Thursday, June 18, 2020

गाठी भेटी राईड

गाठी भेटी राईड
18.06.2020

सकाळी 5.50 वाजता राईड सुरू केली. आज ठाणे येथील उपवन पर्यंत सायकलिंग करायची होती. चाळीस मिनिटात कुर्ला हायवेला पोहोचलो. येथील फ्लायओव्हरच्या कठड्यावर कावळ्यांची सभा भरली होती. आज भरपूर पाऊस पडणार आहे. सर्वांनी पंखांची काळजी घ्या... असाच काहीसा विषय असावा.

थोडा पुढे आलो आणि एकदम विस्मयचकित झालो... एका स्कोडा गाडीवर गुलमोहर फुलांचा सडा पडला होता. जसे की, गाडी लग्नासाठीच सजविलेली होती. वातावरण अतिशय छान आणि ढगाळ होते. धुंद कुंद, आल्हाददायक रस्यावरून राईड सुरू होती. कधीही पाऊस पडेल अशी चिन्ह होते. खंड्या पक्षाचा "चिकू.. चिकू.. चिकू.. आवाज पावसाला साद घालत होता. रस्त्यावरची झाडे पिवळ्या, लाल फुलांनी बहरली होती. "भीगा भीगा नशीला दिन है.. आवो चलो कही छुप जाये" या गाण्याची धून कानावर पडत होती. 
विक्रोळी फ्लायओव्हर ब्रिजवर आलो. समोरच्या काळ्या भुऱ्या ढगाच्या मिठीतून सुटून सूर्यदेव आपली प्रभा, धरणीवर पाठवायचा प्रयत्न करत होते. 
नभांगणाचा अनभिषिक्त सम्राट, त्या गलेलठ्ठ ढगांपुढे हतबल झाला होता. त्यामुळे रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश सुद्धा प्रखर वाटत होता. ते ढग बरसण्यासाठी तयार होते, पण वरुण राजाची आज्ञा अजून झाली नव्हती.
सव्वा सात वाजता मुलुंड टोल नाक्याकडे पोहोचलो.  एव्हढ्यात हिरेनचा फोन आला. पंधरा मिनिटात उपवनला पोहोचतो आहे, त्याला सांगितले. 
कॅडबरी नाक्यावर वळल्यावर येऊर पायथ्यापर्यंत चढ लागतो. अतिशय दमदार पेडलिंग करत येऊर पायथा चढलो. तेथून भन्नाट उतार उतरत तडक उपवन गाठले. 

आज बरेच समर्पयामि सभासद उपस्थित होते. कुलथे दादा आणि किशोरीची भेट झाली. 
 विशेष म्हणजे आदित्य कारखानीस आणि स्नेहाची उपस्थिती होती. मीडियाचे एक फोटोग्राफर सुद्धा आले होते. सध्याच्या सोशल डिस्टनसिंग कार्यक्रमामुळे बऱ्याच व्यक्ती सायकल घेण्यास इच्छुक होत्या, यासाठीच आज सायकालिस्टच्या मुलाखती होत्या.

भारतातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता, सायकलिंगसाठी MTB सायकल कशी उपयुक्त आहे, या साठी मुलाखती होत्या.  बलवंतने हिंदीत, मयुरेशने मराठीत, आदित्यने इंग्रजीत, तर जिनेशने गुजरातीमध्ये मुलाखत दिली. मी मुंबई ते कन्याकुमारी राईडच्या अनुषंगाने  तर  स्नेहाने महिलांच्या सायकलिंग बाबत मुलाखत दिली. 
केळी, चहा बिस्कीट, तजेलदार काढा यांचा नास्ता झाला. हिरेनने माझी सायकल अप टू डेट केली होती. 

आदित्य (काका), मयुरेश आणि सुधीर शेट्टी बरोबर माझी परतीची राईड सुरू झाली. उपवन गेट जवळच जॉगिंग करणाऱ्या भूषण अहिरेची भेट झाली. अहिरे "सोनम वांगचुक" चा फॅन आहे, ज्याच्यावर थ्री ईडियट चित्रपट बनविला आहे.

त्यानंतर मयुरेश घराकडे सटकला. आदित्य आणि सुधीर मला  मौर्य डेअरी शॉप मध्ये घेऊन गेले. खास माझ्यासाठी कुल्फी आईस्क्रीमची फार्माईश झाली. आईस्क्रीम खाता खाता पनीर सुध्दा हातात आले. आजचे पनीर आणि आईस्क्रीम हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट होते. घरी न्यायला सुद्धा पनीरचे पाकीट मिळाले. आदित्यची उदारता आणि सुधीरचे औदार्य पाहायला मिळाले. 

दोघांची माझ्या बरोबर राईड सुरू झाली. तीन हात नाक्यावर नवीन पुलाचे काम चालू आहे. तेथील मातीच्या ढिगाऱ्यावर आदित्य पाठोपाठ मी सायकल चढवली. आता ठाण्यात ऑफ रोडिंग सायकलिंग सुरू झाले. खड्डे खुड्डे,  छोटे उंचवटे, दगड, पावसात ओलसर झालेली माती या वरून सायकलिंग करणे थ्रीलीग होते. नवनवीन रस्ते शोधण्याबाबत मानलं पाहिजे आदित्यला. 

तेथून दोघांनी मला मुलुंड ऐरोली पुलापर्यंत कंपनी दिली. मुंबई ते गोवा सायकलिंग  प्लॅनिंग आदित्य बरोबर करायचे ठरले. त्यांना टाटा केला.
मुलुंड पार केल्या वर मिठागर परिसरातील पानथळीवर बगळ्यांचे थवे उतरले होते. 

विक्रोळीला पोहोचल्यावर, देवनारला गीते साहेबांना भेट द्यायची आहे, हे आठवले. घाटकोपर वरून गोवंडीला सायकल वळवली. जोरदार पाऊस यायचे लक्षण दिसत होते, म्हणून पेडलिंगचा वेग वाढविला.

