Thursday, January 20, 2022

लडाख सायकलिंग भाग ६ दि. ०९ ऑगस्ट २०२१

लडाख सायकलिंग भाग ६

दि. ०९ ऑगस्ट २०२१

  सकाळी सिंधू नदीच्या प्रवाहात आन्हिके उरकली. टेंट डिसमेंटल करून, सुरू झाली पुढची सायकल सफर. माहे ब्रिज ओलांडून सिंधू नदी सोडली आणि सुमडो गावांकडे पेडलिंग सुरू झाले. आता  सिंधुला मिळणाऱ्या एका नाल्याच्या किनाऱ्याने पुढे जात होतो. पूर्णतः ऑफ रोडिंग रस्ता; मध्ये मध्ये पुलाचे काम सुरू असल्यामुळे चिखलातून, खड्ड्यातून जाणारा तसेच नवीन पूलाच्या  बांधकामा ठिकाणी; बाजूने वळविलेला रस्ता होता.  हा सुद्धा चढाचाच रस्ता  होता. त्यात पुन्हा हेडविंड... त्यामुळे सुमडो गावात पोहोचायला सव्वा दोन तास लागले.  
वाटेत नाशिकच्या मोटरसायकलिस्ट मंडळींची गॅंग भेटली. मग काय... झाला भारताचा जोरदार जयजयकार आणि बाप्पाचा गजर... ही मंडळी श्रीनगर लेह करून आज सो मोरीरी पाहून मनाली कडे निघाली होती. मराठी माणसे जेव्हा अशा पहाडात भेटतात तेव्हा सह्याद्रीचा कणखरपणा हिमालयात घुमतो...

सुमडो गाव तिबेटीयन लोकांचे आहे. येथून मनाली साठी बायपास रस्ता आहे. साधारण ऐंशी घरांच्या गावात साडेतीन हजार लोकवस्ती आहे. सरकारने गावासाठी तिबेटी शाळा तसेच स्वास्थ्य केंद्र याची व्यवस्था केली आहे. बरेच होम स्टे सुद्धा गावात होते. गावातूनच मोठा ओढा वाहात असल्यामुळे शेती पण होती. नावांग काकांच्या जसु होम स्टे मध्ये मॅगी खाल्ली आणि पुढे निघालो.

सो मोरीरी आणि सुमडो मध्ये एकही गाव नाही. त्यामुळे येथे राहायचा विचार करत होतो. पण दुपारचे बारा वाजले होते आणि येथून सोमोरीरी जवळचे कारझोक  गाव ४५ किमी होते तसेच सोमोरीरीचा "नामाशांग पास" हा मोठा घाट पण पुढे लागणार होता... म्हणून आणखी २० किमी  पुढे जाऊन वाटेत एखाद्या बुगियालवर किंवा नाल्या शेजारी  अथवा पहाडात खानाबदोश (चरवाहे) लोकांचे दगडाचे बंकर पण असतात.. त्याच्या शेजारी  टेंट लावता येईल... म्हणून पुढे निघालो. 

प्रत्यक्ष सुमडो गावातूनच चढाचा रस्ता सुरू झाला होता. दोन किमी वर एक चहाचे हॉटेल लागले. तेथे दिल्लीवरून कारने आलेल्या एका कुटुंबाने थांबवले... आमची चौकशी करून चिवड्याचे पाकीट भेट देताना तो गृहस्थ म्हणाला मी पण सायकलिस्ट आहे... तुम्हाला पाहून मला सुद्धा लडाख मध्ये सायकलिंग करायची इच्छा झाली आहे.  त्याला सदिच्छा देऊन पुढे निघालो. 

आता हिरवळीचा प्रदेश संपून घाट रस्ता सुरू झाला... रिदम मिळाला होता,  घाट संपल्यावर थांबुया म्हणून दमदारपणे घाट चढत होता. "नामशांग पास" चढायला तब्बल तीन तास लागले. पास वर थोडी विश्रांती घेऊन भरपूर फोटोग्राफी केली. प्रचंड वारे सुटले होते. त्यामुळे जास्त वेळ थांबता येणार नव्हते.

 येथून सोमोरीरी लेक वरील कारझोक गाव २५ किमी होते.  आता उताराचा रस्ता असल्याने आपण कारझोक गावात पोहोचू असा आत्मविश्वास बळावला. सोबत असलेला खाऊ खाऊन नव्या दमाने उतार उतरू लागलो. थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. हेडविंड एव्हढे जोरदार होते की पेडलिंग करून सुद्धा सायकल वाऱ्यावर लटपटत होती. बरीच दमछाक होत होती.  सोसाट्याच्या वाऱ्याचा मारा झेलत पुढे चाललो होतो. 
 
