Saturday, June 27, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Tenth Day) 03.11.2019. मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा) ०३.११.२०१९ दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा)  

 03.11.2019

दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

सकाळी सहा वाजता स्ट्रेचिंग आणि प्रार्थना करून दिंडीगल वरून कोविलपट्टीकडे प्रस्थान केले. आज जवळपास दीडशे किमी स्ट्रेच होता.


सकाळीच सूर्य दर्शन झाले. प्रभात समयी "मित्राच्या" भेटीचा आनंद अपरिमित होता. नवा दिवस, नवीन ऊर्जा आणि ध्येयपूर्तीकडे प्रस्थान करण्याचे प्रशस्त कार्य या आदित्याच्या आगमनाने सहज सोपे झाले होते.

सात वाजता अन्नलक्ष्मी हॉटेलमध्ये नास्त्यासाठी थांबलो. आज खुप दिवसांनी पोंगलचा (तमिळ खिचडी) मस्त आस्वाद घेतला. हॉटेलमध्ये सर्व महिला काम करत होत्या.
आता मदुराई जवळ येऊ लागले. अभिजीतला मदुराईच्या मीनाक्षी मंदिराचे दर्शन घ्यायचे होते. हायवे पासून आत 27 किमी वर मीनाक्षी मंदिर होते परंतु कन्याकुमारीचा  पल्ला मोठा होता, त्यामुळे मदुराई शहरात जायचे टाळले. 

मी स्टेटस अपडेट करत होतो. सकाळीच पुण्याच्या मनोजचा फोन आला. 'कन्याकुमारीला रस्ता संपतो, तेथे डेड एन्डचा फोटो काढा'.

वाटेत सत्यमंगलम टायगर रिजर्व लागले. नऊच्या दरम्यात लक्ष्मणला झोप येऊ लागली. एक डेरेदार झाडाखाली पथारी मांडून लक्ष्मण झोपी गेला. मी सहलीचे निवांत लेखांकन करत बसलो होतो.

बाराच्या आसपास 78 किमी सायकलिंग झाले होते. वाटेत कामधेनू हॉटेल लागले.  गरमागरम  कांदा भाजी तळली जात होती. भोंडा, केळा भजी आणि गरम कांदाभजी आम्ही हादडली. इथे एक बर होतं, सांबर आणि चटणी हवी तेंव्हाढी घ्या, भरपेट खा.  पांढरी आणि लाल चटणी फर्मास होती. त्या नंतर घेतलेला चहा म्हणजे पर्वणी होती.
 येथील चहा बनवायची पद्धत एकदम निराळी. चहाची पावडर एका कापडी पोटलीत घालून उकळत्या पाण्यातील, छोट्या पाण्याच्या भांड्यात डुंबवून ठेवतात, त्यानंतर काचेच्या छोट्या ग्लासात साखर टाकून त्यावर ती चहाची पोटली धरून चहाचा अर्क ग्लासात  मिसळतात. त्यानंतर दुसऱ्या भांड्यातले गरम दूध त्या चहाच्या ग्लासात ओततात. मग एका ग्लासातून दुसऱ्या ग्लासात चहा, साखर, दुधाचे मिश्रण फेसाळत ओतले जाते.  वर टॉपिंगला आणखी चहाचा अर्क टाकून, तो ग्लास पाण्यात बुडवून प्यायला देतात. तमिळ चहा बनविण्याची पद्धत अतिशय झकास होती. शेवटी चहाच्या ग्लासाचे बुड पाण्यात बुडवितात कारण कपाच्या बुडाला लागलेला चहा तुमच्या अंगावर सांडू नये. मानले या पद्धतीला...
अजून 80 किमी राईड करायची होती. आम्ही जोर मारला आणि पुढे सर्वांना गाठले. तामिळनाडू मधील रस्ते अतिशय चांगले होते, त्यामुळे जोरदार राईड सहज होत होती. रस्त्याला रहदारी सुद्धा कमी होती.
दोनच्या सुमारास वाहीकोलम गावातील  घरगुती हॉटेल मध्ये गेलो. येथे सर्व महिला काम करत होत्या. मसालेदार तळलेले काणे मासे आणि रस्सम भात खाल्ला वर  चिक्की खाल्ली. 

दुपारी साडेतीन वाजता टिफिन हॉटेल लागले. चहा साठी थांबलो. येथे सर्व तमिळी... त्यांना दुसरी कोणतीही भाषा येत नाही, त्याच्याशी मुक्याच्या भाषेत हावभावने काय हवे ते सांगितले. माणसे हसतमुख होती. किती पैसे झाले, या साठी नोटा काढून दाखवल्या.

विरदूनगर गावात साडेचारला पोहोचलो. तेथे चहा पीत असलेल्या नागरिकांनी आमची आस्थेने चौकशी केली. पर्यावरणाचा संदेश सर्व भारतात पसरावा, हे सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी चहा आणि गोड बनपाव खायला घातला. त्यांनी आपुलकीने केलेल्या चौकशी आणि स्वागतामुळे आमचा उद्देश साध्य होतोय याची निश्चिती झाली.

याच मंडळींनी तमिळ भाषेमध्ये "तूई मुई इंडिया" म्हणजे पोल्युशन फ्री इंडिया हे सांगितले. एक तमिळ वाक्य शिकलो होतो. मला वाटते... अशा प्रकारे भारत भ्रमण केले तर भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि खानपान याचा आस्वाद नक्कीच घेता येईल.