 महापालिका एम पूर्व विभागात काम करणारा माझा मित्र किरण लहाने, अनपेक्षितपणे समोर आला. माझ्या तोंडावर स्कार्फ असल्यामुळे खात्री करण्यासाठी त्याने सायकलच्या पुढे स्कुटर घातली, '"तुम्ही जाधव साहेब का"
 होय, मी म्हणालो.
  त्याच्या पण चेहऱ्यावर मास्क होता त्यामुळे मी पण पटकन त्याला ओळखले नव्हते. पण हसऱ्या डोळ्यावरून किरणला ओळखले. खूप आनंद झाला त्याला भेटून.

किरणला घेऊन गीते साहेबांच्या घरी गेलो. किरण लहाने, गीते साहेबांच्या गाववाला निघाला. थोड्या वेळाने कार्यालयीन कामासाठी तो बाहेर पडला. आता धुवादार पाऊस सुरू झाला होता.

गीतेंनी माझ्या आवडती डिश बनविली होती, गव्हाच्या चिकाची पेज. गरमागरम पेज प्याल्या नंतर फक्कड चहा आला. चहाचे घोट घेताना पावसाच्या सरींकडे लक्ष होते.

 धुवादार पाऊस पडत होता. बाहेरच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरी,  वरातीच्या ताशा सारखा तडतड आवाज करीत होत्या. चहा पिता पिता त्या वरातीत सामील झालो होतो. बराच वेळ गीतेंशी गप्पा मारल्या. 

पाऊस थांबल्यावर सायकल निघाली घराच्या वाटेवर. पाऊस येणार ही आशंका असल्यामुळे, चष्मा काढून ठेवला, तसेच फ्लूरोसंट हिरवे विंडचिटर घातले. देवनार पार करून घाटकोपरमध्ये प्रवेश करताच आभाळ फाटले आणि पावसाचा जबरदस्त वर्षाव होवू लागला.

 जोरदार पावसामुळे सर्व मोटार सायकलवाले रेनकोट असून सुद्धा रस्त्याच्या कडेला थांबले होते. पावसाच्या जोरदार सरींमुळे त्यांच्या हेल्मेटवर फॉग जमा होऊन त्यांची व्हीजिबलिटी नाहीशी झाली होती. म्हणून मोटारसायकल स्वार स्तब्ध झाले होते.

पण माझी सायकल, वाऱ्यासह कोसळणारा पाऊस, रस्त्यावर तुंबलेले पाणी या कशालाही न जुमानता पळत होती.  जलधारांनी चिंब भिजलो होतो. वारा मागे ढकलत होता. पण मनाने ठरवले होते, आता न थांबता, पावसाची साथसंगत करत घर गाठायचे. सतत अर्धातास बेधुंद पावसात राईड करत होतो. मुंबई ते कन्याकुमारी सफरीत अशीच पावसाळी राईड केली होती. अंगावर पाऊस घेऊन सायकल चालविणे म्हणजे थेट पावसाशी दंगामस्ती करणे होते.

सोसायटीत प्रवेश केला तो चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद लुटूनच!!!

आज 75 किमी राईड झाली होती.

आज मित्रांच्या गाठीभेटीसह पावसाची सुद्धा गाठ पडली होती, निसर्गाचे नवे रूप दाखविण्यासाठी.

सतीश जाधव

Wednesday, June 17, 2020

निसर्गाकडून निसर्गाकडे सायकल राईड

निसर्गाकडून निसर्गाकडे सायकल राईड

16.06.2020

 सकाळी पावणे सहा वाजता राईडला सुरुवात केली.  आज पहाटेच पाऊस पडून गेला होता. रस्ता अर्धा ओला अर्धा सुका होता. ठिकठिकाणी फुलांच्या रांगोळ्या पसरल्या होत्या.  वातावरणात गारवा होता. "दूरच्या रानात, केळीच्या बनात" गाणे सायकलच्या पेडल बरोबर साथ देत होते. पक्षांचा किलबिलाट गाण्याची साथसंगत करत होता.

आज एक गम्मत झालीय, कुत्र्यांना सुद्धा मी परिचित झालोय, त्यामुळे त्यांनी भुंकत सायकल मागे पाळायचे सोडून दिलंय. हिंदमाता जवळ कावळ्यांची मस्त मेजवानी चालती होती. सकाळ सकाळीच ताव मारत होते मेलेल्या उंदरावर. 

रहदारी कमी असल्यामुळे राईड मस्त मजेत चालू होती. आज कोणत्याही पुलावरुन राईड करायचे टाळले. त्याचे मुख्य कारण, पडून गेलेल्या पावसात पुलावरच्या पाण्याच्या आउटलेट मध्ये पावसाचे पाणी तुंबून राहते, त्यामुळे पुलावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही.

चित्रा सिनेमागृहाच्या होर्डिंगवर एकही चित्र दिसत नव्हते. वाऱ्यामधल्या मातीमध्ये दरवळणारे हेच का माझे शहर आहे, हा संभ्रम मला पडला. पहाटे पासून पळणारे माझे मुंबई शहर, स्तब्ध झाले होते. उभ्या आयुष्यात एवढी स्तब्धता, शांतपणा कधीही अनुभवला नव्हता. मला खात्री आहे पुन्हा ती उभारी, तो जनमाणसांचा दरवळ लवकर सर्व संकटावर मात करून मुंबईला प्राप्त होणार आहे.

फाईव्ह गार्डनच्या सिग्नलचे, लाला, हिरवा, पिवळा सर्व सिग्नल एकाच वेळी चालू होते. नक्की काय सांगायचे होते या सिग्नलला, सगळे रंग एकाच वेळेला दाखवून?

सायन हॉस्पिटल पुढे आलो आणि मनात गाणे तरळले, खास मुंबईसाठी ....

 "धड़कनों में तू .....
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू ...

हळव्या दवात भिजली पहाट तू....

हळूवार सांज की चांदरात तू ....

शब्दाविना बोलणारा .....

