर पोहोचलो आणि सायकल पंचर झाली. ज्या ठिकाणी पंचर झाली तो भाग अंधारात होता. मुलुंड ऐरोली सिग्नल पर्यंत सायकल ढकलत न्यायचे ठरविले, इतक्यात आदित्य काकाचा फोन आला. काकाला परिस्थिती सांगितल्यावर काका म्हणाला, 'एक दीर्घ श्वास घेऊन रिलॅक्स व्हा आणि आहात तेथेच ट्यूब बदला'. मी एकदम रिलॅक्स झालो. हेड लाईटचा ब्लिन्कर चालू करून सायकलच्या मागे ठेवला. ओल्या रस्त्यावर बैठक मारली आणि अंधारात सायकल उलटी करून हेल्मेटच्या लाईटचा उजेड मागच्या चाकावर टाकून चाक बाहेर काढले. संपूर्ण टायर तपासून बारीक खिळा काढून टाकला आणि नवीन ट्यूब घालून,  चाक ओके केले. खरंच काकाच्या एका फोन कॉलने मला लयभारी ऊर्जा दिली होती. आता ढगातून सूर्य किरणे धरणीवर यायचा प्रयत्न करीत होती.
अंमळ पंधरा मिनिटे उशीर झाला,  तीन हात नाक्यावर पोहोचायला. काका आणि अतुल यांनी मला चियर अप केले. बाकीची मंडळी माजीवडे जंक्शनला उभी होती. राजेश खारेगाव नाक्यावर भेटणार होता. 

पाच मिनिटात माजीवडे जंक्शनला पोहोचलो. आदित्य काकाने सर्वांची ओळख परेड स्वतः पासून सुरू केली. माझी ओळख आझाद पंछी म्हणून करून दिली. अविनाश, शशिकांत, ब्रिजेश, बलवंत, ऍल्डन उर्फ अल्लादिन, सुप्रिय, डॉ सुमित राठोड,  चिराग, प्रशांत, अतुल आणि डॉ राजेश असे तेरा  समर्पयामि साथीदार निघाले होते तानसा निसर्ग भ्रमणाचा आनंद लुटायला.

 चिराग आणि प्रशांत जुळे भाऊ वाटत होते, दोघांनी हिरवा फ्लूरोसंट टीशर्ट घातला होता.

एक्सपर्ट तंत्रज्ञ हिरेन आमच्या सेवेला हजर होता. त्याने सर्वांचे टायर तपासले, हवा भरली तसेच सायकलचे नट बोल्ट टाईट केले. राजेशची खारेगाव नाक्यावर भेट झाली. आज एकदम खुशीत होता राजेश.

पूर्व द्रुतगती मार्गावरून राईड सुरू झाली. आज पाईप लाईन टाळून हायवे वरून राईड करायची होती.  काकाने सर्वांना सांगितले, ' जोडी जोडीने सायकलिंग करायची नाही. एकामागे एक पेडलिंग करा'. हायवेला रहदारी खूप जास्त असल्यामुळे अतिशय महत्त्वाची होती ही सूचना. 

सायकलिंग करताना एक कार, मागच्या स्टँडला सायकल अडकवून पुढे जाताना दिसली. थोडे पुढे जाऊन ती कार थांबली. माझे परममित्र प्रविणकुमार कुलथे बाहेर आले. तानसा राईड बद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रवीण आपल्या गावाला नांदेडला सहकुटुंब सायकल घेऊन निघाले होते. मागे अडकवलेल्या सायकलची दोन्ही चाके गाडीच्या बाहेर आली होती. 

सायकलिंग मध्ये माहीर असलेले अविनाश, शशिकांत, ब्रिजेश, बलवंत, ऍल्डन, अतुल आणि डॉ राजेश वेगात पुढे निघाले.  आदित्य थोडावेळ पुढे थोडावेळ मागे राहून मागे राहणाऱ्यांना चिअर अप करत होता. मी सुप्रियच्या मागे पेडलिंग करत होतो.
साधारण तीस किमी पुढे गेल्यावर बोयसरपाडा येथे सुप्रियची सायकल पंचर झाली. नवखा सुप्रिय जरा अपसेट झाला होता. मी पुढे येऊन थांबलो. त्याला धीर दिला आणि तातडीने सायकल उलटी करून मागचे चाक बाहेर काढले. टायर मध्ये बारीक खिळा निघाला. नवीन ट्यूब टाकून सुप्रियची सायकल टकाटक केली. ऐरोली मुलुंड जवळ माझ्या सायकलचे पंचर काढणे, येथे कामी आले होते.

इतक्यात मागून आदित्य आला. सुप्रियची सायकल अपडेट केल्याबद्दल त्याने धन्यवाद दिले. पुनः सुरू झाली मागच्या फळीची सायकलिंग. 
सूर्य वर आला होता. आकाशात ढग असल्यामुळे प्रकाश मंद होता. भुरभुर पावसामुळे रस्ते ओले होते.  सर्वांच्या मध्ये एकदम मजेत सायकल राईड सुरू झाली होती. 

आता ठाण्यावरून जवळपास पन्नास किमी राईड झाली. पडघा टोल नाका पार करून शहापूर हायवे जवळील मॅक्डोनाल्डकडे  हायड्रेशन ब्रेक घेतला. काकाने ड्रायफ्रूट आणि काढा काढला. शशिकांतने खजूर तर बलवंतने चटपटीत चणे काढले. माझ्या ड्रायफ्रूट डब्यातील शेंगदाणे अविनाशला आवडले. 