 'तमिलची रेस्टॉरंट'  पर्यंत 115 किमी सायकलिंग झाले होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. अजून 45 किमी जायचे होते. लक्ष्मणच्या डोक्यात आराम करायचे विचार होते, पण मी त्याला होकार देत नव्हतो. शेवटचे दोन दिवस संपूर्ण सायकलिंग लवकर लवकर करायचे असे मी ठरविले होते. हे लक्ष्मणच्या गळी उतरविण्यासाठी  'मौनं सर्वार्थ साधनं' हा मंत्र अवलंबला. 
नाऊडूपट्टी गावापर्यंत लक्ष्मणाला रेटले. 
शेवटी त्याला सांगितले,  'आता फक्त 13 किमी राहिले आहे सायकलिंग करूया' लक्ष्मण माझ्या मौनाचा अर्थ समजला होता, त्यामुळे तो हसत होता. राईड पूर्ण करायचे ठरले. रात्री साडेआठ वाजता कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेलमध्ये पोहोचलो. 163 किमी राईड झाली होती.

आजची सायकल सफर लांब पल्ल्याची होती, परंतु जनमाणसांच्या भेटीगाठी, त्यांचे आदरतिथ्य आणि नितांत सुंदर परिसर, हवा हवासा वाटणारा निसर्ग यामुळे सहज सोपी वाटली.

 या कोविलपट्टीवरून कन्याकुमारी फक्त 140 किमी आहे.  "याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा" तुकोबांच्या या अभंगाचा प्रत्यय उद्या येणार होता.
सतीश विष्णू जाधव

Wednesday, June 24, 2020

राणीचा रत्नहार राईड

राणीचा रत्नहार राईड

२२, जून २०२०

आज संध्याकाळी विजयसह राईड वर निघालो. खूप दिवसांनी विजयसह रात्रीची राईड करत होतो. विजयने मिशा काढल्यामुळे एकदम तरुण दिसत होता.
दूरदर्शन, वरळी नाका, महालक्ष्मी, जसलोक, वाळकेश्वर करीत मारिन लाईन्स चौपाटीला पोहोचलो. आज सुद्धा चौपाटीवर कोणालाही बसण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मारिन लाईन्स वरील गोलाकार बस स्टॉपचा आसरा घेतला आणि संध्याकाळी दिसणारा राणीचा रत्नहार न्याहाळू लागलो. 

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसर...
मुंबईचा दिमाख मिरवणारा....
मुंबई आणि समुद्र यांचे अतूट नाते...
हा परिसर  गोलाकार असल्यामुळे तो समुद्राची गळाभेट घेताना दिसतो...
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा.!!!

खरोखरच समुद्राच्या लाटा या किनाऱ्याला भेटताना मौल्यवान मौक्तिक अर्पण करतात....
हे पाहात असताना, सर्व समर्पणात केलेल्या त्यागाची प्रचिती येते... 
आजही ते अनुभवले...
घरोघरी देवघरात तेजाची निरांजने उजळत असताना...
या ठिकाणी संध्यासमयी, तेजोनिधी गोल आपल्या किरणांचा तेजस्वी प्रकाशाची तीव्रता कमी करून अस्ताचली निघत होता...
आकाशी काळ्या पांढऱ्या ढगांची दाटी झाली होती...
चुकार किरणे ढगाआडून समुद्र लाटांशी खेळत होती...
समुद्रलाटा सोनसळी होऊन लहरत होत्या... घराकडे उडणारे पक्षी उडता उडता त्यांच्या खेळाची मज्जा घेत होते...
मंद मंद वारे काळ्या पांढऱ्या ढगांशी खेळण्यात रमले होते...
आपल्या सोबत त्यांना पळायला लावत होते... पळताना त्यांच्या बदलणाऱ्या आकाराची नक्षी माझे चित्त सुखवित होती... 
काळ्या ढगांची  समुद्राशी असलेली सलगी शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे...
या विचारात मन रममाण झाले...
शाळेत शिकविलेल्या जलचक्राची महती पुन्हा अधोरेखित झाली...
ढग आणि समुद्राच्या पाण्याला असे नक्कीच वाटत असेल की काही काळापूर्वी आपण एकमेकांच्या जागी होतो...
आणि आतासारखे तेव्हाही परस्परांना न्याहाळत होतो...
या सूर्याच्या उष्णतेने समुद्र पाण्याची वाफ होऊन ढग झालो आणि पावसाच्या रूपाने पुन्हा समुद्राचे पाणी!!!
ह्या सूर्यशिवाय हे काही शक्य नसते झाले...
ह्या विचाराने आपल्या जीवनातील "मित्राचे" महत्त्व मनोमन पटले...
आणि म्हणूनच सूर्याला मित्र हे नामाभिधान  का पडले असावे ह्याचा उलगडा ही झाला...
     
अंधार पडू लागताच मानवी आविष्काराचे  डोळ्यांना सुखावणारे विलोभनीय दृश्य दिसू लागले...
समुद्राला वेढलेल्या गोलाकार रस्त्यावरील विजेचे दिवे पाहून ती रत्नजडीत हारातील दैदिप्यमान रत्नेच भासली...
एव्हढा मौल्यवान हार राणीच्या गळ्या व्यतिरिक्त आणखी कोठे बरं असू शकेल!! 
ही मुंबई  महानगरी भारताची राणी...
आणि  ह्या विजेच्या दिव्यांची रोषणाई म्हणजे तिच्या गळ्यातला हा अमोलिक रत्नहार !!!

 सर्व मित्रांच्या आठवणीमध्ये...
 तसेच मुंबई महानगरीचा सुज्ञ नागरिक असण्याचा रास्त अभिमान बाळगत  परतीचा प्रवास सुरु झाला....

सतीश जाधव

Monday, June 22, 2020

धुवाधार राईड, रविवार २१ जून २०२०

धुवाधार  राईड

रविवार २१ जून, २०२०

आज राईड ठरली ठाण्याला जायची, परंतु ज्यांना ज्यांना सांगितले ते सर्व काही तरी अडचणी सांगून आउट झाले. पण मनाने ठरविले होते, आज जायचेच राईडला. 