स्पर्शातूनि सांगणारा .....

मुका गोड अनुराग तू ....

आता कुर्ल्याला पोहोचलो आणि तेथील "ही गुलाबी हवा..... वेड लावी जिवा..." या भाव अवस्थेत रममाण झालो.

गोदरेज गार्डनकडे पोहोचलो, रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती.  हिरवी गर्द झाडे त्याच्यावरून खाली येणाऱ्या वेली, त्या वेलीवरून ठिबकणारे पावसाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. 


"मै जिंदगीका साथ निभाता चला गया" या गाण्याची साथ, ओलसर रस्त्यावर गाड्यांच्या चाकाचे होणारे आवाज हे अतिशय सुमधुर संगीत या निसर्गात बहरलेले आणि भरलेले होते.  सगळीकडे हिरवेगार वातावरण, ढगांनी आच्छादलेले आकाश, अतिशय अप्रतिम निसर्ग सौंदर्य मी डोळ्यात साठवत होतो.
ठाण्याच्या तीन हात नाक्यावर सायकलपटू प्रियांका भेटली. रोडिओ सायकल घेऊन तिने संथ सुरुवात केली होती. तिला बाय करून पुढे निघालो.

उपवनच्या मुख्य गेट जवळ आलो. येथे पूजा,कौस्थुभ, आदित्य, बलजीत, बलवंत, मयुरेश, कुलथे दादा, शेट्टी, अतुल, राजेश, अरुणा यांची भेट झाली. वातावरण अतिशय मस्त होते. येऊरच्या डोंगरावर धुकं पसरलं होतं.
बलवंतने चहा बिस्कीट, आदित्य काकाने अमृततूल्य काढा, कुलथे दादांनी खजूर आणले होते. आज खूप दिवसांनी सर्वांची  भेट झाली होती. आदित्य काकाने (YBC शंभर टक्के) वॉटर प्रूफ बॅग आणली होती. खास पावसाळ्यात वापरात आणण्यासाठी उपयुक्त बॅग होती.

येथून आम्ही ब्रिजेशाला भेटायला गेलो. तेथून आदित्य काका आम्हाला वसंत विहार येथील गौरव स्वीट मध्ये घेऊन आला.  येथे समोसा, कचोरी, पट्टी समोसा आणि रसमलाई  आदित्यने आग्रहाने खाऊ घातली. 

अतुल म्हणाला, ' मी घोडबंदर वरून जाणार आहे. मी त्याला होकार दिला. सर्वांना सी ऑफ करून अतुलच्या नेतृत्वाखाली घोडबंदरकडे राईड सुरू झाली.
आज पुन्हा गायमुख येथे थांबलो, खाडीच्या पाण्यात उतरलो. एका बाजूला मोठी होडी उभी होती, तेथे खुपशे आझाद कावळे फिरत होते. 
येथेच दशक्रिया विधिसाठी घाट बांधण्यात आला आहे. येथील खाडीच्या  किनाऱ्याला बांधलेल्या चौपाटीला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे.
 तेथून पुढे चायना क्रीक जवळ आलो. अतुल जुन्या चायना ब्रिजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी शूटिंग होते, असे अतुल म्हणाला. आज अतुल आणि मी स्टार होतो निसर्गाचे. 
फोटो काढून पुढे निघालो. पुढे "रिव्हर विव्ह हॉटेल" जवळ पाणी प्यायला थांबलो. हॉटेल मधील माठातील थंड पाणी बाटलीत भरून घेतले. सुंदर हिरवळीवर फोटो काढले. हॉटेलचे लॅन्डस्केप अतिशय सुंदर होते.  हात सॅनिटाईज करून पुढची राईड सुरू झाली
 घोडबंदर नाक्यावरच्या फाउंटन हॉटेल कडून मुंबईकडे वळलो. मीरा भायंदर पुलाकडे वळसा घेऊन मॅक्सअस मॉलकडे निघालो. नाक्यापासून सात किमी आत भायंदर गावात अतुलच्या मुलीच्या घरी पोहोचलो. अतुलचे व्याही घरी यायचा आग्रह करत होते, पण घरात जाणे टाळले. लिंबू सरबत पिऊन परतीचा प्रवास सुरू झाला.
 दुपारचे साडेबारा वाजले होते. येथून 45 किमी राईड करायची होती. ऊन चढले होते त्यामूळे राईड हळू झाली. गोरेगावला आल्यावर रत्ना हॉटेल जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला. अतुलला येथेच रामराम करून पुढची सोलो साइड सुरू झाली. उन्हे वाढल्यामुळे सतत पाणी प्यावे लागत होते. खारच्या संत निरांकरी ब्यास आश्रमा समोर सायकल पार्क केली आणि चक्क पंधरा मिनिटे फूटपाथवर बसकण मारली. पाय बोलू लागले होते. सोबतची बिस्किटे पाण्याबरोबर खाल्ली. तरतरी आल्यावर शेवटची घरापर्यंतची राईड झोकात झाली.
आज अतुलमुळे घोडबंदर वरील दोन निसर्गरम्य ठिकाणे जवळून पाहता आली. तसेच 110 किमी राईड करता आली. 

गम्मत आहे... अतुलची ओळख जेमतेम वर्षभराची असेल... सायकलिंगच्या समान धाग्याने तो आझाद पंछी बरोबर जोडला गेला आहे. आज तो आझाद पंछीचा स्टार रायडर आहे.

आजची निसर्गाकडून निसर्गाकडे जाणारी राईड बहारदार झाली होती.

सतीश जाधव

Saturday, June 13, 2020

सेंच्युरी राईड १३, जून २०२०

सेंच्युरी राईड
१३, जून २०२०

सकाळी ४.५० ला घर सोडले. बिल्डिंगच्या बाहेर दूधवाला बसला होता. त्याच्या रेडिओवर " जिंदगी भर नही  भुलेंगे वो बरसात की रात" हे गाणे लागले होते.  रस्ते ओलसर होते पण पहाटे  पाऊस पडून गेला होता. परेलचा पूल उतरलो तर समोरच्या रस्त्यावर पिवळ्या फुलांचा सडा पडला होता. 

