Thursday, February 23, 2023

सन्मान... एका छंदाचा...

सन्मान...  एका छंदाचा... 

माझ्या कार्यालयीन सहकारी सोनाली जोशींना नुकतीच प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली...

आपली माणसं जेव्हा वरीष्ठ पदावर पोहोचतात तेव्हा खुप आनंद होतो... आणि हाच आनंद साजरा करण्यासाठी जोशी बाईंना भेटायला मुलुंडस्थित महापालिकेच्या टी विभाग कार्यालयातील जल विभागात गेलो होतो...

आधी सांगितले असल्यामुळे जोशी बाई आतुरतेने वाट पाहत होत्या... बाईंची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी मंगल आशिर्वाद दिले...

  जल विभागातील सहाय्यक अभियंता श्री बोरसे साहेब यांची भेट झाली... त्यांनी रक्तदानाच्या आणि  सायकलिंग क्षेत्रातील माझ्या भरीव कामगिरी बाबत जल विभागातर्फे सन्मान सोहळा आयोजित केला होता.. हे तर माझ्यासाठी अनपेक्षित  होते... परंतु सर्व कार्यालयीन कर्मचारी, अधिकार्‍यांशी सुसंवाद करायला मिळणार म्हणुन आनंद झाला होता...

जोशी बाईंनी सर्वांना माझा परिचय करुन दिला... आता पर्यंत केलेले ११२ वेळा रक्तदान तसेच सायकलिंग करत एकट्याने आदि कैलास आणि ॐ पर्वत पादाक्रांत करून केलेल्या जागतिक विक्रमाची ओळख करून दिली... आणि कार्यालयातर्फे सुंदर भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ श्री बोरसे साहेबांच्या हस्ते देऊन सन्मान केला... 

श्री बोरसे साहेबानी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज आम्हा सर्वांना जाधवांनां ऐकायचे आहे... सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जपलेले छंद... याची ओळख करुन घ्यायची आहे... फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने जल देयकांच्या डिमांड रिकव्हरी साठी अतिशय निर्णायक आणि संवेदनाक्षम असतात... या दिवसात येणार्‍या ताणतणावाच्या वातावरणात  श्री जाधवांनां ऐकणे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असेल...

सर्वांशी सुसंवाद साधताना सांगितले की, मनपा मध्ये सेवा करत असताना कार्यबाहुल्यामुळे सतत ताणतणावाला सामोरे जावे लागते... आपल्या छंदांना मुरड घालावी लागते... तसेच आपल्या प्रकृतीकडे सुद्धा दुर्लक्ष होते... 

म्हणुनच  उत्स्फुर्तपणे जीवन जगायचे असेल आणि सतत नवचैतन्यमय राहायचे असेल तर आपले छंद जपा-जोपासा... वेळ काढून भ्रमंती करा... नवनवीन मित्र जोडा... 

"चरैवेती". म्हणजे संधी मिळेल तेव्हा भटकणे हे सतत उर्जावान ठेवण्याचे जीवनाचे सूत्र आहे... या फिरण्याच्या वेडापायीच सेवानिवृत्त झाल्यावर सायकलिंगला सुरुवात केली... आतापर्यंत भारत भ्रमंती करत बेचाळीस हजार किमी सायकलिंग केली आहे... तसेच एक जागतिक विक्रम नावावर आहे... या सायकलिंग मुळेच मित्र परिवार प्रचंड वाढला आहे तर मोठ्या मोठ्या लोकांच्या गाठी भेटी झाल्या आहेत... सायकलिंगमुळे भारताच्या विविध प्रांतातील लोकांचे जनजीवन अतिशय जवळून पाहता आले... लडाख सारख्या ठिकाणी  बर्फवृष्टीमुळे आठ महिने दळणवळण बंद असते... अशा ठिकाणी राहणार्‍या जनतेचे खडतर जीवन अनुभवता आले... त्यामुळेच  जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय विशाल झाला... कोणत्याही ताणतणावात न अडकता... आलेली कठीण परिस्थिती संधी म्हणुन स्वीकारत गेलो आणि एखाद्या झर्‍यासारखे  प्रवाही राहीलो... झाडासारखे दातृत्व स्वीकारले...

निसर्ग आपला सर्वात मोठा गुरु आहे... आपण जेव्हा मोटरसायकल, कार, रेल्वे ईत्यादीने फिरतो तेव्हा ग्रंथाची पान फडफडल्या सारखा निसर्ग पाहतो... परंतु सायकलने आपण निसर्गाच्या खूप जवळ जातो... त्यात रमतो आणि आपणच निसर्ग होऊन जातो... 

आपण समाजाचा एक घटक आहोत याची जाणीव होते आणि लोककल्याणासाठी आपले उत्तरदायित्व आहे हे ध्यानात येते... निरपेक्ष वृत्तीने समाजोन्नत्ती करण्यासाठी प्रेरित होतो...