अचानक तलावाचे टोक दिसले. खूप हायस वाटलं ... खूप पुढे आल्यावर लक्षात आलं ... हा सो मुरीरी लेक नाही. हा "खजांग करू" लेक आहे. अजून सो मुरीरी खूप लांब होता...  जोरदार वारे वाहत होते त्यामुळे तलावाजवळ थांबणे अशक्य होते. तरी सुद्धा सायकल थांबवून  प्रोटेक्शन म्हणून विडचिटर अंगात चढविले. या तलावाला वळसा मारून पुढे आलो... तलावाजवळ सायकलींनी पण थोडी विश्रांती घेतली... थंडीने गारठल्या होत्या...

तलावा भोवती ढगांचा चाललेला लपंडाव अनिमिष नजरेने पहात होत्या.

रस्ता उताराचा असून सुद्धा वाऱ्यामुळे पेडलिंग करणे कठीण होत होते. संजय थोडा पुढे होता... संजयला जोरदार हाक मारून दोन्ही हात कैची सारखे वर केले. संजयच्या लक्षात आले माझा स्टॅमिना संपला आहे... तो थांबला... हळू हळू त्याच्या जवळ गेलो ... आता इथेच पडाव टाकूया... जवळच दगडाचे कुंपण दिसत होते... वारे वाहत असून सुद्धा कुंपणाच्या आत तंबू लावण्यासाठी पुढे झालो... आणि काय... त्या दगडाच्या कुंपणाच्या आतील संपूर्ण परिसर शेळ्या मेंढ्याच्या लेंड्यांनी खचाखच भरलेला होता. थोडावेळ थांबलो... चार खजूर खाल्ले... संजय म्हणाला, "थोडे पुढे जाऊया... एखादा चांगला आडोसा पाहून टेंट लावूया" 

 थोडी राईड करून पुढे आलो तेव्हा वारा किंचित कमी झाला होता... परंतु आता  स्टिफ उतार चढाचा  रस्ता सुरू झाला... अक्षरश यु आकाराचा सरळ रस्ता... भन्नाट सायकल उतरत जायची आणि चढ सुरू झाला की पेडलिंगचा कस निघायचा... खजुरामुळे ऊर्जा मिळाली होती आणि ह्या सिसॉ रस्त्यावर मस्त रिदम मिळाला होता... भन्नाटत संजयच्या पुढे गेलो... पुढे जोरदार उतार सुरू झाला पण डांबरी रस्ता संपून दगडांचा... मातीचा रस्ता सुरू झाला होता... टेंट लावायचे विचार दूर पाळले.. वारे थोडे कमी झाले... त्याचा फायदा घेऊन ऑफ रोडिंग मध्ये जोरदार पेडलिंग सुरू केले. सायकल रॉकेट सारखी पळू लागली... सायकल थडथडत होती. पण  हँडल वरची ग्रीप अतिशय पक्की होती... मोठ्या हँडल मुळे हाताला अतिशय कमी गचके बसत होते...  
 
खूप खाली उतरलो होतो... लांबवर सोमुरीरी लेक दिसू लागला... संजयसाठी रस्त्याच्या बाजूला थांबलो. सायंकाळचे पावणे सहा वाजले होते... उताराच्या ऑफ रोडिंगवर संजयला खूपच काळजी घ्यावी लागत होती... 

पुढे प्रस्थान केले... वातावरण अचानक बदलू लागले वाऱ्याचा जोर वाढला... पावसाची चिन्हे दिसू लागली... आणखी जोरात पेडलिंग सुरु केले. सोमुरीरीच्या पहिल्या किनाऱ्या जवळ पोहोचलो येथून एक रस्ता सोमुरीरीच्या पूर्वेला चुमार गावाकडे जातो तर दुसरा पश्चिमेला कारझोककडे जातो ...
येथून कारझोक आठ किमी वर होते.. ढग गडगडू लागले आकाश भरून आले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची चिंन्हे होती... अर्धा किमी अंतरावर एक कंटेनर दिसला... संजयला सांगितले त्या कंटेनर जवळ जाऊया... बघू जवळपास काही व्यवस्था होते काय... कंटेनरचा दरवाजा वाजवला .. एक तरुण बाहेर आला... त्याला बाहेरची परिस्थिती सांगितली.. त्याने तातडीने  आत घेतले...