सायन पुलावर पोहोचलो, सकाळची रहदारी कमी होती. गम्मत म्हणजे माझ्या स्पीकरवर "सुखके सब साथी, दुख मे ना कोई" हे गाणे लागले होते. परंतु माझ्या राईडमध्ये तर सर्वांचीच साथ होती. मुख्य म्हणजे निसर्ग माझा जोडीदार होता.

साडेपाच वाजता घाटकोपर पार केले आणि कोकीळ स्वर कानावर पडले. हवेतील मंद गारवा हवाहवासा वाटत होता. गोदरेज गार्डन जवळ पोहोचलो. समोर दिसणाऱ्या झाडांनी धुक्याची चादर ओढली होती, उंच सुरुची झाडे हटयोगी साधू सारखी उभी राहून वाऱ्याच्या झोतावर डुलत डुलत मंत्रजाप करीत आहेत असा भास झाला. रस्त्यावरचे डेरेदार वृक्ष ध्यानस्थ बसलेल्या ऋषी सारखे दिसत होते.

सव्वा सहा वाजता तीन हात नाक्यावर पोहोचलो सकाळीच बाहेर पडताना गृपवर लाईव्ह लोकेशन टाकले होते. तसेच माझी राईड गायमुख पर्यंत आहे याची सुद्धा कल्पना दिली होती.  तीन हात नाक्यावर थांबल्यावर गृपवर मेसेज तपासले. कोणाचाही रिस्पॉन्स आला नव्हता. तेव्हढ्यात किशोरीचा मेसेज आला.  "सर, मी राईडला जॉईन होतेय".
पुढील कॅडबरी जंक्शनवर किशोरीची भेट झाली. घोडबंदर नाक्यावर वळसा मारून गायमुखकडे राईड सुरू झाली.
अर्ध्या तासातच गायमुख जवळ पोहोचलो. किशोरीला आणखी राईड करायची होती. फाउंटन हॉटेल पर्यंत जाऊया ह्या तिचा प्रस्तावाप्रमाणे चेना घाट चढणे सुरू झाले. ठाण्याच्या बाजूने या घाटाची चढाई जास्त आहे. 2-5 गियर लावून एका दमात घाट चढून गेलो. पुढील चेना क्रीक जवळ थांबलो. समोर नॅशनल पार्कचा रम्य परिसर दिसत होता.

 समोरील जुना ब्रिज त्याच्या खालून वाहणारे खाडीचे पाणी आणि त्याच्या पलीकडे गर्द वनराई मन मोहून टाकत होती. या खाडीत दोन महिला मासे पकडत होत्या. समोरील जुन्या पुलावर बऱ्याच सिनेमाचे शूटिंग झाले आहे, किशोरी म्हणाली.
या रस्त्याने बऱ्याच वेळा गेलो पण आज दिसणारी हिरवीगर्द वनराई अतिशय जिवंत वाटली. फोटोग्राफी करून दहा मिनिटातच फाउंटन हॉटेल जवळ पोहोचलो. 
सव्वा सात वाजले होते. अडीच तासात  51 किमी राईड झाली होती. दहा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. 

आता परतीची सफर सुरू झाली. पुन्हा गायमुख गावाच्या हायवेला असलेल्या बगीच्या जवळ थांबलो. 
शांत असलेली ठाण्याची खाडी आणि तिच्या समोरच्या किनाऱ्याला  दिसणारा हिरवागार डोंगर तसेच त्या डोंगरामागे असलेले डोंगर ढगांच्या नीळाईत विरळ झाले होते. निसर्गाची एक खासियत आहे. प्रत्येक ठिकाणी तो वेगळा भासतो. तसेच निसर्गाच्या नवनवीन छटांची जाणीव होते. पण त्यासाठी निसर्गात एकरूप व्हावे लागते.

पुढे ओवळे गावाजवळ आलो. "कोरल" ची गावरान भाजी ( ही फक्त पावसात मिळते), तसेच चोखायचे  बिटकुळे आंबे, तोतापुरी कैऱ्या आणि अळूची भाजी खरेदी केली. सायकल सफरीसह घराची कामे सुद्धा सहज होऊन जातात. 

परतीची राईड सुद्धा अडीच तासात पूर्ण करायची होती. त्यामुळे घोडबंदर ठाणे हायवेवर लागणाऱ्या ब्रिजवरुन राईड केली. अर्ध्या तासात कॅडबरी जंक्शनला पोहोचलो. किशोरीची खूप दिवसांनी 40 किमीची मोठी राईड झाली होती.  तीला  सीऑफ केले. तसेच नियमित राईड करावी, हे पण सांगितले. 

ठाण्यातून आता जोमदारपणे मुंबईकडे राईड सुरू केली. मधे दोन ठिकाणी पाणी प्यायला थांबलो. हायड्रेशन ब्रेक पकडून साडेपाच तासात आजची 102 किमी राईड पूर्ण झाली होती. गेल्या तीन दिवसात माझ्या बऱ्याच मित्रांनी सेंच्युऱ्या मारल्या होत्या. त्यांचा आदर्श माझ्या पुढे होता. 
आजच्या राईडचे एक स्लोगन होते, 

*जे येतील त्यांच्या सह आणि नाही येणार त्यांच्या शिवाय सफरीचा आनंद घेणे*

सतीश जाधव

Wednesday, June 10, 2020

सह्या गोळा करण्याचा छंद दि.०९.०६.२०२०

सह्या गोळा करण्याचा छंद

शाळेत असताना सह्या गोळा करण्याचा छंद लागला.  चॉकलेटच्या रॅपरवर मोटारगाड्यांची चित्रे येत. ती चित्रे  चॉकलेट कंपनीने दिलेल्या वहीत योग्य नंबरवर चिकटवून सर्व वही पूर्ण भरून त्या कंपनीला पाठवायची. त्यामुळे कंपनी कडून मोठमोठ्या नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या सह्यांचा छोटासा गुलाबी रंगाचा अल्बम बक्षीस मिळाला होता. 