 याचाच भाग म्हणून प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन भारत भ्रमंती चालू आहे... नर्मदा परिक्रमा करताना "नर्मदा स्वच्छता अभियान राबविले होते... लडाख मध्ये" प्रिजर्व लडाख... Don't liter Save Water" ही संकल्पना घेऊन फिरलो... तर स्पिती व्हॅली मध्ये "एक बुटा (झाडाचं रोपटं) बेटी के नाम" याचा प्राचार केला... 

सायकलिंग आपले प्रकृती स्वास्थ्य झकास तर ठेवतेच आणि ते एक प्रकारे मेडिटेशन सुद्धा आहे... त्यामुळे मनस्वास्थ्य सुद्धा उत्तम राहते... 

विद्यार्थ्यांना-तरुणांना सायकलिंग साठी उद्युक्त करणे आणि मोबाईल संस्कृती कडून निसर्ग संस्कृतीकडे वळविणे... हा उपक्रम सुरू आहे...
भारत भर सायकल संस्कृती वाढविणे आणि सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे हा प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्यासाठी परमेश्वराकडून शंभर वर्षाचे आयुष्य मागून घेतले आहे... 

आपल्या उर्वरित काळात "पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा प्रकृती कशी आहे याचीच चौकशी केली जाते... या साठीच तुमच्या आवडीचे छंद जोपासा... तसेच सायकल चालवा... आणि हिट रहा फिट रहा... 

या सुसंवादामुळे बर्‍याच कर्मचारी अधिकारी यांनी माझा मोबाईल नंबर घेतला... 

शेवटी सर्वांना एकच सांगणे आहे... छंद जोपासा... हसत रहा... फिरत रहा... हीच जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे... 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे 
९८६९५७०२६६





Sunday, February 19, 2023

११२ वे रक्तदान... छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं...

११२ वे रक्तदान... छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं... 


राजा शिवाजी माजी विद्यार्थी मैत्रेय प्रतिष्ठान तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते...

या शिबिरात प्रमुख पाहुणा आणि रक्तदाता म्हणून बोलावण्यात आले होते. 

कार्यक्रमात सायकलपटू आणि रक्तदाता म्हणून राजा शिवाजी विद्यालयाच्या गुरूवर्य माजी मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया निमगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


विशेष म्हणजे माझ्या सायकलिंग उपक्रमाबद्दल माहिती  मिळाल्यानंतर सुप्रिया ताईंनी सायकलिंग सुरू करण्याचे मनोगत व्यक्त केले...

 ११२ व्या रक्तदाना नंतर गुरूवर्य रूपवते बाईंनी प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन गौरव केला...

या कार्यक्रमात बर्‍याच रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्याचे सौभाग्य मिळाले...  खरे तर राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे हे स्नेह संमेलनच होते...


एका अतिशय स्तुत्य सामाजिक  उपक्रमाचा राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रेरक पायंडा पाडला होता. 

मुंबईतील सर्व मित्र परिवार होताच... तसेच एक मित्र नाशिक वरुन तर एक मित्र अँमस्टरडॅम येथून आला होता... वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या सर्व मित्रांना या निमित्ताने भेटता आले... आणि खुप नविन मित्र मिळाले...

राजा शिवाजी विद्यालयाच्या १९९१ सालात पास आऊट झालेल्या विद्यार्थी समूहाने अतिशय बहारदार उपक्रम हाती घेऊन के ई एम् रक्तपेढीला ६७  रक्त पिशव्या मिळवून दिल्याबद्दल सर्वांना शतश प्रणाम...

मंगल हो !!!

 सतीश जाधव 

Monday, December 12, 2022

एक छोटीशी चूक... बेतू शकते जिवावर...

एक छोटीशी चूक...  बेतू शकते जिवावर... 

खरतर असे प्रसंग घडू नये म्हणून प्रत्येक सायकलिस्ट  खबरदारी घेत असतो...  परंतू अनवधानाने किंवा चुकीने... ती गोष्ट घडली... की मग त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो...

कालच १०० किमी ग्लोबल पगोडा सायकल राईड दरम्यान हा प्रसंग घडला... परंतू सायकलिंगचे सर्व सेफ्टी मेजर परिधान केले असल्यामुळे थोडक्यात बचावलो...

सकाळी अंबरीष गुरव, तुषार रेडकर आणि विजय कांबळे सोबत सेना भवन कडून सायकल राईड सुरू झाली...

दहिसर चेक नाक्यावर रघुनाथ घडशी भेटला...  घोडबंदर लुप मारण्याचे ठरविले होते...  


पण सकाळी अकरा  वाजता अंधेरीच्या सोसायटी मध्ये असणारी मीटिंग गाठणे सुद्धा आवश्यक होते... म्हणून मीरा भायंदर नाक्यावरून उत्तन मार्गे ग्लोबल पगोडा राईड करण्याचे ठरले...