तो कंटेनर म्हणजे बंक बेड असलेल घर होत.. सायकल वरचे समान काढून आत घेतले... रस्त्याचे काम करणाऱ्या काँट्रॅक्टरचे हे दोघे सुपरवायझर होते... बाकी कामगार सुमडो गावाजवळ रस्त्याचे काम करत होते. 'अली' कुक पण होता.. त्याने गरमागरम चहा बनवून दिला.. हळूच त्याला विचारले अलीभाई, "आज यहा रह सकते है क्या" अली दिलखुलास हसला... आणि म्हणाला  "अभी आप हमारे मेहमान है, बिनधास्त रहो"  खूप मोठं काम झालं होतं... अली म्हणाला, "बहोत मोटारसायकलवाले, कारवाले यहासे आते-जाते है, लेकीन कंटेनरतक कोई नही आता... भगवाननेही आपको हमारे लिये भेजा है..."

खरं तर अली आणि रवी च्या  रूपाने आम्हालाच भगवंताचे दर्शन झाले होते... " जे का रंजले गांजले... त्यासी म्हणे जो आपुले... देव तेथेचि जाणावा..." ही तुकोबांची वाणी आठवली.

बाहेरचे वातावरण आणखी उग्र झाले सोसाट्याच्या वाऱ्या बरोबर पाऊस सुरू झाला... वातावरण आणखी थंड झाले... अशा परिस्थितीत कारझोक पर्यंत पोहोचणे अशक्यच होते... कंटेनरच्या आत प्लायवूड लावला असल्यामुळे बाहेरची कडकडीत थंडी फारशी  जाणवत नव्हती. या कंटेनर मध्ये तीन बंक बेड होते.. म्हणजे  सहा जण झोपू शकत होते... त्यातील खालचे दोन बेड मिळाले... 

कपडे बदलले आणि अली-रवी बरोबर गप्पा सुरु झाल्या... "आज आप क्या खाना खाओगे" इति अली...
"अलीभाई मै सबके लिये टमाटर चटनी बनाता हु, आप सबजी बनाव"  कांदा टोमॅटो कापले, अलीने मसाला हळद वगैरे दिले... खूप दिवसांनी टोम्याटो चटणी बनवीत होतो... अलीने बिन्सची चमचमीत भाजी, भात आणि पोळ्या बनविल्या.. जेवताना लक्षात आले टोम्याटोची चटणी बेचव झालीय... कोणीही काहीही न बोलता जेवण संपविले... 

थोडासा भात, एक चपाती, भाजी आणि बरीचशी टोम्याटो चटणी शिल्लक राहिली होती... अलीभाईने सर्व एकत्र करून...  त्याचे दोन दोस्त जेवणाची वाट पाहत होते... त्यांना घातले... अली म्हणाला, कोई कामगार या नया आदमी यहा आता है;  तो ये दो कुत्ते भौककर कंटेनर के पास आने नही देते... लेकीन आज वो आप पर कैसे नही भौके, ये अचरज की बात है...

प्राण्यांनासुद्धा रंजल्या गांजल्यांची जाणीव होत असावी... 

चराचरात परमेश्वर आहे याची अनुभूती आली...

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

Wednesday, January 19, 2022

"मल्हार मिसळ" "येळकोट येळकोट जयमल्हार" दि. १९ जानेवारी २०२२

मल्हार मिसळ
येळकोट येळकोट जयमल्हार
दि. १९ जानेवारी २०२२

महाराष्ट्राच कुलदैवत जेजुरीचा खंडोबा... त्याचा जयजयकार म्हणजे "येळकोट येळकोट जयमल्हार" आणि याच मार्तंडाच्या नावानं एक सणसणीत खाद्य संस्कृती बहरात आलीय... "मल्हार मिसळ"

अलिबागच्या पार नाक्यावर मल्हार मिसळ जन्माला आलीय... ती अनिता आणि मंगेश निगडे यांच्या अथक प्रयत्नातून...

फिरायला बाहेर पडल्यावर... खाद्यपदार्थामध्ये नवीन काय याचा सतत शोध चालू असतो... आणि  निगडे कुटुंबासारखी कल्पक माणसे सापडतात ती या शोधला आयाम देण्यासाठीच... 

मिसळ ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली... सजलेली...आणि लहान थोरांच्या जिव्हाळ्याची संस्कृती आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशातील खाद्य संस्कृतीची सळमिसळ "मिसळ" मध्ये पाहायला मिळते... 

पुणेरी, कोल्हापुरी, नाशिकची, भीमाशंकरी अशा वेगवेगळ्या प्रांतातील मिसळीची चव आणि गोडी वेगवेगळी... पण एक गोष्ट सर्वात सारखी ती म्हणजे पाव... हा पाव या मिसळ मध्ये कसा घुसला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला... अस्सल महाराष्ट्राच्या मिसळ मध्ये पाव हे समीकरण जुळत नव्हते... तेव्हाच मनात आले ... ह्या मिसळीने पावाची संगत सोडून पुरी बरोबर दोस्ती का करू नये...

हीच किमया साधली मल्हार मिसळने...