त्या अल्बम मध्ये प्रथमच महात्मा गांधीजींची सही होती. त्या नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर यांच्या सह्या  होत्या. पाब्लो पिकासो, विल्स्टन चर्चिल यांच्या सुद्धा सह्या होत्या.

याच अल्बम मध्ये प्राध्यापक शिवाजीराव भोसले, शिवशाहीर दादासाहेब पुरंदरे आणि ऐतिहासिक कथाकथनकार भारताचार्य प्राध्यापक सु ग शेवडे, पोलीस महानिरीक्षक अरविंद इनामदार, आध्यत्मिक गुरू पद्माकर वि वर्तक यांच्या  सह्या घेतल्या आहेत.

 माझ्या जीवन सफरीत ज्यांना ज्यांना मी गुरू मानले त्यांच्या सुद्धा सह्या ह्या अल्बममध्ये घेतल्या आहेत. 

हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री यांचे एक पुस्तक मिळायचे. त्या पुस्तकात हिरो हिरोईन यांचे पत्ते आणि जन्म तारीख असायची. आपल्याला आवडणाऱ्या हिरोला पोष्टकार्ड वर शुभेच्छा संदेश लिहून वाढदिवसाच्या अगोदर पाठवून द्यायचो. या अभिनेत्यांकडून त्यांचा पोस्टकार्ड साईज फोटो आणि त्याच्या वर त्यांच्या सहीचे कार्ड घरपोच पोष्टाने यायचे.

त्या काळचे प्रसिद्ध हिरो  दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, मनोज कुमार, राजेंद्र कुमार तसेच हिरॉईन नूतन, नर्गिस, माला सिन्हा, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेकांचे फोटो आणि सह्या गोळा केल्या होत्या.

हा सर्व सह्यांचा खजिना 26 जुलै 2005 च्या पावसात गहाळ झाला.

परंतू सह्या घेण्याची उर्मी शमली नव्हती.

मुंबई महापालिकेच्या ए विभाग कार्यालयातील जल विभागात कार्यरत असताना. दोन प्रसिद्ध व्यक्तींच्या सह्या मिळाल्या. एक प्रसिद्ध सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम आणि दुसरी अतिशय प्रसिद्ध व्यक्ती जिचा मी चाहता आहे,  तिच्या सहीची गोष्ट  सांगणार आहे.
 ०२ जानेवारी २००६ रोजी काळाघोडा येथील चेतना रेस्टॉरंट मध्ये माझ्या अधिकाऱ्यांसह दुपारी जेवायला गेलो होतो. हे रेस्टॉरंट ट्रॅडिशनल  शाकाहारी जेवणासाठी खूप प्रसिद्ध आहे. तेथे राजस्थानी फूड फेस्टिव्हल सुरू होते. आम्ही जेवायला बसलो, इतक्यात समोर लक्ष गेले, एका टेबलवर आशाताई भोसले काही परदेशी व्यक्तींसह  बसल्या होत्या. त्यांचे जेवण आटपून त्या निघायच्या तयारीत होत्या

आशताईंचा मी कॉलेज जीवनापासून फॅन आहे. क्षणाचा विलंब न लावता खिशातील छोट्या डायरीचे पान फाडले आणि आशाताईंच्या पुढ्यात उभा राहिलो.

"आशाताई मी तुमचा चाहता आहे, या नवीन वर्षात तुमची सही हवी आहे". 

 हसत हसत आशाताईंनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, 'काय रे नाव तुझं'  क्षणभर मी गांगरलो  आणि नाव सांगितले. आशाताई गोव्याच्या आहेत आणि गोव्यात एकेरी नावाने हाक मारणे हे प्रेमाचे, आपुलकीचे प्रतीक आहे याची जणीव झाली.

आशाताईंनी एक मेसेज लिहिला आणि सही करून कागद माझ्या हातात दिला. तो मेसेज वाचला आणि अपार आनंद झाला. खाली वाकून आशाताईंच्या पाया पडलो. त्या हॉटेल मधील सर्व व्यक्ती तसेच आशाताईंच्या समोर बसलेल्या परदेशी व्यक्ती आश्चर्याने माझ्याकडे पाहत होत्या. परंतु मी माझ्याच आनंदात मश्गुल होतो.

आशाताईंनी लिहिले होते, " हे नवीन वर्ष सुखाचे आहे, प्रिय सतीश"

आशाताई गायकीने खूप मोठ्या आहेत हे माहीत होते. पण मनाने सुद्धा अतिशय श्रीमंत आहेत आणि सकारात्मक दृष्टिकोन खच्चून भरला आहे याची जाणीव झाली. 

सर्व साधारणपणे "नवीन वर्ष सुखाचे जावो" अशा शुभेच्छा देतात, पण आशाताईंनी  "नवीन वर्ष सुखाचे आहे" अशा शुभेच्छा दिल्या होत्या.

नवीन वर्षातील पहिल्याच कार्यालयीन दिवशी आशाताईंचे प्रेमळ शब्द आणि त्यांच्या शुभेच्छासह मिळालेली सही मी आजही जपून ठेवली आहे.

माझ्या सह्यांचा छंदातील आशाताई भोसलेंची सही माझ्या मर्मबंधातली प्रचंड मोठी ठेव आहे. 

ही अनमोल सही आज तुम्हाला पेश करतोय.

सतीश जाधव

Monday, June 8, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Nine) 02.11.2019 Selam to Dindigal मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा) सेलम ते दिंडीगल

 02.11.2019

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा)  

सेलम ते दिंडीगल सायकल राईड

सकाळी साडेसहा वाजता सेलम जवळच्या 'अन्नामार हॉटेल' कडून राईड सुरू झाली. आज राईड सुरू करतानाच सुर्योदयाचे दर्शन झाले होते. 
सोपान, नामदेव आणि विकासने पंढरपूर सायकल वारीचे भगवे टीशर्ट घातले होते. विकासचा पाय दुखत होता. पण जिद्द कायम होती. दोन्ही पायाला नी-कॅप लावून आज सायकलिंग करत होता.
 दिंडीगल येथे आजचा मुक्काम होता.  सर्वजण एकत्र राईड करत होते. आज मी आणि लक्ष्मण लीड करत होतो. 
 
साडेसात वाजता सेलमच्या मुख्य चौकात पोहोचलो.  16 किमी राईड राईड झाली होती.

पुढच्या तासाभरात एकूण 30 किमी राईड झाली आणि नामक्कल गावात पोहोचलो. तेथील   टपरीवजा उडुपी हॉटेल मध्ये डोसा ऑर्डर केला. त्याच डोसा तव्यावर आम्लेट सुद्धा बनवले जात होते. शाकाहारी लक्ष्मणची गोची झाली, त्याने इडली ऑर्डर केली. मी डोसा आणि डबल आम्लेट ऑर्डर केले. इथली कॉफी मस्त होती. 

पुढे कन्याकुमारीच्या एका माईल स्टोन जवळ पंढरपूर वारकरी सोपान, नामदेव आणि विकासचे विठोबा स्टाईल फोटो काढले.
 नामदेवराव तर पुंडलिकाच्या आवेशात विठोबाला द्यायची वीट हातात असल्यासारखे, त्या माईल स्टोनवर एक हात वर करून उभे होते. तर दिपकचा त्या माईल स्टोनवर 'लाफिंग बाबा' आवेशात फोटो काढला. आज खऱ्या अर्थाने पळत सुटणारे सायकल स्वार निसर्गाचा, फोटोग्राफीचा आनंद घेत होते.

साडेअकराच्या  सुमारास नामक्कल टोल प्लाझाला पोहोचलो.  75 किमी राईड झाली होती. आज सुद्धा जेवणा ऐवजी इडली डोसा खात होतो.

ऊन चढले होते, दर अर्ध्या तासाने हायड्रेशन ब्रेक घ्यावा लागत होता. या हायवेवर धाबे तुरळक होते. एका हायड्रेशन ब्रेकमध्ये पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला बलुशाही आणि चिवडा खायला दिला.
 मुंबई कन्याकुमारी  सायकल राईड करत  "प्रदूषण मुक्त भारत"  हा संदेश सर्वाना देत असल्याबद्दल त्या पोलीस अधिकाऱ्याने आमचे कौतुक केले. त्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सुद्धा लक्ष्मण होते, हे विशेष.

पुढे गेलेल्या सोपान आणि कंपनीला आम्ही करूर शहराच्या अलीकडेच गाठले.
 आता भरगच्च नारळाच्या वाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरभरून लागत होत्या. या नारळांच्या झाडांखालची जमीन सुद्धा हिरवीगार दिसत होती. जणूकाही हिरवळीची दुलई अंथरली होती.

तीनच्या दरम्यान 120 किमी राईड झाली होती.  करूर शहर जवळ आले होते.  विकासच्या लक्षात आले, सोपनच्या सायकलचे मागचे चाक व्होबल करते आहे.    थांबून तपासताच समजले, चाकामधील एक तार तुटली आहे. कन्याकुमारी अजून 400 किमी होते, त्यामुळे सायकल दुरुस्त करण्यासाठी  लक्ष्मण, विकास, सोपान आणि मी करूर शहरात घुसलो.  दोन सायकलची दुकाने सापडली, पण नवीन तार सापडली नाही. सोपनने पुढे तशीच राईड करायचे ठरविले. 
 
या शहरातील "ताशी स्वीट बेकरी" मध्ये लक्ष्मण आणि मी मिठाईचा आस्वाद घेतला. विकास आणि सोपान पुढे गेले होते. 
तामिळनाडूचे  रस्ते एकदम मस्त होते. रस्त्यावर रहदारी कमी असल्यामुळे वायू प्रदूषण नव्हते.
उन्हाचा चटका जाणवत होता. मी आणि लक्ष्मण दमलो होतो. पुढे पाच किमी हायवेला आलो आणि जोरादार स्प्रिंट मारायला सुरुवात केली. रस्त्यात सर्वजण भेटले. आम्हाला पुढे जाऊन हॉटेल बुकिंगची कामगिरी मिळाली. दिंडीगलच्या भर चौकात "सुकन्या इन रेसिडन्सी"  हे छान पैकी हॉटेल मिळाले. रात्री आठ वाजता बाकीची मंडळी सायकलिंग करत हॉटेलवर पोहोचली. बेसमेंटमध्ये सायकल पार्किंगसाठी जागा होती.

170 किमी राईड उन्हामुळे खडतर झाली होती, परंतु कन्याकुमारी आता जवळ आल्यामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास बुलंद झाला होता.

सतीश विष्णू जाधव

Wednesday, June 3, 2020

निसर्ग वादळ आणि नाबाद 101 दि. 03.06.2020

निसर्ग वादळ आणि नाबाद 101

03.06.2020

चार दिवसांपूर्वी तरुण मित्र मंडळाच्या अंकीतचा मेसेज आला, तीन जूनला रक्तदान शिबीर भरविले आहे. सोशल डिस्टनसिंगमुळे रजिस्ट्रेशन करावे लागेल.  मला सकाळी 11 वाजताची वेळ मिळाली.

गेले दोन दिवस निसर्ग वादळाच्या बातम्यांचा सोशल नेटवर्कवर भडिमार होऊ लागला आणि आज रक्तदान करू शकू काय असा संभ्रम मला पडला.

आज,  3 जून, जागतिक सायकलिंग दिवस. परंतु आप्तस्वकीय, मित्रमंडळी यांच्याकडून सायकलिंगला बाहेर पडायचे नाही असा प्रेमाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता.