ब्रिजेशने तेव्हढ्यात जोक केला, "आपल्या गृप मध्ये सर्वात कमी शिकलेले फक्त दोनच व्यक्ती दिसतात" आता त्या कोण व्यक्ती हे ब्रिजेशकडूनच ऐकावे. इतक्यात एल्डनच्या डोक्यावरील लाईटला एक वायर लटकताना दिसली,  कसली वायर हे विचारताच, एल्डन म्हणाला हॉर्नची.  हेल्मेटवरचे बटन दाबून त्याने हॉर्न वाजवून दाखवला. सायकल चालू असताना हँडल वरचा हात काढून हेल्मेटला असलेले बटन दाबून हॉर्न वाजविणे मला खूप रिस्की वाटले.

सर्व रायडर एकत्र येण्यासाठी थोडावेळ थांबलो. शेवटचा रायडर सुप्रिय थोड्याच वेळात आला. पाणी भरून घेतले. पुढची राईड सुरू झाली. पुढे दोन किमी वर तानसा बायपास लागणार होता. 

आटगाव स्टेशन जवळील रेल्वे फाटक ओलांडले आणि हायवे सोडून तानासाकडे राईड सुरू झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आणि भातशेती बहरली होती. 
हिरव्या हिरव्या गवतावर छोटी छोटी पिवळी लाल फुले उगवली होती. निसर्गाची ही रांगोळी पाहून मन प्रसन्न झाले. या वातावरणात काही शब्द सुमने सहज अवतरली.

पाऊलवाटा हिरव्या ओल्या 

 पानांवर पागोळ्या गळल्या 
 
 सुवासिक फुलांनी मोहविलें
 
 फुलपाखरांना  रंगही  दिलें
 
 सुरंगी फुले लाल लाजली
 
 हिरवी पाने हळूच डोलली
 
 थेंब पाण्याचे छान चमकले
 
 रवी तेज पिऊन ते सजले 
 
 सप्तरंगाचा रम्य नजराणा
 
 मिरवितो हा निसर्ग राणा
 
 एक दृष्टी पडता त्यावर 
 
 सुखविते हे अपुले अंतर

रम्य निसर्गानंद दाटे नयनात

आनंद तरंग लहरले तनामनात

आता राजेशच्या मागे माझी पेडलिंग सुरू होती. शेतातून झुळझुळ वाहणारे पाणी खुणावत होते. 


पुढे  छोट्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली सुबाभूळ आणि भेंडाची झाडे, रस्त्याला एक राजेशाही थाट आणत होती. या मार्गातून सायकल चालविताना डोक्यावर छत्रचामर असल्याचा भास होत होता. 

 चार किमी पुढे गेल्यावर तानसा तलावचे चेक पोष्ट लागले. चेक पोष्टच्या थोडे पुढे हायड्रेशन ब्रेक घेतला. सर्व सवंगडी एकत्र आल्यावर बरेच फोटो काढले.


थोड्याच वेळात तानसा धरणाजवळ पोहोचलो. धरणाकडे जाणारा रस्ता बंद होता म्हणून मुख्य प्रवेशद्वाराजवळ फोटो काढले.  तसेच मोडकसागरला जाणाऱ्या तलाव रस्त्याने पुढे निघालो. येथून मोडक सागर धरण बावीस किमी अंतरावर आहे. 

चार किमी पुढे गेल्यावर रस्त्यात एक पोलीस चौकी लागली. तेथे मोडकसागर आणि तानसा तलावाच्या बोर्डावर बृहन्मुंबई महानगर पालिकेचे नाव वाचून मन उचंबळून आले. प्रेमाने त्या बोर्डला
 मिठी मारली. माझ्या महानगर पालिकेच्या अतिशय उत्कृष्ट आणि कर्तृत्ववान अभियंत्यांनी ही दोन्ही धरणे बांधली आहेत. महापालिकेचे प्रमुख अभियंता माननीय मोडक साहेबांच्या अथक प्रयत्नाने मुंबईला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी वैतरणा नदीवर मोठे  धरण बांधले गेले.  त्यांच्या गौरवप्रित्यर्थ वैतरणा धरणाला मोडकसागर धरण नाव देण्यात आले आहे.

दोन  किमी पुढे गेलो, तेथे कौलारू घरे दिसू लागली. कोकणासारखी  टिपिकल घरे होती.  घरांच्या आसपास भातशेती तरारून आली होती.

 तानसा तलावा मधून मुंबईकडे जाणाऱ्या पाईपलाईन रस्त्याने मार्गक्रमण सुरू झाले.

 हा रस्ता तानसा तलावाच्या कडेकडेने जातो. मोठ्या पाईप लाईनच्या मधून आमची सफर सुरू होती. एका पुलाजवळून तानसाचे पाणलोट क्षेत्र दिसू लागले. त्या ठिकाणी ब्रिजेश, सुप्रिय आणि सुमित थांबले. 
बाकीचे पुढचा मोठा चढ पार करायला निघाले.  माझ्या सोबत अतुल, चिराग आणि प्रशांत होता. बाकी फास्ट रायडर पुढे गेले होते. एका ठिकाणाहून तानसा तलावाचे विहंगम पात्र दिसत होते. त्याठिकाणी आम्ही चौघांनी पडाव टाकला. सुरू झाले आमचे वनभोजन.

 घरून बायकोने पनीर बुर्जी आणि पोळ्या दिल्या होत्या तर अतुलने बाजरीच्या रोटल्या आणि गूळ आणला होता.  बुर्जी प्रशांतला खूप आवडली. जबरदस्त भूक लागल्याने सर्व जेवण फस्त झाले. आम्ही सर्व आता त्या भल्यामोठ्या पाईप वर चढलो. पाईपवरून तानसा परिसर विहंगम दिसत होता. पाईपवर बसून फोटो काढले.

 नंतर पाऊस आला म्हणून पाईपच्या खाली बसलो. भल्या मोठ्या पाईपवरून घरंगळत येणारे पाणी डोक्यावर टपकत होते. त्या पडणाऱ्या थेंबांचे ओघळ बालपणात घेऊन गेले. आम्ही पाईपच्या वरखाली अक्षरशः बागडत होतो. 
पुढे लूप मारायला गेलेल्या मंडळींची तेथेच वाट पाहत होतो. तानसा तलावाला मनात साठवत होतो.