बरोबर सकाळी पावणे नऊ वाजता ग्लोबल पगोडा येथे पोहोचलो... वाटेत महेश दाभोळकर आणि इतर सायकलिस्ट मित्रांची भेट झाली...

पगोडाचे बाहेरूनच दर्शन घेऊन मनोरीकडे कूच केले...  मनोरी मार्वे मढ आयलंड वर्सोवा करून अंधेरीला जायचे नक्की केले..

डोळ्याच्या नजरेत मनोरी बीच दिसू लागला... आणि मनोरीला केलेल्या धम्माल मस्तीचे जुने दिवस आठवले... मन प्रफुल्लित झाले... हवेत तरंगत समुद्र न्याहाळू लागले... त्या आनंदाच्या भरात तो लांबवर दिसणारा मनोरी  बीच सोबत सायकलिंग करत असलेल्या विजयला उजवा हात समुद्राकडे करून दाखवत होतो...

क्षणार्धात काय झाले कळलेच नाही... समोरच्या  स्पिड ब्रेकर वरुन सायकल धाडकन जमिनीवर कोसळली... पाय आणि खांदा सायकल खाली आला... डोके कचकन जमिनीवर आदळले... हात रस्त्यावर घसपटले... ट्रॅक पँट फाटली... 

भानावर यायला मिनिट भर लागले... तेव्हा लक्षात आले समोर पांढरे पट्टे न मारलेला स्पिड ब्रेकर दिसलाच नाही... सायकल हॅन्डल वरुन क्षणभर सोडलेला हात... जिवावर बेतणारा होता... परंतु डोक्यात चांगल्या प्रतीचे हेल्मेट... हातात ग्लोव्हज असल्यामुळे डोक्याला कोणतीही हेड इंज्युरी झाली नाही आणि पंजा सोलपटला नाही... पण गुढग्याच्या खाली पायाला बरेच खरचटले होते... खांदा दुखावला होता... तरी बरं... मागून कोणतेही मोठे वाहन नव्हते...

तुषारने पाणी दिले तर विजयने पुरणपोळी खायला दिली... जमिनीवर एव्हढ्या जोरात आपटलो होतो की उजवा पाय आणि खांदा बधिर झाला होता... तुषार आणि रघुनाथ थोडेसे घाबरलेले वाटले... पण विजय एकदम खंबीर होता... वाकडे झालेले हॅन्डल विजयने सरळ केले... चाक सुद्धा थोडे व्होबल झाले होते... ते पुढच्या सायकल दुकानात ठीकठाक करून राईड पूर्ण करण्याचे ठरविले...

पेडलींग सुरू केल्यावर लक्षात आले पाय आणि खांदा व्यवस्थित काम करतोय... कुठेही मेजर ईंज्युरी नाही... मार्वेला रघुनाथला टाटा केला तर वर्सोवा मेट्रो स्टेशन कडे विजय आणि तुषारला बाय बाय करून अंधेरी सोसायटीत मीटिंग अटेंड केली..

पेडलिंग करत मुंबईत आलो... लोअर परळला सायकल शॉपी मध्ये खुप गर्दी असल्यामुळे सखीला उद्या ठिकठाक करण्याचे ठरविले... रात्री शाळकरी मित्र नागेश सोपारकर याने वाशीला विष्णु दास भावे  नाट्यगृहात ठेवलेल्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी झालो...

तेथे स्टेज वर डान्स पण केला...

 त्यामुळे खात्री झाली... सकाळी झालेला अपघात फारसा गंभीर नाही... कोठेही फ्रॅक्चर नाही... अपघात हा अपघातानेच होतो... पण  बचावलो ते निव्वळ  सेफ्टी मेजर मुळेच... डोक्यात चांगल्या प्रतीचे हेल्मेट आणि हातात ग्लोव्हज नसते तर... कालच  हॉस्पिटल मध्ये बेशुद्धावस्थेत पोहोचलो असतो... पण तसे न घडल्यानेच १०० किमी राईड पुर्ण झाली होती... 

मित्रांनो... सर्वांना एकच सांगणे आहे... सायकल वरुन  हात एका क्षणांसाठी सोडल्यामुळे काय घडू शकते... याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे... म्हणूनच सर्व सेफ्टी मेजरसह सावधपणे सायकल चालवा... आणि मस्त एंजॉय करा... 

आज सखीची काळजी घ्यायची आहे तसेच पायाला आणि खांद्याला आराम द्यायचा आहे... 

मंगल हो... 


सतीश जाधव... 
मुक्त पाखरे 

Thursday, December 8, 2022

४२ हजार किमी सायकलिंग आणि १११ वे रक्तदान...

४२ हजार किमी सायकलिंग आणि  १११ वे रक्तदान...
दि. ८ डिसेंबर २०२२

पंढरपुर ते पंजाब (घुमान) ही सायकल वारी नुकतीच पुर्ण झाली होती... संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज यांनी समता, शांतता आणि बंधुता हा मानव कल्याणाचा  विश्वसंदेश घेऊन भागवत धर्माच्या प्रचारासाठी संपूर्ण भारत भ्रमंती केली होती... त्यांच्या पदकमलाने पावन झालेल्या मार्गावरूनच सदरची सायकल वारी संपन्न झाली... 

