Monday, April 21, 2025

मित्र भेटींसाठी सायकल राईड... २० एप्रिल २०२५...

मित्र भेटींसाठी सायकल राईड...

२० एप्रिल २०२५...

 सकाळी साडेपाच वाजता घरातून निघालो  सायकल राईड करत... हवेत सुखद गारवा होता... एकट असताना सुंदर गाणी सुचतात... आणि ती गुणगुणत सायकलिंग करणे म्हणजे आनंदाचा परमावधी असतो... त्या आनंदाचा आस्वाद घेत रमत गमत सायकलिंग सुरू होती... वाटेतील स्वातंत्रवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली...

 

सात वाजता भांडुप मुलुंड पंपिंग स्टेशन हायवे जवळ समीरची भेट झाली... पुढे दोन तास तो साथीने राईड करणार होता...


तेथून राईड करत गेलो उपवनच्या समर्पयामि शॉपी मध्ये... समीरची ओळख करून दिली... माझा सायकल गुरु मयुरेश डोळस बरोबर... एकदम खुश झाला पठ्या... येथे भेट झाली सायकल डॉक्टर हिरेन आणि उभरती सायकलिस्ट सुवर्णाची...

सर्लीच्या छोट्या कामासोबत... समीरच्या सुद्धा सायकलचे काम सायकल डॉक्टर हिरेनने सफाईदारपणे केले... उपवन येथून राईड करत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाकडे आलो...


आज या  महाविद्यालयाच्या स्टुडिओ मध्ये  पॉडकास्टच्या माध्यमातून मुलाखत होणार होती... ती घेणार होता सुप्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणजेच आवाजाचा जादूगार... सुमेध समर्थ... 

मुलाखत होती... आजपर्यंत झालेल्या इंटेंस टुरिंग सायकलिंग बाबत... ती झाल्यावर  समीर  ऐरोलीच्या मित्रां समवेत माझी भेट घालून देणार होता... ऐरोली स्पोर्टस कॉम्लेक्सच्या लाउंज मध्ये...

मुलाखत पूर्ण झाली आणि तडक निघालो ऐरोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये...   गंमत झाली... समीर ज्या दोस्तांची भेट घालून देणार होता... ते माझे जुने दोस्त निघाले... डॉ सत्वशील राणे आणि डॉ अरुण औटी ह्यांच्या सोबत सायकल राईड केल्या होत्या... संदीप कोरडे आणि संदीप जाधव तसेच कमलेश भाई क्षणार्धात माझे मित्र झाले...

सुरू झाली गप्पांनी मैफिल...  नुकत्याच झालेल्या विश्वविक्रमी काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी बद्दल सर्वांना माहिती दिली... 

आतापर्यंत झालेले जागतिक विक्रम... मी केले नाहीत... तर ते परमात्म्याने माझ्याकडून करून घेतले... मी तर निमित्त मात्र होतो...  कोणत्याही विक्रमासाठी सायकलिंग केली नाही...  टुरिंग सायकलिंग पूर्ण केल्यावर विक्रम झाला आहे हे कळले...

  सेव्हन सिस्टर सायकल वारी... नर्मदा सायकल परिक्रमा... आदी कैलास ओम् पर्वत सायकल वारी मुंबई कन्याकुमारी, मुंबई दिल्ली सायकल वारी... मनाली लेह लडाख सायकल वारी... या मध्ये प्रदूषण मुक्त भारत ह्या संकल्पनेचा प्रचार प्रसार केला... याबाबत सर्वांना माहिती दिली...

आतापर्यंत पूर्ण झालेल्या ७८ हजार किमी सायकल वारी मध्ये अनुभवलेल्या गमती जमती...  भारतातील जनतेचा मिळालेली उस्फुर्त प्रतिसाद... आलेल्या अडचणी शिकण्याची संधी समजून सोडविण्यासाठी केलेले अथक प्रयत्न... यांचे किस्से सांगताना तीन तास कधी गेले कळलेच नाही... 

डॉ औटी आणि डॉ राणे तसेच त्यांच्या मित्रमंडळींनी शाल आणि शिवाई फाऊंडेशनचा पंढरीची वारीचा मोमेंटो देऊन सन्मान केला...

ही डॉक्टर मंडळी पंढरीच्या वारीत करत असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेची माहिती मिळाली... जनसेवा हीच ईश्वर सेवा... हा भाव दिसला... या जुन्या मित्रांची नव्याने ओळख पटली...

तेथून समीरच्या चष्म्याच्या दुकानात गेलो... सौ ब्रीद यांचा परिचय झाला... आजच्या मित्र भेटीने समीर एकदम भारावून गेला होता... त्याने छानसा फास्ट ट्रॅक बायकिंग गॉगल भेट दिला... समीर ऐरोली वेशीपर्यंत सोडायला सुद्धा आला होता...

सकाळी साडेपाच वाजता सुरू केलेली सायकल वारी दुपारी  साडेतीन वाजता पूर्णत्वाला गेली ... आता भर उन्हात सुद्धा सायकल चालविणे... सहज साध्य झाले आहे... झालेली ८५ किमी सायकल वारी आज भेटलेल्या सर्व मित्रांना अर्पण...

२०१६ पासून सुरू झालेल्या सायकल वारीने दिला प्रचंड मित्र परिवार आणि जीवन जगण्याचा नवा दृष्टीकोन...

 प्रत्येक क्षणाचा मध चाखायला शिकलो आहे...

 भरभरून मिळणारे प्रेम पाहून एकच अवस्था झाली आहे... 

अनंत हस्ते कमलावराने देता...

किती घेशील दो कराने...

म्हणूनच या प्रेमाची मुक्त उधळण सुरू आहे... निरपेक्ष मनाने...


सतीश जाधव, सायकलिस्ट

7977690693


Friday, April 11, 2025

शारदाश्रम 1974 मित्र भेट

18.08.2019

*शारदाश्रम 1974 मित्र भेट*

आज संध्याकाळी सर्व शाळकरी मित्रांची पुन्हा एकदा पार्क क्लब मध्ये भेट झाली. ही भेट  शाळेतील जुन्या आठवणींचा खजिना उघडण्यासाठी होती.  मी सायकल घेऊन क्लबवर पोहोचलो.

अशोक परब, आणि शरद शिंदे पहिल्यांदा उद्यान गणेश मंदिरात बाप्पाचे दर्शन घेऊन आले. मागोमाग सतीश कामेरकर, सतीश जोशी, विकास होशिंग,दिलीप काळे, नरेंद्र मोहिते चौपाटीवर आले. एवढ्यात संजीव पणशीकरचे आगमन झाले आणि सर्व लवाजमा पार्क क्लब मध्ये स्थानापन्न झाला.

 थोड्याच वेळात शिरीष देसाई आणि कैलास गौडचे सुद्धा आगमन झाले. पण आमचे उत्सव मूर्ती  शरद पाटील आणि कुणाल ठाकूर  अजून उपस्थित झाले नव्हते.  शरद  गणपती आगमनाच्या गराड्यात टिळक ब्रिज जवळ, तर कुणाल नातेवाईकाच्या दहाव्यात अडकला होता. सुहास राऊत आणि गिरीश उर्फ मकरंद चव्हाण रमत गमत आले. 
 
गोरा आणि तगडा दिनेश नाडकर्णीचे हसत हसत आगमन झाले. दिनेश नुकताच श्रीनगर-लेह-मनाली मोटरसायकल सफर करून आला होता. त्याच्या देहबोलीतून त्याचा आत्मविश्वास जाणवत होता. मोठी लढाई जिंकून आलेला राजा जसा आपल्या नगरात अभिमानाने प्रवेश करतो, तसेच छाती काढून दिनेशने आगमन झाले होते.

आज विकास होशिंग जाम खुशीत दिसत होता. अमेरिकेहून चॉकलेट्स आणली होती.  ती सर्वांना प्रेमाने वाटत होता. पांढऱ्या रंगाची आणि त्रिकोणी ढंगाची चॉकलेट्स तोंडात ठेवताच क्षणी विरघळत होती. या विकासची एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्याचे हास्य आणि लाघवी बोलणे. पठया घरातून निघताना चॉकलेट्सच आख्खे पाकिटच खाऊन आला असावा. 

एक कृश व्यक्ती  नरेंद्रच्या बाजूला बसला होता.  डोक्याला टक्कल पडलेले, भुवया पांढऱ्या झालेल्या आणि थकल्या सारखा वाटणारी ती व्यक्ती कोण, हे विचारताच तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला मी रामकृष्ण मुतालिक. ओ.... हो.. हो..  मी मुतालिकला ओळखलेच नव्हते. त्याला हर्षभराने मिठी म्हटली. माझा शाळेतील परम मित्र होता तो. रामकृष्ण पार्ट टाइम भिक्षुकी करतोय. आता तो सुद्धा सायकल घेऊनच आला होता. 

सतीश कामेरकर हातात इंपोर्टेड खाऊची पिशवी घेऊन आला होता. तो खाऊ संजीवच्या हातात दिला. दर्दी मंडळींचा खाऊ होता तो. पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. बाहेरचा खाऊ क्लब मध्ये खाण्यास मनाई होती.

आता मैफिलीला सुरुवात झाली तेव्हढ्यात शरद आणि कुणालचे आगमन झाले. गिरीश आणि सुहास राऊत पण आले. 

सतीश कामेरकर क्लबमध्ये पहिल्यांदाच आला होता. मागच्या वेळी तो अमेरिकेत होता. दोन पेग पोटात गेल्यावर सतीश कामेरकरने सगळ्या मैफिलीचा ताबा घेतला आणि शाळेतील आठवणींचा फुलबाजा तडतडू लागला.  

सतीशने कमेरकरने बापट बाईंच्या सायन्स पिरियडचा किस्सा सांगितला. सायन्स विषयाचा पुनरुत्पादन हा धडा शिकवून बाईंनी घरी वाचायला सांगितला होता. परंतु दुसऱ्या दिवशी मी (सतीश जाधव) तो धडा परत शिकवा असे बाईंना सांगितल्यावर, मला पट्टीने चोपले होते.  जीत बाई स्लीवलेस घालून यायच्या मराठीच्या तासाला बरीच मुले बाईंकडे टक लावून बघायचे. तळवलकर बाई इंग्रजी शिकवायच्या आणि सहदेव आंब्रेने उत्तर दिले म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना धडा समजला असा त्यांचा विश्वास होता. हे सगळं ऐकताना आम्ही शाळेच्या वर्गात पोहोचलो होतो.

शरद शिंदेने किस्सा सांगितला,  विद्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीला आलेल्या डॉक्टरांचा.  त्यांनी गुप्तांगाची  कातडी कशी वर करायची आणि त्याची निगा कशी राखायची याची माहिती दिली. पण डॉक्टरांनी प्रात्यक्षिक करून दाखवावे ही शरदची इच्छा होती. 

सतीश कमेरकरचे तंबाखू विडीचे दुकान शाळेजवळच होते.  त्यात तो उंचीने बुटका, त्यामुळे त्याला शाळेत "तोकडी विडी" म्हणायचे. 

मी लठ्ठ असल्यामुळे मला सर्वजण "डबी" म्हणायचे. पहिल्यांदा तळवलकर बाई वर्गात आल्यावर सुद्धा मी मस्ती करत होतो आणि मुले मला डबी म्हणून चिडवत होते, ते नाव बाईंनी ओझरते ऐकले, त्यांना माझे आडनाव वाटले आणि मला "डबीर" इकडे ये, असे म्हटल्यावर सर्व वर्ग जोरजोरात हसला होता. मुले का हसतात हे बाईंना कळलेच नाही. मी मात्र केविलवाणा चेहरा करून, मान खाली घालून उभा होतो. हा किस्सा कैलासने सांगितला.