मटकीच्या सुक्या भाजी मध्ये फरसाण, त्याबरोबर चमचमीत तर्री... सुकी बुंदी, दही, गुलाब जाम आणि रसरशीत फुगलेल्या पुऱ्या त्या सोबत फर्मास मसाले ताक... कांदा लिंबू आणि अतिरिक्त मटकी... ताटात खच्चून भरलेले हे पदार्थ पाहिल्यावर... पोटातले कावळे फडफडू लागले तर नवल नाही... 

मनात असलेले पुढ्यात आले की रसनेला आवर घालणे अतिशय कठीण असते...  हा मटकी मिसळीचा थाट पहिला की पोटावर हात फिरवत... सर्व पदार्थ उदरात विसावले जातात... पोट भरलं तरी पण मन भरत नाही... आणि हेच हॉटेलच्या दरवाजावर लिहिले होते... स्पेशल मल्हार पुरी मिसळ बरोबर स्पेशल बटर आणि स्पेशल चीज मिसळ सुद्धा होती...  या वर कडी म्हणजे ओल्या नारळाची करंजी आणि सोबत सेंद्रिय गुळाचा आमदार चहा... या सर्व पदार्थांची निवांत चव चाखली.

      आणखी एक गोष्ट प्रकर्षाने नजरेत भरली... ती म्हणजे स्वच्छ आणि टापटीप असलेला सर्व कर्मचारी वर्ग... विशेष म्हणजे त्यांचे हसतमुख चेहरे पाहिल्यावर... त्यांनी बनविलेले पदार्थ आणखी बहारदार झाले होते... अनिता ताई सर्व  कामगिरीवर काळजीपूर्वक लक्ष पुरवत होत्या...

हॉटेल मधील देव्हारा म्हणजे सर्व देवांचे आणि सनातन धर्माचे वसतीस्थान होते...


प्रथम गणेश,  त्याच्या एका बाजूला गुढी आणि राधाकृष्ण तर दुसऱ्या बाजूला दिवा आणि डमरू...खालच्या खणात विठठल रखुमाई आणि दत्तगुरूंच्या साथीने स्वामी विवेकानंदांना स्थान मिळाले होते...संत मीराबाई सोबत वाद्यसंगीतक आणि बछड्यासह गोमता विराजमान झाली होती... 

कल्पकतेचा कळस म्हणजे हॉटेलच्या  भिंतीवर लावलेल्या पाट्या...


यांत भावलेलं वाक्य म्हणजे "इथे तुम्हाला मेहुण्यापेक्षा  तिखट आणि बायकोपेक्षा झणझणीत मिसळ मिळेल"... मिसळीला सुद्धा माणसाळवण्याचे काम या पाटीने केले होते...

मिसळ खाण्याबरोबर शब्दांतील कहाण्या वाचणे म्हणजे पोटाबरोबर मन आनंदाच्या लहरीवर तरंगणे होते...

पोटातून निघणाऱ्या या आनंद लहरी मनाच्या पटलावर स्वार होऊन चौफेर उधळल्या होत्या...

अशा या अलिबागच्या पार नाक्या जवळील मल्हार मिसळ हॉटेलला भेट देणे ... म्हणजे खवय्येगिरील चालना देणे आहे...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

अनिता आणि मंगेश निगडे
मल्हार मिसळ
7719822522

Saturday, January 15, 2022

ग्रेट भेट... सायकल प्रेमी रमाकांत महाडिक.... दि. १५ जानेवारी २०२२

ग्रेट भेट... सायकल प्रेमी रमाकांत महाडिक...

दि. १५ जानेवारी २०२२

सकाळी रमाकांतचा फोन आला, "आज दादरच्या  स्वातंत्रवीर सावकार राष्ट्रीय स्मारकाला भेट देतोय"
खूप आनंद झाला... रमाकांत माझा सायकलिस्ट मित्र आणि सोलो रायडर... संपूर्ण भारत भ्रमंती करणारा... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या सैनिकांना ७५०० किमी ची राईड समर्पित करणार आहे...
 

तसेच या राईड दरम्यान २६ फेब्रुवारीला स्वातंत्रवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्ताने अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट देणार आहे. 

२ जानेवारीला रमाकांतने गुजरात मधील कोटेश्वर येथून सायकल राईड सुरू केली.  दररोज १५० किमी सायकलिंग  करत आतापर्यंत २००० किमीचा टप्पा पार केला आहे.  रमाकांतने आज १५ जानेवारी रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली... 

येथे रमाकांतचा सन्मान सोहळा पार पडला... सावरकर स्मारकाचे मुख्य अधिकारी श्री संजय चेंदवणकर यांनी माझी जन्मठेप हा ग्रंथ  भेट दिला.