सकाळी 5.50 वाजता सुरू झाली सायकलिंग. आज वातावरण खूपच शांत-निवांत होते. एकतर रविवार त्यात सूर्य ग्रहण याचा परिणाम असावा. खरं तर निसर्गप्रेमींसाठी ग्रहण म्हणजे पर्वणी असते. परंतु आज वातावरण इतके ढगाळ होते की नक्की ग्रहण दिसेल काय याची शंका होती.

रात्री पडलेल्या पावसाच्या पाऊलखुणा अजून रस्त्यावर जाणवत होत्या. विक्रोळी फ्लाय ओव्हरवर पोहोचलो. ढगांचे आच्छादन भेदून रवीराजा नभांगणात  सप्तअश्वांच्या रथातून चौफेर स्वारी करत होता. प्रकाश किरणांचे आसूड गलेलठ्ठ ढगांवर ओढत होता. आज त्याचा मित्र चांदोबा त्याला भेटायला येणार होत. त्या भेटीत ढगांचा  अनाहूत अडसर सूर्याला अनावर झाला होता.
या चंद्र-सूर्य भेटीची पूर्वकल्पना सर्व पक्षी समुदायाला झाली होती, त्यामुळे सकाळीच झाडाझाडावर  नेहमीपेक्षा जास्त किलबिलाट जाणवत होता.

निसर्गातील काही विशिष्ट घटना पक्षी, प्राणी यांना आधीच समजतात. आज  कुत्रेसुद्धा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. परंतु सायकलच्या मागे न लागता, एकमेकांत लपंडाव खेळत होते. "मित्राच्या" भेटीला चंद्र अमावस्येची काळी चादर लपेटून येणार होता. त्याचा आनंद साजरा करत असावेत ही श्वान मंडळी.

मुलुंड ब्रिज जवळ आलो आणि आदित्यचा फोन आला, त्याच्या बरोबर प्रशांत आणि चिराग होते. माझ्या भेटीसाठी कॅडबरी जंक्शन जवळ थांबणार होते. 

स्पीड वाढवला आणि सव्वासात वाजता कॅडबरी जंक्शनला पोहोचलो. येथे मयुरेश आणि हिरेनची सुद्धा भेट झाली. एका मोबाईल होर्डिंग वर आम्ही जल्लोषात फोटो काढले. आदित्यने तर सायकलच गाडीवर चढवली होती.
तेथून उपवनला आलो. प्रशांतची भेट चार महिन्यानंतर झाली होती. त्याच्या सायकलचे बारीकसे काम हिरेनने केले. आदित्यने लज्जतदार काढा पाजला. येथून चिराग आणि प्रशांतसह बाळकुंम पाईप लाईनकडे प्रस्थान केले. खारगाव टोल नाका ओलांडून पाईप लाईन मध्ये प्रवेश केला.

दोन्ही बाजूला प्रचंड मोठे पाण्याचे पाईप आणि त्यातील निर्जन रस्त्यावरून आमची राईड सुरू झाली. रहदारी पासून अलिप्त अशी ही राईड करताना आम्ही पावसाची आराधना करीत होतो. खुप दिवसांनी प्रशांतने सायकलिंग सुरू केली होती. दुखऱ्या हाताला ग्रीप बांधली होती. त्यामुळे मॉडरेट सायकलिंग सुरू होते. चिरागने केस वाढविल्यामुळे त्याचा लुक एकदम बदलला होता. डोक्याला तो हेअरबँड लावून आला होता. 
हा पाईप लाईनचा रस्ता सायकलिस्टसाठी बनवला आहे असेच वाटत होते. आम्ही तिघे जणच या रस्त्यावर होतो. लांबून गाड्यांचा आवाज येत होता. या पाईप लाईनच्या डाव्या बाजूला मोठमोठी गोडाऊन आहेत. परंतु तेथे सुद्धा रहदारी कमी होती. ठाण्यावरून जवळपास वीस किमी राईड झाली होती. अंजुर फाट्याला हायड्रेशन ब्रेक घेतला. येथूनच मागे फिरायचे ठरले. 

पुन्हा सायकलिंग सुरू केले आणि धुवाधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा मारा एव्हढा जोराचा होता की सर्व मोटार सायकलस्वार गुडूप झाले. कशेळी पुलावर पावसाचा जोर आणखी वाढला. खाली ठाण्याची खाडी, त्याच्या पाण्यात  पडणारे पावसाचे थेंब उसळून पुन्हा वर उडत होते. या पुलावर थांबून पावसाचा लपंडाव पाहत होतो. फोटो काढून पुढे निघालो. 
खारगाव ओलांडल्यावर पाऊस थांबला, पण झाडांच्या खालून जाताना हवेने पानांवरून अंगावर येणारे पाण्याचे थेंब पावसाचा फील देत होते. पावसाचा मारा आणि वाऱ्यांचा पाऊस असे दुहेरी निसर्ग दर्शन झाले. निसर्गाचे अतिशय वेगळे रूप आज पाहिले.

चिराग आणि प्रशांतला ठाण्याला सी ऑफ केले.  विक्रोळी येथील गोदरेज गार्डन समोर हायड्रेशन ब्रेक घेतला. फुटपाथवर बसून समोरील हिरवळ न्याहाळत होतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवत होतो. 
दहा वाजता ग्रहण सुरू झाले, तेव्हा ठाणे सोडले होते. वातावरण ढगाळ असल्यामुळे सुर्यग्रहणाचा मागमूस लागला नाही. रस्त्यावरील गाड्यांची वाहतूक रोडावल्याचे जाणवले.

साडे अकराच्या दरम्यान ग्राहणाचा मध्य होता. याच वेळेस दादरला पोहोचलो होतो. संपूर्ण दादरमध्ये शुकशुकाट होता. सर्व दुकानेसुद्धा बंद होती. या पूर्वी बऱ्याचदा खग्रास सूर्यग्रहण सुद्धा अनुभवले आहे. पण एव्हढा निर्मनुष्य रस्ता पहिला नव्हता. आजचे मुंबईतून दिसणारे सूर्यग्रहण तर खंडाग्रास होते. म्हणजेच संपूर्ण सूर्य झाकला जाणार नव्हता. तरी सुद्धा हा सन्नाटा का बरे झाला असावा?