सतीश कामेरकर पुढे सांगत होता, "मी दारू प्यायला कसा शिकलो". तर मकरंद चव्हाणने पहिला बियरचा ग्लास माझ्या हातात दिला. मला ती कडवट लागली, पण थोड्याच वेळाय झिंग आली, तेव्हा मजा आली. त्यानंतर पानाच्या गादीच्या गल्ल्यातून  दहा रुपये लंपास करून घरातील नोकराला घेऊन चार रुपयांची बियर हॉटेलमध्ये जाऊन सतीश प्यायला होता. मला दारू प्यायला शिकविणारा मकरंद 1997 पासून व्यसन मुक्त झालाय. पण मी अजूनही पितोय, असे सतीश म्हणाला.

दिनेश  आणि उमेश नाडकर्णी हॉस्टेल मध्ये राहत होते. त्याच्या हॉस्टेलचे किस्से तर औरच होते. 

सतीश जोशी म्हणाला परीक्षेला मी नेहमी सतीश जाधवच्या मागच्या बेंचवर असायचो, कारण दोघांच्या वडिलांचे नाव विष्णु होते.

दिलीप काळे चेउलकर बाईंबरोबर केलेल्या पिकनिक बद्दल हिरीरीने सांगत होता. तर शरद शिंदे  171 नंबर बसचे किस्से सांगत होता. वरळी वरून दादरला शाळेत येणारी ती एकमेव बस होती. 

कुणाल ठाकुरने सुद्धा सांगितले, मकरंदने माझ्या दारू पिण्याचा श्रीगणेशा केला.

शालेय जीवनात केलेले प्रताप आणि त्याची आठवण सर्वांना विद्यार्थी दशेत घेऊन गेले.

कैलासने ड्रिंक अँड ड्राइव्हचा किस्सा सांगितला. त्याचे वडील भाऊ ना म जोशी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये सिनियर इंस्पेक्टर होत.  तेथूनच "जीवन आणि कैलास" शाळेत यायचे. 

शरद प्रत्येकाच्या टेबलवर जाऊन हवे नको ते विचारत होता तर कुणाल, 74 आणि 75 बॅच मधला  फरक सांगत होता. गृप मध्ये गोंधळ घालणाऱ्या दोस्तांना शरदने डिलीट केले होते. संजीव पणशीकर माझ्या सायकलिंगची तारीफ भरभरून करत होता. कैलासने मला ड्रिंक ऑफर करताच, मी म्हणालो " आज नाही घेणार उद्या घेईन" परंतु तो उद्या  माझ्या जीवनात अजूनपर्यंत आलेला नाही. 

कुणालची तऱ्हा तर औरच आहे, जेवणानंतर त्याला प्यायला आवडते. तर शरद पाटील जन्मल्या पासून प्याला नाही. अशोक परबने दोन पेग झटक्यात संपवले होते आणि तल्लीन झाला होता.

सतीश कमेरकरला ड्रिंक्स घेताना सिगारेटची तलफ आली होती. त्यातच त्याने चार सिगारेट ओढल्या.  तर कैलास आल्या पासून सिगारेट ओढत होता. दिनेश आणि संजीवची पिण्याची जुगलबंदी लागली होती. तर शिरीष देसाई आणि सतीश जोशी त्यांना साथ देत होते. खाण्यापिण्याचे टिपण मी करत होतो.

मधेच शिरीष मला म्हणाला सतीश तू काहीच बोलत नाहीस, मी म्हणालो " कोणीतरी ऐकणारा पाहिजे ना"

रामकृष्ण, सुहास, मकरंद, नरेंद्र आणि शरद कोपऱ्यातील टेबलवर बसले असल्यामुळे त्यांचे बोलणे ऐकायला येत नव्हते. 

मी सायकलने मनाली - रोहतांग पास - लेह  केल्याबद्दल दिनेश माझी खूप तारीफ करत होता. लेह सायकलिंगचे किस्से मला सांगायचे होते. पण आज सर्वच जोशात होते, भरभरून बोलत होते. म्हणून पुढील मिटिंग मध्ये मनाली लेह किस्से सांगायचे मी ठरविले.

सतीश जोशी, " सिद्धी शिवाय प्रसिद्धी" कामाची नाही हे सांगत होता. पण पूरग्रस्तांना मदत करण्याचा मूळ उद्देश त्यामुळे बाजूला पडला होता. शरद शिंदेच्या चेहऱ्यावर म्हणून नाराजी पसरली होती.

आज खाण्यापेक्षा पिण्याचे बिल जास्त झाले होते. पण खाण्याबरोबर सर्वजण पोट भरून बोलले होते. एकमेकांना भेटल्याचे समाधान त्यापेक्षा जास्त होते. 
मैत्रीची नशा सोबत घेऊनच प्रत्येक जण पार्क क्लबच्या बाहेर पडला.

एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली, ती म्हणजे या वयात कोणाच्या सवयी बदलणे कठीण काम आहे. परंतु साठी नंतरचे बोनस आयुष्य मस्त मजेत जगायचे असेल तर,  ज्या सवयी आपल्या शरीराला घातक आहेत. तसेच पुढील उतार वयात त्याचा जास्त त्रास होऊ शकतो, त्यांना आवर घालणे आवश्यक आहे. याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मरेपर्यंत मस्त मजेत जगायचं असेल तर कुणालची, शरदची, दिनेशची लाईफ स्टाईल पहावी.

या वयात अंथरुणात खिळून राहणे कोणालाही आवडणार नाही. त्याची काळजी आताच घेणे महत्वाचे आहे.

*जीवन अनमोल आहे आणि ते उपभोगण्यासाठी शरीर संपदा राखणे आवश्यक आहे.*

प्रत्येक जण सुज्ञ आहे !!!

मंगल हो !!!


सतीश विष्णू जाधव

लेख नववा... काश्मिर ते कन्याकुमारी... दि. १७ ऑक्टोबर २०२४...

लेख नववा... काश्मिर ते कन्याकुमारी

 दि. १७ ऑक्टोबर २०२४...

सकाळी मनाच्या त्या संमोहित अवस्थेत बसमध्ये  असतानाच पावसाचा वर्षाव होऊ लागला... डोळे मिटले... आणि माझा सायकल (सखी) सोबत असलेला जीवनपट तरळला... 

आनंद अन् खुशीचा  मामला

सायकलवर जीव टांगला

पहाट झाली  जाग आली

वाट फुटली सायकल चालली

सोबत सायकल साथीदार

निसर्गाची रंगत बहारदार

आज इथे तर उद्या तिथे

सायकल जाई हवी तिथे

सकाळी ५.४८  वाजता कन्याकुमारी ११०९ चा बोर्ड लागला... आता सायकल रेस अंतिम टप्प्यात आली होती... 

पाऊस पडल्यामुळे रस्ता ओला झाला होता... संपूर्ण आसमंतात लालिमा पसरली होती... हळू हळू सूर्यनारायणाने दर्शन दिले... ते लालबुंद तेजोवलय डोळ्याच्या कॅमेऱ्यात साठवून घेतले... ऊर्जेचे संक्रमण होत होते..

वाटेत ६.१० वाजता चेंज ओव्हर झाले... अंबरीशच्या जागेवर ताजातवाना उल्हास आला... अजयच्या साथीला...

पुढील तासाभरात दोघांनी २२ किमी सायकल पळवली होती... हायवेला अजयच्या सीट खालील सायकलचा मागचा पेडल सैल झाला होता... तो घट्ट करून दिला...

सकाळी पावणे आठ वाजता...पुल्लार टोल प्लाझाच्या पुढे (राष्ट्रीय महामार्ग ४४) हैद्राबाद बंगलोर महामार्गावरील हॉटेल अतिथी  मध्ये लखन नाष्टा करायला घेऊन आला... खास उडुपी पद्धतीची न्याहारी म्हणजे इडली वडा सांबार... एका मोठ्या भांड्यात दोन इडल्या आणि एक मेंदू वडा त्यावर  झकास सांबार आणि एका छोट्या वाटीत चटणी.... जोडीला मोठ्या चौपात्रात भरभरून सांबार... हवे तेवढे घ्या... एका डिश मध्येच पोट भरले...

त्यावर पुष कॉफी... म्हणजे उकळत्या पाण्यात नुकत्याच कुटलेल्या चिकोरी कॉफीची पुरचुंडी धरल्यावर कॉफी अर्क पाण्यात उतरतो... त्या पाण्यात गरम दूध टाकल्यावर कडवट टिंच असलेली कॉफी तयार होते... एका पेल्यात आवश्यकते नुसार साखर घेऊन त्यावर हा कॉफीचा प्याला रीता केला जातो... प्याला आणि पेला यात कॉफी वर खाली केल्यावर फेसाळलेली ही पुष कॉफी पुढ्यात आली... प्रदेश बदलला कॉफीची रीत बदलली... स्वाद बदलला... आणि त्याचा आस्वाद घेणे... हे भटक्याचे कर्तव्य होते...

अतिथी उडुपी हॉटेलच्या बाहेर ताज पॅलेस हॉटेल मध्ये पत्र्याच्या ड्रम पासून बनवलेले  टेबल आणि बसायचा सोफा बनविला होता... तसेच पत्र्यापासून बनविलेली मोठी नाव होती ज्यात  बसण्याची सुध्दा व्यवस्था होती...

मोठी बस सकाळी अकरा वाजता सुरू झाली... पुढे गेलेल्या सायकलीला बॅक अप सपोर्ट आणि आवश्यक ती मदत देण्यासाठी सायकल स्वारांना गाठणे आवश्यक होते... पुल्लूर गाव सोडले आणि आता तेलंगणा मधून आंध्र प्रदेशात बसने प्रवेश केला... कृष्णा नदीच्या पुलावरून पार झालो... महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी कृष्णा नदी या दोन राज्यांना जोडते...

साडेअकरा वाजता दोन्ही सायकलिस्टना मोठ्या गाडीने गाठले... उल्हासला आणखी अर्धा तास पेडलिंग करायचे होते...  मागे बसलेल्या अजय स्ट्रोकरच्या डाव्या पायाखालचा पेडल निखळून पडला होता... मागचा अर्धा तास अजय फक्त एका पेडलने सायकल चालवत होता...

मागील क्रॅंकच्या स्पिंडलचे थ्रेड स्लीप झाले होते... त्यामुळे दुसऱ्या सायकलचा क्रॅंक तातडीने काढला... तो लावला... त्यावर पेडल बसवला... खराब झालेली चेन बदलली... तसेच मागच्या चेनला ऑईलिंग केले... या सर्व कामासाठी माझ्यासह सुशिल आणि शिवम यांचे हात लागले...

 सायकल  अप टू डेट करून उल्हास आणि अजयच्या ताब्यात दिली... उल्हासने सायकलचे पेडल मारण्यास सुरुवात केली... आणि सायकल छान तयार झाली या आनंदाच्या भरात अजयने सायकलवर उडी मारली... परंतु त्याचा सीटवर बसण्याचा नेम चुकला आणि सायकलवर पुढे  बसलेला उल्हास हडबडला... अजयचे सायकलवर उडी मारून बसणे हे आततायीपणाचे होते...

अकरा वाजता मोठी गाडी निघाली... पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती... वातावरणात गारवा आला होता... अशा वेळी सायकलिंग करणे मजेशीर असते... रायडर्सना थोड्याच वेळात गाडीने गाठले...

दुपारी १२ वाजता चेंज ओव्हर झाले... उल्हासच्या जागेवर शिवम पायलट म्हणून आला... सकाळी सहा पासून दुपारच्या बारा वाजेपर्यंत उल्हासची ८२ किमी राईड झाली होती...  अजय आणि शिवमची राईड सुरू झाली आणि बराच वेळ दोन्ही गाड्या सायकलिस्टच्या मागे होत्या... 

अजयच्या सूचनेनुसार आता मोठी गाडी २५ ‍किमी पुढे जाऊन थांबणार होती... गाडी पुढे निघाली... वाटेत सव्वा बारा वाजता कन्याकुमारी १००५ बोर्ड लागला...

गाडी अम्माकथाडू टोल प्लाझा वरून पुढे निघाली... आता आम्ही आंध्र प्रदेशात होतो... धोने गावाच्या हायवे वर आरटीओने मोठी गाडी अडवली... ड्रायव्हर अमितकडे कागदपत्रे मागितली... महाराष्ट्र आरटीओ ने दिलेले परमिट त्या पोलीस शिपायाला दाखवले... तो कानडीत काही बोलत होता... आणि अमित हिंदीत... संकेत आणि सुशील खाली उतरले...आरटीओ पोलीस शिपायांचे काय म्हणणे आहे तेच कळत नव्हते... त्या शिपायाने धोने गावातील आरटीओ ऑफिस मध्ये गाडी नेण्यास भाग पाडले...