जय महाराष्ट्र या टीव्ही चॅनलने त्यांची मुलाखत घेतली... परममित्र विजय कांबळे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होता...

आज रमाकांतचा मुक्काम कळवा येथे आहे... सोमवार १७ जानेवारी पासून त्याची सायकल सफर कोकणातील सागरी महामार्गाने कन्याकुमारी पर्यंत जाईल... स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देऊन... रामेश्वर, चेन्नई, भुवनेश्वर करून कलकत्त्याला प्रयाण करणार आहे... 

कलकत्त्या वरून विमानाने अंदमानला जाऊन सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्रवीर सावरकरांना २६ फेब्रुवरीला त्यांच्या पुण्यतिथि निमित्त मानवंदना देणार आहे... अंदमान मध्ये ४०० किमी सायकल राईड करून साडेसात हजार किमीचा टप्पा गाठून भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना ही राईड समर्पित करणार आहे...

वयाच्या ६८ व्या वर्षी एकूण ६८ हजार किमी सायकलिंग पूर्ण करण्याचा रमाकांतचा निर्धार आहे...

रमाकांतच्या या अतुलनीय पराक्रम पूर्तीसाठी आम्हा सर्व समर्पयामि सायकलिस्ट तर्फे आभाळा एव्हढ्या शुभेच्छा...

सोमवार दि १७ जानेवारीला रमाकांत कळवा येथून सकाळी कन्याकुमारीकडे प्रस्थान करणार आहे... त्याला दिलेली सायकल साथ आपल्यासाठी प्रेरणादायी असेल...

रमाकांतच्या या अतिशय प्रेरक अशा सायकल सफरीत त्याची "ग्रेट भेट"  जीवनाची नवी दिशा दाखवून गेली...

       भारत माता की जय...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

रमाकांत महाडिक
9167201915

Friday, January 14, 2022

लडाख सायकलिंग भाग ५ दि. ०६ ते ०८ऑगस्ट २०२१

लडाख सायकलिंग भाग ५
दि. ०६ ते ०८ऑगस्ट २०२१

सकाळी साडेसहा वाजता स्पंगमीक गावातील बस स्टँड जवळ पोहोचलो. येथे दोन बायकर्सची ओळख झाली दाहोद गुजरात वरून फिरोज आणि केरळ वरून आलेला दिबु हे सोलो बायकर होते.

एकमेकांना वाटेत भेटले.. आता मित्र होऊन एकत्र बायकिंग करत आहेत. संपूर्ण लडाख फिरून ते श्रीनगरला जाणार आहेत. आणखी तीन सोलो ट्रेकर भेटले. विशेष म्हणजे स्थानिक बसने हे तिघे लडाख फिरत आहेत.


  एक मुंबईचा, दुसरा त्रिवेंद्रमचा, तिसरा जम्मूचा... समविचारी एकत्र आले आणि निसर्गभ्रमणाला निघाले... कधी बसने, कधी लिफ़्ट मागून, कधी ट्रेक करत... त्यांची सफर सुरू आहे. जेमतेम बावीस-पंचवीस वर्षाचे हे तरुण... जीवन जगण्याची कला शिकत आहेत... स्पंगमीक गावात हे तीन दिवस राहिले होते... पेंगोंगला  लेकला मनात, हृदयात  साठविण्यासाठी... यालाच टुरिंग म्हणतात... जे आवडले त्याचा भरभरून आस्वाद घेणे... 


 आठवण झाली एव्हरेस्ट बेस कॅम्प (EBC) ट्रेक मध्ये भेटलेल्या सुएझ या जगभ्रमणासाठी  निघालेल्या इस्रायली तरुणाची...  एकवीस वर्ष वय झाल्यावर इस्रायलमधल्या प्रत्येक तरुण तरुणीला आर्मी मध्ये तीन वर्षे सेवा द्यावी लागते. मग हीच मंडळी पुढील वर्षभर जगभ्रमण करतात... केवढा प्रचंड जीवनानुभव येतो यांच्या गाठीला...  या तीन भारतीय तरुणांत तीच ऊर्जा दिसली.  यांनीच हानलेच्या परमिट साठी लेह मधील फिरोजचा नंबर दिला. तीन वेगळ्या ठिकाणचे वेगळ्या संस्कृतीचे तरुण एकत्र येऊन प्रवास करतात तेव्हा त्याच्या अनुभवाच्या कक्षा अतिविशाल होत जातात...

आठ वाजता येणारी बस साडेनऊ वाजता आली. सायकल टपावर बांधून सुरू झाली बस सफर खारूकडे... 

