Wednesday, November 4, 2020
श्री भीमाशंकर सायकल वारी... दिवस दुसरा
Saturday, October 31, 2020
श्री भीमाशंकर सायकल वारी...दिवस पहिला
Friday, October 16, 2020
सत्तीपट्टान विपश्यना
सत्तीपट्टान विपश्यना
दि. ०२.०४.२०१९ ते १०.०४.२०१९
सतिपट्टान म्हणजे विपश्यनेचा सूक्ष्म अभ्यास. हा अभ्यास करण्याचा योग वरील कालावधीत धम्मगिरी, इगतपुरी येथे आला. हा अभ्यास करण्यासाठी दहा दिवस विपश्यनेचे पाच कोर्स करणे आणि एक वेळ दहा दिवस धम्म सेवक म्हणून सेवा देणे अनिवार्य आहे.
सति म्हणजे सजगता, जागरूकता आणि
पट्टान म्हणजे प्रतिष्ठापन...
म्हणजेच "जागरूकतेचे प्रतिष्ठापन" याचा अर्थ आपण करत असलेल्या कर्माप्रती सतत सजग असणे...
विपश्यनेची चार स्मृती प्रस्थानें आहेत. त्याचा अभ्यास सतिपट्टानाच्या अनुषंगाने करता येतो.
कायानुपश्यना .... शरीराच्या अंगाने
वेदनानुपश्यना..... संवेदनांच्या अनुषंगाने
चित्तानुपश्यना ...... मनाच्या अनुषंगाने
आणि
धम्मानुपश्यना ..... धर्माच्या म्हणजेच निसर्ग नियमांच्या अनुषंगाने
विपश्यनेच्या या सूक्ष्म अभ्यासात, आपल्याला, स्वतः बद्दलच्या जागरूकतेला अंतिम सीमेपर्यंत प्रतिष्ठापित करण्याचे काम करता येते. त्यामुळे आपल्या संबंधीचे (शरीर आणि मन) सर्व सत्य प्रकाशात येते. ते सुद्धा स्वतःच्या अनुभूतीने; हे सर्व सत्य आपल्या साडेतीन हाताच्या कायेमध्ये प्रत्यक्ष ज्ञानाने प्रकट होते.
विपश्यना म्हणजे स्वतःला विशेष रीतीने पाहणे. याची सुरुवात "आनापान" द्वारे होते. नाकपुड्यातून आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मन एकाग्र होते. त्या नंतर ह्या एकाग्र झालेल्या मनाला नाकपुड्याच्या खाली तसेच वरील ओठाच्या वर होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष देण्याची कामगिरी दिली जाते. हा अभ्यास सतत तीन दिवस केल्यावर चौथ्या दिवशी विपश्यना दिली जाते.
आनापानाची पुढील पायरी विपश्यना आहे. यामध्ये सूक्ष्म झालेले मन टाळूवर, ब्रम्हरंघ्रावर नेऊन तेथे होणाऱ्या संवेदना मनचक्षुने पहायच्या असतात. त्यानंतर मन संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवावर नेऊन तेथील संवेदना समता भावाने, स्थितप्रज्ञतेने पहायच्या. सुखद किंवा दुःखद संवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. याद्वारे शरीरात आणि मनात चाललेल्या घडामोडींची अनुभूती होते. ही झाली विपश्यना साधनेची व्यवहार्य बाजू.
विपश्यना एक विद्या आहे, जिच्या नियमित साधनेमुळे आपण शांतीचे निरामय जीवन जगू शकतो.