सकाळी सहा वाजता उठल्यावर खिडकीतून निसर्गाकडे पाहिले. आभाळ भरून आलेले, हलका हलका वारा वाहत होता. झाडांची सळसळ,  बारीक बारीक पावसाच्या थेंबांचा पत्र्यावर होणारा तडतड आवाज, पक्षांचा किलकीलाट, दुरून येणाऱ्या मालगाडीचा खडखडाट, रेल्वे क्वार्टस मधून ऐकू येणारी कोबड्याची बांग, समोर दिसणाऱ्या गगनचुंबी इमारती या सर्व वातावरणात मन तल्लीन झाले. आठ कधी वाजले कळलेच नाही.

नास्ता आटपल्यावर अंकितला फोन केला. त्याने रक्तदान शिबीर चालू झाल्याचे सांगितले. माझा फोन घरातली मंडळी ऐकत असल्यामुळे बाहेर पडायला वेगळी परवानगी मागण्याची आवश्यकता लागली नाही.

सकाळी पावणे अकरा वाजता सायकल बाहेर काढली. विंडचिटर, हेल्मेट, हॅन्डग्लोज, मास्क इत्यादी सर्व सेफ्टी गियरसह लोअर परळ वरून लालबागला सायकल सहल सुरू झाली. पंधरा मिनिटात पोहोचायचे असल्यामुळे लोअर परळ स्टेशन मार्गे जायचे ठरविले. मुख्य पूल पाडल्यामुळे स्टेशनच्या दादरावर सायकल उचलून घ्यावी लागली. 
स्टेशनच्या पूर्वेला जाऊन राईड सुरू झाली. वारे वाहत होते पण वादळी जोर नव्हता. त्यामुळे पंधरा मिनिटात लालबागच्या जैन मंदिरातील रक्तदान केंद्रात पोहोचलो. 

सोशल डिस्टनसिंगची अतिशय काटेकोर खबरदारी घेण्यात आली होती. रजिस्ट्रेशन केल्यामुळे माझा फॉर्म तयार होता. सर हरकिसनदास रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य होते.  
आज पहिल्यांदा हिमोग्लोबिन टेस्ट करण्याची मशीन पहिली. नॉर्मल हिमोग्लोबिन 12.5 ग्राम पर डेसीलिटर असते माझे 13.5 ग्राम पर डेसीलिटर होते. बिपी नॉर्मल होता. त्यांनी तात्काळ रक्तगट सुद्धा तपासला. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सर्व टेस्ट नॉर्मल आल्या.

हरकिसनदास रुग्णालयाचे टेक्निशियन महेश पेडणेकर आणि डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी  कोविड प्रोटेक्शन गाऊन घातले होते. त्यानंतर सुरू झाले माझे रक्तदान. तीन मिनिटे आणि एक सेकंदात 350 मिलीची बॅग भरली. माझी ही रक्तदानाची नाबाद 101 वी वेळ होती. 
हे महेशला समजल्यावर त्याला खूप आनंद झाला. डॉ कुलकर्णी यांनी हसत हसत  मला धन्यवाद दिले आणि रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र दिले.
आजच्या जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल वरून रक्तदानाला जाणे, ही माझ्यासाठी पर्वणी होती.

 रक्तदान आटपल्यावर लालबाग वरून के इ एम रुग्णालयातील फार्मसीकडे प्रस्थान केले. वाटेतील आय टी सी हॉटेल जवळील रस्त्यावर झाडांच्या पानांचा खच पडला होता. रिमझिम पाऊस सुरू होता. हवेचा जोर वाढला होता.
 
 तेथून दादर मंडईत गेलो. मंडईतील वर्दळ कमी झाली होती. भवानीशंकर मार्गावरील मोठमोठी झाडे वाऱ्याच्या तालावर डोलत होती. ब्राम्हण सेवा मंडळ हॉल समोरील झाडावरची पांढरी फुले फुटपाथ आणि रस्त्यावर विसावली होती. निसर्ग वादळाचे वेगळे रूप येथे पाहायला मिळाले.
रिमझिम पडणाऱ्या पावसाचा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा आस्वाद घेत, दुपारी दीड वाजता घरी पोहोचलो. आज 15 किमी राईड झाली होती.

जागतिक सायकल दिना निमित्ताने आज सायकल सफर तर झालीच, पण त्याच बरोबर रक्तदान (नाबाद 101) करण्याचा योग आला आणि निसर्ग वादळात निसर्ग विहार सुद्धा करता आला.

आज माझ्यासाठी ट्रिपल ट्रीट होती.

सतीश विष्णू जाधव

Tuesday, June 2, 2020

गुलमोहर राईड 02.06.2020

गुलमोहर राईड

02.06.2020


आझाद पंछी सायकल परिवाराच्या सदस्यांसाठी आजची राईड होती.  चिराग, प्रशांत, राजेश यांची भेट गेल्या तीन महिन्यात झाली नव्हती. सर्वांना भेटण्याची ईच्छा अनावर झाल्यामुळे आज सकाळीच मुंबईवरून विजयसह निघालो. 

वातावरण ढगाळ परंतु आल्हाददायक होते. स्पीकर वर  "ऐसा लगता है, तुम बनके बादल, मेरे बदनको भिगोके मुझे छेड रहे हो" हे गाणे लागले होते.

 पाऊस पडण्याचे चिन्ह होते. बऱ्यापैकी गारवा होता. सव्वा सहाला ठाण्याला पोहोचायचे असल्यामुळे वेगातच राईड सुरू झाली. कुर्ल्याला पावसाचा शिडकावा सुरू झाला. येथे दहा मिनिटे हायड्रेशन ब्रेक घेतला आणि पुढची सफर सुरू केली.

सकाळी सव्वा सहा वाजता चिराग तीन हात नाक्यावर पोहोचला होता. आम्हाला पाच मिनिटे उशिर झाला. मागोमाग अभिजितचे आगमन झाले.  जब मिलते है चार यार तो  फोटो बनता ही है.

प्रशांत काही अडचणीमुळे आला नाही. राजेशचा फोन आला, तो बाळकुंम नाक्यावर आम्हाला भेटणार होता.