बसच्या टपावर सायकल कशी बांधायची हे आदित्य काका कडून शिकलो होतो. पेंगोंगचा थ्री ईडीयट  विव्ह पॉईंट पाहायला बस थांबली. परंतु रस्त्यापासून व्हीव पॉईंट  एक किमी अंतरावर होता. बसमधील बरेच प्रवासी तिकडे गेले. परंतु टपावर सायकल आणि सोबत समान असल्यामुळे आम्ही बसमध्येच थांबलो. पेेंगोंग परिसरातील आकाशाची निळाई आणि हिमालयाचे रंग बसच्या खिडकी मधून पाहताना भान हरपून गेले.

बस फुल्ल भरलेली होती. ट्रेकिंग करणारी भली मोठी गॅंग बस मध्ये होती. कर्नाटक मधील हे तरुण नॉन स्टॉप गप्पा मारत होते. सकाळी भेटलेल्या तीन तरुणांमधल्या मालाडच्या हिकेत वीराची मुलाखत घेतली.

 इंजिनिअरींग केलेला हिकेत म्हणतो, "वाटलं आणि सुटलो फिरायला... काहीही न ठरवता... प्रवासातच नवीन मित्र भेटले आणि  सुरू झाली सफर लडाखची... आणखी चार पाच दिवस एकत्र असू... मग माहीत नाही कधी यांची पुन्हा भेट होईल... पण ही साथ जीवनभर आठवणीत राहील..." "जिंदगी के सफर मे लोग मिलते है... पलभर के लिये... और दे जाते है जीवनभर की खुशीया" हिकेत चांगला वक्ता होता. 
 
दुसरा जम्मू मधील खटूआ जिल्ह्यातील अंकुश राजपूतला बोलते केले. ग्रॅज्युएशन पूर्ण करून हा यु ट्युबर एक देश ते दुसरा देश असे भ्रमण करतोय. गेल्या महिन्यात तो अफगाणिस्थानात होता. पण युद्ध परिस्थिती तसेच वॅक्सिन घ्यायला त्याला भारतात परतावे लागले. त्याचे वैशिट्य म्हणजे जगातील जो प्रदेश अनएक्सप्लोअर आहे, अशा ठिकाणी भेटी देऊन त्याची सर्व माहिती यु ट्यूबवर टाकणे... आता त्याचा भारत भ्रमणाचा कार्यक्रम  आहे. संपूर्ण लडाख फिरल्यावर.. काश्मीर मधील खेड्यापाड्यातून फिरणार आहे. तेथून तो नॉर्थ ईस्ट सेव्हन सिस्टर्स करणार आहे. फिरणे आणि युट्युब द्वारे कमाई करणे... आवडीच्या क्षेत्रातून पैसे कमावण्याची कला छान आत्मसात केली आहे अंकुशने...

अंकुश नवीन मित्रांबद्दल भरभरून बोलत होता... चार दिवस तिघेही केलॉंगला लँड स्लाईडिंगमुळे अडकून पडले होते.  तिथेच तिघे सोलो रायडर एकत्र आले. आलेले नवीन अनुभव शेअर करण्याची संधी  मित्रांमुळे मिळली... नवीन गोष्टी, नवीन भाषा, वेगळी संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळली. फिरण्याच्या एका समान धाग्यामुळे तिघे एकत्र आले होते. 

केरळीयन डेसल बरोबर बोलताना उच्चारांची गडबड होत होती. त्याचे मल्याळम उच्चाराचे इंग्लिश डोक्यावरून जात होते. कॉम्प्युटर प्रोग्रामर असलेला डेसल सहा महिन्यांपूर्वी BMS या कंपनीत जॉईन झाला आहे. कोणताही प्लॅन न करता घराबाहेर पडलेला डेसल कोणा बरोबर ही सफर करू शकतो. वर्क फ्रॉम होममुळे प्रवास करता करता कंपनीचे काम सुद्धा सुरू आहे. नोकरी आणि सफरीची छान सांगड घातली आहे डेसलने...

असे हे भटके मित्र... इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. हे भेटलेले तरुण खूप काही शिकवून गेले होते...

डुरबुकला बस जेवणासाठी थांबली. तेथे आमलेट पराठा खाऊन पुढचा प्रवास सुरु झाला.  ४५ किमीचा "चांगला पासचा" घाट खूपच वेडावाकडा आणि दगडांचा होता. 


ऑफ रोडिंग रस्त्यामुळे बस सावकाश चालली होती. वातावरण थंड व्हायला लागल्यामुळे जाकीट आणि कानटोपी चढवली. रस्त्याच्या आजूबाजूला ग्लेशियर दिसू लागले. हायवे असल्यामुळे ट्रक आणि टँकरची सतत वाहतूक सुरू होती. दोन्ही बाजूला गाड्या असल्यामुळे अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू होती. "चांगला" टॉपवर   सायंकाळी सव्वाचार वाजता पोहोचलो.
 