सूर्यग्रहणाला सुद्धा करोना झाला असावा अशी शंका आली.

दुपारी बारा वाजता घरी पोहोचलो. आज 96 किमी राईड झाली होती.

अतुल आज संध्याकाळी चार वाजता गोरेगाववरून निघून, मित्रांसोबत सायकलिंग करत NCPA ला येणार होता. त्याने मित्रांना भेटण्याचे आमंत्रण दिले. तसेच गोरेगाव वरून निघाल्यावर मला व्हाट्स अँप लाईव्ह लोकेशन शेअर केले. 

तासाभरातच सर्वांची वरळी नाक्यावर भेट झाली. परंतू अतुलचे सायकल डिरेलर बिघडल्याने तो परत मागे गेला होता.
अपूर्व, मयांक, डिलोंन आणि सौगात यांच्या बरोबर राईड सुरू झाली. मयांक कडे MTB होती, बाकी तिघांकडे रोडिओ सायकल होत्या. जसलोक लूप चढल्यावर सर्व गोरेगावकर सायकलिस्ट पाणी प्यायला थांबले. आता मी आघाडी घेतली आणि डायरेक्ट NCPA गाठले. थोड्याच वेळात सर्वजण NCPA ला पोहोचले. अपूर्वने सर्वांची ओळख करून दिली. आज त्यांची प्रथम भेट सेलिब्रेट करण्यासाठी सर्वांना मावा केक घेऊन गेलो होतो. 
संध्याकाळचे सहा वाजले होते सूर्य अस्ताला चालला होता.  चौपाटीच्या कठड्यावर कोणालाही बसण्याची परवानगी नव्हती.  त्यामुळे एक कॉर्नर पकडून आम्ही उभे होतो. आज गर्दी होती पण प्रत्येकजण मास्क लावूनच वावरत होता.
अशी ही सायंकाळची सुशांत वेळ....
शीतल वाऱ्याची झुळुक ...
थंड मृदू मुलायम झुळूक  पावलांना हवीहवीशी वाटत होती...
समोर अथांग पसरलेल्या समुद्राच्या  लाटांची गाज दुरून सुद्धा कानाला सुखावत होती... 
त्या लाटांचे फेसाळत किनाऱ्याकडे झेपावणे डोळे भरून पाहात होतो...
त्या लाटा किनाऱ्याजवळ आल्यावर किनाऱ्याला हळुवार बिलगणे... 
मग लाजेने चूर होऊन किनाऱ्यापासून हळूहळू दूर जाणे...
त्या लाटेकडे  तृप्त किनारा  प्रेमभऱ्या नजरेने बघत समाधानी झाला होता...
त्याला माहित होते  ती येणारच आहे...
तीच प्रेमाची ओंजळ घेऊन पुन्हा रिती करायला त्याच्यापाशी....
 अथांग निळाई ल्यालेले आकाश...
 अनिमिष नेत्रांनी सागर किनारा न्याहाळत होते... समुद्रालाही  निळ्या आकाशाकडे पाहून प्रेमाचे भरते येत होते...
उचंबळणाऱ्या  लाटा चुगलखोरपणा करत होत्या... 
निळ्या आकाशाच्या अनिवार ओढीने समुद्राचे पाणी ही निळे निळे झाले होते....
काही ठिकाणी आकाश निरभ्र तर काही ठिकाणी पांढुरक्या अभ्रांचे पुंजके मंद वाऱ्यावर हलकेच तरंगत होते....
गगन राजांनी नुकताच आपला दरबार बरखास्त केला होता...
 त्याच्या दिव्य दैदिप्यमान अस्तित्वाच्या खुणा अजूनही आकाशात रेंगाळत होत्या...
मिलनोत्सुक नव युवतीच्या आरक्त गालाप्रमाणे आकाशी लालिमा पसरला होता....
सागराच्या निळ्या  पाण्याने तो लालीमा प्राशन केला होता...
आणि आनंदाने निळसर लाटा लहरत होत्या... 
अतिशय नयनमनोहर दृश्य दिसत होते... 
पक्ष्यांची किलबिल वाढली होती....
उबदार घरट्याची ओढ लागली होती...
घरट्यात वाट पाहणाऱ्या चिमण्या चोची... 
पंखाना बळ देत होत्या...
 हलके हलके अंधाराचे साम्राज्य वाढत होते...
 वारे ही लगबगीने इकडून तिकडे वाहात होते... वाहताना झाडांच्या फांद्या, एकमेकांशी हितगुज करत होत्या...
ह्या गुजगोष्टींमुळे आनंदाने डोलणारे वृक्ष...
त्यांचा आनंद..
त्यांच्या फुलांचा सुगंध... 
वातावरणात मिसळत होता..
त्यामुळे सारा आसमंत सुगंधित झाला होता....
 सोन्याच्या रथात विराजमान होऊन भास्कराची स्वारी क्षितिजाकडे प्रस्थान करत होती...
सोबत पांढऱ्या सावळ्या ढगांचा लवाजमा  सजून धजून तयार होता... 
त्याला निरोप देण्यासाठी.…

 निसर्गाचे हे विराट रूप डोळ्यात मावेनासे झाले...
म्हणून क्षणभर डोळे बंद करून मनचक्षुने त्या अथांगाचे दर्शन घेतले...
चौघांना वरळी नाक्यावर सी ऑफ केले आणि घराकडे निघालो ते भारावलेल्या मनाने...

संध्याकाळी 22 किमी राईड झाली होती.

आजच्या दोन्ही राईड जुन्या आणि नव्या मित्रांच्या संगतीने  धुवाधार झाल्या होत्या... 