  राजेश, अविनाश, आदित्य, शशिकांत, एल्डन आणि बलवंत पुढचा लुप मारून परत फिरले.
लूप मारताना आदित्यला तलावात मासेमारी करणारी गावकरी मावशी भेटली. मावशीला आदित्यने आपला गॉगल डोळ्यावर लावायला दिला आणि तिच्याबरोबर फोटो काढले.

 मागे आल्यावर सर्वांसह तानसाच्या पहिल्या पडावाकडे आलो.  तेथून ब्रिजेश, सुप्रिय आणि सुमितसह पोलीस चेकपोष्ट पर्यंत सायकलिंग केले.

येथे मयुरेश टेम्पो आणि जेवण घेऊन जिनेश आणि हिरेनसह पोहोचला होता. दुपारचे अडीच वाजले होते. आमची तानसा सायकल राईड पूर्ण झाली होती. हिरेनने सर्व सायकलींची चाके काढून  फ्रेम आणि चाक टेम्पोत भरले. 

 मयुरेशने आमटी, भात, पोळी आणि बटाटा भाजी घरून  आणली होती. जिनेश त्याच्या मदतीला होता. पोलीस चेकपोष्ट जवळच आम्ही जेवायला सुरुवात केली. तेव्हढ्यात झोपेतून उठलेला पोलीस हवालदार, 'तुम्ही येथे कसे आलात, तुम्हाला परिस्थिती काय चालली आहे माहीत आहे काय'. 'आता सर्वांनी हॉस्पिटल मध्ये चला, सर्वांची करोना टेस्ट करूया', अशी भाषा करू लागला. आता आम्हाला पुढ्यातले जेवण सुद्धा खाल्ले जाईना.
 
 इतक्यात ब्रिजेशने आपला मोबाईल त्या हवालदाराच्या हातात दिला.  मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी मोरे साहेबांनी (आमचे सायकालिस्ट मित्र) त्या हवालदाराची समजूत काढली. तेव्हा कुठे तो शिपाई शांत झाला. विश्वनाथ मोरे सर  अतिशय सहृद आणि सतत  मदतीसाठी तत्पर असतात याचा प्रत्यय आला.  सायकलिंगमुळे निसर्गाची जवळीक होते आणि त्यामुळेच मदत करण्याची प्रवृत्ती आणखी वाढते, हे आदित्यचे  म्हणणे मला पटले.
 
कसेबसे जेवण जेवून सर्व जण गाडीतून ठाण्याकडे ताबडतोब निघालो. आदित्यच्या मेहुण्याच्या गाडीत मी, अतुल, शशिकांत, अविनाश आणि आदित्य बसलो. कपडे ओले होते.  बाकीचे मयुरेशच्या आणि जिनेशच्या गाडीत बसले. टेम्पोमध्ये ड्रायव्हरसह हिरेन बसला. 

खर्डी नाक्यावर गाडी थांबली. तेथे आदित्यने गावरान भाज्या घेतल्या, आणि इतरांना ही भरभरून दिल्या. परोपकार किती पराकोटीचा असू शकतो हे आदित्य कडून शिकावं.

 खारेगाव टोल नाक्याच्या पुढे रुस्तमजी पार्क जवळ गाड्या आणि टेम्पो थांबला. तातडीने सर्वांच्या सायकली हिरेनने टेम्पोतून बाहेर काढल्या. मग सुरू झाली प्रत्येकाची चाक लावायची प्रॅक्टिस. अविनाशने सायकलला दोन्ही चाके लावली.  तरी बरोबर लावली का, हे माझ्याकडून तपासून घेतले. 
 
सर्व सायकल टकाटक तयार झाल्या. राजेश कळव्याला जवळच राहायला आहे, त्याचा पहिला निरोप घेतला. बाकीची मंडळी ठाणे परिसरात राहणारी होती. मला लोअर परेल गाठायचे होते, तर अतुलला गोरेगाव पर्यंत राईड करायची होती.

 माजीवडे जंक्शनला अतुल घोडबंदरकडे वळला. माझ्यासह चिराग, प्रशांत आणि अविनाश तीन हात नाक्याकडे निघालो. अविनाशला कॅडबरी जंक्शन जवळ आणि अतुलला तीन हात नाक्यावर तर प्रशांतला मुलुंड टोल नाक्यावर राम राम करून निरोप दिला. 

माझी राईड सुरू झाली घराकडे. अजून तीस किमी सायकलिंग करायची होती. मध्ये गॅप घेऊन पुन्हा सायकलिंग करणे, त्यासाठी शरीर वॉर्म अप करणे अतिशय आवश्यक असते. म्हणून सावकाश पेडलिंगला सुरुवात केली. मांड्या जवळ हुळहुळत होते. विक्रोळी गोदरेज गार्डन जवळ जोरदार पाऊस सुरू झाला. नखशिखान्त भिजलो.  सर्व मोटारसायकलवाले आडोसा शोधत झाडाखाली थांबले होते. वरून जोरदार पाऊस आणि रस्त्यावरून उडणारे  पाण्याचे तुषार म्हणजे माझी पर्वणी होती. सायन पर्यंत सतत पाऊस पडत होता. पाऊस थांबला आणि गरम व्हायला सुरुवात झाली. कमरेच्या खालील भागात खाज सुरू झाली. सीटवर बसणे सुद्धा आता कठीण वाटत होते. त्यामुळे सायकल धीम्या गतीने चालवत सुखरूप घरी पोहोचलो. रात्रीचे पावणे आठ वाजले होते. आज एकूण 151 किमी राईड झाली होती.