१७६८८ फूट उंचीवरचा हा पास गारठलेला होता. ट्राफिक खूपच असल्यामुळे पाच मिनिटातच बस सुरू झाली.

उताराचा रस्ता सुद्धा ऑफ रोडिंग होता थेट खारू पर्यंत..  खारूला पोहोचायला सव्वा सहा  वाजले. हे गाव मनाली लेह हायवे वर आहे.  नाक्यावरच्या सुकू गेस्ट हाऊस मध्ये पडाव टाकला.


तेथेच मनाली ते लेह सायकलिंग करणारे चार मराठी सायकलिस्ट भेटले. आठव्या दिवशी ते खारूला पोहोचले होते. या गावाचे वैशिट्य म्हणजे येथे मांसाहार वर्ज आहे. पंजाबी धाबे सुद्धा शुद्ध वैष्णव धाबे आहेत.

सिंधू नदीच्या किनारी वसलेल्या खारू गावावरून सकाळी सो मोरीरी साठी पेडलिंग सुरू केले. वाटेत त्रिशूल वॉर मेमोरील लागले. शाहिद जवानांना मानवंदना करून पुढे प्रस्थान केले. 

लेह मनाली हायवे वरून १४ किमी वरच्या उपशी गावात पहिला पडाव होता. या गावापासून हायवे सोडून डाव्या बाजूला वळायचे होते. सिंधूच्या किनाऱ्यानेच ही सफर होती. एका सायकलिस्ट मित्राने, एक किमी माईल्स स्टोनचे फोटो शेअर करायला सांगितले होते.

त्या साठी खास उपशी एक किमीचा फोटो काढला. उपशीला चेक पोस्ट वर परमिट दाखवले आणि दहा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. या प्रदेशात तासाला १२ ते १४ किमी पेडलिंग करणे अतिशय योग्य आहे. 
डाव्या बाजूला वाळल्यावर मोठा माईल्स स्टोन लागला. सोमोरीरी आणि हानले एकाच दिशेला होते. परंतु आमच्याकडे हानलेचे परमिट नव्हते. त्यामुळे सो मोरीरी लेक करूनच मागे परतावे लागणार होते. 

हेमीया गावाजवळ सिंधू नदीवर छान पैकी लाकडी झुलता पूल होता. सायकल अलीकडे ठेऊन झुलत्या पुलावरून सिंधू नदी ओलांडून पलीकडे गेलो.
  सिंधू नदीला येथे "सिंघे खबाब" (सिहाच्या तोंडातून येणारी) म्हणतात.  अतिशय सुंदर कॅम्प साईट होती. छोटसं हॉटेल सुद्धा होतं. एका कोपऱ्यात हिरवळीवर टेंट लावले होते.


लहान मुले खेळत होती.  दुपारचे दिड वाजले होते आणि आणखी पुढे जायचे होते, म्हणून येथे राहायचे टाळले. चहाचा स्वाद घेता घेता सर्व निसर्ग सौंदर्य न्याहाळत होतो. 

ऊन वाढले होते. हेमीया गावजवळच्या प्रेयर व्हील जवळ सायकलने थोडी विश्रांती घेतली.
  

अतिशय छान डांबरी रस्ता होता. वळणे आणि चढ उतार याची आता सवय झाली होती. सर्व सामान सायकलवर लादून या रस्त्यावर विशिष्ट गतीने सायकल चालवावी लागते. परंतु दोन मोठी वाहने जवळ आली असता, थांबण्याशिवाय पर्याय नसतो. 

टेरी स्कुडुंग गावाजवळ पोहोचलो. येथे मुक्काम करण्यासाठी नदीपालिकडे जाऊन संपूर्ण गावात फिरलो. एकही घर उघडे नव्हते.


एका होम स्टे चा दरवाजा जोरजोरात खटखटवून सुद्धा कोणी ओ देईना. काही कळेना काय झालंय ते. गावाच्या टोकाला एक गाडी उभी होती तेथे जाऊन घराजवळ हाक मारल्यावर एक गावकरी बाहेर आला... "गावातील सर्व माणसे बाजाराला गेली आहेत, इथे राहायची व्यवस्था होणार नाही. पुढे पाच किमीवर "गायक" गावात राहायची व्यवस्था होईल."

वाटेत कुठेही साधी चहाची टपरी सुद्धा लागली नाही. सायकलिंग करत होतो पण "गायक" गाव सुद्धा सापडले नाही. आता आम्हीच गात होतो... सायंकाळचे साडेसहा वाजले "केरी" गावात पोहोचायला... खूप दमछाक झाली होती. आर्मी कॅम्प च्या बाजूलाच एक नवीन होम स्टे झाला होता, तेथे पडाव टाकला.