याच सायकल वारीच्या अनुषंगाने ४२ हजार किमीचा सायकलिंग टप्पा लीलया पार झाला होता.. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सायकलिस्ट तसेच पालखी सोहळ्याचे सदस्य, पत्रकार, भजनी मंडळातील वारकरी, भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि नामदेव समाजोन्नती परिषद असे जवळपास दीडशे वारकरी कायमचे मित्र झाले आहेत...


 पांडुरंगाच्या कृपेने सायकलिस्ट मंडळींची सेवा करण्याची सुद्धा संधी मिळाली... त्यासाठी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री सूर्यकांत भिसे गुरुजी यांचा शतशः ऋणी आहे...

याची पुढील आवृत्ती म्हणजे.... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहासष्टव्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त सुरक्षा रक्षक दल (पाणी खाते) यांनी आज भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते... या रक्तदान शिबिरात मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित राहण्याची संधी माझे गायक मित्र श्री गणेश हेटगे यांच्यामुळे मिळाली... 

विशेष म्हणजे प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री अजित तावडे साहेब यांनी  आतापर्यंत केलेल्या रक्तदान कामगिरी बद्दल माझा सन्मान केला.
 

तर विभागीय सुरक्षा अधिकारी श्री सुशील बडेकर यांच्या समवेत मला १११ वे रक्तदान करण्याचा योग लाभला...
 

तेथील सर्व कर्मचारी वृंदाबरोबर रक्तदानाच्या माहितीसाठी सुसंवाद करण्याची संधी मिळाली...

आता मला सांगा...  सुख म्हणजे नक्की काय असत... आपल जीवन इतरांच्या कामी यावे... यातच परम सुखाची परिसीमा आहे... हाच संदेश महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवनकार्यातून मिळतो...

या दोन्ही थोर व्यक्तिमत्वांना ४२ हजार किमी सायकलिंग आणि  १११ वे रक्तदान सादर समर्पण...

मंगल हो...

सतीश जाधव...
मुक्त पाखरे... 

Sunday, October 2, 2022

सायकल वरुन भारत भ्रमंतीला निघालेला अवलिया... दि. ०२.१०.२०२२

सायकल वरुन भारत भ्रमंतीला निघालेला अवलिया ... 
 दि.  ०२.१०.२०२२

बुलढाणा जिल्ह्यातील माझा परममित्र श्री संजय मयुरे (वय ६८ वर्ष) यांनी आज महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून  २० हजार किमी ची सायकल राईड मुंबईतील गेट वे ऑफ़ इंडिया येथून सुरू केली...

ते दररोज १०० किमी अंतर पार करणार आहेत...

 मुंबई पासून कोकणमार्गे कन्याकुमारी पुढे चेन्नई आणि कलकत्ता पर्यत त्याची सायकलवारी समुद्र किनाऱ्याने होणार आहे... पुढे आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मीझोराम, नागालँड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात मार्गे परत मुंबईला येणार आहेत.

 प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा संदेश  संपूर्ण भारतभर देणार आहेत... तसेच त्यांची ही सायकल वारी देशाच्या शूरवीर जवानांना समर्पित आहे...

कुटुंबीयांची विशेष करून सौ मयुरे वहिनींची भरभक्कम साथ असल्यामुळेच संजय सायकलने परदेशवाऱ्या तसेच भारत भ्रमंती करू शकला आहे... "जी ले अपनी जिंदगी" हाच संदेश  मयुरे वहिनी देत आहेत...
या प्रसंगी माननीय श्री बजरंग बनसोडे साहेब (NIA पोलीस आयुक्त) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले... 

माणसाच्या मनात आंतरिक सकारात्मक ऊर्जा असेल तर तो कोणत्याही वयात काहीही करू शकतो... त्याचेच मयुरे काका हे उदाहरण आहे. मयुरे काकांची २० हजार किमी भारतभूमीची सायकलवारी सर्वांसाठी आदर्श असेल.. यात प्रदूषणमुक्ती तसेच फिट इंडियाचा संदेश आहे... "काका तुम्ही असेच इतिहास रचत जावेत... त्या पाऊलखुणावर चालवण्याची ऊर्जा आम्हाला सतत मिळत राहील" ... 

माननीय बजरंग बनसोडे साहेब (NIA पोलीस आयुक्त) यांनी श्री संजय मयुरे यांच्या भारतभूमीच्या सायकल वारीला हिरवा झेंडा दाखविला... 

या कार्यक्रमाला बुलढाणा रॉयल रायडर्सचे सायकल प्रेमी  तसेच संजयचा मित्रपरिवार आणि कुटुंबिय आवर्जून उपस्थित होते. 


रिगल चित्रपट गृहा समोर असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला  संजयने अभिवादन केले... 