त्या आदित्यचा उदय...
ग्रहण... 
आणि अस्त.. 
यांचा साक्षीदार होतो...

सतीश जाधव


Thursday, June 18, 2020

गाठी भेटी राईड

गाठी भेटी राईड
18.06.2020

सकाळी 5.50 वाजता राईड सुरू केली. आज ठाणे येथील उपवन पर्यंत सायकलिंग करायची होती. चाळीस मिनिटात कुर्ला हायवेला पोहोचलो. येथील फ्लायओव्हरच्या कठड्यावर कावळ्यांची सभा भरली होती. आज भरपूर पाऊस पडणार आहे. सर्वांनी पंखांची काळजी घ्या... असाच काहीसा विषय असावा.

थोडा पुढे आलो आणि एकदम विस्मयचकित झालो... एका स्कोडा गाडीवर गुलमोहर फुलांचा सडा पडला होता. जसे की, गाडी लग्नासाठीच सजविलेली होती. वातावरण अतिशय छान आणि ढगाळ होते. धुंद कुंद, आल्हाददायक रस्यावरून राईड सुरू होती. कधीही पाऊस पडेल अशी चिन्ह होते. खंड्या पक्षाचा "चिकू.. चिकू.. चिकू.. आवाज पावसाला साद घालत होता. रस्त्यावरची झाडे पिवळ्या, लाल फुलांनी बहरली होती. "भीगा भीगा नशीला दिन है.. आवो चलो कही छुप जाये" या गाण्याची धून कानावर पडत होती. 
विक्रोळी फ्लायओव्हर ब्रिजवर आलो. समोरच्या काळ्या भुऱ्या ढगाच्या मिठीतून सुटून सूर्यदेव आपली प्रभा, धरणीवर पाठवायचा प्रयत्न करत होते. 
नभांगणाचा अनभिषिक्त सम्राट, त्या गलेलठ्ठ ढगांपुढे हतबल झाला होता. त्यामुळे रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश सुद्धा प्रखर वाटत होता. ते ढग बरसण्यासाठी तयार होते, पण वरुण राजाची आज्ञा अजून झाली नव्हती.
सव्वा सात वाजता मुलुंड टोल नाक्याकडे पोहोचलो.  एव्हढ्यात हिरेनचा फोन आला. पंधरा मिनिटात उपवनला पोहोचतो आहे, त्याला सांगितले. 
कॅडबरी नाक्यावर वळल्यावर येऊर पायथ्यापर्यंत चढ लागतो. अतिशय दमदार पेडलिंग करत येऊर पायथा चढलो. तेथून भन्नाट उतार उतरत तडक उपवन गाठले. 

आज बरेच समर्पयामि सभासद उपस्थित होते. कुलथे दादा आणि किशोरीची भेट झाली. 
 विशेष म्हणजे आदित्य कारखानीस आणि स्नेहाची उपस्थिती होती. मीडियाचे एक फोटोग्राफर सुद्धा आले होते. सध्याच्या सोशल डिस्टनसिंग कार्यक्रमामुळे बऱ्याच व्यक्ती सायकल घेण्यास इच्छुक होत्या, यासाठीच आज सायकालिस्टच्या मुलाखती होत्या.

भारतातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता, सायकलिंगसाठी MTB सायकल कशी उपयुक्त आहे, या साठी मुलाखती होत्या.  बलवंतने हिंदीत, मयुरेशने मराठीत, आदित्यने इंग्रजीत, तर जिनेशने गुजरातीमध्ये मुलाखत दिली. मी मुंबई ते कन्याकुमारी राईडच्या अनुषंगाने  तर  स्नेहाने महिलांच्या सायकलिंग बाबत मुलाखत दिली. 
केळी, चहा बिस्कीट, तजेलदार काढा यांचा नास्ता झाला. हिरेनने माझी सायकल अप टू डेट केली होती. 

आदित्य (काका), मयुरेश आणि सुधीर शेट्टी बरोबर माझी परतीची राईड सुरू झाली. उपवन गेट जवळच जॉगिंग करणाऱ्या भूषण अहिरेची भेट झाली. अहिरे "सोनम वांगचुक" चा फॅन आहे, ज्याच्यावर थ्री ईडियट चित्रपट बनविला आहे.

त्यानंतर मयुरेश घराकडे सटकला. आदित्य आणि सुधीर मला  मौर्य डेअरी शॉप मध्ये घेऊन गेले. खास माझ्यासाठी कुल्फी आईस्क्रीमची फार्माईश झाली. आईस्क्रीम खाता खाता पनीर सुध्दा हातात आले. आजचे पनीर आणि आईस्क्रीम हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट होते. घरी न्यायला सुद्धा पनीरचे पाकीट मिळाले. आदित्यची उदारता आणि सुधीरचे औदार्य पाहायला मिळाले. 

दोघांची माझ्या बरोबर राईड सुरू झाली. तीन हात नाक्यावर नवीन पुलाचे काम चालू आहे. तेथील मातीच्या ढिगाऱ्यावर आदित्य पाठोपाठ मी सायकल चढवली. आता ठाण्यात ऑफ रोडिंग सायकलिंग सुरू झाले. खड्डे खुड्डे,  छोटे उंचवटे, दगड, पावसात ओलसर झालेली माती या वरून सायकलिंग करणे थ्रीलीग होते. नवनवीन रस्ते शोधण्याबाबत मानलं पाहिजे आदित्यला. 

तेथून दोघांनी मला मुलुंड ऐरोली पुलापर्यंत कंपनी दिली. मुंबई ते गोवा सायकलिंग  प्लॅनिंग आदित्य बरोबर करायचे ठरले. त्यांना टाटा केला.
मुलुंड पार केल्या वर मिठागर परिसरातील पानथळीवर बगळ्यांचे थवे उतरले होते. 