आजी आजोबा घरात होते. त्यांनीच एक रूम उघडून दिली. या होम स्टे चे ओपनिंग आमच्या हस्ते झाले होते. वातावरण अतिशय थंड झाले होते, त्यामुळे सोलरच्या पाण्याने हातपाय तोड धुतले.  रात्रीच्या जेवणानंतर लवकरच झोपी गेलो. आज ८५ किमी राईड झाली होती. 

सकाळी चहा नास्ता करून माहे गावाकडे सायकल सफर सुरू झाली. या लडाख परिसरात व्यवस्थित जेवणखाण आणि आराम असला की येणारा दिवस एकदम नवा असतो. येथून माहे ६० किमी होते. दोन तास सफर झाल्यावर, वाटेत चुशूल १०० किमी बोर्ड लागला.
  

पेंगोंग वरून चुशूल मार्गेच सो मुरीरीला येणार होतो, याची आठवण झाली. 

चुमाथांग गावात पोहोचलो. येथे सिंधू नदी किनारी गरम पाण्याची कुंड आहेत.


कडकडीत उकळतं पाणी कुंडात साठवून तेथे बरेच गावकरी आणि रस्त्यावर काम करणारे मजूर कपडे धूत होते. काही आंघोळ करत होते.  थंड प्रदेशात नैसर्गिक गरम पाणी ही सर्वसामान्यांना परमेश्वराची देणगीच असते. "हॉट स्प्रिंग कॅफे" मध्ये सब्जी रोटी दही जेऊन पुढची सफर सुरू झाली...

 संपूर्ण प्रवास सिंधू नदीच्या किनाऱ्यानेच चालला होता. आमच्या उलट्या दिशेला सिंधू वाहत होती त्यामुळेच प्रवास चढाच्या दिशेने सुरू होता. माहे सात किमी असताना सिंधू नदीकिनारी सुंदर हिरवळीचा पट्टा लागला. तेथे थांबून हिरवळीवर मस्त ताणून दिली. आता प्रत्येक वैशिट्यपूर्ण पाट्यांजवळ फोटो काढायची चढाओढ लागली.
 
माहे ब्रिज जवळ पोलीस चेक पोस्ट आहे.


तेथे मोबाईल वरचे परमिट दाखविले. खाटेवर आडवे झालेले पोलीस महाशय म्हणाले, "झेरॉक्स कॉपी किधर है, नही है तो वापस जावं". काहीही विनवण्या करून तो ऐकेना. चक्क दोन्ही हात जोडले, तेव्हा त्यानेच आम्हाला रजिस्टर मध्ये एन्ट्री घ्यायला सांगितले.  पठ्ठ्या चष्मा घरी विसरून आला होता...  

संध्याकाळ झाली होती वातावरण थंड व्हायला लागले होते.  मुख्य माहे गाव अजून तीन किमी पुढे होते. परंतु माहे ब्रिज वरूनच सो मोरीरीकडे जायचा रस्ता होता, त्यामुळे पुढे गावात जाणे आवश्यक नव्हते. पोलिसाला राहण्याबद्दल विचारल्यावर, नव्या ब्रिजच्या कामासाठी आलेल्या कामगारांचे टेंट बाजूच्या मैदानात लागले आहेत, तेथे बघा काय जमते का. 

BRO चा एक जवान कामगारांवर सुपरवायझर होता. त्याची तसेच कामगारांची परवानगी घेऊन सिंधू नदीच्या किनारी टेंट स्थानापन्न झाला.


विष्णू आणि लक्ष्मण यांची ओळख झाली. त्यांना सायकल चालवायची इच्छा होती, ती पूर्ण होताच पुढ्यात गरमागरम काळा चहा आला. सुपरवायझर शंकर रात्री आठ वाजता वरणभात खायला बोलावणार होता.  रात्री पाऊस सुरू झाला त्यात थंड वारे सुद्धा वाहू लागले. शंकरचा मेसेज येईल म्हणून वाट पाहत होतो... रात्रीचे नऊ वाजले शेवटी खजूर खाऊन झोपी गेलो.

लडाख सफरीत काही खाण्याच्या वस्तू सोबत असणे फार महत्वाचे आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला... 

एक गोष्ट शिकलो... विपरीत परिस्थितीत सुद्धा तग धरणे... त्यामुळे या प्रदेशात उंच उंच शिखरावर पहारा देणाऱ्या भारतीय सैनिकांचे मनोबल किती उच्च असेल याची जाणीव झाली... 

सॅल्युट तरुणांना आणि जवानांना...



सतीश जाधव
मुक्त पाखरे...