आदित्यचा फोन आला, त्याला सायकलिंग सुखरूप झाले हे त्याला सांगितले. मांड्याच्या आणि कमरे खालच्या भागातील खाजेसाठी कडूलिंबाचे तेल अतिशय गुणकारी आहे, ही माहिती आदित्यने दिली. 

मोठ्या सायकलिंग ट्रेलसाठी, मानवी एनर्जीचे तीन लेव्हल असतात आणि ते कसे काम करतात याची माहिती आदित्यने दिली. सकाळची एनर्जी लेव्हल खूप उच्च असते, त्यामुळे सकाळी जेवढ्या लवकर पेडलिंग करता येईल ते करावे. दुपार नंतर जेवणामुळे तसेच उन्हामुळे एनर्जी लेव्हल खूप कमी होते. त्यामुळे सकाळपेक्षा तेवढ्याच वेळात अर्धेच अंतर जाऊ शकतो. आणि तिसरी एनर्जी लेव्हल फक्त डू ऑर डाय सिच्युएशन मध्येच जागरुत होते.  ही सर्व माहिती  आदित्य काकाच्या अनुभवाचे बोल होते. ह्या एनर्जी लेव्हलची प्रचिती  मुंबई कन्याकुमारी सायकल ट्रेल मध्ये घेतली होती.

आजच्या तानसा सायकलिंग सफरीत नवीन समर्पयामि सदस्यांच्या ओळखी झाल्या. तसेच प्रत्येकाला फार जवळून पारखता आले. अविनाश सारखा केअरींग मित्र मिळाला,  तर डॉ राठोड मधला जिंदादिल सुमित पहिला. सुमितचा अर्थ सुंदर आणि सुशील आहे. सुप्रिय माझ्या सायकल पंचर मदतीने भरवला होता. आपणसुद्धा वेळप्रसंगी इतरांना मदत करायला पाहिजे, ही भावना त्यात जागृत झाली होती.  एल्डन आणि शशिकांत सुद्धा खुष मिजाज आहेत. शशिकांतची इच्छा होती, टेम्पो ऐवजी ठाण्यापर्यंत सायकलिंग करायची. परंतु साथीला कोणीही नसल्यामुळे त्याला बेत रद्द करावा लागला. 

मस्तीखोर ब्रिजेश उर्फ बिरजू  आणि आयर्नमॅन बलवंत माझे जुने दोस्त आहेत. ब्रिजेशला आता दिल्ली मुंबई राईड करायची आहे.  बाकीचे सर्व माझे जिगरी आझाद पंछी आहेत.

 आदित्य काका आम्हा सर्वांचा मुकुटमणी आहे.

तानसाच्या निसर्ग सौंदर्याबरोबर सुंदर मनाच्या मित्रांची नव्याने ओळख झाली होती. 

सतीश जाधव
आझाद पंछी....

Friday, August 7, 2020

पुन्हा दिंडीगड सायकल सफर

पुनः दिंडीगड सायकल सफर

१ ऑगस्ट २०२०

"आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे काही चालेना" ही म्हण आज तंतोतंत खरी ठरली. आदित्यने आग्रह केला आणि दिंडीगडला जायचे नक्की झाले.

 काल राजेश बरोबर मुंब्रादेवी सायकलिंग करायचे ठरविले होते. निखिल आणि निलेशला सुद्धा तसाच निरोप दिला होता.  परंतु आदित्यची साथ म्हणजे सायकलच्या महाराजांची साथ असते, ती कशी सोडायची?  राजेशला फोन केला परंतु  दिंडीगडला खूप वेळ होणार म्हणून त्याने असमर्थता दर्शविली.
सायकलचे चाक बदलायचे म्हणून मुंबईवरून सकाळी  निघालो.   थेट ठाण्याला काका आदित्यच्या घरी जायचे होते.  मुलुंड टोल नाका ओलांडल्यावर चाक पंचर झाले, त्यामुळे काका रिक्षाने स्टँड बाय चाक घेऊन सर्व्हिस रोडला भेटला. तातडीने चाक बदलून आदित्यच्या घरी पंचर चाक ठेवले आणि तीन हात नाक्यावर बरोब्बर साडेसहा वाजता पोहोचलो.
निलेश डॉट वेळेवर आला, मागोमाग निखिल सुद्धा पोहोचला. काका सोबत अविनाश सुद्धा जॉईन झाला. अविनाशने नुकतीच पिवळ्या रंगाची कॅननडेल घेतली आहे. सायकलसह, अविनाश सुद्धा चमकत होता.  हिरेन आला, त्याने सर्वांच्या गाड्या ओके आहेत हे चेक केले आणि आम्ही दिंडीगडकडे प्रस्थान केले.

खारेगाव टोल नाका ओलांडून अंजुर फाट्यावरून पाईप लाईनच्या मार्गावरून राईड सुरू झाली.

 
हम पाच, चलेंगे साथ साथ, करत पक्षांचा किलबिलाट ऐकत भन्नाट वेगाने पुढे जात होतो. आदित्य सर्वांच्या पुढे जाऊन व्हिडीओ शूटिंग आणि फोटोग्राफी करत होता. गेल्या आठवड्यातच आदित्य सोबत ही राईड केली होती.  त्यामूळे रस्ता सरावाचा होता. 

वाटेत निखीलची गाडी पंचर झाली. आदित्य लागला कामाला. सायकलचा टायर सुद्धा फाटला होता. टायरमध्ये सपोर्ट म्हणून आदित्यने शंभर रुपयांची नोट ठेवली. 
नऊ वाजता सोनाळे गावात पोहोचलो. पायथ्याला एका दुकानात अमूल दूध आणि अंजीर मिठाई खाल्ली. चढ चढताना काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती आजही आदित्यने दिली.