तीन हात नाक्यावरून घोडबंदर हायवेवरील ओवळे गावापर्यंत जायचे ठरले. अभिजित आणि चिरागला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे वेळेत घरी पोहोचणे आवश्यक होते. भरपूर पाणी पिऊन पुढची राईड सुरू केली. 

आता आमचा लीडर चिराग होता. अभिजितची भेट  कार्ला एकविरा राईडला  विजय आणि अभिजित बरोबर झाली होती. ठाणे नाशिक हायवे वरून घोडबंदरकडे वळसा घेऊन ओवळे गावाकडे प्रस्थान  केले. बऱ्यापैकी रहदारी होती रस्त्याला. चाळीस मिनिटात ओवळे गावाजवळ पोहोचलो. 

येथे  चोखायचे छोटे छोटे आंबे, तोतापुरी कैरी, चिकू घेऊन माळीण बाई बसली होती.
 

परवा इथेच जांभळे घेतली होती. माळीण बाईकडून आंबे आणि चिकू घेतले.  तिच्याच बाजूला बसलेल्या कोळीण ताईकडे पापलेट, कुपा, शिंगाडा आणि काटेरी मासे होते. एक मोठा कुपा मासा हातात धरून फोटो काढला.

येथून परतीची राईड सुरू झाली. वीस मिनिटात ब्रह्मांड हायवे परिसरातील बोगनवेलीजवळच राजेशची भेट झाली. खूप आनंद झाला  कारण राजेश बऱ्याच दिवसांनी भेटला होता. तेथे ड्रायफ्रूट खाण्यासाठी हायड्रेशन ब्रेक घेतला.


येथून बाळकुंम पाईप लाईनकडे सफर सुरू झाली. 

बाळकुंम जवळील कशेळी पाईप लाईन मधून सफर सुरू झाली. दोन भल्या मोठ्या पाईप लाईन मधून सायकलिंग करताना मन हरकून गेले.
 

दोन्ही बाजूला गुलमोहराची झाडे फुलली होती. गुलमोहराच्या फुलांचा सडा रस्त्यावर पसरला होता. स्वप्नात पाहिलेला फुलांचा मार्ग आज प्रत्यक्षात अवतीर्ण झाला होता.

 पोपट, बुलबुल, भारद्वाज, खंड्या पक्षांचा किलबिलाट मनात आनंदाचे झंकार निर्माण करत होते. निसर्गाचे हे अदभुत रूप पाहून मन मोहरून गेले. निसर्गाच्या या विविध रंगांच्या, संगीताच्या छटा अनुभवणे हा आजच्या सफरीचा क्लायमॅक्स होता.

पाच मिनिटात पाईप लाईनच्या शेवटाला पोहोचलो. पाईपवर बांधलेल्या मोठ्या चौथऱ्यावर चढलो. तेथून दिसणारा हिरवागार आणि गुलमोहरांनी बहरलेला परिसर म्हणजे निसर्गाचा परमावधी होता. 

त्या पाईप लाईन वरील अजस्र गेट व्हॉल्व जवळ फोटो काढले. निसर्ग दर्शन तर झकास झाले होते. 

हायवेला आल्यावर राजेशला टाटा केला. पुढे तीन हात नाक्यावर चिरागला बाय केले.  मुलुंड विक्रोळी हायवेला पाणी ब्रेक घेतला. येथे सुद्धा गुलमोहराच्या झाडाखालीच थांबलो. समोरील रस्त्याच्या मध्ये गुलाबी बोगनवेल फुलली होती. फुलांच्या धुंदीत घरी कधी पोहोचलो हे समजले ही नाही.

आजची गुलमोहर सफर फुलांनी बहरून गेली होती.

सतीश  विष्णू जाधव

Monday, June 1, 2020

पहिला पाऊस 01.06.2020

01.06.2020

पहिला पाऊस

सकाळी साडे पाच वाजता सायकल घेऊन बिल्डिंग खाली उतरलो. पाहतो तर काय... रिमझिम पाऊस सुरू... 

आज पावसात सायकलिंग करता येणार... मनात आनंदाचा पाऊस पडायला लागला. मोबाईल रॅप करून सॅक मध्ये टाकला.

रिमझिम पावसात राईड सुरू झाली. दादर फ्लाय ओव्हरच्या खाली पाणी तुंबले होते. पाण्यात सायकल चालविताना पुढच्या चाकाच्या दोन्ही बाजूने जोरदार तुषार तोंडावर उडत होते. ओलाचिंब झालो आणि आनंदात हरखून गेलो.

कुर्ल्याला आल्यावर अभिजीतला फोन केला. त्याचा फोन बंद होता. आता पाऊस थांबला होता, पण रस्ता ओला होता. त्यामुळे सायकल अतिशय सावधानतेने चालवत होतो.

सात वाजता मुलुंडला पोहोचलो. ढगाळ वातावरणामुळे सकाळचे  सूर्यदर्शन ढगांच्या आडूनच होत होते.
ओलसर रस्त्यामुळे गाड्यांचे लाईट परावर्तित होत होते. हायड्रेशन ब्रेक घेतला. 
टोल नाक्याजवळील मुलुंड फ्लाय ओव्हरला वळसा घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला.  मिठागरांजवळ  फ्लेमिंगो
  पक्ष्यांचे थवे विहार करत होते. माळे सारखे उडणाऱ्या फ्लेमिंगो मधील शेवटच्या पक्षाने पाण्यातील मासा पकडण्यासाठी डुबकी  मारली. त्या डुबकी बरोबर पाण्यावर उठलेले तरंग, मनात झंकार उठवून गेले.
या  पक्षांचे स्वच्छंदी जीवन पाहिले की वाटते; आपल्याला पंख असते तर गगनाला गवसणी घालणे किती सहज झाले असते.

पहिल्या पावसात एकट्याने राईड करण्यातले सुख काही वेगळेच असते.  मीच माझा राजा असतो आणि सेवक सुद्धा...

सतीश जाधव