अडीच हजार वर्षांपूर्वी "सिद्धार्थ गौतम" याने या विद्येचे पुनरुज्जीवन केले आणि विपश्यना साधना करून वयाच्या ३५ व्या वर्षी निर्वाण (अरहत) अवस्था प्राप्त केली. जन्म मरणाच्या भवचक्रातून तो मुक्त झाला, सम्यक संबुद्ध झाला. ही विद्या त्याने पुढील ४५ वर्ष सर्व मानव समाजाला वाटली. या कालावधीत हजारोनी निर्वाण अवस्था प्राप्त केली, तर करोडो गृहस्थाश्रमी आणि भिक्षुक, आसक्तीमुक्त आणि क्रोधमुक्त अवस्था प्राप्त करून सुखशांतीचे जीवन जगू लागले. ह्या विद्येचा प्रसार प्रचार भारतासह कंबोडिया, थायलंड, लाओस, श्रीलंका, ब्रम्हदेश या पूर्वेकडील देशात सुद्धा झाला.
त्या पुढील ५०० वर्षानंतर ही विद्या भारतातून लुप्त झाली. ब्रह्मदेशात हीच विद्या गुरुशिष्य परंपरेने तिच्या मूळ आणि शुद्ध रुपात टिकून राहिली. ही विद्या भारतात १९६९ साली पुन्हा श्री. सत्यनारायणजी गोयंका यांनी आणली आणि आता तिचा प्रचार प्रसार भारतात आणि भारताबाहेर सुद्धा होत आहे.
विपश्यनेचे पाहिले निवासी केंद्र इगतपुरी येथे १९७६ साली बांधले गेले. आता भारतात आणि जगभरात मिळून एकूण १८५ विपश्यना केंद्र आहेत. लाखो व्यक्तींनी विपश्यनेचा अभ्यास, साधना करून आपले जीवन सुख, शांतीमय केले आहे.
आपल्या जीवनात येणाऱ्या जवळपास ९९ टक्के व्याधी, आजार मनोविकारामुळे (सायको सोमॅटीक आजार) निर्माण होतात. डायबिटीज, रक्तदाब, मायग्रेन, हृदयविकार, अर्धांगवायू, ब्रेन हामरेज इत्यादी सर्व आजार मानसिक ताणतणावामुळे निर्माण होतात. जीवनात ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण आसक्ती आणि क्रोध हे आहे. आसक्ती आणि क्रोध हे दोन्ही रिपू बाहेरील गोष्टीवर अवलंबून नसून ते आपल्या मनातच असतात; यांची जाणीव विपश्यना साधनेमुळे होते. त्यामुळे विपश्यना साधनेद्वारे आसक्ती आणि क्रोध या पासून मुक्तता मिळविता येते आणि जीवनात सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होते.
स्त्री असो किंवा पुरुष, धनवान असो की गरीब, हिंदू असो की मुस्लीम किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही प्रांताचा असो की कोणत्याही देशाचा असो; प्रत्येकाला सुख समाधान आणि शांती हवी असते. हे सार्वजनिन त्रिकालाबाधित सत्य आहे.
प्रत्येकाला रात्रीची निवांत झोप हवी असते. पण असे घडते का? याचे मूळ कारण आहे, मानसिक अशांतता आणि ताणतणाव; तसेच आसक्ती आणि क्रोध. विपश्यना जीवनात निर्माण होणाऱ्या दुःखातून बाहेर पडण्याची कला शिकवते. त्यामुळे आपण तर सुखी होतोच असेच आपले कुटुंब, समाज, देश आणि सारे विश्व सुखी होते.
विपश्यना " बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हाच संदेश सर्व विश्वाला देते. निसर्ग नियमांचे पालन आपल्या जीवनात कसे करायचे याचे प्रशिक्षण देते. धर्माचे पालन करणे म्हणजेच निसर्गाचे नियम आपल्या जीवनात उतरविणे. या निसर्ग नियमाच्या विपरीत वागला की ताणतणावाचे दुःख होते तर अनुरूप वागण्यामुळे शांतीचे सुख मिळते.
विपश्यना जीवन जगण्याची कला तर शिकवतेच तसेच मरणाला सुद्धा कसे सामोरे जावे ही मरण मरण्याची कला सुद्धा शिकविते.