आता सुरू झाली चढाई दिंडीगडाची. माझ्या आतापर्यंतच्या अप हिल राईड मधील ही कठीण राईड होती. गेल्या वेळच्या चढाईत दोन वेळा सायकल ढकलावी लागली होती. त्यामुळेच आजचा प्रयत्न होता, सायकल न ढकलता गड पार करणे. 

"करीता अथक सायास... अशक्य ते शक्य होईल खास"... हेच विचार ठेऊन गड चढायला सुरुवात केली होती.

हायब्रीड सायकलमुळे कोणतीही रिस्क नको म्हणून, निलेश थोड्याच वेळात सायकल ढकलत वर जाऊ लागला. त्याच्या चालण्याच्या वेगापेक्षा माझ्या सायकलचा वेग कमी होता. नेहमीप्रमाणे आदित्य सर्वांना चिअर अप करत होता. फुर्तीला अविनाश भराभर  पेडलिंग करत पुढे गेला होता. अर्ध्या रस्त्यात निखीलची विकेट पडली.  म्हणाला, 'तुम्ही जा पुढे, मी थांबतो इथेच'. आदित्य काकाचा डायलॉग मी मारला, 'वरून जे सृष्टी सौंदर्य दिसणार आहे, ते इथून नाही दिसणार'. 

आदित्यच्या डोक्यात वेगळीच आयडिया घोळत होती.  त्याने सॅक मधून मजबूत पातळ दोरी काढली. दोरीची एक बाजू निखिलच्या सायकल हँडलला बांधली आणि दुसरी बाजू स्वतःच्या सायकल कॅरियरला बांधली. आता सुरू झाली निखीलची टोइंग सायकल. 

खरंच... मानलं पाहिजे या आदित्यला. एव्हढया कठीण चढावर स्वतःची सायकल चढविणे दमछाक करते, तेथे आदित्य दुसऱ्याची सायकल खेचत होता. अचाट आहे आदित्य. खरच अशी व्यक्तिमत्व क्षणाक्षणाला काही नवीन शिकवीत असतात. जीवापाड परोपकार, जे आपल्याकडे आहे ते भरभरून देण्याची कला, आदित्यकडून शिकावी.
या आदित्यचा जास्तीत जास्त सहवास मिळण्यासाठी त्याच्या बरोबर मोठी राईड करायचा मनात संकल्प केला.

एका कठीण चढावर माझी सायकल घसरली आणि मी चक्क उलटा पडलो. झिकझांक करताना सायकल रस्त्याबाजूच्या  मातीत गेली आणि माझा बॅलन्स गेला. समोरचा रस्ता एकदम चढाचा होता. थोडावेळ दमछाक घेऊन सायकल ढकलत तो कठीण पॅच पार केला. त्यानंतर पेडलिंग सुरू केले.

निखिलला वर सोडून, मला मदत करायला आदित्य पुन्हा खाली यायला निघाला होता. परंतु मी पेडलिंग करताना पाहून आदित्य, अविनाश, निलेश आणि निखिल  चिअर अप करायला लागले. शेवटचा शंभर फुटाचा सिमेंट काँक्रीट टप्पा त्याच जोशात  न उतरता पार केला आणि थेट मंदिराच्या पायथ्याला येऊन थांबलो.  

आज एका तासात अप हिल पूर्ण झाले होते. परंतु एक ठरवले, 'मंजिल अभी बाकी है मेरे दोस्त, फिर एक बार आयेन्गे'. नॉन स्टॉप चढाई साठी...
मंदिराच्या पायथ्याला सायकल बांधून,  सर्वांनी शेवटचा पाचशे फुटाचा ट्रेक सुरू केला. गडावरून दिसणारे विहंगम दृश्य पाहून सर्व नवे सदस्य स्तिमित झाले. निलेशने मनोमन ठरविले, या दिंडीगडावर सहकुटुंब यायचे. बऱ्याच वेळा टेकडीवरचे हे दिंडेश्वर महादेव मंदिर निलेशने मोटार सायकलिंग करताना पाहिले होते, पण आज प्रथम तो गडावर आला होता. प्रचंड खुश झाला होता निलेश.
देवदर्शन आटपून खाली सायकल स्टँड जवळ आलो. आज आदित्य आम्हाला नवीन स्पॉट दाखवणार होता. ऑफ रोडिंग सायकलिंग करत पाच मिनिटात दिंडेश्वरी माता भैरवी देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. 
अतिशय निसर्गरम्य परिसर आणि विशेष म्हणजे पाण्याची मुबलक सोय होती. दर्शन घेऊन मंदिरातच नाश्त्यासाठी बसलो. निखिलने कंदापोहे आणले होते, तर निलेशने डायटचिवडा काढला. माझ्याकडचे ड्रायफ्रुट बाहेर आले.  मंदिराच्या पुजारी दादांनी तांब्यातून पाणी दिले. सुरू झाले वनभोजन. पक्षांचे आवाज, झाडांची सळसळ आणि पुजारी दादांचे बोलणे मनाला खूप भावले. निखिलने भरपूर कंदापोहे आणले होते. त्या सोबत निलेशचा डायट चिवडा आणि पायथ्याला घेतलेली अंजीरची मिठाई, एकदम फर्मास बेत होता न्याहरीचा. डायफ्रूट मधील सुका आवळा अविनाशला खूप भावाला. 

आज पाऊस असता तर काय मजा आली असती,  असा घोषा निखिल करत होता. निखिलला हसत हसत सांगितले, राजा, जो निसर्ग आता दिसतोय, तो एन्जॉय केला पाहिजे. ना की जे नाही त्याबद्दल दुःख करणे. निसर्ग थोडाच आपल्या म्हणण्याप्रमाणे वागणार आहे. म्हणूनच निसर्ग आता जे देतोय, जे दाखवतोय,  ते भरभरून घेतलं पाहिजे, त्यात खरा आनंद आहे. माझे बोलणे आदित्यला पटले,  तो गालातल्या गालात हसत होता.

