Sunday, August 31, 2025

छत्रपती शिवाजी महाराज चातुर्य गरुडझेप सायकल राईड... १७ ते २७ ऑगस्ट २०२५...

छत्रपती शिवाजी महाराज चातुर्य गरुडझेप सायकल राईड... १७ ते २७ ऑगस्ट २०२५...

जय भवानी जय शिवाजी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा जयघोष करण्यासाठी... शिवचातुर्य दिन १७ ऑगस्ट २०२५ रोजी गरुडझेप सायकल आणि मशाल घेऊन धावण्याच्या मोहीमेची तेजोमयी सुरुवात झाली... ती आग्र्याच्या लाल किल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या पासून...

या तेजोमय मोहिमेचा शुभारंभ झाला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते... आणि आश्वासन मिळाले... आग्र्यात छत्रपतींचे भव्य स्मारक बनविण्याचे...

 ही सायकल मोहीम... ११ दिवसांच्या अखंड आणि प्रचंड प्रयासाने... २७ ऑगस्ट रोजी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवरायांची  विजयी भगवी पताका फडकवून पूर्णत्वाला गेली...

 १३१० किमीची  ही सायकलिंग मोहीम सहनशक्तीचा परिपाक होता... प्रखर ऊन, मुसळधार पाऊस, ऑफ रोडिंग रस्ते, घाटांचे आव्हान आणि विरुद्ध वाऱ्याचा प्रहार... या प्रत्येकाशी छत्रपतींच्या मावळ्यांनी सिंहाच्या ताकदीने सामना केला....

तरुणांना लाजविणाऱ्या ५६ यंग सिनियर्स सायकलपटूंनी दररोज १२५–१४० किमी सायकल चालवत, छत्रपतींच्या जयघोषात स्वराज्याकडे नेणारा हा हिंदूधर्म रक्षणाचा खडतर मार्ग पार केला... यात नऊ लढवय्या महिला सामील होत्या...

आग्रा... ग्वालियर... शिवपुरी... गुना... पाचोर... देवास... ठिकरी... नरडाना... चांदवड... संगमनेर... भोसरी… आणि अखेरीस स्वराज्याचा इतिहास घडविणाऱ्या  राजगडावर या मोहिमेची सांगता झाली... 

प्रत्येक शहरात सायकल मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता... स्थानिक सायकलिस्ट हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करत होते आणि पुढील वर्षी मोहिमेत सामील होण्याचे आश्वासन देऊन प्रेरणादायी सोबत देत होते.... 

गुना येथे भेटलेला सायकलिस्ट आशिष गलगले जानी दोस्त बनला... पुढच्या वर्षी या मोहिमेत तो सामील होणार आहे...

भोपाळचा हेमंत खरे फोन करून मार्ग दाखवत होता...  धामनोद येथे भेटलेला आणि आपुलकीने शिवज्योतीबाबत चौकशी करणारा अग्रवाल पुढच्या वर्षी मोहिमेला मदत करणार आहे... 


धुळ्याचा टुरिंग सायकलिस्ट अनिल जाधव लांबच्या प्रवासाचे अनुभव सांगून उत्साह वाढवत होता...
 

मालेगावचा मॅरेथॉन रनर संजय पवार पायांच्या ताकदीतून चिकाटीचे बळ देत होता... लासलगाव येथे भेटलेले जाधव मामा–भाचे प्रेमाने चौकशी करत होते आणि छत्रपतींची महती समजून घेत होते... त्यांनी फक्कड मसाला पान खाऊ घातले...


संगमनेरचा शिवप्रेमी नरेश माळवे शिवप्रेमाच्या संभाषणातून इतिहासाची जाज्वल्य प्रेरणा जागवत होता...


तर घोंडेवाडी येथे भेटलेला अजय शिसोदे याने दुपारच्या जेवणाची झकास ट्रीट दिली...


आणि भारतातून निर्यात होणारे A1 मनुके  अजयने खायला घातले...  पुण्याचा नगरसेवक रुपेश मोरे याने कात्रजवळ झकास कॉफी पाजून क्षुधा शांत केली...
  

या सर्वांची निरपेक्ष मदत, मनापासूनचे प्रोत्साहन आणि प्रेरणापूर्वक सदिच्छांमुळे सायकलिंगची ऊर्जा सतत वाढत होती... त्यामुळेच संपूर्ण मोहिमेचे अवघड टप्पे सहज पार पाडता आले....

संगमनेर येथील खांडेश्वर मंदिरातील सर्व व्यवस्था सायकलिस्ट मित्र कानवडे कुटुंबानी केली होती... तर घारगाव येथे परममित्र चंदन घुले आणि त्याची पत्नी वैशाली यांनी सकाळच्या न्याहारीची फर्मास व्यवस्था केली होती...