मुंबईतून सुरू केलेल्या या सायकल वारीला समरपयामी सायकल परिवारातर्फे श्री लक्ष्मण नवले यांनी शुभेच्छा दिल्या. 

आजची संजयची ग्रेटभेट अतिशय स्फूर्तिदायी होती... 

सतीश जाधव...
मुक्त पाखरे... 

Tuesday, September 20, 2022

भेटली माऊली माझी....भेटला विठ्ठल माझा...

भेटली माऊली माझी....भेटला विठ्ठल माझा... 

शारदाश्रम शाळेतील १९७४,  एसएससी बॅच च्या आम्ही सर्व मित्रांनी शाळेतील शिक्षकांना भेटण्याचे नक्की केले. 
तो योग जुळून आला मित्र शरद पाटीलच्या अथक प्रयत्नाने. पुण्याजवळील औंधला स्थाईक झालेल्या तळवळकर बाईना भेटण्याचे नक्की झाले. मित्र गृपवर सर्वांना मेसेज पाठवला. 

आज सकाळी  एका गाडीतून माझ्यासह विकास होशिंग, कुणाल ठाकूर, कैलास गौड तर दुसर्‍या गाडीतून दिनेश नाडकर्णी, शरद पाटील, नागेश सोपारकर आणि संजय कोळवणकर पुण्याकडे निघाले. माधव केळकर थेट बाईंच्या घरी येणार होता.  गाडीत गप्पांना बहर आला. 

खालापूर टोल नाक्याजवळील फूड मॉल मध्ये प्रभु गौर गोपाल दासजी महाराजांची भेट झाली. 


शाळेतील गुरूंना भेटायला निघालो असताना आध्यात्मिक गुरुजींची भेट व्हावी हा  शुभ शकुन होता. तळवळकर बाईंना फोन लावला आणि तासाभरात पोहोचतोय... याची वर्दी दिली. उडपी फूड मॉल मध्ये  बटाटा वडापाव आणि इडली वडा सांबार वर ताव मारला. फक्कड चहा पिऊन औंधला निघालो. 

घराच्या खिडकीत आमची वाट पहात बाई थांबल्या होत्या... बाईंनी दरवाजा उघडला... शुभ्र पेहराव आणि गोर्‍यापान चेहर्‍यावर आनंदमय तेज मनाला एकदम भावले... सर्वजण नतमस्तक झालो... अठ्ठेचाळीस वर्षानंतर बाईंची भेट झाली होती... नव्वदीतील हसतमुख तळवळकरबाई क्षणार्धात आम्हा सर्वांना शारदाश्रम शाळेच्या आठवणींच्या वर्गात देऊन गेल्या... 


प्रत्येकाने आपली ओळख करून दिली आणि बाईं बरोबर व्यतीत केलेल्या शाळेतील आठवणी शेअर केल्या.  या वयात सुद्धा बाई अतिशय खुष होत्या... सकारात्मकतेचे  तेजोमय वलय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवले... सर्वजण भारावून गेलो होतो... भरभरून बोलत होतो... 

आज आम्ही विद्यार्थी झालो होतो... आवर्जून शाळेचा युनिफॉर्म घालून बाईंच्या घरी आलो होतो... तुम्ही सर्वजण आठवणीने भेटायला आलात या बद्दल त्यांना खूप खूप आनंद झाला होता... बाईंच्या घरातले सात्विक वातावरण गुरुप्रेमाच्या उत्कटतेने भारून गेले होते... शाळेतील गप्पांना बहर आला होता. मुख्याध्यापक गवाणकर गुरुजींची आठवण निघाली. शाळेत केलेल्या गमतीजमती, खोड्या... गुरुजींचा खाल्लेला मार... प्रत्येकजण भरभरून सांगत होता... ते निखळ आनंदाचे दोन तास जीवनाचा अत्युच्च ठेवा झाले होते. 


बाईंचा निरोप घेताना त्यांना सांगितलं... तुमच्या शंभराव्या वाढदिवसाला आम्ही सर्वजण पुन्हा भेटायला येणार आहोत. आनंदाचा प्रचंड साठा मनात साठवून बाईंचा निरोप घेतला... 

खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत...  ज्यांनी आम्हाला घडविले... त्यांचे प्रेम पुन्हा मिळविण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिली... 

त्या गुरुंचरणी आणि ईश्वरचरणी भावांजाली... 

चुकलो जिथं मी...  तिथं  दाविली तू वाट... 

तुझामुळं उमगलो... मीच मला थेट... 

सुखदुःख एकमेकां वाटलं वाटलं... 

भेटली गुरुमाऊली माझी....भेटला विठ्ठल माझा... 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

Wednesday, August 3, 2022

स्पिती सायकलिंग... गोष्ट किन्नोरी सफरचंद आणि टोपीची...

स्पिती सायकलिंग... 
गोष्ट किन्नोरी सफरचंद आणि टोपीची... 