पुजारी दादांनी व्हॅलीत असलेल्या पाताळेश्वर भैरव मंदिराची माहिती दिली. त्या मंदिराला सुद्धा भेट द्यायचे ठरले. आदित्य सोबत अविनाश आणि मी सायलकलिंग करत थोडे खाली उतरलो. निखिल आणि निलेश मधल्या पाऊल वाटेने खाली उतरत होते. एका ठिकाणी आल्यावर तेथून सायकलिंग करत खाली व्हॅली मध्ये जाणे शक्य नव्हते. सायकल तेथेच ठेऊन पाचशे फूट दरीत उतरलो.

 सायकलिंग नंतर  ट्रेकिंगला खूप मज्जा आली. व्हॅलीतील एका उतरणीवर पाताळेश्वर भैरवनाथाचे मंदिर विराजमान होते.
 हे पांडवकालीन मंदिर भग्नावस्थेत होते. मंदिराचे मोठे मोठे पत्थर खालील ओढ्यात पडले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खचुन मंदिराच्या भिंती ढासळल्या होत्या.  गाभारा आणि भैरवनाथाचे लिंग शाबूत होते. नुकतच शिवलिंगाला बेलपत्र आणि फुलांनी सजविले होते. 

देवदर्शन करून बाजूच्या ओढ्यात पाय सोडून बसलो. आजूबाजूचा निसर्ग पाहून मन एकदम प्रसन्न झाले.  
संपूर्ण व्हॅली आणि समोर दिसणारा डोंगर हिरवाईने नटला होता. हिरव्या रंगाच्यासुद्धा खूप वेगवेगळ्या छटा दिसत होत्या. झुळझुळ वाहणारा ओढा, त्याचा खळखळ आवाज, मोरांचा केकारव, पक्षांचा किलबिलाट, पानांची सळसळ, आकाशात ढगांचे विहरणे,  एकामागे एक असणारे डोंगरांचे हिरवे पदर पाहून  विंदा करंदीकरांची कविता आठवली.

देणाऱ्याने देत जावें;   घेणाऱ्याने घेत जावें.

हिरव्यापिवळ्या माळावरून;  हिरवीपिवळी शाल घ्यावी...

वेड्यापिशा ढगांकडून;  वेडेपिसे आकार घ्यावे...

घेतां घेतां एक दिवस;  देणाऱ्याचे हात घ्यावे !

निसर्ग भरभरून जे देतोय; तेच सर्वाना वाटण्यासाठी मनात काही शब्दसुमने प्रसवली.

निसर्ग असा अजब लहरी

खेळ दाखवितो कितीतरी

पाहता त्याला  आनंदिसी

सुंदर वर्णन त्याचे  लिहिसी

दृष्टी लाभतसे वाचकास दिव्य

मोद भरतो जीवनी अतिभव्य

सायकल अन् मित्रांसोबत

निसर्ग वेडा फिरतो अविश्रांत !!!

भान हरपून गेले हा निसर्गाचा आविष्कार पाहून. व्हॅलीमध्ये एक पाऊल वाट उतरत होती. खाली ओवळे गाव वसलेले होते. घरांच्या छपराची लाल कौले छोट्या छोट्या पाखरांसारखी दिसत होती. दूरवर हायवे दिसत होता. वेगात जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या परंतु गाड्याचे आवाज येत नव्हते. 
आदित्य आणि अविनाश मंदिराबाजूच्या छोट्या शेडमध्ये पहुडले. निलेश, निखिल आणि मी ओढ्यात गप्पा मारत बसलो होतो. मुंबईच्या जवळ एव्हढा निसर्गरम्य, अदभूत परिसर पाहून सहकुटुंब एकदिवसाची सहल काढायचे मनात ठरविले. आदित्य काकाने तर खाली जाणाऱ्या पाऊल वाटेने ऑफ रोडिंग सायकलिंग करायचे सुद्धा नक्की केले.
अविनाशच्या पायाखाली काहीतरी वळवळले, बघतो तर एक खेकडा होता. त्याला पकडून साहसी खेकडया बरोबर अविनाशचा फोटो काढला. हळूच त्याला दगडात सोडून दिले.

 आदित्यने मग नारळ पाण्याचे पावडर सॅचे काढले. मोठ्या पाण्याच्या बाटलीत ते टाकल्यावर शहाळ्याचे पाणी तयार झाले. बहारदार नारळ पाण्याचा आस्वाद सर्वांनी घेतला. काकाने मंदिराच्या डागडुजीचे काम करणाऱ्या गावकऱ्यांना सुद्धा नारळपाणी  दिले. खरच... समयसूचकता काकाकडून शिकावी.
दुपारचा एक वाजला होता. पुन्हा ती दरी चढत पार करून वर आलो आणि सायकलिंग करत दिंडेश्वरी भैरवी मातेच्या मंदिरात आलो. 

मंदिर परिसरात काही हिंदी भाषिक मंडळी जेवण बनवीत होती. त्यांचा एक मोठा गृप देवदर्शनासाठी ट्रेक करत वर येणार होता. गोवऱ्याच्या चुलीत त्यांनी बटाटे भाजले होते. त्या गावरान धुराच्या वासाने ते भाजलेले बटाटे खाण्याची मनोमन इच्छा झाली. म्हणतात ना.. परमेश्वराच्या दारात मनापासून झालेली इच्छा पूर्ण होते. त्या मुख्य आचाऱ्याने मला बोलावून दोन मोठे भाजलेले बटाटे आणि मीठ दिले. काळपट, मातकट झालेल्या साली काढून मीठ लावून ते बटाटे खाताना आपसूक डोळे मिटले आणि मन त्या बटाट्याचा स्वाद घेण्यात तल्लीन झाले. त्यानंतर पुजारी दादांनी जडीबुटीयुक्त लेमन चहा दिला. या प्रेमळ आदरतिथ्याने सर्वजण प्रचंड आनंदलो.