मंगल हो !
*सतीश विष्णू जाधव*
Wednesday, October 14, 2020
भरत भेट सायकल राईड
Monday, October 12, 2020
सिद्धिविनायक राईड
Thursday, October 8, 2020
ईशावास्योपनिषद भाग तीन कर्मयोग
ईशावास्योपनिषद भाग तीन
कर्मयोग
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत् शतं समाः।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥
मनुष्याने या जगात कर्म करतांना शंभर वर्षे आनंदाने जगण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे. जो आपली विहित कर्मे योग्य प्रकारे करीत असतो त्याला त्या कर्माचे बंधन कधीही नडत नाहीत.
ईशावास्य उपनिषद हे 'कर्मयोग' सांगते. परंतु जी कर्मे फलदायी वाटत नाहीत ती कर्मे आपण टाळतो आणि ज्या कर्मामुळे आपल्याला धन, कीर्ती, लौकिक मिळत असेल अशी कर्मे करायला आवडतात. पण जेथे आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेथे निराशा येते, जीव क्रोधाने, लोभाने जळू लागतो.
उपनिषदात फलाची अपेक्षा न करता कर्म करावे असे सांगितले आहे. परंतु या जगात मृत्यूपर्यंत सकाम कर्म करावे लागते असे सांगत त्याचाही निषेध केलेला नाही. निष्काम कर्म अधिक चांगले हे मात्र सांगितले आहे. निष्काम कर्म आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून अर्थात भवचक्रातून सोडविण्यास उपयुक्त ठरते असे हे उपनिषद सांगते.
'सकाम कर्म' म्हणजे फळ साध्य करण्यासाठी केलेले कृत्य.
'निष्काम कर्म' म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म.
कर्मयोगानुसार निष्काम कर्म केल्यामुळे फळ चांगले मिळो अथवा वाईट, कर्मयोगी... ना चांगले फळ मिळाले म्हणून आनंदी होत, ना वाईट फळ मिळाल्यामुळे दुःखी होत. तो सुख आणि दुःखाच्या पलीकडची स्थिती, ज्याला सच्चिदानंद म्हणतात, त्याची अनुभूती घेत असतो. जेव्हा निस्पृहतेने कर्म केले जाते, तेव्हाच हे शक्य होते.
कर्म करताना फळाची इच्छा धरली तर त्याला सुख किंवा दुःखाचे फळ प्राप्त होते आणि ती व्यक्ती कर्मफलाच्या बंधनात बांधली जाते.
कर्म कधीही सोडता येत नाहीत, पण बंधनातून अलिप्त असे कर्म करता येते. म्हणून उपनिषद सांगते ‘ विहित कर्म करा’ जसे की नित्याच्या श्वासोच्छवासा प्रमाणे कर्म अगदी सहज, अनायास घडते आहे.
"विहित कर्म" जसे की लहान बाळ भूक लागली की मोठ्याने रडते. जे मिळेल ते चोखून घेते. जे घेतले आहे, ते पचविणे आणि झोपणे, ही त्याची विहित कर्मे आहेत. पण तो जसा मोठा होतो तशी त्याची विहित कर्मे बदलत जातात. रांगणे, बसणे, बोलणे ही त्याची विहित कर्मे होतात. नंतर तो विद्यार्थी होतो. आता तो पाळण्यात झोपणार नाही, पांगुळगाडा चालविणार नाही. अध्ययन त्याचे विहित कर्म होईल. नंतर तो कुटुंबाचे पालन पोषण करणारा जबाबदार गृहस्थ होईल. अशा प्रकारे विहित कर्मे बदलतात. पहिली कर्मे सहज सुटली जातात.
परंतु जेव्हा बुद्धी चालायला लागते, वासना विकारांचा लेप त्यावर चढतो, तेव्हा मी - माझे, आवड-निवड सुरु होऊन विवेकबुद्धी लोप पावते. येथे विहित कर्म विकारग्रस्त होते आणि मग मनासारखे झाले नाही की अपयश भेडसावू लागते. जगणे निरस होते. मन निराशेने लिप्त होते.