काल किन्नोर जिल्ह्यातील टापरी गावात पोहोचायला रात्री साडेनऊ वाजले.  सायकलिस्ट मित्र नितीन कुमारचा मेसेज वाचला... त्याला  किन्नोरी टोपी हवी होती... हॉटेलच्या मालकाला टोपी बद्दल विचारले. शेजारच्या  ईमारतीत टोपीचे दुकान होते.

सकाळी लव कुश हॅन्डलुम दुकानात गेलो. हिरवा पट्टा असलेल्या बर्‍याच किन्नोरी टोप्या पाहिल्या. कुलू टोपीना लाल पट्टा असतो तर किन्नोरी टोपीला हिरवा पट्टा... येथे पुरुषांबरोबर महिला सुद्धा हीच हिरवट टोपी वापरतात... या टोपीला डोक्यात घालण्याची एक विशिष्ट पद्धत आहे... कुल्लू टोपी डोक्यात सरळ घातली जाते तर किन्नोरी टोपी तिरकी घालतात...

नितीनला टोपी घेताना, स्वत:साठी पण टोपी घेतली...  

मालक भूपेश म्हणाला, 'किन्नोर की एक खास चीज दिखाता हुँ" एक शाल दाखवीली... तसेच जाकिट पण दाखविले... हे दोन्ही पेहराव परिधान करून डोक्यात किन्नोरी टोपी घातली... आणि सगळा लूक बदलून गेला... 

भूपेशने सांगितले," सदर शाल आणि जाकिट लग्न समारंभात किंवा सणासुदीला घालतात"... शालीची  किंमत बावीस हजार आणि जाकिट अडीच हजार रुपये... किंमत ऐकून चाट पडलो... भूपेश म्हणाला, "बरीच बारीक बारीक कलाकुसर केलेली ही हाताने विणलेली शाल आहे ... ही शाल बनवायला विणकराला तीन महिने लागले... किन्नोरी वेषभूषा करून फोटो काढले. आता दुकानात गर्दी वाढत होती. दोन महिला आल्या.. त्यांनी पण किन्नोरी टोपी घातली होती..  स्थानिक माणसे भारतीय संस्कृती कटाक्षाने जपतात याची जाणीव झाली... 

 टापरी वरुन चितकूलकडे सायकलिंग सुरू झाली. आजची सफर फक्त तेवीस किमी होती. पण पूर्णपणे चढाची होती. खर्चम पुलाजवळ पोहोचलो. येथून एक रस्ता रीकॉगपिओ कडे... तर पुलावरून पलीकडे जाणारा रस्ता चिटकुल कडे जातो. 
बस आली म्हणुन तेथील लाकडी बाकडे खाली झाले. संजयसह तेथे बसलो असताना तीन किन्नोरी महिला तेथे आल्या त्यांनी पण टोप्या घातल्या होत्या.  

संजयच्या बॅगेतून  मोठे सिमला सफरचंद  काढून कापले... आणि  शेजारी बसलेल्या महिलांना देऊ केले... त्या घेईनात... आग्रह केल्यावर सफरचंदाच्या  फोडी घेतल्या... ईतक्यात एका महिलेने बॅगेतून रसरशीत किन्नोरी सफरचंद काढले. "ये खाँवो आप सिमला सफरचंद भूल जाओगे. खरंच अप्रतिम मिठास होती... 

थोड्याच वेळा पूर्वी किन्नोरी सफरचंद खायला मिळावे अशी ईच्छा संजय कडे व्यक्त केली होती. 

बॅगेतील नवीन किन्नोरी टोपी त्या महिलांना दाखवली...  त्या टोपीला फुल कसे लावायचे हे आजीने  शिकविले...  किन्नोरी टोपी घेतल्या बद्दल आजीला अपरूप वाटले... तिच्या बरोबर फोटो काढला. स्पिती सायकल वारी साठी आजीचा आशिर्वाद मिळाला... 

सखीने किन्नोरचे अंतरंग दाखविले होते... 

खऱ्या अर्थाने किन्नोरी रंगात रंगलो होतो... 


सतीश जाधव 

मुक्त पाखरे... 

Saturday, July 23, 2022

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी २५ जून २०२२


आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी 
२५ जून  २०२२

बुधी मधील कुमाऊ मंडळ विकास निगमचे रेस्ट हाऊस डोंगराच्या कपारीवर वसलेले होते. सकाळी संपूर्ण परिसर धुक्याने व्यापला होता. आज समोरचा   खडा पर्वत चढून जायचे होते. 

सकाळी साडेसात वाजता दुसरा टप्पा सुरू झाला.  ह्या टप्प्यात साडेसात किमी उभा चढ छियालेक पर्यंत होता. अतिशय धीम्या गतीने सखीची चढाची सफर सुरू झाली.  


येथे सुद्धा रस्त्याची कामे जोरदार सुरू होती. ॐ नमः शिवायचा घोष सुरू केला. कामगारांचा त्याला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे काही वेळ थांबावे लागत होते.