विक्रोळीला पोहोचल्यावर, देवनारला गीते साहेबांना भेट द्यायची आहे, हे आठवले. घाटकोपर वरून गोवंडीला सायकल वळवली. जोरदार पाऊस यायचे लक्षण दिसत होते, म्हणून पेडलिंगचा वेग वाढविला.

 महापालिका एम पूर्व विभागात काम करणारा माझा मित्र किरण लहाने, अनपेक्षितपणे समोर आला. माझ्या तोंडावर स्कार्फ असल्यामुळे खात्री करण्यासाठी त्याने सायकलच्या पुढे स्कुटर घातली, '"तुम्ही जाधव साहेब का"
 होय, मी म्हणालो.
  त्याच्या पण चेहऱ्यावर मास्क होता त्यामुळे मी पण पटकन त्याला ओळखले नव्हते. पण हसऱ्या डोळ्यावरून किरणला ओळखले. खूप आनंद झाला त्याला भेटून.

किरणला घेऊन गीते साहेबांच्या घरी गेलो. किरण लहाने, गीते साहेबांच्या गाववाला निघाला. थोड्या वेळाने कार्यालयीन कामासाठी तो बाहेर पडला. आता धुवादार पाऊस सुरू झाला होता.

गीतेंनी माझ्या आवडती डिश बनविली होती, गव्हाच्या चिकाची पेज. गरमागरम पेज प्याल्या नंतर फक्कड चहा आला. चहाचे घोट घेताना पावसाच्या सरींकडे लक्ष होते.

 धुवादार पाऊस पडत होता. बाहेरच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरी,  वरातीच्या ताशा सारखा तडतड आवाज करीत होत्या. चहा पिता पिता त्या वरातीत सामील झालो होतो. बराच वेळ गीतेंशी गप्पा मारल्या. 

पाऊस थांबल्यावर सायकल निघाली घराच्या वाटेवर. पाऊस येणार ही आशंका असल्यामुळे, चष्मा काढून ठेवला, तसेच फ्लूरोसंट हिरवे विंडचिटर घातले. देवनार पार करून घाटकोपरमध्ये प्रवेश करताच आभाळ फाटले आणि पावसाचा जबरदस्त वर्षाव होवू लागला.

 जोरदार पावसामुळे सर्व मोटार सायकलवाले रेनकोट असून सुद्धा रस्त्याच्या कडेला थांबले होते. पावसाच्या जोरदार सरींमुळे त्यांच्या हेल्मेटवर फॉग जमा होऊन त्यांची व्हीजिबलिटी नाहीशी झाली होती. म्हणून मोटारसायकल स्वार स्तब्ध झाले होते.

पण माझी सायकल, वाऱ्यासह कोसळणारा पाऊस, रस्त्यावर तुंबलेले पाणी या कशालाही न जुमानता पळत होती.  जलधारांनी चिंब भिजलो होतो. वारा मागे ढकलत होता. पण मनाने ठरवले होते, आता न थांबता, पावसाची साथसंगत करत घर गाठायचे. सतत अर्धातास बेधुंद पावसात राईड करत होतो. मुंबई ते कन्याकुमारी सफरीत अशीच पावसाळी राईड केली होती. अंगावर पाऊस घेऊन सायकल चालविणे म्हणजे थेट पावसाशी दंगामस्ती करणे होते.

सोसायटीत प्रवेश केला तो चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद लुटूनच!!!

आज 75 किमी राईड झाली होती.

आज मित्रांच्या गाठीभेटीसह पावसाची सुद्धा गाठ पडली होती, निसर्गाचे नवे रूप दाखविण्यासाठी.

सतीश जाधव

Wednesday, June 17, 2020

निसर्गाकडून निसर्गाकडे सायकल राईड

निसर्गाकडून निसर्गाकडे सायकल राईड

16.06.2020

 सकाळी पावणे सहा वाजता राईडला सुरुवात केली.  आज पहाटेच पाऊस पडून गेला होता. रस्ता अर्धा ओला अर्धा सुका होता. ठिकठिकाणी फुलांच्या रांगोळ्या पसरल्या होत्या.  वातावरणात गारवा होता. "दूरच्या रानात, केळीच्या बनात" गाणे सायकलच्या पेडल बरोबर साथ देत होते. पक्षांचा किलबिलाट गाण्याची साथसंगत करत होता.

आज एक गम्मत झालीय, कुत्र्यांना सुद्धा मी परिचित झालोय, त्यामुळे त्यांनी भुंकत सायकल मागे पाळायचे सोडून दिलंय. हिंदमाता जवळ कावळ्यांची मस्त मेजवानी चालती होती. सकाळ सकाळीच ताव मारत होते मेलेल्या उंदरावर. 

रहदारी कमी असल्यामुळे राईड मस्त मजेत चालू होती. आज कोणत्याही पुलावरुन राईड करायचे टाळले. त्याचे मुख्य कारण, पडून गेलेल्या पावसात पुलावरच्या पाण्याच्या आउटलेट मध्ये पावसाचे पाणी तुंबून राहते, त्यामुळे पुलावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही.

चित्रा सिनेमागृहाच्या होर्डिंगवर एकही चित्र दिसत नव्हते. वाऱ्यामधल्या मातीमध्ये दरवळणारे हेच का माझे शहर आहे, हा संभ्रम मला पडला. पहाटे पासून पळणारे माझे मुंबई शहर, स्तब्ध झाले होते. उभ्या आयुष्यात एवढी स्तब्धता, शांतपणा कधीही अनुभवला नव्हता. मला खात्री आहे पुन्हा ती उभारी, तो जनमाणसांचा दरवळ लवकर सर्व संकटावर मात करून मुंबईला प्राप्त होणार आहे.

फाईव्ह गार्डनच्या सिग्नलचे, लाला, हिरवा, पिवळा सर्व सिग्नल एकाच वेळी चालू होते. नक्की काय सांगायचे होते या सिग्नलला, सगळे रंग एकाच वेळेला दाखवून?