या मोहिमेचे शिल्पकार आणि प्रेरणास्थान... गरुडझेपचे संस्थापक व विश्वस्त  मारुती आबा गोळे यांच्या अथक प्रयत्नामुळे १७ ऑगस्ट या दिवसाला शिव चातुर्य दिन म्हणून सरकारने शिक्का मोर्तब केले आहे... छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास जनमानसांच्या दिलात रुजावा... म्हणून भारतीय पोस्ट विभागाने शिवचातुर्य स्मरण तिकीट प्रकाशित केले... राजगड किल्ल्यावर या तिकिटाचे लोकार्पण करण्याचा क्षण माझ्या जीवनातील अतीव आनंदाचा क्षण होता ...

तसेच सायकल मोहिमेचे शिल्पकार प्रकाश केदारी, शिरीष लोणकर, किरण पाटील आणि गणेश आगाशे त्यांच्या निर्धारपूर्वक आणि अप्रतिम  नियोजनाने ही सायकल मावळ्यांची तेजोमयी मोहीम पूर्णत्वाला गेली...

या हिंदवी स्वराज्याच्या मार्गावर माझ्यासोबत असलेले धैर्याचे सहशिलेदार  नवनीत वरळीकर, महेंद्र निकम, विठ्ठल चव्हाण आणि चंद्रशेखर जगताप... सर्वांनी एकदिलाने छत्रपतींची महती भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सांगितली... आणि ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली... त्यांच्या पुढील टुरिंग सायकलिंग कार्यक्रमासाठी ही मोहीम अतिशय उपयुक्त ठरणार आहे...


धर्मांध औरंगजेबाच्या ९९ दिवस नजरकैदेत  असताना... आग्र्याच्या मीनाबाजार कोठी येथून छत्रपतींनी चातुर्याने सुटका करून घेतली... तो इतिहास ज्या भूमीवर घडला, त्या पवित्र जागेला भेट देण्याचे भाग्य सुद्धा लाभले....

प्रत्येक भारतीयाने आग्र्याच्या ताजमहाला सोबत छत्रपतींचे होणारे भव्य स्मारक पाहावे, हिच श्रींची इच्छा आहे...

या मोहिमेच्या निमित्ताने खूप नवीन मित्र मिळाले तर जुने मित्र नव्याने उमगले...

मोहिमेत सामील असणाऱ्या नऊ रणरागिणी महिला या तर आमच्या प्रेरणास्रोत होत्या...

ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय चातुर्याची आठवण करून देणारा प्रेरणादायी प्रवास होता.. सायकलस्वार, मशाल घेऊन धावणारे मॅरेथॉन रनर, स्थानिक स्वयंसेवक आणि जन प्रतिनिधी... कलाकार... सर्वांनी मिळून शिवज्योती सोबत चालताना शौर्य, इतिहास, श्रद्धा आणि सायकलिंग याचा संगम घडविला होता...

आबांनी सहा वर्षांपूर्वी पेटवलेली गरुडझेपेची ज्योत... आज विराट ज्वाला होऊन प्रज्वलित होत आहे प्रत्येकाच्या मनात...

आग्रा आता छत्रपतींच्या नावाने ओळखला जावा... हिच लोकभावना आहे...

बस्स...  आता एकच ध्यास… भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमत राहावा… आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास सायकलिंगच्या मार्गाने प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावा...

🙏 जय जिजाऊ! जय शिवराय! 🚩

सतीश जाधव

7977690693


13 comments:

  1. खूप सुंदर वर्णन.. सतीश सर आपले खूप खूप अभिनंदन 👏👏

    ReplyDelete
  2. Very nice incourgement event for every cycle rider🙏

    ReplyDelete
  3. सतीश सर,तुमचे सायकलिंग अन् विचार मांडण्याची शैली एकदम सुरेख आहे आणि त्यामुळे माझ्यासारखे छोटे तुमचे फॅन होतात...कायमचे.👌👌🚴👍🚩🙏

    ReplyDelete
  4. खुप छान लिहिले आहे सतिश सर 👌🙏🙏

    ReplyDelete
  5. Nicely written, congratulations & all the best..🤝

    ReplyDelete
  6. Great event Satish Sir. Very much proud to be retired bmc staff.

    ReplyDelete
  7. सतीश सर, खुप छान वार्तांकन केले आहे..... अप्रतिम, सुंदर....🙏🙏🙏🚩💐🌹

    ReplyDelete
  8. खूप सुंदर प्रवासवर्णन लिहिले,लक्षात आणि मनात रहावे अशेच आहे सतीशदादा 👍👏👌

    ReplyDelete
  9. खूप सुंदर व प्रेरणादाई असे लिखाण आहे, 👌👌🙏🙏🚲

    ReplyDelete
  10. खूब सुंदर लेखन केले आहे सतीश सर आहे. है लेखन मोहिम संबंधी मूल्यवान दस्तावेज आहे.

    ReplyDelete
  11. आपल्या आग्रा ते राजगड किल्ला सायकल मोहिमेचे खूप सुंदर व सविस्तर वर्णन केले आहे सतीश जी अभिनंदन व धन्यवाद मित्रा

    ReplyDelete
  12. मित्रा मोहिमे चे अतिशय सुंदर वर्णन, खुप छान डिटेलिंग आणी नोंदी. संग्रही ठेवावा असा लेख.🙏

    ReplyDelete