या आनंदाच्या भरातच दिंडीगड उतरलो. पायथ्याला घरच्यांसाठी मिठाई घेऊन सोनाळे गाव पार करून हायवेला आलो. खारेगाव टोल नाका ओलांडुन मलईदार नारळ पाणी प्यालो. तीन हात नाक्यावर सर्वांना राम राम करून,  एकटाच,  उरात भरलेल्या निसर्गासोबत मुंबईला घराकडे निघालो.

आजची दिंडीगड सफर मित्रांच्या साथीने आणि आदित्य काकाच्या शोधक वाटांमुळे अविस्मरणीय झाली होती.

आझाद पंछी ...

Tuesday, August 4, 2020

मेघदूत

मेघदूत

महाकवी श्री कालिदासांचे मेघदूत वाचनात आले... 

शांताबाई शेळके यांनी रसग्रहण केलेले...

या रसग्रहणाला कविवर्य माधव ज्युलियन यांची चार ओळींची प्रस्तावना आहे.

त्या चार ओळींचा,  भावलेला रसस्वाद... झालेले आकलन... सविनय सादर...


मेघांनी हें गगन भरतां गाढ आषाढमासी

होई  पर्युत्सुक  विकल तो कांत एकांतवासी,

तंनि:श्वास श्रवुनि, रिझवी कोण त्याच्या जिवासी ?

मंदाक्रान्ता ललित कविता कालिदासी विलासी !


*रसास्वाद*

कविवर्य माधव ज्युलियन यांनी  कालिदासांच्या मेघदूत महाकाव्याचे  मंदाक्रांता वृत्तात रसग्रहण केले आहे. त्यातील या प्रथम चार ओळी आहेत.

 या चारपंक्ती मध्ये :
 
 आषाढ महिन्यात नभांगणात ढगांची दाटी झाल्यावर, हा प्रेमाचा पुजारी एकांतवास भोगणारा शापित यक्ष;  प्रेयसीच्या भेटीसाठी  विरहाने व्याकुळ  आहे. 
 
 जशी गगनात मेघांनी गर्दी केली आहे, तसेच प्रेमाची दाटी त्याच्या हृदयात झाली आहे. मिलनाच्या विरहाने विकलांग झालेला तो जीव, ढगांकडे आर्ततेने पाहत आहे. 


मेघांच्या तनातून बरसणाऱ्या जलधारा, त्या आर्त जिवाच्या अश्रूधारांपुढे फिक्या झाल्या आहेत. 

त्याच्या श्वासाचा वेग वाढला आहे;  या श्वासाची अधीरता,  या अश्रूंचे लोट थांबविणारी ललना कधी येणार आहे.

कालिदासाच्या शब्दविलासाने भारलेले  मेघदूत  हे संस्कृत काव्य मंदाक्रांता वृत्तात आहे  आणि कविवर्य माधव ज्युलियन यांनी केलेले मंदाक्रांता वृत्तातील मराठी रसग्रहण सुद्धा अतिशय अप्रतिम आहे.

मनाला चिरंतन आणि शाश्वत आनंद ह्या पहिल्या चार ओळी देतात.

प्रेमाची उत्कटता,  विरहाची आर्तता मनाला भावविभोर करते.

प्रत्येक  शब्द...

त्यातील ओज...

ओघवती भाषाशैली...

मंदाक्रांता वृत्तात केलेली शब्दांची गुंफण...

मंद चालणाऱ्या गजगामीनी सारखी हळुवारपणे मनाचा गाभारा पादाक्रांत करते.

 आपल्या मनातल्या गोष्टी,  कवींच्या शब्द सामर्थ्याने आपल्या समोर अवतीर्ण होतात, तेव्हा प्रेमभावना उचंबळून येतात...  

नव्हे.... नव्हे... भरभरून वाहू लागतात...
 
 बांध फुटून वाहणारे प्रेम....

 साऱ्या आसमंतात भरून जाते... 

किंबहुना त्याच्याही पलीकडे वाहत जाते. 
 
गाढ आषाढमासी...

कांत एकांतवासी...

कविता कालिदासी विलासी....

हे शब्द मन पटलावर गारुड करतात. 

काय अप्रतिम शब्द रचना आहे...

या महाकाव्याच्या शेवटी...

मेघाला वर्षावैभव प्राप्त होऊन सौदामिनीसोबत रत होत असता, विरहाची अनुभूती कधीही न येवो अशी कामना यक्ष व्यक्त करतो....

महाकवी कालिदासांची शब्दविलासिनी आपल्याला वेगळ्या भाव विश्वात घेऊन जाते.

आझाद पंछी.... 😊🦋

Monday, August 3, 2020

मैत्री दिवस सायकलिंग

मैत्री दिवस सायकलिंग

२ ऑगस्ट २०२०

सकाळीच शाळेतला परममित्र संजय कोळवणकर बरोबर बोलणे झाले, त्याच वेळी आजचा मैत्री दिवस विजय मित्रासोबत सायकलिंग करून साजरा करायचा हे मनाने ठरविले.

चार दिवसापूर्वी कोणीतरी बेलार्ड पियरचे फोटो पोष्ट केले  होते, गुलमोहर फुललाय म्हणून. आज गुलमोहर दर्शन करायचे म्हणून संध्याकाळी पाच वाजता विजयसह सायकल राईड सुरू केली. 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला पोहोचलो. तो परिसर सायंकाळच्या सोनेरी सूर्य किरणांनी न्हाऊन निघाला होता. रहदारीसुद्धा शांत झाली होती. स्टेशनच्या मुख्य इमारती बाहेरील कुंपणावर निळसर गुलाबी रंगांच्या फुलांनी एक वृक्ष बहरला होता. 
हेरिटेज बिल्डिंगच्या कॅनव्हासवर हिरव्यागच्च वृक्षावर गुलाबी निळी फुले म्हणजे इंग्रजी इमारतीवर निसर्गरूपी छत्रपती शिवाजी महाराजांचे आक्रमणच जाणवले. म्हणूनच स्टेशनला व्हिक्टोरियाचे नाव बदलून छत्रपतींचे नाव दिले असावे. मन एकदम प्रसन्न झाले. 