जेसीबी, बुलडोझर यांचे धाडधाड  वाजणे म्हणजे जणूकाही ते हिमालयाशी कुस्ती खेळत होते. अतिशय बाकदार वळणे आणि उंच चढ एकदम अंगावर येत होते. 


काली नदीचा आवाज आता लुप्त झाला होता. काही ठिकाणी डांबरी रस्ता दिसत होता तर काही ठिकाणी मातीने माखलेला खडबडीत रस्ता होता. 

 या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेले होते. नवीन रस्ता बनविण्याबरोबर रस्त्यावरचा मलबा साफ करणे... ही कामे अतिशय चिकाटीने सुरू होती. काही ठिकाणी चिखल मिश्रित रस्ता होता. या चिखलात सायकलची चाके जमिनीत रुतत होती... सायकल चालवणे तर सोडा... ढकलणे सुद्धा कठीण होत होते... अशा वेळी कामगार तत्परतेने मदत करीत होते... 

वर चढत जाणार्‍या घाटात वळणे घेऊन घेऊन दमलो पण वळणे संपायचे नाव नव्हते. तब्बल बावीस वळणे लागली. छियालेख परिसर जवळ आल्याची चाहूल लागली लांबवर आर्मी कॅम्प दिसू लागला. अचानक रस्त्यातच मोठे पाण्याचे डबके लागले.

अंदाज येईना.. किती खोल आहे ते... अशा डबक्यात चिखल असेल तर... सखी त्यात अडकून पडण्याची शक्यता होती...  एका बाजूला खोल दरी तर दुसर्‍या बाजूला दगडांची कपार... सखीने टांस घेतला... डोंगराच्या किनाऱ्याने डबक्यावर चढाई केली... सखीची अर्धी चाकं पाण्यात गेली... पेडलला पाणी लागले... अक्षरशः पेडल बोटी सारखी अवस्था झाली. आता थांबणे म्हणजे नव्या संकटाला आमंत्रण देणे होते. पाण्यात चिखल असल्यामुळे प्रचंड ताकदीने पेडलिंग करत होतो. सखी धीम्या गतीने पुढे सरकत होती. पुढचा काठ जवळ आला... आणि कचकन सखी थांबली... चाके चिखलात रूतली होती... गुढगाभर पाय चिखलात गेला... कशीबशी सखी सावरली... जोरदार रेटा देऊन सखीला बाहेर काढले... प्रचंड दमछाक झाली होती... दोन्ही पाय आणि बूट चिखलाने माखले होते... सखीच्या दोन्ही चाकात आणि डिरेलर मध्ये चिखलाचा थर जमला होता... कसाबसा सखीसह बाहेर आलो. प्रचंड खडतर सफर होती... 

आता  अतिशय उंचावरील खडकाळ रस्त्यावर आलो होतो. ढगांनी  संपूर्ण खोलवरची दरी व्यापून टाकली होती.

जणूकाही समोरील रस्ता स्वर्गारोहण करीत होता. निसर्गाच्या या बेभान आविष्काराचा भाग झालो होतो. त्या निसर्गात रममाण झालो... 

कवडसे... ढगांचे.... 

लपंडाव... धुक्याशी... 

खेळ उन्हाचा... 

सोनुल्या सावल्याशी...

किती सुंदर आहे !!

धरेवरचा स्वर्ग... 

बारा हजार फुटा वरील छियालेख जवळ पोहोचलो होतो. प्राणवायुची कमतरता जाणवायला लागली होती ... परंतू  समोरील मनोरम दृश्याने सगळा थकवा अदृश्य झाला होता...

साडेसात किमीचा घाट चढायला तब्बल साडेतीन तास लागले होते. जवळच्या एका झऱ्याखाली सखीला स्वच्छ केले... पाय आणि बूट धुतले... 

आता सपाटून भूक लागली होती... दूर उंचावर एक मंदिर दिसले...

मंदिरापर्यंत आणखी वर चढण्याचे त्राण नव्हते. जवळच्या गावाकडे जायचे ठरवले आणि  छोटा चढ चढून छियालेख चेक पोस्टकडे आलो...

इतक्यात लांबून कोणीतरी हाक मारली... एक जवान पळत पळत माझ्याकडे येत होता... "ये रस्ता आर्मी कॅम्पमे जाता है" "गुंजी की तरफ जानेका नीचेवाला रस्ता है" त्या जवानाची माफी मागितली... महाराष्ट्रातून आलोय हे कळल्यावर त्याचा चेहरा खुलला... नागपूरच्या सुरेंद्र चव्हाणची भेट झाली होती...  आर्मी कॅम्प मध्ये सुरेंद्र घेऊन गेला... कॅप्टन रावत यांची ओळख झाली... त्यांनी जेवून जाण्याची विनंती केली... खरचं  जेवणाची व्यवस्था कैलास महादेवाच्या कृपेनेच झाली होती. राजमा, भात, पालेभाजी, दही कोशिंबीर, चपात्या असे राजेशाही जेवण झाले... बरेच जवान चौकशी करायला आले होते... एकट्याने आदी कैलास सायकल वारी करतोय याचे त्यांना अप्रुप वाटत होते. सर्व जवानांच्या शुभेच्छा स्विकारुन पुढे पेडलींग सुरू झाले... 