सायन हॉस्पिटल पुढे आलो आणि मनात गाणे तरळले, खास मुंबईसाठी ....

 "धड़कनों में तू .....
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू ...

हळव्या दवात भिजली पहाट तू....

हळूवार सांज की चांदरात तू ....

शब्दाविना बोलणारा .....

स्पर्शातूनि सांगणारा .....

मुका गोड अनुराग तू ....

आता कुर्ल्याला पोहोचलो आणि तेथील "ही गुलाबी हवा..... वेड लावी जिवा..." या भाव अवस्थेत रममाण झालो.

गोदरेज गार्डनकडे पोहोचलो, रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती.  हिरवी गर्द झाडे त्याच्यावरून खाली येणाऱ्या वेली, त्या वेलीवरून ठिबकणारे पावसाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. 


"मै जिंदगीका साथ निभाता चला गया" या गाण्याची साथ, ओलसर रस्त्यावर गाड्यांच्या चाकाचे होणारे आवाज हे अतिशय सुमधुर संगीत या निसर्गात बहरलेले आणि भरलेले होते.  सगळीकडे हिरवेगार वातावरण, ढगांनी आच्छादलेले आकाश, अतिशय अप्रतिम निसर्ग सौंदर्य मी डोळ्यात साठवत होतो.
ठाण्याच्या तीन हात नाक्यावर सायकलपटू प्रियांका भेटली. रोडिओ सायकल घेऊन तिने संथ सुरुवात केली होती. तिला बाय करून पुढे निघालो.

उपवनच्या मुख्य गेट जवळ आलो. येथे पूजा,कौस्थुभ, आदित्य, बलजीत, बलवंत, मयुरेश, कुलथे दादा, शेट्टी, अतुल, राजेश, अरुणा यांची भेट झाली. वातावरण अतिशय मस्त होते. येऊरच्या डोंगरावर धुकं पसरलं होतं.
बलवंतने चहा बिस्कीट, आदित्य काकाने अमृततूल्य काढा, कुलथे दादांनी खजूर आणले होते. आज खूप दिवसांनी सर्वांची  भेट झाली होती. आदित्य काकाने (YBC शंभर टक्के) वॉटर प्रूफ बॅग आणली होती. खास पावसाळ्यात वापरात आणण्यासाठी उपयुक्त बॅग होती.

येथून आम्ही ब्रिजेशाला भेटायला गेलो. तेथून आदित्य काका आम्हाला वसंत विहार येथील गौरव स्वीट मध्ये घेऊन आला.  येथे समोसा, कचोरी, पट्टी समोसा आणि रसमलाई  आदित्यने आग्रहाने खाऊ घातली. 

अतुल म्हणाला, ' मी घोडबंदर वरून जाणार आहे. मी त्याला होकार दिला. सर्वांना सी ऑफ करून अतुलच्या नेतृत्वाखाली घोडबंदरकडे राईड सुरू झाली.
आज पुन्हा गायमुख येथे थांबलो, खाडीच्या पाण्यात उतरलो. एका बाजूला मोठी होडी उभी होती, तेथे खुपशे आझाद कावळे फिरत होते. 
येथेच दशक्रिया विधिसाठी घाट बांधण्यात आला आहे. येथील खाडीच्या  किनाऱ्याला बांधलेल्या चौपाटीला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे.
 तेथून पुढे चायना क्रीक जवळ आलो. अतुल जुन्या चायना ब्रिजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी शूटिंग होते, असे अतुल म्हणाला. आज अतुल आणि मी स्टार होतो निसर्गाचे. 
फोटो काढून पुढे निघालो. पुढे "रिव्हर विव्ह हॉटेल" जवळ पाणी प्यायला थांबलो. हॉटेल मधील माठातील थंड पाणी बाटलीत भरून घेतले. सुंदर हिरवळीवर फोटो काढले. हॉटेलचे लॅन्डस्केप अतिशय सुंदर होते.  हात सॅनिटाईज करून पुढची राईड सुरू झाली
 घोडबंदर नाक्यावरच्या फाउंटन हॉटेल कडून मुंबईकडे वळलो. मीरा भायंदर पुलाकडे वळसा घेऊन मॅक्सअस मॉलकडे निघालो. नाक्यापासून सात किमी आत भायंदर गावात अतुलच्या मुलीच्या घरी पोहोचलो. अतुलचे व्याही घरी यायचा आग्रह करत होते, पण घरात जाणे टाळले. लिंबू सरबत पिऊन परतीचा प्रवास सुरू झाला.
 दुपारचे साडेबारा वाजले होते. येथून 45 किमी राईड करायची होती. ऊन चढले होते त्यामूळे राईड हळू झाली. गोरेगावला आल्यावर रत्ना हॉटेल जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला. अतुलला येथेच रामराम करून पुढची सोलो साइड सुरू झाली. उन्हे वाढल्यामुळे सतत पाणी प्यावे लागत होते. खारच्या संत निरांकरी ब्यास आश्रमा समोर सायकल पार्क केली आणि चक्क पंधरा मिनिटे फूटपाथवर बसकण मारली. पाय बोलू लागले होते. सोबतची बिस्किटे पाण्याबरोबर खाल्ली. तरतरी आल्यावर शेवटची घरापर्यंतची राईड झोकात झाली.
आज अतुलमुळे घोडबंदर वरील दोन निसर्गरम्य ठिकाणे जवळून पाहता आली. तसेच 110 किमी राईड करता आली. 

गम्मत आहे... अतुलची ओळख जेमतेम वर्षभराची असेल... सायकलिंगच्या समान धाग्याने तो आझाद पंछी बरोबर जोडला गेला आहे. आज तो आझाद पंछीचा स्टार रायडर आहे.

आजची निसर्गाकडून निसर्गाकडे जाणारी राईड बहारदार झाली होती.