 स्टेशनच्या बाहेर इमारतीचे फोटो काढत असतानाच, माझ्या सोगो कराओके संगीत  मैफिलीची मैत्रीण गीताची भेट झाली.
 आजच्या दिवशी तिची भेट म्हणजे संपूर्ण सोगो परिवाराची भेट होती. तिला सुद्धा सायकलिंगचा श्रीगणेशा लवकरच करायचा आहे. तेथे खूप फोटो काढून बेलार्ड पियरकडे वळलो. 

काय आश्चर्य... मुलांच्या गुलमोहरानी बेलार्ड पियर फुलून गेला होता. आसपासची खूप मुले संपूर्ण परिसरात क्रिकेट खेळत होती. गुलमोहराचा मागमूस कुठेच नव्हता. बेलार्ड पियरच्या सर्व मार्गिका फिरलो. 
अचानक एक वेगळेच दृश्य समोर दिसले. एका मार्गात ढोलताशा लेझीमसह एक मिरवणूक निघाली होती. जवळ जाऊन पाहिले तर एका ऐतिहासिक चित्रपटाची शूटिंग सुरू होती. आश्चर्य वाटले... या मिरवणुकीच्या शूटिंगला करोना काळात परवानगी कोणी आणि कशी दिली, याचे. 

 या मिरवणुकीचे शूटिंग करून गेटवे ऑफ इंडियाकडे निघालो.

सगळ्या ठिकाणी बॅरिकेट लावून गेटवे ऑफ इंडिया परिसर बंद केला होता. ताजमहाल हॉटेल समोरील चौपाटीवरसुद्धा जायला बंदी होती. नेहमी तुडुंब  गजबजलेला हा परिसर एकदम शांत वाटला. माणसांच्या कोलाहलाऐवजी पक्षांचे पंख फडफडण्याचे आवाज आसमंतात घुमत होते. 


आकाशातील काळे पांढरे ढग गेटवे ऑफ इंडियाच्या चार बुरुजांशी हितगुज करत होते. विचारात होते, 'कधी येणार तुझी लाडकी माणसे, तुला भेटायला'.

नीलवर्णी आकाश छताखाली काळे पांढरे ढग हातात हात गुंफून वारा वाहिल तसे स्वछंदी भरकटत होते . ते सागराच्या संथ लाटांशी मान डोलावून  हितगुज करत होते.  लाटाही ढगांशी हळुवारपणे गुजगोष्टी करत होत्या. 

पोलिसांची गाडी येण्याअगोदर दोनचार फोटो काढून तेथून सटकलो. थेट मारिन लाईन्स चौपाटी गाठली. आज खूप मोठा जनसमुदाय चौपाटीवर दिसत होता. सोशल डिस्टनसिंगमुळे तातडीने फोटो काढून पुढे प्रस्थान केले. 
गिरगाव चौपाटीवरून वाळकेश्वरला चढणाऱ्या रस्त्यावर थांबलो. तेथून मारिन लाईन्स चौपाटी परिसर अतिशय विहंगम दिसतो. सूर्य अस्ताला गेला होता, परंतु त्याची लाली राणीच्या रत्नाहाराला सोन्याचा मुलामा देत होती.
 समुद्राच्या निळाईवर तो हिरेजडित रत्नहार चमचम चमकत होता. सागर निळ्या नभाच्या रंगाने न्हाऊन निघाला होता. आकाशाची निळाई पाहून सागराचे पाणी आनंदाने उचंबळून येत होते. 
त्या क्षितिजा जवळ नभाचे आणि सागराचे जेथे मिलन होते, तेथे मनाची सैर सुरू झाली. शांत चित्ताने ती एकरूप अवस्था,  समाधी अवस्था अनुभवायला लागलो.

 लाजेने चुर होऊन थरथरणारी लाट आजच्या मैत्री दिनानिमित्त प्रिय "मित्राला" आर्जव करत होती, 'थांब ना थोडावेळ, नको ना मावळूस एवढ्या लवकर. मित्र तिला हसत हसत सांगत होता, उद्या सकाळी लवकरच भेटूया. अच्छा तो हम चलते है.

हे दोघांचे हितगुज ऐकून मित्र विजयला म्हणालो, चल आपणसुद्धा निघुया इथून. जास्त वेळ थांबलो तर आपले पोलीस मित्र येतील आपल्या भेटीला. विजय हसला... आम्ही कमला नेहरू पार्ककडे प्रस्थान केले. रस्ते वर्दळ नसल्यामुळे निवांत होते. समुद्रही त्या शांततेचा कानोसा घेत शांत झाला होता. संपूर्ण तीनबत्ती परिसर निर्जन झाला होता. फक्त तुरळक गाड्यांची रहदारी सुरू होती. 

तेथून महालक्ष्मी, वरळी मार्गे घरी पोहोचलो. दोन तासात पस्तीस किमी राईड झाली होती. 

आजच्या मैत्री दिनानिमित्त जिवलग मित्र संजय बरोबर बोलणे झाले, मित्र विजय बरोबर सायकल राईड झाली.  सोगो मैत्रीण गीताची भेट झाली. गेटवे ऑफ इंडियाची ढगांशी झालेली मैत्री पाहिली आणि गिरगाव चौपाटी नाक्यावरून सागरी लाट आणि सूर्य नारायणाची मैत्रीसुद्धा अनुभवली होती.

आजचा मैत्री दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला होता.

आझाद पंछी....