तेथील आरटीओ अधिकारी कुमार याने सांगितले... तुमची टुरिस्ट कमर्शिअल गाडी आहे... आणि तुमच्याकडे फक्त महाराष्ट्रात कोठेही फिरण्याचा परवाना आहे... महाराष्ट्र आरटीओ ने तुम्हाला इतर सर्व राज्यात जायला परवानगी दिली आहे परंतु प्रत्येक राज्यात गाडीने प्रवेश करण्या आधी त्या राज्याचा रोड टॅक्स भरणे हा नियम आहे... कन्नूर शहरापासून आंध्र प्रदेशची हद्द सुरू होते त्या आधी तुम्हाला  ९००० टॅक्स  भरणे आवश्यक होते... तो भरला नाही म्हणून पाच पट दंड रक्कम मिळून आता ६४७०० एव्हढा दंड आणि टॅक्स भरावा लागेल...   तो पर्यंत गाडी डीटेंड करण्यात येईल... 

सुशिल तसेच सागरने बरीच फोनाफोनी केली आंध्रप्रदेश जिल्हाधिकाऱ्याने पण कुमारला फोन केला... शेवटी आरटीओ अधिकारी कुमारने गाडी सोडली... पण एकच सांगितले... सिस्टिम मध्ये दंड रकमेची नोंद झाली आहे तेव्हा तुम्हाला ही रक्कम नंतर सुद्धा भरावीच लागेल... 

गाडी घेऊन तेथून निघालो... पण या प्रसंगात दीड तास पोलीस स्टेशन मध्ये आम्ही अडकून पडलो होतो... 

पावणे सहा वाजता रायडर बदलले अजय आणिl शिवम यांच्या बदल्यात सागर आणि सुशील यांनी चार्ज घेतला...

 दोघांनी पाच किमी वरील टोल प्लाझा ओलांडल्यावर  घाटाचा रस्ता लागला... तो त्यांनी सहज पार केला...

अर्ध्या तासात गाडी अनंतपुर शहरातील टाईम स्टेशनकडे आली... या ठिकाणी आराम करण्यासाठी खोली होती... तेथे शिवमची रगडून मालिश केली... जवळपास पाऊण तास त्याची मालिश आयुर्वेदिक तेलाने केली... आता शेवटच्या टप्प्यातील सायकलिंग मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती...  त्याचे सर्व स्नायू मुलायम झाले... हे  त्याला ताबडतोब लागलेली झोप यावरून लक्षात आले... 

सुशीलने सागरला ७१ किमीची साथ दिली.... त्यानंतर

अंबरीश ने १०१ किमी ची साथ दिली... सागरने तर कमालच केली बारा तासात १७२ किमी सायकल चालवली होती... आता सर्व लवाजमा बंगलोर जवळ फक्त ३० किमी अलीकडे पोहोचला होता... तेथून कन्याकुमारी शहर ७०० किमी अंतरावर होते...

पुढे अजय आणि उल्हासने सायकल रामरथ हाकण्यासाठी हॅण्डल रुपी दोरी हातात धरली... वाटेत सात घोड्यांच्या रथावर स्वार झालेल्या सूर्य नारायणाचे दर्शन झाले होते... त्याचेच हे रूपक होते...

वरील सर्व अंतरावरून एक लक्षात आले होते... ही सायकल रेस पूर्ण करण्यासाठी परवा  १९ ऑक्टोबरची पहाट उजाडणार होती...  माझे आणि महेश दाभोलकरांच्या विमानाचे तिकीट १८ ऑक्टोबर सायंकाळीं ८.२० वाजताचे होते... रत्नागिरीच्या रोलर कोस्टर सायकल शर्यतीचा ब्रँड आयकॉन संयोजकांनी मला बनविले असल्यामुळे १९ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत रत्नागिरी येथे पोहोचणे अगत्याचे होते... 

म्हणूनच या काश्मीर कन्याकुमारी रेस मधील सर्व सहकार्यांना प्रचंड शुभेच्छा देऊन... त्यांची रजा घेऊन आज बंगलोर वरून मुंबईला येतोय... त्यामुळे तिरुअनंपुरमचे ते मुंबई चे विमान तिकीट रद्द केले...

माझ्या टीम बरोबर शेवटचे आणि अतिशय उत्कंठा वाढविणाऱ्या दोन दिवसात मी नसणार याचे खूप वाईट वाटत होते... 

पण माझी टीम जागतिक विक्रम करणारा आहे हे निश्चित होते... 

निसर्गाच्या ओढीने आणि दोन दूरदृष्टी असणाऱ्या तरुणांचे स्वप्न साकारण्या साठीच हा प्रचंड प्रवास करत होतो...

गेल्या सोळा दिवसात सर्वांबरोबर अकृत्रिम जिव्हाळा आणि स्नेह यांचे बंध निर्माण झाले होते... आणि सर्वांच्या या निरपेक्ष प्रेमामुळेच मैत्रीचा खरा अर्थ समजला होता ...

आज सर्वांचा निरोप घेताना... अनामिक हुरहूर लागली जीवाला... त्यामुळे चाललो कुठे तें... पायांना कळत नव्हतें... 

बालपणी शाळकरी मित्रांच्या गराड्यात रंगलेला मी आजही माझ्या सेकंड इनिंगमध्ये माझ्यामध्ये मुक्काम करून आहे... हे या सायकल रेसमुळे कळले...

 मालिशवाला, सायकल मेकॅनिक, आचारी, हायड्रेशन सपोर्टर, वृत्तलेखनकार, गायक आणि समन्वयक  म्हणून एका अंतरंगाच्या रंगपटावर माझ्यातले किती मी रंगले आहेत... याचे आकलन करण्यात गर्क झालो... आणि बंगलोर विमानतळाच्या गराड्यात एकांतात गेलो...

एक नवा मार्ग, नवी दिशा आणि प्रफुल्लित झालेल्या चिरंतन आशा... हे काश्मीर ते कन्याकुमारी रेसने मला दिलेले प्रमाणपत्र होते...

 जय श्री राम...

सतीश विष्णू जाधव

सायकलिस्ट, मुंबई

7977690693

9869570266

Sunday, April 6, 2025

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व...१३ फेब्रुवारी २०२५...देवगडचा प्रफुल्ल...


काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व...  १३ फेब्रुवारी २०२५

देवगडचा प्रफुल्ल...

देवगड मधील हॉटेल प्रपंचचा सर्वेसर्वा आणि माझा मित्र प्रफुल्ल भावे याने आज दुपारी जेवणाची फर्मास ट्रीट दिली...

वसंत भालेकरचा लंगोटी यार माझा मित्र कधी झाला हे कळलेच नाही... आमच्या साठी हॉटेल मध्ये टेबल बुक होते... 

सुग्रास अशा सात्विक जेवणात दोन दोन ग्लास सोलकडी आणि घट्ट आणि वेलचीदार आमरस खाऊन मन तृप्त झाले...

विशेष म्हणजे मुंबईच्या ग्रँड हॉटेल मध्ये मुख्य शेफ असलेला प्रफुल्ल... किचन मध्ये बनियन घालून तव्यावर खुसखुशीत पोळ्या बनवत होता... शेफ मालक झाला तरी त्याची खरी ओळख किचन मध्येच असते... याचा प्रत्यय आला...

जेवण झाल्यावर प्रफुल्ल भेटायला आला... अतिशय विनम्र आणि चेहऱ्यावर सकारात्मक हास्य असलेला प्रफुल्ल खूप जवळचा भासला...

सर्वांबरोबर फोटो काढताना... त्याचा मुलगा समर्थची ओळख झाली... दोन वेळा पॉवर लिफ्टिंग मध्ये नॅशनल खेळला आहे समर्थ...

काश्मिर ते कन्याकुमारी सायकलिंग करताना कोकणचा स्वाद चाखायला मिळणे... आणि कोकणचे अंतरंग जाणून घेणे... ही तर पर्वणीच होती... 

कोकणतील माणसं साधी भोळी असतात आणि त्यांच्या काळजात शहाळी असतात... असे उगीच नाही म्हणत...

सतीश जाधव, सायकलिस्ट

7977690693

Sunday, March 30, 2025

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २१ फेब्रुवारी २०२५...केरळचा राजन अण्णा...

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २१ फेब्रुवारी २०२५

केरळचा राजन अण्णा...

केरळ मधील करीनकपारा गावात केळी घ्यायला थांबलो... सकाळचा ब्रेक फास्ट झाला नसल्याने केळी खाऊन दोन तास राईड करायची होती...

राजन स्टोअरचा मालक राजन अण्णा  गल्ल्यावरून उठून बाहेर आला... आस्थेने मल्याळम मध्ये चौकशी करू लागला... त्याचे मल्याळम आणि आमचे हिंदी इंग्लिश मेळ खात नव्हते... पण त्याच्या बोलण्यातली कणव जाणवत होती... तेवढ्यात दुकानात असलेला त्याचा मुलगा अनिरुद्ध बाहेर आला... त्याला इंग्लिश येत होते...

 एक किलो केरळी वेलची केळी सत्तर रुपयात दिली... किमान अठरा केळी आली असावी... गोड केरळी अप्पे सुद्धा घेतले... सर्वांनी केळी आणि अप्पे गटकावले... आणि तयार झाले पुढील दोन तास राईड करायला...

अनिरुद्धने आमची चौकशी करून मल्याळम व्यतिरिक्त कोणतीही भाषा न  समजणाऱ्या वडिलांना सर्व माहिती दिली... राजन अण्णा एकदम खुश झाला...केळीचे पैसे नाकारू लागला... बळेच पैसे दिले त्याला...

आम्ही पुढे निघालो... तर राजन अण्णा मागून स्कूटर वरून आला आणि थंड पाण्याची बाटली देऊन गेला... 

राजन अण्णाला आमचा काश्मीर ते कन्याकुमारी साहसी सायकलिंगचा  उद्देश समजला होता... या जागतिक विक्रमात त्याने सुद्धा खारीचा वाटा उचलला होता...

निरपेक्ष उद्देश आणि लोककल्याण... यातूनच प्रेमाचा मार्ग जातो... हेच राजन अण्णाच्या कृतीतून दिसते...


सतीश जाधव, सायकलिस्ट

7977690693

Tuesday, March 25, 2025

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २० फेब्रुवारी २०२५. कोझिकोडे येथील पेट्रोल पंप मॅनेजर मनोज...

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २० फेब्रुवारी २०२५

कोझिकोडे येथील पेट्रोल पंप मॅनेजर मनोज...

कोझिकोडे येथील HP पेट्रोलपंपावर मॅनेजर मनोजची भेट झाली... डोगरा रेजमेंटमधून हवालदार पदावरून निवृत्त झालेल्या मनोजने पेट्रोल पंप घराप्रमाणे स्वच्छ ठेवला होता... 

सर्व महिला कामगार होत्या पेट्रोलपंपावर... अतिशय हसतमुखपणे सर्व महिला पेट्रोल डिझेल भरण्याचे काम करत होत्या... एक महिला साफसफाईकडे बारकाईने लक्ष देऊन होती... 

टॉयलेटला गेल्यावर ताबडतोब टॉयलेट स्वच्छ केले जात होते... अपंगांसाठी स्वतंत्र बाथरूम होते... RO पाण्याचा कुलर होता... थंडगार पाणी बाटल्यात भरून घेतले आणि तृष्णा शांत केली...

फ्रिज मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स ठेवले होते... ते सुद्धा MRP वर मिळत होते... मोटर सायकल आणि बस गाड्या पार्किंग साठी स्वतंत्र जागा होती... येथे गाडीचे ऑईल बदलले तर 10% सूट होती...

सायकलिस्ट मोटार बाईकर यांच्यासाठी राहण्याची, टेन्ट लावण्याची व्यवस्था होती... पंप मॅनेजर मनोजने आम्हाला सुद्धा राहण्याची विनंती केली... परंतु पुढील टप्पा गाठायचा होता...

पाच वाजता मागच्या बाजूला असलेल्या भगवती मंदिरातून  शारदा स्तोत्र सुरू झाले... वातावरण मस्त मंगलमय झाले... नमाजी केरळ मध्ये हिंदू भक्तिगीत ऐकून मन भावविभोर झाले...

मनोज केबिन मधून बाहेर येऊन आमची आस्थेने चौकशी करत होता... काश्मिर ते कन्याकुमारी सायकलिंग करत असल्याबद्दल त्याला खूप आनंद झाला होता...

आर्मी मध्ये असताना खूप ट्रेकिंग केले होते मनोजने... पण आता पाय दुखतात... असे म्हणाला... सायकलिंगमुळे पायाचे दुखणे नाहीसे होते आणि तब्बेत सुद्धा चांगली होते... त्यावर सायकलिंग करण्याचे त्याने आश्वासन दिले...

या रस्त्याने तुमच्या ओळखीचे कोणीही सायकलिस्ट आणि बायकर्स जाणार असतील तर त्यांना या पेट्रोल पंपाला आवर्जून भेट द्यायला सांगा... मनोज म्हणाला...

या सायकल सफरी मध्ये अशी आगळी वेगळी व्यक्तिमत्वे भेटत होती आणि आनंदाचा चिरंतन साठा देऊन जाता होती...

पाडगावकरांचे भावगीत ओठावर तरळून गेले...

कुठे कुणाच्या घडल्या भेटी...

गीत एक मोहरते ओठी...

त्या जुळल्या हृदयांची गाथा...

सूर अजूनही गाती...

अशी पाखरे येती... 

आणिक स्मृती ठेऊनी जाती...


सतीश जाधव, सायकलिस्ट

टीम लीडर, 7977690693

Monday, March 24, 2025

मुंबईच्या वरिष्ठ तरुण सायकलवीरांनी केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारी... आणि दिला 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश....


 मुंबईच्या वरिष्ठ तरुण  सायकलवीरांनी केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारी... आणि दिला 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश....

पाच सेवानिवृत्त मुंबईकरांनी 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी असा ४,१९८ किमीचा सायकल प्रवास सागरी महामार्गावरून पूर्ण केला.

प्रदूषण कमी करण्याच्या संदेशासोबत सुदृढ आरोग्य राखणे आणि वयस्कांमध्ये  सक्रिय जीवनशैलीबद्दल जागरूकता पसरवणे देखील होता.

वरिष्ठ सायकलिस्ट सतीश जाधव (६७) यांच्या नेतृत्वाखाली   जितेंद्र जैन (५६), मनोज चौगुले (६२), जयंती गाला (५५) आणि मंगल भानुशाली (६४)... हे  टूरिंग सायकलिंगच्या आवडीमुळे देशाच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंतच्या  स्वप्नातील सायकलिंग सफर पूर्ण करण्यासाठी एकत्र आले होते.

संघप्रमुख सतीश जाधव यांनी जुलै २०२४ मध्ये जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता उमलींगला पास सायकलने पादाक्रांत केला होता... तसेच त्यांच्या नावावर सायकलिंगचे दोन जागतिक विक्रम आहेत... संपूर्ण भारतात ७६,००० किमी सायकल सफर करणाऱ्या जाधव यांचा १०० वर्षापर्यंत सायकलिंग करण्याचा निर्धार आहे...

या वरिष्ठ तरुण सायकलवीरांनी  १६ जानेवारी रोजी श्रीनगरच्या लाल चौकातून आपला प्रवास सुरू केला 

पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी... प्रदूषण मुक्त भारताचा संदेश देत... जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ मार्गे काश्मिर ते कन्याकुमारी हा ४१९८ किमीचा प्रवास ३९ दिवसात पूर्ण केला...

तसेच कोणत्याही सहाय्यक वाहनाशिवाय आणि सर्व सामान सायकलवर घेऊन  दररोज १०० किमी पेक्षा जास्त अंतर कापले आणि शेवटचा २३० किमीचा  टप्पा २२ तासांत  पूर्ण केला.

डिझेल पेट्रोल वाहनांच्या अतोनात वापरामुळे प्रदूषणाची होणारी प्रचंड वाढ थांबविण्यासाठी... आम्हाला लोकांमध्ये जागरूकता पसरवायची होती...

 सैनिक किंवा पोलिस प्रसंगी प्राणाची आहुती देऊन देशसेवा करतात... तसेच निवृत्ती नंतर देशसेवा करण्यासाठीच सायकलिंगने भारत भ्रमंती हा मार्ग आम्ही निवडला...

 सायकलिंगमुळे केवळ प्रदूषण कमी होईलच असे नाही तर व्यक्तीच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठीच प्रत्येकाने सायकलिंगकडे वळणे महत्त्वाचे आहे.  तसेच सर्वांना सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणे हा आमचा उद्देश होता," असे जाधव म्हणाले.

 संपूर्ण मार्गावर विविध शाळा आणि महाविद्यालये आणि पोलिस स्टेशन मध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी  या चमूने व्याख्याने दिली.

 एका शहरातून दुसऱ्या शहरात पॅडलिंग करत असताना, विविध समुदाय आणि सरकारी अधिकाऱ्यांनी  त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सायकल वारीला हिरवा झेंडा दाखवला.

वाटेत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि संरक्षण दलातील माजी कर्मचाऱ्यांनी  आमचे स्वागत केले आणि आम्हाला अनेक प्रकारे मदत केली. विशेषतः काश्मीरमध्ये, आम्हाला एस्कॉर्ट वाहने देण्यात आली होती... तसेच  आमच्यासाठी रस्ता मोकळा केला होता त्यामुळे आम्ही या प्रदेशातून सुरक्षितपणे प्रवास केला... जितेंद्र जैन म्हणाले

आम्ही काश्मिरच्या बर्फवृष्टीतून तसेच केरळच्या कडक उन्हातून  सायकलिंग केली,  एकंदरीत सायकल वारीचा हा अनुभव अविस्मरणीय होता...  असे जाधव म्हणाले.

या सायकल वारीसाठी ठाण्याच्या आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन, घोडबंदर सायकल क्लब आणि समर्पयामि सायकल्स तसेच मुंबईच्या पेडल वॉरियर्स या सायकल संघटनांचे  विशेष सहकार्य लाभले.

काश्मिर ते कन्याकुमारी स्वप्न झाले साकार... दिनांक २४ फेब्रुवारी २०२५



काश्मिर ते कन्याकुमारी स्वप्न झाले साकार...

सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना सादर प्रणाम...

जीवनात अनेक स्वप्न पहात असतो... पण किती साकारतात... स्वप्नांना प्रत्यक्षात आणायला अथक परिश्रमाची जोड द्यावी लागते... 

एकट्यानेच आपले स्वप्न साकार करणे... आणि आणखी चार जणांना सोबत घेऊन त्यांच्या स्वप्नांना पूर्णत्वाकडे नेणे... हे अतिशय खडतर असते... ते आज साध्य झालंय...

काल सकाळी 5.55 राईड सुरू केली केरळ मधील वंदनम शहरातून... आणि कन्याकुमारीला पोहोचलो आज पहाटे 4.30 वाजता...

23 तास सायकलिंग करून 230 किमी एका दिवसात पार केले होते... ते ही फक्त 39 दिवसात...

एका नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली होती... या विक्रमातील महत्त्वाचे मुद्दे खालील आहेत...

प्रथमच काश्मिर ते कन्याकुमारी व्हाया सागरी महामार्ग करणारे 5 सितारे... या मार्गाने अजून कोणीही K2K राईड केलेली नाही... 

या मार्गाने राईड करणारे 55 ते 67 या वयाचे पाच वरिष्ठ तरुण...

ही संपूर्ण राईड सर्व सामनासहीत सेल्फ सपोर्ट होती...

एकूण 40 दिवस ठरवले होते परंतु राईड 39 दिवसात पूर्ण झाली... 

शेवटच्या  दिवशी 23 तासात 230 किमी सायकलिंग... करून कन्याकुमारी मध्ये पदार्पण केले...

यासाठी तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद कामी आले..


सतीश जाधव...टीम लीडर

7977690693




हापूस आंब्यासारखी मधुर आणि मधाळ कोकणची माणसं... दि. १३ फेब्रुवारी २०२५

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी मध्ये भेटलेली व्यक्तिमत्वे...

 हापूस आंब्यासारखी मधुर आणि मधाळ कोकणची माणसं... दि. १३ फेब्रुवारी २०२५

कुणकेश्वरचे महादेवाचे दर्शन घेऊन पुढे निघालो... मेहुणा महेश बागवेचा मित्र गोविंद सावंत हे मुणगे येथे वाट  पहात थांबले होते...  त्यांनी भगवती देवीच्या मंदिरात श्रीफळ आणि प्रसाद देऊन सन्मान केला... कोकणातील टिपिकल हॉटेलातील  पिठाचे, खोबऱ्याचे, शेंगदाण्याचे लाडवांचा  आस्वाद घेतला... तो सावंतांचे पाहुणे म्हणूनच...

डोंगरातून येणाऱ्या गोमुख जलाचे आणि भगवती देवीचे दर्शन  घेतले... मंदिराजवळ मेहुणा संतोष आणि भाचे कंपनी श्री आणि श्रीकांतची भेट झाली... कोकणचे स्पेशल खडखडे  लाडू मिळाले... मुणगेकरांनी झकास आदरतिथ्य केले होते... संतोषाचा मेहुणा मुणग्यात रहाण्यासाठी आग्रह करत होता... पण आज पुढचा पल्ला गाठायचा होता...

राईड करताना अर्ध्या तासात सूर्य अस्ताला गेला... त्यामुळे रहाण्याची व्यवस्था पाहणे आता आवश्यक होते... महेश कडून आचरे येथील डॅफोडिल रिसॉर्टच्या निलेश सरजोशीचा नंबर मिळाला... त्याला फोन करून रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली... 

मुणगे घाट चढलो... आणि वरच्या सड्यावरून पेडलिंग करत आचरा तिठा पार केला आणि डॅफोडिल रिसॉर्टवर पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता... आज या रिसॉर्ट वर कोल्हापूरच्या शाळेतील मुलांची सहल आली होती... मुलांचा चिवचिवाट ऐकून एकदम मस्त वाटले...  सायंकाळी पक्षी घरट्यात येताना किलबिलाट करतात त्याची आठवण झाली... लहान मुलांबरोबर बालपणात जाता येते... मुलांच्या या खळखळाटाने सायकलचे श्रम एकदम नाहीसे झाले... त्याच बरोबर हिरव्यागार निसर्गाचे आसमंतात पसरलेले आवर्तन आवाक्यात आले ... आणि ऊर्जेत परावर्तित झाले...

 आडिवरे येथील तावडे वाड्यातून सकाळी आठ वाजता सुरू झालेली सायकल वारी रात्री साडेआठ वाजता आचरा येथील डॅफोडिल रिसॉर्ट मध्ये पोहोचली होती...  रिसॉर्टवरच सात्विक जेवणाचा आस्वाद घेतला... 

रात्री रिसॉर्टचे मालक निलेश सरजोशी बरोबर बोलणे झाले... फोन वर बोलतानाच जाणवले... नीलेशच्या आवाजात मार्दवता आणि हळुवारपणा आहे... मनोमन त्याला भेटण्याची इच्छा जागृत झाली... 

पाच पाच बेडचे दोन मोठे रूम आम्हा पाच जणांना उपलब्ध करून दिले निलेशने ... ते निव्वळ आम्ही पर्यावरण प्रेमी सायकलिस्ट आहोत आणि सकाळी लवकर निघण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून होते...

सकाळी आश्चर्याचा सुखद धक्का बसला... उपमा चहा नाष्टा करतानाच निलेश सरजोशी रिसॉर्ट वर हजर झाला... पांढऱ्या शुभ्र सदरा झब्ब्यात असणारा... अतिशय साधी राहणी असलेला निलेश प्रथमदर्शनीच भावला...