सतीश जाधव

Saturday, June 13, 2020

सेंच्युरी राईड १३, जून २०२०

सेंच्युरी राईड
१३, जून २०२०

सकाळी ४.५० ला घर सोडले. बिल्डिंगच्या बाहेर दूधवाला बसला होता. त्याच्या रेडिओवर " जिंदगी भर नही  भुलेंगे वो बरसात की रात" हे गाणे लागले होते.  रस्ते ओलसर होते पण पहाटे  पाऊस पडून गेला होता. परेलचा पूल उतरलो तर समोरच्या रस्त्यावर पिवळ्या फुलांचा सडा पडला होता. 

सायन पुलावर पोहोचलो, सकाळची रहदारी कमी होती. गम्मत म्हणजे माझ्या स्पीकरवर "सुखके सब साथी, दुख मे ना कोई" हे गाणे लागले होते. परंतु माझ्या राईडमध्ये तर सर्वांचीच साथ होती. मुख्य म्हणजे निसर्ग माझा जोडीदार होता.

साडेपाच वाजता घाटकोपर पार केले आणि कोकीळ स्वर कानावर पडले. हवेतील मंद गारवा हवाहवासा वाटत होता. गोदरेज गार्डन जवळ पोहोचलो. समोर दिसणाऱ्या झाडांनी धुक्याची चादर ओढली होती, उंच सुरुची झाडे हटयोगी साधू सारखी उभी राहून वाऱ्याच्या झोतावर डुलत डुलत मंत्रजाप करीत आहेत असा भास झाला. रस्त्यावरचे डेरेदार वृक्ष ध्यानस्थ बसलेल्या ऋषी सारखे दिसत होते.

सव्वा सहा वाजता तीन हात नाक्यावर पोहोचलो सकाळीच बाहेर पडताना गृपवर लाईव्ह लोकेशन टाकले होते. तसेच माझी राईड गायमुख पर्यंत आहे याची सुद्धा कल्पना दिली होती.  तीन हात नाक्यावर थांबल्यावर गृपवर मेसेज तपासले. कोणाचाही रिस्पॉन्स आला नव्हता. तेव्हढ्यात किशोरीचा मेसेज आला.  "सर, मी राईडला जॉईन होतेय".
पुढील कॅडबरी जंक्शनवर किशोरीची भेट झाली. घोडबंदर नाक्यावर वळसा मारून गायमुखकडे राईड सुरू झाली.
अर्ध्या तासातच गायमुख जवळ पोहोचलो. किशोरीला आणखी राईड करायची होती. फाउंटन हॉटेल पर्यंत जाऊया ह्या तिचा प्रस्तावाप्रमाणे चेना घाट चढणे सुरू झाले. ठाण्याच्या बाजूने या घाटाची चढाई जास्त आहे. 2-5 गियर लावून एका दमात घाट चढून गेलो. पुढील चेना क्रीक जवळ थांबलो. समोर नॅशनल पार्कचा रम्य परिसर दिसत होता.

 समोरील जुना ब्रिज त्याच्या खालून वाहणारे खाडीचे पाणी आणि त्याच्या पलीकडे गर्द वनराई मन मोहून टाकत होती. या खाडीत दोन महिला मासे पकडत होत्या. समोरील जुन्या पुलावर बऱ्याच सिनेमाचे शूटिंग झाले आहे, किशोरी म्हणाली.
या रस्त्याने बऱ्याच वेळा गेलो पण आज दिसणारी हिरवीगर्द वनराई अतिशय जिवंत वाटली. फोटोग्राफी करून दहा मिनिटातच फाउंटन हॉटेल जवळ पोहोचलो. 
सव्वा सात वाजले होते. अडीच तासात  51 किमी राईड झाली होती. दहा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. 

आता परतीची सफर सुरू झाली. पुन्हा गायमुख गावाच्या हायवेला असलेल्या बगीच्या जवळ थांबलो. 
शांत असलेली ठाण्याची खाडी आणि तिच्या समोरच्या किनाऱ्याला  दिसणारा हिरवागार डोंगर तसेच त्या डोंगरामागे असलेले डोंगर ढगांच्या नीळाईत विरळ झाले होते. निसर्गाची एक खासियत आहे. प्रत्येक ठिकाणी तो वेगळा भासतो. तसेच निसर्गाच्या नवनवीन छटांची जाणीव होते. पण त्यासाठी निसर्गात एकरूप व्हावे लागते.

पुढे ओवळे गावाजवळ आलो. "कोरल" ची गावरान भाजी ( ही फक्त पावसात मिळते), तसेच चोखायचे  बिटकुळे आंबे, तोतापुरी कैऱ्या आणि अळूची भाजी खरेदी केली. सायकल सफरीसह घराची कामे सुद्धा सहज होऊन जातात. 

परतीची राईड सुद्धा अडीच तासात पूर्ण करायची होती. त्यामुळे घोडबंदर ठाणे हायवेवर लागणाऱ्या ब्रिजवरुन राईड केली. अर्ध्या तासात कॅडबरी जंक्शनला पोहोचलो. किशोरीची खूप दिवसांनी 40 किमीची मोठी राईड झाली होती.  तीला  सीऑफ केले. तसेच नियमित राईड करावी, हे पण सांगितले. 

ठाण्यातून आता जोमदारपणे मुंबईकडे राईड सुरू केली. मधे दोन ठिकाणी पाणी प्यायला थांबलो. हायड्रेशन ब्रेक पकडून साडेपाच तासात आजची 102 किमी राईड पूर्ण झाली होती. गेल्या तीन दिवसात माझ्या बऱ्याच मित्रांनी सेंच्युऱ्या मारल्या होत्या. त्यांचा आदर्श माझ्या पुढे होता. 
आजच्या राईडचे एक स्लोगन होते, 

*जे येतील त्यांच्या सह आणि नाही येणार त्यांच्या शिवाय सफरीचा आनंद घेणे*

सतीश जाधव