सत्य हे सुवर्णाच्या झाकणाने झाकलेले असते असे हे उपनिषद सांगते. सत्य समजून घ्यायचे असेल तर सुखदु:खापलीकडे जावे लागते. परंतु मनुष्य सुखाचा अनुभव सोडायला तयार नसतो. या अनुभवाची तो पुन: पुन: प्रतीक्षा करतो. लोभामुळे या सुखाची तो पुन्हा पुन्हा अपेक्षा करतो . सत्य जाणून न घेता सत्यावरील सुवर्ण झाकणाच्या मोहात पडतो आणि सत्याच्या अतीव आनंदाला मुकतो.
कर्मफलातून मिळालेल्या सुखालाच तो शाश्वत आनंद मानतो. परंतु ह्या सुखाचा जेव्हा लोप होतो तेव्हा दुःखाची निर्मिती होते.
सुखाच्या अनुभवालाही दूर लोटून माणूस पुढे जातो तेव्हाच त्याला शाश्वत सत्याचा बोध होतो. यालाच "सच्चिदानंद" म्हणतात.
सर्व ईश्वराचेच आहे, 'माझे' म्हणण्यासारखे जगात काहीच नाही. म्हणून “ मी – माझे ” याला काहीच अर्थ नाही. 'मी' हा 'माझे' या भावनेवर पोसलेला असल्याने 'मी'पणाही निरर्थक आहे, हेच हे उपनिषद आग्रहाने सांगते. जसे की ... आजची भाकरी मी खाल्ली उद्याची मिळणार आहे. म्हणून भरून ठेवलेले धान्य रोज कोणी मोजत नाहीत. हे माझे आहे असा जपही करत नाहीत. त्याचा विनियोग आवश्यक तेव्हा करतो. वेळेला सर्वांच्या उपयोगासाठी करतो. त्याचा ध्यास सोडून देतो.
काम करणे अगत्याचे आहे की नाही ते पाहणे महत्वाचे आहे. ते काम जरुरीचे असेल तर करताना सर्व चित्तवृत्ती गुंतल्या पाहिजेत, तरच ते काम सुरेख होते. परंतु बऱ्याच वेळेला आपल्या वाट्याला आलेले काम हीन दर्जाचे वाटते. दुसऱ्याला मिळालेले सगळे चांगले वाटते. त्याचे घर, त्याचे ऐश्वर्य, त्याची मुले चांगली वाटतात. तुलना करून मन दुषित करणे, पुन्हा त्यात ‘मी’पणा कालवून कामाचे रूप बिघडवून टाकणे, या मुळेच नातेसंबध दुरावतात.
आपल्याकडे येणारी कामे प्रसन्न मनाने कुशलतेने करणे हा ‘योग’ आहे, यज्ञ आहे. कृतज्ञता मनात ठेऊन कर्म करणे म्हणजे यज्ञ होय. जेवणाच्या अगोदर आपण प्रार्थना करतो “ उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ” आपल्या जठराग्नित दिलेली ती आहुती आहे. मग जिभेचे चोचले राहत नाहीत. अन्नाला नावे ठेवणे, नासधूस करणे हे घडत नाही. स्वयंपाक करणे ही यज्ञकर्माची पूर्वतयारी आहे. ते आनंदाने, प्रेमाने केले की आपोआप रुचकर, पुष्टीकर होईल.
उपनिषदात सांगितल्यानुसार जीवन जगताना .. करावी लागणारी / निवड केलेली कामे आनंदाने, कुशलतेने, कुणाशीही तुलना न करता , 'मी' पणा दूर सारून केल्यास आनंदात शंभर वर्षे जगणे सहज सुकर होईल.
// श्री कृष्णार्पणमस्तु //