तुझ्या आडनावात काय विशेष आहे... निलेश म्हणाला आमचे घराणे पुरोहितांचे आहे... बारा पंचक्रोशीच्या पुरोहित जोशींचे मुख्य म्हणून सरजोशी...

पर्यावरण प्रेमी निलेशने  आपल्या दहा एकर जमिनीत फक्त जंगल वाढविले आहे... ते निव्वळ वन्य प्राणी, पक्षी, पाने, फुले, जमीन आणि पर्यावरण यांचे संवर्धन आणि संगोपन होण्यासाठीच... 

वेदांचा गाढा अभ्यास असणाऱ्या निलेशला पर्यावरण पुरक सायकल यात्रे संबंधात बोलण्यास सांगितले...

 आपले प्राचीनतम शास्त्र ऋग्वेद हे निसर्गाशी निगडित आहे... आणि आपण सुद्धा निसर्गाचा एक भाग आहोत... म्हणूनच निसर्गाची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य आहे... आणि याच उद्देशाने समाज प्रबोधनासाठी तुम्ही वरिष्ठ तरुण प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन प्रदूषणमुक्त वाहन सायकल वरून काश्मिर ते कन्याकुमारी या साहसी वारी वर निघाला आहात... याचे कौतुक वाटते आहे... सरजोशी कुटुंबीय आणि डॅफोडिल परिवारातर्फे  या पर्यावरण वारीला प्रचंड शुभेच्छा.... तुम्ही ही सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण करणार याची खात्री आहे...

निलेशचे ते विद्वतप्रचूर कवन ऐकून धन्य झालो... या पुढे सायकल सफर करणारे माझे सहकारी... सायकल क्लब यांना निलेश सरजोशीचा संदर्भ देण्याची मनोमन ठरवून डॅफोडिलचा निरोप घेतला...

कोकणातील मन मोहून टाकणाऱ्या मधाळ माणसांच्या भेटीगाठी वारीच्या सफलतेसाठी अतिशय पूरक होत्या...


सतीश जाधव

सायकलिस्ट...टीम लीडर

7977690693




Thursday, March 20, 2025

मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मेडिक्लेम एक दुष्टचक्र...

मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मेडिक्लेम एक दुष्टचक्र...

कॉम्प्युटरवरच्या प्रतिमा जरा भुरकट  दिसायला लागल्या तेव्हा लक्षात आले... चष्म्याचा नंबर वाढला आहे... म्हणून लालबागच्या प्रसिद्ध मारू रुग्णालयात डोळे तपासायला गेलो... 

 डोळ्यात औषध टाकून डोळे तपासले...  तेव्हा डॉक्टर म्हणाले मोतीबिंदू झाले आहे... शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढावे लागेल.... लगेच त्यांनी रक्ताचे रिपोर्ट ECG, XRay इत्यादी टेस्ट करायला सांगितल्या... तसेच इंपोर्टेड लेन्स बसवायची असेल तर 35000 रुपये खर्च सांगितला... सर्व रिपोर्ट आणि ऑपरेशन इत्यादीचा  खर्च मिळून एकूण साठ हजार रुपये लागतील असे सांगितले...

मेडिक्लेम काढलेल्या SBI general insurance कंपनी कडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले...  मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कॅशलेस फॅसिलिटी नाही... ऑपरेशन झाल्यावर पैसे परत मिळतील... 

याच शस्त्रक्रियेसाठी हिंदुजा रुग्णालयात चौकशी केल्यावर माहिती मिळाली... लेन्स साठी 75 हजार रुपये तसेच सर्व टेस्ट आणि ऑपरेशन मिळून दिड लाख रुपये खर्च येईल...

 फेब्रुवारी महिन्यात काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी असल्यामुळे डॉक्टर ना विचारले मार्च महिन्यात ऑपरेशन केले तर चालेल काय... त्यांनी होकार दिला...

टॅक्स प्लॅनर मित्र महेंद्रला सांगितले... मेडिक्लेम फेब्रुवारी अखेरीस  संपतोय तो रिनिव्ह करावा लागेल...  कन्याकुमारी सायकल टुरवर असताना sbi जनरल इन्शुरन्स कडून मेसेज आला... अगोदरचा रु 10500 प्रीमियमचा मेडिक्लेम आता इलिट मेडिक्लेम मध्ये परावर्तित करावा लागेल आणि त्याचा प्रीमियम 93000 रुपये आहे... हे समजल्यावर महेंद्रला सांगितले... सध्याचा मेडिकल दुसऱ्या कंपनीत पोर्ट कर... परतू ती सोय सुद्धा sbi जनरल इन्शुरन्सने ठेवली नव्हती... त्यामुळे सतत पाच वर्ष सुरू असलेलेला मेडिक्लेम मार्च महिन्यात बंद झाला...

 वयाच्या पासष्टी नंतर कोणत्याही कंपनीचा नवीन मेडिक्लेम घ्यायचा तर सर्व टेस्ट कराव्या लागणार होत्या तसेच प्रीमियम सुद्धा पन्नास हजारापेक्षा जास्त होता... तेसेच कोणत्याही मेडिक्लेम मध्ये 100 टक्के पैसे कधीच मिळत नाहीत... याचा अनुभव घेतला होता... नवीन मेडिक्लेम काढल्यावर मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी एक वर्ष थांबावे लागणार होते... त्यामुळे मेडिक्लेमचा नाद सोडून दिला..  आणि स्वतःच्या पैशांनी मोतीबिंदू ऑपरेशन करायचे नक्की केले...

मुंबई महापालिकेच्या sogo संगीत मैफिलीमुळे नायर रुग्णालयात सध्या कार्यरत असलेल्या सिस्टर प्रिया आणि साक्षी यांची मैत्री झाली होती... त्यांनी सांगितले  नायर मध्ये डॉ नयना पोतदार यांच्या युनिटच्या opd मध्ये  डोळे तपासा... म्हणजे सेकंड ओपिनियन पण होईल आणि ऑपरेशन आवश्यक असेल तर अतिशय कमी खर्चात होईल... (खाजगी रुग्णालयात आवश्यक नसताना सुद्धा ऑपरेशन केली जातात आणि मेडिक्लेम द्वारे पैसे उकळले जातात... अशी बरीच प्रकरणे झाली आहेत...)

स्वतः माजी महापालिका कर्मचारी असल्यामुळे रिपोर्ट किंवा ऑपरेशन यासाठी काही खर्च येणार नव्हता... 

आठवड्यापूर्वी डॉ नयना पोतदार यांच्या opd मध्ये औषध घालून डोळे तपासले... जवळ जवळ सात आठ वेळा वेगवेगळ्या मशीन खाली दोन्ही डोळे तपासण्यात आले... पुन्हा औषध घालून सुद्धा तपासणी झाली... डॉ दिप, डॉ शिवानी, डॉ श्रुती, डॉ माधव या सर्वांनी डोळे तपासल्यावर मुख्य डॉ अनुजा यांनी डोळ्याची पाहणी केली... आणि मोतीबिंदू फर्स्ट स्टेज मध्ये आहे... याचे निदान झाले... डॉक्टर म्हणाले नंबर थोडा वाढला आहे... त्यामुळे नवा चष्मा घेऊन सहा महिने ऑपरेशन पुढे ढकलू शकता... सायकलचे इव्हेंट सतत चालत असल्यामुळे कुटुंबियांच्या सहमतीने ताबडतोब ऑपरेशन करायचे नक्की केले... 

डॉक्टरांनी XRay, ECG, रक्ताचे वेगवेगळे रिपोर्ट, HIV, BP, मधुमेह इत्यादीचे रिपोर्ट आणायला सांगितले... नायर रुग्णालयातील सिस्टर्स गायिका प्रिया आणि साक्षी मुळे सर्व रिपोर्ट्स दोन दिवसात मिळाले...  तेही कोणताही खर्च न होता... 

दोन दिवसांनी पुन्हा OPD मध्ये डॉक्टर अनुजा यांना दाखविले तर त्यांनी सांगितले पुढच्या आठवड्यात ऑपरेशनची तारीख नक्की करूया... पुन्हा येथे  प्रिया आणि साक्षी यांची ओळख उपयोगाला आली... त्यामुळे दुसऱ्या दिवशीच ऑपरेशन करायचे नक्की झाले... 

डॉक्टरांनी सांगितले इंपोर्टेड लेन्स बाहेरून विकत घ्यावी लागते... या लेन्स साठी सात हजार रुपये खर्च येईल... तसेच ऑपरेशनच्यावेळी लागणारी काही इंजेक्शन आणि औषधे बाहेरून आणावी लागतील... ताबडतोब होकार दिला... 

रात्री रुग्णालयात भरती झालो... दर दोन तासांनी डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप्स देण्यात आले... हाताच्या पंजाला स्काल्प व्हेन लावण्यात आली... रात्री अलर्जीचे इंजेक्शन देण्यात आले... नायर रुग्णालयात सायंकाळी सात वाजता अतिशय सात्विक जेवण आणि रात्री आठ वाजता पेलाभर दूध मिळाले... 

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून दर अर्ध्या तासांनी डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप देण्यात आले...  चार नंबर वार्डची स्वच्छता वाखाणण्या सारखी होती... रात्री दहा वाजता वॉर्ड मध्ये झाडलोट आणि मॉपिंग करण्यात आले... त्यामुळे निवांत झोप झाली... 

सकाळी पाच वाजता नावाची अनाउन्समेंट झाली... डॉक्टरांनी पुन्हा BP पल्स रेट आणि मशीन वर डायबिटीज चेक केले... थिएटरचे पांढरे ढगळ कपडे देण्यात आले... कमरेला बांधायला सॅनिटरी पॅड देण्यात आला... तोंडाला आणि डोक्याला मास्क, तसेच थिएटर मध्ये जाताना चप्पल काढण्यावर पायात घालायचे प्लास्टिक मोजे देण्यात आले...

संघवी इंटरप्रायसेस कंपनीचा माणूस लेन्स घेऊन थिएटर बाहेर उभा होता... लेन्सचा बॉक्स हातात घेऊन त्यावर असणारी लेन्सची किंमत पहिली... त्यावर   17109 रुपये किंमत होती... आणि त्याचे नायर रुग्णालयाच्या नावाने 6935 रुपयाचे बिल होते... पैसे देऊन लेन्स ताब्यात घेतली... 

मारु रुग्णालयात 35000 रुपये, हिंदुजा मध्ये 75000 रुपये आणि नायर मध्ये  फक्त 6935 रुपये किंमत...  या लेन्सच्या किमतीचे  गौडबंगाल पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली...

ऑपरेशन थिएटर मध्ये सुद्धा ओळखीमुळे पहिला नंबर होता... डॉ श्रुतीने डाव्या डोळ्याला भूल दिली... पाच मिनिटात डोळा सुन्न झाला... तेव्हढ्या वेळात डॉक्टरांनी माझ्या काश्मिर ते कन्याकुमारी सायकलिंग बद्दल माहिती विचारली...  डोके न हलवता डॉक्टरांबरोबर बोलण्याची परवानगी होती..

लेझर सर्जरी सुरू झाल्यावर कानात... डोळा कापण्याचा टरर् टरर् आवाज येत होता... सर्जरी सुरू असताना ऑपरेशन थिएटर मध्ये मधुर भक्ती संगीत चालू होते... माझ्या सायकलिंग बद्दल सुद्धा चर्चा सुरू होती... पेशंट एकदम रिलॅक्स असावा... त्याला कोणताही ताण येऊ नये म्हणूनच सर्व काळजी घेण्यात आली होती... 

दहा मिनिटात ऑपरेशन पूर्ण झाले... मोतीबिंदू काढलेल्या डाव्या डोळ्याला पट्टी लावून रिकव्हरी रूम मध्ये पाच मिनिटे बसविण्यात आले... डॉ अनुजा यांना विचारले... काढलेला मोतीबिंदू पाहायला मिळेल काय... डॉक्टर हसल्या आणि म्हणाल्या आता ऑपरेशन लेझरद्वारे डोळ्याला सूक्ष्म छिद्र पडून केले जाते... त्यामुळे मोतीबिंदू बर्स्ट करून बारीक चुरा करून बाहेर काढला जातो... आणि त्या जागेवर नवी लेन्स बसविली जाते... ती लेन्स त्या सूक्ष्म छिद्रातून आत सरकवली जाते... मग डोळ्याच्या रेटिना मध्ये ती छत्री सारखी उघडते... त्यामुळे तिला डोळ्याच्या योग्य जागेवर बसण्यास थोडा वेळ लागतो... म्हणूनच ऑपरेशन नंतर दर दोन तासांनी डोळ्यात ड्रॉप टाकणे आणि डोळ्यात धूर, धुळ जाऊ नये किंवा ताण येऊ नये याची काळजी घ्यावी लागते...

डॉ अनुजाने दिलेली माहिती खूपच उपयुक्त होती...

संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला... तसेच सर्जरी लवकर बरी व्हावी यासाठी पाच प्रकारच्या गोळ्या आणि ड्रॉप देण्यात आले...

दर दोन दिवसांनी फॉलो अप साठी बोलावण्यात आले... या ऑपरेशन कार्यक्रमात बायको स्वप्नाची साथ सुरुवातीपासून शेवट पर्यंत होती... 

 मोतीबिंदू ऑपरेशन आणि बाहेरून आणावे लागणारे औषध गोळ्या यांचा एकूण खर्च आला 7840 रुपये आला होता...

मित्रांनो... आता सांगा मेडिक्लेमच्या नावाखाली खाजगी रुग्णालये किती लूटपाट करत आहेत... असलेला मेडिक्लेम पास झाला तरी पंचवीस टक्के रक्कम रुग्णाला भरावी लागते.... सरकारी रुग्णालयात प्रत्येक ठिकाणी रांग लावावी लागते... तुमच्याकडे वेळ आणि संयम असेल तर खरोखर सरकारी रुग्णालयातील अतिशय चांगली सेवा आपण मिळवू शकतो...

खाजगी रुग्णालयातील रुग्णाच्या पैशाची लुटपाट, ऑपरेशनचे दुष्टचक्र आणि मेडिक्लेमचे मायाजाल पहिले की मन विषण्ण होते....

ठरवले आहे... आता दरमहा पाच हजार रुपये मेडिकलसाठी SIP करायची आणि सरकारी रुग्णालयात... ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन साठी आपलेच पैसे खर्च करायचे... 


सतीश जाधव

सायकलिस्ट

7977690693

Wednesday, October 30, 2024

रत्नागिरी रोलर कोस्टर सायकल रेस... एक विचार मंथन... दि. २० ऑक्टोबर २०२४

रत्नागिरी रोलर कोस्टर सायकल रेस...

 एक विचार मंथन...

दि.२० ऑक्टोबर २०२४

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या वतीने  प्रसाद देवस्थळी आणि दर्शन जाधव यांच्या  या वर्षीच्या रत्नागिरी रोलर कोस्टर सायकल रेस मध्ये इव्हेंट आयकॉन होण्याच्या विनंतीला ताबडतोब होकार दिला... कारण जास्तीत जास्त सायकलिस्ट ना भेटायला मिळेल म्हणून... ही नियुक्ती तीन महिन्यापूर्वी झाली होती...

  रोलर कोस्टर रेस २० ऑक्टोबर रोजी होती... आणि १९‌ ऑक्टोबर रोजी बिब कलेक्शन आणि ओरियंटेशन होते... त्यानंतर माझ्या टुरिंग सायकलिंग बाबत अनुभव कथनाचा कार्यक्रम होता...

त्यातच या स्पर्धेच्या २ महिने आधी  २० ऑक्टोबर ही तारीख नॅशनल्सच्या स्पर्धेसाठी घोषित झाली...  आणि बरोबर ७ दिवसांनी  २७ ऑक्टोबरला  गोवा ट्रायथलॉन लागली... कोकणातील पाऊस सुद्धा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे सरकला होता...  त्यामुळे  माझे बरेचसे सायकलिस्ट मित्र या स्पर्धांच्या सरमिसळीमुळे विखुरले जात होते.... काही जण पावसामुळे साशंक होते... काही जण मला फीडबॅक देत होते की कोकणातील रस्ते पावसामुळे खराब झालेत.... त्यामुळे रत्नागिरी स्पर्धेमध्ये किती स्पर्धक येतील ही शंका माझ्या मनात होती...  तरी देखील माझ्या संपर्कातील जवळपास ३५ हून अधिक सायकलप्रेमींनी या सायक्लोथॉनसाठी रजिस्टर केले होते...

त्यात भरीस भर म्हणून रेस ॲक्रॉस इंडिया संस्थेच्या काश्मीर ते कन्याकुमारी या रेस कार्यक्रमाच्या तारखा १ ते १० ऑक्टोबर ऐवजी १० ते २० ऑक्टोबर झाल्या... ते काश्मीरमध्ये होणाऱ्या‌ निवडणुकीमुळे.. त्यामुळे २० ऑक्टोबरला इवेंटच इवेंट अशी परिस्थिती झाली.

रेस ॲक्रॉस इंडिया या रेस मध्ये दोन अंध तरुणांचा मी क्रू मेंबर होतो...  आणि ही रेस १८ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून  रत्नागिरी रोलर कोस्टर मध्ये सहभागी होणार होतो... त्या अनुषंगानेच तिरुअनंपुरम वरून १८ ऑक्टोबरचे मुंबईसाठी विमानाचे तिकीट काढले होते...

परंतु पाऊस, खडबडीत आणि रोलिंग टाईपचे रस्ते, धुके तसेच हैद्राबाद मधील हायवे सायलिंगसाठी बंद करणे... या सर्व कारणांमुळे १७ ऑक्टोबर रोजी  अनंतपुर शहरापर्यंत पोहोचलो होतो... येथून बंगलोर २०० किमी  तर कन्याकुमारी ९०० किमी अंतरावर होते... आणि एका दिवसात कन्याकुमारीचे अंतर पार करणे शक्य नव्हते... त्यामुळे बंगलोर वरून मुंबईचे १८ ऑक्टोबरचे दुसरे तिकट काढले.... आणि रेस अर्धवट सोडून बंगलोर वरून मुंबईला पोहोचलो...  रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे... हे प्राधान्य होते... 

यु ट्यूबर महेशला घेऊन गाडीने सायकलसह १९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता रत्नागिरी गाठले... रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला...  अतिशय प्रेमपूर्वक स्वागत झाले आम्हा दोघांचे...  सतत पंधरा दिवस भारत भ्रमंतीचा प्रवास सुरू होता... त्याचा शीण क्षणार्धात नाहीसा झाला होता... 

उतरल्या उतरल्या काऊंट किती झाला असं विचारलं आणि १७० जण आलेत हे कळल्यावर फार भारी वाटलं… एवढे एकत्र आलेले इवेंट, पाऊस आणि रस्त्याविषयी साशंकता असलेली परिस्थिती हे सर्व असून देखील रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने १७० जणांना कोकणात खेचून आणलं होत… अर्धी लढाई इथेच जिंकली गेली होती..

दुपारी परममित्र लाल्या उर्फ मृत्यंजय खातू याच्या गोपाळ हॉटेल मध्ये जेवायला गेलो... जेवत असतानाच... लाल्या मरणाच्या दारातून परत कसा आला... त्याची अतिशय विस्मयजनक कहाणी त्याने स्वतः सांगितली... हृदय विकाराने तो मृतप्राय झाला होता... आणि जवळपास वीस मिनिटांनी तो जिवंत झाला... खऱ्या अर्थाने मृत्यूवर त्याने विजय मिळविला होता... मृत्युंजय हे स्वतःचे नाव लाल्याने सार्थ केले होते... हसरा आणि खेळकर मित्र माझ्या समोर बसून गप्पा मारतोय... ही परमेश्वराची कृपाच म्हणायला हवी... 

इव्हेंट पार्टनर हॉटेल विवेकचे मालक श्री देसाई यांनी सायकलिस्टना राहण्यासाठी संपूर्ण हॉटेल खुले केले होते... महेश आणि माझ्यासाठी दोन वेगळे रूम देण्यात आले होते... परंतु आम्ही दोघांनी एकच रूम शेअर केला... आमच्या इतर सायकलिस्ट मित्रांची सोय व्हावी म्हणून...

सायंकाळी सात वाजता प्रसाद देवस्थळीने उद्या होणाऱ्या रोलर कोस्टर सायकल स्पर्धेचे नियम आणि घ्यायची काळजी याबाबत विस्तृत माहिती दिली... तसेच जागोजागी ठेवलेली हायड्रेशन व्यवस्था... मार्गदर्शनासाठी ठेवलेले स्वयंसेवक या बाबत सर्व खेळाडूंना अवगत केले... स्पर्धेचा रस्ता अतिशय ट्रिकी आणि चॅलेंजिंग होता... या स्पर्धेची टॅगलाइन देखील रंजक होती... जो दिमागसे खेलेगा... वही जीतेगा...

त्यानंतर इव्हेंट आयकॉन म्हणून मला बोलायची संधी मिळाली... नुकतीच करून आलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रेस बाबत  माहिती दिली... आतापर्यंत केलेल्या सायकल सफरी तसेच टुरिंग आणि रेसिंग सायकल मधले अंतर समजावून सांगितले... टुरिंग सायकलिंग मध्ये परिसर एक्सप्लोअर करता येतो... मित्र जोडता येतात... तसेच निसर्गात रममाण होता येते... निसर्गच आपला सर्वात मोठा गुरु आहे... खूप काही तोच आपल्याला शिकवत असतो... सायकलने प्रचंड मित्रपरिवार दिला... नॉर्थ ईस्ट सफर, उमलिंगला पास सायकलिंग, आदि कैलास ओम पर्वत सायकलिंग... यात घडलेल्या गमती जमती सांगितल्या...

नंतर सर्व उपस्थित सायकलिस्ट आणि पाहुण्यांना छान भोजनाची मेजवानी होती...

दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक हॉटेलने ठेवलेला केळी आणि चहा अल्पोपहार घेऊन माझ्या मुंबईच्या टीमसोबत भाटे पुलाकडे प्रस्थान केले...

सायकलिंग करत स्टार्ट पॉइंटला पोहोचलो आणि प्रसादचा फोन आला... जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्या समवेत बरोब्बर सकाळी साडेसहा वाजता शर्यतीला पांढरे निशाण फडकावून शर्यतीला सुरुवात करून दिली...

आणि सर्वांच्या शेवटी या शर्यतीत सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी माझी सुद्धा राईड सुरू  झाली... 

माझ्यासाठी जरी ही फन राईड असली तरी... पंढरपूर  पंजाब वारीची तयारी म्हणून न थांबता ही शर्यत पूर्ण करायची असे ठरविले होते... हळूहळू एक एक स्पर्धक मागे पडू लागला... ग्रॅव्हल रायडर सुद्धा मागे पडत होते... एका स्पर्धकाने विचारले... तुमची MTB सायकल इलेक्ट्रिक मोटर लावल्या सारखी पळते आहे... त्याला सांगितले... वेग चाकात नसतो तर तो डोक्यात असतो...

विशेष म्हणजे आज पावसाची कृपा झाली होती... सकाळी रेस दरम्यान कुठेही पाऊस पडला नाही... तसेच रत्नागिरी बांधकाम खात्याने आदल्या दिवसापर्यंत पावसामुळे खराब झालेला रस्ता... खडी आणि डांबर टाकून सुव्यवस्थित केला होता...

वाटेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या स्वयंसेवकांनी अतिशय फर्मास हायड्रेशन व्यवस्था  केली होती... पाणी तसेच मेनेकी Abaolute  चे हायड्रेशन बाटलीचे बुच उघडून स्पर्धकांना देत होते... एक स्वयंसेवक मुलगी  सोललेले केळे  देण्यासाठी माझ्या सायकल मागे धावली होती... खरंच स्पर्धकांची अशा प्रकारे काळजी घेणे... ही कौतुकास्पद गोष्ट होती...

या सायकल स्पर्धेत बरेच अल्ट्रा सायकलिष्ट होते...  जवळपास एकशे सत्तर सायकलिस्टनी या स्पर्धेत भाग घेतला होता... परंतु प्रत्यक्ष स्पर्धा करणारे निम्मे असावेत... माझ्यासारखे फन राईड करणारे आणि फोटोग्राफी करत त्या सायकल रूटचा आणि  निसर्गाचा आनंद घेणारेच खूप सायकलिस्ट होते... 

ईलिट ग्रुप मध्ये पहिले तीन स्पर्धक विजयी झाले... त्यात पहिला आला अमन तांबोळी... अमनने निर्विवाद फिनिश केला २ ते १० नंबर साठी मात्र तुल्यबळ लढत झाली... पहिले आलेले तिघेही स्पर्धक नॅशनल स्पर्धांसाठी एकत्र सराव करतात आणि ते या स्पर्धेत ग्रुपने सायकलिंग करताना एकमेकांना डॉज करत होते... तसेच शेवटपर्यंत त्या तिघांनी कोणालाही पुढे जाऊ दिले नाही... आपल्याच ग्रुपच्या एका सदस्याने रेस जिंकण्यासाठी ही  स्टॅटेजी आता सर्व ठिकाणी सर्रास वापरली जाते... 

मुलींच्या गटात प्रथम आलेली नॅशनल स्पर्धक योगेश्वरी एका ठिकाणी घसरून पडली... तरी सुद्धा उठून पुन्हा तिने मुसंडी मारत स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकली...

 पहिल्या तीन क्रमांकाने विजयी झालेल्या स्पर्धकांच्या सायकलींच्या किमती ऐकून डोळे पांढरे झाले होते...

नॅशनल लेवलला स्पर्धा करणाऱ्या स्पर्धकांबरोबर स्थानिक सायकलिस्ट स्पर्धेत होते पण ही तुलना सायकलचे प्रकार पाहुन होऊ शकत नाही हे मात्र खरं… स्थानिक सायकलपटू ना प्रोत्साहन देण्यासाठी वेगळी Category ठेवल्यास अजून मजा येईल...

मला वाटते... कोणत्याही सायकल क्लबने आपल्या शहरात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात सायकलिंग कसे वाढेल... फोफावेल... सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचेल याचा विचार करणे आवश्यक आहे... रेस साठीच्या स्पर्धा भरविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर वेगळे मंच आहेत... स्थानिकांसाठी रेग्युलर ग्रुप राईड तसेच लांब पल्याच्या राईड होणं गरजेचं वाटतं...

हल्ली बऱ्याच क्लब मध्ये BRM, SR आणि LRM करणाऱ्या स्पर्धकांचे सत्कार, सन्मान केले जातात... खरंच या स्पर्धा भारतीय आहेत काय... अशा स्पर्धांच्या प्रत्येक गोष्टी साठी पैसे मोजावे लागतात... हायड्रेशन, सायकल ब्रेक डाऊन किंवा स्पर्धकाला आलेल्या अडचणीसाठी आयोजकांकडून कोणताही सपोर्ट मिळत नाही...

याच धर्तीवर मुंबईच्या घोडबंदर सायकल क्लबने GRM (म्हणजे घोडबंदर रोड मास्टर) 25, 50, 75, 100, 150, 200, 250 आणि 300 किमी ह्या सायकल स्पर्धा अतिशय कमी फी मध्ये सुरू केल्या  आहेत... स्पर्धा पूर्ण करण्यासाठी कट ऑफ टाईम निर्धारित केलेला असतो... यात कोणीही सायकलिस्ट प्रत्यक्ष किंवा वर्चुअल भाग घेऊ शकतो... स्पर्धेत प्रत्यक्ष भाग घेणाऱ्यांसाठी सकाळचा नाष्टा, वाटेतील हायड्रेशन, जेवण, सायकल मेकॅनिक, अँब्युलन्स सपोर्ट... इत्यादी सर्व सुविधा पुरविल्या जातात... यात मेडल अथवा सर्टिफिकेट साठी वेगळे पैसे भरावे लागत नाही... शंभर किमी अंतरापर्यंतच्या सर्व स्पर्धा पार करणाऱ्या सायकलिस्टला ज्युनिअर GRM ट्रॉफी आणि 25 ते 300 किमीच्या सर्व स्पर्धा नियोजित वेळात पार करणाऱ्या  सायकलिस्टला सिनियर GRM  ही ट्रॉफी मिळत आहे... या स्पर्धेत ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल या भागातले शेकडो सायकलिस्ट भाग घेत आहेत... अशा धर्तीवर देखील रत्नागिरी सायकलिस्ट क्लब अथवा रत्नागिरीतील सर्व सायकल क्लब स्पर्धा भरवू शकतात... 

GRM मध्ये स्पॉन्सरर कडून आलेली मदत सर्व सायकलिस्ट वर खर्च केली जाते...  सायकलिस्टच्या खिशाला जास्त खर्च न पडता अशा स्पर्धा जेव्हा घेतल्या जातात तेव्हा भरभरून सायकलीस्ट यात भाग घेतात... यामुळे तळागाळातील सायकलिस्ट सुद्धा आपला इंड्युरंस तपासू शकतो... ते सुद्धा अतिशय कमी खर्चात... यामुळे सायकलिंग सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवू शकतो... 

रोटरी क्लब ऑफ काळा घोडा ही संस्था सायकलिंग फॉर डायबिटीज या सायकल रॅलीचे आयोजन करते... ह्याचे रजिस्ट्रेशन मोफत असते... स्पर्धेच्या दिवशी सकाळी सर्वांना टीशर्ट आणि पाणी दिले जाते... मुंबईच्या काळा घोडा पासून दादर शिवाजी पार्क पर्यंत फक्त 15 किमीची  रॅली असते... रॅली पूर्ण केलेल्या प्रत्येक सायकलिस्टना एक नंबर दिला जातो... दादर येथे लॉटरी द्वारे 25 सायकलिस्ट ना सायकल विषयक बक्षिसे दिली जातात... आणि पहिले बक्षीस चांगल्या प्रतीची गियर सायकल असते... या रॅलीत हजारो सायकलिष्ट भाग घेतात... आणि शेवटपर्यंत थांबतात..  हा उपक्रम सुद्धा रत्नागिरी सायकल क्लब स्पॉंसररच्या  मदतीने राबवू शकतो...

मी गेली ३-४ वर्ष सतत कोकणात येतोय आणि सायकल स्पर्धेमधे एंजॉयमेंट म्हणून भाग घेतोय. मला मनापासून वाटतं की जिल्ह्यातील सर्व क्लबचं मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सायकलिंग करावे हे  असले पाहिजे... फक्त स्पर्धात्मक सायकलिंग वर भर देण्याऐवजी टूर राईड वर फोकस केला गेला पाहिजे... आणि स्थानिक सायकलिस्ट यात कसा सहभागी होईल यावर लक्ष दिले पाहिजे...

इतर प्रांतातील सायकलिस्टसाठी व्हर्च्युल सायकल स्पर्धा घेऊन त्यांना सुद्धा बक्षिसे देता येतील का हा विचार देखील प्रत्येक सायकलिस्ट क्लब ने करावा... असा माझा आग्रह असतो... कारण इतर प्रांतातून येणाऱ्या सायकलिस्टना कारने, बसने, रेल्वेने सायकल घेऊन यावे लागते... त्यामुळे स्पर्धेत भाग घेणे हे खर्चिक होते... 

स्पर्धा आली तेथे रिस्क आली आणि रिस्क आली की संस्थेची जबाबदारी खूप वाढते...मी असे अनुभव घेतलेत आणि त्यापासून धडा घेऊन काही क्लब फक्त फन राईड आयोजित करतात... रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली सायकलिंग क्लब त्यापैकी एक आहे...

मी अनेक क्लब ना सांगतो की जे ब्रँड आयकॉन आहेत त्यांना  वाईल्ड कार्ड द्या... त्यांच्या मार्फत येणाऱ्या पार्टीसिपंट ना स्पेशल  डिस्काउंट द्या... इव्हेंट अनाउन्समेंटच्या पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी  डिस्काउंट द्या... तळागाळापर्यंत सायकलिंग पोहोचली पाहिजे असे उद्दिष्टं ठेवा... घोडा सायकलवाल्याने सुद्धा भाग घ्यायला हवा असा फॉरमॅट ठेवा... महाराष्ट्रात असणारे वयस्क तसेच भरपूर सायकलिंग केलेले सायकलिस्ट त्यांना फ्री एन्ट्री द्या... या गोष्टीमुळे सायकल क्लब सर्वांपर्यंत पोहोचू शकतील...

इव्हेंट मध्ये लॉटरी असली की जास्तीत जास्त सायकलिस्ट  सहभागी होतात... ज्या सायकल संस्थेची दहा पेक्षा जास्त सायकलिस्ट इव्हेंट मध्ये सहभागी होतील त्या सायकल क्लबचा सुद्धा सन्मान करावा... नुसती रेस हा कन्सेप्ट नसावा... लॉटरी मध्ये हेल्मेट, गॉगल, ग्लोव्हज, सायकल इत्यादी बक्षिसे वाटण्यात यावीत... यातील बऱ्याच गोष्टी यावर्षी रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने अमलात आणल्या आहेत... 

कुठल्याही क्लबच ध्येय हे सायकलिस्ट घडवणे हे असावे... ना की स्पर्धक निर्माण करणे... स्पर्धा आली की ग्रुप करून इतरांना पुढें जाऊ न देणे... आपल्या गटातील  एकमेकांना वाऱ्यापासून प्रोटेक्शन देणे... अशा चाली खेळल्या जातात... 

आणि यावर पर्याय म्हणजे स्पर्धा न  ठेवता कट ऑफ टाईम असावा..  आणि मग लॉटरी सिस्टिमने बक्षीस द्यावे... सर्वांना मेडल... टीशर्ट मिळावे... फन राईड मुळे खूप जण सहभागी होतील... महिलांसाठी सुद्धा स्पर्धा पूर्ण करणे हे ध्येय असावे... ना की स्पर्धा जिंकणे असावे... 

रत्नागिरीतील सर्व क्लबचे ध्येय हे  रत्नागिरी जिल्हा सायकलमय व्हावा... हे असले पाहिजे... मग बाहेरील सायकलिस्ट कसे  सहभागी होतील याचा विचार करावा... 

स्पर्धेपेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सायकलिंग पोहोचविणे... आणि लोकल सायकलिस्टनी या सायकलिंग इव्हेंट मध्ये भाग घ्यावा यासाठी रत्नागिरी क्लब प्रयत्नशील आहेच पण आता याची गती वाढणे आवश्यक आहे... 

देशाला प्रदूषण मुक्त करायचे असेल तर जास्तीत जास्त सायकलिस्ट निर्माण करण्याचे ध्येय संस्थेने ठेवणे आवश्यक आहे... स्पर्धा म्हणजे धोक्याला आमंत्रण देणे आहे... 

कोणत्याही तालुका निहाय सायकल संघटनांमध्ये स्पर्धा नसावी... किंवा संघटनेची प्रगती स्पर्धा अनुषंगाने मापली जाऊ नये... तर किती स्थानिक स्पर्धक स्पर्धेत भाग घेतात या वर असावी... स्थानिक स्पर्धकांची आदल्या दिवशी राहण्याची व्यवस्था करण्याची सुद्धा आवश्यकता नसते...

बाहेरील सायकलिस्ट मंडळींना जास्तीत जास्त सवलती दिल्या तरच टुरिझम वाढेल तसेच रत्नागिरीचे  स्थान महात्म्य सर्वांपर्यंत पोहचविता येईल... टिळक, सावरकर यांची कर्मभूमी आणि गणपतीपुळे, पावस, वेळणेश्वर, हेदवी  ही देवस्थाने यांची ओळख इतरांना करून देता येईल... 

स्थानिक सायकलिस्ट वाढले की स्थानिक प्रशासनाला रस्त्याची कामे वेगात करावी लागतील... मीडिया सुद्धा जागृत होईल... त्यामुळेच प्रत्येक सायकलिस्टला निर्विघ्नपणे  एक्सप्लोअर करता येईल असे व्हिजन असावे... 

सर्व स्वयंसेवक  यांचा सुद्धा  यथोचित सन्मान झाला पाहिजे... रत्नागिरी शहर...  त्याच बरोबर जिल्ह्यातील इतर शहरे तालुके आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्हा सायकलमय होईल हे उद्दिष्ट असले पाहिजे... 

तसेच टुरिंग सायकलिंगसाठी सुद्धा प्रोत्साहन द्यावे... रत्नागिरी मधून जाणाऱ्या टुरिंग सायकलिस्टला क्लबची मदत  आणि मार्गदर्शन मिळाले तर तो सुद्धा आपल्या क्लबचा प्रचार प्रसार करू शकतो... या द्वारे प्रत्येक प्रांतात आपला सायकलिस्ट  मित्र पाहिजे...  हे ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट साध्य होईल...

रत्नागिरी सायकल क्लबला पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा...

जय श्री राम...


सतीश विष्णू जाधव,  सायकलिस्ट, मुंबई 7977690693

Thursday, September 26, 2024

सायकल रपेट आणि मोबाईलचा डॉक्टर हेमंतची भेट... दि. २६ सप्टेंबर २०२४

सायकल रपेट आणि मोबाईलचा डॉक्टर हेमंतची भेट... 

दि. २६ सप्टेंबर २०२४

सकाळी पाच वाजता उठलो... खिडकीतून बाहेर डोकावले तर रस्ता ओलाचिंब आणि पावसाची रिपरिप सुरू होती... कालच रेड अलर्टचा इशारा मिळाला होता... म्हणून सकाळी सायकलिंग साठी बाहेर न पडता एक तास मेडीटेशन नंतर २८ सूर्य नमस्कार घातले...

काश्मिर ते कन्याकुमारी राईडची अंतिम तयारी सुरू आहे म्हणूनच सायकलिंग सोबत सूर्यनमस्कार सुद्धा सुरू केले आहेत... 

घरातील सर्व कामाची यादी घेऊन दुपारी सखिसह बाहेर पडलो... बाजारातच परममित्र अल्ट्रा रायडर आणि कोच अंकुश साळुंखे आणि संतोषची भेट झाली... जेव्हा जुने मित्र नव्याने भेटतात तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही...

घरातील सर्व कामांचा निपटारा करून... ग्रँट रोडला गेलो... ब्ल्यू टूथ स्पीकर आणन्यासाठी... त्याची बॅटरी लवकर ड्रेन होत होती... बोट कंपनी मध्ये रीपेरींग पॉलिसी नाही... जर पिस वॉरंटी मध्ये असेल तर रीप्लेसमेंट मिळते... 

दोन दिवसांपूर्वी राज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तो स्पीकर घेऊन गेलो त्याने बाजूलाच असलेल्या रीपेरर  हेमंतचे दुकान दाखवले... गुजराती मारवाडी यांच्या गराड्यात मराठी माणसाचे दुकान मनाला दिलासा देऊन गेले... त्याने स्पीकर चेक करून त्याची बॅटरी खराब झाल्याचे सांगितले... नवीन  ओरिजीनल बोट कंपनीच्या  बॅटरीचे... त्याच्या कारागिरी सह... सातशे रुपये होतील असे सांगितले... बोट कंपनीचा स्पीकर घेऊन दोन वर्ष झाली होती... आणि नवा स्पीकर दोन हजार पर्यंत होता... म्हणून हेमंतला होकार दिला बॅटरी बदलण्यासाठी... ती आज मिळणार होती...

हेमंतच्या दुकानात गेलो तर नेमका तो जेवायला गेला होता...  यायला तासभर लागणार होता... म्हणून बाजूलाच असलेल्या सॅमसंग गॅलरीत गेलो... दोन वर्षापूर्वी घेतलेला सॅमसंग मोबाईल आता एकदम ड्रेन होत होता... सकाळी चार्ज केला की दुपारपर्यंत डिस्चार्ज व्ह्यायचा... त्यामुळे सतत पॉवर बँक घेऊन फिरावे लागत होते... 

 गॅलरीमध्ये मोबाईल दाखवल्यानंतर... पंधरा मिनिटांनी रिपोर्ट आला... मोबाईलची बॅटरी खराब झाली आहे... बॅटरीचा खर्च साडेचार हजार रुपये... आणि डेटा नाहीसा होऊ शकतो... तसेच दोन दिवस मोबाईल ठेवावा लागेल... 

मोबाईल दोन दिवस गॅलरीत ठेवण्याची तयारी नव्हती... यापेक्षा नवा मोबाईल घेऊन त्यात डेटा ट्रान्स्फर करून मगच जुना मोबाईल दुरुस्तीला द्यावा... असे ठरवून सॅमसंग गॅलरीतून बाहेर पडलो... येथून नरिमन पॉइंट लूप पूर्ण केला...

 आणि तासाभरात हेमंतच्या दुकानात आलो... हेमंत ब्ल्यु टूथ स्पीकरमध्ये नवी बॅटरी बसवत होता... दहा मिनिटात त्याने स्पीकर टकाटक केला... त्यात मायक्रोकार्ड बसवून... खणखणीत आवाजात स्पीकर चालू केला... काश्मिर कन्याकुमारी सायकलिंगसाठी याचा मस्त उपयोग होणार होता...

हेमंतला सॅमसंग मोबाईलचा प्रोब्लेम सांगितला... त्याने माझ्या समक्ष मोबाईल उघडला आणि म्हणाला बॅटरी फुगली आहे... बदलावी लागेल... किती होतील... तर म्हणाला ओरिजनल बॅटरी टाकली तर माझ्या मजुरीसह पंधराशे रुपये होतील... यातील  डेटा नाहीसा होईल काय... हेमंत म्हणाला बिलकुल नाही... मनाला दिलासा वाटला... आणि नवा मोबाईल घेण्याचे विचारचक्र थांबले... किती वेळ लागेल... हेमंत म्हणाला... मार्केट मधून ओरिजनल बॅटरी आणावी लागेल... आणि तासाभरात काम होईल...

जुनी बॅटरी घेऊन हेमंत मोटरसायकल घेऊन मार्केटमध्ये गेला तेव्हढ्यात पाऊस सुरू झाला... पाऊस थांबल्यावर हेमंत अर्ध्या तासात परत आला आणि दहा मिनिटात नव्या बॅटरीसह मोबाईल फिट करून माझ्या ताब्यात दिला... सर्व डेटा सुरक्षित आहे का ते तपासले... एकदम ठिकठाक पाहिल्यावर खूप आनंद झाला... 

साडेचार हजार रुपये खर्च, डेटा जाण्याची शक्यता, दोन दिवस मोबाईल ठेवा... या सर्व दुष्ट चक्रातून मोबाईलच्या खऱ्याखुऱ्या डॉक्टरने अतिशय माफक खर्चात मोबाईलला संजीवनी दिली होती... 

आज मोबाईलच्या प्रामाणिक डॉक्टरची भेट झाली होती...

आजची पंचवीस किमी राईड हेमंतला सप्रेम भेट...

Friday, September 6, 2024

उमलिंगला पास सायकल वारी.. विश्रांती आणि सायकल सर्व्हिसिंगचा दिवस... दि. २० जुलै २०२४

उमलिंगला पास सायकल वारी.. विश्रांती आणि सायकल सर्व्हिसिंगचा दिवस... दि. २० जुलै २०२४

आज विश्रांती आणि सायकल सर्व्हिसिंगचा दिवस होता... संजयला आणखी एक दिवस विश्रांती हवी होती... सकाळीच संजयची बायको पूजाचा फोन आला... संजयची खुशाली विचारण्यासाठी...  तिला ताबडतोब तिघांचा फोटो शेअर केला... संजय एकदम ठिकठाक आहे... हे कळण्यासाठी...

सर्लीचा डिरेलर हॅंगर फाईन ट्युनिंग करणे आवश्यक होते... मागचा गियर एक आणि दोन वर जात नव्हता... प्रथम  हॅंगरचे फोटो काढले...

सायकलचे चाक  फ्रेम मधून बाहेर काढले... त्यानंतर परेशच्या मदतीने  हॅंगर खोलला... हॅंगरच्या बाहेरील पट्टी वाकडी झाली होती... तिला पक्कड आणि हातोडीच्या साहाय्याने सरळ केले... ती पट्टी पुलीसह पुन्हा लावताना काढलेल्या फोटोची मदत झाली... आता गियर एक आणि दोन वर शिफ्ट होत होता... सर्लीची टेस्ट राईड घेतली... शंभर टक्के पास झाली सर्ली... टुरिंग राईड करताना सायकलचे रीपेरिंग शिकणे म्हणूनच अतिशय महत्त्वाचे असते... 

नाष्टा झाल्यावर सकाळी क्वालिस गाडी आली... परेश बरोबर सोमोरिरी तलावाकडे प्रस्थान केले... आज संजय सुमडो येथे पूर्ण विश्रांती घेणार होता... 

सुमडो ते सोमोरीरी सायकल वारी संजय सोबत केली होती... क्वालिस मधून जाताना ती संपूर्ण वारी आठवली... क्यागरसो पर्यंत वर वर चढत जाणारा रस्ता मातीने माखलेला ऑफ रोडींग होता... गाडीत अक्षरशः हाडे खिळखिळी झाली... यापेक्षा या रस्त्यावर सायकलिंग केले असते तर बरे झाले असते... असे वाटले...

सोमूरिरी लेकच्या आधी क्यागरसो तलाव लागतो... या तलावाच्या काठाला पांढऱ्या वाळूचा प्रदेश होता... जणूकाही थंडीत पडणाऱ्या भुरभुऱ्या बर्फाची  वाळू झाली असावी... 

निळेशार पाणी आणि त्यावर वाऱ्याने उठणारे  तरंग... मनाचे अंतरंग... मदमस्त करत होते... मागच्या वेळी माहे ते सो मोरीरी सायकलिंग करताना या तलावापर्यंतचा घाट चढल्यावर माझी दमछाक झाली होती... परंतु टेन्ट लावायला येथे आडोसा मिळाला नव्हता... म्हणून कारझोक कडे प्रस्थान केले होते...

क्यागरसो लेकच्या पुढे  बऱ्याच ठिकाणी रस्ते डांबरी झाले आहेत... त्यावेळी सोमोरिरी जवळ BRO कंत्रादाराचा सुपरवयाजर अलीच्या कंटेनर मध्ये तीन दिवस राहिलो होतो... त्याची चौकशी केली... पण त्याची बदली लेह मध्ये झाली होती... 

कराझोक गाव ओलांडून सोमोरिरी तलावाच्या व्हीव पॉइंट कडे आलो...

तेथून परेशची  फोटोग्राफी  झाली...  परेशच्या बकेट लिस्ट मधील एक इच्छा पूर्ण झाली होती... 


तलावाजवळून जवळपास चार किमी चालत सफर करत... मॉनेस्ट्रीकडे आलो... परेशने खूप फोटो काढले...
एकाच लोकेशनचे वेगवेगळ्या ॲपरचर आणि स्पीड (ISO) मध्ये बदल करून परेश फोटो टिपत होता...

 ढगांचे तलावात पडलेले प्रतिबिंब... लाईट आणि शॅडो इफेक्ट, बर्फाने आच्छादलेली  हिमशिखरे, पक्षांचे बागडणे... हे सर्व निसर्ग सौंदर्य... डोळ्याच्या कॅमेऱ्याने टिपत होतो... डोळ्यांचे पारणे फिटले...

जवळपास दोन तास सोमोरीरि परिसरात फिरत होतो...

कारझोक गावात एका हॉटेल मध्ये फ्राय राईस आणि चावमिन खाऊन पुन्हा सुमडोकडे रवाना झालो...

संजय आता एकदम फ्रेश झाला होता... त्याच्या बरोबर मस्त चहा घेऊन... हॉटेलच्या गच्चीत बसलो... सर्वांशी सुसंवाद करायला...

जय श्री राम...