वाटेत चेक पोष्टवर परमीट तपासले गेले... पुढचा रस्ता वरखाली वरखाली असा रोलींग होता. परंतू चिखल मिश्रित असल्यामुळे अतिशय सावधपणे पुढे पुढे जात होतो. आता रस्ता हळूहळू खाली उतरत चालला होता. काली नदीच्या उगमाच्या दिशेने मार्गाक्रमण सुरू होते. निसर्गाची विविध रूपे पाहायला मिळत होती. हिरवळीचा प्रदेश आणि त्यातून वहाणारी काली नदी हे सर्व दृश्य स्वप्नातीत वाटत होते. 

हिरवाई आणि निळाई यांचा अद्भुत संगम झाला होता...

 धवल मेघांनी आच्छादलेले आकाश... 
 
हिरव्या डोंगर रांगांनी आणि वृक्षांनी वेढलेली काली नदी !!!

केवळ अप्रतिम... 

किती आणि काय काय मनोहारी पाहायचे...

मन भरत नव्हते...

 सरळ पुढे पुढे जाणारा रस्ता अकरा हजार फुटा वरचा असल्यामुळे दीर्घ श्वास घेऊन दमदार पेडलींग करावे लागत होते. बर्‍याच ठिकाणी लॅन्ड स्लाईड झाल्यामुळे रस्ता डोंगराच्या वरच्या भागाकडे वळविला होता.

ही राईड सर्व सामानासह करीत असल्यामुळे चढावर दमछाक होत होती. नपलचू घाट सुरू झाला. दोन किमीचा छोटासा घाट चढायला सुद्धा अर्धा तास लागला. 

 नपलचू गावात पोहोचलो. जीवनसिंगच्या देवभुमी होम स्टे मध्ये चहा घेतला.  जीवनसिंग तेथेच राहण्याची विनंती करत होता. पण ट्रेकर मित्र अंबरीष गुरव गुंजीला भेटणार असल्यामुळे नदी ओलांडून गुंजीकडे निघालो. गुंजीच्या गोविंदसिंग गुंजीयालच्या होमस्टे मध्ये एकटा सायकलिस्ट म्हणून रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नास्त्यासह सहाशे रुपयात खाशी व्यवस्था झाली होती. निसर्गरम्य गुंजी गाव साडे अकरा हजार फुटावर आहे. 

अंबरीषला भेटायला कुमाऊ विकास निगमच्या रेस्ट हाऊस मध्ये गेलो. अंबरीष अजून गुंजीला पोहोचला नव्हता.  टूर टू टेंपल या पॅकेज मध्ये जवळपास चाळीस यात्रेकरू तेथे आले होते. काही वयस्क मंडळी जाकिट कानटोपी ईत्यादी सर्व गरम कपडे घालून उन्हात बसले होते. प्राणवायूची कमतरता त्यांना जाणवत असावी... त्यांची मेडिकल टेस्ट होणे आवश्यक होते. 

सरकारी कैलास मानसरोवर यात्रा करणार्‍या यात्रेकरूंसाठी गुंजी गाव म्हणजे महत्त्वाचा टप्पा असतो. सर्व यात्रेकरुंची येथे अंतिम मेडिकल टेस्ट होते... जे या टेस्ट मध्ये पास होतात त्यांनाच कैलास मानसरोवरची यात्रा करता येते. 

सायंकाळी अक्षय दुबे आणि नयन तिवारी या दोन तरुण सायकलिस्टची भेट झाली. या दोघांनी पिठोरागड वरुन  सायकलींग सुरू केली होती आणि आदी कैलास दर्शन घेऊन ते आज गुंजीला पोहोचले होते. अक्षयने हेल्मेट न घालता ही सफर केली होती. त्याला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याचे सांगितले. परंतु त्याच्या बोलण्यात अति आत्मविश्वास जाणवला. उद्या ते ओम पर्वतकडे सायकलिंग करणार होते. येथे बागेश्वरच्या अरविंद आणि मनोज या मोटरसायकलीस्टची भेट झाली. रात्री शेकोटी भोवती ऊब घेत सर्वांना सायकलिंगचे अनुभव... किस्से सांगितले. अरविंदने बागेश्वरला येण्याचे आमंत्रण दिले. आजची फक्त चौतीस किमीची सफर अतिशय कठोर होती. 

अशा प्रवासाची एक गम्मत असते काही वेळासाठी भेटणारे निसर्गप्रेमी कायमचे मित्र होतात.

रात्री निद्रा देवीने कधी घेरले हे कळलेच नाही... 

ॐ नमः शिवाय!!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे...